Wednesday 28 March 2012

बालाचा पयला पयला प्यार





बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते.
मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस.
'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं
मी सुसाटलो
९३२२ १७ ३३ १४
सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू.

'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.'
सूर्‍या आला

'क रं बाला क बोल्तोस?

'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.'
'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा. चल तुला रातीची मूंबय दाकवतो.'

मंगलवार - संद्याकाली सात वाजता सूर्‍या हजर. मीनी पन नवी न शर्ट न प्यांट घातली न दोगव नींगालू.

रीक्शान बसलू . 'ए चल जल्दी. पनवेल मे जानेका हाय. ' सूर्‍या रीक्शावाल्याव वरडला

बर्‍याच येलान पनवेल आला.
'वो सर्कल का बाजुमे खडा करो' सूर्‍या
आमी ऊतरलो.
समोरच बार व्हता
झीरो च्या गूलपांच तोरन लावलवत, म्हाराजा स्टाईल वाचमन व्हता न नाव व्हत ' चांदनी बार ऍंड रेस्टोरन्ट'

'सूर्‍या जल्ला लय भारी बार दीसतोय'
'आर नीस्ता बगीत क रहातोय . आत जाउ चल'

वाचमन न कडक सलाम ठोकला न दरवाजा ऊंगडला.
आत बगतो त काय
ही गुलपं, ह्या लायटी, हा मोटा लाउडस्पीकर न सगलीकड छनछन छनछन.
डोलच भिरभिरल, जराश्यान डोल चोलीत बगीतल त सगलीकड पोरीच पोरी. काय उब्या त काय नाचतान. जेआयला हा त डान्स बार.

'साब इधर आईये' वेटर न येक टेबल दाकवल.
'नय नय हम उस कोनेमे बैठेगा' सूर्‍या म्हनाला
समोरची जागा सोरुन सुर्‍या कोपर्‍यात क बसला ते कल्लच नाय

'दो कींगफीशर स्ट्रांग' सुर्‍यान ऑर्डर दिल्ली न सगलीकड नजर फिरवली.
मना त काय सुचतच न्हवत. तेवड्यात सुर्‍यान धा ची नोट चीमटीत पकरली न यका पोरीला खुन केली.
ती आयटम जवल आली न दोगांना शेकँड केला. जल्ला काय फटाका व्हता

'आप बहूत दिन बाद आये हो. हमारी याद नही आती क्या ?'
'ये हमारा दोस्त हाय. उसका बडडे मनाने के लीये आया हय. तुम कैशी हय?' सुर्‍या.
'अच्छी हूं. '
'मै गाना लगाताय जरा अच्छा नाच दिकाना'

'वेटर ~~ काला कौआ लगाव' सुर्‍यान फर्माईश केली

काला कौआ काट खायेगा सच बोल .. सूरू झाल नी ती आशी काय नाचाय लागली क माजा डोकाच आउट झाला
मी भिरभिरून हिकर तिकर बगाय लागलो न ती दिसली.

यका कोपर्‍यात चीप उबी व्हती, यकटीच, सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू.
अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती. डोले फाडून मी हावरटासारका तीच्याकड बगीत व्हतो पन ती आपल्याच धुनकी मदी आरशात बगुन केस उडवीत व्हती

सूर्‍यान माजेकड बगीतल. 'आवरली क र ? ' मी मान खाली घातली. ' आर तेजाआयला कना लाजतस कना लाजतस र? धा ची नोट चीमटीत पकर न बलीव तीला.'
'आर आस कस ? रागवल ना ती.'
'आर बाबा कना रागवल ? पैशासाटीच नाचतान त्या'.

मी धा ची नोट चीमटीत पकर ली न घाबरत घाबरत हलवली
तीन बगीतल न माजेकड आली हलूच हसली. मी येड्यागत बगीत रहालो. सूर्‍यान चीमटा कारला तसा भानावर आलो.

'तेरा नाम क्या हय ?'
'रेश्मा'
'कीधरसे आयी हय'
'कलकत्ता से'
'ये कलकत्ता कीधर आया'
'आर आसल ईंदापूर चे फुर तूला क कराचा र ?' सूर्‍यान मना जागेवर आनला
'तू रोज ईधर आती क्या'
'हां. रोज आती'
'मै बी आयेगा'

त्या दिशी कोंबडीचे पिसावर बसुनच घरी गेलो
राती झोप नाय, नीस्ता तलमलत व्हतो. दुसर्‍या दिशी सूर्‍याला न सांगता यकटा गेलो.
तीला बलीवल. तिचा हात हातात झेतला.
'मेरेकु रातमे नींद नही आयी. शिर्फ तू ही तू दिकती थी आंखो के सामने'
'कूछ बी मत बोलो हां झुटे कहीके.' तीन लटक्या रागान मूरका मारला. मी खल्लास
'सच्ची. तेरी कसम'
'मै तेरेको ईतनी अच्छी लगती ?'
'फीर. सारी दूनीयामे तेरे जैशी खूबसुरत कोई नही. लेकिन तूम ईतनी अच्छी हो तो ईधर कायको आती है ?'
'क्या बताउ तूम्हे मेरी कहानी. मेरा छोटा भाई बीमार है. उसके ईलाज के वास्ते आना पडता है. घरमे कमानेवाला कोई नही. मजबूरी है.'

मना खुप वाईट वाटला. परस्तीती काय कराला लावील ते समझाचा नाय. मी खीश्यातून पाच हजार रुपये काडले.
'ये रख दो. और बी लाके देगा, जब तक मिथुन तेरे साथ है टेंशन नहि लेनेका क्या?'

येका आठवड्यात बा चे तीस हजार गायब झाले. कशे त कूनालाच कल्ला नाय.. माला पन.

'फ्रायडे को मेरा बडडे है. तूम आयेगा ना.' येके दिशी रेश्माने ईचारल
'क्या बोलती तू ? तेरा बडडे और मै नहि आयेगा ऐसा हो सकता क्या ? '
'तु ईधर आ हम बडडे मनायेंगे और कीधर तो बाहर जायेंगे घुमने को.'
'पक्का ?'
'तेरी कसम' रेशमान माजे गल्याला हात लावला
परत कोंबडीचे पिसावर...

आता बडडेला जावाचा त काय बाय झेउन जावाला नको ? पन क झेवाचा. असा गिफ्ट झेतला पायजेन क ती खुश झाली पायजे. कायव समझना
९३२२ १७ ३३ ........
'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.'
सूर्‍या आला
'क झाला र मिथन्या ?'
सगली श्टोरी सांगीतल्याव सूर्‍या ताडकन उडाला


'जेआयला येवडी परगती केलीस न मना म्हाईत नाय ? तूजा तूच बग काय त.'
'आर बाबा चुक झाली मापी कर पन तीला गिफ्ट काय झेवाचा त सांग'
बर्‍याच मिनतवारीनंतर सुर्‍या शांत झाला
'हे बग तूझा झंगट मनापासन आसल त येकादी भारी साडी झे. '
'बर पन तू चल माजेबरोबर दुकानात. मना साडी झ्याला जमाच नाय.'

सुर्‍याबरोबर गेलो न यक भारी साडी झेतली. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.

'आर पन येक आडचन हाय. ही साडी झेउन मी घरी कसा जाउ ? वाट लागल माजी. असा कर ही तूज्या कडच ठेव. मी फ्रायडे ला येउन झेवुन जाइन'
ठरला. साडी चांगली गिफ्टपॅक करून सुर्‍याचे घरी ठेवली.

