Tuesday 26 June 2012

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज.





आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जम झाला. त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता. तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र. असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता. शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.
शिवारायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले. स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले. औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत. कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत. इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता. अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार दि. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव घाटगे यांचे  "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले. त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं. 

राजकारण
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.


 समाजकार्य
८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.
राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.  



‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.



‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.
करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता.  

खासबाग कुस्तीचे मैदान म्हटले की साहजिकच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आठवण येणे क्रमप्राप्त. त्यानीच या मैदानाची स्थापना केली होती. ते स्वतः अगदी लहानपणापासून निष्णात असे कुस्तीगीर होते. त्यांच्या काळात (जवळपास २६-२७ वर्षाचा काळ होता) महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी हा सुवर्णकाळ होता. कोल्हापूरच नव्हे तर सार्‍या राज्यात कुस्तीगिरांच्या तालमींचा हा उत्कर्षाचा काळ होता. त्यानी हिंदुस्थानातील कोल्हापुरात कुस्तीसाठी निमंत्रित केले. काहीजणांना वाड्यावर आणि गावात कायमचा आश्रयही दिला. पैलवानांच्या आहारासाठी [पैलवानी भाषेत 'खुराक'] महाराजांनी लाखो रुपयांची अनुदाने दिली होती. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला.

अशा थोर जाणता राजास मानाचा मुजरा.

-------------------- लोकसत्ता

लज्जतदार मालवणी




आज जनसामान्यांमध्ये मालवणी जेवण आवडणाऱ्यांची  संख्या वाढत आहे. मांसाहारी जेवणाचा बेत असला की, बरेचदा मालवणी खाद्यपदार्थाचा शोध घेतला जातो. बाहेरगावी जाताना रस्त्यांवरील धाब्यांवरदेखील ‘येथे मालवणी जेवण मिळेल’ अशा पाटय़ा सर्रास दिसू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं गाव मालवण. मालवणी लोकांचं बोलणं थोडं तिरकस, हेल काढून असलं, तरी राहणं आणि खाणंपिणं मात्र अगदी निखळ स्वच्छंद! गरीबातला गरीब मालवणी माणूससुद्धा खाण्यापिण्यात काटकसर करताना दिसणार नाही. मग तो मुंबईसारख्या शहरात राहणारा चाकरमानी असो की, वडिलोपार्जित स्थावर सांभाळणारा गावकरी असो.
मालवणी जेवणाची लज्जत नारीच! गावाकडे आजही सकाळची न्याहारी उकडय़ा तांदळाची पेज आणि त्याबरोबर तोंडी लावायला वाळवून तळलेल्या ताकातल्या सुक्या मिरच्यांनी होते. मालवण
समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे भात व मासे हाच मुख्य आहार. वार पाळणारे मालवणी बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी शाकाहाराकडे पूर्णत: पाठ फिरवतात.
मालवणी कोंबडी-वडे किंवा वडे सागुती सुप्रसिद्धीच! एका कोंबडीला एक नारळ, वाटल्यास थोडं सुकं खोबरं असं साधं -सोपं प्रमाण. कढईत थोडय़ा तेलावर कांदा व खोबरं खरपूस भाजून त्याचं वाटण कोंबडीला लावलं जातं, पण खरी चव मालवणी मसाल्याचीच. बेडगी, संकेश्वरी सुकी मिरची, धणे, लवंग, मिरी, जायफळ, तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी, बडीशेप, खसखस, मसाला वेलची योग्य प्रमाणात घालून
वर्षभराचा मालवणी मसाला केला जातो. भाजक्या वाटपाचे सर्व प्रकार साधारणत: एकाच पद्धतीने केले जातात. मग ते बकऱ्याचं मटण असो वा कुल्र्याचं कालवण; कोलंबी बटाटा रस्सा असो की मोरीचं (मुशी) थपथपीत असो. अगदी मासे नाही मिळाले तर अंडय़ांची आमटीदेखील त्याच पद्धतीने केली जाते.
मालवणी पद्धतीने केलेल्या माशांच्या आमटीत थोडासा कांदा, थोडीशी चिंच, बेडगी मिरच्या, धने सर्व जिन्नस एकत्र वाटून घातले जाते. वाटण अगदी बारीक वाटलं जातं. अगदी सहाणेवर उगाळलेलं गंध. पूर्वी पाटय़ावरवंटय़ाच्या जमान्यात त्याची लज्जत औरच होती. 
मिरचीचा रंग मात्र लालच असायला हवा. तसेच काळी पडलेली चिंच बादच केली जाते. कारण त्यामुळे आमटीचा रंग बदलतो. यावरून एक गोष्ट दिसून येते की, चवीबरोबर रंगालाही मालवणी गृहिणी महत्त्व देते. या मसाल्यात मग पापलेट, सुरमई, हलवा, बांगडे, मांदेली, मुडदुशे, कोलंबी, भिंगी तत्सम अन्य माशांची आमटी केली जाते. वाटण तेच पण प्रत्येक माशाप्रमाणे त्याची चवही वेगळी. लसणीचा उपयोगही थोडय़ाफार प्रमाणात आवडीप्रमाणे केला जातो. कधी कधी तेच वाटप कमी पाणी घालून छोटे बांगडे, पेडवे, तारली, मोदकं यांसारख्या माशांना लावून त्याचं सुकं किंवा तिखलं केलं जातं. त्यात तिरफळं घातली की एक वेगळाच स्वाद निर्माण होतो. आणि जर ते मातीच्या सोरकुलात (पसरट भांडय़ात) चुलीवर शिजवलं असेल तर अप्रतिमच! कधी कधी शेवग्याच्या शेंगा, कैरी वगैरे घालून कोलंबीची किंवा शिंपल्यांची मासं काढूनही अशा प्रकारे लाल आमटी केली जाते.
मालवणच्या किनाऱ्यावर भरपूर बांगडे सापडतात. त्यामुळे ताजे बांगडे तर स्वस्त मिळतातच, पण सुक्या बांगडय़ांचाही वर्षभरासाठी साठा केला जातो. सुकी मिरची, चिंच, ओलं खोबरं व थोडं मीठ घालून जाडसर चटणी वाटली जाते. सुका बांगडा चुलीवर किंवा गॅसवर दोन्ही बाजूने भाजला जातो. त्याच्यावरचा जळका भाग काढून आतलं मांस चटणीत घातलं जातं. गरम गरम भाकरी आणि बांगडय़ांची चटणी किंवा गरम गरम कुळथाची पिठी (पिठलं) भात आणि बांगडय़ांची चटणी खाण्यात काय स्वर्गीय सुख आहे, ते मालवणी माणसालाच 
विचारा. त्या बांगडय़ाप्रमाणेच सुका जवळा, सुकी टेंगळी घालूनही चटणी करता येते. पावसाळ्यात सुक्या बाजाराने दुधाची तहान ताकावर भागवली जाते.
हळदीच्या किंवा केळीच्या पानात मसाला लावलेले बांगडे चुलीच्या निखाऱ्यावर भाजून फारच चविष्ट लागतात. माखले, शिवडं, कालवं, गुले ही वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळतात. कधी कधी भरल्या वांग्याबरोबर किंवा सुरण, दुधी वा कच्च्या पपईबरोबर सुका- ओला जवळा घालून भाजी केली जाते.
मालवणी पाककृतीनुसार मिरचीपूड, हळद, चिंच किंवा कोकमाचा रस व मीठ लावून मासे अर्धा तास ठेवून मग तांदळाचं पीठ लावून तेलात
कुरकुरीत तळले जातात. भिंगीची किंवा करलीची गाबोळीदेखील थोडी वाफवून घेऊन तिचे तुकडे करून अशाच प्रकारे तळली जाते. माशाच्या आमटीबरोबर एखादी कांदा, खोबरं घातलेली सुकी पालेभाजी, तसंच सोलकढी! सोलकढीशिवाय मालवणी माणसांचा मांसाहार पूर्ण होत नाही. लसणाची एखाददुसरी पाकळी ओल्या खोबऱ्याबरोबर वाटून त्याचा रस काढतात. त्यात एखादी ओली मिरची, मीठ व सोल म्हणजे कोकम टाकून सोलकढी केली जाते. तीदेखील गुलाबी दिसली पाहिजे. शेवटचा भात सोलकढीबरोबरच खायचा. नंतर एक वाटी सोलकढी प्यायली की मन एवढं तृप्त होतं की, ‘उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म’ म्हणजे काय याची जाणीव होते.
मालवणी भोजन म्हणजे फक्त मांसाहार हे समीकरण तसं चुकीचंच आहे. कारण मालवणी शाकाहारदेखील तेवढाच समृद्ध आहे. काळ्या 
वाटाण्याचं सांबारं, आंबोळ्या, घावणे मालवणी जेवणातील अविभाज्य घटक आहेत. काळ्या वाटाण्याचं सांबारं आणि तांदळाचे वडे, रव्याची लापशी किंवा तांदळाची खीर जसे लग्नकार्यात करावेच लागतात, तसेच श्राद्धकर्माच्या वेळीही तितकेच आवश्यक असतात. खापरोळी, भोपळ्याचे वडे, नरयेलाची भाकरी, मालपोआ हे पदार्थ प्रसंगानुसार केले जातात. नागपंचमीच्या सणाला हळदीच्या पानात बनवलेले पातोळे, नारळाच्या रसात गूळ-वेलची घालून त्याबरोबर खाल्लेल्या तांदळाच्या किंवा नाचणीच्या शेवया, काकडीचं धोंडस, उकडीचे मोदक, अळूवडय़ा, मूगडाळीचं कढण, कारळ्याची चटणी, ओल्या नारळाच्या पुरणाच्या करंज्या यांची सणासुदीला वर्णी लागतेच.
चुनाची कापं (खोबऱ्याच्या वडय़ा), शेंगदाण्याचे खडखडे लाडू, शेवाचे लाडू, खाजं ही भेट कोकणातून आलेल्यांकडून येतेच. मुगाचे, चण्याचे किंवा उकडय़ा तांदळाचे लाडू ही मालवणी लोकांची खासियतच असते. मोसमाप्रमाणे रतांब्याचं (कोकम फळाचं) सरबत, रायवळ आंब्याचं रायतं, कैरीचं लोणचं, विलायती फणसाची कापं किंवा भाजी, लाल भोपळ्याचे वडे, अळूच्या गाठीची भाजी, भरलेल्या मिरच्या, मायाळूच्या पानांची भजी, सुरणाच्या काचऱ्या केल्या जातात. सातपानी भेंडय़ांची आमटी व गोळ्यांची, टोमॅटोची आमटी माशाच्या आमटीच्या मसाल्यात केली जाते. प्रत्येक मालवणी घरात बिडाच्या तव्याबरोबर आप्पेपात्रही असतेच. भरपूर काजू व शेंगदाणे घालून गोडाचे तसेच तिखटाचेही आप्पे सणासुदीला केले जातात.
मोड आलेल्या मुगाची, कुळथाची, वालाची, चवळीची आमटीदेखील मटणाच्या मसाल्यात केली जाते. ओल्या काजूची उसळ जो खाईल त्याच्या हाताचा वास जाणार नाही, हे निश्चितच. फणसाच्या घोटय़ा (बिया) घालून केलेली टाकळ्याची भाजी, उडदाचं डांगर, वांग्याचं भरीत, कच्च्या फणसाची भाजी इतकंच काय शेवग्याच्या शेंगाचं चण्याच्या डाळीचं पिठलंही सुरेखच!
नुसती कांदा-मिरची घातलेली वालीची भाजी असो की मसालेदार भरली वांगी, जिरं, खोबरं वाटून लावलेलं तुरीच्या डाळीचं वरण असो. मुळ्याची पीठ भरलेली भाजी असो की परतलेल्या अळंब्या; सारं काही जिभेचे चोचले पुरविणारं!  मुगाच्या डाळीची साधी किंवा तिखट खिचडीदेखील  भूक शमवते, मनाला तृप्ती देते. खिचडीबरोबर ताकाची कढी असेल आणि एखादा तळलेला उडदाचा पापड तर मजा काही औरच!
अशा प्रकारे वैविध्यपूर्ण मालवणी जेवणावर कोणीही फिदा होईल. मालवणी माणसापुढे तुम्ही पंजाबी, मोगलाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, थाई, देशी-विदेशी खाद्यपदार्थाची जत्रा मांडा; तो आनंदाने ते भोजन चाखेल, पण घरी आल्यावर स्वयंपाकघरात जाऊन आईने  किंवा बायकोने आज काय जेवण केलं होतं, त्यातलं काही उरलय का, याची निश्चितच चौकशी करेल!

------------लोकप्रभा




ईर्जिक - सहकारातून प्रगती



एक आटपाट नगर नव्हत.... साध सुध गाव होत.
आटपाट नगरातील राजवाडा नव्हता, राजा नव्हता अन त्याच्या दोन राण्या पण नव्हत्या.ना आवडती ... ना नावड्ती !
तिथे हो्त एक चन्द्रमौळी टुमदार कौलारू घर. शेताच्या बांधाला लागून.
लोक त्याला "धर्माची वस्त्ती " म्हणत !
त्या घराचा राजा होता धर्मवीर. लोक त्याला "धर्मा" म्हणत.
त्याची एकच आवडती राणी होती. नाव तिच द्रोपदी. लोक तिला "धुर्पा" म्हणत.

या राजा-राणीच्या घराच्या तुटक्या-फुटक्या कौलातून चन्द्रोदय झालेवर चंद्राचे चांदणे घरभर विखुरतात. म्हणून हे चन्द्रमौळी घर. तुम्ही याला फाटके-तुटके म्हणू शकता. मी मात्र चन्द्रमौळीच म्हणाणार! वचने किं दारिद्र? शिवाय खर्‍या चन्द्रमौळी घरा मध्ये राहणारॆ तथा-कथित सुखवस्तु लोक, धर्मा-धुर्पा पेक्षा जास्ती सुखी नव्हते. आई अंबाबाईच्या आशिर्वादनं धर्माच्या घरात दोन पोरं बागडत होती.थोरली "रक्मा" अन धाकला "शिवा". गोठ्यात धर्मानं लहानपणा पासून वाढिवलेली खिलारी जोडी अन धुर्पाच्या माहेरा कडून आलेली आंदन-गाय झुलत व्हती.

आता तुम्ही म्हनाल कि ही "आंदन-गाय" काय़ भानगड हाये ?
तर बगा, आम्च्या टायमाला नां , सासुरवाशिण बाई सासरला जाउदे न्हायतर म्हायाराला जाउदे , ती कदीपन मोकळ्या हातान जात नव्हती. तिच्या बरोबर बुत्तीची दुर्डी आन जोंधळ्याच पोतं न्हायतर कडधान्याचं गठुड असनारच. सासुरवाशिण घरला पोचल्यावर दुर्डी खाली होई पवस्तर बुत्ती गांवभर वाटली जायाची. सासुरवाशिण म्हायाराला आल्याची बातमी गावभर पसरायची अन पोरीच्या मैतरनी भरा-भरा गोळा व्हयाच्या.

