Wednesday 29 February 2012

पुणेरी मॅकडोनाल्ड्'स



 


'पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर....

 
1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.

2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)

3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.

4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.

5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.

6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.

7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (
मोठा साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, लहान: ४६ फ्राईज)

8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)

9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.

10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.

11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.

12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.

14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.

15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)

16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)

17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.

18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. 






आयपीएल आणि पुणे टीम




पुणे टीम इन आयपीएल


शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची आय पी एल टीम आली. आता २०११ च्या खेळात ही टीम सहभागी सुद्धा होणार आहे पुणे वोरीअर्स नावाने.
एक भविष्यातले पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही पुणेरी पाट्या लागोलाग तयार करुन ठेवत आहोत पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

ह्या पाट्या आहेत त्या मैदानावरच्या
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.

६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
१४. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
१५. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
१६. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
१७. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
१८. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
१९. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
२०. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
२१. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

ह्या पाट्या आहेत त्या आयपीएल पुणे संघाच्या कार्यालयातल्या
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्‍या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
४. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
५. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
६. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
७. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
८. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
९. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
१०. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
११. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये 





विठुरायाचा खजिना

 -----------------





उन्हं कलली. दिवस सांजावला.
 
खांद्यावर कांबळं घेतलेला, एका गाठीच्या शिसवी लाकडासारख्या घोटीव देहाचा, रापलेल्या कांतीचा सावळा विठुराया राऊळाच्या पडवीत आला. हातापायावर गारेगार पाणी घेतलं, थोडं अंगावर शिंपडून तोंडावरून हात फिरवला, तसं त्याला बरं वाटलं. ‘‘परमेश्वरा, पांडुरंगा..’’ असं आपसूक ओठांवर आल्यावर तो हसला आणि वळला आणि आश्चर्यचकित झाला. आज नेहमीच्या जागी पाण्याचा गडगा तर ठेवलेला होता.. पण, दाराशी ओठंगून उभी राहिलेली हसरी रखुमाई मात्र नव्हती. ‘‘काय गडबड झाली काय जणू..’’ असं स्वत:शीच पुटपुटत त्यानं गडगा उचलला आणि घटघटघटघट एका घोटात घशाखाली रिता केला, तेव्हा जरा थकवा आल्यासारखं वाटलं. आतून भांडय़ांचे आवाज येत होते. नेहमीपेक्षा थोडे जास्त खणखणीत. तेव्हाच विठुरायाच्या लक्षात आलं की गाभा-याचं कोपगृह झालेलं दिसतं.
 
‘‘अहो, ऐकलंत का.. कोपभर च्या मिळेल का?’’
 
‘‘का नाही मिळणार? साखर, दूध, चहाच्या किमती आभाळाला भिडल्या तरी कोपभर च्या देईनच की ढोसायला?’’ रखुमाईनं कप आणून विठुरायासमोर आदळलाच.
 
‘‘च्या जरा कडक झालाय आज..’’ गालातल्या गालात हसत विठुरायानं खडा टाकला.
 
रखुमाईनं लागलीच तोफ डागलीच, ‘‘कडक होईल नाहीतर काय? बायकोचं काय दुखतंय खुपतंय.. आमच्या बाबाला काही चिंता नाही.. त्यांचं ध्यान चहावर.. सुंदर ते ध्यान..’’
 
‘‘एकदम आमच्या ध्यानावर घसरू नका. काय गडबड झालीये ती बैजवार सांगा.’’
 
उत्तरादाखल रखुमाईनं विठुरायांसमोर ताजा पेपर आदळला.
 
विठुरायानं बातमीचं शीर्षक वाचलं, ‘‘विठुराया गरीबच.. यंदाच्या वारीत अवघ्या ८६ लाख रुपयांची कमाई..’’ रखुमाईकडे पाहून चिडवण्याच्या सुरात विठुराया म्हणाला, ‘‘आबाबाबा, 86 लाख म्हंजे आठावर सहावर किती शून्यं तेही मोजता येणार नाही आपल्याला. फारच श्रीमंत झालो आपण.’’
 
‘‘देवा रे देवा, काय करू आमच्या या भोळय़ा माऊलीला,’’ रखुमाई कडाडली, ‘‘अहो जग कुठं चाललंय आणि तुमचं ध्यान कुठंय? अहो, इतक्या देवांच्या मंदिरांवर सोन्याचे कळस चढले, मी गप्प बसले. कोणाच्या अंगावर किलोकिलोंचे सोन्याचे दागिने चढले, कित्येक देव हि-यामोत्यांच्या अलंकारांनी मढले, मी गप्प बसले. अख्खी हयात ज्यांनी फकिरासारखी घालवली, त्यांना रत्नजडित सिंहासनं मिळाली, मी गप्प बसले. पण, आता नाही हो गप्प बसवत. कोण कुठला हातचलाखीची जादू करणारा बाबा- त्याची हजारो कोटींची संपत्ती. कालपर्यंत हृषिकेशमध्ये सायकल मारत फिरणारा बाबा मंचावर उभा राहून बिनसायकलीचे हातवारे आणि पायवारे करायला लागला- तो गेला हजार कोटींच्या घरात. आता त्या पद्मनाभाच्या मंदिरात तर अख्ख्या देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडलीये म्हणतात. आणि आमचे हे- एवढय़ा मोठय़ा वारीत अवघे 86 लाख रुपये जमा झाले, तर म्हणे केवढी मोठी रक्कम-जसा टिपिकल मराठी माणूस, तसाच त्याचा देव.’’
 
‘‘अगं हळू हळू..’’ विठुरायानं हात रखुमाईच्या तोंडावर नेला, ‘‘त्या मराठी अस्मितावाल्यांच्या कानावर गेलं तुझं बोलणं तर काय होईल. आमचा विठुराया असा गरीब कसा, म्हणून आकाशपाताळ एक करतील. सतत दुख-या आणि किरकि-या मराठी अस्मितेला आवाहन करून माझ्या भाबडय़ा भक्तांना लुबाडतील. आपलं पंढरपूर आहे तसंच राहील आणि यांच्या बंगल्यांवर मात्र सोन्याचे कळस चढतील.’’
 
‘‘कित्ती काळजी गं बाई या देवाला त्याच्या भक्तांची,’’ रखुमाई कृतककौतुकानं म्हणाली, ‘‘पण, भक्तांना त्याची काही कदर आहे का? तिकडे त्या देवांचे भक्त पाहा, 
आपापल्या देवाला, सत्पुरुषाला सोन्यारूप्यानं मढवतायत, त्याच्यावर नोटा-नाण्यांचा वर्षाव करतायत..’’
 
‘‘..आणि त्याची कृपा विकत घेतायत. हा रोकडा व्यवहार आहे रखुमाई, व्यवहार,’’ आता विठुरायाचा स्वर काहीसा कठोर झाला, ‘‘याला का भक्ती म्हणतात? मला पास कर, तुला अमुक देईन. मला पैसे मिळवून दे, तुला तमुक देईन. माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुला ते वाहीन. अरे, हा देव आहे की कमिशन एजंट? जिकडेतिकडे लाच खाण्याची आणि लाच देण्याची सवय झालेले हे नादान लोक साक्षात परमेश्वराला लाच देऊ पाहतात. ही क्षुद्र लाच त्या विश्वरूप परमात्म्याच्या काही उपयोगाची नाही, हे ऊठसूट अध्यात्माच्या बाता मारणाऱ्या या दगडांच्या ध्यानातही येत नाही की हे निगरगट्ट पैशानं पुण्य विकत घेऊ पाहतायत, हे कोडं आजवर मलाही उलगडलेलं नाही. हा असला देवाचा काळा पैसा मग देवळांचे दुकानदार बनून बसलेल्या दलालांच्या खिशात खुळखुळतो नाहीतर देवळांतल्या अंधा-या खोल्यांमध्ये सडतो. काय उपयोग असल्या भक्तांचा आणि त्यांच्या विकाऊ भक्तीचा? मला माझ्याकडचा खजिनाच पुरेसा आहे..’’
 
‘‘काय सांगताय? तुमच्याकडे खजिना आहे!.. मला कधी बोलला नाहीत ते.. कुठे दडवून ठेवलायत सांगा.’’ रखुमाईनं अधीरतेनं विचारलं.
 