आनी येकदाची आली फ्रायडे ची संद्याकाल
मी चांगले नवीन कपडे घातले न सुर्‍याकड आलो.
तो वाटच बगीत व्हता. मी झटकन त्याजेकडशी साडी झेतली न रिक्शात बसुन नींगालो.
वाचमन न कडक सलाम ठोकला न दरवाजा ऊंगडला.
रेश्मा आज मस्तच दिसत व्हती. तीला झेउन कोपर्‍यातल्या टेबलावर बसलो.
'हपी बडडे टू यू '
'थंक्यू. मै कैसी लग रही हूं ?'
'कैशी क्या यकदम रापचीक '
'मेरे लीये क्या लाये हो मेरी जान.'
'ये देख.' मी साडी दाकवली. 'मगर येक शर्त हय. ये साडी पहनके मेरे साथ आनेका.'
'ओके बाबा मै पहनके आती.'
साडी झेउन रेश्मा आत गेली. मी आनलेल्या साडीत रेशमा कशी दिसल हया ईचारात गूंगलो

धाडकन माज्या डोक्यावर कायतरी आपटल. मी वर बगीतल
रेश्मा रागान लाल लाल झालीवती.
'साले, भिकारी की आवलाद, मेरे लीये फटी पूरानी साडी लाया तू, भडवे जा और तेरी मा को पहनाना और वापस ईधर दिखा तो हड्डी तूडवाके रख दुंगी हरामी'
आनी काय काय शीव्या देत व्हती. मी साडीवर नजर टाकली. फाटलेली, वीरलेली, मलकट. मना काय कलना. कूत्र्याचे **सारका तोंड करून घरी आलो.
अपमान गिलुनघरात पडून रायलो.



चार दिवसांनी घराभायेर पडलो न नाक्यावर शिगारेट पीवाला  झेलो
समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.