आता तुम्ही म्हनाल कि ही "बुत्ती" काय़ भानगड हाये ?

बुत्ती म्हंजी साबुती, एक लहान आकाराची सारण भरलेली गोड पोळी. ही बुत्ती गावभर वाटून, सर्वांचे तोंड गोड करून, सर्वांना सासुरवाशिण घरी आल्याच्या आनंदात सहभागी करून घेणारा पदार्थ.
धुर्पा लगीन झाल्यावर पहिल्यांदा म्हायाराला आली. मैतरनीच्या घोळक्यात चारदिस कसं गेल कळलंपन न्हाय.सासरी जायाचा दिस उजाडला अन सर्व्यांच्या डोळ्यात दाटून आल. धुर्पाचा भाउ मुराळी म्हुन जायच ठरलं. त्यान बैलगाडी जोडली. बां न जोंधळ्याच पोतं गाडीत चढीवल.बुत्तीची दुर्डी पांढर्‍या धोतराच्या तुकड्यात बांधून गाडीत ठेवली गेली. धुर्पाच्या आईने तिची खणानारळान ओटी भरून जड अंत:करणान गाडीत बसवलं. बैलाच्या पठीवर थाप पडनार तेवढ्यात धुर्पाच्या बां न आवाज दिला " ए पोरा, जरा थांब !". धुर्पाचा बां बिगीनं गोठ्यात गेला. धुर्पाची लाड्की गाय "तुळसा" चा कासरा सोडला अन गाडी माग बांधून दिला. आंदन म्हनुन . तस बगितल तर धुर्पाच्या आई-बापान लग्नातल्या रुकवतात आंदन म्हनुन मोप भांडी-कुंडी दिली व्हती. पर धुर्पाचा बां लय दूरदर्शी. त्यो रुकवतात आंदन म्हनुन गाय पन देची म्हनत व्हता. भांडी-कुंडी काय निर्जीव वस्तु. पर धुर्पाची लाड्की तुळसा पोरीबर धाड्ली तर तिला सासरी एकटं-एकटं वाटायच नांय. वाट्ल कि माझ्या म्हायाराची जिती-जागती सखी हायं सोबतीला. उद्या आई अंबाबायच्या कुर्पेन घरात चार नातवंड खेळत्यालं. त्यासनी प्वाटभर दुध-दुबत मिळलं. म्हनुन काय रुकवतात गायं? ईक्रितच झाल ! . धुर्पाच्या आईला काय हे पटाना ! ती भर मांडवात धुर्पाच्या बां वर डाफरली ...

" काय यड का खुळं म्हनावं ? रुकवतात कुनी गायं बसिवत्यात व्हयं? पुन्यांदा म्हायाराला ईल तवा द्या काय ती."

त्यो दिस आज उजाडला. धुर्पा बरुबर आज तुळसा पन नांदाया निघाली व्हती. "आंदन " म्हनून!. धुर्पा आन तुळसा सांच्याला सासरी पोचली तवा तुळसाला बगुन धर्मानी सासर्‍याच्या मनातली कालवाकालव बरुबर हेरली.त्यानी दावनीच्या ईतर जनावरा सारखी तुळसाला पर माया लावली. वैरण तोडल्यावर पैली पेंडी तुळसच्या गव्हानित पडायची. रोज वड्यावर न्हिउन खरारा करायचा, बेलफळ लाउन घासुन आंघोळ घालायचा.
शब्दाविना एकमेकाच्या मनातील भावना जाणून त्याला स्वत:च्या आचरणानी प्रतिसाद देण ही फार थोर कला आहे, तिला परिपक्वतेची खोली आहे, दोन व्यक्ती मध्ये द्रुढ नांत निर्माण करण्याची क्षमता आहे मात्र शब्दांचा उथळ्पणा बिलकुल नाही.
धुर्पाच्या बां चा "आंदन-गाय" पाठविण्या मागचा हेतू पूर्णपणे सफल झाला होता. तिच्या दुधावर दोन नातवंड पोसली होती.
तर ही अशी हाय बगा "आंदन-गाय" ची भानगड!.


बोंबलां ! घडाभर तेल नमनालाच खर्ची झाल की ! आपुन कुठ व्हतो आन कुठल्या कुठ भरकटलो तुळसाच शेपुट धरुन!

तर मी काय सांगत होतो की, त्या चन्द्रमौळी घरातल्या राजा-राणीचा संसार लेकरा-बाळा सकिट आन गोठ्यातल्या गाय-म्हशी सकिट मजेत चालला व्हता. बाप-जाद्याची ईस बिगा जमीन हुती. धुर्पा तिचा उल्लेख "काळीमाय" म्हनून करायची. वैशाखाचा वनवा थंड झाला व्हता. जेष्टी पुनव पन उलटून गेली व्हती. म्हातार्‍याच्या आजारपनानं धर्माला पुरा घेरला व्हता. अजुन बिगाभर जमीन पर नांगरून झाली नव्हती. हां हां म्हंता आकाडातल पैल नक्षत्र फुटंल. धर्माला काय कराव काय सुचना झालं. आजच्याला जरी नांगर धरला तरीबी एका नांगरावर हापत्याभरात ईस बिग जमीन कशी काय नांगरून व्हनार? धर्मा शेताच्या बांधावर डोक्याला हाथ लाउन बसला व्हता. पांदीवरन गुरवाच्या म्हाद्य़ाला जाताना बगुन धर्माच्या डोक्यातला तिडा सुट्ला. त्याला एक दिसात आख्खी ईसबिगा जमीन नांगरायची चावी सापडली. धर्मान बसल्या जागवरनं साद घाताली......

" ए ~~ म्हादा ! हाकड ये जरा ! "
म्हादा येउन बांधावर धर्माच्या शेजारी टेकत बोलताझाला...
" कांय धर्मा ! काळजीत दिसतुयास जनुं ! आं ! काय झालं ?"
" त्यच काय हाय म्हादा, म्हातार्‍याच्या दुखण्यापायी आवंदा जमीनीची नांगरट आज पतुर झाली नाय बग ! आता पावसाच्या आगुदर सगळी मशागत उरकायची तर मला ईर्जिकी
शिवाय दुसरा कुटलाच रस्ता दिसत नांय !"
" आरं मग घाल कि ईर्जिक मर्दा ! च्या मायला, एका दिसात आख्ख शिवार उखडुन टाकुया ! दिउ का समध्यासनी उध्याच आवातनं ! बोल !"
घटकाभर डोकं खाजऊन धर्मानं निर्णय घेतला.....
"व्हयं ! त्याच्या बिगर दुसरा कायबि ईलाज नाय ! दे उद्याचं आवातनं सर्व्यासनी !"
"ठरल तर मग ! आत्ताच जाउन सांगतो सर्व्यासनी ! तुमी लागा तयारीला "
म्हादा उठून रस्ता धरणार तेवढ्यात धुर्पानं दरवाज्यातनं हाळी दिली...
" ओ~~ भावजी ! कुट निगालासा लगी ? मी च्या टाकलाय ! बसा जरा यळ !"
धर्माला चहा टाकण्याची आर्डर देण्याची गरज भासली नव्हती. "अतिथी देओ भव " हे धुर्पाच्या रक्तातच होतं. चहा पीत-पीत तिघांनी ईर्जीकीच्या तायरीची बईजवार चर्चा केली.१५-२० आवातनी म्हंजी लहान-मोठी धरून घरटी ४ मानस धर्ली तरी पाउन्शे लोकाची यवस्ता करावी लागंल. शिवाय दोन ईसा जनावराचा दाना-पानी बगावा लागंल. लेकरास्नी दुध लागंल. मीठ-मिर्ची, तेल-तिखाट, दळण ईत्यादी सर्व्या गोष्टी वर चर्चा झाली. ईर्जीकीच्या तयारीची मिटींग दोन मिनिटात संपली आन जो तो आपापल्या कामाला लागला.वस्तीवरून आत्ताच गावात जाव लागनार व्हतं. च्या चा शेवटचा घोट घेउन धर्मा-म्हादा उठलं. धर्मान कनगीतन धा पायली जोंधळ काढुन म्हादाच्या मदतीनं तेची दोन बाचकी बनिवली. दोघांनी एक-एक बाचकं खांद्यावर मारून गावचा रस्ता धरला. किश्या पाटलाच्या चक्कीवर बाचकी उतरून, चक्कीवरच्या पोराला आर्डर सोडली,

"नीट बारीक दळुन वस्तीवर पोचिव रं ! ईर्जीक हायं उद्याला. ".
पोरान मान डोलावली.
म्हादा मधल्या आळीत शिरला अन रस्त्यावरनच सगळ्यास्नी आवातनी ध्यायला सुरवात केली..
"ओ~ शिर्पा.... आरं ईर्जिक हायं उद्या धर्माकड ! लवकर यं सकाळी वस्ती वर! काय ?"
धर्मानं जोश्याच्या पाकाडीतनं वर जाउन मांग वाडयाचा रस्ता धरला. धर्माची चाहूल लागताच वाड्यावरची कुत्री कोकलायला लागली. बिर्‍या मांगाच्या पालासमोर आल्यावर धर्मान आवाज दिला...

"हाईत का बिरुबा घरांत ? "
डोक्यावरच पागुटं सारख करत बिरुबा पालाच्या भाईर आला.
" कोन त्ये ? धर्मादादा व्हयं ! या या बसाकि ! लंय दिसानी येन केलं ! "
बिरुबाच्या बायकुनं पालातली घोंगडी आणुन पालाफुड टाकली.
" नग ! बसाया टाईम न्हाय ! उध्याची ईर्जीक ठिवलिया ! हाल्गी तापउन ठेव बगं ! ईसरू नको "
" न्हाय बां ! ईसरीन कसा ! यतोकि हाल्गी घिउन सकाळी-सकाळी ! बिनघोर र्‍हावा तुमी " .

ईर्जिकीनं "टेकॉफ" घेतला होता. म्हादा आवातनी करून घरी गेला होता. चक्कीवरच्या पोरानं दोन पायल्या जोंधळ्याच पीठ पाडलं होतं. १५-२० घरातल्या बायका पोरांना ईर्जिकीची खबर पोहोचली होती. धुर्पा घरातल्या आवरा-आवरीत गुंतली होती. धर्मा मात्र घरी जाउन बिनघोर झोपला होता. आपल शेत आता पिकणार याची खात्री पटल्याने तो निर्धास्त झाला होता.
शेवटी तो ईर्जिकीचा दिस उगवला. पैल कोंबडं आरावलं तवाच धुर्पा उठली व्हती. आंगुळ-पांगुळ ऊरकून अंगणात सडा घातला. चुल पेटवली अन च्या चं आदंन ठेवल. धर्मानं कुस बदलली तसा धुर्पानं आवाज दिला...

"आवं ~~ उटा कि आता ! का दिस उगवायचि वाट बगताया "

धर्मा उठला. चूळ भरून दोघंनी च्या घेतला.पोरस्नि उठिवलं. वैरण तोडून गुराम्होर गव्हानीत टाकली.
झुंजू-मुंजू झाल तसं एक-एक गडी बैलगाडीत नांगर, जूं , कासरा ईत्यादी आवजार घेउन जमाय लागला. वरच्या आळीचा बाप्या, खाल्या आळीचा धोडुदादा, माळावरला पोपट्या, पाटलाचा रम्या, सुताराचा किसन्या, सोनाराचा ईसन्या, माळ वाडितला भैरू, लव्हाराचा बाळ्या, गुरवाचा दत्या, हौसाक्काचा राम्या, शेलाराचा बाब्या......समदी जंनं आली. दिवस उजडे पातुर पंधरा-ईस गडी जय्यत तयारीनिशी गोळाझाली. धुर्पाची समद्यासनी च्या-पनी देता-देता धांदल उडाली व्हती. तरी बरं ! किसन्याची बायकु हिरा अन पोपट्याची शेवंता सकाळच्या पारी मदतीला आल्या व्हत्या.

च्या झाला.
तंबाकुची चंची समध्यांच्या हातातनं फिरून परत जागच्याजागी आली.
तळहातावरच्या पत्तीला चुना रगडून मस्त मळणी झाली.
तंबाकुचा बार भरून मान तिरकी करून पिचकारी मारीत सर्वीजन उठ्ली.
धोतराचे सोगे खोचले गेले. बैलांच्या मानंवर जूं कसली गेली. नांगरची पाती बांधून, दोन नांगरच्या मधी कासराभर अंतर ठेउन सर्वांनी आपापली पात धरली. कुनालाबी कायबी सांगा-सवरायची गरज पडली नाय. खरं पायल तर धर्मा या शिवाराचा मालक. पर आज त्यो कुनाच्या हिशोबातच नव्हता. जस काय समध्यास्नी अस वाटत व्हतं की हे शिवार आपल हाय, आन ते सांच्यापतुर नांगरून व्हयालाच पायजे.
समदि तयारी झाली.
दत्या गुरवानं बैलांच्या कपाळावर गुलाल टाकून नांगराच्या फाळावर नारळ वाढीवला.
धर्मा-धुर्पा नं काळ्या माईला हळद-कुकू वाहून जमीनीवर डोस्कं टेकिवल तसं बिर्‍या मांगाची थाप हाल्गीवर पड्ली.

हाल्गी कडाडली.
बैलं कान टवकारून फुस्कारायला लागली.
सर्वांनी एकच कल्लोळ केला.....
" भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! "

नांगराचा फाळ हाथभर जमिनीत घुसला अन काळीभोर ढेकळं बका - बका उदसून टाकाया लागला.
ईकडं बाया मानसं आपापल्या घरची धुनी-भांडी, केर-पोतारा उरकून लेकरा-बाळांना घिउन धुर्पाच्या वस्तीवर जमाया लागली. जिला जे दिसल ते काम कराया लागल्या. न सांगता न सवारता. समध्याजनी जनुकाय सवताच्याच घरात वावरत होत्या. हौसाक्काची एन्ट्री झाली अन वातावरण बदलून गेलं. हौसाक्का ही सर्व्याजनी मधे जेष्ट. तिचं जेष्टत्व सर्वमान्य. तिनं वस्तीवर पाय ठेवला अन सर्व सुत्र स्वताच्या हातात घेतली.

"ए धुर्पा, दुध तापवायला ठेवलस का ?"

" ए तुळसा, यका चुलीवर काय व्हनार हाय ! आजुन दोन चुली पेटवा ! आत्ता दुपार्च्या जेवायचा टाईम व्हईल ! बापै मानसास्नी भाकरी साठी ताटकळत ठिउ नांय कदी ".

" तुमी दोगी-तिगी कांय करताय गं हिरिवर ? एकीन पानी शेंदा आन दोगीजनी रांजनात आनुन वता."