‘‘इथे दडवून ठेवलाय इथे,’’ आपल्या छातीवर वळलेली मूठ आपटत विठुराया म्हणाला, ‘‘माझ्या भोळ्या भक्तांच्या सच्च्या भक्तीभावाचा खजिना. जरा विचार कर. नवससायास, गंडेदोरेताईत, बुवा-बापू-बाबा-महाराज, कर्मकांडं यांनी बुजबुजलेल्या या देशात माझ्यासारखा ‘निरुपयोगी’ देव आहे आणि त्याचे भक्तही आहेत, हेच आश्चर्य नाही का? ना मी त्यांच्या नवसाला पावत ना त्यांच्या काही इच्छाआकांक्षा पूर्ण करत. दगडाच्या मूर्तीत बद्ध झालेला कोणताही देव कोणालाही काही देऊ शकत नसतो, याचं भान माझ्या या अडाणी भक्तांना आहे. तरीही ते माझ्यात सखा पाहतात, बाप पाहतात आणि मायही पाहतात. आपल्या शेतात, कामात, औजारात, गाईगुरांत, बायकापोरांत मला पाहतात. कधी सवंगडय़ाशी कराव्यात, तशा सुख-दु:खाच्या चार गोष्टी करतात, कधी कातावून मला बोल लावतात, शिव्याही घालतात. त्यानं त्यांचं मन हलकं होतं. तेवढंच मी त्यांना देऊ शकतो आणि तेवढय़ावरच ते समाधानी आहेत..’’
 ‘‘..आणि तेवढय़ावरच तुम्हीही समाधानी आहात. धन्य तुमचे भक्त आणि धन्य तुम्ही,’’ कोपरापासून हात जोडून उठत रखुमाई फणका-यानं म्हणाली. 

अचानक तिचं लक्ष दूर उभा राहून डोळे मिटून कळसाला हात जोडणा-या एका फाटक्या भक्ताकडे गेलं.. संधिप्रकाशात चमकणा-या त्याच्या सात्त्विक चेह-यावर निर्व्याज, निरागस श्रद्धेचं अपरंपार तेज झळकत होतं. ते पाहून तिच्याही अंत:करणात आपसूक आशीर्वचन उमटलं आणि.....

आपल्या भोळ्या नव-याचा खूप अभिमान दाटून आला.



-------- प्रहार



आवडती गाणी - कोण होतीस तू






मुलगा ----
नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली |
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली |

कोण होतीस तू, काय झालीस तू |
अग वेडे कशी वाया गेलीस तू | |
 
सुंदर रूप तुझे निर्मळ भारी |
होतीस अशी तू पवित्र नारी |
डोईवर पदर, पदरात चेहरा |
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा |
होती यशोदा तू, होतीस तारा तू |
होतीस राधा तू, होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली |
राज्य वैभव टाकून आली |
काळ बदलला तूही बदलली |
सा-यांना भुलवीत रसत्याने चालली |

पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही |
सडक लैला अशी बदनाम झालीस तू |
तू अशी नारी होती, लाखात भारी होती |
मर्दानी झाशीवाली हो‍उन लढलीस तू ||

कोण होतीस तू, काय झालीस तू 


मुलगी ----------
पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली


कोण होतास तू काय झालास तू
|
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
|

तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा
|
होतास असा तू मर्दाचा राणा
|
सिंव्हाची छाती होती, उरात आग होती
|
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती
|
होतास राम तू, होतास बुद्ध तू
|
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू
|

भगतसिंग तो महान झाला
|
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला
|
काळ बदलला, तूही बदलला
|
करीत इशारे तू रस्त्याने चालला
|
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी
|
सडक मजनू असा बदनाम झालास तू
|
तू असा शूर होता, लाखात वीर होता
|
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
| | | |

मुलगा ----

लाजवंती कालची तू चंचल छछोर होई |
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही
|
कोण होतीस तू, काय झालीस तू |
अग वेडे कशी वाया गेलीस तू
|

आखुड केस हे आखुड कपडे
|
पाठ ही उघडी, पोट हे उघडे
|
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली
|
साडी बिचारी खाली घसरली |

नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा
|
पुढून मुलगी मागून मुलगा |
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू
|
तू अशी नारी होती लाखात भारी होती |
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू
|



मुलगी ----------
काल तुझ्या हाती तलवार होती |
लढवय्याचा तू वारसा
|
आज तुझ्या हाती कंगवा |

घडीघडी बघसी तू आरसा
|
कोण होतास तू काय झालास तू
|
अरे वेड्या कसा वाया गेलास तू |

काय तुझी वेषभुषा आता कहर झाला
|
कालचा हिरो हा आज झिरो झाला |
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका
|
लांबलांब केस हे मिशिला चटका
|
तऱ्हा तुझी बायकी, बघण्याजोगी
|

पुढून मुलगा हा मागून मुलगी
|
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू
|
तू असा शूर होता लाखात वीर होता |
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू |
कोण होतास तू काय झालास तू
|
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
|









गावरान इंग्लिश



गुरुजी : बाळ, खाली दिलेले अंक इंग्रजीमध्ये म्हणून दाखव!

७०... ८२... ८९...९९

गंपू : शेवंती
(सेंवेनटी)... येती तू... येती  नाय?... नाय त नाय !! 


क्रांतिवीर लहुजी (वस्ताद) साळवे


-------------------

क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. लहुजींचे वडील राघोजी पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.

लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते. फक्त त्या काळात दलितांना लिहिण्या-वाचण्याची बंदी असल्यामुळे लहुजी साळवे फक्त शालेय शिक्षणापासून वंचित राहिले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. नवोदित लेखकांनी, साहित्यिकांनी, जागृत समाजाने हे सत्य जाणून घेण्याची गरज आहे की, इतिहास दलित, आदिवासी, विमुक्त, भटके, ओबीसी, बहुजन समाजातील विद्वान, क्रांतिकारक शूरवीर मावळ्यांनीदेखील घडविला आहे. चंद्रकांत वानखेडे, खुशाल खडसे, दया हिवराळे, पद्मश्री नामदेव ढसाळ, दिगंबर घंटेवाड, प्रा. विठ्ठल भंडारे, अंकुश सिंदगीकर, राजेश खंडारे, नानासाहेब कठाळे, शिवराज दाढेल, प्रा. सुरेश दाभाडे, वि. भ. विटेकर, शंकर तडाखे, वसंत देसाई, प्रा. मा. म. देशमुख, विनोदकुमार बोरकर, प्रा. हरी नरके, प्रा. नरेश करडे, ऍड. एकनाथ आव्हाड आदींसहित त्या सर्व कवी, लेखक, साहित्यिकांचे ज्यांनी आपल्या लेखणीतून, साहित्यातून आद्य क्रांतिपिता लहुजी साळवे तसेच इतर उपेक्षित महापुरुषांचे कार्य समाजासमोर मांडले.

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
--------- globalmarathi.com

