Thursday 31 May 2012

टोमॅटोच्या रश्यातील मटण


साहित्यः

१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल

पाककृती:
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.
तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.
बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.
टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.
नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.
ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.
परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.
रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.
कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.
वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
ही अशी तयार मटणाची वाटी.




-----------

Wednesday 23 May 2012

एका रात्रीची गोष्ट...




तो नेहेमीप्रमाणे कामावरून घरी येत होता. आजही पाय लडखडत होते. चाळीच्या कॉर्नर पर्यंत मित्र सोडायला आला होता. आज पण नाही नाही म्हणता जास्त घेतली होती. आता तोंडाचा वास आला कि बायकोची कटकट चालू होईन. पोरांची रडारड चालू होईल. वैताग आलाय ह्या गरिबीचा, ह्या कामाचा, ह्या दररोजच्या कटकटीचा. तेच सारे विसरायला हे पिणे चालू झाले आणि आता सुटता सुटत नाही आहे. बायको पण समजून घेत नाही आहे. तिला वाटतेय कि मजा मारायला पितोय. मी कामावरच्या बायकांबरोबर बोललो तरी तिला संशय येतोय. माझ्यावर विश्वासच नाही. साला मला कोण समजूनच घेत नाही आहे. वैताग आलाय ह्या जगण्याचा.

धडपडत, कशाबशा पायऱ्या चढत तो चाळीतील आपल्या घरापर्यंत आला. दरवाजा ठोठावला. आतून 'बाबा आले' 'बाबा आले' असा पोरांचा आवाज आला. बायकोने दरवाजा उघडला. दारूचा भपकारा तिच्या नाकाला झोंबला तसा तिचा पारा चढला. धावत आलेल्या छोट्या पोराला तिने तसाच डोळे वर करून मागच्या मागे पिटाळला. कंबरेवर हात ठेवून तिने रागाने नवऱ्याला विचारले, "आलात आज पण पिऊन? जीवाला थोडीशी लाज नाही वाटत? इथे पोरांना शाळेत फी भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही खुशाल आपले ढोसून येताहेत. बायकोचे काही ऐकायचे नाही असेच ठरवले आहे वाटते?"

मोठी मुलगी पुढे आली आणि आईला म्हणाली, "अगं आई त्यांना आत तर येउदे."

"तू गप् ग !आली मोठी मला शिकवायला"...आई कडाडली.

तशी पोरगी गप् जाऊन पुस्तकात डोके घालून बसली.

तो आत आला तसा उंबरठ्याला अडखळून धडपडला. एवढी घेतली होती कि बायकोने कपाळाला हात मारून दोन शिव्या घातल्या.  त्याला जाम किळस आली "काय साली बायको  भेटलीय मला" पार्श्वभाग वर करून पालथ्यानेच तो भडा भडा  ओकू लागला आणि शेवटी  तेथेच तोंड घालून पडून राहीला. बायकोने आणि मुलीने तसाच खांद्याला धरून वर उठवला आणि आतल्या खोलीत  नेऊन झोपवला.

सकाळी डोळ्यावर सूर्याची किरणे आली तशी त्याला जाग आली. घड्याळात बघितले साडे आठ वाजून गेले होते. आज पण बायकोने उठवले  नाही. आज पण कामाला लेट होणार. परत सायेबाच्या शिव्या खाव्या लागणार. उठून बेड वर बसला. डोके अजून जड होते.सर्व गरगरत होते. आता बायकोची कटकट चालू झाली कि अजून डोके उठणार आहे. पण आज बायकोचा आवाज येत नव्हता  तो तसाच डोके पकडून उठला. तेवढ्यात बायको समोर आली. चक्क हातात लिंबू पाणी घेऊन आणि म्हणाली, "हे घ्या ! जरा डोके हलके वाटेल".

च्यामायला मी स्वप्नात तर नाही ना ? बायकोचा आवाज एवढा मृदू कसा झाला? लग्नानंतर पहिले काही दिवसच हा आवाज ऐकायला मिळाला होता. स्वत:लाच चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली. पण जे डोळ्यासमोर होते ते खरे होते. हातात खरच लीम्बुपानी चा ग्लास होता. एका घोटात त्याने पिऊन टाकला आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.

डोके पुसत बाहेर आला तर बेड वर त्याचे ऑफिस ला जायचे कपडे काढून ठेवले होते. शूज पोलिश करून ठेवले होते. तेव्हढ्यात बायको आली तिने हातातला टॉवेल खेचून घेतला आणि म्हणाली तुम्ही बसा खुर्ची वर मी पुसते तुमचे केस. तो आश्चर्यचकित !!!! बसला खुर्चीवर.

डोके पुसता पुसता लाजून बायको म्हणाली,"लवकर तयारी करून या. आज नाश्त्याला तुमच्यासाठी कांदा पोहे केले आहेत. ते खावून घ्या आणि डब्याला पण तुमच्या आवडीचीच भाजी केली आहे आणि संध्याकाळी पण लवकर घरी या" टॉवेल त्याच्या हातात देऊन ती स्वयंपाक घरात निघून गेली.

आत तर तो पूर्ण चक्रावून गेला. रात्री असे काय झाले तो ते आठवायचा प्रयत्न करू लागला. पण रात्री एवढी चढली होती कि काही आठवायलाच तयार नव्हते. एवढेच आठवले कि आपल्याला बायकोने आणि पोरीने उचलून आतल्या खोलीत उचलून आणले. तो पोरीकडे गेला आणि विचारले, "काय ग !! तुझ्या आई ला मध्येच काय झाले? एका रात्रीत अशी अचानक कशी बदलली?"

पोरगी म्हणाली, "बाबा ! काल आम्ही तुम्हाला बेड वर नेऊन टाकले. मी तुमचे शूज काढत होती आणि आई तुमचे ऑफिसचे कपडे काढत होती, तेव्हढ्यात तुम्ही ओरडला कि नको नको बाई ! माझे कपडे काढू नका. माझे लग्न झालेले आहे. माझी घरी एक बायको आहे. दोन सोन्यासारखी मुले आहेत. प्लीज माझे कपडे काढू नका. प्लीज....सोडा मला .."

तो काय समजायचे ते समजून गेला.



----------- भोवरा 

Friday 18 May 2012

आठवणीतली गाणी - एकदंताय वक्रतुन्डाय







गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि
गुणशरीराय गुणमंडीताय गुणेशानाय धीमहि
गुणातिताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि

एकदंताय वक्रतुन्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेषानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि

गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने
गानोत्सुखाय गानमत्ताय गानोत्सुखमनसे

गुरुपुजीताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायीने
गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे

गुरुदैत्य कलक्षेत्रे गुरुधर्म सदाराख्याय
गुरुपुत्र परीत्रात्रे गुरु पाखंड खंडकाय

गीतसाराय गीततत्वाय गीतगोत्राय धीमहि
गुढगुल्फाय गंधमत्ताय गोजयप्रदाय धीमहि
गुणातिताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि

एकदंताय वक्रतुन्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेषानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि

गर्वराजाय गंधाय गर्वगान श्रवण प्रणयीमे
गाढानुरागाय ग्रंथाय गीताय ग्रंथार्थ तत्परीमे

गुणये… गुणवते…गणपतये…

ग्रंथ गीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने
गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्य पटवे

तेज चरिताय गाय गवराय गंधर्वप्रीक्रुपे
गायकाधीन वीघ्रहाय गंगाजल प्रणयवते

गौरी स्तनम धनाय गौरी ह्रुदय नंदनाय
गौरभानु सुताय गौरी गणेश्वराय

गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौर भावाय धीमहि
गो सहस्त्राय गोवर्धनाय गोप गोपाय धीमहि
गुणातिताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि

एकदंताय वक्रतुन्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेषानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि


------------------- विश्व विनायक


आठवणीतली गाणी - मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून










मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

ओढ लावती अशी जीवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती

गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

उद  उद उद उद

दे ग आंबे उदे -६
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे

फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी भवानी बसली ओठिकळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो
गावली गावली गावली, मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

बोला अंबाबाईचा उदो, रेणुका देवीचा उदो 
एकविरा आईचा उदो, या आदिमायेचा उदो
 जगदंबेचा उदो, महालक्ष्मीचा उदो
 सप्तश्रुंगीचा उदो, काळूबाईचा उदो
तुळजा भवानी आईचा उदो
 बोला अंबाबाईचा उदो, रेणुका देवीचा उदो
बोला जगदंबेचा उदो




  ----------------- अगं  बाई अरेच्चा



आठवणीतली गाणी - कुंजवनाची सुंदर राणी






कुंजवनाची सुंदर राणी 
रूप तुझे ग अंतर्यामी |
चांदणं राती अशा एकांती 
मनसागर उसळं मीलनाची उर्मी | |

लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रीयतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?

कुंजवनाची सुंदर राणी 
रूप तुझे ग अंतर्यामी |
चांदणं राती अशा एकांती 
मनसागर उसळं मीलनाची उर्मी | |


मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग

माझं काळीज तू; माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
या संसाराला देवाजीची छाया ग

मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग

मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन् जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

मक्याच्या शेतात एकलीच होते ठावुक नव्हतं कुणा
अरे उभ्या पीकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा

मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग





 ----------------- अगं  बाई अरेच्चा 



Wednesday 16 May 2012

शिवसेना नावाचा ढाण्या वाघ



ताजा संदर्भ आहे, मुंबई महापालिका निवडणुकीचा. अनेक दिग्गज राजकारण्यांच्या अटकळी आणि भाकिते खोटी ठरवीत शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकाविला.  कॉंग्रेसने तर शिवसेना संपली, आम्ही संपविली असे आपल्या जाहीर नाम्यात खुल्लम खुलला सांगून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली होती.
पण हीच शिवसेना किती भक्कम पायावर उभी आहे आणि तिची पाळेमुळे ह्या मराठी जनमानसात किती खोलवर गेलेली आहेत ह्याचा हा आढावा

१९६८ सालच्या निवडणुकीनं पुढचा सारा राजकीय पटच बदलून टाकला. या निवडणुकीविषयी, त्यावेळच्या वातावरणाविषयी 'नवशक्ति'त सुरू केलेला हा कॉलम.

कासराभर उडी मारल्यानंतर सिंह मागे वळून पाहतो. आपण किती लांब उडी मारली ते. मग अदमास घेत पुढची उडी घेतो. आपण त्याला 'सिंहावलोकन' म्हणतो. माणसानंही असंच करावं. इतिहासाचा मागोवा घ्यावा. म्हणजे आजूबाजूच्या घडामोडी उलगडतात. भविष्यात काय होईल याचा अंदाज येतो, असं जुने-जाणते सांगतात. 




भाग १ : इलेक्शन दे धक्का !
केवळ एका महापालिकेच्या निवडणुकीमुळं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं राजकारण बदलून गेलं...हे कोणालाही खरं वाटेल काय? पण होय, हे खरं आहे. भारतीय राजकारणात अशी उलथापालथ झाली ती मुंबई महापालिकेच्या १९६८ सालच्या निवडणुकीत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मुंबईतल्या दादा राष्ट्रीय पक्षाचं यात पानिपत झालं. त्यांच्यावर दे धक्का विजय मिळवला तो नव्यानंच उदयाला आलेल्या प्रादेशिक पक्षानं. त्याचं नाव, शिवसेना!

मुंबईतल्या या निवडणुकीपासून कम्युनिस्ट पक्षाला मुंबईत तर ओहोटी लागलीच. पण या पराभवाचा परिणाम देशभर झाला. देशातल्या पुढच्या दोन निवडणुका इंदिरा गांधींच्या वर्चस्वाखाली झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची लोकसभा, विधानसभेतली सदस्यसंख्या कमी झाली. 
डाव्यांच्या पाठीशी असलेला वर्ग काँग्रेसकडे वळला. यात प्रामुख्यानं होते, कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्ग. इंदिराबाईंच्या घोषणा त्यांचं आकर्षण ठरलं. या घोषणा होत्या, बँक राष्ट्रीयीकरण, राजेरजवाड्यांचे तनखे रद्द, बंद पडलेल्या किंवा आजारी गिरण्याचं राष्ट्रीयीकरण आणि गरीबी हटाव इत्यादी. 
७२ला इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं या आणिबाणीचं समर्थन केलं. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षानं सपाटून मार खाल्ला. आणिबाणीनंतर कम्युनिस्टांकडून काँग्रेसकडं गेलेला वर्ग जनता पक्षाकडं गेला.

आणिबाणीवरून कम्युनिस्ट पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यात पक्ष पुन्हा एकदा दुभंगला. कॉम्रेड डांगेंसारख्या उत्तुंग नेत्याला पक्षाबाहेर काढण्यात आलं. आणि मग काँग्रेसविरोध हाच कम्युनिस्ट पक्षाचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. त्याचा एकूण परिणाम म्हणजे पक्ष छोटा छोटा होत गेला. आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दावणीला बांधला गेला.
याच काळात प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रादेशिक अस्मितेला चालना मिळाली ती शिवसेनेमुळे. शिवसेना म्हणजे या पक्षांपुढं एक आदर्श’ ठरला. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन एखादा पक्ष एवढी परिणामकारक मुसंडी मारू शकतो, याचा साक्षात्कार शिवसेनेच्या १९६८मधील विजयातून देशातल्या इतर राज्यांना झाला. 
त्यातूनच मग तामीळनाडूत अण्णा डीएमके, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव, उत्तरप्रदेशात मुलायम सिंग, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, ओरिसात बिजू पटनायकांचा जनता दल, पंजाबमध्ये अकाली दल, ओमप्रकाश चौटालांचा हरियाणा जनतादल हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष उदयाला आले. या सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाले.

१९६६ सालच्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ सालीच काँग्रेसला देशभर प्रादेशिक अस्मितेचा पहिला धक्का बसला. ९ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली. कम्युनिस्टांसारख्या राष्ट्रीय पक्षाला आपण त्यांच्या बालेकिल्ल्यातच, मुंबईत हरवू शकतो हा या निवडणुकीतून शिवसेनेला आला.

१९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकांवर आणि मुंबईतल्या गिरणगावावर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का बसला. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळला. काँग्रेसमध्ये शिवसेनेचा वटवाढला. १९६८चं हे महाभारत नेमकं जिथं घडलं त्या रणभूमीची, गिरणगावाची आणि त्याच्या इतिहास-भूगोलाची चर्चा करूयात उद्याच्या भागात.

भाग २ : रणभूमी गिरणगाव
महानगरी मुंबई पोर्तुगिजांच्या ताब्यात होती.. त्यांनी ती आपल्या ब्रिटीश जावयाला आंदण दिली..हीच मुंबापुरी इंग्लडच्या राजानं दहा पौंड भाड्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दिली...हा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. पण पुढं ही उद्योगनगरी घडवली कोणी याबाबत कवी नारायण सुर्वे गर्जून सांगतात,
‘‘तोच मीतेच आम्ही ह्या तुझ्या वास्तूशिल्पाचे शिल्पकार,
तुझ्या सौंदर्यात हे नगरीदिसोंदीस घालीत असतो भर...’’

तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,
‘‘बा कामगारा तुजठायी अपार शक्ती।
ही नांदे मुंबई तव तळहातावरती।।...’’
अण्णाभाऊंच्या पोवाड्यातला हा कामगार म्हणजे गिरणगावातला गिरणीकामगार. तो आला महाराष्ट्रभरातून. सुरुवातीला आली कोकणी माणसं. कारण भाऊच्या धक्क्यावरून समुद्रमार्गे कोकणात ये-जा करण्याची त्यांची सोय होती. नंतर मुंबई-पुण्याहून मिरज-कोल्हापूरला जाणारा रेल्वेमार्ग सुरु झाला, तशी घाटावरची माणसं गिरणगावात येऊ लागली.