" ए शेवंता , त्या पोराला पाजं आगुदर! कवापस्न रडतया"

" काय फुलाबाय, बसल्या का तुमी मिसरी लावत ? तुमचं मुरली-वादन उरका बिगिन आन चटनी घ्या वाटायला "

" ए पोरी , ते दुरडीतलं कांदं टाक चुलीत भाजायला"

हौसाक्काच्या भात्यातनं सटासट आर्डरी सुटाया लागल्या आन सगळ्या जणी त्या खुशीनं पेलायला लागल्या. तिची सासुगिरी सर्वजणींना हवी - हवीशी वाटायची. गावच्या कुठ्ल्याही बाईवर कसलंही संकट येउदे, हौसाक्का त्या संकटा समोर ढाली सारखी उभी राहायची. मग दोघीमधे एकतर नवीन नातं निर्माण व्हायच किंवा असलेल नातं अधिकच द्रुढ व्हायच.
आई मधल्या सासूचं आणी सासूमधल्या आईच नातं!. भारतीय आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम करणार नातं!.

" बकुळा दिसत न्हाय कुट ती ? परंत वांत्या व्हया लागल्या का काय म्हनावं ?"

हौसाक्काच्या या फेकीन चांगलीच खसखस पिकली.
खर पाहिल तर या सगळ्या जणी आपापल्या घरी जी नैमत्तीक कामं करतात तीच सगळी काम ईथं येउन करीत होत्या. पण ईथ एकत्रित काम करण्याचा आनंद वेगळा होता. हुरुप होता. नवीन घडामोडींची आणी घरोघरीच्या बातम्यांची देवाण - घेवाण चालू होती. एकमेकीच्या कानात कुजबुज चालु होती. चेष्टा-मस्करीला उत आला होता. दर दोन मिनिटाला खसखस पिकत होती. सर्वजणी बाजारात पैसे देउन सुद्धा विकत न मिळ्णार्‍या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेत भराभर कामं उरकत होत्या. पोरांची फौज धमाल करीत होती. भांडा-भांडी, रडा-रडी आणी शक्य होतील त्या सर्व उचापती चालू होत्या. जाता-येता कुणीतरी त्यांच्यावर डाफरून, मुलांचे कडून कसल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न धरता आपापल्या कामाला निघून जात होते. त्यामुळं सगळी फौज कानात वारं शिरलेल्या वासरा सारखी बेभान होउन आजच्या दिवसाचा पुरेपूर उपभोग घेत होती.
तीन दगडं मांडून तयार केलेल्या चार चुली धगधगायला लागल्या. फोडणीचा झटका नाकात शिरून ठसका-ठसकी झाली. दोन-तीन काटवटीत भाकरीचं पीठ मळायला सुरवात झाली. सर्व काही कंट्रोल मधे आहे याची खात्री करून घेत हौसाक्का पडवीत टेकली, तेवढ्यात धर्मा अंगणात आला..

" हौसाक्का, मी गांवात जाउन येतो जरा. सांच्या ईर्जीकिची यवस्था करुन येतो."

" आगदि बिनघोर जा ! हिकडच संम्ध बगते मी "

नाही तरी आता धर्मा-धुर्पा चा कुठ्लाच रोल शिवारात किंवा घरात राहिला नव्हता. सर्वांनी आपापली जबाबदारी पेलली होती.

धर्मा वस्तीवरनं निघाला तो थेट मन्या सावकाराच्या वाडयावर जाउन धडकला. मोठ्या रुबाबात सावकाराच्या पडवीत चोपाळ्या शेजारच्या खांबाला टेकून बसला. झोपाळा थांबला. दोघांनी एकही शब्द न उच्यारता एकमेकांना न्याहाळल अन सावकार गपचुप उठून माजघरात निघून गेला. धर्माच्या ईर्जीकीची बातमी सावकराच्या कानावर कालच आली होती. त्यामुळ धर्माच्या येण्याच प्रयोजन काय आहे हे कुणी सांगण्याची गरज नव्हती. शंभराच्या पांच नोटा हातात घेउन सावकार परत पडवीत प्रगट झाला. त्यातल्या चार नोटा धर्माच्या हातावर ठेवल्या. जागेवरुन तसुभरही न हालता धर्मानं सावकाराच्या डोळ्यात नजर भिडवली. शब्दाविना नेत्रांची भाषा झाली अन सावकारानं पाचवी नोट धर्माच्या हातात कोंबत वडिलकीच्या हक्कानं दम भरला...

" यवडयात समद भागवायचं ! उगाच पैका हातात आला म्हुन उडवीत बसायच नांय ! निट लक्षात ठेव !"

सावकाराचे शब्द कानात शिरे पर्यंत धर्माने वड्याचा उंबरा ओलांडला होता. रुबाब असा काय कि जणू तोच सावकाराला कर्ज देऊन गेला आहे.

असा हा कर्ज देण्याचा आणि कर्ज घेण्याचा " सो काँल्ड " व्यवहार दोनच मिनिटात व कमित कमी शब्दात पूर्ण झाला होता. कागद नाही, शाई नाही, लिखावट नाही, स्टँम्प पेपर नाही, सही नाही, अंगठा नाही कि साक्षीदार सुध्दा नाही. असा हा आगळा वेगळा व्यवहार फक्त या काळ्या आईच्या कुशीत वाढलेल्या निष्पाप जिवां मध्येच होऊ शकतो. माणिकचंद उर्फ मन्या सावकार हा या गांवचा पिढीजात सावकार. वाड-वडिलांची सावकारी मन्या ने पुढे रेटली होती. पण अशी ही सावकारी म्हणजे आक्रीतच म्हणायच. सावकारकीच्या व्यवसायाला बट्टा म्हणा हव तर !. मन्या सावकार म्हणजे या गावची सार्वजनिक बँक आणी शेती मालाची बाजारपेठ सुध्दां. गावात कुणाच्याही घरी, कसलही अडचण अथवा कार्य असूदे. अगदि बाळंत पणा पासून ते मयती पर्यंत, फायनान्सर म्हणून मन्या सावकार ठामपणे पाठीशी उभा असायचा. पिकांच्या कापणी नंतर खळ्यातली रास घरात यायची. कणगी सारऊन, काठोकाठ भरून शेणाने बंद केल्या जायच्या. अशा प्रकारे पुर्ण वर्षाची बेगमी झालेवर शिल्लक राहिलेल सर्व धान्य पोत्यात भरून गाडी सावकाराच्या वाड्यावर पोहोचायची. सावकाराच्या पडवीत धान्याच्या पोत्यांची थप्पी लागत राहायची. एकदिवस सावकारच्या दारात ट्रक उभा राहायचा. जमाझालेला सर्व शेतीमाल ट्रक मधे भरून सावकार "म्हमई" ला जायचा. चार दिसांनी उगवायचा ते नोटाच पुडकं घेउन. मग एकेकाला वाड्यावर बोलाउन घेऊन आख्या वर्षाचा सविस्तर हिशेब सांगायचा अयशस्वी प्रयत्न करायचा...

" हे बग भैरू, तुझी जवारी भरली धा किंट्ल, त्याचे एवढे पैसे झाले...

बाजरीचे एवढे, हळदीला काय या वर्षी चांगला भाव भेटला नाय, त्याचे एवढे ...
सर्व मिळून एवढे झाले..एवढे

ट्रक वाल्याला एवढे दिले, त्यात तुझा हिस्सा एवढा....

पोरीच्या लगनाला तू एवढे घेतले होतेस...

दिवाळ सणाला तुझ्या बायकुनं एवढे नेले...

बँकेच्या भावा परमान माझ्या याज एवढ झालं ....
आणी हे आता एवढे शिल्लक रहिले ... हे घे "
सावकराचा हिशेब कसा चोख असायचा. त्यासाठी कसाल्याही कागद पत्राची गरज नसायची. सावकार हिशेब सांगत रहायचा अन समोरचा माणूस सावकाराची बडबड या कानाने घेऊन त्या कानाने सोडत राहायचा. सावकाराचे शेवटचे दोन शब्द " हे घे " कानात शिरले कि पट्कन हाथ पुढे व्हायचे. सावकाराने हातात ठेवलेल्या नोटा कोपरीच्या खिशात कोंबत तो माणूस चालता व्हायचा अन दुसरा टपकायचा. हे रूटीन आठवडाभर चालू राहायच.

तर असा हा मणिकचंद सावकार फक्त " गांवची बँक आणी शेत मालाची बाजार पेठ " या पुरताच मर्यादित नव्हता, तर अजून एक जबाबदारी त्याने स्वत:च अंगावर ओढून घेतली होती. वडिलकीच्या नात्याने गांवकर्‍यांच्या भविष्याची चिंता करण्याची जबाबदारी. कसं ते या किस्या वरूनच कळेल ...

त्याच काय झालं, मागल्या वर्सी चैतीची पुनव झाल्यावर कुदळवाडीचं पावनं भैरूच्या थोरल्या लेकीला बगायला आलं. पोरगी देखणी. चार-चौघीत उठून दिसायची. नाकी-डोळी सरस. चांगल्या संस्कारात वाढलेली. नांवं ठेवाया काय पर जागा नव्हती. कुदळवाडीकरांनी लगुलग पसंती सांगुन टाकली. कुदळवाडीकराच घरान बी मात्तबर. दोन्ही बाजूनी होकार भरला. झालं . लग्नाची बैठक बसली. दोन्ही गांवची वयस्कर मानसं पानाला चुना लावत अन सुपारी कातरत समोरासमोर बसून एकमेकाला तोलत होती. भैरू अगुदरच फाटक्या खिशाचा. त्यात समोरची पार्टी मात्तबर. कुदळवाडीत तेंचा मोठ्ठा बारदानां. ही सोयरिक आपल्याला काय झेपणार नाय म्हनून भैरून आगुदरच कच खाल्ली व्हती. पर पोरगी खात्या-पित्या घरात पडनार म्हनून गांवकर्‍यांनी अन भैरूच्या बाकुनं त्याला भरीस घातलं. बैठकीत एकेक ईषय यायला लागला तस भैरूच्या छातीत धडधडाया लागलं. भैरू तोंड उघडाया लागला कि किस्ना मास्तर त्याला डोळ्यांनी दटाउन " गप गुमान र्‍हा " म्हनून सांगत होता. एकेक मुद्दा फुड सरकत होता.......

लग्नाचा मांडव पोरीच्या दारात पडनार ............... ....................ठरलं !
उमदा घोडा, ताशा-पिपानीचा ताफा ..........................................ठरलं !
नवरा-नवरीची कापडं, शालु , हळदीच लुगड्म ........ ..............ठरलं !
आई कडल डोरलं, आजी कडून नथ, सासू कडून गंठण ...........ठरलं !
मामाच कन्यादान, आत्याच पैजण.........................................ठरलं !
वरमायांचा मान, आजचीर , रुकवतावरची साडी .....................ठरलं !
वरबापाचा पोशाख, मामाला फेटा .........................................ठरलं !
मावळणीची घागर, तिचा मानपान ......................................ठरलं !
करवलीचा मान , कानपिळ्याचा पोशाख .............................ठरलं !
बारा बलुतं दारांचा मान .................................................ठरलं !
हे...............................ठरलं ! ते...................................ठरलं !

सर्वांचा मानपान, परंपरागत रीती-रिवाज सांभाळत आणी चार कलाक घोळ घालत चाललेली ती बैठक एकदाची भैरवीच्या सुरावर येउन ठेपली. शेवटी किस्ना मास्तरानी मधुमध भला मोठा दगड ठेउन तेच्यावर सुपारी ठिवली. हुबं र्‍हाउन खडया आवाजांत सगळ्या ठरावांची पुन्यांदा उजळणी केली अन समस्त उपस्थितांना शेवटचा सवाल केला......

" तर काय मंडळी , फोडायची का सुपारी ?"

लोकं कबुली देण्यासाठी तोंड उघडणार तेवढयात कशीकाय ती माशी शिंकली आन उजव्या कोपर्‍यातल्या बायामानसांच्या कंपूतनं पैल्यांदाच खणखणीत आवाज उठला..............

" आमच्या घरच्या लक्षीमीला कायं लंकेची पारवती म्हून पाठिवतसा का काय म्हनावं ! आमच्या खानदानात धां सुना नांत्यात या घडीला ! पर कंच्याच कार्यात आस नाय घडल कधी ! निदान पाच-सा तोळ्याचा यकादा डाग नकोव्हय घालाया ? जनाची नाय निदान मनाची तरी.... ?"

झालं ! वरमायनं अगदि शेवटच्या क्षणी ठिणगी टाकून पोरीच्या आई-बापाच्या वर्मावर घाव घातला होता. बायामानसांच्या कंपूत त्या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागला नाही. नवर्‍या कडल्या बायांच्या अंगात झाशीची राणी तर नवरी कडल्या बायांच्या अंगात कडकलक्ष्मी संचारली होती. उणी-दुणी काढून झाली, घालून-पाडून बोलणी झाली आता फकस्त एकमेकीच्या झिंज्या उपटायच्या बाकी होत. चांगला कलाकभर तमाशा झालेवर शेवटी हौसाक्काच्या मध्यस्तीन रणांगण शांत झाल अन वरमाय "तीन तोळ्यावर " तयार झाली. पण भैरू काय व्हय भरायला तयार व्हयना आन सुपारी काय फुटनां. शेवटाला कुदळवाडीचं पाटिल फेटा सावरत बोलायला उभं र्‍हायल तसी सगळी जण एकदम चिडीचुप झाली.....

"हे बगा मंडळी, यवडा खंल घालुन पर तोडगा निघत नाय मजी ह्या सोयरीकीचा काय योग दिसत नाय ! तवा आमी म्हनतो कि आता उठावं. तिनिसांजच्या आत आमास्नीबी वाडीवर पोचाया पायजे. तवा आता आमास्नी निरोप ध्या. "

वरपक्षाची ही निर्वाणीची भाषा ऐकून ईतका येळ एका कोपर्‍यात गप-गुमान बसलेला मन्या सावकार खाड्कन ऊभा राहून खड्या आवाजात फुट्ला ........

" पाटी~~ल ! ही बैठक सुपारी फुटल्या बिगर उठनार नाय!. गांवच्या ईभ्रतीचा सवाल हाय ! चला, घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! हा गावच्या सावकाराचा सबूत हायं. आता फोडा सुपारी. तुमास्नी सोयरिकीची पुरणपोळी खाउ घातल्या बिगर हे गाव सोडू देनार नायं . "

कुदळवाडीच्या पाटलांनी परिस्थितीचं गांभिर्य लगोलग ओळखून सावकारा फुड हात जोडले....
" हे बगा सावकार, उगीच गैरसमज करून घेउ नकासा ! आमास्नी कुनाच्या ईभ्रतीला हात घालायचा नाय का कुणावर राग पन न्हाय ! पोरीच्या बापाला हां भरायला लावा, ही आत्ता सुपारी फुटंल!"