------------------------  मिसळपाव

मांसाहार हाच नैसर्गिक आहार - भाग २






हा जुना वाद शास्त्रीय पध्दतीने तपासला पाहिजे.पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कीव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशा भावना चेतवू शकत नाही, याचे कारण त्यांचे जीव म्हणून आपल्याशी गुणसाधम्र्य नसते. पावित्र्यासंबंधी असलेले आंधळे धार्मिक समज मनात असल्यामुळे मांसाहारी व्यक्तींमध्ये कधीकधी नाहकच न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण होते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा ज्याप्रकारे भोंदू बुवा-बापू घेतात त्याचप्रकारे शाकाहारवादीही घेऊ पाहतात.
 शाकाहाराचा प्रचार करण्याचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅटस्, पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा ३, अँटिऑक्सिडंटस् या अन्नघटकांसंबंधाने मांसाहाराच्या संदर्भात बेधडक
विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतडय़ांचे विकार, कर्करोग अशा  अनेक विकारांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडे फेकणारी विधाने त्यांनी ऐकली की परिणाम साधतोच. शुद्ध शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनी तरी अधिक असते असा एक एकजात खोटा प्रचार केला जातो.
अगदी अलीकडेच मेरीलँड युनिव्हर्सिटीतील पेडिएट्रिक्स, मेडिसिन आणि फिझिऑलॉजीचे प्राध्यापक डॉ. अ‍ॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चितपणे अन्न मिळवण्याचे शेतीचे तंत्र अवगत झाले आणि धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांमधील ग्लुटेन या प्रथिनामुळे यापूर्वी होत असलेले आतडय़ाचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतडय़ाच्या विकारांनी जगातील केवढीतरी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. त्यांनी काही उत्तरे मिळवलेलीही आहेत. गहू, बार्ली, राय हा शुद्ध शाकाहार असूनही त्याचे काही दुष्परिणाम आहे. म्हणून काही गहू खाण्याचे कुणी सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यामागे अनेकांची बुद्धी धावू लागेल. माणसाने विकसित केलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारांमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर पथ्यकर काय, दोषकर काय याचा तपशीलवार
अभ्यास नोंदला आहे. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वत:बद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलीकडे यातून काहीही साध्य होत नाही. शाकाहारी लोक अधिक निरोगी राहतात या दाव्याची शहानिशा कुणी केली आहे का? निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवनशैली, आहार-विहार, देशमान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे किती तरी अभ्यसनीय मुद्दे- व्हेरिएबल्स असतील.
मांसाहारी लोक काही शुद्ध मांसाहारी नसतात. शाकाहाराला मांसाची जोड असते. मांसामधून जी आठ अमायनो अ‍ॅसिडस् मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैरनिष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो. शुद्ध शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.
पण आज या धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनची साथ मिळाली आहे. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन स्वीकारतात.  केवळ बुद्धिनिष्ठा ग्राह्य़ धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.  आता आपण आरोग्यकारक घटकांचे काही तपशील पाहू. शाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की, ‘बी१२’ हे जीवनसत्त्व शाकाहारी आहारातून मिळू शकते. काही शैवाले, सोयाबीन्स आंबवून मिळणारे टेंपी, यीस्ट हे कवक यातून ‘बी१२’ हे जीवनसत्त्व लाभते हा त्यांचा दावा पूर्णत: खोटा आहे. हे जीवनसत्त्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाही हे सांगितले जात नाही किंवा प्रचारक त्याबाबत अज्ञानी असावेत. स्पिरुलिना, टेंपी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिद्ध झाले आहे. यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरूपातील ‘बी१२’
नसतेच. ते केवळ बाहेरील घटकद्रव्यांशी संयोग पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचविण्यात आलेल्या सोयाबीनची एक तिसरीच कथा आहे. सोयाबीन उत्पादने करणाऱ्या बडय़ा कंपन्यांचा प्रचार काहीही असो. सोयाबीन हे धान्य काही फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या सेवनामुळे अनेक लोकांना थायरॉइडचा त्रास होतो हे सिद्ध झालेले आहे.
काही प्रचारक तज्ज्ञ सांगतात, आतडय़ातील काही बॅक्टेरियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहेच. पण तेथे तयार झालेले बी१२ शरीराला लाभत नाही त्याचे काय. बी१२ शरीराला मिळण्यासाठी त्याचे पचन जठरात व्हावे लागते. देशाच्या काही प्रदेशातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित असा निष्कर्ष काढला गेला असेल. पण या प्रदेशात कीटकनाशकांचा वापर नसल्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात, त्यातून त्यांना प्रथिने मिळत असतील. (कीटक आणि त्यांची अंडी ही भविष्यातील प्रथिनाचा पुरवठा असू शकतात, अशा एका भाकिताची येथे आठवण होते.)
शरीराला सहजपणे शोषून घेता येईल असे बी१२ जीवनसत्त्व केवळ प्राणिज्य पदार्थातून मिळू शकते हे सत्य आहे. लिव्हर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दुग्धजन्य पदार्थातून थोडय़ा कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दूध आणि अंडीही आहारातून वगळतात. अंडी खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करण्यात आला आहे, त्यामुळेही अनेकजण अंडी खाणे टाळतात.परिणामी बी१२ ची कमतरता निर्माण होते आणि त्यातून अंतिमत: पंडुरोग (अ‍ॅनिमिया) जडतो. आजकाल बी१२ च्या पूरक गोळ्या उपलब्ध आहेत म्हणून ठीक नपेक्षा हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती, खरे म्हणजे बी१२ च्या कमतरतेचा एकच मुद्दा शाकाहाराच्या आरोग्य प्रदतेच्या मुद्दय़ाचा खातमा करू शकतो. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अ‍ॅसिडस् म्हणजे लिनोलेनिक आणि लिनोलिइक ही पॉलिअनसॅच्युरेटेड मेदाम्ले
आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वत: ती तयार करू शकत नाही. अत्यल्प प्रमाणात ओमेगा ३ पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा पुरवठा मासे आणि अंडी यातूनच होतो. ओमेगा ६ हे बव्हंशी भाज्यांमधून मिळते आणि अल्प प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतून मिळते. शाकाहारी लोकांची समजूत पटविण्यासाठी शाकाहाराचे प्रचारक सांगतात की, आपले शरीर ओमेगा ६ पासून ओमेगा ३ पर्यंत गरज पडेल तसे रूपांतरित करू शकते. असे होऊ शकत नाही असे मेरीलँड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग सिद्ध केले आहे. ओमेगा ६ मेदाम्ले थोडय़ा वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा ३ चेही आहे. पण ओमेगा ६ चे ओमेहा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता चांगली राहावी म्हणून ओमेगा ३ प्रकारातली मेदाम्ले अत्यावश्यक असतात.
भाज्यांतून मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने नुकसानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा ३ वापरणे शरीराला कठीण जाते. आणि ओमेगा ३ कमी पडल्यास कर्करोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारक शक्तीही खालावते.
मेदाम्ले बी१२ जीवनसत्त्व याबाबत जशी अर्ध सत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्त्वाबाबतही सांगितली जातात. अ जीवनसत्त्व हे शाकाहारातून भरपूर प्रमाणात मिळते असा सर्रास समज आहे. प्रचारकांकडून तो अधोरेखित केला जातो. वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा कॅरोटीनचे रूपांतर करून शरीर अ जीवनसत्त्व मिळवू शकते हे सत्य आहे. पण ते रूपांतर करण्यासाठी साथीला चरबी किंवा तैलद्रव्ये खावी
लागतात. शिवाय हे रूपांतर काही तेवढेसे सोपे नाही. जे काही बिटा कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्त्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले, वृद्ध माणसे थायरॉइड, गॉलब्लॅडरने ग्रस्त लोक यांना तितक्या चांगल्या प्रमाणात हे रूपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळेल असे अ जीवनसत्त्व मिळेल केवळ प्राणिज पदार्थातून मिळते. ताजे लोणी, इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बीटा कॅरोटीनपासून अ जीवनसत्त्व मिळवता येते. अ जीवनसत्त्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात आलेली प्रथिने किंवा मिनरल्सचा फायदा शरीराला उचलता येतो.
मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा १७ रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणात असतो, असे छातीठोकपणे सांगितले जाते. गंमत अशी आहे, की यातील बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव विसाव्या शतकात अधिक होऊ लागला. त्या पूर्वीचा इतिहास, मानववंशाचा इतिहास साऱ्याकडे डोळेझाक करून असला प्रचार केला जातो. मांसाहार त्याज्य आहे हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले. शाकाहारी मताच्या शास्त्रज्ञांकडे त्यांची जबाबदारी असूनही, त्यातील अनेक निरीक्षणे अपेक्षेच्या उलट निघाली. डॉ. एच. ए. कान, डॉ. डी. ए. स्नोडेन यांच्या अभ्यासातून शाकाहारी लोकांना दीर्घायुष्य असल्याचा मुद्दा निकाली निघाला.
अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या त्या शास्त्रज्ञांनी तसे मोकळेपणाने मान्यही केले आहे, पण तरीही शेवटी मांसाहार शक्य तितका न घेण्याचा सल्ला देऊन तर्कनिष्ठेशी मात्र त्यांनी प्रतारणा केली.
शाकाहार घेणे अर्थातच महत्त्वाचे आहे. आपण सारेच जण प्राय: शाकाहारच घेतो. कबरेदके मिळविण्यासाठी धान्याहार, पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच; परंतु तेवढय़ाने पुरत नाही हेही मान्य करावे लागते.
प्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होता हा एक दावा फसवा आहे. आदिमानवाच्या आहारात फळेमुळे होती असे आग्रहाने सांगितले जाते. हे दावे मनघडन्त वाटावेत इतके अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. अजूनही शिल्लक असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही यातील तथ्यांशाचा अभाव जाणवतो.
काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळेनासे झाल्यामुळे, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाल्यामुळे आणि एकूणच अन्न परवडेनासे झाल्यामुळे त्यांचा निरोगीपणा धोक्यात आला आहे.
आणखी एक गैरलागू मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे मांसाहारामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स, घातक कीटकनाशके, घातक रसायने जातात. प्राणी मारले जाताना त्यांच्यात जी स्ट्रेन्स हार्मोन्स जातात तीही
शरीराला चांगली नसतात असेही सांगितले जातात. यात निश्चितच तथ्य आहे, पण नेमके हेच शाकाहार, धान्याहाराच्या बाबतीतही होते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी अधिक अन्न उत्पादनासाठी जे आधुनिक मार्ग स्वीकारणे आपल्याला भाग पडले आहे त्याचीच ही परिणती आहे.
आहाराच्या पोषक मूल्यांसंबंधी सर्व मुद्दे मांडून झाले की शाकाहारवादी आजकालचे अव्वल नंबरचे चलनी नाणे वाजवू लागतात. ग्लोबल वॉर्मिग, क्लायमेट चेंजसाठी मांसाहार जबाबदार आहे असे सांगितले जाऊ लागले आहे. भावनिकतेच्या आहारी जाऊन पर्यावरणासाठी काम करू म्हणणारे किशोरवयीन कार्यकर्ते अनेकदा या बाबतीतील सत्याची पडताळणी करण्याच्या मन:स्थितीत नसतात. पण यासंबंधातील नेमका मुद्दा काय आहे तो पाहावाच लागेल. जगातील गरिबी, मिथेनचे उत्सर्जन अशा दोन मुद्दय़ांचा घोळ घालून जाऊन तयार झालेला हा मुद्दा आहे. खाण्यासाठी एक जनावर जगवायचे तर त्याच्यासाठी जे काही धान्य किंवा गवत तयार करावे लागते ते उगवण्याच्या जागेत जगभरातील अर्धपोटी, उपाशी पोटी जनतेसाठी धान्य उगवता येईल असा एक मुद्दा असतो. त्याच्या जोडीला गुरांच्या वाढत्या संख्येमुळे तयार होणारा मिथेन हा वायू पर्यावरणास हानीकारक आहे असेही सांगितले जाते. या वरवर छान छान आग्र्युमेंट वाटणाऱ्या मुद्दय़ांच्या अंतरंगात जरा डोकावून पाहा. गवतांमध्ये वैविध्य किंवा गुरांसाठी वाढवली जाणारी विशिष्ट धान्ये वाढू न देता केवळ काही धान्येच वाढू दिली तर जीववैविध्याची हानी होते याचा यात विचार आहे? गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरे नष्ट करायची आहेत का? गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको? गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये,
पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
सत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आरोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणी कुणावर अमूक एक गोष्ट खाण्याची सक्ती करू नये, पण आपापल्या आवडीनिवडीला तात्त्विक रंग चढवू नयेत. गेंडय़ाच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत.
अन्नविषयक आवडनिवड ही पूर्णत: व्यक्तिसापेक्ष आहे, हे शाकाहारवादी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.

स्वत:ची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्त्वे आहेत ती आपल्यापुरती जपावी. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या पर्युषण पर्वात इतरांनी शाकाहार करावा (म्हणजे केवळ वनस्पती- जीवहत्या करावी!) म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे हाही दुराचारच.
आरोग्यरक्षणासाठी मितभुक्, हितभुक आणि अशाकभुक् राहावे असा आयुर्वेदाचाही उपदेश आहे.
मितभुक् म्हणजे- आहार कमी असावा, खादाडपणा करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. खाण्याच्या दोन वेळांतही किती अंतर ठेवावे, तेही आयुर्वेदाने सांगितले आहे. दोन तासांच्या आत पुन्हा खाऊ नये आणि सहा
तासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये.
हित भुक् म्हणजे- आवडणारे अन्नघटक खावेत, कारण जे आवडतात ते घटक सहसा तुमच्या पचनसंस्थेला सहन होणारे असतात. ज्या घटकांमुळे किळस किंवा घृणा वाटेल, नकोसे वाटेल ते घटक जबरदस्तीने खाऊ नयेत.
आणि अशाकभुक् म्हणजे- आहारात अशाक म्हणजे प्राणिज आणि प्राणिजन्य पदार्थही पुरेसे असावेत.
खरे म्हणजे शुद्ध शाकाहार हे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार म्हणजे पोषणदृष्टय़ा श्रेष्ठ आहार असे कुठल्याही शास्त्रीय आधाराशिवाय सांगणे हा सत्यापलाप आहे आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे. 