विठाबाई (मांग) नारायणगांवकर



योगीराज बागुल यांनी लिहिलेल्या `तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा' या चरित्रग्रंथावर आधारलेला आणि त्यांनीच लिहिलेला कार्यक्रम नुकताच यशवंत नाट्यमंदिरात पाहावयला मिळाला. `पंचमी' या संस्थेने हा कार्यक्रम सादर केला. विठाबाईच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग कथन करून विठाबाईच्या फडात गायल्या गेलेल्या गण-गवळी, पोवाडा, लावणी, विरहगीत, शौर्यगीतं अशी कार्यक्रमाची रचना असून कार्यक्रमाचे निवेदन अभय कुलकर्णी यांनी केले आणि विठाबाईच्या फडाचे, आयुष्याचे चित्र प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे उभे केले.
    ``आजच्यासारखी कुठली बिदागी आणि कुठली सुपारी? खेळ करून झाला की माझा बाप मला दारोदार वटी पसरून भाकर तुकडा मागायला पाठवी. मिळालं ते त्याच गावात खाऊन त्याच गावात उरल्याली रात काढून पुढचं गाव असा जतन केला आम्ही तमाशा'' विठाबाईचे हे अनुभवाचे बोल. तमाशासाठी. या मातीतल्या लोककलेसाठी, तिने ज्या खस्ता खाल्ल्या, त्यामुळे सिनेमाची चंदेरी दुनियाही तिला कधी भुलवू शकली नाही. ज्याच्या सिनेमात काम करण्यासाठी जीव पाखडत त्या व्ही. शांताराम आणि राज कपूर यांनी स्वत: विनंती करूनही काम करण्याचे विठाने नम्रपणे नाकारलं. आणि शारीरिक त्रासाला तोंड देत तमाशाची कास अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही. तिला सामाजिक भानही होते. त्यामुळे लोककलेच्या क्षेत्रात मी मी म्हणणाऱयांची तिने छुट्टी केली आणि ती या क्षेत्रातली सम्राज्ञी झाली. विठाबाईचे वडील भाऊ मांग नारायणगांवकर हे पठ्ठे बापूरावांचे शिष्य आणि विठाबाई भाऊंची शिष्या. त्यामुळे विठाबाईंनी पठ्ठे बापूरावांचाच वारसा चालवला असं म्हणावयाला हरकत नाही. तिने तमाशात उदंड नाव कमावलं. एकेकाळी विठाबाईचे फड हा शेकडो कलाकारांच्या आणि फडात पडेल ती काम करणाऱया मजुरांच्या उपजीविकेचे हक्काचं साधन होतं. पण पैशाचा पूर एका दिशेने आला आणि दुसऱया दिशेने निघून गेला. या कलावतीची घागर मात्र कोरडीच राहिली. जिच्या फडाचा जमा झालेला पैसा गोणपाटात पायांनी दाबून भरला जाई त्याच विठाबाईला वृद्धत्वाच्या काळात टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी नारायणगावात जोगव्याच्या नावाखाली पदराची ओटी पसरावी लागली.
   त्याचप्रमाणे तमाशाला आलेल्या रसिक प्रेक्षकांनी नाराज होऊ नये म्हणून नवव्या महिन्यातही ती बोर्डावर उतरली. नाचगाणं करताना तिच्या पोटात कळा सुरू झाल्या. तरी ती नाचतच होती. पण कळा असह्य झाल्यावर ती स्टेजमागे गेली आणि बाळंतपण उरकलं. नाळ दगडानं तोडली गेली आणि ती पुन्हा रंगमंचावर आली. हजारो रसिकांनी हा प्रसंग अनुभवला. विठाबाईच्या कलेवर सारे फिदा होते, प्रसिद्धी पैसा यश सारं काही चालून येत होतं. पण जवळच्याच माणसांनी तिला दगा दिला. विठाबाई कर्जबाजारी झाली. वय वाढलं तरी लावणी म्हटलं की तिच्या अंगात अक्षरश: संचार व्हायचा. पण आर्थिक अडचणी आणि आजारपणाने या लावणीसम्राज्ञीला गाठलं गेलं इत्यादी तिच्या संगीतमय, कष्टप्रद आयुष्याचं चित्र या कार्यक्रमात संगीत साथीने साकारलं गेलं. त्यात नाट्य होतं, नृत्य होतं, निवेदनही होतं. ``विठू माऊली तू माऊली जगाची. शुभ मंगल जनी गण नाचला, चाळ माझ्या पायात, शूरा मी वंदिले, सैनिक हो तुमच्यासाठी, लग जा गले, ए मेरे वतन के लोगो, बाळा जो जो रे, नाचू किती लाजू किती, कान्होबा तुझी घोंगडी, डेरेदार बहरलं झाड, पोटासाठी नाचते मी,'' इत्यादी गाण्याभोवती विठाचा जीवनपट साकारण्यात आला.
   `माझ्या डोळ्यात कचरा गेला, एक हौस पुरवा महाराज, कंबर लचकली, ' या लावण्या नृत्यांगना स्मिता वेताळे यांनी झाकदार पेश केल्या. विश्वजीत बोरवणकर, संचिता गर्गे, आदिती प्रभू देसाई, राजश्री लेले, मानसी फडके या गायक वृंदाने आपली कामगिरी झकासपणे पेश केली. गावकुस बाहेरच्या कलावंतांनी जगविलेल्या तमाशाकलेच्या या साम्राज्ञीची चित्तरकथा तिच्या गाण्याच्या साथीने `पंचमी' या संस्थेने रंगमंचावर मांडली आहे. विठाबाईंच्या आयुष्यातील काही ठळक प्रसंग, त्याला सुसंगत अशा विठाबाईच्या फडात गायल्या गेलेल्या गण-गवळणी, पोवाडा, लावणी, विरहगीत, शौर्यगीतं अशी या कार्यक्रमाची रचना असून कार्यक्रमाचे निवेदन अभय कुलकर्णी तन्मयतेने करतात. गायक कलाकारांनीही या कार्यक्रमाला यथार्थ साथ देऊन कार्यक्रम श्रवणीय केला आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून लोककलेसाठी आपले सारं आयुष्य कारणी लावणाऱया विठाची अखेर अंगावर काटा उभी करणारी आहे. वयाच्या 17व्या वर्षी ती आई झाली आणि 30व्या वर्षी तिने आठव्या मुलाला जन्म दिला. स्त्रीला फडमालक कसे वापरतात याचं विठा हे मूर्तीमंत उदाहरण आहे. राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार तिने मिळवले पण दुर्दैवी विठा पुरुषी जुलमाची, अत्याचाराची आणि अशिक्षितपणाची बळी ठरली. 15 जानेवारी 2002 रोजी पुण्याच्या केईएम रुग्णालयात अर्धांग वायुने तिचे निधन झाले. 




Tuesday 28 February 2012

झटपट तंगडी कबाब


साहित्यः

२. कोंबड्यांच्या तंगड्या हव्या तितक्या.
२ मोठे चमचे ताजे दही .
२ लहान चमचे आलं-लसण कान्द्याची ची पेस्ट.
२ लहान चमचे तंदुर मसाला.
३/४ लहान चमचा हळद.
१ चमचा तिखठ   
चवी नुसार मीठ.

कृती:
१) कोंबडिच्या तंगड्यांना सुरीने चरे पाडुन घ्यावे.
२) दही, आले-लसणाची पेस्ट, तंदुर मसाला, हळद, मीठ, तिखठ  सर्व एकत्र करुन, ते या तंगड्याना लावुन किमान ४-५ तास मुरत ठेवा.
३) तव्यावर मध्यम आचेवर थोड तेल तापवुन तंगड्या १०-१५ मिनीटं फ्राय करुन घ्या.
४) प्रत्येक तंगडी चिमट्यात पकडुन डायरेक्ट मोठया ग्यास वर ३०-४० सेकंद भाजुन घ्या.

पुदीना+दहीच्या चटणी बरोबर हाण तिच्यायला !




विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास !





केव्हाही स्त्री-पुरुष संबंध आणि केव्हाही मूल अशा नीतीनियमविरहित अवस्थेपासून ते विवाहबंधनापर्यंतचा मानवाचा प्रवास का आणि कसा झाला? या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते? विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायची पद्धत का व कशी सुरू झाली? विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविणारा लेख-
 