मन्या सावकार तावातावान उठला अन भैरूला बकुटीला धरून मागच्या दाराला घेउन गेला. मागुमाग किस्ना मास्तर पण गेला.
"भैरू ! माज ऐक लेकां . पोरीच ठरत आलेल लगीन मोडू नगं ! खात्या-पित्या घरी पोरगी सुखात राहील बग ! आता माग हटू नगं "
" पर सावकार, हे समध नाय झेपायच माझ्याचानी ! जमिनीचा तुकडा ईकावा लागंल न्हायतर डोक्यावर कर्जाचा डोंगर उचलावा लागंल ! मग बायकापोरांच्या पोटांत काय काट
घालू ? दोन-चार वर्षात धाकली पर ईल लग्नाला ! कस काय जमनार सार?"
भैरू डोळ्यात पाणी आणून पोटतिडकीन बोलत होता.
" तसं कायपंर व्हनार नाय ! मी काय सांगतो ते नीट ऎकून घे ! तुझ्या हातात पैका टिकत नाय हे मी पैल्या पासन वळकुन व्हतो. तुझ्या हातात नोटा पडल्या कि पार्‍या वाणी निस्टुन जात्यात. म्हनुन तुझ्य़ा धाकल्या पोरीच्या जलमा पासून आज पर्यंत तुझ्या उत्पन्नातला तिसरा हिस्सा मी परस्पर किस्ना मास्तराकडम जमा केलाय. मास्तरानी तालुक्याच्या पोस्टातनं तुझ्या नावावर सर्टिफिकिटं घेउन ठेवल्यात. तवा आता पैशाची कायपर फिकिर नाय. ईचार वाटलस तर मास्तरला ! "
भैरू भांबावल्या सारखा किस्ना मास्तराकडं बगाया लागला.....
"खरं हाय सावकार म्हंत्यात ते ! आजच्या घडीला तुझा पैका चांगला दान-दुप्पट झालाय. आर मर्दा, तीन तोळ काय घेउन बसलास, कुदळवाडीकरांनी पाच तोळ मागितल तरी तू देऊ शकतोस१. चल ! ताट माननं हो भर आन दे बार उडउन !"
दोघांच्या बोलण्यान भैरूचा ऊर भरून आला. पागुटयाच्या टोकानं डोळं टिपुन भैरू पडवीत दाखल झाला ते धा हत्तीच बळ घेउनच. सगळीकड चिडिचुप झालं. भैरू काय निर्णय घेनार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मिशीवरन हात फिरवीत भैरूनं ताट मानेन सगळीकड नजर फिरवली. शेवटी विहिणबाई बसलेल्या कंपूवर नजर स्थीर करून गर्जना केली ...............

"घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! आनि वर जावयाला अंगठी पन घालतो ! फोडा सुपरी"
किस्ना मस्तरानी क्षणाचाही विलंब न करता, बैठकीला अजून पाय फुटण्या आगुदर हातातल्या दगडाचा सुपारीवर घाव घातलुन पार भुगा करून टाकला. गुरवाचा दत्या शिंगाला तोंड लाउन तयारच होता. शिंगाची थुई-थुई गावच्या वेशी पर्यंत जाउन घुमली अन समद गांव समजून चुकलं ! भैरूच्या पोरीची सुपारी फुटली ! सोयरिक जुळली!
एका मिनिटात सार वातावरण बदलून गेल. पानसुपारीची ताटं फिरायला लागली. हळदी-कुकवाचं करंड मिरवाया लागल.. काही वेळेपुर्वीच्या रणांगणाचा मागमूस सुध्दा राहिला नव्हता. वरमाय तोंडाला फेस येविस्तोवर व्हनार्‍या सुनेचं कवतुक कराया लागली. भैरूची बायकु जावायाच आप्रुक गायाला लागली. सयपाक घरात पुरणा-वरणाच्या सैपाकाची तयारी सुरु झाली. पडवीत पाचव्यांदा च्या चा कप जिरवीत तंबाकुच्या चंच्या उघडून शेतीवाडीच्या गप्पा रंगात आल्या. हळू हळू एकएक गावकरी कुदळवाडीकरांना रामराम करून काढता पाय घ्यायला लागला. शेवटी मन्या सावकार निरोप घेउन निघाला तस भैरूनं सावकाराला मिठी मारली .........

" सावकार ! आज तुमी देवासारकं धाऊन आलासा म्हुन मी वाचलो बगा ! न्हायतर गावात छी-तू झाली आसती !"
" आसं नगं म्हनूस मर्दा ! तुझी पोरं आन माझी पोरं काय यगळी हायती व्हय ! आनी म्या तरी आशी काय मर्दानकी गाजावलिया ? तुझा खिसा फाटका म्हनून तुझ्याच घामाचा पैका, तुझ्याच खिशातनं काढून मास्तराच्या भक्कम खिशात ठिवला."

तर मंडळी, असा हा आमचा मन्या सावकार. कागाद पत्रावर विश्वास नसलेला. फक्त माणसातील माणुसकी तारण म्हणून स्वीकारणारा. गांवचा अभिमानी. लोकांच्या भविष्याची चिंता करणारा. वसुली साठी कुणाच्याही दारात न फिरकणारा मात्र अडीअडचणीला हमकास टपकणारा. सावकारकीचा कुठलाही गुणधर्म नसलेला तरी सुध्दा यशस्वीपणे सावकारी करणारा. थोडक्यात काय तर सावकारकीच्या व्यवसायाला काळीमा फासलेला असा हा मन्या सावकार. त्याच्या या सरळ पणाचा गैरफायदा घेण्याचे धाडस कुणी केल नव्हतं.
तरी सुध्दा गांव तिथ हगीणदारी ही आलीच. बेन्या लव्हार हा त्याच घाणीतला किडा . बायकुच्या आजारपणाला म्हनून सावकारा कडनं सा महिन्याच्या बोलीवर कर्ज घेउन गेला आन दारू पीत बसला. बिचारी बायकु मरून गेली तरी याचा रोजचा खांबा चालूचं. धा महिनं उलटून गेल तरीबी सावकाराच्या वाड्यावर फिरकला नायं. बरं वसुलि तरी कशी करावी? उभ पीक शिरगांवच्या मारवाड्याला ईकून मोकळा झाला. वाट बगून बगून शेवटी सावकारानं तेच्या दारावर जाउन तगादा लावला. सुरवातीला टोलवा टोलवी करणारा बन्या शेवटी शेवटी सावकारावर डाफराया लागला. कायद्याची भाषा कराया लागला. काय पुरावा हाये तुझ्याकड मी पैस घेतल्याचा, आस उलटून ईचारायला लागला. सावकारान वळकुन घेतलं कि आपल पैस डुबलं. हळहळला बिचारा. रातभर झोपला नाय. सकाळी उठला तो डोक्यात सनक घेउनच. तडक कुंभार वाड्यावर जाउन एक मडकं घेतलं. तिरक्या न्हाव्याला त्याच्या धोपटी सकट फरपटत बन्याच्या घरासमोर घेउन गेला. दारात बसकन मारीत तिरक्याला हुकुम सोडला .......
"कर माज मुंडन ! मिशा सकट भादरून टाक मला "
सावकाराचं लालबुंद डोळं बगुन तिरक्याचं काय पन ईचारायचं धाडस झाल नांय. त्यानी गुमान भादरायला सुरवात केली. बातमी वणव्या सारखी गांवभर पसरली. अर्धा गाव जमा झाला अन बन्याच्या घरा भोवती कोंडाळं करून हुबा र्‍हायला. पर कुनाची हिंमत झाली नाय सावकाराशी बोलायची .पयल्यांदाच आस आक्रीत घडत होतं. बन्या मात्र दारात बसून दात ईचकत फिदीफिदी हासत सावकाराकड बगत व्हता. भादरून झाल्यावर सावकारान मडक्यात पाणी भरून खांद्यावर घेतल. बन्याच्या घराला उलट्या तीन फेर्‍या मारून मडकं सोडून दिलं. मडकं फुटल्याचा आवाज झाला अन सावकारान बन्याच्या नावान जोरजोरात बोंब ठोकली. कुणाशीही एकही शब्द न बोलता परत फिरला. जाता जाता बन्याला बजाऊन गेला ....
" बन्या ~~ भडवीच्या माझ पैसं डुबवलंस....... दारूत घातलंस ...... स्वताच्या बायकुला खाल्लंस .........तुझ्या नावानं मडक फोडल मी आज ! कुतर्‍याच्या मौतीनं मरशील बग !"
सावकार तडक घरी गेला. वड्याचा दरवाजा बंद करून आडसर टाकला तो दुसर्‍या दिवसा पर्यंत उघडला नाही.
सावकारानं दिलेला शाप खरा ठरला. सावकार शांत झाला. त्याने स्वत: पुरता "बन्या" अध्याय कायामचा बंद केला. पण गावानं बंद केला नाही. दुसर्‍याच दिवसा पासून गावच्या पोराठोरा पासून ते म्हातार्‍या कोतार्‍या पर्यंत सर्वांनी उत्फूर्त पणे, सामुहिक रित्या, बन्या विरुध्द "असहकाराचे" अघोषित युध्द पुकारले. गांधी बाबांनी सर्व सामान्यांना दिलेले यशस्वी हत्यार........ "अहिंसा आणी असहकार".
बन्याचा दानापानी बंद झाला. त्याला कुणी दारात उभं करेना. विहिरीवर कुणी पाणी भरू देईना. वाणी सामान देईना. चांभार चप्पल शिऊन देईना. शिंपी कपडे शिउन देईना. शेतीच्या कामाला मजूर मिळेना. बन्या अगदी एकटा पडला. जिथ जाईल तिथ हाडतुस व्हायला लागली. सावकाराच्या वाड्यावर जाउन नाकदुर्‍या काढल्या, गावकर्‍याचा हातापाया पडला. पण काहीसुध्दा उपयोग झाला नाही. सर्वजण आपाल्या भूमिकेवर ठाम होते. ज्या वटवृक्षाच्या छायेत सारा गाव नांदतो आहे त्या वटवृक्षाला लागलेले बांडगूळ कायमचं छाटून टाकणे आवश्यक होते. शेवटी बन्या वैतागला अन एक दिवस गांव सोडून ??????? ला पाय लाऊन पळून गेला. गांधी बाबाच हत्यारंच तस होत. आहो, एवढया मोठ्या ईंग्रजाला पळता भुई थोडी झाली तर मग हा बन्या किस झाड की पत्ती !

बोंबलां ! धर्माची ईर्जीक र्‍हायली बाजुला अन आपंन कुटल्या कुट भरकटत गेलो ? भैरूच्या पोरीची सुपारी फोडून बन्याच तेराव पन घालून आलो ! ह्या सगळ्या घोळात धर्माची ईर्जीक पडली कि बाजूला !

तर धर्मा ईर्जीकी साठी सावकाराकडून पाच नोटा घेउन भाईर पडला खरा, पर सावकाराच्या मनाला यका गोष्टीची चुट्पुट लागून र्‍हायली. आता ईर्जीक म्हनल्यावर रातच्याला वस्तीवर बकरं पडनार. सगळ मैतर मिळून मटनाचा रस्सा कोपरापोतर धार जाईस्तोर वरपनार. मग तेच्या जोडीला म्हनून धर्मान फुगा घेउन जाउनाय मजी मिळवली.

आता तुमी म्हनाल फुगा मजी काय?. त्याच आस हाय कि फुगा, खंबा, चपटी ही समदी एका द्रवरूप पदार्थाची माप आहेत. गावच्या जत्रला ह्या मापांचा लंय सुळसुळाट आसतो. एरवी कधीतरी कुनाकड खंडुबाचा जागर आसंल न्हायतर गावात तमाशाचा फड उतरला तरच ही मापं कानावर पडत्यात. म्हंजी आस कि, एकटा-दुकटा आसल तर चपटीत भागतं, जोडीला एक-दोन मैतर आसलं तर खांबा लागतो अन टोळक आसल तर फुग्या शिवाय भागत नाय.

पर धर्मानं हौसाक्काच्या भितीनं फुगा-बिगा काय घेतला नाय. सावकाराच्या वाड्यावरन निगाला तो सरळ धनगर वाड्यावर गेला.केरबा धनगर जाळीत मेंढरं कोंडून लोकर भादरत होता. धर्माला आलेला बगुन केरबान लहान-मोठी चार बकरी कळपातन बाजूला केली. धर्मानं बकर्‍यांच्या मागल्या खुब्यात हात घालून उचलून वजनाचा अंदाज घेतला. त्यातलं एक बकरू निवडून केरबाला ईचारलं.........

" ह्याच काय घेनार बोल "
केरबान उजव्या हाताची पाच अन डाव्या हाताची दोन बोट दाखवीत व्यवहाराच्या घासा-घासीचा श्रीगणेशा केला.
" काय बोलतो मर्दा, ह्याच सातशे ? तुझी बकरी काय सोनं हागायला लागली का काय म्हनावं. नीट ह्यवारानी बोल कि जरा "
तासभर घासाघीस करून धर्मान चार नोटा केरबाच्या हातात ठेवल्या आणि निवडलेल बकर पाट्कुळी मारून रस्ता धरला. हौसाक्कान सांगीतलेल्या चार गोष्टी वाण्याच्या दुकानातून घेतल्या. मशिदीला वळसा घालून टेकाडावरनं उतरत आब्बास भाईला आवाज दिला ....
" ओ ~~ आब्बास भाई, हायसाकां घरात ?""
दारावरचा जुन्या ओढणीचा पडदा बाजूला करीत आब्बास भाईने बाहेर डोकावल ...
" कौन ? धर्मा क्या ?हमको रातकोच मालुमपड्या ईर्जिक है करके ! दुपेरको आताय काटनेको ! "
" थोडा लवकरंच आव ! शिजनेको टाईम लगता है " ... धर्मान जवळ होत तेवढ हिंदी फांडत वस्तीचा रस्ता धरला.
धर्मा वस्तीवर पोहोचे पर्यंत दिस डोक्यावर आला होता. निम्म शिवार नांगरून झाल होतं. लोकांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी केली होती. बैल झाडाखाली वैरण चघळीत, अंगावर धन्याची थाप पडायची वाट बघत होती. गडी मानसं भाकरी खाऊन बांधावर सावलीला तंबाखू मळीत बसली होती. धर्मान खांद्या वरच बकर खाली उतरऊन झाडाला बांधल. हातातल सामान हौसाक्काला देउन वसरीला टेकला. पोरांनी बकर्‍या भोवती कोंडाळ करून नावीन उचापती सुरू केल्या. धुर्पानं पायरीवर आनून ठेवलेला पण्याचा तांब्या नरड्यात रिता करीन धर्मा उठला. हिरीवर जाउन पानी शेंदल अन सर्व्या बैलास्नी बादली-बादली पानी दावलं. एकएक गडी उठून आपापल्या शेजंनं कामाला लागला. तेवढ्यात शेलाराच्या सुगंधानं धर्माला वसरीच्या उंबर्‍यावरन आवाज दिला .........
" ओ~~ भावजी ! जिउन घ्या कि आगुदर ! धुर्पाक्का ताटकाळ्यात कवाधरनं ! सकाळपासन पोटात काय बि नाय बगा !"
" आत्तां ! च्यामारी, मी काय तिला उपाशी र्‍हायला सांगितल हुत व्हयं ! जेवायचं व्हत सगळ्या संगट ! "
" तस नव्ह भावजी ! तुमी जेवल्या बिगर घास उतरल व्हय धुर्पाक्काच्या गळ्या खाली ! आता भरवा पैला घास तुमीच !"
सुगंधाच्या बोलण्याने सगळ्याजणी तोंडाला पदर लाउन फिदि-फिदि हसायला लागल्या. धुर्पा बिचरी पार लाजून चुर्र झाली. तिन पडवीत घोंगडी टाकली. ताट वाढलं. पाण्याचा तांब्या ठिवला अन आजून काय चेष्टा-मस्करी व्हायच्या आत घरात निघून गेली. धर्मा गुमान जेवायला बसला. हात धुवस्तोवर आब्बास भाई आपली हत्यार पाजळत हजर झाला. त्यानं पोरांच्या कोंडाळ्यातन बकर्‍याची सुट्का केली अन लांब खिवराच्या झाडाखाली घेउन गेला. पोत्यातन सुरी काढली. बकर्‍याला आडव पाडून जबरदस्तीन तोंडात पाणी ओतून खटका उडवला. झाडाच्या फांदीला उलटं लटकऊन भराभर कातडी सोलून काढली. पोटात सुरी खुपसून साफ-सफाई झाली. बाभळीचा ओंडका उभा करून त्यावर खटाखट सत्तूर चा आवाज व्हायला लागला. धर्मानं आणून ठेवलेल्या भल्या मोठ्या भगुल्यात मटनाचं तुकडं पडायला लागलं. आब्बासभाईन तासाभरात आपल काम चोख बाजावलं. मुंडी आणी कातडी पोत्यात कोंबून आब्बासभाई चालता झाला.
होय ! मुंडी-कातडी हीच आब्बासभाईची मजुरी. गांवची पध्द्तच होती तशी. बरेचसे व्यवहार हे चलना शिवाय व्हायचे.
दिवस मावळतीला झुकला होता. चार चुली परत पेटल्या होत्या. तव्यावर भाकरी पडत होत्या. भल्या मोठया तप्याल्यात मटान रटरटत होतं. फोडणीचा खमंग वास नाकात घुसून पोरांच्या पोटात कावळं कोकलायला लागल होत. बाया मानसांची लगबग वाढली होती. तिकड नांगरटीनं शिवाराच शेवटचं टोक गाठलं होतं. बैलं घायकुतीला आली होती. आता थोड्याच टायमात सुट्टी व्हनार हे त्या मुक्या जनावरांनी वळीकल होत. जसा जसा नांगरटीचा शेवट जवळ येत होता तसा बिर्‍या चेव आल्या सारखा हालगी बडवीत बैलांना प्रोत्साहित करीत होता. शेवटी हाथभर दिवस असतानाच हालगी थांबली. आख्खं शिवार दिवस मावळायच्या आत उदसून टाकलं होत. सर्वांच्या चेहेर्‍यावर आनंद पसरला होता.