मुंबईच्या मध्यभागी असलेलं गिरणगाव म्हणजेधुराड्यांनी व्यापलेलं आकाशदाटीवाटीनं उभ्या असलेल्या लाल कौलारू चाळीत्याशेजारी अहोरात्र सुरू असणा-या गिरणी. गिरणगाव म्हणजे जवळपास ६०० एकरावरच्या ५८ गिरण्या आणि पंधराशे एकरांवरचा कामगारांचा परिसर. ढोबळ नकाशा सांगायचा म्हटला तर मुंबईतल्या भायखळ्यापासून दादरपर्यंत आणि महालक्ष्मीपासून एल्फिन्स्टन रोडपर्यंत पसरलेला भाग म्हणजे गिरणगाव.

गिरणगावातले बसचे प्रमुख स्टॉप म्हणजेमहालक्ष्मीतील संत गाडगेबाबा चौकगुलाबराव गणाचार्य चौकखालचे परळप्रभादेवीप्रबोधनकार ठाकरे चौक, नायगावशिवडीघोडपदेव, माझगावभायखळा.

रेल्वे स्टेशन्स सांगायची तर भायखळाचिंचपोकळीकरीरोडपरळ आणि दादर. लट दिशेने पच्छिम  रेल्वेमार्गाने दादरएल्फिस्टन रोडलोअर परळ आणि महालक्ष्मी. हार्बर मार्गावरचं कॉटनग्रीनरे रोड,शिवडी. तर लखमसी नप्पू मार्गपश्चिमेला सेनापती बापट मार्ग आणि ना. म. जोशी मार्ग, डॉ.आंबेडकर मार्ग आणि पूर्वेकडचा रफी अहमद किडवाई मार्ग हे प्रमुख रस्ते.


याबरोबरच नरे पार्कातलं गणेश गल्ली मैदानकामगार मैदानत्याच्या पलिकडं गिरणगावात न मोडणारी गिरगावची चौपाटीदादरचं शिवाजी पार्क मैदानप्रभादेवीचं नर्दुल्ला टँक मैदान ही गिरणगावाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणं. याशिवाय कम्युनिस्टांची ऑफिसं असणारी परळमधली दळवी बिल्डिंग, खेतवाडीतलं राजभवनलालबागेतलं तेजुकाया मॅन्शनतसंच करीरोड पुलाजवळची हाजीकासम,प्रभादेवीची ‘वाकडी’, आग्रीपाड्याच्या बीआयटी चाळीकामाठीपु-यातल्या बटाट्याची चाळी यांच्याशिवाय गिरणगावाचा उल्लेख पूर्ण होणार नाही.

शहरातल्या याच भूभागानं, गिरणगावानं मुंबईचं आणि संपूर्ण देशाचं औद्योगिक जीवन घडविलं. आणि ते घडवण्यासाठी राबणारे हात होते, मराठी माणसाचे. जवळपास ८० टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाख मराठी माणसं गिरणगावात राहत होती. त्यामुळं साहजिकच या एकगठ्ठा समाजावर राजकीय पक्ष डोळा ठेवून होते. 

पण हा मराठी गिरणी कामगार होता, कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य, कार्यकर्ता. कारण हाच पक्ष कामाच्या ठिकाणी अर्थात गिरणीत त्यांचा पाठीराखा होता. अर्थात या कामगारांचा लढाऊ बाणा कम्युनिस्टांच्या नेहमीच उपयोगी आला. पण १९६६मध्ये मराठीचा जयजयकार करत शिवसेनेचा उदय झाला आणि हा कामगार वर्ग शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली जमू लागला. 
साहजिकच अस्तित्वाच्या लढाईसाठी तलवारी उपसल्या गेल्या. अर्थात या लढाईतला सैनिक होता, सर्वसामान्य मराठी गिरणी कामगार. त्याच्या लढाऊ बाण्याविषयी बोलूयात पुढच्या भागात.

भाग ३ :  तळपती तलवार


कामगार आहे मीतळपती तलवार आहे..’, नारायण सुर्वेंनी केलेलं हे गिरणगावातल्या कामगाराचं वर्णन. इतिहास घडवणा-या कामगारांच्या वर्णनासाठी यापेक्षा समर्पक शब्द असूच शकत नाहीत.
आयुष्याशी झगडताना या कामगारांच्या जगण्याला लखलखीत धार आली होती. कामगार म्हटलं की संघर्ष आलाच. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगारांनी संप करायचा आणि मालकांनी तो मोडण्याचा प्रयत्न करायचा. हे अगदी १८४४मध्ये मुंबईत पहिली गिरणी सुरू झाल्यापासून चालू आहे.

सत्यशोधक नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणगावात पहिली कामगार संघटना उभी केली. ते महात्मा जोतिराव फुल्यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांनीच इथल्या कामगारांना लढायला शिकवलं. प्रसंगी लोकमान्य टिळकांशीही पंगा घ्यायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही.

अर्थात १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा होताच गिरणगावातल्या कामगारांनी अभूतपूर्व सार्वत्रिक बंद पाळला. तोही रोजंदारी बुडवून. अगदी कम्युनिस्ट नेता लेनिननंही याची दखल घेतली. अर्थात संपांची सुरुवात १८९०पासूनच झाली होती. १९२०मध्ये या संपांनी कळस गाठला आणि त्याचवेळी कामगार संघटना पूर्णपणे कम्युनिस्टांच्या ताब्यात गेल्या. 
केवळ स्वत:च्या मागण्यांसाठीच नव्हे, तर समाजाचंही आपण देणं लागतो या भूमिकेतून कामगार अनेक सामाजिक लढ्यांमध्येस्वातंत्र्यलढ्यांमध्ये सहभागी झाले. आघाडीवर राहून लढले.
  
१९४२चं चलेजाव असो, १९४६चं नावीक बंड असोसंयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की गोवा मुक्ती आंदोलन. गिरणगावानं तो अटीतटीनं लढवला. ४२च्या आंदोलनाचा भडका देशभर उडालेला असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मात्र लोकविरोधी भूमिका घेतली. अशावेळी गिरणीकामगारांनी आपला विवेक शाबूत ठेवून या लढ्यात उडी घेतली.

स्वातंत्र्यसंग्रामातही गिरणगावानं झोकून दिलं होतं. १९३०मध्ये पुणे जिल्ह्यातल्या महाळुंगे पडवळ गावच्या तरुण गिरणी कामगारानं परदेशी माल घेऊन जाणा-या ट्रकखाली स्वत:ला झोकून दिलं.

नाविक बंडात परळच्या एलफिन्स्टन पुलावर इंग्रज सैनिकांच्या गोळीबारात अनेक कामगार कार्यकर्ते ठार झाले. या लढ्यामुळं कम्युनिस्ट पक्षाला पुन्हा एकदा बळ मिळालं.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेलाही याच गिरणगावानं मदत केली. भाजीच्या पिशवीत बॉम्ब नेण्यापासून ते रेल्वेरुळांमध्ये स्फोटकं ठेवण्याचं काम इथल्या धाडसी तरुणांनी केलं.
  
संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर ख-या अर्थानं गिरणगावानंच लढवला, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या १०५ हुतात्म्यांपैकी तब्बल २२जण गिरणगावातले कामगार होते. शाहीर अमरशेख किंवा अण्णाभाऊ साठेंचा एखादा पोवाडा ऐकला, वाचला तरी गिरणी कामगारांच्या लढ्याची प्रखरता आपल्याला दिपवून टाकते. जागा मराठा आम, जमाना बदलेगा या अमरशेखांच्या ललकारीनं महाराष्ट्राला विरोध करणा-या दिल्लीतल्या काँग्रेस सरकारला घाम फुटला होता. तर गावोगाव फिरत, लोकनाट्यातून, पोवाड्यातून
‘‘एकजुटीच्या या रथावरती । आरुढ होवून चल बा पुढती ।
नवमहाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रकट निज धाव ।’’… अशा ललकारीनं अण्णाभाऊ महाराष्ट्राचं मन चेतवत होते. 

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. उरलेला सीमाभाग महाराष्ट्रात यावा म्हणून मग संपूर्ण महाराष्ट्र समिती अस्तित्वात आली, पण नंतर तीही नामशेष झाली. मराठी अस्मितेची धग मात्र कायम राहिली. गिरणगावातल्या कामगारांच्या रुपानं तळपत असलेली मराठी स्वाभीमानाची ही तलवार हस्तगत करण्यासाठी मग शिवसेनेनं कंबर कसली. आणि टार्गेट ठरलं, गिरणगावातले कम्युनिस्ट !
भाग ४ : मराठीचा झेंडा
 

 साठच्या दशकात महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राचा वणवा उसळला. म्हणजे प्रकार असा झाला की,भाषिक राज्य संकल्पनेनुसार बहुतेक राज्यं स्वतंत्र झाली. पण महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा द्यायला काही केंद्रसरकार तयार होईना. 
त्यामागचं कारण म्हणजे मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी अर्थात उद्योग नगरी. ती ताब्यात राहावी. शिवाय मराठी माणसाविषयी केंद्राला आकस असल्याचा आरोप अर्थमंत्री चिंतामण देशमुखांनी तर अगदी जाहीरपणे केला होता.
केंद्राच्या या धोरणाविरोधात मराठी माणूस जागा झाला. झाडून सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी  संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. लढाईचं मैदान होतं मुंबई. आणि सैनिक होता, गिरणगावातला मराठी गिरणीकामगार. या वीरांनी आणि सा-या महाराष्ट्रानं रणात बाजी लावली. अखेर दिल्लीला झुकावं लागलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.

त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या निमित्तानं जागृत झालेली मराठी शक्ती कायम जागती राहावी असं अनेकांना वाटत होतं. त्यात आघाडीवर होते आचार्य अत्रे. या लढ्यानंतरही लोंबकळत पडलेला मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न सुटावा, मराठी माणसांची एकी राहावी यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

त्यानंतर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ ऑगस्ट १९६५मध्ये लालबाग-परळ भागात ‘महाराष्ट्र हितवर्धिनी’ नावाची संस्था स्थापन केली. नोक-या तसंच सरकारी वसाहतींमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढू नये,अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. 

शिवसेना नेते दत्ताजी नलावडेही त्यावेळी आदिकांसोबत होते. बाळासाहेबांचे तर ते मित्रच होते. त्यांच्या कामाचं कौतुक बाळासाहेब अगदी जाहीरपणे करीत असत.
दुसरीकडं पत्रकार म्हणून 'लोकसत्ता'चे ह. रा. महाजनीही मराठीपणाचा जोरदार पुरस्कार करत होते. 

मात्र या सगळ्यांमध्ये उजवे ठरले ते ठाकरे पितापुत्र. त्यांनी मराठी माणसांची लढाऊ संघटना उभारण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. प्रबोधनकारांनी तर ४०च्या दशकातच शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. प्रबोधनकारांचे सुपुत्र बाळ ठाकरे मावळा नावानं व्यंगचित्रं काढून महाराष्ट्रविरोधकांना फटकारे मारत होते. 

नाही म्हणता शिवसेना या मराठी माणसांच्या संघटनेची कल्पना अत्र्यांनीही मांडली होती. पण त्याला मूर्त दिलं ठाकरेंनी. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मार्मिक साप्ताहिक काढलं. महत्त्वाच्या ठिकाणी मराठी माणसांना डावलून दाक्षिणात्य कसे जागा बळकावून बसले आहेत, हे मार्मिकमध्ये पुराव्यानिशी छापून येऊ लागलं.
मार्मिकच्या ऑफिसमध्ये बेरोजगार तरुणांची गर्दी वाढू लागली. या गर्दीला एक दिशा दे असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचवलं. आणि स्थापन झाली शिवसेना! तारीख होती, १९ जून १९६६.

मराठीचा झेंडा फडकावण्यात शिवसेना यशस्वी झाली. आता शिवसेनेचं ध्येय बनलं, फक्त मराठी आणि मराठी!
मराठी मनांवर अधिराज्य गाजवेल ती फक्त शिवसेना. त्यात इतर कोणाचीही लुडबूड नको, असा निश्चय झाला. मग जानी दोस्त जॉर्ज फर्नांडिस असोत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन लढणारे आचार्य अत्रे असोत वा कॉम्रेड डांगे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला गेला. त्याविषयी उद्याच्या भागात.
भाग ५ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- १)
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानं मराठी माणसांना डोंगराएवढे नेते दिले. या लढ्यात आणि त्यानंतरही मराठी माणसांना आधार देणारे हे नेते म्हणजे, समाजवादी पक्षाचे  एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, झुंजार पत्रकार आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, आणि नंतरच्या काळात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. 
मराठी माणसांची नस गवसलेले हे नेते नंतरही आपापला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील होतेच. यात सरशी झाली ती प्रबोधनकार ठाकरेंची. त्यांचे पुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे कुंचल्याची तलवार घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. 

मराठी माणसाला मुंबई मिळाली. पण या उद्योगनगरीत मराठी माणूस मात्र उपराच राहिला. त्याला न्याय मिळावा, स्वत:चा आवाज मिळावा म्हणून ठाकरे बंधूंनी साप्ताहिक मार्मिक सुरू केलं. त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं ठाकरे उपरोक्त नेत्यांचे थेट स्पर्धकच बनले. १९६६ ला शिवसेना स्थापन झाल्यानंतर तर या स्पर्धेला चांगलीच धार चढली. 

मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर राज्य करायचं असेल तर या नेत्यांना वाटेतून दूर करायला लागणार, हे ठाकरेंच्या लक्षात आलं. पहिला नंबर होता, आचार्य अत्रेंचा. खरं तर अत्रे हे प्रबोधनकार ठाकरेंचे जीवलग मित्र. पुण्यात सत्यशोधक चळवळीत एकत्र आलेले हे समाजधुरीण नंतरही साहित्य, सिनेमा आदी क्षेत्रांमध्येही एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत होते. 
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तर त्यांनी भीमपराक्रम केला होता. पण नंतर अत्रे आणि ठाकरे यांच्यात वाद उभा राहिला. यामागचं कारण सांगितलं जातं ते अत्र्यांची डाव्यांशी असलेली मैत्री. मग या मुलुखमैदान तोफा समोरासमोर येऊन एकमेकांवर आग ओकू लागल्या. मार्मिक आणि मराठामधून परस्परांवर शेलकी विशेषणं उधळली जाऊ लागली. सुव्वराचार्य, प्रल्हादखान, वरळीचा डुक्कर अशा विशेषणांनी अत्र्यांचा मार्मिकमधून उद्धार केला जाऊ लागला. डांगेंसोबत राहतात म्हणून त्यांनालालभाई असंही हिणवण्यात येऊ लागलं.

अत्र्यांनी तर ठाकरेंविरुद्धच्या  सांज मराठातील लेखांची एक पुस्तिकाच तयार केली. तिचं नाव होतं,कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी. आणि तिची किंमत ठेवण्यात आली होती, एक कवडी!
नंतर मात्र अत्रेंच्या विरोधात शिवसेनेनं कंबर कसली. १९६७मध्ये शिवसैनिकांनी अत्र्यांचीठाण्यातली सभा उधळली. अत्र्यांवर जोडे फेकले. गदारोळात अत्र्यांना मारही बसला. त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. त्या काळात अत्र्यांचा महाराष्ट्रात प्रचंड दबदबा होता. पण या दिवशी शिवसैनिकांनी अत्रेंच्या व्यक्तिमत्वातली हवाच काढून घेतली. या लोकसभा निवडणुकीत अत्र्यांचा पराभव झाला. अर्थात या पराभवात शिवसैनिकांचा मोठा वाटा होता.