--- लोकसत्ता 






मांसाहार हाच नैसर्गिक आहार! : भाग-१





इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसाला फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं, असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा घडला त्याच्या कार्यकारणसंबंधाची सत्यता खरेच आहे का हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार, सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रद्धात्मक आग्रह धरून सांगत राहणे म्हणजे अंधश्रद्धेचाच प्रसार.
धार्मिक- आध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो, जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासातून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे.
माणसाने काय खावे, कसे खावे, का खावे याचा विचार मानवी संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित होत गेला. जे उपलब्ध आहे, जशी हवा आहे, जशी प्रकृती आहे त्यानुसार विविध प्रदेशातल्या विविध लोकांनी आहाराच्या पद्धती ठरवल्या. अन्नग्रहणाचे रीतीरिवाज ठरवले. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपद्धती स्वीकारल्या गेल्या. यात अनेकविध धान्ये, कडधान्ये, फळे-मुळे, पाने-फुले असा शाकाहार, मत्स्याहार, मांसाहार, दही-दूध-लोणी- तूप, अंडी, चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होत गेला.
जगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वज्र्य करावा, असे सांगण्यात आलेले नव्हते. प्रत्येक धर्मात काही वस्तू वज्र्य आहेत. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वज्र्य आहेत. हिंदू धर्माला फुटलेल्या केवळ एका पांथिक शाखेत म्हणजे जैन धर्मपंथात अशाक आहार पूर्णत: वज्र्य मानण्यात आला आहे. आताशा जैन धर्मपंथ एखाद्या पूर्ण धर्माप्रमाणे अधिकाधिक होत चालला आहे हा भाग अलाहिदा.
पण आजकाल जगभरच सर्वत्र मूळ धर्माचा भेदाभेद न राहता शुद्ध शाकाहारी बनण्या-बनवण्याचा धर्मपंथ बळावत चालला आहे. मांसाहाराविरुद्ध जिहाद पुकारल्यासारखी प्रचारकी भाषा वापरली जात आहे. भावुकतेच्या आहारी जाऊन अनेक मांसाहारी लोक नाहक अपराधी भावनेने ग्रस्त होत त्यात सामील होत आहेत.
व्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी शाकाहारी राहायचे ठरवले तर तो मुद्दा मान्य करता येईल, अशा व्यक्ती कुणी आग्रहच केला तर नम्रपणे मला आवडत नाही, मला चालत नाही, अशी उत्तरे देऊन अशाक आहार घेण्याचे टाळतात किंवा कधी थोडी चव घेऊनही पाहतात.
हिंदू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठेवलेले जातीने ब्राह्मण असलेले अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत. ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली अशी तिसरी पिढी तरी भारतात आहेच.
परंतु त्याचवेळी शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा येऊ लागली आहे. यावरून कुणालाही हा संदर्भ मुंबईसारख्या महानगरातील जैन पंथीयांच्या वर्तनाला अनुलक्षून आहे की, काय असे वाटेल. तसे तर आहेच. पण हा संदर्भ तेवढय़ापुरता मर्यादित मात्र नाही. भारतीय परिघाबाहेरही, जागतिक स्तरावर शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अवास्तव मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्दय़ांचा कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे कारण या वादामुळे माणसामाणसात प्रकारचे विभाजन (्िर५्रीि) होण्याची शक्यता तर आहेच, पण मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळेपणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले एका उत्तम प्रकारच्या प्रथिनयुक्त आहाराला मुकतात. आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.
विज्ञानाच्या परिभाषेचा दुरुपयोग करून फार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल करणारे बाबा, बुवा, फेथ-हिलर्स तर आपण पाहतोच. हा प्रसिद्धी आणि पैशाचा सारा खेळ असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहेत. ज्यांना ज्यांना काही विशिष्ट ‘दुकान’ चालवायचे आहे, प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवून आपले वेगळेपण प्रस्थापित करायचे आहे, अशा जगभरातल्या विविध गटांत कोण कोण आहेत.. पृथ्वीच्या रक्षणाचे ठेकेदार, प्राणीप्रेमाचे ठेकेदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स इंजिनीअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महंत अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते. या सर्वाचीच दुकाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या सत्तेच्या दुकानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वाचेच ध्येय पैसा असते, असेही नाही. कुणाला प्रसिद्धीचे वलय हवे असते, कुणाला काटेरी मुकुट. जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा हवा असेल त्यांना फंड्स आणि काटेरी मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके, कधी कधी तर दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम प्लेझर ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा मिळवण्याचे शुचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे.
असल्या गटांमधलाच एक अत्याधिक बोंबाबोंब गट आहे शाकाहारवाद्यांचा. शाकाहारवादी कोणत्या प्रकारे विज्ञानाची परिभाषा वापरतात आणि दिशाभूल कशी केली जाते हे पाहण्यासारखे आहे.
माणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाहीत हे त्यांचे सर्वात लाडके आग्र्युमेंट असते. शरीररचनेचा वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे.
शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. केलेच तर तर्कनिष्ठा गहाण पडण्यासारख्या एखाद्या पगडय़ाखाली असेल तरच. एॅनिमल लिबरेशन फ्रंट नावाच्या एका दुकानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. ते आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्न नाही असे शाकाहारवादी लोकांचे म्हणणे असते.
निसर्गसंमत म्हणजे नेमके काय? मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुद्धी निसर्गत: मिळाली. एकाच खाद्य वस्तूवर विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बुद्धी माणसाकडेच आहे. आणि त्या निसर्गदत्त बुद्धीचा वापर करूनच मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गत: मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत गेलेले स्वरूप आहे. माणूस आपल्या भोवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूंमध्ये परिवर्तन करून ती खाऊ, पचवू शकतो. उष्ण कटिबंधातील माणसं अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नि, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा म्हणजे तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तुरट चवींचा वापर करून खातात. मांस, मासे, अंडी वगैरेंप्रमाणेच धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे, मुळे, फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे लागते. निवडणे, सोलणे, धुणे, भिजवणे, चिरणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधातील माणसं कमी जास्त प्रमाणात तेच संस्कार करतात.
अतिशीत प्रदेशातील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर देताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खातात आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.
दुसरे असे की माणसाची आतडी ही शाकाहारी प्राण्यांच्या आतडय़ांपेक्षा कमी लांब असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतडय़ांपेक्षा थोडी जास्त लांब असतात. शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसात नसते. रवंथ करण्याची रचनाही नसते. माणूस हा शाका तसेच मांस असे दोन्ही प्रकारातील अन्न घेऊ शकतो.
अशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शुद्ध अशाक आहार घेत नाही. शाकाहाराला प्राणिज पदार्थाची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचरांचे मांस यांची जोड असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिंबिरी यांच्या जोडीला मांसाहार केला जातो. छान मजेत माणूस मांसाहार घेतो. दातांनी सुळ्यांनी तोडतो, चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.
संस्कृतीच्या युगप्रवासात पाककला प्रगत झाली त्याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बुद्धी, निसर्गदत्त शरीररचना- पचनसंस्था आणि काय आवडतंय हे कळवणारी रसना. शरीराला काय नको हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध घेऊन आहारात बदल करण्याची अक्कल हे सारं निसर्गदत्त होतं. मग ते निसर्गसंमत नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.
दुसरा मुद्दा पुढे केला जातो तो क्रौर्याचा. तर्कनिष्ठेला, अनुभवसिद्ध ज्ञानाला खुंटीला टांगून केवळ आपलीच भावना श्रेष्ठ मानणाऱ्यांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वत:च्या माथ्यावर संवेदनशीलतेचा किरीट ठोकून बसवला तरीही असले खुळचट मत मनावर घेण्याची गरज नाही.
अनेक लोक आपण संवेदनाशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्टय़ा आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्व संमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होतो.
पण बुद्धीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले असेल तर असल्या भावनाप्रधान, वेडगळ श्रद्धांबद्दल काडीइतकाही आदर दर्शवणे चूक ठरेल. किंबहुना असल्या उद्योगांना सज्जनता म्हणून थोडाही आदर दाखवल्यास त्यांच्या शस्त्रांना धार चढते. काही काळानंतर त्यातूनच भावना दुखावण्याचे राजकारण सुरू होते. अशाक खाणे म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रूरता असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.
तसे पाहता धान्य खाणे म्हणजे एका अर्थी भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या त्या बिया दोन दगडांमध्ये दळल्या जाताना, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनांचा ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदना होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाणी मिळते आहे अशा जाणिवेने कडधान्यांच्या बिया अंकुरायला लागतात, वाढण्याच्या तयारीला लागतात.. त्यांची जिजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? उगवलेले कोवळे झाड उपटून त्याची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना, अगदी कोवळेच आहे असे पाहून ते चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुद्ध शाकाहारी म्हणवणाऱ्या लोकांना त्या करणं भाग आहे. कारण माणूस दगड मातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत राहू शकण्याइतका अजूनतरी उत्क्रांत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर व्हावा आणि प्रायोपवेशन करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?
निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात् साहचर्य, क्रौर्य ही जे घडते त्याला माणसाने दिलेली विशेषणे आहेत. खरे तर तो एक केवळ अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार वागतो, जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्त्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्त्व पाळत आला आहे. स्वग्रह- संवर्धनाच्या नव्या जाणिवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून ‘खाद्य’ जीव, ‘अखाद्य’ जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशुपक्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या सर्व व्यक्ती दुर्मिळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता निर्बुद्ध, लोभी, लालची एवढेच करता येईल.
शाकाहारी असलेल्या अनेक व्यक्ती दुर्मिळ जीवसृष्टीच्या काळ्या बाजारात तसेच इतर अनेक काळ्या व्यवहारांतही असतात हे भारतातल्या कुणाला वेगळे सांगायला नकोच! आणि आवडीने कोंबडी, बकरी, मासे खाणाऱ्या अनेक व्यक्ती आपला परिसर, आपली सृष्टी आणि आपला समाज निरोगी राहावा म्हणून तळमळीने काम करताना दिसतात. सुष्टत्वाचे आणि दुष्टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार, मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. वनस्पतींची जीवहत्या सात्त्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका फरक आपण नाहकच करून ठेवला आहे.