प्रोजेक्ट "ईर्जीक " यशस्वी झाला होता.
नो प्रोजेक्ट मँनेजर , नो प्रोजेक्ट टीम .....
नो कन्सलटन्सी , नो फिजिबिलिटी स्टडी ...
नो लीगल अडव्हायसर , नो ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ...
नो वर्कर्स , नो वेजेस ...........
नो मिटींग्ज , नो बिझनेस लंच ....
नो गाडी , नो घोडा .........
नो इन्फ़्रास्ट्रकचर , नो नेटवर्क ....
नो फायनान्सीअल रिसोर्स , नो करन्सी एक्स्चेंज ....
नो शेड्युलिंग , नो डी.आर. पी. ......
ओन्ली काँमन टारगेट अँड विल टू अचीव्ह ईट .... व्हाट वंडर ..........
" प्रोजेक्ट वाँज अ ग्रेट सक्सेस "

बैलांच्या माना जुआतून सुट्ल्या. सगळे बापें आवरा आवर करून हिरीवर हातपाय धुया गेल. धर्मान पेंडीच्या पोत्याचं तोंड खोलून घमेलं-घमेलं पेंड सरव्या बैलाफुड सरकवली. तेवढ्यात धुर्पा भाकरीची चवड हातावर घेऊन आली. स्वताच्या हातानी एक-एक भाकरी बैलास्नी भरवीत प्रेमानी त्यांच्या अंगावरन हात फिरिवला. ईर्जिकीच्या पैल्या पंगतीचा मान बैलास्नी मिळाला होता. ती बैलं कुणाच्या मालकीची आहेत हा प्रश्न गौण होता. मुक्या जनावरांना सुध्दा माणसा बरोबरीन वागणूक मिळाली होती. त्या साठी धर्मा-धुर्पाला "ह्युमन रिसोर्स, डेव्हलप्मेंट अँड मोटिव्हेशन " सारख्या "ट्रेनिंग प्रोग्राम " ला जायची गरज भासली नव्हती. जी माणसं मुक्या जनावरांच्या "काँन्ट्रीब्युशन" च एवढ्या उत्त्म प्रकारे "अँप्रिसिएशन" करू शकतात, त्यांना "ह्युमन मोटिव्हेशन" च कांय ट्रेनिंग देणार ?

बापय मानस बांधावर बसून सकाळ पासनं वावरात घडलेल्या लहान-सहान घटनांची उजळणी करीत, एक-मेकांची टिंगल-टवाळी करण्यात रमली होती. आज आपण एक "प्रोजेक्ट " यशस्वी पणे पूर्ण करून धर्माला चिंता मुक्त केलं आहे, याची कुणालाही जाणीव नव्हती. त्यांच्या साठी हा फक्त गाव-गाड्याच्या अन गावकीच्या रिती-रिवाजांचा एक भाग होता. दिवस मावळला होता. कडुसं पडल होत. धर्मानं वाण्याकडून उसनवारीवर आणलेली गँसबत्ती पेटउन वसरीवर आड्याला टांगली. धुर्पानं घोंगड्याच्या घड्या पसरून पंगतीची तयारी केली. पितळ्या, वटकावनं , तांबे मांडले गेले. बाया मानसांची लगबग शिगेला पोहोचली होती. चुली धगधगत होत्या. भाकरीच्या चवडी उंचावत होत्या. मटणाचा रस्सा रटरटत होता. हौसाक्काची नजर चौफेर भिरभिरत होती. सगळी तयारी झाली तसा धर्मान बांधाचा दिशेनं आवाज दिला .........
" चलाउठारं ~ माझ्या मर्दानू ~~, बसा पंगतीला "
पंगत बसली. गरमगरम मटनाचं कोरड्यास अन घरच्या जोंधळ्याची पांढरी-फेक भाकरी. पुन्यांदा एकदा " भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! " करून सर्वेजण तुटून पडले. तस बगितल तर, मटाण-भाकरीच जेवान सगळीजन कधी-मधी जेवत्यातच की !. पर आजच्या जेवनाची चव काय यगळीच व्हती. हौसाक्काची मँनेजमेंट तशी कधीच फेल जात नाय. पार कोपरा पर्यंत वगळ येईस्तवर रस्सा भुरकत होते. सोबत तोंडी लावायला चवदार गप्पा अन एक-मेकांची चेष्टा-मस्करी. खाणारांच्या तोडीला-तोड वाढणार्‍या होत्या. पैल्याभाकरीचा शेवटचा घास तोंडात घालेपर्यंत दुसरी भाकरी ताटात पडत होती. लगुलग गरम-गरम रस्याची वाटकं पितळीत पालत होत होतं. हौसाक्का सगळ्या पंगतीवर नजर ठिऊन होती. पंगत चांगलीच रंगली होती. तीन-तिगाड जाती एक-मेकाच्या मांडीला मांडी लाऊन जेवत होती. आपल्या मांडीला चिकटलेली मांडी कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे याचं कुणालाच सोईर-सुतक नव्हतं. आणि ही प्रवॄत्ती "डेव्हलप " करण्या साठी कुणी "सर्व धर्म समभाव " या विषयावराचं रटाळ व्याख्यान पन "अटेंड" केल नव्हतं. या पंगतीच अजून एक वैशिष्ठ म्हणजे, सोनाराचा ईसन्या अन गुरवाचा दत्या हे दोघे " जानवं धारी " शुध्द शाकाहारी सुध्दा ह्याच पंगतीला बसून, त्यांच्या साठी आवरजून केलेल्या वेगळ्या गोडाच्या जेवणाचा आस्वाद घेत होते. शेजारचा दाताखाली हड्डी फोडतोय म्हणून त्यांचा धर्म भ्रष्ट झाला नव्हता. धुर्पा पंगतीत फिरून आग्रह करीत होती ....

" ओ ~म्हादाभावजी ! यवड्यात झालव्हय ! घ्या कि एक भाकरी ! एकदम गरम हाये बगा !" ------ धुर्पा.
" नका आग्रिव करू वैनी ! प्वाट भरल आता " -------म्हादा.
" आरं घे कि मर्दा ! तुझ्या कारभारणीनच केलिया ती भाकरी ! " -----------सुताराच्या किसन्यान फिरकी घेतली.
" आत्तागं बया ! किसन्या, मुडद्या, तुलारं कसं रं ठाव ? भाकरीवर काय करनारनिचं नांव कोरलय व्हय ?" ----- हौसाक्का.
" आता एकदम गरम हाये म्हंजी त्याच्या बायकुनंच केली असनार कि ! " --------- किसन्या.

किसन्याच्या फिरकीनं चांगलाच हाशा पिकला. पंगतीत पन अन सयपाक घरात पन. यवडा हाशा पिकायला पन तसंच कारण व्हतं. म्हादाच्या बायकुनं "गरम डोक्याची " म्हनून आख्या गावात नाव कमावल होत. किसन्याचा "डायलाँग" ऐकून पुरती शरमून गेली बिचारी. तसा नाकावर राग पन आला, पर यवडया सार्‍या बापयं मानसा समोर तोंड उघडायच धाडस केल न्हाय पोरीनं. शिवाय वर हौसाक्काचा धांक. गप र्‍हायली बिचारी. या अचानक झालेल्या हल्यान कावरा बावरा झालेला म्हादा, मदतीच्या अपेक्षेनी हौसाक्काकडे बघू लागला. त्या संधीचा फायदा उठवीत धुर्पानं म्हादाच्या ताटात भाकरी वाढून मटनाची वाटी पालथी केली. म्हादा गुमान खाली मान घालून नवी भाकरी कुस्करायला लागला. मस्करीला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घेत हौसाक्कान फर्मान सोडलं ....
"बास झाली मस्करी ! गुमान जिऊन घ्या पोटभर ! पोरी ताटकळल्यात कवाच्या "
जेवणं उरकली. पंगत उठली. सिताफळीच्या झाडाखली हात धुउन, ढेकरांच्या लांबलचक डरकाळ्या फोडत मंडळी अंगणात टाकलेल्या सुतडयावर विसावली. मधे पानाचा डबा अन तंबाकूची चंची. पानाला चुना फासला गेला. सुपारीचं कात्रण अन तंबाकुची मळणी सुरु झाली. सुचेल त्या विषयांवर लांबलचक गप्पा सुरु झाल्या. शेतीवडी झाली. पावसाचे अंदाज वर्तवले गेले. राज कारण झाल. गांवकारण झाल. धर्माच्या अंगणातलं, चंद्राच्या चांदण्यातल खुल व्यासपीठ चांगलच रंगल होतं.
तोपर्यंत ईकडे बायकांनी जेवणं उरकून आवरा-आवर केली. सगळी झाका-पाक झाल्यावर एक-एक बाई धुर्पाचा निरोप घ्यायला लागली. पोराला कडेला मारून, पडवीच्या पायर्‍या उतरत आपल्या धन्याला हाक देत होती.....
" आवं ..! उटा कि आता ! किती रात झालिया बगा कि ! "
हळू हळू सगळ घर खाली झालं. शेवटी हौसाक्काला तिच्या घरापर्यंत पोहोचऊन धर्मा वस्तीवर परत आला. घराच्या पायरीवर एकटाच बसून चांदण्याच्या प्रकाशात नांगरट झालेल्या आपल्या शिवराकड एकटक पाहात राहिला. काल पर्यंत अशक्य वाटणरी गोष्ट आज सहजा सहजी शक्य झाली होती. वीस बिगा जामीन एका दिवसात नांगरून झाली होती. आता पाऊस गरजनार होता. उदसून वर आलेली ढेकळ न्हाऊन निघणार होती. काळ्याशार मऊ मतीत बीजं रुजणार होतं. नाजूक कोंब फुटणार होते. हिरवगार पीक वार्‍यावर डोलणार होतं. काल पर्यंत धर्माच्या डोक्यावर असलेल ओझं उतरलं होतं.
धर्माला बराच वेळ अस बसलेल पाहून धुर्पा त्याच्या जवळ आली. मायेन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हनाली ....
"आव~~धनी ! कितीयळ बसनार आस काळ्या आईकडं बगत ? मिटली आपली काळजी एकदाची. चला, झोपा आता निवांत ! "
धर्मा उठला. धुर्पान अंथरलेल्या घोंगड्यावर आडवा होऊन, आपल्या चद्रमौळी घरातलं चांदण पांघरून निवांत झोपला.
ईर्जीक संपली होती. नेहमी प्रमाणे यशस्वी झाली होती. पण अध्याप "ईर्जीक " चा खरा अर्थ उमगला नव्हता.
एवढच माहीत होत, कि काल राती पासून आत्ता पर्य़ंत जे जे घडल त्याला ईर्जीक म्हणतात.


आता तुम्हीच सांगा मंडळी, ईर्जीक चा खरा अर्थ!
ईर्जीक चा अर्थ केवळ "जेवणा वळी " पुरता मर्यादित आहे ?
ईर्जीक चा अर्थ शब्दात व्यक्त करता येईल ?
ईर्जीकीत सामील झालेल्या पात्रांची मनं, भावना, संस्कार, संस्क्रुती.... ईत्यादी, ईत्यादी शब्दांकित करता येईल?
अशी ही ईर्जिक काळाच्या ओघात लोप पावते आहे. कारण माणूस प्रगती पथावर आहे. तरी सुध्दा आत्ताच खरी ईर्जिकीची गरज आहे.
धर्माने घातलेली ईर्जिक त्याच्या वीस बिगा जमीन आणी १५-२० सहकार्‍या पुरती मर्यादित होती.
माझा देश काश्मिर पासून ते कन्या कुमरी पर्यंत कित्येक बिगा पसरलेली आहे.
राजकीय ईर्जिक घालून फोफावलेला भ्रष्टाचार आणि सफेद गुंडाराज उखडून काढण्या साठी करोडो सहकार्‍यांची गरज आहे.
सामाजिक ईर्जिक घालून बाबू लोकांचे लाच घेऊन बरबटलेले हात उखडण्या साठी ईर्जिक जिवंत राहाण गरजेच आहे.
सांस्क्रुतिक ईर्जिक घालून भारतीय संस्क्रुतीच्या वटवॄक्षाला लागलेल बांडगूळ छाटण गरजेच आहे.
सन्मान-जागृतीची ईर्जिक घालून मध्यम वर्गीय नामाक मुक्या प्राण्याला "मोटिव्हेट "करण्याची गरज आहे.
धर्मातील "धर्म" अन हौसाक्कतील "हौस " जागृत रहाण गरजेच आहे.
खरच माणूस प्रगती पथावर आहे ?