असं सांगितलं जातं की, सुरुवातीला अत्र्यांनाच मार्मिकचं संपादक करण्याचा ठाकरेंचा विचार होता. तसंच शिवसेनचं मुख्य पदही त्यांना देण्याचा विचार होता. मात्र अत्रे काही शिवसेनेच्या व्यासपीठावर आले नाहीत. पण शिवसेनाप्रमुखांवर अत्र्यांच्याच लेखणी आणि वाणीचा प्रभाव असल्याचं मराठी माणसाला सतत जाणवत राहिलं.
अत्र्यांची जादू तर शिवसेनेनं निष्प्रभ केली. आता उरले होते, मुंबईतील कामगारांवर पर्यायानं मराठी माणसांवर अधिराज्य गाजवणारे नेते, कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.
 भाग ६ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- २)


कॉमर्ड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आणि जॉर्ज फर्नांडिस या तिघांनाही शिंगावर घेण्याचं ठाकरेंनी कसं ठरवलं होतं, याचं एक उदाहरण  मार्मिकच्या २९ ऑगस्ट १९६५च्या कव्हरवर एक कार्टून प्रसिद्ध झालं. त्यात या तिघांनी असहाय भारतमातेचा लीलाव आरंभलाय, असं दाखवण्यात आलं होतं. 

मार्मिकचा हा अंक पाहून अत्रे, डांगे, फर्नांडिस प्रचंड संतापले. त्याच दिवशीच्या रात्री शिवाजी पार्क परिसरातील ठाकरे यांच्या निवासस्थानावर संतप्त जमाव चाल करून गेला. ठाकरे बंधू घरी नव्हते. प्रबोधनकार आणि त्यांचे आणखी एक चिरंजीव रमेश घरात होते.
घराबाहेर शंभरेक माणसांचा जमाव ‘बाळ ठाकरे काँग्रेसचा हस्तक’, ‘बाळ ठाकरे, बाळासाहेब देसाईंचा बुटपुशा’ अशा घोषणा देत होता. त्यांनी पिशव्या भरून दगड आणि जोडेही सोबत आणले होते. ठाकरेंच्या घरावर लटकवलेली ‘मार्मिकची पाटी उचकटून काढण्यात आली. अत्रे-डांगे-फर्नांडिस झिंदाबाद, असे नारे देत मोर्चेक-यांनी ‘मार्मिकच्या अंकाची होळीही केली.
यावेळी वयोवृद्ध प्रबोधनकार घराबाहेर आले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वतीनं संतप्त निदर्शकांची माफी मागितली.

या घटनेनंतर मात्र बाळासाहेब या तिघांच्या कच्छपीच लागले. अत्रेंचं त्यांनी काय केलं, हे मागच्या भागात आपण पाहिलं. डांगे आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष हे मुख्य टार्गेट होतं. पण त्याआधी नामोहरम करायचं होतं, जॉर्ज फर्नांडिस यांना. मुंबईवर राज्य करण्यासाठी ते आवश्यकच होतं. कारण जॉर्ज त्या वेळी बंदसम्राट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या एका इशा-यावर अवाढव्य मुंबईची हालचाल बंद व्हायची. 

महापालिका, बेस्टमहापालिकेची हॉस्पिटल्स, थिएटर कामगार, हॉटेल कामगार, कॉलेज कर्मचारी, फेरीवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले या सर्व ठिकाणी जॉर्ज यांनी उभ्या केलेल्या संघटना होत्या. ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतात, जॉर्ज, बाळासाहेब आणि शेट्ये फ्री प्रेसमध्ये एकत्र काम करत होते. जॉर्ज युनियनचे अध्यक्ष तर शेट्ये सेक्रेटरी होते. पुढं जॉर्ज मोठे कामगार नेते बनले. त्यामुळं ते बाळासाहेबांच्या निशाण्यावर आले. 

जॉर्ज यांच्या मुंबईला वेठीस धरण्यावर बाळासाहेबांनी मार्मिक आणि सभांमधून प्रचंड टीका केली. १९६७च्या निवडणुकीत पंचमहाभूतांना गाडा असं आवाहन शिवसेनेनं केलं. त्या यादीतही जॉर्ज होतेच. समाजवादी जॉर्ज यांनीही शिवसेनेला वेळोवेळी विरोध केला. पण दोघांमधली मैत्री कायम राहिली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट काँग्रेसचे स. का. पाटील यांचा पराभव करून जॉर्ज मुंबईचे सम्राट बनले. पुढं ते राष्ट्रीय राजकारणात गेले. नंतर शिवसेनेनं स्थापन केलेली कामगार संघटना सगळीकडं घुसली. पण त्यांना जॉर्ज यांच्या संघटनेचा प्रभाव फारसा मोडून काढता आला नाही. शरद राव यांच्या माध्यमातून त्यांची संघटना अजूनही पाय रोवून आहे.

शिवसेनेचं मुख्य टार्गेट होतं ते कम्युनिस्ट आणि त्यांचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. कारणशिवसेनेचं विषारी रोपटं मुळातूनच उपटून काढा असं आवाहन ते करत होते. तर उलट डांगे हे विष आहे, असा प्रचार शिवसेना करत होती. कारण शिवसेनेच्या लेखी कम्युनिस्ट राष्ट्रद्रोही होते. त्यामुळं त्यांना संपवणं गरजेचं होतं. म्हणूनच १९६७ पासून शिवसेनेनं नेम धरला होता तो  कम्युनिस्ट पक्षावर आणि अर्थात त्यांचे नेते कॉम्रेड डांगे यांच्यावर. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.

भाग ७ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)
शिवसेना जन्माला आली तीच मुळी मराठी अस्मितेच्या प्रश्नावर. कालांतरानं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत शिवसेनेनं मुस्लिम विरोध सुरू केला. पण सेनेनं यापेक्षाही कट्टर द्वेष केला तो मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाचा. आपल्या राजकीय आयुष्यात शिवसेनेनं बहुतेक पक्षांशी युती केली पण कम्युनिस्टांशी कधीही जवळीक केली नाही.

मुंबईवर अधिराज्य गाजवायचं असेल तर बाळासाहेबांच्या भाषेत या लाल माकडांना पहिल्यांदा हुसकावून द्यायला पाहिजे, असा अजेंडा शिवसेनेनं ठरवला. त्यानुसार शिवसैनिकांमध्ये कट्टर कम्युनिस्टद्वेष भिनवण्यास सुरुवात केली. डेअरिंगबाज कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं अवसानघात करण्यासाठी त्यांच्या म्होरक्यावर प्रहार करणं आवश्यक होतं. म्हणूनच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेचे प्रमुख शत्रू बनले.

खरं तर कॉम्रेड डांगे म्हणजे देशातल्या कम्युनिस्ट पक्षाचे उद्गाते आणि कामगार चळवळीचे पितामह. त्यांच्याच पुढाकारानं १९२५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीस्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यात कामगार आणि शेतकर्‍यांचा सहभाग वाढला तो डांगे यांच्यामुळं. महिला कामगारांमध्येही हक्काची जाणीवनेतृत्वगुण निर्माण करण्यात डांगे यशस्वी ठरले. 

त्यांच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. त्यांनी काही काळ वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचं सदस्यत्वही भूषवलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेत रशियानंही त्यांना सर्वोच्च असं लेनिन पदक देऊन गौरविलं होतं. चीन-युद्धानंतर क्रुश्र्चेव्हटिटो आदी नेत्यांना भेटण्यासाठी आणि भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी  पंडित नेहरूंनी डांगेंना खास परदेश दौर्‍यावर पाठवलं होतं. 

असा हा नेता महाराष्ट्राच्या, मुंबईच्या गळ्यातला ताईत होता. मराठी माणसासाठी डांगेंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. त्यांच्यामुळंच  कामगार वर्ग मोठ्या संख्येनं आणि एकजुटीनं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उतरला आणि हा लढा यशस्वी झाला.

मराठी भाषेवर डांगेंचं मोठं प्रेम होतं. राज्यकारभारात मराठी भाषा स्वीकारली जावी, यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. कामगार चळवळ आणि राजकारणासोबतच साहित्य, संगीत, अर्थकारणाचाही त्यांचा अभ्यास होता. साहित्य क्षेत्रातलं दलित-विद्रोही साहित्य निर्माण होण्यामागची वैचारिक पार्श्र्वभूमी तयार करण्याचं मोठं काम कॉम्रेड डांगेंनीच केलं. संयुक्त महाराष्ट्राचं मुखपत्र अर्थात आचार्य अत्र्यांचामराठा पेपर सुरू करण्यातही डांगेंचा मोठा वाटा होता.

दिल्लीश्वरांनी १ एप्रिल हा महाराष्ट्र दिन करायचं ठरवलं होतं. पण डांगेंच्या आग्रहामुळं १ मे हामहाराष्ट्र दिन झाला. अशा या लोकप्रिय माणसाला अंगावर घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा जनमानसातल्या त्याच्या प्रतिमेला धक्का दिला पाहिजे, हे बाळासाहेबांनी लक्षात घेतलं. त्यानुसार मार्मिकच्या प्रत्येक कार्टूनमध्ये डांगे राष्ट्रद्रोही असल्याचं रंगवलं जावू लागलं. डांगेवर टीका नाही, खिल्ली उडवणारं कार्टून नाही, असा १९६५पासूनचा मार्मिकचा एकही अंक पाहायला मिळत नाही. भाषणातून डांगेंवर जोरदार टीका करणं, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करणं हे तर नेहमीचंच झालं.
  
मुंबईतल्या गिरण्यांसोबतच एलआयसी, जीआयसीवर कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. ते मोडून काढायचं तर शिवसेनेनं समाजकारणापेक्षा राजकारणात जाणं गरजेचं होतं. त्यानुसार कम्युनिस्टांना विरोध करतच शिवसेना १९६७च्या निवडणुकीत उतरली. 

सेनेच्या पहिल्या मेळाव्यात राजकारण म्हणजे गजकरणअशी खिल्ली उडवणारे ठाकरे पुढच्या काळात पक्के राजकारणी बनले. त्यांची शिवसेना कम्युनिस्ट पक्षाची वैरी बनली. या राजकारण ते गजकरण प्रवासावर नजर टाकूयात उद्याच्या भागात.



भाग ८ :  राजकारणाचं गजकरण
शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडूनच ऐकायला हवा. या वयातही खड्या आवाजात, ओघवत्या भाषेत ते शिवसेनेच्या स्थापनेचं आणि पहिल्या दस-या मेळाव्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात.
‘'मार्मिक'मधले ज्वलंत विचार वाचून अस्वस्थ झालेला मराठी माणूस 'मार्मिक'च्या कचेरीची म्हणजेच ठाकरे परिवाराच्या शिवाजी पार्कवरच्या घराची वाट धरायचा. माणसांचे लोंढेच्या लोंढे इथं येऊन धडकायचे. 
बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सगळं पाहात होते. एक दिवस बाळासाहेबांना ते म्हणाले,  'बाळया गर्दीला, धुमसणा-या मराठी शक्तीला कधी आकार देणार आहेस की नाहीउत्तरादाखल बाळासाहेबांनी नारळ आणवला. तो छत्रपतींच्या पुतळ्यासमोर फोडायला लावला. आणि एका लढवय्या संघटनेची स्थापना झाली. प्रबोधनकारांनी तिचं बारसं केलं. नाव ठेवलंशिवसेना!

पहिल्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक ढोलताशे वाजवतगुलाल उधळत शिवाजी पार्कवर आले. गर्दीबाबत सांगायचं तर, मी पाहिलंयशिवाजी पार्कच्या भिंतींना माणसं टेकली होती’’. महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे, असं सांगत शिवसेना यापुढं ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करेल, असं बाळासाहेबांनी या मेळाव्यात जाहीर केलं. याच वेळी राजकारण म्हणजे गजकारण अशी कोटीही त्यांनी केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढ्यानंतरही सत्तेपेक्षा रोजगार मिळावा, अशी सामान्य मराठी माणसाची अपेक्षा होती. ही अपेक्षाच ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेअगोदर सहा वर्षे मार्मिकमधून व्यक्त करत होते. स्थापनेनंतरही ही मराठी समाजकारणाची लाईन आपण सोडणार नसल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली खरी पण राजकारणाशिवाय समाजकारण होऊ शकत नाही, हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं. 

निमित्त झालं, १९६७च्या लोकसभेच्या निवडणुकीचं. माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन या निवडणुकीला उभे राहिले. मराठी माणसासाठी काहीही न करणा-या या उप-या माणसाला विरोध म्हणून शिवसेनेनं काँग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठींबा दिला. मराठी मतांची ही जणू चाचणीच होती. या निवडणुकीत स. गो. बर्वे निवडून आले. आणि मराठी माणूस निवडणुकीच्या मैदानातही आपल्या पाठीशी उभा राहू शकतो हे शिवसेनेच्या ध्यानी आलं. 

या निवडणुकीतून राजकारणात अप्रत्यक्षपणे शिरकाव झाला असला तरी ८० टक्के समाजकारण या आपल्या मूळ धोरणापासून शिवसेना हटली नव्हती. त्यानंतर २१ जुलै १९६७ रोजी शिवसेनेनं विधानसभेवर पहिला मोर्चा काढला. मुंबईतल्या ८० टक्के नोक-या आणि महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीतील ८० टक्के जागा मराठी माणसासाठी राखून ठेवाव्यात, अशा २५ मागण्यांचं निवेदन शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना दिलं.

या दरम्यान मुंबईत नाक्या-नाक्यांवर शिवसैनिकांचे अड्डे उभे राहू लागले होते. हे अड्डेच पुढं शिवसेनेच्या शाखा बनल्या. नागरी प्रश्नांपासून ते बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करण्यापर्यंत आणि स्वस्त दरातल्या वस्तू विकण्यापासून ते अगदी घरगुती भांडणं सोडवण्यापर्यंतची सर्व कामं शिवसेनेच्या शाखा-शाखांवर होऊ लागली. शिवसेना शाखांच्या या कार्याविषयी उद्याच्या भागात.

भाग ९ : अड्डे ते शाखा
मार्मिकमधले विचार वाचून बेरोजगार मराठी तरुण अस्वस्थ झाले. नाक्या-नाक्यांवर जमून चर्चा करू लागले. हे सारं बदललं पाहिजे, असं म्हणू लागले. सुरुवात म्हणून त्यांनी परिसरातल्या नागरी समस्यांना हात घातला. कचरा, सांडपाणी, नळाचं पाणी आदी तक्रारी घेऊन ते वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ लागले. नंतर तर केवळ नागरी समस्याच नाही तर अगदी गल्लीतली, घरांमधली भांडणंही हे तरुण सोडवू लागले. त्यामुळं गांजलेल्या मराठी माणसांना या अड्ड्यावरच्या तरुणांचा मोठाच आधार वाटू लागला.

सुरुवातीला हे अड्डे अगदी घराच्या ओट्यांवर, चाळींच्या जिन्याखाली, दुकानांच्या बाकड्यांवर असे जागा मिळतील तिथं सुरू झाले. भाऊ पाध्येंनी राडा या आपल्या कादंबरीत या अड्ड्यांचं नेमकं वर्णन केलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या अड्ड्यांना बळ मिळालं. त्यांचं हळू हळू शाखांमध्ये रुपांतर होऊ लागलं. गोरेगावचे विलास अवचट किंवा गिरणगावातल्या बाळकृष्ण नर यांच्याकडं सुरुवातीच्या या शाखांच्या मोठ्या मनोरंजक आठवणी आहेत. गिरणगावातले शिक्षक असलेले रमेश लब्दे यांनी तर पहिली शाखा काढली मॉडर्न मिलच्या कोप-यात मुतारीच्या जागेवर, गटारावर. ती पंधरा वेळा पाडली आणि बांधली. त्यावर केवळ छप्पर टाकलं जायचं.