-------- लोकसत्ता



वन्दे मातरम् - संपूर्ण


वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्य श्यामलां मातरम् ।
शुभ्र ज्योत्स्न पुलकित यामिनीम
फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् ।
सुखदां वरदां मातरम् ॥ वन्दे मातरम्...

सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद कराले
निसप्त कोटि भुजैब्रुत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीं नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्...

तुमि विद्या तुमि धर्मं, तुमि ह्रदि तुमि मर्मं
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
ह्रदये तुमि मा भक्ति,
तोमारे प्रतिमा गडि मंदिरे मंदिरे ॥ वन्दे मातरम्...

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम् ॥ वन्दे मातरम्...

श्यामलां सरलां सुस्मितां भुषिताम्
धरणीं भरणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्
------- बंकिमचंद्र

आगरी वस्त्रहरन



मांगच्या सालची गोस्ट सांगतय
कमीटीची मीटींग झाल्ती
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा.
पन ईशय कोन्ता ?
कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला
चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन
काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला
"यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?"
मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं.
"व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन
ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन'
"चला आता काश्टींग करुया " मास्तर
म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया
"आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर
"बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार
हां. तर आता धर्मराज कोन ?
मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या
अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली
"दुर्योदन ?"
"तुकाराम तु हो."
"पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन?
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर
दुशासन कोन ?
सगल्यांचा हात वर
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
"ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?"
सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन.
आता द्रुपदी
सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना
आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलं
"पनवेलचे 'मल्लिका' मदी माजी वलक हाय." बारक्या म्हनाला "तीतुन आनु यकादी."
"जमल जमल , आनी तीचा यक डांस बी ठीउ . मोप गर्दी जमल. "
रेसल सुरु . सगला येवस्तीत जमला पन येक लफरा झाला
"द्युत" कसा खेलाचा ह्ये मास्तरला कलना. आता मास्तरलाच म्हाईत नाय म्हन्जे बाकी सग्ल्यांची बोंब. क कराचा
"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. लासला धर्मराज हरल न मंग द्रुपदीचा वस्रहरन करु. क बोल्ता?" दत्ता पाटील बोल्ला
ह्ये बी पटल सर्वांना.
नाटक सुरु झाल
झाल्त काय मंडली , काश्या न बंड्या दोगव भट्टीची लाउन आल्ते आनी यकमेकांच डायलाग बोलत व्हते.
सगला लोच्या चाल्ला व्हता
शेवटी यकदाचा धर्मराजान दुयोधनाला तीन पानीच आवतान द्दील्ल नी 'द्युता' स सुर्वात झाली
पन धर्मराज जिकतच गेला . दुयोधनाला पत्ताच येयना .
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या
मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल ,
काश्या तराट , तो कइ आयकना
"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"
दुयोधन रास हरला . काश्या उटला " द्रुपदीला हाना. मी सोरनार पातल . माजा आदीकार हाय तो."
दुयोधन म्हनाला " नाटकान क लीवलय ? मीच द्रुपदी ला मांडीव बशीवनार"
दुशासन म्हनाला "मीच द्रुपदीची सारी वडनार"
हा लफरा वारला. ही मारामारी .
आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.


------- मिसळपाव 

माझा बापूस



मी चवतीन होतो.
सकाली उटलो. आंग धवला. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन झेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायपुन दिसना.
कसातरी खाली बसलो. हजेरी चाल्लीवती.

"रमेश म्हात्रे.............. " मास्तर वरडलं

"आत्ताच आयलो न" मी

"हं दिसतय मना."

"पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं

"म्हात्र्याच्या !  उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "

माजे पोटान गोला उटला. चवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवता. मी उबाच.

"काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर

"बापासचे बरब खारीवर कोलब्या न चिम्बोर्या पकराला जेलेलो."

"बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय.  क समजला ?"

घरी आलू.

सांचे टायमाला बा आल्याव आय म्हनली "मास्तरनी रम्याला लय झोरला आज. अब्यास करना म्हुन. तुमासनी बलीवलं हाय"

बाचा डोस्का सटाकलं.
" माजे पोराला झोरला ? माजे पोराला झोरला ? क केलाय क त्यान ? क र रम्या ?"

"ग्रिवपाट नाय केलावता." मी लराला लागलू.

"आवरावरशी झोरला क ? बाला तू लरू नको. चीप रव चीप रव. उद्या बगून झेव."

मी बा च्या कुशीत झोपून गेलो.

सकाली मी न बा शालंन.

"क झाला ?" बा शांत.