---- यशवन्त नवले.



Thursday 21 June 2012

एका शाळेत लावलेला अर्थपूर्ण फलक…!


















सुलभ शौचालय --- अशोक नायगांवकर

 

 विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?


अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे
तशी संपत म्हणाला -- साहेब, शी काय म्हंता? सरळ हागाय बसतो म्हणाना !
म्हणजे किती मराठी वाटतं, पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं.......


मी त्याला म्हटलं अरे दादरसारख्या ठिकाणी आता किती सुंदर, देखणी, सुलभ शौलालयं निघालीत
तिथे जावं..........


मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला
शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत
आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात - सुलभ शौचालयात !
 

...... आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!!

 

 

 

---------------- अशोक नायगांवकर

 

शाकाहारी हिंसाचार --- अशोक नायगावकर

 

गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रुरपणे त्वचा सोलली जातीय दुधी भोपळ्याची
सपास्सप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चाललीय
डोळ्यांची आग-आग होतोय........
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी
तडतडतेय मोहरी........

हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्यांच्या पंखांचा उकळत्या तेलात
आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात........

धारेवर किसली जातायत गाजरं
पिळवणूक चाललीय आंब्याची
सर्वहारा बनलीय कोय......

वरवंट्याखाली चिरडतेय मीठमिरची
बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात
फड्क्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय
चक्का बनण्यासाठी......

हे भरडले जातायत गहू
लाहीलाही होतीय मक्याची ज्वारीची
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात
पोलीस नुस्तेच बघतायत......

संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं
उतरवली जातायत दिवसाढवळ्या
मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी
आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर
हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी......

 

 ------------------- अशोक नायगावकर 

 

श्री. संत शिरोमणी गोरा कुंभार




प्रस्तावना 

व्यवसायाने कुंभार असल्यामुळे गोरा कुंभार यांच्या वाट्यास येणारी सामाजिक प्रतिष्ठा बेताचीच होती.पण परमार्थात त्यांची पदवी उच्च दर्जाची होती. गोरोबांचे जीवनचरित्र पाहिले तर ते तसे साधेसुधे जीवन आहे. त्या जीवनात कुठलाही थाटमाट किंवा वैभव नाही. त्यांच्या जीवनात वैभव असेल तर ते फक्त परमार्थिक भक्तीचे गोरा कुंभार हे सर्वसामान्य अशा कुंभार कुटुंबात जन्मले अन् वाढले.    
गोरोबा-काका हे तेराव्या शतकातील अत्यंत महत्वाचे संत होते. श्री संत ज्ञानेश्वरांनी १३ व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अध्यात्मिक लोकेशाहीची स्थापना केली. त्यातून अठरापगड जाती-जमातीतील संत निर्माण झाले. कुंभार समाजात गोरोबा कुंभार हे संत म्हणून उदयास आले.
संत गोरा कुंभार यांचा जन्म इ.स. १२६७ साली म्हणजे शालिवाहन शके ११८९ साली प्रभवनाम संवत्सरात, आषाढ शुक्लपक्ष १० गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता "तेर' येथे झाला. "भक्तकथातत्व' नामक ग्रंथात गोरोबांच्या जन्मकालविषयी पुढील माहिती मिळते.

"कुल्लाळवंशी एक जालेले आहे
"कुल्लाळवंशी एक जाण।
महादू कुंभार नामाभिमान।।
तया गावीचे वतन।
करी भजन श़ीहरीचे।।
तया पोटी झाला सुत।
गोरा कुंभार जगविख्यात।।
अकराशे एकोण्णवदात।
प्रभवनासंवत्सर।।'

उस्मानाबाद जिल्ह्यातील "कळंब' तालुक्यातील "तेर' येथे त्यांचे वडील माधवबुवा आणि आई रखुमाई वास्तव्य करीत होते. "तेर' व "ढोकी' ही गावे जवळजवळ असल्यामुळे "तेरढोकी' असे म्हणण्याची एक पध्दती रुढ झालेली आहे. कुर्डुवाडी-लातूर या रेल्वेमार्गावरील "तेर' रेल्वे स्टेशन येते. रेल्वेस्टेशनपासून १ ते १.५ कि.मी. आत गाव येते. "तेर' हे गाव "तेरणा' नदीच्या तीरावर वसलेले आहे. या "तेरे' गावाला पूर्वी "सत्यपुरी' असे म्हणत. कारण क्रता युगात विश्वकर्म्याने "सत्यपुरी' नगरी वसविली. ती राक्षसांनी विध्वंस केल्यानंतर त्रिविक्रमाने "त्रिगर' नावाची नगरी वसविली. ही व्यापारी नगरी बनली. "त्रिगर' ऐवजी "तेगर' असे अपभ्रंशित नाव झाले आणि पुढे कालांतराने "तगेर' चे "तेर' असे आज नाव रुढ झालेले आहे. 



गोरोबा काका यांच्या जन्माविषयी :
"तेर' नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. "तेर' येथील "काळेश्वर' या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे "तेर' गावात माधव बुवांना "संत' म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात,""श्री माधवबुवा "तेर' येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना आठ पुत्र होते. त्यांना आठ पुत्र झाले. परंतु ते सर्व एकामागून एक निर्वतले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?' माधबुवांनी सांगितले की,"आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत' नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, 'तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.'    
या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णिलेले आहेत. चमत्काराचे चैतन्य असते. पण ब-याचदा समृध्द समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रध्दा बळावताना दिसते. संतांचे जीवन दर्शन घडविताना सुध्दा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे. म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रध्दा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रध्देचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरुन एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारोबांचा जन्म झाला आहे. 



गोरोबांचे घरचे वातावरण :
गोरोबा काकांचे आई-वडिल आणि गोरोबा असे तीन माणसांचे कुटुंब हे कुटुंब तसे खाऊनपिऊन सुखी होते. त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती वडिलोपार्जित होती. त्यात वडील काळेश्वराचे भक्त असल्याने विठ्ठल भक्तीला शिवशक्तीची जोड लाभलेली होती. ज्यांनी विठ्ठलाला आपल्या अंतःकरणात कायमचं स्थान दिलेले आहे. हरी आणि हर यात काही मराठी मनानं भेद मानला नाही, हेच तर महाराष्ट्राचं एक खास वैशिष्ट्य होय. त्याप्रमाणे गोरोबांच्या कुटुंबात शिवभक्ती व विठ्ठलभक्ती यांना सारखाचं स्थान होते, महत्त्वही होते. देवाच्या स्वरूपात ज्यांना सुरुवातीपासून ऐक्यभाव आढळला; त्यांना त्यांच्या पारमार्थिक जीवनात द्वैत तत्त्वाचा अनुभव कधीच येणार नाही. गोरोबा शिव आणि विठ्ठल यांची ऐक्यभावानं उपासना करीत होते. किंबहुना विठ्ठलातच त्यांना शिवाचे दर्शन घडत होते. 

गोरोबांचा विवाह :
गोरोबांनी आपल्या प्रेमळ आणि कष्टाळू वृत्तीने मातापित्यांचा कौटुंबिक भार कमी केला. परंतु कुंभारकाम म्हटले की अतोनात कष्ट आले आणि त्याचबरोबर हा निसर्गावर अवलंबून असलेला मातीचा धंदा अन् या कुंभारकामात अन्य कुणाची तरी मदत हवी, कोणीतरी जोडीदार हवा असतो, असा गोरोबांच्या वडिलांनी विचार केला. गोरोबा हे काम कसे करणार?अशी चिंता त्यांच्यासमोर उभी राहिली. गोरोबा वयात आले होते. म्हणून गोरोबाला त्याचे वडील म्हणाले, कुंभारकामात तुला कुणीतरी मदत करायला माणूस हवा आहे. कुंभाराच्या चाकावर काम करायला दोन माणसे हवी असतात. आजपर्यंत तुझ्या आईने मला मदत केली. पण तुझी आई आता थकली आहे. तुला कुणीतरी जोडीदारीण हवी आहे. कुंभारकामात मदत करणारी पत्नी गोरोबाला करुन द्यावी, असा वडिलांचा आग्रह होता. यावर गोरोबा काही बोलले नाहीत. आपल्याला काहीच कळले नाही, असे त्यांनी दाखविले म्हणूनच त्यांचे वडील त्यांना म्हणाले, अरे, तुझे दोन हाताचे चार हात व्हायला पाहिजेत. संसार करायचा म्हटला की जोडीदार हवा आहे. चार हातांनी काम झाले म्हणजे चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. तुझे लग्न होणे गरजेचे आहे. माधवबुवांनी गोरोबासाठी चांगली मुलगी पाहिली. ढोकी येथील कुंभारबाबांची मोठी मुलगी पाहिली. तिचे नाव संती. ती मुलगी सद्गुणी व सद्वर्तनी होती. आपल्या गोरोबासाठी ही मुलगी योग्य आहे असे त्यांना वाटले. गोरोबाला देखील संती पसंत पडली. पुढे गोरोबा व संती यांचा विवाह झाला. गोरोबा अशारितीने खऱ्याअर्थाने प्रापंचिक गृहस्थ बनले. 

गोरोबांचा दिनक्रम :
गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना लिहायला वाचायला येत होते.ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते.अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते.ते भक्त होते, योगी होते.सिद्ध, साधकही होते.गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई.त्यांच्या योगसाधनेचं त्यांना कौतुक वाटे, आकर्षण वाटे असे करता करता गोरोबांचा प्रपंच आता परमार्थमय झाला होता.गोरोबा सकाळी उठून अंघोळ करून, देवाची पूजा करणे.नंतर नामस्मरण करावं आणि ध्यानात पांडुरंगाचं रूप साठवून त्याला मनी-मानसी मुरवून घ्यावं आणि मग न्याहारी करुन कामाला लागावं, असा त्यांचा सकाळचा दिनक्रम असे.    
दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा जरा विश्रांती घेत. ही विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते.तर घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत, अभंग म्हणीत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे.पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत.ते दिवस मावळेपर्यंत.दिवस मावळल्यानंतर हातपाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिंपळ्याच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवण्याचेवेळी ते थांबे. अन् रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरु होई.शेजारपाजारची मंडळीही त्यात सामील होत असत.नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत झोपी जात. 


गोरोबा माता-पित्याच्या मायेस पारखे :
गोरोबा आता वडिलांचा धंदा सांभाळू लागले होते. गोरोबाची पत्नी मोठी सद्गुणी होती. सारी घरकामे झपाट् यानं उरकून, ती गोरोबांना कामात मदत करु लागली. गोरोबाचा प्रपंच सुखासमाधानात व आनंदात चालला होता. गोरोबाचा सुखाने चाललेला संसार आणि त्याची पत्नी संती ही मोठी गुणी आणि प्रापंचिक असलेली पाहून माधवबुवा व रखुमाई यांना अत्यानंद झाला. गोरोबांचे आईवडील आता खूप थकले होते. त्यांची पंढरीची वारी सतत चालू होती. म्हातारपणाच्या काळात अखंड नामस्मरण आणि भक्ती करीत करीतच निजधामास गेली. अखेरचा श्वास सोडताना वडिलांनी गोरोबांना सांगितलं, गोरोबा तू प्रपंच चांगला करशील पण विठ्ठलाचे नामस्मरण कधी सोडू नकोस आणि पंढरीची वारी कधी चुकवू नकोस.    
गोरोबा काका हे पंढरीचे श़द्धानिष्ठ वारकरी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा, एकादशी व्रत करीत असत. आषाढी कार्तिकी वारी ते कधीही चुकवित नसत. पंढरपूर क्षेत्री विठ्ठलाच्या भेटीबरोबरच संताच्याही भेटीगाठी होत असत. त्या संतांच्या मांदियाळीने व त्यांच्या भजन, कीर्तनानंदाने, टाळमृदुंगाच्या नादाने अवघी पंढरी दुमदुमून जात असे. देव, भक्त आणि नामसंकीर्तन असा त्रिवेणी संगम या वारीच्या भजनानंदात आवर्जून घडत असे. पंढरीचा काला घेऊनच ही संतमंडळी श्री विठ्ठलाचा निरोप घेऊन आपल्या गावी परत येत असत. आणि आपापल्या कामधंद्याला लागत असत. त्याप्रमाणे गोरोबाकाका ही पंढरपूराहून आले की कुंभारकामाला लागत असत. 


मूल चिखलात तुडविले :
एके दिवशी गोरोबा पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. गोरोबाकाका विठ्ठल भक्तीत कसे तल्लीन होत हे सांगताना संत नामदेव गोरोबा काकांच्या तन्मय वृत्तीबद्दल लिहितात.     

प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।।१।।
असे घराश़मी करीत व्यवहार
न पडे विसर विठोबाचा ।।२।।
कालवुनी माती तुडवीत गोरा।
आठवीत वरा रखुमाईच्या।।३।।
प्रेमे अंगी असे झाकुनी नयन
करीत भजन विठोबाचे ।।४।।

स्वतः नामदेवांनी गोरोबांच्या तन्मयवृत्तीबद्दल वरील अभंगात दिलेली स्पष्ट कबुली महत्त्वाची वाटते. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. अशाप्रकारे एके दिवशी गोरोबा देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वरचरणी लागले होते. अशावेळी त्यांची बायको-संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही. असे सांगून ती पाणी आणण्याकरिता निघून गेली. पण तिचे सांगणे गोरोबांनी ऐकले का? त्यावेळी गोरोबा देहभान हरपून गेले होते. पण संतीला याची काय कल्पना! इकडे भक्त गोरोबा पांडुरंग चरणी लीन होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण, जप करीत होते.
असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित आहेत आणि बाळ, रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. श्री.गोरोबा-काका डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात,

नेणेवेचि बाळ की हे मृत्तिका
मन गुंतलेले देखा पांडुरंगी।।१।।
मृतिकेसम जाहला असे गोळा।
बाळ मिसळला मृतिकेत ।।२।।
रक्तमांस तेणे जाहला गोळा लाल
नेणवे तात्काळ गोरोबासी।।३।।
एका जनार्दनी उटक आणुनी कांता
पाहे तवं तत्वता बाळ न दिसे।।४।।

अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. जणु मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला.
संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली. पण बाळाचा शोध कुठे लागेना! तिने गोरोबांना विचारले, धनी, आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते. ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंगच. संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. ती रागाच्या भरात गोरोबांना काय म्हणते? ह्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात.