अशा शाखांमधून कामाला सुरुवात करूनच शिवसेनेचे नेते पुढं आले. गिरगावातले प्रमोद नवलकर प्रजासमाजवादी पक्षाच्या जिन्याखालच्या जागेत लोकांच्या तक्रारी ऐकत बसत. ही जागा अपुरी पडू लागल्यानं ते रस्त्यावरच्या सुपारीच्या दुकानात खुर्ची टाकून बसू लागले. तीही जागा अपुरी पडू लागल्यानं गिरगावातल्याच एका मोकळ्या जागेवर शिवसैनिकांनी शाखा बांधून टाकली. मुंबईतल्या शिवसेनेच्या बहुतेक शाखा अशाच रातोरात उभारल्या गेल्या.

सुधीर जोशींनीही न. चि. केळकर रस्त्यावरच्या आपल्या यशवंत भोजनालयाच्या गच्चीवर एक शाखा बरेच दिवस चालवली.
परळचे वामनराव महाडिक शाखेचं बांधकाम होईपर्यंत आपल्या घरासमोरच टेबल टाकून बसायचे.
शिवशाहीतील गडांच्या बुरुजांच्या आकारातल्या या शाखा ठिकठिकाणी दिसू लागल्या. खरं तर शाखा ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांच्या जवळ जाणारी. पण या शाखांमधले सैनिक मात्र रस्त्यावर उतरून लढत. लोकांच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस धावपळ करत.

त्यामुळं या शाखा म्हणजे नागरिकांना आपल्या व्यथा, गा-हाणी मांडण्याचं हक्काचं ठिकाण बनलं. अडचणीत सापडलेल्या मराठी माणसाला मदत करणं, हे या शाखांचं आद्य कर्तव्य बनलं. याशिवाय या शाखांवर रोजगार मार्गदर्शन, व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, विविध स्पर्धा व्यायामशाळा उभारणी अशा गोष्टीही होऊ लागल्या. रक्तदानासाठी तर शिवसैनिक कधीही धावून जात.

महागाईतही शाखांवरचे शिवसैनिक सामान्य माणसाच्या मदतीला धावत.
सणासुदीच्या काळात शिवसेना शाखांसमोर रास्त दरात नारळ, उदबत्या विकायला ठेवल्या जात. साठेबाजी करणा-यांच्या विरोधात धडक कारवाई केली जाई. गोडाऊन उघडून त्यातला माल लोकांना रास्त दरात विकून टाकला जाई. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी हा तर त्या काळी परवलीचा शब्द बनला होता.

पण नंतर पक्षासाठी निधी गोळा करण्याचं कामही याच शाखांमधून सुरू झालं. मात्र ते काहीही असो. शिवसेनेचं ८० टक्के समाजकारणाचं धोरण या शाखांनी मनापासून राबवलं. अर्थात हे सारं करत होते, सच्चे, कडवे, मराठीप्रेमानं झपाटलेले शिवसैनिक. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात. 

भाग १० : झपाटलेला शिवसैनिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी तरुणांमध्ये असं कोणतं रसायन भरलं, की ज्यामुळं हे तरुण बेभान शिवसैनिक बनले? कोणाशीही पंगा घ्यायला तयार झाले? कुठलंही आव्हान झेलायला तयार झाले? बेधडकपणे समोरच्याला भिडू लागले? हे रसायन होतं, शिवसेनाप्रमुखांच्या लेखणीत अन् वाणीत. बाळासाहेबांच्या लेखणीतून आणि वाणीतून उकळत्या लाव्हारसासारखे बाहेर पडणारे शब्द मराठी तरुणांच्या रक्ताचा थेंब न थेंब तापवत होते. हे शब्द होते मराठी असल्याचा स्वाभिमान जागवणारे. मार्मिकमधल्या वाचा आणि उठा या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण रस्त्यावर उतरले.

ठोकशाहीचं समर्थन करत ठाकरेंनी पहिला हल्ला चढवला तो गांधीजींच्या अहिंसेवर. या अहिंसा तत्वज्ञानाची त्यांनी षंढ म्हणून खिल्ली उडवली. या नपुंसक अहिंसेनंच देशाचं वाटोळं केलं, हे त्यांचं म्हणणं तरुणांना पटू लागलं.

मराठी माणूस गुंड का नाही? मराठी माणूस हातभट्ट्या का चालवत नाही? तो मटक्याचं बेटींग का घेत नाही?’ असे प्रश्न ते जाहीर सभांमधून विचारीत. या खिजवण्यातून मराठी तरुणांना बरोब्बर मेसेज मिळाला. 
मला मर्द शिवसैनिक हवेत. शेळपट, नामर्दांची फौज नको अशा आशयाच्या मार्मिकमधल्या लिखाणांतूनकार्टून्समधून आणि जाहीर सभांमधील भाषणांतून मराठी तरुणांच्या मनात जोश आणि त्वेषाचा दारुगोळा ठासला गेला. मग हे तरुण रस्त्यावर उतरून काहीही करायला तयार झाले. 

महत्त्वाचं म्हणजे, शिवसेनाप्रमुख नेहमीच या तरुणांच्या पाठीशी उभे राहिले. राजकारणी उघडपणे जे करत नाहीत ते बाळासाहेबांनी केलं. त्यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक कृत्याचं जाहीर समर्थन केलं. त्या कृत्य़ाची जबाबदारी घेतली. शिवसैनिकांना शाबासकी दिली.

सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख हे नातं अत्यंत जिव्हाळ्यानं परस्परांशी घट्ट जोडलेलं होतं. लॉकअपमधल्या शिवसैनिकांना जामीन मिळवून देणं असो, त्यांच्या घरातल्यांना दिलासा देणं असो, शिवसेनाप्रमुख स्वत: जायचे. सैनिकांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचे. शिवसैनिक भेटायला आला तर उठून उभे राहायचे. त्याला दरवाजापर्यंत सोडवायला जायचे. त्यामुळं बाळासाहेबांच्या शब्दाखातर हजारो शिवसैनिकांनी तळहातावर शीर घेतलं.

बाळासाहेबांचे शब्द वाचकांवर भूल टाकत. त्यांचं भाषण म्हणजे बेस्ट ऑडिओ व्हिज्युअल परफॉर्मन्स आणि हिप्नॉटिझमचा प्रयोगच. तो ऐकून, पाहून हजारोंचा समूह मंत्रमुग्ध होई. त्यांच्या इशा-यावर डोलू लागे, गर्जू लागे, बेधुंद होऊन नाचू लागे.
शिवसेनाप्रमुखांनी घाटी म्हणून अवमानीत होणा-या मराठी माणसाच्या अस्मितेचा अंगार फुलवला. त्यांच्या रुपानं मुंबईतल्या मराठी माणसाला संरक्षणाची ढालच मिळाली.

बाळासाहेब हे तरुणांचे हिरो बनले. त्यासाठी बाळासाहेबांनी आपली इमेजही जाणीवपूर्वक उभी केली. किरकोळ शरीरयष्टीचे बाळासाहेब सुरुवातीला लांब बाह्यांचा शर्ट इन करून वावरत. त्यानंतर व्यक्तिमत्वाला रुबाबदारपणा यावा म्हणून त्यांनी गळाबंद जोधपुरी वापरायला सुरुवात केली. 
नंतर पांढराशुभ्र कॉलरचा झब्बा लेंगा घालायला सुरुवात केली. त्यानंतर भाषण करताना खांद्यावर शाल आली. गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा आल्या. यातून संकटातून तारणारा महामानव, अशी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा उभी राहिली. 

याच दरम्यान बेरोजगार तरुणांना कायदा हातात घेऊन अन्यायाविरुद्ध लढणारा अमिताभचा अँग्री यंगमॅन थिएटरमध्ये पाहायला मिळू लागला. अमिताभचा नायक आणि बाळासाहेब यांच्यात कमालीचं साम्य असल्याचा साक्षात्कार या तरुणांना झाला. त्यामुळं बाळासाहेबांच्या हुकमतीखाली शिवसैनिक होऊन रस्त्यावर राडा करावा, असं मुंबईतल्या प्रत्येक मराठी तरुणाला वाटू लागलं. तसं तो प्रत्यक्षपणे करूही लागला. त्याच्या या राड्याविषयी उद्याच्या भागात. 


भाग ११ : राडा
राडा हा शब्द कानावर पडला की मागून आवाज कुणाचा, शिवसेनेचा!’ हा प्रतिध्वनी ऐकायला येतो. दाक्षिणात्य लोक आपल्याच शहरात राहून आपल्याच हाता-तोंडचा घास हिरावून घेत आहेत. नोकरीधंदे बळकावून बसले आहेत. त्यांना हुसकावले पाहिजे. त्यासाठी बजाओ पुंगी, हटाओ लुंगी असं आवाहनमार्मिकमधून होऊ लागलं होतं. मराठी मनं चेतवली जात होती. त्याला संघटनात्मक रुप देण्यासाठी शिवसेनेची पायाभरणी सुरू झाली होती. 

५ जून १९६६च्या अंकात चौकट प्रसिद्ध झाली. यंडुगुंडुंचे मराठी माणसांच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची नोंदणी सुरू होणार!’त्यानंतर चौदाच दिवसांनी म्हणजे १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. 

३० ऑक्टोबरच्या शिवसेनेचा पहिल्या मेळाव्यातल्या भाषणात बाळासाहेब गरजले, ‘‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दाचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं तर काय परिणाम होतील याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यकाळात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील.’’ बस्स! चेतलेल्या तरुण मनांना एवढ्या ठिणग्या पुरेशा होत्या. या सभेहून परतणा-या जमावानं दादर भागात मोठी दगडफेक केली. उडप्यांच्या हॉटेलांची आणि रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉल्सची मोडतोड झाली. राड्याची ही सुरुवात होती. अर्थात सुरुवातीचं टार्गेट होते, दाक्षिणात्य लोक.
  
१९६७च्या निवडणुकीत राड्याला अधिकृत कारण मिळालं. माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे दाक्षिणात्य उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. त्यांना विरोध करायचा म्हणून प्रचाराच्या काळात लालबाग, परळ, काळाचौकी परिसरातल्या उडपी हॉटेलांमध्ये घुसखोरी सुरू झाली. दाक्षिणात्यांच्या हॉटेलात गटागटाने घुसायचं. बिल न देताच तिथले पदार्थ फस्त करायचे, असे प्रकार सर्रास सुरू झाले.

या प्रचाराच्या काळातच चेंबूर परिसरातल्या दाक्षिणात्यांची वस्ती असलेल्या एका झोपडपट्टीस आग लावून देण्यात आली.
काळा चौकी परिसरातील दाक्षिणात्यांच्या हॉटेलावर २९ फेब्रुवारी १९६७ रोजी केलेल्या दगडफेकीत ३२जण जखमी झाले. यात चार शिवसैनिकांना अटकही झाली. बाळासाहेबांनी मात्र या सर्वांना शाबासकी दिली.

यानंतर शिवसेनेनं टार्गेट केली ती मुंबईतली थिएटर्स. इथं सिनेमे दाखवून दाक्षिणात्य निर्माते पैसे मद्रासला घेऊन जातात. मराठी माणसाच्या या पैशाने यंडुगुंडूची घरे भरू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती. यातूनच फेब्रुवारी १९६८मध्ये लालबाग परिसरातल्या प्रसिद्ध गणेश टॉकीजवर हल्ला चढवला गेला. तिथं सुरू असलेला आदमी सिनेमा बंद पाडण्यात आला.

१ मार्च १९६८ रोजी तर मुंबईतल्या १७ थिएटर्सवर एकाच वेळी हल्ला चढवून हिंदी आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या सिनेमांचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं. अर्थात हे राडे तसे सौम्य होते. कारण १९६८च्या निवडणुकीत शिवसैनिकांची गाठ पडली ती कडव्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी. त्यानंतर ख-या अर्थाने मोठे राडे सुरू झाले. त्याविषयी आपण पुढं बोलणारच आहोत.

पण विशेष म्हणजे सुरुवातीला हे राडे बघत पोलीस आश्चर्यकारकरित्या गप्प होते. कारण तेहीमराठी होते ना! मात्र सरकारचीच हे राडे थांबवण्याची इच्छा नव्हती, हे हळू हळू स्पष्ट होऊ लागलं. आणि त्यानंतर शिवसेना म्हणजे सदाशिवसेना, वसंतसेना असल्याची टीका होऊ लागली. त्याविषयी उद्याच्या भागात.

भाग १२ सदाशिवसेना ते वसंतसेना
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना जनतेच्या रोषाचा वणवा अंगावर घ्यावा लागला. यात सर्वाधिक भाजून निघाले ते मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि सदोबा कान्होबा पाटील उर्फ स. का. पाटील! त्यांच्यावर तोफा डागण्यात आघाडीवर होते, आचार्य अत्रे आणि त्यांच्या मागोमाग व्यंगचित्रकार बाळ ठाकरे.

मुंबई हे कॉस्मॉपॉलिटन अर्थात बहुसांस्कृतिक शहर आहे’, अशी भूमिका घेत
स. का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्राला जोडण्यास विरोध केला होता. त्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं संबोधलं जाई. त्यामुळं तेच पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या टार्गेटवर आले. अत्र्यांनी तर १९४८ पासूनच नवयुगमधून पाटलांवर नेम धरला होता. १९५० पासून बाळासाहेबही अत्र्यांच्या जोडीला आले. नवयुगचे कव्हर्स बी. के. ठाकरेंच्या धमाल व्यंगचित्रांनी सजले. या चित्रांमध्ये मुख्य पात्र असे मोरारजी किंवा स. का. पाटील.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अत्र्यांनी पाटलांची केलेली जाहीर हजामत तर प्रसिद्धच आहे. एका सभेत स. का. पाटील म्हणाले यावश्चंद्रदिवाकरौ (म्हणजे आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत) ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यावर अत्र्यांनी सूर्य आणि चंद्रनावाचा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणाले, ‘‘जसे काही चंद्र सूर्य याच्या बापाचे नोकर. जणू सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि रामा हर्डीकर’’.

सदोबा कोळसे पाटील, द्विभाषिकवादी सदोबा, अशा विशेषणांनी अत्र्यांनी स. का. पाटलांना या काळात हिणवलं.

अत्र्यांचीच री पुढं बाळासाहेबांनी ओढली. ‘मार्मिकमधून त्यांनी स. का. पाटलांना यथेच्छ ओरबाडलं. पुढं याच पाटलांनी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली. निवडणूक होती १९६७ची. माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. दाक्षिणात्य म्हणून त्यांना विरोध करत शिवसेनेनं काँग्रेसचे मराठी उमेदवार स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे तसंच इतर तीन काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेनं पंचमहाभूतांना गाडा असं आवाहन करत प्रचार केला. परिणामी मेनन, अत्रे पडले. तसंच सूत्रधार स. का. पाटलांना पाडून जॉर्ज मुंबईचे अनभिषिक्त सम्राट बनले. पण यानिमित्तानं काँग्रेसला म्हणजेच पाटलांना मदत करणा-या शिवसेनेला सदाशिवसेना म्हणून विरोधकांकडून हिणवलं जाऊ लागलं.