पुरुषाने क्रूर जंगली जीवनापासून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिकदृष्ट्या समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले. आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहात आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले..
विवाहाच्या उत्क्रांतीचा अभ्यास कशासाठी? तर विवाह ही शरीरसंबंधाची स्वीकारलेली एक पद्धत आहे. अशा शरीरसंबंधाच्या विविध पद्धती आपल्या पूर्वजांनीसुद्धा स्वीकारल्या, बदलल्या. त्यांनाही अडचणी आल्या, पेच निर्माण झाले. त्यातून त्यांनी मार्ग कसे काढले, त्याकरिता मानसिकता कशी बदलावी लागली, हे सर्व गेल्या ५० हजार वर्षांपासून जर आपण तपासलं तर आजही विवाहासमोर ज्या अडचणी आपल्याला वाटतात, त्या सोडविण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या विचारपद्धतीचा काही उपयोग होऊ शकतो का, मार्ग सापडतो का, हे निश्चितच आपल्याला समजू शकेल.
विवाहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाला सुरुवात करताना, सर्वप्रथम माणसाच्या शरीरात त्याच्या पूर्वजांच्या तुलनेत कोणते बदल झाले, हे आपल्याला पाहावं लागेल, कारण तरच मानवाचे वर्तन, त्याच्या भाव-भावना, मानसिकता याचा अर्थ आपल्याला समजेल. पहिला शारीरिक बदल हा मानवी स्त्रीमध्ये झाला, तो म्हणजे तिचा ‘estrus period’ म्हणजेच तिचा ‘प्रजनन काल’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नाहीसा झाला. म्हणजे स्त्री-पुरुषांचे केव्हाही संबंध आणि केव्हाही मूल अशी स्थिती निर्माण झाली. साहजिक मनुष्यसंख्येवरचं निसर्गाचं नियंत्रण गेलं आणि ती स्त्री-पुरुषांची जबाबदारी झाली. स्त्रीचा ‘estrus period’ जाणे ही शारीरिक घटनाच शरीरसंबंधाच्या नियमनाच्या पद्धतीची मानवाला गरज वाटण्याची जननी आहे.
त्यानंतर माणसातला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, त्याच्या मेंदूचा आश्चर्यकारक विकास! हा पूर्ण विकास गर्भातच झाला असता, तर डोक्याचा आकार इतका मोठा झाला असता की स्त्रीला जन्म देणं शक्य झालं नसतं. म्हणून अर्भकाच्या मेंदूचा गर्भाशयातला विकास हा सुमारे ३० टक्के असतो. बाकीचा विकास हा अर्भकाने जन्म घेतल्यानंतर पुढील १५ ते २० वर्षांत होत असतो. अर्थात मनुष्याची बाल्यावस्था प्रदीर्घ झाली. त्यामुळे
बालसंगोपनाची स्त्री-मातेची वर्षे वाढत गेली. ही एक प्रकारे स्त्रीवरची आपत्ती होती. कारण एका बाजूला सततच्या बाळंतपणाचा धोका आणि त्यात बालसंगोपनाचा काळ वाढलेला. ही परिस्थिती अशीच राहिली असती, तर मनुष्यप्राणी जिवंत राहिला नसता. परंतु याची भरपाई म्हणून निसर्ग आणखी एक शरीरबदल स्त्रीमध्ये आणतो आणि तो म्हणजे ‘मेनापॉज’! हा मेनापॉज फक्त मानवी स्त्रीलाच आहे. तो चिपांझी-गोरिलाच्या प्राणीमातांना नाही.
‘मेनापॉज’मुळे स्त्री मातृत्वचक्रातून मुक्त होत असते. हीच स्त्री मग आपल्या मुलीच्या-मुलांच्या संगोपनात हातभार लावते. इथे Nature’s selection हा डार्विनचा मुद्दा दिसतो. वास्तविक पुरुष हा बालकाचा जैविक पिता असताना, त्याच्याच शरीरात पितृत्वादाखल बदल देऊन ‘पिता’ म्हणून त्याला स्त्रीच्या मदतीसाठी उभे करण्याचे काम निसर्ग करीत नाही, तर तो दोन मातांना तयार करतो. एक जन्म देणारी माता आणि दुसरी आजी-माता! अशा रीतीने आजी-पालकत्वाचा उदय आपल्याला फक्त मानवी जीवनातच दिसतो. अन्य प्राणीजीवनात आजी-पालकत्व आढळत नाही. याबाबतचं संशोधन अमेरिकेतील उटाह विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टेन हॉक्स आणि डॉ. निकोलस जोन्स यांच्या टीमने सन १९९८-९९ मध्ये केलं. ते असे की, ‘स्त्रीला मुलं झाली की काही महिने ती अंगावर पीत असतात. मग आई त्यांना कंदमुळं देऊ लागते. पण आईला पुन्हा दिवस गेले की, त्या मुलांना ना अंगावरचं दूध मिळत ना कंदमुळं! अशा वेळी त्या मुलांची आजी, म्हणजे त्या स्त्रीची आई, त्यांच्या मदतीला येते व त्यांच्या खाण्याची जबाबदारी स्वत:कडे घेते. अशी आजी ज्या मुलाला  लाभते, ते मूल पुन्हा बाळसं धरतं व प्रगती करतं. याउलट आजी नसलेल्या मुलाचे हाल होतात.’
मुळातच स्त्रीला स्थैर्याची गरज पुरुषाच्या तुलनेत जास्त असते. तशी ती प्रत्येक प्राणीमातेलाच तिच्या
बाळंतपणासाठी, एके ठिकाणी स्थैर्य गरजेचं असतं. मेंदूच्या विकासातून अग्नीचे उपयोग कळल्यावर, स्त्री ही अग्नी घेऊन गुहेत पहिली स्थिर झाली. स्त्री-समाज पुरुषाआधी स्थिर झाला, असे संशोधक मांडतात, कारण पुरुषाला स्थैर्याची गरज नव्हती.
स्थिर झालेली स्त्री, आपल्या अपत्य संगोपनात अनेक वर्षे घालवू लागल्यावर स्त्रीमध्ये ममत्व आणि 
वात्सल्य या भावना बहरू लागल्या. त्याचबरोबर जंगली अवस्थेतील तिची क्रूरता आणि हिंसकता यांचा झपाटय़ाने ऱ्हास होऊ लागला. मातेच्या दीर्घकाळ सान्निध्यामध्ये अपत्ये राहिल्यामुळे, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होऊ लागला. मात्र, आजच्या भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ वगैरे भावना तेव्हा नव्हत्या. फक्त स्त्री-पुरुषांच्या जोडय़ांना जन्माला घालणारी एक माता आणि एकाच मातृत्वाने बांधलेल्या या जोडय़ा, म्हणून त्यांच्यामध्ये एक सौहार्द होते. हीच भावंडे मोठी होऊन आजच्या भाषेतल्या मामा-मावश्या व्यक्तिमत्त्वाचा मातृटोळीत समावेश होत होता. अशा रीतीने आई-अपत्ये, मामा-मावश्या, आजी असे मिळून मातृटोळ्या जमिनीवर स्थिर होऊ लागल्या.
स्त्री-समाजाच्या स्थिरतेमुळेच शरीरसंबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण आधीच्या अस्थिर आणि झाडावर राहून संरक्षण करण्याच्या कालखंडात स्त्रिया पुरुषांना सहज उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे शरीरसंबंधाचे नियमन आपोआपच होत होते. परंतु स्थिर झाल्यावर जंगली पुरुष टोळ्यांना स्त्रिया एका जागी उपलब्ध होऊ लागल्या.
पुरुषांचे ४० हजार वर्षांपूर्वीचे जीवन कसे होते? मेंदूच्या विकासामुळे पुरुष हा कळप-अवस्थेतून टोळी-अवस्थेत आलेला होता. पुरुषांमध्ये एरव्ही पितृत्वादाखल कोणताही शारीरिक बदल आणि भावनिक जाणीव निसर्गाने निर्माण केलेली नव्हती. अपत्य जन्मामध्ये आपलाही भाग असतो, याची पुरुषाला जाणीव नसल्यामुळे, मातृकुळात त्याला बांधून ठेवणारे कोणतेही पाश नव्हते. आक्रमक, हिंसक अशा जंगली पुरुषांच्या टोळ्या तेव्हा होत्या. जंगली पुरुषांचे स्थिर मातृटोळ्यांवरचे हल्ले आणि अर्भके पळविणे, हा मातांचा अत्यंत चिंतेचा विषय होता. अशा वेळेस मातृकुळांची व अपत्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय मानून,
कुळाबाहेरील जंगली पुरुषांशी शरीरसंबंध टाळण्यातूनच त्या पुरुषांना दूर ठेवत असत. कुळातील पुरुषांशी म्हणजे भाऊ, मामा, भाचे यांच्याबरोबर स्त्रियांनी शरीरसंबंध ठेवणं हे त्यांना कमी धोक्याचे वाटू लागले.
आज जरी आपल्याला सख्खे भाऊ, मावसभावंडे, मामा वगैरे नात्यातले संबंध धक्कादायक वाटत असले तरी
या अतिप्राचीन काळात नात्याने एकमेकांना कोणी ओळखत नसल्यामुळे, नात्यात शरीरसंबंध करू नयेत, ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. जंगली पुरुषाशी कोणत्याच स्त्रीने संबंध करू नयेत, अशी बंदी घालण्यासाठी कुळातल्याच पुरुषाशी संबंध करावेत, अशी सक्ती निर्माण करणे गरजेचे होते. त्याकरिता मातांनी ‘टॉटेम-विश्वासाचा’ उपयोग करून घेतला. कोणा पशु-पक्ष्यामुळे टोळी जन्माला आली असे मानून त्या प्राण्याचे नाव टोळ्यांना दिलेले आढळते. भारतीय संस्कृतीत अशा मूषक, मातंग, नाग, वृषभ टोळ्यांची नावे आहेत. या टॉटेमिझम्मुळे एकच कुलचिन्ह (टॉटेम) असणाऱ्या कुळातील स्त्री-पुरुष यांचे शरीरसंबंध सक्तीचे करणे सोपे गेले.