जळो हे भजन तुझे आता।
डोळे असोनिया जाहलासी आंधळा।
कोठोनी कपाळा पडलासी।
कसाबासी तरी काही येती दया।
का रे बाळराया तुडविले।

संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविलेले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना होतात. पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले. त्यांनी गोरोबा खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची आण (शपथ) घातली. याप्रसंगाचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित असे वर्णन करत

हातबोट मज लावशील आता
आण तुला सर्वथा विठोबाची।
ऐकतांचि ऐसे ठेवियेली काठी
राहिला उगाचि गोरा तेव्हा।।

संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरुच होता. शेजार-पाजारचे पुरुष बायका जमा झाल्या. त्या गोरोबांना दूषण देऊ लागल्या. संती माझा बाळा कुठे आहे? माझा बाळा कुठे आहे, म्हणून छाती बडवून घेत होती. हा सगळा प्रकार आता गोरोबाला चांगलाच उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. कर्माची गती वेगळीच असते. देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो ते कळलेच नाही असे म्हणून गोरोबांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली. संतीने देखील याप्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला.
येथे भाविकांनी, रसिकांनी गोरोबाकाकांनी मुलाला चिखलात तुडवून मारले. ह्या घटनेचा अर्थ गोरोबांच्या भावभक्तीचा प्रकार मानवा असे वाटते. कारण संतजीवनात, चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना येतात. त्यामागे संतचरित्रे ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटावी. संत चरित्राचे महत्त्व वाढावे असाच भाव असलेला दिसून येतो. आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत. म्हणून अशा घटनांचा आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावा चा हा प्रकार समजावा.
काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेला. एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. "आण ना बाण उगीचच संसारात ताण' निर्माण झाला. उगाउगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचा विषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्याच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता संतीला सहन होत नव्हती. एक वंशाचा दिवा गेला आता वंशाला दुसरा दिवा हवा. संत गोरोबांनी तर संसारात पूर्णपणे वैराग्य पत्करलेले. शेवटी संतीने मनाशी विचार केला अन् ती एके दिवशी गोरोबांचे पाय धुण्याकरिता गेली असता गोरोबा म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला स्पर्श करशील तर! अग तू मला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना? मग माझ्या अंगाला हात का लावतीस! जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुलाही पांडुरंगाची शपथ! अग सूर्य पश्चिमेस उगवेल! समुद्र आपली मर्यादा सोडील परंतु विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही.
अशाप्रकारे असे बरेच दिवस गेले. गोरोबांची अवस्था असोनि संत नसोनी संसारी अशीच झाली होती. अखंड नामस्मरण देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढेच त्यांना माहीत होते. एक वर्ष होऊन गेले तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. दुरुनच बोलणे, वागणे. संतीसारखी भावूक मनाची प्रेमऴ, संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने गोरोबाची काळजी परोपरीने घ्यायला सुरुवात केली. तिची ही पतिसेवा दिवसेंदिवस एखाद्या व्रतासारखी होऊ लागली. ती गोरोबांना जीवापलीकडे जपू लागली. तरीही गोरोबा तिच्याशी अलिप्तवृत्तीने वागू लागले. त्यामुळे संतीच्या जीवाला एकप्रकारची काळजी लागून गेली. आपण भावनेच्या, दु:खाच्या भरात आपण वाटेल तसे मनाला येईल तसे बोलून जातो. पण त्याचा केवठा मोठा विपरित परिणाम भोगावा लागतो. यातून संतीच्या मनातील संसाराची चिंता आणि गोरोबांच्या मनाची विरक्ती दिसून येते. या सर्व प्रसंगातून गोरोबांच्या कुटुंबाची मानसिकताही स्पष्ट होते. 



गोरोबांचा दुसरा विवाह :
संत गोरोबांची कठोर प्रतिज्ञा आणि त्यांची संसारातील वैराग्यवृत्ती पाहून संतीला फार मोठी काळजी वाटू लागली. घराण्याच्या पुढील वंशाचीही काळजी वाटू लागली. घराण्याला वंश हवा. पण गोरोबा तर अंगाला स्पर्श करीत नाहीत. अन् विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही ही नवऱ्याची कठोर प्रतिज्ञा हे सर्व पाहून ती चिंताक्रांत झाली अन् ती आपल्या मनाशीच विचार करू लागली की आता मात्र त्यांचे दुसरे लग्न करुन दिल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून स्वतःची बहीणच तिनं सवत म्हणून आणण्याचे ठरविले अन् त्यायोगे तरी संतती वाढेल. ती एके दिवशी गोरोबांना म्हणाली धनी, एकदा हातून चूक झाली. बोलू नये ते मी तुम्हाला रागाच्या भरात बोलून गेले. दुःखात माणूस बोलतो ते खरे मानायचे नसते. मला आपल्यापासून असे दूर केले याचे फार वाईट वाटते.    
त्यावर गोरोबा म्हणाले, संती तू बरोबर बोलते आहेस. माणूस दुःखात असला म्हणजे त्याचा विचार त्याला सोडून जातो. पण तू मला प्रत्यक्ष विठ्ठलाचीच आण घातली आहेस. मी तुला स्पर्श करू शकत नाही. विठ्ठलाची आण मी मोडू शकत नाही. असे जर केले तर भक्तावर कुणी विश्वास ठेवील का? त्यावर गोरोबांना संती म्हणाली, तुम्ही फक्त देवाची आणि भक्ताची काळजी वाहता. पण या कुटुंबाची, वंशाची काही काळजी करीत नाही. देवापुढे सगळेच तुम्हाला केरकचरा वाटते. आपल्या कुटुंबाचा वंश कसा वाढणार? प्रपंचाचे कसे होणार? याचा तुम्ही जरुर विचार करावा. त्यावर गोरोबा संतीला म्हणाले, परमेश्वराचे लेकरु परमेश्वराने नेले. हे सारे मायेचे बंध आहेत देवालाच मी आता स्वतःला अर्पण केलेले आहे.
संतीला पश्चाताप होऊ लागला. आपण नव-यालाशपथ घातली अन् नवरा आता आपल्या अंगाला हात लावायलाही तयार नाही. आज उद्या घरात धन-धान्य भरपूर येईल. पण संततीचा विचार काय करावा? अशी ती सतत काळजीकरू लागली. येईल तो दिवस अन् रात्र ती दुःखात घालवू लागली एके दिवशी तिने मनाशी विचार केला की, माहेरी जाऊन वडिलांना आपले दुःख सांगावे. आपल्या नवऱ्याचे दुसरे लग्न करण्याचा विचार वडिलासमोर मांडावा आणि त्यासाठी आपली धाकटी बहीण रामीची मागणी घालावी. असा तिने मनाशी पक्का विचार केला आणि गोरोबांना सांगून ती माहेरी ढोकी गावी आली. संती अचानक आलेली पाहून वडिलांनी विचारले, संती, तू आज अचानक कसे काय येणे केलेस! त्यावर संती मुळूमुळू रडू लागली आणि म्हणाली, माझे नशीबच फुटके, नवऱ्याचा मी खूप अपमान केला. त्यांना वाटेल तसे टाकून बोलले. देवभक्ताची निंदा केली. नव-यालामाझ्या अंगाला हात लावू नका म्हणून मी विठ्ठलाची शपथ घातली आणि पति ही देवाची शपथ मोडेना. शेवटी वंशाचा दिवा तरी कसा लागणाऱ? म्हणून मी तुम्हाला विनवणी करायला आले आहे की, धाकटी बहीण रामी, माझ्या नव-यालाद्या. त्यामुळे घराला वंशाचा दिवा मिळेल आणि लग्नानंतर आम्ही दोघी सुखाने राहू.
संतीच्या वडिलांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले व त्याप्रमाणे रामीबरोबर गोरोबांचा दुसरा विवाह करायला तयार झाले. तेर मध्ये सगळ्या गल्लीत आता गोरोबाचे दुसरे लग्न होणार. संती आपल्या पाठच्या बहिणीला सवत म्हणून घरी आणणार अशी चर्चा सुरू झाली. या घटनेकडे तेर आणि ढोकी या गावाचे आणि गावातील लोकांचे लक्ष लागून राहिले.
संती आणि तिचेवडील गोरोबापाशी आले. सासरे गोरोबांना म्हणाले, जावईबुवा आमचे वचन मानावे. माझी रामी नावाची सद्गुणी कन्या मी तुम्हाला देतो आहे. विधीपूर्वक आपला विवाह करून देतो. गोरोबांनी सास-यांची विनंती मान्य केली.
संतीच्या वडिलांनी सुमूहुर्त आणि तिथी पाहून आप्तेष्ट आणि नातेवाईकांना निमंत्रण देऊन पहिल्या लग्नापेक्षा हा सोहळा अधिक सुंदर झाला. पाहुणे, रावळे, ब्राह्मण इ. ना विविध प्रकारचे आंदण देऊन संतोषविले असा हा लग्नसोहळा चार दिवस चालू होता. शेवटी रामीचा आणि गोरोबाचा विवाह संपन्न झाला. सवतीच्या रूपाने रामीने संतीच्या घरात प्रवेश केला. संतीला लग्न झाल्याचा आनंद वाटला, तिच्या मनाचे समाधान झाले. या प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेव म्हणतात,

जाहली तेव्हा श़मी वंश बुडविला।
विठोबा कोपला मजवरी।।
मनामाजी तिने केला तो विचार।
करावे दुसरे लग्न याचे।।
बोलाविला तिने आपला तो पिता।
सांगितली वार्ता त्याजलागी।
कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा।
नको या विचारा पाहू आता।।
अवश्य म्हणूनिया विनविला गोरा।
लग्नाची हे त्वरा केली तेव्हा।।

अशाप्रकारचे गोरोबाचा आणि रामीचा विवाह संपन्ना होताच. गोरोबाचे सासरे साधे भोळे होते. ते गोरोबांना इतर सर्वासारखेच म्हणाले, आता माझी लेक रामी तुमच्याबरोबर येत आहे. जावईबापू दोन्ही डोळ्यांना ज्याप्रमाणे सारखे जपावे त्याप्रमाणे माझ्या दोन्ही मुलींना जपा. संतीवर जसे प्रेम करता तसे रामीवरही करा. दोघींना सारखेच वागवा. अंजदुजं करु नका (भेदभाव करु नका) तुम्हाला तुमच्या विठोबाची आण (शपथ) आहे. गोरोबा सास-यांना म्हणाले, भली आठवण करुन दिली. संतीप्रमाणेच रामीला वागवीन. त्याबाबत आपण निश्विंत असावे.
गोरोबांनी दुसरा विवाह केला तो संतीच्या मनाप्रमाणे संसार व्हावा म्हणून गोरोबा संती-रामीसह तेर गावी आले. दुसरे लग्न होऊनही गोरोबाचे मन संसारात रमेना. ते सतत भजनामध्ये दंग राहत असत. दोघीशीही त्यांनी अबोला धरला. तेव्हा संती गोरोबांना म्हणाली, मी तुम्हाला विठ्ठलाची आण घातली आहे. म्हणून माझ्याशी तुमचा अबोला आहे. परंतु आपण रामीशी का बोलत नाही आपल्या पोटी संतान नाही. निदान रामीचा तरी स्वीकार करा. तेव्हा गोरोबा म्हणाले, संती, तुझ्या वडिलांनी दोघींना सारखेच वागवा. अजंदुजं करु नका, असे म्हणून मला विठ्ठलाची आण घातली आहे. अन् प्राण गेला तरी मी विठ्ठलाची आण मोडणार नाही संतीने ज्या उद्देशाने गोरोबांचे दुसरे लग्न केले तो उद्देश असफल झाल्याचे, मनाशी रंगविलेले स्वप्न उध्वस्त झालेले पाहून तिला फार वाईट वाटले. गोरोबांचे मन संसारात पुन्हा कसे रमेल यासाठी तिचे प्रयत्न सुरु झाले.


गोरोबांनी दोन्ही हात तोडले :
रामी ऊर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण आक्का, ते कसं?    
असं नाही तसं नाही. असं म्हणायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं! असे संतीने रामीला सांगितले.
संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. अन् संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या उजव्या हाताला संती आणि डाव्या हाताला रामी झोपली आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या. गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली, पाहिले तर त्याच्या शेजारी रात्री संती व रामी झोपल्या होत्या.
गोरोबा झटकन् उठले. त्यांना संती व रामी यांचा अत्यंत राग आला गोरोबांचा राग-संताप पाहून रामी व संती मनातल्या मनात फार घाबरून गेल्या गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. तेव्हा गोरोबा म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे. अरेरे! घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. विठ्ठल मला भेटायला आला नाही. मी एवढा भाग्यवान नाही मी त्याची शपथ मोडली म्हणून तो तर आणखी दूर गेला.
गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नवऱ्यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,
विठोबाची माझ्या मोडियेली आण।
टाकावे तोडून हातचि हे।।
घेऊनिया शस्त्र तोडियले कर।
आनंदला फार गोरा तेव्हा।।

गोरोबांनी शस्त्र घेऊनी आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घ्यायचे ठरविले. झाल्या चुकीबद्दल संती-रामी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली, अन् त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबापासून दूर निघून गेल्या अन् घरकामाला लागल्या. आणि इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबांचे हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या. पण प्रायश्चित घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. हा प्रसंग वर्णन करताना संत नामदेव अमृतवाडी ग्रंथामध्ये लिहितात,

लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा।
दोघासही पाळा समानची।।
न पाळीता आण तुम्हा विठोबाची।
धराया शब्दाची आठवण।
अवश्य म्हणोनिया निघाला तो गोरा।
आला असे घरा आपुलिया।।
कनिष्ठ स्त्रियेशी आले असे न्हाण।
न करी भाषण तिसी काही।।

संतीला आपला नवरा आपल्याशी अन् रामीशी संभाषण करीत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यावर गोरोबा सांगतात की, मला सास-यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे. दोघींना मी सारखेच वागवणार आहे. संतीला या गोष्टीचे वाईट वाटते आपला वंश कसा वाढणार? ही संतीला काळजी होती. दोघी गोरोबांना न सांगता, न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवितात त्यातून पुढील अनर्थ घडतो आणि विठ्ठलाची आण मोडल्याने गोरोबा आपले हात तोडून टाकतात संती अन् रामी हे दृश्य पाहतात अन् कावऱ्याबावऱ्या होतात. कारण गोरोबांनी हात तोडले तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही. अन् शारीरावर जखमही कोठे दिसेना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना दोन हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका. त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबांच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदीपलिकडे टाकतात. अन् पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले. भाविकांनी व रसिकांनी घटनेचा अर्थ असा घ्यावा, की गोरोबांनी संसाराचा त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोघी बायकांना दिले म्हणजे आता संसाराची धुरा तुम्ही दोघीच व्हा असे सांगितले. अन् आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. गोरोबांचे श़ेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. तसेच गोरोबांनी हात तोडले याचा अर्थ असा घ्यावा की, गोरोबा संसार पाशातून विरक्त वृत्तीने राहू लागले. विठ्ठल भक्ती व नामस्मरण यासाठी हात वर्ज्य केले असा हा हात तोडले याचा अर्थ लक्षात घेता येईल. गोरोबांच्या या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्तीमार्गावरील अढळ श़द्धा किती प्रभावी होती हे स्पष्ट होते.
गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले अऩ् त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्य याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातुर होऊन कसाबसा संसार सावरू लागल्या. पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते. 