पुढं मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनीही हाच काँग्रेसी धूर्तावा वापरला. मुंबईतलं विशेषत: गिरणगावातलं कम्युनिस्टांचं बळ ही काँग्रेसची डोकेदुखी होती. नाईकांनी हा कम्युनिस्ट साप पाव्हण्याच्या अर्थात शिवसेनेच्या काठीनं मारायचा ठरवला. सेना रस्त्यावर उतरून राडे करू लागली. पण सरकार त्याविरोधात काहीही कारवाई करेना. 
उदाहरणच द्यायचं तर १९६९च्या मुंबईतल्या दंगलींचं देता येईल. दोन-तीन दिवस दादरमध्ये दगडफेक, लुटालूटजाळपोळ आणि हिंसाचार सुरू होता. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोलापुरात जाऊन बसले होते. 
१९६२ ते १९७४ या आपल्या चौदा वर्षांच्या कालखंडात नाईकांनी असंच धोरण ठेवलं. नंतरच्या काळात वसंतदादा पाटलांनी नाईकांचाच वारसा चालवला. त्यामुळं शिवसेना म्हणजे वसंतसेना आहे, अशी टीका विरोधक करू लागले. 

याच पार्श्वभूमीवर आली ठाणे महापालिकेची निवडणूक. इथं शिवसेनेनं पहिल्यांदा भगवा फडकवला. तो इतिहास उद्याच्या भागात. 

भाग १३ : ठाण्यावर भगवा
शिवसेनेनं विरोध केल्यानं लोकसभेच्या १९६७च्या निवडणुकीत कृष्ण मेनन यांचा पराभव झाला. यामुळं सेनेच्या अंगात बारा वाघांचं बळ संचारलं. त्यातच ठाणे नगरपालिकेची निवडणूक आली. या निवडणुकीच्या मैदानात आपण उतरायचं, असं बाळासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ठरवलं. 

बाळासाहेबांचं हे मित्रमंडळ म्हणजे, प्रबोधनकारांकडं नियमित येणारे समीक्षक आणि विचारवंत धोंडो विठ्ठल देशपांडे, मार्मिकचे लेखक प्रा. स. अ. रानडे, एड. बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख, पद्माकर अधिकारी आदी मंडळी. हे लोक आपापले नोकरीधंदे सांभाळून संध्याकाळी शिवसेनेचं काम करण्यासाठी येत. यापैकी देशमुख आणि देशपांडे हे सिव्हिल इंजीनिअर होते. 

शिवसेनेच्या नव्याने स्थापन होणा-या शाखांशी, तरुणांशी माधव देशपांडे संपर्क ठेवून असत. त्यांनी १९६७-६८च्या मुंबई, ठाणे, पुणे या निवडणुकांमध्ये तिकीट वाटण्यापासून ते प्रचारापर्यंतची सर्व कामे केली.
ठाणे नगरपालिका निवडणुकीच्या वेळी या मित्रमंडळाला येऊन मिळाले, मनोहर जोशी, त्यांचे भाचे सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर.
   
त्या काळात बाळासाहेबांकडं स्वत:ची गाडी नव्हती. पण जोशी मामा भाच्याकडं स्वत:च्या मोटारी होत्या. बाळासाहेबांनी सुरुवातीला बराचसा प्रवास या गाड्यांमधूनच केला. मनोहर जोशी कधी गाडी चालवत तेव्हा माझा ड्रायव्हर एलएलबी आहे’, असं बाळासाहेब गमतीनं म्हणायचे.

१३ ऑगस्ट १९६७ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. शिवसैनिकांनी प्रचारानं ठाणे ढवळून काढलं. बाळासाहेबांसोबत मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी प्रचाराच्या मैदानात उतरले.

मतदानाच्या दिवशी ठाण्यात पाऊस सुरू होता. तरीही ७० टक्के मतदारांनी मतदान केलं. १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले. त्यामुळं शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला. या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले.

ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी एड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वत: शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले. त्यावेळच्या भाषणात ते म्हणाले, ‘‘जनतेच्या हितासाठी लढणारी संघटना ठाण्यात उतरण्याचा १०० वर्षांतील हा पहिलाच प्रसंग होय. 
पुष्कळ लोक म्हणत होते की, शिवसेना नष्ट होईल. आम्हाला फक्त जनताच नष्ट करू शकेल. नगरपालिकेत खूप लाचलुचपत आहे असे म्हणतात. ती आम्ही साफ गाडून टाकू. 
लोक आम्हाला देशप्रेमाचे धडे देतात. आम्हीही भारतमातेचीच लेकरं आहोत. प्रथम आम्ही देशच मानतो आणि नंतर महाराष्ट्र. पण महाराष्ट्र जगला तरच देश जगेल, हेही ध्यानात ठेवा. ठाणे शहरात आम्ही सुधारणा करू शकलो नाही तर आम्हाला खुशाल आणि जरूर बाहेर काढा.’’

या विजयामुळं शिवसेनेचा वट वाढला. एरवी शिवसेनेला जमेतही न धरणारे पक्ष शिवसेनेचं कौतुक करू लागले.
शिवसेनेच्या या विजयावर बोलताना प्रजासमाजवादी पक्षाचे नेते डॉ. जी. जी. पारीख म्हणाले, अन्य प्रांतातील एकूण प्रांतीय राजकारणाची दिशा लक्षात घेता, शिवसेनेचा विजय अगदी अपेक्षित असाच आहे. 
या निर्विवाद विजयामुळं शिवसेना मराठी भाषिक जनतेच्या भावनांचं प्रतिबिंब व्यक्त करणारा राजकीय पक्ष म्हणून विकास पावेल, असं मानण्यास प्रत्यवाय नाही. शिवसेनेच्या काही मागण्यांशी मीही सहमत आहे.’’ युतीच्या राजकारणाची ही नांदी होती. त्याविषयी उद्याच्या भागात.

भाग १४ : पहिली युती
बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण कोणी काहीही करोत पण बाळासाहेब पक्के राजकारणीआहेत, हेच खरं. कारण ज्या काळात प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं नव्हतं, ज्या काळात राजकीय युत्यांचा फंडा फेमस झाला नव्हता, त्या काळात त्यांनी पहिली युती एका राष्ट्रीय पक्षाशी केली होती. 

१९६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं युती केली होती, प्रजा समाजवादी पक्षाशी. पदार्पणातच या युतीनं मैदान मारलं. महानगरपालिकेत प्रथमच लढणा-या सेनेला १४०पैकी ४२ जागा मिळाल्या. तर प्रजा समाजवादीला १२ जागा मिळाल्या. 

खरं तर या युतीचा फायदा प्रजा समाजवादीपेक्षा शिवसेनेलाच जास्त झाला. त्यांची एक जागाही कमी झाली. याचं कारण युतीमध्ये शिवसेना सुरुवातीपासूनच डॉमिनेटींग राहिली. म्हणजे युतीत पहिलं नाव यायचं ते शिवसेनेचं.शिवसेना-प्रजासमाजवादी युती असं या युतीला संबोधलं जाई. 
प्रचाराच्या पोस्टर्सवर तर चक्कशिवसेना पुरस्कृत प्रजासमाजवादी उमेदवार असं लिहिलं जात होतं. प्रजासमाजवादीचा उमेदवार म्हणजे शिवसेना पुरस्कृत, किंमत कमी!’ अशा त्या वेळच्या विनोदाची आठवण ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सांगतात.
युतीची सगळी सूत्रंच शिवसेनेच्या हातात होती. सेनेनं दिल्या तेवढ्या जागा प्रजा समाजवादीनं विनाशर्त मान्य केल्या.

या युतीपूर्वी ठाकरेंनी मार्मिकमधून प्रजासमाजवादीच्या नेत्यांचा तसा यथेच्छ समाचार घेतला होता. पण सेनेचं ठाणे, मुंबईतलं वाढतं बळ पाहून प्रा. मधू दंडवते आदी नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला.

पुढच्या काळात शिवसेनेशी अनेकांनी समझोता केला. पण एस. एम. जोशी यांच्या संयुक्त समाजवादी पक्षानं मात्र कधीही शिवसेनेशी युती केली नाही. याच पक्षाच्या नेत्या मृणाल गोरे यांनी तर अगदी स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तरी शिवसेनेशी जवळीक केली नाही. 
याहीपुढचा कट्टरपणा दाखवला तो कम्युनिस्ट पक्षानं. त्यांनी शिवेसेनेसोबत युती करण्याचा विचारही मनाला शिवू दिला नाही. उलट मुंबईत बलवान असलेल्या या पक्षानं शिवसेनेला विरोध करण्याचं धोरण ठेवलं. कम्युनिस्टांना मोडून काढण्याचा निश्चय करूनच शिवसेना १९६८च्या निवडणुकीत उतरली.
  
दुसरीकडं मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून इतर पक्षही हडबडले होते. हातातली मराठी मतं निसटून नयेत म्हणून मुंबई काँग्रेसनं तर ८० उमेदवारांच्या पहिल्या यादीत तब्बल ३४ मराठी भाषिकांना उमेदवारी दिली होती!

प्रजासमाजवादी पक्षासोबत युती करण्यात बाळासाहेबांचे काही आडाखे होते. भविष्यात देश पातळीवर आपल्यावर टीका होणार, शिवसेनेला विरोध होणार हे ते जाणून होते. त्यावेळी संसदेत आपली बाजू मांडणारा कोणीतरी असावा, या भूमिकेतूनच त्यांनी दूरदृष्टीनं ही युती केल्याचं सांगितलं जातं. 
त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रजा समाजवादी पक्षानंही संसदेत सेनेची वकिली केली. निमित्त होतं, दळवी बिल्डिंग प्रकरणाचं. हे प्रकरण फेब्रुवारी १९६८मध्ये भूपेश गुप्ता, चित्त बसू, ए. पी. चटर्जी यांनी संसदेत उपस्थित केलं. तेव्हा गृहमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांना उत्तर देताना तारेवरची कसरत करावी लागली होती. 

दळवी बिल्डिंगवरचा हल्ला प्रकरण म्हणजे मुंबईतल्या कम्युनिस्टांच्या वर्मावर केलेला आघात होता. या हल्ल्यामुळं कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला. शिवसेनेनं कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात अर्थात गिरणगावात भक्कमपणे पाय रोवले. अशा या ऐतिहासिक दळवी बिल्डिंग प्रकरणाविषयी उद्याच्या भागात.



भाग  : दळवी बिल्डिंग
१९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे शिवसेना आणि कम्युनिस्टांमधल्या संघर्षाचा इतिहास. कामगार जगतावर अधिराज्य गाजवणा-या कम्युनिस्ट पक्षाच्या हासाचा इतिहास. आणि या इतिहासाची साक्षीदार आहे, परळची दळवी बिल्डिंग! 

ही बिल्डिंग म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं मुंबईतलं ऑफिस. गिरणीकामगारांच्या असंख्य आंदोलनाचा केंद्रबिंदू. नाविक बंडापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची साक्षीदार. ही बिल्डिंग म्हणजे देशाच्या कामगार चळवळीचं फुफ्फुसच. देवळात जावं तेवढ्या भक्तीभावानं कामगार या बिल्डिंगमध्ये नित्यनेमानं यायचे.
शाहीर अमरशेख, अण्णाभाऊंचा आवाज याच बिल्डिंगमध्ये घुमायचा. कॉम्रेड डांगे, कृष्णा देसाई, गुलाबराव गणाचार्य आदी दिग्गज कम्युनिस्ट नेत्यांचा इथं राबता असायचा. दळवी बिल्डिंग १८२, डॉ. आंबेडकर रोड, परळ, मुंबई १४’, हा पत्ता देशाच्या राजकीय नकाशात ठळकपणे नोंदला गेला होता. 
इथल्या गर्दीचा रहिवाशांना कधीही त्रास वाटला नाही. उलट रात्री उशिरापर्यंत चालणा-या चर्चा, बैठकांना आसपासच्या बि-हाडांमधून चहा पाठवला जायचा.

अशा या कम्युनिस्टांच्या मर्मस्थळावर २८ डिसेंबर १९६७ रोजी शिवसैनिकांनी तुफान हल्ला चढवला.
निमित्त झालं एका बैठकीवरच्या दगडफेकीचं. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवे यांची सभा शिवडीच्या गोलंजी हिलजवळच्या गाडी अड्ड्यावर सुरू होती. त्याचवेळी कराची हॉटेलवरच्या गच्चीवर मिटींगसाठी शिवसेनेची पाचशेक पोरं जमली होती. जोशी, साळवे इथं येण्यापूर्वी या मिटींगवर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. 
ही बातमी पसरताच उट्टं काढायचं म्हणून शिवसैनिकांनी दळवी बिल्डिंगमधल्या कम्युनिस्टांच्या ऑफिसवर जोरदार हल्ला चढवला. पाच ते सहा हजारांचा जमाव या बिल्डिंगमध्ये घुसला. ऑफिसमधले सर्व पेपर जाळले, फाडले गेले. सगळी कागदपत्रं रस्त्यावर आणली गेली. मोठा राडा झाला.

या घटनेचं शिवसेनाप्रमुखांनी समर्थनच केलं. दळवी बिल्डिंगवर चाल करून जाणारा शिवसैनिक आणि त्याची आक्रमकता मला प्यारी होती. हे मी वसंतराव नाईकांकडे ते मुख्यमंत्री असतानाच बोललो होतो. म्हटलं, आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायचीच होती. पण इतर भाडेकरू आमचे मतदार असल्यानं पोरांना रोखावं लागलं. पण त्यांनी नासधूस केली. टाईपरायटर फेकला हे सगळं खरं आहे. या घटनेनंतर काही वर्षांनी बाळासाहेबांनी हा खुलासा केला होता.

पण हल्ल्याचे पडसाद लगेचच उमटले. या हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी कम्युनिस्टांनी गोखले सोसायटीजवळ सभा भरवली. ही सभाही शिवसैनिकांनी उधळली. यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली. दगडविटा, लाठ्याकाठ्या, एसिड बल्ब यांचा दोन्ही बाजूंनी सर्रास मारा झाला. पोलिसांना यावेळी लाठीमार करून अश्रूधूर सोडावा लागला.

विधानसभा आणि संसदेतही दळवी बिल्डिंग प्रकरण गाजलं. यात सत्ताधारी काँग्रेसनं शिवसेनेला पाठीशी घातलं. संसदेत गृहमंत्री म्हणून उत्तर देताना यशवंतरावांनी या घटनेपूर्वी शिवसेनेच्या मिरवणुकीवर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं निदर्शनास आणून दिलं. प्रजासमाजवादी पक्षाचे सद्स्य बंकी बिहारी दास यांनी दिल्लीत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं.

दळवी बिल्डिंगवरचा हा हल्ला कम्युनिस्टांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होता. त्यात शिवसेनेला यश आलं. या घटनेनंतर कम्युनिस्ट चळवळीला उतरती कळा लागली. कम्युनिस्टांचं असं नाक कापल्यावर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी गिरणगावात प्रवेश केला. गणपती मंडळं, व्यायामशाळा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते गिरणगावकरांच्या हृदयात शिरले. हळूहळू गिरणगाव शिवसेनेच्या पंज्यात येऊ लागलं. त्याविषयी उद्याच्या भागात. 

भाग १६ : गिरणगावात वाघाचे ठसे
शिवसेनेचे स्थापना झाली ती मार्मिकच्या कचेरीत. म्हणजे दादरमधल्या बाळासाहेबांच्या घरात.मार्मिकचा वाचकवर्ग होता, दादर, शिवाजी पार्क, गिरगाव इथल्या मध्यमवर्गीय वस्तीतला. सुरुवातीला शिवसेनेला पाठींबाही याच मध्यमवर्गातून मिळू लागला. या भागातून पाठींबा मिळेल पण शिवसेनेसाठी आवश्यक असणारी लढाऊ फळी मात्र गिरणगावातूनच मिळणार, हे बाळासाहेबांनी ओळखलं. कारण कष्ट करत अन्यायाशी झगडणारा चिवट कामगारवर्ग या गिरणगावात होता. 

महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ज्यामराठी माणसावरच्या अन्यायाबाबत बोलत होती तोच हा मराठी माणूस होता. सेनेच्या दृष्टीनं अडचण फक्त एवढीच होती, की हा मराठी कामगार कम्युनिस्टांच्या पोलादी तटबंदीत होता. हीच तर तटबंदी शिवसेनेला तोडायची होती. त्यासाठी निमित्त मिळालं, १९६८च्या महापालिका निवडणुकीचं. तोपर्यंत रस्त्यावर राडे करून सेनेनं लढाऊ कम्युनिस्टांचा आत्मविश्वास ढिला केला होता. पण कामगारांच्या मनावर कम्युनिस्टांची पकड कायम होती. ही पकड सेनेला ढिली करायची होती. म्हणून सेनेचा ढाण्या वाघ गिरणगावातून वावरू लागला.

अगदी शिवसेना स्थापनेच्या शिवाजी पार्क मेळाव्याच्या अगोदरच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली ती परळच्या गणेश गल्लीच्या मैदानावर. त्याही आधीपासून ठाकरे गिरणगावातल्या विविध व्यायामशाळा, सांस्कृतिक मंडळांना भेटी देत होते. तिथल्या तरुणांच्या व्यथा समजून घेत होते.
  
गिरणगावात त्यावेळी अनेक व्यायामशाळा होत्या. या व्यायामशाळा म्हणजे सळसळत्या रक्ताच्या तरुणांचे आखाडेच. देवदत्त, गुरुदत्त, हिंदमाता, राममारुती, जयभवानी, जनता सेवा मंडळ आदी व्यायामशाळा त्यावेळी प्रसिद्ध होत्या. १९६८च्या निवडणुकीत यातल्या बहुसंख्य व्यायामशाळांनी सेनेला पाठींबा दिला. बाळासाहेबांनी या व्यायामशाळांमध्येही सभाही घेतल्या होत्या.

मराठी माणूस म्हटलं ती सण, उत्सव आलेच. गिरणगावातही ते मोठ्या उत्साहाने साजरे होत. या उत्सवांबद्दल कम्युनिस्टांना फारशी आत्मीयता नव्हती. हे हेरून शिवसेनेनं गिरणगावातला गणेशोत्सव,शिवजयंती उत्सव, नवरात्रोत्सव ताब्यात घेतला. आणि आपल्या राजकारणासाठी या उत्सवांचा उपयोग करून घेतला.

गणेशमंडळं म्हणजे तरुणांचे अड्डेच. त्यामुळं शिवसेनेनं पहिल्यांदा गिरणगावातली गणेशमंडळं ताब्यात घेतली. समाजवादी मंडळींची गणेशमंडळं तर शिवसैनिकांनी जवळपास हिसकावूनच घेतली. इथं समाजवाद्यांच्या राष्ट्र सेवा दलाची कलापथकं होती. ही पथकं नाटकं वगैरे बसवत. त्यातून तरुणांचं संघटन होई. यापैकी कम्युनिस्टांकडं काहीही नव्हतं. एकही गणेशमंडळ त्यावेळी कम्युनिस्टांच्या ताब्यात नव्हतं. अशा गणेशमंडळांमधून, सांस्कृतिक उपक्रमातून होणा-या तरुणांच्या संघटनाकडं त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. त्यांची हीच उणीव शिवसेनेनं भरून काढली.

गिरणगावात शिवसेनेनं विविध सांस्कृतिक उपक्रम सुरू केले. वृक्षारोपण, रक्तदान, वह्यावाटप आदी उपक्रमांतून शिवसेना घराघरांत पोहोचली.
बाळासाहेबांभोवती कामगारांची तरुण मुलं जमू लागली. बाळासाहेब या बेकार तरुणांच्या नोक-यांबद्दल बोलत होते. त्यांच्या नोक-या दाक्षिणात्यांनी हिरावून घेतल्याचं सांगत होते. 
खरं तर त्या वेळी गिरण्यांमध्ये साधारणपणे अडीच लाख नोक-या होत्या. पण प्रत्येक कामगाराला किमान दोन तरी मुलं होती. त्यामुळं या नोक-या पु-या पडू शकत नव्हत्या. आणि इतर उद्योगव्यवसायातल्या, सरकारी नोक-या यंडुगुंडूंनी ताब्यात घेतलेल्या. यामुळं अस्वस्थ झालेल्या तरुणांना त्याविरुद्ध बोलणारे शिवसेनाप्रमुख आपले वाटू लागले होते. त्यातून वडील कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक असं चित्र सर्रासपणं गिरणगावात दिसू लागलं. त्याबद्दल उद्याच्या भागात.




भाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक!
काळाचा महिमा अगाध असं म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राच्या रणमैदानात जीवाची बाजी लावली, गिरणगावातल्या कामगारांनी. पण म्हणजे तुम्ही आमचं काय भलं केलंत? असा सवाल त्यांना पोटची पोरं करू लागली. या लढ्यातून मुंबईवर खरंच मराठी माणसाचं राज्य आलं का? आमचे प्रश्न सुटले का? असं ही पोरं विचारू लागली.

दारोदार हिंडूनही नोक-या मिळत नाहीत. साधी वडापावची गाडी टाकायची म्हटली तर बापाजवळ पैसे नाहीत. अशा परिस्थितीत मराठी माणसांची नोकरी, भाकरी आणि घरयासाठी आवाज उठणारे बाळासाहेब ठाकरे या तरुणांना जवळचे वाटू लागले. शिवसेनेच्या दाक्षिणात्यांविरोधातल्या बजाओ पुंगी, हटाओ लुंगीत हे तरूण मग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शिवसेनेच्या जला दो जला दो, लालबावटा जला दो या घोषणेच्या तालावर ही कम्युनिस्टांची पोरं नाचू लागली.

बाप कट्टर कम्युनिस्ट आणि पोरगा शिवसैनिक१९६८च्या निवडणुकीत गिरणगावात हे चित्र सर्रास दिसू लागलं. कारण तेव्हा कम्युनिस्ट संघटना मालक विरुद्ध कामगार एवढीच लढाई लढत होते. स्थानिकांना नोक-या मिळाव्यात हा मुद्दा त्यांच्या गावीही नव्हता. त्यामुळं बेरोजगार तरुणांना शिवसेनेचं अपिल पटू लागलं. रोखठोक रांगडी भाषा, राडा करणा-या पोरांच्या मागं ठामपणं उभं राहणं, तुरुंगात गेलेल्या पोरांच्या घरच्यांची काळजी घेणं, हे पाहून कामगारांची पोरं बाळासाहेबांवर फिदा झाली.

दुसरीकडं या पोरांच्या आई-बापांची जामच गोची झाली होती. आपलीच पोरं आहेत म्हणून त्यांना गप्प बसावं लागत होतं. लाल बावटा जला दो म्हणा-या पोरांना भगवा झेंडा जला दो असं प्रत्युत्तर देता येत नव्हतं. कारण तो झेंडा शिवरायांचा. 

६८च्या निवडणुकीतलं वातावरण अनुभवणारे कम्युनिस्ट पक्षाचे अरविंद घन:श्याम पाटकर सांगतात, ‘‘शिवसेनेच्या पोरांच्या झुंडीच्या झुंडी त्यावेळी रस्त्यावर असत. चाळीतली सर्व पोरं सेनेत असायची. पाच ते १५-२० वर्षांची पोरं. काही कळायचं नाही, पण शिवसेना जिंदाबाद! कुठं गडबड, तणाव झाला की पोरं तिकडं धावायची.
कम्युनिस्ट उमेदवारासोबत दोघे तिघे त्याच्या चाळीतले कार्यकर्ते असायचे. पण शिवसेनेच्या उमेदवारासोबत पोरांची ही गर्दी असायची. सर्वांवरच या गर्दीचं दडपण यायचं. सेनेलाच मत द्या असा हट्ट ही पोरं आईबापाकडं करायची. मतदार चाळीतून निघाला की तो बूथपर्यंत जाईपर्यंत पोरं त्याची पाठ सोडायची नाहीत. या सळसळत्या रक्ताच्या पोरांनीच ख-या अर्थानं ही निवडणूक लढवली.’’

१९६८च्या निवडणुकीपर्यंत कार्डवाटप हा महत्त्वाचा प्रकार होता. आपली माहिती असलेलं कार्ड मतदाराला मतदानासाठी घेऊन जावं लागे. पक्ष कार्यकर्ते हे कार्ड बनवायचे. या निवडणुकीत कार्ड कम्युनिस्ट पक्षाचं आणि मत शिवसेनेला असा प्रकार झाला.
१९६८मधला सेनेचा हा कार्यकर्ता पूर्ण कोरा होता. त्याच्या डोक्यात फार मोठं तत्वज्ञान, दिशा असं काही नव्हतं. फक्त मराठी माणसाचं भलं झालं पाहिजे, एवढंच त्याला कळत होतं. पण भारावलेला कार्यकर्ता किती हिंमतीनं काम करतो त्याचं अनोखं उदाहरण या पोरांच्या रुपानं पाहायला मिळालं. 

बरं, निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि कार्यकर्ते दोघंही फाटक्या खिशाचे. पण मनात जबरदस्त जिगर होती. दोस्तांच्या खिशातून मिळतील तेवढे पैसे गोळा करून, अपार मेहनतीची तयारी ठेवून उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्याविषयी बोलूयात उद्याच्या भागात.

भाग १८ : बिनपैशांची निवडणूक
पेटी, खोका हे शब्द हल्ली अगदीच बापडे वाटतात; असा पैशांचा प्रचंड खेळ निवडणुकांच्या निमित्तानं अवतीभोवती पाहायला मिळतोय. अशा वातावरणात कुणी बिनपैशाची निवडणूक असा शब्द जरी उच्चारला तरी खुळ्यातच काढतील. 

भल्या भल्या मंत्र्यांना लाजवेल असं साम्राज्य मुंबईल्या नगरसेवकाचं असतं. पण जीवलग दोस्तांनी गोळा केलेल्या पैशांतून, चाळीतल्या मावशी, आजींनी दिलेल्या हक्काच्या मतांवर नगरसेवक म्हणून निवडून येण्याचाही एक काळ होता. त्याचं उदाहरण म्हणजे १९६८ची मुंबई महापालिकेची निवडणूक.

गिरणगावातले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात,  त्यावेळी पक्षाचा निवडणूक खर्च अत्यंत कमी असायचा. चाळीतल्याच लोकांकडून वर्गणी काढून बॅनर लावले जात. गिरणीच्या गेटवर एकेक रुपया निवडणूक निधी गोळा केला जाई. तो गरजू उमेदवारांना दिला जा.

या निवडणुकीतले एक उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार मधू शेट्ये सांगतात, निवडणुकीसाठी माझ्याजवळ पैसे असण्याचं कारणच नव्हतं. माझा मतदारसंघ ताडदेव होता. तिथल्या कार्यकर्त्यांनीच प्रत्येकी पाच ते दहा रुपये काढले. असे ८०० रुपये जमा झाले. त्यावेळी डिपॉझिट अवघं अडीचशे रुपये होतं. तेव्हा हजार पाचशे रुपयात सहज निवडणूक लढवली जायची.

शिवसेनेच्या उमेदवारांचीही अशीच परिस्थिती होती. पण सत्ताधारी काँग्रेसकडं साहजिकच मुबलक पैसा होता. त्यांनी या निवडणुकीत भरपूर झेंडे, बॅच, टोप्या आदी साहित्य आणलं. शिवाय त्यांनी शिवसेनेलाही पैसे पुरवले, असा आरोप अजूनही जुने कम्युनिस्ट नेते करतात.

आताच्या सारखी प्रचार करणा-या कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची सोय परस्पर होत नव्हती. प्रचारासाठी राबणारे हे कार्यकर्तेही अर्थातच फाटक्या खिशांचे. पण खिशात पैसे नसले तरी मनात दिलदारी होती. अर्ध्या कप चहात मित्राच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला जायचा. या कार्यकर्त्यांचे अड्डे म्हणजे इराण्याची हॉटेल्स
गल्ली, रस्त्याच्या कोप-यावर असलेली ही हॉटेल्स आकाराने भरपूर मोठी असायची. हॉटेलमालक कधीही गि-हाईकाला किती वेळचा बसला, म्हणून उठवायचा नाही. त्यावेळीआम आदमीचं खाणं म्हणजे, ब्रून मस्का-चहा, खारी-चहा, खिमा-पाव, आम्लेट-पाव. इराण्याचं हॉटेल म्हणजे कॉम्रेडससाठी एक चहा आणि सिगारेट यावर तासन् तास गप्पा मारण्याची हक्काची जागाया कार्यकर्त्यांमुळं इराणी हॉटेल्स नेहमी भरलेली दिसत.

कार्यकर्त्यांना परवडतील असे पदार्थ हॉटेलवाले ठेवायचे. त्यावेळी बटाटावडा फेमस नव्हता. उडप्याच्या किंवा काही मराठी हॉटेल्समध्ये ऊसळ पाव, वडा ऊसळ, घावण ऊसळ, भजी, कांदाभजी मिळायचे. कमी किंमतीतले हे पदार्थ राबणा-या कार्यकर्त्यांच्या पोटाला आधार द्यायचे. निवडणुकीच्या काळात प्रचार करणा-या कार्यकर्त्यांसाठी एकत्रित ऊसळ-पाव बनवला जायचा. यातूनच कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबद्दल एक म्हण प्रचलित झाली. लाल बावटा ऊसळ परोटा’!
 
त्यावेळी लाल बावट्याखाली जमलेल्या तरुणांना आंदोलनासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.गिरण्यांमधली छोटी छोटी आंदोलनं तर पावाचा आकार छोटा आहे, ऊसळ बरोबर नाही, अशा कारणांवरून व्हायची. पण एक व्हायचं, यामुळं कार्यकर्ते जोडले जायचे. हे कार्यकर्ते रात्र रात्र जागून बॅनर लावायचे. भिंती रंगवायचे. हो, या भिंतींचा आणि त्यांच्यावर रंगवलेल्या घोषणांचाही एक इतिहास आहे. हे उद्याच्या भागात.



भाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)
जमाना आहे कोट्यवधी लोकांना एकमेकांशी जोडणा-या सोशल नेटवर्कींगचा. तरुणाई तर ट्विटर,फेसबुकच्या वॉलवर अक्षरश: पडीक असते. या तरुणाईला जर एखाद्या वयस्कर गृहस्थांनी सांगितलं, की १९६८ साली मुंबईतल्या तमाम वॉल्सनी अर्थात ख-या खु-या भिंतींनी शिवसेनेला एक निवडणूक जिंकून दिली..., तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. कारण तो इतिहास आहे.

ज्ञानदेवमाऊलींनी आळंदीत जशी निर्जीव भिंत चालवली, तशा ७०च्या दशकात मुंबईतल्या भिंती जणू बोलत होत्या. म्हणजे, या भिंतींवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. त्यांना जागवत होत्या. साद घालत होत्या. आपलं म्हणणं लोकांपर्यंत थोडक्यात आणि नेमकंपणानं पोचवण्यासाठी त्यावेळी या भिंतींशिवाय हुकमी पर्याय नव्हता. साहजिकच निवडणूक प्रचारात या भिंतींना फार फार महत्त्व आलं. 

मुंबईत त्या काळात विळा हातोड्यावाल्या कामगार संघटनांची या भिंतींवर मक्तेदारी होती. १९६६नंतर शिवसेनेचा वाघोबा या मक्तेदारीला गुरकावू लागला. पहिला घास होता, यंडुगुंडूंचा. त्यांच्या विरोधातल्या बजाव पुंगी, हटाव लुंगी घोषणेनं मुंबईत धुमाकूळ घातला. त्यानंतर नंबर होता, कम्युनिस्टांचा. जला दो जला दो, लाल बावटा जला दो, या घोषणेनं डाव्यांना धडकी भरवली.