"तुक्या तुजा रम्या अब्यास करना बग" मास्तर

"मंग " बा शांतच.

"अरे मंग कय मंग ? तेला चिंबोरी पकराला न्हेउ नको . अब्यास कवा करील त्यो ?"

"तेजायला मंग खावाचा क ? तुजी हारां ?" बा सटाकला.

"असा क बोलतस तुक्या ? रम्याचे चांगल्यासटी सांगतय."

"अब्यास करून डंपरवरतीच बसाचा हाय नं. आवरा करुन ठेवलाय त्याजेसाटी. तु सांगाची गरज नाय. "

"अरे अब्यास करा नको ? तेला वाचाय सुदीक येत नाय"

"म्हुन त्याला झोरलास ? म्हुन त्याला झोरलास ? आज तुजे रेमन कीरे भायर काडतो क नाय बग. रम्या पोकल बांबू आन लवकर. बा चितालला.
...
...
...
त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला.



------------------ मिसळपाव  

Tuesday 27 March 2012

विनोदी विनोद वडे ....... भाग २




आयुष्यात अनेकदा पाय डगमगला , पडलो पण हिम्मत नाही हारलो,

.

.

.

.
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला....
.
.
.
.
.
.
.
.
वेटर अजून एक खंबा लाव ..................!!!!!!!!


-----------------------------------


एकदा बायको नवऱ्यासाठी एकाच कलरच्या ४ आतल्या चड्ड्या  घेवून येते


नवर्याला हे बघून खूप राग येतो


नवरा : तुला काय अक्कल आहे का ? लोक काय म्हणतील मी एकच चड्डी रोज घालतो.


बायको : (रागाने) कुठली लोकं...............सांगा ना कुठली लोकं ?








पुढे काय झालं असेल ते तुम्ही त्या नवऱ्याला जावून विचारा



-----------------------------


मुलगी : मी जेव्हापण तुला फोन करते तेव्हा तु शेव्ह करत असतोस .


मुलगा : अग हो ग ..


मुलगी : दिवसातून कितीदा शेव्ह करतोस रे ??


मुलगा : तरी अंदाजे ३० ते ४० वेळा .


मुलगी : पागल आहेस का रे ??


मुलगा : पागल नही ग .. न्हावी आहे ..



------------------------


एकदा बंड्या ITEM ला घेऊन फिरायला जातो, 



बंड्याच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते, बंड्याला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल......

अन तिच्याकडे बघत असतो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ITEM - बघु पण नको
हा "दिवाळीचा ड्रेस " आहे माझा.....!!!!!

-----------------------


दोन अतिरेकी बार मध्ये बोलत बसले होते..

वेटर ने सहज म्हणून त्यांना विचारले कि ते कशाबद्दल बोलत आहेत...

अतिरेकी: आम्ही ४०० माणसाना आणि एका गाढवाला मारणार आहोत...

वेटर: गाढवाला का?

अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला : हुशश... बघितलस.. मी बरोबर म्हणत होतो... 


४०० माणसांचा कोणीच विचार करणार नाहीत.

---------------------
 

प्रमिला- काय गं, डोळा कसा काय सुजलाय तुझा?
मीना- काल रात्री नवऱ्यान
मारलं.
प्रमिला- पण तुझा नवरा तर कोल्हापूरला गेला होताना काल.






मीना- मला पण तसंच वाटलं होतं.


 ----------------

मराठीचा वर्ग सुरू होता,  बाईंनी वाक्य सांगितलं,


' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'


हात वर करून विन्या लगेच उद्गारला,

'

'

'

'

'
"आयला आयटम!!!'



---------------------



मुलगा : तू किती गोड हसतेस..., अस वाटत तू हसतच रहाव, हसतच रहाव....
मुलगी (लाजुन) : खरच... मग काय होईल ?
'
'
'
'
'
'
'
मुलगा : काही नाही ... लोक तुलाच वेडी समजतील...


--------------------------



एक मुलगी तिचा स्वतःचा नंबर  तिच्या boyFriend च्या मोबाईल मधून डायल करते, हे बघण्यासाठी कि त्याने तिचा
नंबर काय नावाने सेव केलाय ......जस....डार्लिंग,  शोनु ...


आणि तिला धक्काच बसतो.

ते नाव असत

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तुकाराम  पलंबर.

--------------------------------------------



 बॉस : (चिडून) मूर्खा, तू एका दिवसात एवढ्या चुका कशा करू शकतोस?

गंपू : त्याचं काय आहे सर...मी सकाळी लवकर उठतो ना.




--------------------------------------------


मालवणी माणूस : ओ पुजाऱ्यानु...यंदाच माझी बायपास झाली असा.....
तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्येव.

पुजारी: बा देवा म्हाराजा, यांची यंदा बायपास झाली असा. तशी ती दरवर्षाक होऊ दे रे म्हाराजा..........







विनोदी विनोद वडे ....... भाग १



मुलगी : कशी दिसतेय मी आज.. आत्त्ताच ब्युटी पार्लर ला जाऊन आले .

.

.

.

.

.

.

.
.

मुलगा : मग ..???  आज पण पार्लर बंद होते का??





------------------------------


एक गाढव झाडावर चढते.


झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.


हत्ती-तु झाडावर कय करतोयस?


गाढव- सफरचन्द खायला आलोय.

...

हत्ती- अरे 
गाढवा हे तर आंब्याचे झाड आहे.


गाढव- मला माहित आहे म्हणून मी सफरचन्द सोबत घेउन आलोय.




---------------------------


भाजीवाल्याने दुकान उघडले आणि भाज्यांवर पाणी शिंपडत असतो.




शेवटी एक बाई म्हणते.


.


.


.


.


.


.


.


भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो दे ...



---------------------------


एकदा 'ती' त्याला म्हणाली,


या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके आहेत. जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर किलो मीटर मध्ये.........पण.....


प्रेम


... ... ...


विश्वास,
... ... ...

मैत्री,
... ... ...

जिव्हाळा,

... ... ...


सुख,
... ... ...


दुःख


हे मोजायला एकके मात्र नसतात........असं का???


त्याने क्षणभर विचार केला,


तिचा हात हातात घेत..........तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला,


"हे बघ,


.


.


तुला पकवायचं असेल तर सरळ घरी जा...."


------------------


 तीन गोष्ठी नेहमी लक्षात ठेवा


''



''



''



''



''



''



''



म्हातारीची, लाकूडतोड्याची आणि चिऊ-काऊची......


----------------------------


कधी खूप वाटतं की,


काहीतरी वाटावं....


कधी वाटतं की, काही वाटू नये....


नंतर वाटतं की, काही वाटण्यापेक्षा,

:

:
:
:
:
:


सरळ मिक्सरमधून बारीक करून घ्यावं!!


---------------------



एकदा मोगली दादा कोंडकेंना विचारतो " दादा दादा तुम्ही चड्डी कुठे शिवता?"

.

.

.

.

.

.

.

.

.

.

दादा- " च्या मायला कुठे म्हणजे काय? फाटेल तिथून शिवतो!"