Endogamy ही अशा रीतीने शरीरसंबंधाची पद्धत म्हणून पुढील काही हजार वर्षे स्थिर झाली. या कालखंडात भावाला काही अधिकार देण्यात आले. त्यापैकी बहिणीची मालमत्ता व तिचा आईकडून येणारा वारसाहक्क सांभाळणे आणि तिच्या मुलांच्या संगोपनात हातभार लावणे, असे दोन अधिकार होते. बहिणीची अपत्ये मात्र कुळातल्या अनेक पुरुषांपासून जन्मलेली असायची. Endogamy च्या पुढील ५ ते १० हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यामुळे मातृकुळातून अनेक व्यवसाय, उद्योग उदयाला आले. हळूहळू भाऊ, मामा, भाचे या उद्योगात लक्ष घालू लागले तसेच त्यांचे जंगलातले निर्थक भटकणे संपले आणि ते अर्थपूर्ण झाले. ही मातांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब होती. लक्ष घालू लागल्यावर त्यांचं कुळातले वास्तव्य वाढलं. त्यामुळे कुळातील शरीरसंबंधाचं प्रमाण वाढून कुळाची मनुष्यसंख्या हाताबाहेर जाऊ लागली, ही मातांना चिंता होती. त्यापेक्षाही मोठी चिंता अशी होती की, वाढलेल्या शरीरसंबंधामुळे भाऊ, मामा, भाचे यांचे स्त्रियांवरून संघर्ष होऊन हिंसा होऊ लागली.
मात्र याच कालखंडात एक चांगले सामाजिक परिवर्तन येत होते. पुरुष जो कच्चा माल जंगलातून आणत होते,
तो अन्य मातृकुळांनाही ते पुरवीत होते, ज्याची कुलचिन्हे भिन्न होती, त्या कुळातील स्त्रियांशी परिचय होऊन त्यांच्याशी पुरुषांशी संबंध होऊ लागले. त्याचप्रमाणे स्त्रिया आपापली उत्पादने घेऊन दुसऱ्या मातृकुळामध्ये जात असत, तिथे रात्री वास्तव्याला राहण्यातून तिथल्या पुरुषांशी शरीरसंबंध होऊ लागले. अशा रीतीने कुळातच सक्तीचे असणारे संबंध हळूहळू कुळाबाहेर जाऊ लागले. म्हणजे त्याही काळात सक्ती वा बंधने मोडणारे स्त्री-पुरुष होते, हे विशेष!
कुळाबाहेर जाणारे शरीरसंबंध हे मातांसाठी सुचिन्ह होते. त्यायोगे कुळातील संबंधांवर बंदी आणणे सोपे होते. 
अर्थात हळूहळू शरीरसंबंधाची पद्धत उलटी फिरली. एकाच कुळात संबंधाची जिथे काही हजार वर्षे सक्ती होती, तिथे बंदी आली. म्हणजे तांत्रिक शोधामुळे अर्थव्यवस्थेत आणि जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे आधीची शरीरसंबंध पद्धत endogamy पूर्वजांनी संपूर्णपणे रद्द करून exogamy मध्ये प्रवेश केला.
नात्यातल्या संबंधाची काही हजार सवय झालेली असल्यामुळे, हे शरीरसंबंध लगेच बंद पडणार नव्हते. हे ओळखून त्याकरिता काही उपाययोजना आखण्यात आल्या-
* बाहेरील स्त्री-पुरुष संबंधांना मोठं उत्तेजन देण्यात आलं. जसं, आजही आदिवासी जमातीत ‘घोटुळ’ नावाची dormitory गावाबाहेर बांधून देऊन वयात आलेल्या मुला- मुलींना तिथे जाण्यात उत्तेजन देण्यात येत असते. ज्या मातृकुळातील बहुतेक स्त्री-पुरुषांनी कुळाबाहेर संबंध पत्करले त्या कुळातील शांतता व प्रगती हा अन्य कुळांचा आदर्श झाला.
* दुसरा उपाय म्हणजे एकाच मातृकुळामधील हत्या व हिंसांना बंदी आणली गेली. अर्थात ही हिंसा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुळांतर्गत असणारे शरीरसंबंध होते. ते थांबवले तरच हिंसा थांबू शकते. त्यातून endogamy बद्दल नकारात्मक मानसिकता तयार होऊ लागली.
* तिसरा उपाय म्हणजे कोणी कुळात शरीरसंबंध केलेच तर मृत्युदंड- डोके छाटण्याची शिक्षा देण्यात येऊ लागली. त्यामुळे स्त्रियांनी आपले मुलगे व भाऊ यांना या शिक्षा होऊ नयेत म्हणून त्यांना अशा संबंधापासून 
परावृत्त करण्यास व स्वत: नकार देण्यास सुरुवात केली.
शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे भाऊ व बहीण यांचे वेगळे भावनिक नाते याच कालखंडापासून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. भाऊ-बहीण नात्यात जिव्हाळा व प्रेम हवे, पण शरीरसंबंध नकोत, असे अत्यंत अवघड काम मातांनी अत्यंत कौशल्याने पुढे अनेक शतके अथक परिश्रमाने केले. भाऊ-बहीण नाते हा मानवी जीवनातला चमत्कार होता. हे नाते नैसर्गिक नाही. ते कोणत्याही प्राणी जातीत नाही. ते नाते सांस्कृतिक आहे आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निर्माण झालेले आहे आणि तो टप्पा हाच आहे, असे माझे मत आहे.
मातांचे हे प्रयत्न इतके यशस्वी झाले की, भावा-बहिणीमधील शरीरसंबंध ही लाजिरवाणी बाब होऊन ती 
निषेधार्ह, तिरस्करणीय झाली, ती आजतागायत! निव्वळ भाऊ-बहीणच नाही, तर मामा, भाचे, मावसभाऊ या एकाच कुळातील नात्यातील स्त्री- पुरुष शरीरसंबंध थांबवण्यात आले. एकच कुलचिन्ह असणाऱ्या कुळामधील नात्यात संबंधांना बंदी, हीच परंपरा पुढे ‘सगोत्र विवाहबंदी’ म्हणून पितृसंस्कृतीत आलेली दिसते.
अशा रीतीने endogamy सुमारे २० ते २५ हजार वर्षांपूर्वी पूर्णपणे अस्ताला गेली, की तिचे अवशेष आजच्या आदिम, आदिवासी जमातीतही शिल्लक राहिले नाहीत. पण कुळात संबंध आलेच तर प्राचीन काळात सांगितलेल्या शिक्षा तेवढय़ा या आदिम जमातीत दिसतात.
आपण पाहिले की, आपल्या पूर्वजांनी आपली जुनी endogamy सोडून देऊन त्यांनी exogamy पत्करली, यातून आज आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, असे म्हणायला लागेल.
आज आपणही exogamy मध्ये आहोत; परंतु १५-२० हजार वर्षांमागीली exogamy ची वैशिष्टय़े फार वेगळी होती. मुख्य म्हणजे, मातृकुळातील भाऊ-बहिणी हे कुळाबाहेर शरीरसंबंध करीत होते, तरी ते दोघेही मातृकुळातच राहत होते. भाऊ संबंध करण्यापुरते कुळाबाहेर जात होते आणि बहिणींचे संबंधित पुरुष हे बाहेरून बहिणींकडे येत होते. बहिणी आपले मातृकूळ सोडत नव्हत्या. इथे बहिणींची सुरक्षितता जपली जात होती. हा रिवाज आजही काही आदिम आदिवासीमधून टिकून आहे, याचे पुरावे रॉबर्ट ब्रिफो हा आपल्या ‘X 
The mothers’  या खंडातून देतो. तसेच कमलाताई चट्टोपाध्याय आपल्या ‘Tribes in India’ या पुस्तकातून देतात. तसेच स्टीफन फ्यूज आपल्या १९६३च्या ‘The origin of Man and his culture’ या पुस्तकातून नागा ट्राईब्स, आसाममधील खासी, द. भारतातील नायर तसेच मध्य व पूर्व आफ्रिका, न्यू गिनी, बोर्निओ, ब्राझील वगैरे ठिकाणी मातृकुळातच भाऊ-बहिणी राहत असल्याचे पुरावे देतो. अशा प्रकारे मातृकुळाबाहेर जाऊन संबंध करण्याच्या पद्धतीला आजचे संशोधक Visiting marriage अशी संज्ञा देतात.
विशेष म्हणजे,exogamy च्या कालखंडात स्त्री चमत्काराने मूल जन्मास घालते, हे अज्ञान लयास गेले आणि पुरुषामुळे स्त्रीला मूल होते, या शास्त्रापर्यंत मानव पोहोचला. या ज्ञानामुळे पुरुषाची मन:स्थिती द्विधा झाली. आपले कुळाबाहेरील ज्या स्त्रीशी संबंध आहेत, त्या स्त्रीच्या मुलांमध्ये आपले मूल असणार आहे, याचे भान त्याला येऊ लागले. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीशी आपले संबंध, ती आणि तिच्या मुलांबद्दल आपल्याला कोणतेही अधिकार नाहीत आणि ज्या बहिणीबद्दल अधिकार आणि तिच्या मुलांविषयीची कर्तव्ये, ती मुले आपली नाहीत, ही जाणीव पुरुषाला अस्वस्थ करू लागली.
पुरुषामधील हा बदल, मातृसंस्कृतीला आशादायक व आनंददायक वाटत होता. पुरुषाची अपत्यांमध्ये होणारी गुंतवणूक हा मानवी संस्कृतीच्या एका टप्प्यावरचा महत्त्वाचा बदल होता. पुरुषाच्या या हळुवार भावनेला प्रतिसाद देण्यासाठी, जगातील काही संस्कृतींनी पुरुषाला ‘सामाजिक पितृत्व’ देण्याचा रिवाज निर्माण केलेला दिसतो. मातृकुळातील पुरुषालाही इच्छा असल्यास अपत्यसान्निध्य मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. अंदाजे १० ते १५ हजार वर्षांदरम्यानचा हा काळ होता.