निवडणुकीत तर हे घोषणायुद्ध अगदी भरात आलं. यात शिवसेनेनं एकदमच आघाडी घेतली. कारण शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मूळचे चित्रकार. त्यांच्या व्यंगचित्रांना जनतेनं यापूर्वीही दाद दिली होतीच. शिवाय वडील प्रबोधनकार ठाकरेंकडून वारसापरंपरेनं आलेली एक घाव दोन तुकडेकरणारी भाषाही जोडीला होतीच. त्याचा पुरेपूर वापर शिवसेनेच्या घोषणांमध्ये करण्यात आला.

१९६८च्या निवडणुकीत केवळ भिंतीच नव्हेत तर पूल, पाईप, पाण्याच्या टाक्या शिवसैनिकांनी ताब्यातघेतल्या. कम्युनिस्ट कार्यकर्ते चुना लावून भिंती बुक करून ठेवत. शिवसैनिक मग या भिंतीच धुवून टाकत. दोघांमधल्या भांडणाची खरी सुरुवात या भिंतींवरूनच झाली. कम्युनिस्ट भिंतींवर आपल्या पक्षाचा शॉर्टफॉर्म सीपीआय असा लिहायचे. म्हणून शिवसैनिक एसएस असं लिहू लागले.

शिवसेनेच्या घोषणा भावनिक आवाहन करणा-या असायच्या. त्यातल्या त्यात शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ ही शिवसेनेची आवडती घोषणा होती. तर असशील जर खरा मराठी,राहशील उभा शिवसेनेच्या पाठी असं मराठी मनांना भिडणारी घोषणा ठिकठिकाणी दिसू लागली.

लोकप्रिय सिनेमांची नावं लोकांच्या पक्की लक्षात राहतात, हेही शिवसेनेनं लक्षात घेतलं. त्यातूनच मग थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’, ‘बूँद जो बन गये मोती, शिवसेना हमारा साथी’, या घोषणा रंगवल्या जाऊ लागल्या.

म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, काव्य यांचा मुक्त वापर या घोषणांमध्ये केला जाऊ लागला.
बाळासाहेब व्यंगचित्रांमधून जी टोपी उडवायचे, तो प्रकार या घोषणांमध्येही दिसू लागला. 
काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत’ या घोषणेच्या पुढं शिवसैनिकांनी लिहिलं हा हा हा हा...’ 

केवळ पक्षाच्या भिंती रंगवता रंगवता पेंटर झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात, बाकी काहीही असो या भिंती अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेल्या असत. या सुबकतेचं श्रेय शिवसेनेलाच द्यायला हवं. त्यातून एकप्रकारे भिंतीवाचनाचा आनंद मिळे. अर्थात शिवसेनेला खिजवणा-या घोषणाही विरोधकांनी शोधल्या होत्याच. त्याविषयी पुढच्या भागात. 

भाग २० : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस! (भाग ) 
शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसांवर मोहिनी घालू शकली याचं एक मुख्य कारण म्हणजे शिवसेनेची ठाकरी भाषा! ही भाषा थेट होती. नेमकी होती. एक घाव दोन तुकडे करणारी होती. शिवसेनेच्या घोषणांमध्ये ही भाषा पुरेपूर उतरली. 

कॉम्रेड प्रकाश रेड्डी म्हणतात, गोबेल्स पद्धतीनं प्रचार करून शिवसेनेनं मुंबईकरांना हिप्नॉटाईज केलं. ते काहीही असो, ही भाषा लोकांना भिडत होती. याअगोदर अशाच पद्धतीची भाषा वापरून आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्र गाजवून सोडला होता. बाळासाहेब ठाकरेंनी अत्र्यांवरही कडी केली. 
६७च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र समिती पुरस्कृत पाच पांडवांना निवडून द्या, असं आवाहन अत्र्यांनी केलं. त्याला विरोध करताना या पंचमहाभुतांना गाडा, अशी घोषणा बाळासाहेबांनी दिली. त्याही पुढं जाऊन त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मराठा तितुका मेळवावा-अत्र्याला पुरता लोळवावा’! अशीही घोषणा देऊन टाकली. सेनेच्या टार्गेटवर असलेले कृष्ण मेनन यांची निशाणी सायकल होती. त्याचा भाषणात उल्लेख करून बाळासाहेब घोषणा द्यायचे,सायकल पंक्चर.. लोक प्रतिसाद द्यायचे, झालीच पाहिजे!..’

याच निवडणुकीत संयुक्त समाजवादी पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस बोंब ठोकत आहेत, असं व्यंगचित्र बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये काढलं. त्याला घोषणावजा कॅप्शन होती, शिवसेना-प्रसोपा युती, त्याने केली आमची माती...बों बों बों...

शिवसेनेची प्रजा समाजवादी पक्षासोबतची युती नंतर तुटली. त्यानंतर ७१च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी रातोरात दादर भागात  ‘प्रमिला दंडवते,सर्वांना गंडवते, अशा घोषणा रंगवल्या होत्या.
जनताचे शांती पटेल, काँग्रेसचे रजनी पटेल, मराठी मनाला हे कसे पटेल? अशा अत्रेंच्या स्टाईलची आठवण करून देणा-या मुबलक घोषणा शिवसेनेनं तयार केल्या होत्या.

अर्थात शिवसेनेला उत्तर देणा-या घोषणा विरोधकांनी शोधल्या होत्याच.
बजाव पुंगीहटाव लुंगी या घोषणेला गिरणगावातल्या कम्युनिस्टांनी धोती लुंगी एक हैटाटा बिर्ला दुष्मन है या घोषणेनं उत्तर दिलं. तर ७१मध्ये करिअप्पा यांची प्रचार मोहीम खांद्यावर घेतल्यावर, मराठी माणसाच्या मारतात गप्पानिवडून आणतात करिअप्पा’ या घोषणेनं शिवसेनेला खिजवलं गेलं होतं.

शिवसेनेकडं सुरुवातीला ढाल-तलवार चिन्ह होतं. त्यावेळी जय अंबे जय भवानी, ढाल तलवार आमची निशाणी अशी घोषणा होती. धनुष्य-बाणाचं चिन्ह मिळालं तेव्हा आमची निशाणी धनुष्य बाण, विरोधकांची दाणादाण ही घोषणा जन्माला आली. सर्वसामान्यांच्या लक्षात राहील, असा पंच या घोषणांमध्ये असे. अगदी अजूनही आवाज कुणाsचा..’ म्हटलं की, पुढचं शिवसेनेsचा..’ हे आपोआप ओठांवर येतंच!

खरं तर प्रांतवाद उभी करणारी संघटना म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या बाजूनं मीडिया फारसा नव्हता. पण शिवसेनेसाठी प्रभावी मीडियाचं काम या घोषणांनी केलं. त्याला जोड मिळाली ती मार्मिकची. बाळासाहेब मार्मिकमध्ये जी कार्टून्स काढायचे, तीच मोठी करून शिवसैनिक चौकाचौकांत लावायचे. ही कार्टून्स एवढी प्रभावी ठरायची की शिवसेनेला वेगळ्या मीडियाची अशी गरजच भासली नाही.

बाकी काहीही असो शिवसेनेच्या या घोषणांनी तो काळ गाजवला. सुबक अक्षरात लिहिलेल्या घोषणांच्या भिंतींनी कार्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना एक वेगळाच आनंद दिला.
१९६८च्या निवडणुकीत भिंती रंगवणारे, पोस्टर्स चिकटवणारे असे उत्साही कार्यकर्ते शिवसेनेला भरपूर मिळाले. पण मिळत नव्हते, उमेदवार. त्याविषयी पुढच्या भागात. 

भाग २१ : उमेदवारी घ्या उमेदवारी...
निवडणुकीचा सीझन आला की बंडगार्डनला मोठा बहर येतो. यंदाचा मोहोर जरा जास्तच होता. काही केल्या बंडोबा थंड होत नव्हते. कसं तरी बाबापुताकरून, गोडीगुलाबीनं, वेगवेगळी गाजरं दाखवून, प्रसंगी हात दाखवून त्यांना गार केलं गेलं. पण धुसफूस राहिलीच. ही समस्या आता सर्वपक्षी आणि सर्वव्यापी झालीय. शिवसेनेला तर अगदी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. तर मनसेचे नाराज कार्यकर्ते तर थेट कृष्णकुंजवर धडकले.

१९६८मध्ये हे चित्र एकदम उलटं होतं. मराठी माणसाचं भलं करायचंय असं सांगत शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरली. पण आपल्याकडं पुरेसे उमेदवारच नाहीत, हे सेनेच्या लक्षात आलं. होतंही साहजिकच. स्थापनेनंतर लगेच दोन वर्षात निवडणूक लागली होती. मग अगदी मिळेल त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणं सुरू झालं. 

त्याचं उदाहरण देताना मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत सांगतात, ‘‘त्या वेळी काळा चौकीतून सेनेच्या पठडीत न बसणा-या साटमगुरुजी नावाच्या अत्यंत मवाळ माणसाला उमेदवारी देण्यात आली. हे गुरुजी म्हणजे एक पात्रच होतं. संयुक्त महाराष्ट्राची रस्त्यावरची रणधुमाळी पाहत ते गॅलरीत उभे होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात यांच्या खांद्याला गोळी लागली. हेच त्यांचं उमेदवारीसाठी क्वालिफिकेशन. 
माथाडी कामगारांवरचे जे गुमास्ते अर्थात मुकादम असतात तसे हे गुरुजी दिसायचे. धोतर नेसायचे. त्यांचा पिंड ना कोणाशी शत्रुत्व घेण्याचा ना अंगात सेनेचा आक्रमकपणा. पण दोनदा निवडून आले. त्यांना निवडणुकीला उभं राहायला मीच भरीस घातलं होतं.

दुसरे गणेश गल्लीत क्लासेस चालवणारे प्रि. हळदणकरही असेच. त्यांनाही शिवसेनेनं निवडून आणलं. एखादा कार्यकर्ता अमूक भागात राहतो म्हणून द्या त्याला उमेदवारीअसंही झालं. काळाचौकीतून मलासुद्धा उमेदवारी देण्यात आली. माझ्या नावाने गेरुनं भिंतीही रंगवल्या गेल्या. पण इथल्याच हरिश्चंद्र पडवळांनी हट्ट केला. मग मी बाळासाहेबांना त्यांना उमेदवारी द्यायला सांगितली.’’

बरं अनुभवी कार्यकर्ते तरी आणणार कुठूनशिवसेनेची पहिली बॅच तर कम्युनिस्ट विचारसरणीचीच होती. कारण बहुतेक लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आले होते. दत्ताजी साळवी, प्रजा समाजवादी पक्षाचे प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे. हे सर्व कामगार भागातले होते. त्यामुळं ते डाव्या विचारसरणीशी निगडीत होते. पण त्यांचा फायदाच झाला. काँग्रेसविरोधी जे डावपेच त्यांनी पूर्वी वापरले तेच शिवसेनेत आल्यावर कम्युनिस्टांच्या विरोधात वापरायला सुरुवात केली.

साटमगुरुजींच्या उमेदवारीसाठी तर पंढरीनाथ सावंतांनी टी. व्ही. सावंत या कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्याची मदत घेतली होती. नंतर ज्यांच्या खुनाचा शिवसेनेवर आरोप झाला त्या आमदार कृष्णा देसाईंचे हे सावंत खास कार्यकर्ते होते. त्यांचा काळा चौकी परिसरात मोठा दबदबा होता.

शिवसेनेच्या यादीत डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर,मनोहर जोशी, सुधीर जोशी, शरद आचार्य, अमरनाथ पाटील, दत्ताजी नलावडे या पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा प्राधान्यानं समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये हिंदू महासभेच्या पंडित बखले आणि पदमाकर ढमढेरे यांचाही समावेश करण्यात आला होता.

असं असलं तरी या पहिल्या निवडणुकीतही शिवसेनेनं एका गोष्टीकडं कटाक्षानं लक्ष दिलं होतं. ते म्हणजे जातीपातीची गणितं. त्याविषयी पुढच्या भागात. 

 

भाग २२ : एक व्हावे बहुजनांनी!
१९६८च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला पदार्पणातच मोठं यश मिळालं. या यशाचा हिशोब करता लक्षात येतं की यामागं एक मोठं कारण आहे. ते म्हणजे, शिवसेनेनं जुळवलेलं जातीय गणित! 

या निवडणुकीत बहुजन समाजातल्या छोट्या छोट्या जातींनी शिवसेनेला पाठिंबा दिला. हा समाज होता, कोकण आणि देशावरून नोकरीसाठी मुंबईत आलेला. त्यांच्यातल्या अनेक तरुणांना शिवसेनेनं नगरसेवक बनवलं. निवडून आलेल्या शिवसेनेच्या ४२ उमेदवारांपैकी जवळपास ३० उमेदवार बहुजनच होते.

सुरुवातीच्या काळात मराठ्यांपासून वैश्यवाण्यांपर्यंत आणि भंडा-यांपासून कुणबी, माळ्यांपर्यंत अनेक जाति-जमातीचे कार्यकर्ते शिवसेनेला मिळाले.
खरं तर कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली अगोदरच झालेलं होतं. यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्ष मराठ्यांचं राजकारण करत होता. जनसंघामध्ये शेटजी-भटजी होते. तर रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये दलित समाज विभागलेला होता.

अशा वेळी आपल्याही पाठीशी कोणीतरी राजकीय पक्ष असावा, असं छोट्या छोट्या जातींना वाटत होतं. शिवसेनेनं त्यांची अपेक्षा पूर्ण केली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे तर म्हणतात, मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपल्या जातीसमूहाविरुद्ध केलेलं बंड म्हणजे शिवसेना!’

सुरुवातीच्या काळातली बाळासाहेबांची भूमिका पाहिल्यावर ते आणखी पटतं. नाटककार आणि विचारवंत संजय पवार यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, साळी माळी शहाण्णव कुळी, एक व्हावे बहुजनांनी, असा आशय असलेली शुभेच्छापत्रे बाळासाहेब स्वत:च्या सहीनं पाठवत. 

अर्थात बाळासाहेबांच्या या भूमिकेवर ठसा होता, तो वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा. प्रबोधनकार ठाकरे जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या मुशीत घडलेले. जातीपाती प्रथांच्या विरोधात आयुष्यभर झगडलेले. त्यामुळं मुलावर त्यांच्या विचारांचा प्रभाव असणं साहजिकच होतं. 
त्यातूनच मुंबईत मराठी माणसांच्या हक्काचा लढा देताना आम्ही जात-पात मानत नाही, असं म्हणणारे बाळासाहेब तमाम बहुजन समाजातल्या तरुणांना आपले वाटू लागले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची घोषणाही याच सामाजिक जाणीवेतून आली होती.

याच जाणीवेतून १९६८च्या निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी शिवाजी पार्क आणि गिरणगावात असणारी अदृश्य भिंत जमीनदोस्त केली. म्हणजे शिवाजी पार्कात राहात होते, मुंबईतले उच्चवर्णीय,सुशिक्षित, सधन नेते. तर गिरणगावात होते, कोकणातून किंवा देशावरून मुंबईत आलेला चाकरमानी. या दोघांनाही शिवसेनेनं एकत्र आणलं.

पुढं बाळासाहेबांनी भूमिका बदलली. शिवसेना आणि दलितांमध्ये संघर्ष उभा राहिला. वरळी दंगल, नामांतर, रिडल्स प्रकरण, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण अशा अनेक घटनांमधून तेढ वाढत राहिली. 