Monday 26 March 2012

माजघरातील हुंदके






१८०० किंवा त्याच्याही आधीचा काळ.
स्थळ :
माजघर, पाणवठा, देऊळ. जिथे स्त्रिया जमू शकतात, असं कुठलंही ठिकाण.
पाच-सहा बायका जमल्यात. एकीला हंडा उचलवत नाही. हात सुजलाय. बाकीच्या मदत करतायत. साहजिकच कारण विचारलं जातं. तिच्या अश्रूंचा बांध फुटतो.
‘काल यजमान आले.. स्वयंपाक तयार नव्हता.. त्यात बारकीला ताप होता.. पण सांगणार कोणाला?’
‘बयो, पावसानं झोडलं, नवऱ्यानं मारलं, कुणाला सांगणार? बाईचं जिणं असंच, आपणच सांभाळून घ्यायचं.’
आता यात पात्र बदलू शकतात. म्हणजे समाजातील वर्गवारीनुसार ब्राह्मण-मराठा समाजातल्या घरातील माजघरातले हुंदके, मारझोड बाहेर दिसत नाहीत. कधी कधी वाढताना बांगडय़ांचा आवाज झाला किंवा भात थोडासा कच्चा राहिला म्हणून

तांब्या फेकून दिला जायचा. डोळे टिपत चुलीकडेच हळद भरून बाईचं काम सुरूच राहायचं. तुलनेने जरा खालच्या स्तरात दादल्याने ठोकून काढलं की बोंबलत बायको बाहेर यायची, त्यात वावगं कुणाला वाटायचं नाही. अर्थात मारणारा नवराच असायचा असंच काही नाही. सासरा, दीर, प्रसंगी सासू, नणंदही.
एखादीला तिचं भाग्य चांगलं आहे असं सांगताना ‘निदान नवरा मारत तरी नाही गं,’ असं आवर्जून बोललं जायचं. असह्य झालं तर बाई मग घरामागचा आड जवळ करायची, जाळून घ्यायची, एखादी माहेरी जायची.
पण प्रसंगामध्ये फरक पडायचा नाही. त्यावेळच्या चुलींनी, माडय़ांनी, माजघरांनी किती अत्याचार पाहिले असतील.
२००५
स्थळ :
चाळ किंवा तत्सम जागा. वेळ कुठलीही.
एका बिऱ्हाडातून दणादण दणक्यांचा आवाज येतो. घरातल्या मुलांचं रडणं वाढतं. कुणीतरी घाबरून बाहेर येतं, पण आजूबाजूच्या बिऱ्हाडात सगळं कानाआड होतं. काही झालंच नाही अशा आविर्भावात बाकीच्यांचे कार्यक्रम चालू असतात. समजा, जास्त वेळ मारणं चालू राहिलं तर गॅलरीत विडी फुंकत मावा लावून उभे असलेले निवांत बाप्ये घरात जातात. नवऱ्याला बाहेर आणतात, मग बायका जाऊन त्या बाईला सावरतात.
२००९
स्थळ :
हायक्लास सोसायटी. एकदम पॉश. वेळ मुख्यत्वे करून रात्रीची. अल्ट्रा मॉडर्न घरातली सुपर अल्ट्रा बेडरूम.
दरवाजा धाडकन उघडला जातो आणि इंग्रजीत शिव्या देत बायकोला सटासट कानफटात मारलं जातं. तिच्या
एका कानातील हिऱ्याची कुडी सांडते. पार्टीसाठी खास केलेली केशभूषा विस्कटते, मस्करा गोंधळतो, तोंडावर वार होऊ नयेत म्हणून मॅनिक्युअर्ड हातांनी तोंड झाकलं जातं. मग लाथा कंबरेत बसतात. शिव्यांची राळ उडते. बाजूच्या तशाच फ्लॅटमध्ये सगळं ऐकू येतं. यावर उपाय म्हणून होम थिएटरचा आवाज मोठा केला जातो. पार्किंग लॉटमधले ड्रायव्हर, वॉचमन उत्सुकतेने बघतात. पण वर जात नाहीत.
दुसऱ्या दिवशी त्याच घरातला पुरुष जॉगिंगला बाहेर पडतो. काही तासांनी डोळ्यांवर गॉगल लावून मॅडम येतात. गाडीत बसून सुळकन जातात.
..
हे एवढे प्रसंग भिन्न कालखंडातले. भिन्न संस्कृतीमधले, पण त्यात एकसमानता आहे. स्त्रीला जर मारहाण, शिवीगाळ होत असेल तर ते नवरा-बायकोचा किंवा घरगुती मामला समजून त्यात पडलं जात नाही. चाळीत वगैरे नवऱ्याला दूर केलं जातं. पण त्याचा परिणाम होत नाही. आणि श्रीमंतांकडे तर is their private life. how we can interfere?
नवरा-बायकोच्या भांडणात ब्रह्मदेवानेही पडू नये, अशी भिक्कार म्हण आपल्यात आहे. ती यावेळी अगदी हमखास वापरली जाते. किंवा दुसरी म्हणजे नवरा-बायकोची भांडणं बिछान्यात मिटतात. थोडक्यात काय नवऱ्याने मारणं आणि शिवीगाळ करणं हे आक्षेपार्ह समजलं जात नाही. अगदी एखादीने पोलिसात जायचं ठरवलं तरी पोलिसही पारंपरिक भूमिका घेऊन तिला समजावतात. मेख अशी आहे की अत्याचारग्रस्त
स्त्रियांकरता आपल्याकडे एक अत्यंत उत्कृष्ट सोय आहे. ४९८ कलम. पण त्यामध्ये अनेकदा नवऱ्याला किंवा मारहाण करणाऱ्या व्यक्तीला थेट पोलिस कोठडीतच नेलं जातं. कारण तो दिवाणी कायदा नाही. पुन्हा त्यामधे अनेक किचकट कायदेशीर बाबी असतात. कुटुंबात जर कुठल्याही वयाच्या स्त्रीला मारहाण शिवीगाळ, धमक्या अशा प्रकाराला सामोरं जावं लागत असेल तर हे कलम पुरेसं नव्हतं. दारुडय़ा वडलांनी मुलीला मारलं तर त्याची एनसी व्हायची. अनेकदा काटय़ाचा नाटा व्हायचा. त्याकारणास्तव २००५ साली कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे रक्षण करणारा कायदा अस्तित्त्वात आला.
४९८ कलमामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळते. पण त्यामधे अनेक अडचणी येतात. बरेचदा नवऱ्याला पोलिसात न देता त्याला धाक दाखवला तरी पुरे होणार असतं. आणि म्हणूनच २००५चा कौटुंबिक हिंसाचार कायदा अत्यंत उत्कृष्ट उपाययोजना आहे. यात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी म्हणजे हिंसा अशी व्याख्या यात आहे. हा दिवाणी कायदा असल्याने पोलिसांचा हस्तक्षेप नसतो. पुन्हा फक्त स्त्रीच नव्हे तर तिचे नातेवाईक, शेजारी, मित्र, हितचिंतक अर्ज करू शकतात. त्याकरता वकिलांची गरज नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने नेमलेल्या संरक्षण अधिकारी, नोंदणीकृत सेवाभावी 
संस्था, मॅजिस्ट्रेट किंवा पोलिस अधिकारी यापैकी कुणाकडेही ही स्त्री तक्रार नोंदवू शकते.
कुटुंबातली हिंसा हा एक अत्यंत नाजूक आणि वेगळा विषय आहे. तिथे ४९८ सारखं कडक कलम अनेकदा उपकारक ठरत नाही. मारहाण,
शिवीगाळ करणाऱ्या नवऱ्याला वा तत्सम व्यक्तिला समाजाचा आणि कायद्याचा धाक असावा, त्या स्त्रीचा संसार मोडू नये, तिला संरक्षण मिळावं अशा संवेदनाक्षम भूमिकेतून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. खरं तर अगदी भल्याभल्या सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनाही याची पूर्ण माहिती नाही. आणि त्यासाठीच हल्ली ‘बेल बजाव’ या नावाखाली जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत.
एका जाहिरातीत शेजारच्या खोलीतल्या धमक्या, आवाज ऐकून एक माणूस त्या घराचं दार वाजवतो, पुरुष दार उघडतो.. हा माणूस दूध मागतो.. थोडा वेळ दोघांची नजरानजर होते. पुरुष दूध घेऊन येतो.. तो माणूस गेलेला असतो.
दुसऱ्या जाहिरातीत खाली खेळणारी पोरं सरळ दार वाजवतात.. बॉल मागतात.. दरवाजा बंद होतो आणि मारहाण, शिवीगाळही..