स्त्रीला अनेक पुरुषांपासून मुले होत होती. त्या सर्व मुलांचे पितृत्व पुरुषाला देण्याचा हा रिवाज होता. हा संस्कार म्हणजे ‘पिता बनण्याचे व्रत’ असे होते- पुरुषाची पत्नी-स्त्री (आजच्या अर्थाने पत्नी नाही) जेव्हा मूल 
जन्माला घालणार अशा लक्षणाची दिसते, ते चार-पाच महिने पुरुषाने भाला, कुदळीसारख्या शस्त्रांना स्पर्श करायचा नाही. शिकारीला जाण्याचे थांबवायचे. गवत, झाड, लाकूड कापायचं नाही. रक्त वाहील, असे कोणतेही काम करायचे नाही. मांस भक्षण करायचे नाही. पत्नी-स्त्री बाळंत होईपर्यंत त्याने जास्तीत जास्त झोपून राहायचे. झोपून राहण्याचे कारण बाहेर समाजात कोणी कुणाची हत्या केल्यास ते या व्रत करणाऱ्या पुरुषावर घातले जाऊ नये, म्हणून पुरुषाने मातृकुळातच जास्तीत जास्त शांत राहावे असे हे व्रत! Paternity leave ची त्या काळातील ही कल्पना म्हणावी लागेल.
या व्रतामधून एक बाब स्पष्ट जाणवते म्हणजे, पुरुषाठायीची हिंसकता कमी झालेली नव्हती. त्यामुळे अशा
पुरुषाच्या अधिकारात स्त्री व तिची मुले सोपविणे, हे मातृकुळांना मान्य होणारे नव्हते. म्हणून मग त्या पुरुषाने चार-पाच महिने शस्त्र, शिकार, मांसभक्षण यापासून दूर राहून हिंसा व शिकार न करता तो राहू शकतो हे त्याने प्रथम सिद्ध करावे, असा संकेत रूढ झाला. त्या काळच्या पुरुषाच्या ‘लाइफस्टाइल’नुसार त्याच्या पालकत्वाचे हे प्रशिक्षण म्हणायला पाहिजे. हे व्रत केल्यावर झालेले मूल सदोष निघाले किंवा मृत झाले तर त्याचा ठपका व्रत करणाऱ्या पुरुषावर येत असे. ज्या पुरुषाला असे पितृत्व हवे आहे त्याने पितृत्वभावनेशी वचनबद्ध असले पाहिजे, म्हणून वर वर्णन केलेल्या व्रताचे महत्त्व प्राचीन काळात होते.
म्हणजे इथे स्पष्ट आहे की, सामाजिक पितृत्वकल्पना येऊनही समाजाची प्राचीन मातृव्यवस्था कायमच राहिली. प्रत्येक स्त्रीची मुले या नेमलेल्या पित्याजवळ राहून सात-आठ वर्षांची होताच मामाच्या तालमीत येत 
होती. सामाजिक पितृत्वाची ही कल्पना सुमारे दोन-तीन हजार वर्षे टिकली. पण या कालावधीत जे एक सत्य उघडकीस आले, त्या सत्याने ही कल्पना उद्ध्वस्त केली. आतापर्यंत पुरुषापासून स्त्रीला मूल होते, इथपर्यंत मानवी समाज ज्ञानी झाला होता. पण हे मूल अनेक पुरुषांमुळे स्त्रीच्या उदरात तयार होते, अशी कल्पना होती. पण सामाजिक पितृत्व संस्कारामुळे पिता-पुरुषाचे, स्त्रीबरोबर सान्निध्य वाढले. त्यातून, एकाच पुरुषाच्या सततच्या स्त्री-सान्निध्याने स्त्रीला होणारे मूल, हे त्याच पुरुषाचे असते, हे ज्ञान या प्राचीन स्त्री-पुरुषांना प्राप्त झाले. हा कालखंड ८ ते १० हजार वर्षे दरम्यानचा असावा. अर्थात आपली मुले पुरुषाला स्पष्टपणे ओळखता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा स्वत:च्या मुलांचे हित पाहण्याकडे कल होऊ लागला आणि बहिणीच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातून मातृकुळात मामा-भाचे तंटे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे संबंध बिघडले. बहिणीची मुले व भावाची मुले असे आते-मामे भावंडांत संघर्ष सुरू होऊन त्याची परिणती हिंसेमध्ये होऊ लागली.
पुरुषाला पितृत्वादाखल अधिकार हवे होते, पण हजारो वर्षे लाभलेले भावाचे अधिकारही, त्या संस्कारामुळे, सोडून देण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नव्हती. परंतु दोन्ही अधिकार एकाच वेळेस पुरुषास प्राप्त होणे, हे व्यवहारात अडचणीचे होत होते. त्यामुळे तत्कालीन समाजाची बंधुप्रधान आणि पितृप्रधान अशा दोन गटांत सरळ विभागणी झाली. मातृप्राधान्य बाजूलाच राहिले. माझ्या मते, याच कालखंडापासून मातांची मातृकुळावरील पकड सैल झाली. माता व बहिणींचा प्रभाव कमी होत गेला, कारण इथे भांडण हे पुरुषांच्या दोन अधिकारातलं होतं आणि पुरुष काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं झालं. स्त्रीच्या निर्णयाला अर्थ राहिला नाही.
पुरुषाने बंधुप्रधानकी किंवा पितृप्रधानकी यापैकी एक काहीतरी मान्य करण्याने समाजात शांतता नांदणार होती. तेव्हा काही संस्कृतींनी त्याकरिता क्रूर प्रथा स्वीकारल्या. ज्या पुरुषाला पितृप्रधानकी मान्य आहे, त्याने बंधुप्राधान्य सोडले हे सिद्ध करण्यास, बहिणीचा पहिला मुलगा बळी द्यायचा आणि त्याउलट बंधुप्रधानकी मान्य करणाऱ्या पुरुषाने पितृप्रधानकी सोडली हे दाखविण्याकरिता पत्नी-स्त्रीचा पहिला मुलगा ठार करायचा. या प्रथेमुळे मातृकुळात हाहाकार उडाला. प्रत्येक स्त्री ही कुणाची बहीण किंवा पत्नी-स्त्री होतीच. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे अपत्य बळी जाऊ लागले. कालांतराने पशुबळीची कल्पना स्वीकारली जाऊन हे प्रकार थांबवण्यात आले.
बंधुप्राधान्य विरुद्ध पितृप्राधान्य हा झगडा म्हणजे मातृसंस्कृती विरुद्ध पितृसंस्कृती अशाच एका अर्थाने तो संस्कृती संघर्ष होता. हा संस्कृती संघर्ष पुढील काही हजार वर्षे चाललेला होता. भारतात तर तो आर्य आल्यानंतरही चालू होता.
मध्यंतरीच्या काळात नांगराचा शोध सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी लागला. या नव्या तांत्रिक बदलाने संपूर्ण समाजव्यवस्था नंतरच्या तीन हजार वर्षांत पूर्णत: उलटी फिरवली. नांगर या अवजड साधनामुळे शेती करण्याचे काम पूर्वी स्त्रियांकडे होते, ते पुरुषांकडे आले. पुरुष जमिनी जिंकून आणण्याचे काम प्राचीन काळापासून करीत होते. नांगरामुळे जास्त जमीन लागवडीखाली येऊन भरपूर धान्य निर्माण होऊन
धान्यसाठे निर्माण झाले. शेती उद्योग इतर उद्योगांना ‘किरकोळ’ करून पुढे गेला आणि जमीनदारी उदयास आली. जमीन जिंकून आणणारे आणि ती कसणारेही पुरुष, म्हणून जमीनदारांना शेती उत्पादन आणि जमीन पुढे सांभाळणारा स्वत:चा वारस मुलगा हवा, असे स्वाभाविकपणे वाटू लागले. म्हणून विशेषत: जमीनदार व राज्यकर्त्यांनी रीती, रिवाज, परंपरा निर्माण करून स्त्रियांनी एकाच पुरुषाशी शरीरसंबंध करण्याचे बंधन आणले, तीच विवाहप्रथा होय! साम, दाम, दंड व भेद असे विविध प्रकार वापरून सत्ताधारी पुरुषांनी स्त्री-समाजावर विवाहाची सक्ती लादली. ही विवाह प्रथा राजघराण्यातून झिरपत सामान्य जनतेतही रूढ झाली.
थोडक्यात, गेल्या सुमारे ५० हजार वर्षांत, शरीरसंबंधाच्या प्रस्तुत पद्धती म्हणजे पुरुषाला मातृकुळात सामावून घेण्याचे, त्याला माणूस म्हणून घडविण्याचे मातांनी केलेले प्रयत्न म्हणावे लागतात. पुरुषाने क्रूर जंगली जीवनातून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, 
नातेसंबंधाशी तो भावनिक समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले.
आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहातही आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे
संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले आणि गेली  ३-४ हजार वर्षे, पुरुषाचे हित सांभाळण्यासाठी, पतीगृहात पती देईल ते स्थान पत्करून त्या आपला जीव वेचीत राहिल्या, ही आजची वस्तुस्थिती आहे.
‘विवाह’ हा नेहमीच मला पुरुषाचा प्रश्न वाटला. तो स्त्रीचा प्रश्न कधीही नव्हता आणि आजही नाही. आणि हा अभ्यास केल्यावर मात्र विवाह म्हणजे ‘पुरुष जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणावेसे वाटले.
मार्गारेट मीड या संशोधिकेने आपल्या १९४९ साली लिहिलेल्या Male and Female या पुस्तकात वेगळ्या शब्दात हेच मांडलेले आढळते. ती म्हणते, ‘पुरुषाला नक्की कोणती भूमिका द्यावी, ही प्रत्येक समाजाची कायमच मध्यवर्ती समस्या राहिली.’