पण दलित तसंच अठरापगड जातीचं कडबोळं सोबत घेतलं तरच यश मिळतं, हे शिवसेनेला अनुभवानं लक्षात आलं. त्यामुळंच पूर्वपदावर येत शिवसेनेनं शिवशक्ती-भीमशक्ती युती घडवून आणली. उच्चवर्णीयांपासून ते मागासवर्गीयांपर्यंत सर्व जातींच्या पाठिंब्यामुळं शिवसेनेला यश मिळत गेलं. 

या यशानं सर्वोच्च टोक गाठलं, १९९५च्या निवडणुकीत. यात शिवसेनेचे तब्बल ७३ आमदार निवडून आले. आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. अर्थात या यशाची मुळं सापडतात ती १९६८च्या निवडणुकीत. या निवडणुकीपासून बाळासाहेबांनी जुळवलेल्या छोट्या-मोठ्या जातींच्या समिकरणात. 

युतीचं राजकारणही सेनेचं याच हिशोबानं केलं. शिवसेनेची पहिली युती झाली होती, प्रजा समाजवादी या राष्ट्रीय पक्षाशी. यानिमित्तानं या पक्षाविषयी बोलूयात पुढच्या भागात. 


भाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष
शिवसेनीची पहिली युती झाली ती प्रजा समाजवादी पक्षाशी. या पक्षाबाबत फारसं लिहिलं, बोललं गेलेलं नाही. आता स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या या पक्षाचा त्यावेळी मुंबईत चांगलाच प्रभाव होता. पीएसपी किंवा प्रसोपा नावानं हा राष्ट्रीय पक्ष प्रसिद्ध होता.


मुंबईत वरळीच्या रेडीमनी मेन्शन’ बिल्डिंगमध्ये १९३४मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी नावानं या पक्षाचं बारसं झालं. त्याची बीजं रोवली गेली होती, नाशिक जेलमध्ये. स्वातंत्र्य चळवळीतले जयप्रकाश नारायणअशोक मेहता, सुसुफ मेहेर अली, आदी काँग्रेस नेत्यांनी जेलमध्येच स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा विचार केला. स्वातंत्र्यानंतरचा समाज कसा असेल, हे ठरवण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्येच दबावगट तयार केला होता. पण या गटाला वल्लभभाई पटेलादी नेत्यांनी विरोध केला. त्यातूनच मग स्वतंत्र काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचा जन्म झाला. 

१९४८मध्ये या पार्टीचे मुंबई महापालिकेत ३६ सदस्यही निवडून आले. मुंबईतल्या तरुणांमध्ये तेव्हा या पार्टीचं वारं होतं. म्हणजे आईवडील काँग्रेसमध्ये आणि पोरं काँग्रेस सोशलिस्ट पार्टीत, असा प्रकार होता.

१९४२ची चळवळ पक्षाच्या जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, अरुणा असफ अली यांनी गाजवली. स्वातंत्र्य मिळाल्यावर अखेर या नेत्यांनी १९४८मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली.

काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून आचार्य कृपलानी यांनी केएमपीपी अर्थात किसान मजदूर पार्टी स्थापन केली. नंतर त्यांनी १९५३मध्ये मुंबईतच केएमपीपी आणि समाजवादी पार्टीचं विलिनीकरण केलं. आणि जन्माला आली, प्रजा समाजवादी पक्ष.
हा पक्षही १९७७मध्ये प्रजा समाजवादी पक्ष जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीत विलीन झाला.
  
खरं तर समाजवाद्यांचं कम्युनिस्टांशी वैर १९३४ पासूनचं. काँग्रेस पक्ष भांडवलदारांचा आहे, असं कम्युनिस्टांचं मत. तर काँग्रेस स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचं एक हत्यार असल्याचं समाजवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं. 
मुंबईतले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जी. जी. पारिख सांगतात, ‘‘१९४२च्या चळवळीतही कम्युनिस्ट ब्रिटीशांच्या बाजूने होते. भूमिगत समाजवाद्यांना पकडून देत होते. त्यामुळंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही कम्युनिस्टांसोबत राहणं पक्षश्रेष्ठींना मान्य नव्हतं.’’

अर्थात पुढं १९६८च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करून प्रसोपानं कम्युनिस्टाचं उट्टं काढलंच. पुढं शिवसेना मुस्लिम विरोधी आणि हिंदुत्ववादी झाल्यानंतर ही युतीही तुटली.
त्यापूर्वी प्रजा समाजवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन संयुक्त समाजवादी पक्ष तयार झाला होता. डॉ. लोहिया, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिंस हे या पक्षाचे प्रमुख नेते होते.

प्रजा समाजवादी पक्षाने मुंबईत पहिल्यांदा गृहनिर्माण सहकारी चळवळ सुरू केली. त्यातून जुन्या चाळींचा पुनर्विकास सुरू झाला. झोपडपट्टीत राहणा-या गरिबांचे जीवनमान सुधारावे, फेरीवाल्यांना परवाने मिळावेत यासाठी हा पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला.

त्यांनी सुरू केलेल्या ग्राहक चळवळीतून अपना बाजार, अपना बँक, न्यू इंडिया को. ऑप. बँक, अंबुजा को. ऑप. बँक स्थापन झाल्या.

पारिख म्हणतात, ‘‘सध्या आम्ही पाठपुरावा केलेल्या सुनियोजित शहर संकल्पनेकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. चाळी, झोपडपट्ट्या मुंबईत टॉवर उभे राहतायत. गरीब, मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय. मराठी माणसांचा कैवार घेणा-या शिवसेना, मनसेसारख्या पक्षांचंही त्याकडं दुर्लक्ष आहे.’’

असं मराठीप्रेम केवळ समाजवाद्यांनाच होतं, असं नाही. १९६८च्या निवडणुकीत तर सर्वच पक्षांना मराठी प्रेमाचं भरतं आलं होतं. त्याविषयी पुढच्या भागात. 

भाग २४ : मराठीची लागण
शिवसेनेनं जसा मराठी माणसाचा कैवार घेतला, तसं मुंबईतलं वातावरण बदलू लागलं. मराठी माणूस शिवसेनेच्या झेंडयाखाली मोठ्या संख्येनं जमू लागला. ते पाहून इतर पक्षांना धडकी भरली. अशी धडकी भरणा-यांमध्ये प्रमुख पक्ष होता काँग्रेस. 
कारण संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उसळलेल्या मराठीच्या आगडोंबात काँग्रेस चांगलीच होरपळली होती. मरता मरता वाचली होती. त्यामुळं या पक्षानं सरळ शिवसेनेशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. आणि दुसरीकडं मराठी मतांना चुचकारायला सुरुवात केली.

या सगळ्याला निमित्त होतं, १९६८च्या मुंबई महापालिका निवडणुकीचं. त्यामुळं काँग्रेसप्रमाणं इतर पक्षही पाघळू लागले. मराठी मराठी करू लागले. पण यातही आघाडी घेतली ती काँग्रेसनंच.

मार्मिकच्या सातव्या वर्धापन सोहळ्याला मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी हजेरी लावली. त्यावेळी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून ते म्हणाले, ‘‘परप्रांतीयांचा संसार आम्ही चालू देतो आणि आपल्याच प्रांतीयाला पुढे जाऊ देत नाही. हे मराठी माणसाचं मोठं वैगुण्य आहे. ते दूर केल्याशिवाय मराठी माणसाची प्रगती होणं अशक्य आहे’’. यावरून निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असणार हे स्पष्टच झालं.

त्याच वेळी स्थानिक लोकांना नव्या उद्योगांमध्ये किमान ९० टक्के नोक-या मिळाव्यात, अशी भाषा काँग्रेस पक्षाचे नेते, मजूरमंत्री नरेंद्र तिडके आणि उद्योगमंत्री राजारामबापू पाटील बोलू लागले. हा योगायोग नक्कीच नव्हता.

पण या निवडणुकीत शिवसेनाच आपला खरा प्रतिस्पर्धी असल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं. त्यामुळं मराठी माणसांना तिकीटं देण्याचा प्रचंड आग्रह झाला. गुजराथ्यांचं लांगूलचालन करतात म्हणनू स. का. पाटलांवर पक्षातल्याच लोकांनी टीकेची झोड उठवली. 
मराठी उमेदवारांच्या समावेशावरून काँग्रेसची यादी अडकून पडली. अखेर मुंबई काँग्रेसनं ८० उमेदवारांच्या पहिल्या यादीत चक्क ३४ मराठी उमेदवारांचा समावेश केला. 

इकडं कम्युनिस्टांनाही मराठीची हवा लागलीच होती. शेतकरी कामगार पक्षाचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे तर शिवसेनेच्या जाहीरनाम्याची कॉपीच होती. बेकारांच्या जिल्हावार संघटना उभाराव्यात,नोक-यांमध्ये महाराष्ट्रीय स्थानिकांना अग्रहक्क आणि प्राधान्य मिळालं पाहिजे, राज्यसरकार तसंच अन्य महामंडळं यांचा कारभार मराठीतूनच चालला पाहिजे, अशा मागण्या शेकापचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब लाड यांनी केल्या. शेकापचा हा कार्यक्रम मराठी युवकांसाठी होता!

शिवसेनेला नाक मुरडणा-या समाजवाद्यांनाही निवडणुकांच्या मुहूर्तावर मराठीची लागण झाली. केंद्रीय नेतृत्वाची नाराजी पत्करून प्रजा समाजवादी पक्षानं शिवसेनेशी युती केली. मुंबईत टिकून राहण्यासाठी प्रा. मधू दंडवतेंनी दूरदृष्टीनं हा निर्णय घेतला होता.
प्रजा समाजवादीच्या भांवंडानं अर्थात संयुक्त समाजवादी पक्षानं शिवसेनेला विरोध कायम ठेवला. पण प्रत्यक्षात सेनेचीच भूमिका मांडायला सुरुवात केली. 
मुंबईत उभ्या राहणा-या नवीन कारखान्यांमध्ये परप्रांतीय मजूर आणण्यास बंदी घालावी. कारण हे मजूर जथ्थे करून राहतात आणि त्यामुळे शहरात झोपड्या वाढतात, असा स्पष्ट इशारा संयुक्त समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आला होता.

या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र समिती आणि शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होईल. त्यात मराठी मतं फुटून काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज नवा काळनं व्यक्त केला होता. तो खराही झाला. पण या निवडणुकीत शिवसेनेनं मराठीच्या नावानं अक्षरश: हलकल्लोळ उडवून दिला. त्यात इतर पक्ष पार झाकोळून गेले. त्याविषयी पुढच्या भागात. 

 भाग २५ : अवघा हलकल्लोळ करावा 
१९६८च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना बोलेल, तसंच बाकीचे पक्ष बोलू लागले. शिवसेना म्हणेल तसे वागू लागले. कारण सेनेच्या तालावर मुंबईतला तमाम मराठी माणूस झुलू लागला होता. 

महापालिकेची ही निवडणूक १२ मार्च १९६८ रोजी घ्यायचं ठरलं. पण बाळासाहेबांनी स्टंट केला. होळीचा सण तोंडावर होता. सणासाठी हजारो कामगार गावी जातात. त्यामुळं निवडणूक २६ मार्चला घ्या, अशी मागणी बाळासाहेबांनी केली. त्याला काँग्रेस, संपूर्ण महाराष्ट्र समिती, प्रजा समाजवादी पक्ष आदींनी पाठिंबा दिला. त्यामुळं निवडणुकांची तारीख ठरली २६ मार्च १९०६८!

मग आपल्या लेखणी अन् वाणीमधून बाळासाहेबांनी विरोधकांना चेचायला आणि मराठी मतदारांच्या भावनांना हात घालायला सुरुवात केली.
२४ मार्च १९६८ रोजी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये अवघा हलकल्लोळ करावा नावाचा अग्रलेख लिहिला. बाळासाहेबांचा हा लेख प्रचंड गाजला.

यात सामान्य मतदारांच्या मनाला हात घालताना बाळासाहेबांनी कमालीची भावूक भाषा वापरली. ‘‘२६ मार्चला तुम्ही शिवसेनेला कौल दिलात की चार दिवसांनी म्हणजे वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर, महाराष्ट्राच्या या राजधानीत शिवरायांचा पवित्र भगवा डौलाने फडकलेला आपणाला दिसेल. 
हा भगवा म्हणजे त्यागाचा ध्वज आहे. पावित्र्याचा ध्वज आहे. शुद्धतेचा ध्वज आहे. तो एकदा महापालिकेवर फडकला की, या शहराच्या कारभारात काँग्रेसने गेल्या तीस वर्षात करून ठेवलेली घाण चुटकीसरशी नष्ट होईल. 
महाराष्ट्राच्या या राजधानीत पाणी तर मुबलक व शुद्ध होईलच पण, वारे वाहतील तेदेखील या पाण्यासारखेच दुर्गंधी नसतील तर निर्मळ व सुगंधी वारे वाहू लागतील.
२६ मार्च या दिवसात एवढी जादू भरलेली आहे. एवढी शक्ती भरलेली आहे.
२६ मार्च हा एक मंगल सण आहे, असे आपण मानूया. 
दिवाळीसारखे त्या दिवशी सुप्रभाती उठा, स्नान करा नि घरातल्या, आपल्या इमारतीतल्या, वाडीतल्या नि गल्लीतल्या सर्व स्त्रीपुरुष मतदारांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने चला.

मोगलांचे परचक्र आले तेव्हा देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा संदेश समर्थ रामदासस्वामींनी दिला होता. २६ मार्चला मुंबईच्या जनतेने असाच हलकल्लोळ करावा’, असं आवाहन बाळासाहेबांनी या लेखातून केलं.

त्याचवेळी सत्ताधा-यांच्या कामावरही त्यांनी ठाकरी भाषेत कोरडे ओढले. गलिच्छ मुंबई, बेकायदा झोपडपट्ट्या, पाणीचोरी, अतिक्रमण झालेले फूटपाथ, फेरीवाले, संप, तोट्यातील बेस्ट, यावर तसंच सत्ता उपभोगलेल्या संपूर्ण महाराष्ट्र समितीवर जोरदार टीका केली. कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांना दूर ठेवण्याचं आवाहन केलं.

मधल्या काळात शिवसेना उत्तर भारतीयांचं लांगूलचालन करते, अशी सेनेवर जोरदार टीका झाली होती. पण या अग्रलेखातच बाळासाहेबांनी भविष्यातली शिवसेनेची भूमिका स्पष्ट करून टाकली होती.‘‘मराठी लोक आपले आहेतच. पण गुजराथी, सिंधी, पंजाबी, बंगाली, बिहारी, उत्तर प्रदेशीय हे सारे आपलेच आहेत. जे लोक या नगरीला आपली मानतात, तिच्या वैभवासाठी झटतात, त्यागाला सिद्ध राहतात, तिच्या उत्कर्षात आनंद मानतात नि तिच्या अपकर्षाने ज्यांना दु:ख होते, ते मग कोणत्याही प्रांताचे असोत, कोणत्याही जातीधर्माचे असोत. ते आपलेच आहेत. मुंबईकरच आहेत.’’

त्यानंतर शिवसेनेच्या सभांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. प्रचंड उत्साहात
मतदान झालं. आणि अखेर शिवसेनेला ऐतिहासिक कौल मिळाला. त्याविषयी उद्याच्या भागात. 

भाग २६ : शिवसेना झिंदाबाद!
अखेर मुंबई महापालिकेच्या १९६८च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेनं सगळ्याच पक्षांना जोरदार धक्का दिला. पदार्पणातच सेनेनं १४०पैकी ४२ जागा जिंकल्या. त्यांच्याशी युती केलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला ११ जागा मिळाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीतील घटक पक्षांना भगदाड पाडत शिवसेनेनं भगवा फडकावला.








 'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/16/32692