कमी शब्दात अत्यंत उत्कृष्ट तऱ्हेने या जाहिराती केलेल्या आहेत. समाजाचा धाक काय करू शकतो किंवा आपणही झाला प्रकार थांबवू शकतो ही गोष्ट प्रभावीपणे यातून सिद्ध होते.
मुख्य म्हणजे Not in my backyard हा जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो या कायद्याने आणि अशा जाहिरातींमुळे हळुहळू पालटू लागलाय. फक्त बायकोच नव्हे तर आई घरातली कामवाली, मुलगी अशा कुठल्याही स्त्रिया या कायद्याखाली मदत मागू शकतात किंवा त्यांच्या वतीने दुसरं कुणीही तक्रार देऊ शकतं. ‘तुम्हाला मारतोय का नवरा? मग? गप घरी जा. कशाला लोकांच्या खाजगी मामल्यात पडता?’ असं उत्तर जे
या आधी पोलिस सर्वसाधारणपणे द्यायचे; ते आता मिळणार नाही. कारण यात कायदेशीर हस्तक्षेप वेगळ्या तऱ्हेने केला जातो.
या कायद्यात अनेक बाबी आहेत, ज्याचा जागेअभावी इथे उल्लेख होऊ शकत नाही. परदेशात डोमेस्टिक 
व्हायोलन्स या सदराखाली शेजारी वा कुणीही फोन करून पोलिसांना बोलावू शकत होतं. आता आपल्याकडेही तशी सोय आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीला किंवा ग्रस्त स्त्रीला संसार मोडायचा नसतो आणि सारख्या पोलिस स्थानकाच्या चकराही मारायच्या नसतात. तिला गरज असते ती एका भक्कम मध्यस्थाची. आणि नेमका इथेच हा कायदा अत्यंत उपयोगी पडतो.
मालकाने, नवऱ्याने, सासूने, मुलाने, जावेने कुणीही मानहानी होईल असं स्त्रीच्या बाबतीत वागणं हे बेकायदेशीर आणि शिक्षापात्र ठरू शकतं.. असं अगदी थोडक्यात या कायद्याचं वर्णन करता येईल. मुख्य म्हणजे इथे फक्त स्त्रियाच तक्रार करू शकतात किंवा कायद्याने सज्ञान नसलेले मुलगे. पण तक्रार ही एखाद्या स्त्रीच्या विरोधातही असू शकते.
शहाण्याने पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये, असं म्हणतात. आपल्याकडे वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेले खटले पाहिले की खात्रीही पटते. अशा अवस्थेत अगदी वाईट अवस्था होते ती बाईची. अक्षरश: काहीशे रुपयांसाठी ओढलेल्या चेहऱ्याने आशेने कुटुंब न्यायालयात बाया येतात. आल्यावर कळतं नवरा उपस्थित नाही. पुढची तारीख पडते. न्यायाधीशांना आणि वकिलांनासुद्धा सर्व कळून काही करता येत नाही. कारण
कायदा..
या कायद्याचं सब घोडे बारा टक्के हे रूप बदलून त्याला संवेदनक्षम आणि मानवतावादी करण्याचं एक काम या कायद्याने झालंय. पण आपल्याकडे अनेकांना त्याची खबरबातही नाही. अशासाठी मग बेल बजावसारख्या जाहिराती आहेत. घरातली बाब चव्हाटय़ावर जाऊ न देता पुरेशा गांभीर्याने आणि अपेक्षित अशा संवेदनक्षम पद्धतीने या कायद्यामुळे अनेकजणींचे हुंदके संपलेत, जुन्या जखमांचे व्रण आहेत पण ताज्या जखमा नाहीत.
बाईचा जन्म असलाच, हे वाक्य हल्ली मात्र खूप कमी ऐकायला येतं. आमच्या स्त्री-मुक्ती संघटनेचं काम कचरावेचक महिलांमध्येही चालतं. त्यात अक्षरश: रस्त्यावर राहणाऱ्या बायका (विशेषत: तरुण) आपल्या 
मुलीच्या शिक्षणाबाबत व्यवस्थित जागरुक असतात. एखादीच्या सासूच्या तोंडून निघतं हे वाक्य, पण थोडय़ाशा परीक्षणाने या आमच्या बायांत जो प्रचंड आत्मविश्वास येतो तो कुठल्याही मध्यम काय पण उच्चमध्यमवर्गीय स्त्रीलाही विचार करायला लावण्याजोगा आहे. कौटुंबिक अत्याचार यावर त्यांना क्वचित व्यवस्थित माहिती असते.
आणि थोडीफार ही भूमिका मला आजच्या तरुण मुलींच्यातही दिसते. मी महाविद्यालयात असताना आम्हा मैत्रिणींना खरंच वाटायचं की पुरुष असणं किती छान. पण या पिढीत मात्र वेगळा विचार आहे. उगाचच बाह्यात्कारी पुरुषी न वागता या मुली आपल्या स्त्रीत्वाबद्दल अभिमानी आहेत. बाइकवरून धडधडत जाणारी
एखादी छोरी अगदी कूऽऽलली सिग्नलपाशी केस ठिक करते. आरशात बघते. आजूबाजूच्या गाडय़ातल्या आ वासून बघणाऱ्या बाप्यांकडे घंटा लक्ष न देता त्यांना कट मारून अगदी मस्त निघते. मला उगाचच भरून येतं.. आणि वाटतं की ही नक्कीच उगारलेला हात कचकन दाबेल.. कुणाचीही वाट न बघता..
घरगुती भांडण हे काही नवीन नाही, पण त्यातून जर कुठलाही शाब्दिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हिंसाचार सातत्याने होत असेल तर ते नक्कीच चिंतादायक आहे.. आणि अशा प्रत्येक ठिकाणी एकच नियम लावणंही चुकीचं आहे. कारण शेवटी कायदे माणूसच करतो.. मग त्यात मानवी भावना असल्या तर गैर काय?
(श्रेय : या लेखाकरता स्त्री-मुक्ती संघटना आणि अ‍ॅड. जाई वैद्य यांचे मौलिक सहकार्य मिळाले.)
घरगुती हिंसाचाराची टक्केवारी
पॉप्युलेशन सायन्सेस गोवंडी, आणि पॉप्युलेशन कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) या संस्थांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ८,०५२ विवाहित पुरुष आणि ९३,९१२ विवाहित स्त्रिया (१८ ते २९ वयोगट) यांच्या अभ्यासातून निष्कर्षांला आलंय की आपल्या प्रागतिक सुधारक महाराष्ट्रात २३ टक्के स्त्रियांना नवऱ्याद्वारा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये १४ टक्के अत्याचार लग्नाच्या पहिल्या वर्षांत होतात. थोडक्यात २७ टक्के बायका घरगुती हिंसाचार सहन करतात. आणि आपल्यासोबत या बाबतीत आहे लालूंचा बिहार. आयआयपीएसच्या उषा राम यांच्या मते हा हिंसाचार फक्त गरीब आणि अशिक्षित घरात होतो असं नव्हे तर शहरी, नोकरदार उच्चमध्यमवर्गातही होतो. आणि तो बरेचदा बाहेर येत नाही.


 -------- लोकप्रभा 



Friday 23 March 2012

पुलंनी घेतलेली भीमसेनजींची मुलाखत - दुग्ध शर्करा योग





 




पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉर्डिंग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉर्डिंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.

भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.


आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत
जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं.
आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?


भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली
रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न 
लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.


पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, 
तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही त-हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)