------ मंगला सामंत


 

प्रवासाला निघताना







मार्च, एप्रिल महिन्यात अनेक प्रकारचे मानसिक ताण अनुभवाला येतात. परीक्षेचा ताण केवळ विद्यार्थ्यांनाच असतो असे नव्हे, तर पालकांनाही हा ताण येतोच. 31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्यामुळे मोठा व्यवसाय असो वा नोकरी असो, ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक व्यवसायात मार्च महिन्यात अधिक वेळ काम करावे लागते. एवढे करून संपूर्ण वर्षाचा नफा-तोटा डोळ्यासमोर दिसायला लागल्यानेसुद्धा बऱ्याच वेळा मानसिक ताण तयार होतो. म्हणून असेल किंवा "केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार' या उक्‍तीप्रमाणे असेल, पण परीक्षा संपण्यापूर्वीच परीक्षेनंतर येणाऱ्या सुट्टीचे नियोजन सुरू होते. 

सुट्टीसाठी कोठे जावे, यावर बरीच चर्चा होऊ शकते. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांना मुलांना समजेल, त्यांना आनंद वाटेल, खेळता येईल, काहीतरी नवीन पाहता येईल असे ठिकाण निवडावे लागते. मुले मोठी असतील तर ती स्वतंत्रपणे आपल्या मित्रमंडळींबरोबर प्रवासाला जाऊ शकतात. सुट्टीत एखाद्या कला प्रशिक्षणाच्या वर्गाला जाणे; चित्रकला, पोहणे वगैरे छंद जोपासणे; वनस्पतींची माहिती मिळविण्यासाठी जवळपासच्या रानात भटकायला जाणे वगैरे जीवनात उपयोगापेक्षा आनंद देणाऱ्या गोष्टी शिकण्यासाठी मुले स्वतंत्रपणे जाऊ शकतात. त्यांचे पालक कुठल्यातरी नवीन स्थळाला भेट देण्यासाठी, तिथले लोकजीवन पाहण्यासाठी प्रवासाचा बेत ठरवू शकतात. प्रत्येक प्रवासात एखादा नवीन प्रदेश पाहणे, तेथील लोकांचे जीवन, त्यांच्या चालीरीती पाहणे, त्यांच्याबरोबर राहण्याचा अनुभव घेणे, याचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर आरोग्यासाठी, म्हणजेच ज्या ठिकाणी पंचकर्माची सोय आहे, ज्या ठिकाणी शरीराला आवश्‍यक असणारे अभ्यंग, स्पा वगैरे उपचार मिळू शकतील, अशा ठिकाणी ते जाऊ शकतात. नायगरा फॉल्स, ताजमहाल वगैरे जगातील चमत्कार पाहण्यासाठीही प्रवासाचा बेत ठरविता येतो. सध्या ऍग्रो टुरिझम म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नधान्याची, शेतीभातीची माहिती करून घेण्यासाठी कोठेतरी जाता येते. आपण जी वस्त्रे वापरतो ती चांगली-वाईट आहेत हे कसे ठरवावे, ती कशी तयार होतात, रेशमी वस्त्र कसे तयार होते, अशा तऱ्हेची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने प्रवास करता येतो.

प्रवासाला कुठेही जायचे असले- ठिकाण जवळ असो वा लांब, स्वतःच्या देशात असो वा परदेशात असो, त्याची आखणी वेळच्या वेळी करणे, प्रवासाचे व राहण्याच्या जागांचे आरक्षण आगाऊ करणे, आपण जर
मित्रमंडळींकडे वा नातलगांकडे उतरणार असू तर त्यांना वेळच्या वेळी तसे कळवणे, त्यांची सोय पाहणे आवश्‍यक असते. प्रवासाची तयारी जर व्यवस्थितपणे केलेली असली तर प्रवासाचा ताण अजिबात जाणवत नाही, प्रवास सुखकर होतो. ज्या ठिकाणी प्रवासाला जाणार त्या ठिकाणी खाण्या-पिण्याची काय सोय आहे, आपण जे अन्न नेहमी खातो ते अन्न आपल्याला तेथे मिळू शकणार आहे का, नसल्यास आपल्याला काय सोय करावी लागणार आहे, कोणते रेडिमेड पदार्थ नेता येतील वगैरे विचार करून त्यानुसार तयारी करणे इष्ट ठरते.

प्रवासात कुठलाही आजार येऊ नये किंवा कुठलाही त्रास होऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. अपरिचित हवामान, अपरिचित खाद्यपदार्थ यामुळे तब्येत बिघडू शकते. आपल्याला मधुमेह, रक्‍तदाबासारखे विकार असतील तर त्यासाठी आवश्‍यक असलेली औषधे दोन-तीन ठिकाणी विभागून बरोबर ठेवावीत. सामान
उशिरा येणे, हरवणे असे झाल्यास औषधे बरोबर असल्यास गैरसोय टळू शकते. सर्व औषधे ठेवलेले सामान हरवले वा वेळेवर पोचले नाही तर बरोबर डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यास औषधे मिळतीलच याची खात्री नसते, परदेशात तर तेच औषध वेगळ्याच नावाने मिळण्याची शक्‍यता असते. 
 
प्रवास जर हिमालयासारख्या ठिकाणचा असेल, म्हणजेच आपण जर अति थंड ठिकाणी वा बऱ्याच उंचीवर जाणार असू तर दमा वगैरे कुठल्याही प्रकारचा त्रास नसावा किंवा तेथे गेल्यावर कुठल्याही प्रकारचा श्‍वसनाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असा त्रास होण्याची शक्‍यता वाटत असल्यास त्यावरची औषधे, श्‍वास लागल्यावर आवश्‍यक असणारा स्प्रे घेऊन जाणे इष्ट ठरते. तसेच थंडी बाधू नये अशा दृष्टीने तसे कपडे नेणेही गरजेचे असते. थंडी असली तर बहुतेक वेळा स्वेटर, मफलर, कानटोपी वापरली जाते, परंतु पायाकडे दुर्लक्ष केलेले असते. पाय अति थंड जमिनीवर ठेवले गेले तर त्रास होऊ शकतो, या दृष्टीने पायमोजे बरोबर असणे महत्त्वाचे असते. सुंठ-तूप-गूळ यापासून बनवलेली गोळी, आलेपाक, आयुर्वेदिक औषधातील श्‍वासकुठार, "प्राणायाम, योग' वगैरे औषधे उपयोगी पडू शकतात. हृदयविकार असणाऱ्यांनी जिभेखाली ठेवायची गोळी बरोबर घेतली असली तरी आयुर्वेदीय पद्धतीने बनविलेली मधातील औषधे ताबडतोब कार्य करतात, हृदयाला ताकद देतात- ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा, थंडीचा त्रास होत नाही हे लक्षात ठेवून अशी औषधेही बरोबर घ्यावीत.

जुलाब, उलटी, ताप व सर्दी या चार गोष्टींपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने यावर उपयोगी पडणारी औषधे अवश्‍य बरोबर ठेवावीत. प्रवासाच्या दिवसांत काही त्रास होऊ लागल्यास ताबडतोब डॉक्‍टर उपलब्ध होणे, तसेच औषधे मिळणे शक्‍य होईलच असे नसते. त्यातही रात्रीची वेळ असल्यास अधिकच त्रास होऊ शकतो.

प्रवासाला गेले असता तेथल्या वातावरणाशी समरस होऊन प्रवासाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीशी प्रेमाने व मैत्रीपूर्ण भाव ठेवून संबंध प्रस्थापित करावेत, म्हणजे प्रवासाचा अधिक आनंद व फायदा मिळू शकतो.
* पहिलाच सहकुटुंब प्रवास असेल तर शक्यतो व्यावसायिक सहल आयोजकांमार्फत सहलीला जावे.
ह आपल्याबरोबर असणार्‍या लहान मुलांच्या खाण्यापिण्याची वेगळी माहिती सहल व्यवस्थापकाला व्यवस्थित द्यावी. ‘लहान मूल आहे. मग हे लागणार एवढे कळत नाही का?’ असे प्रश्‍न विचारून येणारे कटू प्रसंग टाळावेत.
* एकत्र सहलीला गेल्यावर नवरा-बायकोपैकी एकाने शक्यतो जेवणासाठी थांबण्याअगोदर इतर काहीतरी खाऊन घ्यावे, ज्यामुळे तुम्हाला मुलाला खाऊ घालणे सोपे जाते. अन्यथा कुणाचेच जेवण व्यवस्थित न झाल्याने मनस्ताप होऊन सहलीचा आनंद कमी होऊ शकतो.
* हिंदुस्थानातल्या सहलीला जाताना आपल्या मुलांमुळे एखादे ठिकाण दोघांना एकत्र पाहणे शक्य नसल्यास, एकाने बसमध्ये किंवा हॉटेलमध्ये थांबून मुलाकडे पूर्ण लक्ष द्यावे व दुसर्‍याने सहलीचा आनंद घ्यावा. सहल ही ८-१५ दिवसांची असली तरी, त्या आनंदासाठी मुलांची जबाबदारी टाळणे योग्य नव्हे.
* सहकुटुंब सहलीला जाताना आपल्या मुलांचीच औषधे न घेता मोठ्यांना लागणारीही नेहमीची औषधे जवळ ठेवावीत.
* स्वत:च्या वाहनाने प्रवास करताना ज्या भागात प्रवास करणार आहोत त्या भागातील, आपल्या वाहनाच्या संबंधित सर्व्हिस सेंटर / डिलर इत्यादींची माहिती शक्यतो प्रिंट स्वरूपात जवळ ठेवावी.

* सहकुटुंब प्रवास करताना बरोबरच्या सर्वच सदस्यांच्या गरजांचा तसेच उद्देशांचा विचार करावा. एखाद्या बीचवर सहकुटुंब सहल काढताना, कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्यांसाठी एक संध्याकाळ त्या ठिकाणच्या मंदिरात जावे, ज्यायोगे ‘सहल म्हणजे दररोजच्या धावपळीतून सुटका’ हे सर्वांसाठीच शक्य होते.


कपडे-
  • कुठेही गेलात तरी कपडे हे सुटसुटीत असावेत ही गोष्ट लक्षात ठेवा.
  • आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणच्या हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. थंड हवामानाच्या जागी अंग पूर्ण झाकणारे सुती कपडे न्यावेत. साड्या शक्‍यतो टाळा. पंजाबी सूट चालेल. कुठल्याही वयाच्या स्त्रियांना चालेल असा हा अत्यंत सुटसुटीत पोशाख आहे. लेगिन्स आणि त्यावर वेगवेगळे कुर्ते हा सध्याचा लोकप्रिय पर्यायही वापरून पाहायला हरकत नाही.
  • कपड्यांची संख्या शक्‍य तितकी कमीच ठेवावी.
  • एक लक्षात ठेवावं, की आपण बाहेर फिरायला जात आहोत ते नवीन गोष्टी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी. कपड्यांचं प्रदर्शन करायला आपण तिथे जात नाही. त्यामुळे खूप भडक, अंगात खूप फिट्ट बसणारे, उत्तेजक कपडे घालू नका.
  • ट्रेकिंगला जायचं असेल तर मुलींनी जीन्स घालणं टाळावंच. त्याऐवजी ट्रॅकसूट किंवा लूज टी शर्ट आणि पॅंट घालणंच चांगलं.
इतर वस्तू-
  • बाहेर फिरताना पायांत अगदी स्पोर्टस शूज नसले तरी पाय बंद राहतील असे आरामदायी शूज शक्‍यतो असावेत. मुख्य म्हणजे त्यांची खरेदी आदल्या दिवशी करू नये, बरीच आधी करून ठेवावी आणि एकदोनदा घालून पायांना थोडी सवय असू द्यावी.
  • तुमचं जास्त चालणं होणार असेल तर चपला अजिबात नेऊ नका.
  • प्रवासात दागिने आणि तत्सम मौल्यवान वस्तू नेणं, अंगावर घालणं हे अत्यंत चुकीचं. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अशा वस्तू सांभाळणं अवघड असतं. त्यामुळे शक्‍य तेवढं मोकळं जाणं, राहणं, असा दृष्टिकोन ठेवावा.
  • कॅमेरा नीट चार्ज करून घ्या.
  • फॅन्सी पर्सेस टाळा. त्याऐवजी शक्‍य असेल तर खांद्यांवर क्रॉस करून घालता येण्यासारखी बॅग घ्यावी.
  • साधी, जास्त कप्पे नसलेली अशी पर्स किंवा बॅग घ्या. ती आधी रिकामी करून ठेवा; नाही तर आधी त्यात ठेवलेली बिलं, याद्या, छोट्या-मोठ्या वस्तू यात प्रवासात आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू म्हणजे तिकिटं वगैरे गहाळ होऊन बसतात.
पॅकिंग-
  • बऱ्याचदा बॅगांची निवड अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली जाते. एक मोठी, एक छोटी असं तोल बिघडवणारं आणि शरीरावर ताण आणणारं वजन तयार होतं. परत आल्यावर त्यामुळे पाठदुखी वगेैरे त्रास होऊ शकतात. म्हणून एकच मोठी बॅग घेण्याऐवजी दोन सारख्या वजनाच्या बॅगा घ्याव्यात.
  • प्रत्येक गोष्ट ही घरूनच नेली पाहिजे, हा अट्टहास टाळावा.


शिखर शिंगणापूर





 
 मुख्य लिंग

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.


या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे. या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो. इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.

मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराचे प्रवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे.

रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो. मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बंधू शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले. यामध्ये अनुक्रमे पश्च्मीमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शाहू महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत. मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून उलाख्ले जाते याचे बांधकाम शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते. पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते. हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते. कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात. या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) 
यांची असते. द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते. हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते. द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो. 
 
मुंगी घाटातुन कावड आणताना मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला.

मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.
गुप्तलिंग :
  शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला. या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.





अशा या ठिकाणास भेट देऊन या ठिकाणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव नक्कीच जाणून घ्या.