पांडुरंगे धरिला कुंभारवेष :
गोरोबांनी हात तोडून घेतले त्यामुळे संती-रामी यांना फार दुःख झाले.गावातील दुष्ट चांडाळ होते ते गोरोबांची निंदा करु लागले.हात तोडायची काय गरज होती.आता आम्हाकडे जर मदत मागायला आला तरी आम्ही तिळमात्र मदत करणार नाही.पण गोरोबांनी निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायाने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.क्षेमकुशल आणि कल्याण याची काळजी परमेश्वराला असते.आपला भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते.ते गोरोबांच्या घरी भक्ताचे येथे जावयाचे ठरवतात.विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही जावयास तयार होतात.ते तिघेही वेष पालटून ढोकीस निघाले.विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले.विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारीण झाली.गरुड गाढव झाले.विठ्ठलाने कुंभाराचे रूपधारण केले.डोक्यावर वेडेवाकडे पागोटे घातले.अंगात बंद नसलेली बाराबंदी घातली.जीर्ण धोतर नेसले.रुक्मिणीने जीर्ण-जुने असे लुगडे नेसले.कपाळावर आडवे कुंकू लावले. नाकात मोत्याची झुपकेदार नथ घातली.गरुड गाढव झाले.    
अशाप्रकारे तिघे वेष पालटून तेर गावात आले.अन् आम्ही कुंभार आहोत आणि आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले.गावातल्या लोकांना कुंभाररूपी विठ्ठल सांगू लागले, मी नावाचा विठू कुंभार.रुक्मा माझी बायको.आमचे कुटुंब मोठे आहे.कामधंदा करुन पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आलो आहे. कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे.आम्ही मन लावून काम करु.आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात.आमचे काम तरी बघून मग आम्हाला ठेवून घ्या.असे चक्रपाणीचे हे सत्य बोलणे कोणाला कळेना तेर गावातील प्रत्येक जण म्हणू लागला हा गरीब कुंभार आहे.त्याला गोरोबांच्या घरी पाठवूया. आणि गावकरी विठू कुंभाराला सांगू लागले, आमच्या गावचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत तेथे तुम्हाला कामधंदा मिळेल.गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे देव गोरोबाच्या घरी जातात अन् गोरा कुंभारला म्हणतात, आम्हांला काहीतरी काम द्या.आम्हांला पैश्याची अपेक्षा नाही.आपण जे सांगाल ते काम करु. यावर गोरोबा काका विचारतात आपण कोण? कुठले? आपले नांव गाव सांगा? तुम्ही कोणता कामधंदा करु शकता? त्यावर देव म्हणाले, मी विठू कुंभार माझी बायको रुक्मा कुंभारीण.आम्हां दोघांची एकमेकाला साथ आहे.हे गाढव (गरुड) आमचे कामधंद्याचे वाहन.आम्ही कारगीर आहोत.मडकी घडणे भाजणे हा आमुचा व्यवसाय आहे.आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी.आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे.म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधार्थ, पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही.अन् म्हणाले, आपण द्याल ते काम करु आणि मिळेल ते पोटाला खाऊ.गोरोबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेऊन घेतले.तिघेही आनंदाने गोरोबांच्या घरी राहिले.अन् भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले. नानाप्रकारची मडकी घडू लागले.प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले (भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्म-वैवर्त पुराणात पहावी) गरुड माती वाही.विठ्ठल चिखल तुडवी.रुक्मिणी पाणी भरी.अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागला.भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात गाडगी मडकी विकू लागले.विठ्ठलाने कुंभारवेषात तयार केलेली मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया मडकी घेऊ लागल्या.स्त्रिया विठ्ठलरुपी कुंभाराचे कौतुक करु लागल्या.


जगदात्मा भक्तमुकी घास घाली :
कुंभारवेष धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभारकाम करीत असत. उभयतांना कामाचा कंटाळा असा नसे. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असत. संती-रामी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि गरुडासाठीही स्वतंत्र पात्र करीत असत. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला गोरोबाही विठ्ठलला भरवू लागला. आणि संतीही गोरोबांची सेवा करु लागली. लोकही गोरोबाचे हात नसल्याने त्यांच्याकडून आता गाडगी-मडकी मिळणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठलरूपी कुंभाराकडून तयार झालेली मडकी विकत घेऊ लागल्या. आणि स्त्रिया गाडगी मडकी घेत असत पण त्याच्या मोबदला देत नसत आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्याने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैते गोळा करून गोरोबाच्या घरी आणून टाकीत असत.
   
अशाप्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी आले. ते गोरोबांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही सेवा करु लागले. इतर भक्तांना विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठलाच्या शोधार्थ संतपरिवार गोरोबाच्या गावी जायचे ठरवतात. तेर नगरीत पांडुरंग सात महिने सव्वीस दिवस राहिले. 


संत परिवार येती गोरोबांचे घरी :
तेर नगरीत संत गोरोबा काका अभंग गात, कीर्तन, भजन करीत आणि स्वतः पांडुरंग चिखल तुडवीत असे. एके दिवशी तेरमधील एक कुंभार गोरोबाला म्हणाले की, संत परिवाराचे म्हणणे असे आहे की देव पंढरीला नाहीतच देवाचा शोध घेण्यासाठी आषाढी एकादशीला इकडेच येणार आहेत. हा गोरोबा आणि तेथील कुंभाराचा संवाद ऐकून चिखल तुडविता -तुडविता पांडुरंग क्षणभर थांबत अन् पुन्हा चिखल तुडवायला लागतात. यावर गोरोबा काका म्हणाले, ही चांगलीच गोष्ट आहे. तेर भूमीला संतपरिवाराचे पाय लागतील त्यामुळे उलट आपुली भूमी अधिक निर्मळ होईल.    
ज्येष्ठ महिना सुरू झाला. नामदेव अस्वस्थ झाले. कारण देव कुठे लपला हे कळेना. गाईला भेटण्यासाठी तिचे वासरु जसे आतुर होते. त्याप्रमाणे देवाच्या भेटीसाठी संतपरिवार आतुर झाला होता. संत नामदेव, राका कुंभार (पंढरपूर), संत माणकजी बोधला (धामणगाव), संत नरहरी सोनार (वाळुद), संत चोखामेळा (मंगळवेढा), संत कर्ममेळा (जानज), संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर (देवाची आळंदी), संत जनाबाई (पंढरपूर), संत सोयराबाई (चिंचपूर), संत कान्होपात्रा (पंढरपूर) असे पंढरीच्या आसपासचे सर्व संत पंढरीत जमा झाले. देव तेरमध्येच असे समजून ते तेरला निघाले. तेथून पंढरीला जाऊ असे त्यांनी ठरविले गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नव-यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,

आषाढी यात्रा आला पर्वकाळ
निघाला संतमेळा पंढरीशी।।१।।
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
आणिक ही अनुभवी संत बहु।।२।।
मार्ग तेरचा धरुनी ते आले।
तेथे गोरोबाशी पुसियेले।।३।।
गावातील जन सांगती प्रकार।
गोऱ्याचा विचार जाहला सर्व ।।४।।
परदेशी कुंभार पंढरीचा विठ्ठल।।
राहिलाशी वाटा करुनिया।।५।।
ज्ञानदेवे खुण आणलीया मनी।।
एका जनार्दनी पाहू त्याने।।६।।

वरील संतांचा मेळा अकलूज मार्गे, काही संत वैराग मार्गे ज्येष्ठ शुद्ध दशमीला निघून तेरला पोहचले. तेरमधील गावक-यांनी संतपरिवाराचा आदर सत्कार केला. संतांनी गावकऱ्यांना गोरोबाकाकांचे कसे काय चालले आहे असे विचारले. त्यावर गावकऱ्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाले गोरोबाकाकांच्या घरी एक परदेश कुंभार येऊन राहिला आहे. तो त्यांच्या घरी कुंभार काम करुन राहतो आहे. तो अत्यंत प्रामाणिक व कुशल कारागीर आहे. परदेशी कुंभार आणि त्याची पत्नी दोघेही कुंभारकामात पारंगत आहेत. उभयतांच्यामुळे गोरोबाकाकांचा व्यवसाय चालतो. इतकेच नव्हे तर परदेशी कुंभार आल्यापासून गोरोबाचे घरची परिस्थितीही सुधारलेली आहे. गावक-यांचे सर्व बोलणे ज्ञानदेवांनी ऐकिले व त्यांना खूण पटली. त्यांनी गोरोबाकाकांना त्रिविक्रम मंदिरात बोलावून घ्यावयास सांगितले. संतांचे बोलावणे आल्याचे ऐकून गोरोबाकाकांना आनंद वाटला. आणि परदेशी कुंभाराला ही संतदर्शनाला चला असे म्हणाले, परदेशी कुंभार हो म्हणाला आणि कुठे गुप्त झाला. गोरोबाकाकांनी त्रिविक्रम मंदिरात जाऊन सर्व संताचे दर्शन घेतले. सर्व संतांनी काकांचे दर्शन घेतले. संध्याकाळी दशमी दिवशी त्रिविक्रम मंदिरात सर्व संतांनी कीर्तन केले. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला ज्ञानदेवाचे विचारप्रवर्तक कीर्तन ऐकून सर्वजण धन्य झाले. गोरोबांनी सर्व संतांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. गोरोबांच्या विनंतीस मान देऊन ज्येष्ठ शुध्द द्वादशीस संत मंडळी गोरोबा काकांच्या घरी निघाले.
गोरोबांच्या घरी सर्व संतमंडळी आली. गोरोबांनी निवृत्तीनाथासह सर्वांना आलिंगन दिले. सर्वांनी अलिंगन प्रसंगी मौन धारण केले होते. परंतु संतांचे हे मौन फारच बोलके होते, अर्थपूर्ण होते. सर्वजण मनाने अनुभूती घेत होते. ज्ञानदेव गोरोबाकाकांना म्हणाले, आपले तर हात तुटलेले आहेत. मग आपला उदरनिर्वाह कसा चालतो? त्यावर गोरोबा काका म्हणाले, पंढरीचा वाटेकरी तो विठू कुंभार कष्टाळू आणि स्वभावाने चांगला आहे. त्याची पत्नीही खूप कष्टाळू आणि मायाळू आहे. तो परदेशी विठू कुंभार माझे सर्व कुंभार काम करतो आणि त्याची बायको स्वयंपाकपाणी करते. त्या दोघांच्या येण्याने माझ्या घरची सर्व परिस्थिती पालटली आहे. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, बोलवा! त्या परदेशी विठू कुंभाराला मग गोरोबाकाका आणि संत मंडळीत पुढील संवाद घडला, विठ्ठलाच्या भेटीसाठी कासावीस झालेली संत मंडळी गोरोबाकाकांना म्हणाली, काका, देव तुमच्याकडेच होते. आता कुठे आहेत़?
गोरोबा संतमंडळींना म्हणाले, अहो देव इकडे आलेच नाहीत त्यावर संतमंडळी म्हणाली, काका, देव इथेच होते. तुमच्यापाशीच राहत होते.
त्यावर गोरोबा काका म्हणाले, आमच्या घरी देव आलेच नाहीत फक्त पंढरीचा विठू कुंभार आणि त्याची बायको रुक्मिणी काम करण्यासाठी दोघे माझ्या घरी राहताहेत.त्यावर विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेले नामदेव म्हणाले, इकडे बोलवा तरी त्यांना नामदेव असे म्हणताच गोरोबांची पत्नी संती परदेशी विठू कुंभाराला शोधू लागली. परंतु संत मंडळी तेर मध्ये दाखल होताच पांडुरंग, रुक्मिणी व गरुड अगोदरच अदृश्य झाले होते. आणि ते पंढरीत दाखल झाले होते. संतीने सर्वत्र पाहिले पण परदेशी विठू कुंभार त्यांची पत्नी कुठेही दिसेना. तिने येऊन सर्वांना सांगितले ती दोघेही कुठे दिसेनात. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, त्यांनी घडविलेली गाडगी-मड़की इकडे आणा पाहू! सर्व संतमंडळी मडकी पाहू लागली. ती मडकी अप्रतिम वाटत होती. सर्व मडक्यावर कोरीव नक्षीकाम व कलाकुसर केलेली त्यांना दिसली. त्यातले एकेक मडके घेऊन वाजवून पाहली त्या प्रत्येक मडक्यातून विठ्ठलऽऽविठ्ठल असा नाद उमटत होता. यावरून सर्वांचे एकमत झाले की प्रत्यक्ष विठ्ठल आणि रुक्मिणी गोरोबाकाकांच्या कडे काम करुन राहत होती. संत गोरोबाकाकांनाही खेद वाटला की, आपण आपल्या प्रपंचासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाला राबवून घेतले. पण संतसहवासात हा खेद गोरोबाकाका क्षणभर विसरले आणि सर्व संतमंडळींना भोजन देऊन त्यांची बोलवण केली.

संत येती घराघरा येई घरपण :
घरी गुप्त झाला देवराणा।
तेणे गोरा आणि त्याच्या ललना।।
पश्चाताप होवोनी जाणा।
देवासी राबविले म्हणूनि।।     

आपल्या घरी सर्व संतमंडळी आलेली पाहून आणि आपल्या नवऱ्यावषयीचा संतमांदियाळीमध्ये असलेला आदर भाव पाहून, संती-रामी यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटला. गोरोबांची उत्कटभक्ती व मोठेपण यांची अनुभूती जशी सर्व लोकांना आली तशी त्यांच्या पत्नीलाही आली. संती अंतर्मुख होऊन विचार करायला लागली की! आपल्या प्रपंचाच्या विपरित अवस्थेला नशीब जबाबदार नाही. आपल्याच विचित्र स्वार्थी वागण्यानं-दोघांच्या म्हणजेच पतीपत्नींचा नात्यात दुरावा निर्माण झाला. वास्तविक आपण आपल्या नव-याला समजून घेऊ शकलो नाही. याचा तिला पश्चाताप होऊ लागला. आपल्या नवऱ्याचं सात्विक जीवन, अंतःकरण, त्यांच्या ठायी असलेली कारुण्यमयता, सर्वस्व परमेश्वराठायी अर्पिलेले, आपला नवरा खरा साक्षात देवमाणूसच. पण त्याला आपण ओळखू शकलो नाही. त्यामुळे संसारापासून विरक्ती घेणाऱ्या नव-यालाआपण ओळखू शकलो नाही म्हणून मला हे दुःख भोगावयास लागले त्यांनाही दुःख भोगावयास लागले. बहिणीलाही या दुःखात आपण लोटून दिले. अशी संतीच्या मनाला उपरती झाली. संतपरिवाराचे तिच्या घरी येण्याने आणि संतपरिवार पंढरीला निघून जाताच. आता संतीच्या वागण्याबोलण्यात फरक पडू लागला. इतकेच नव्हेतर प्रत्येक गोष्टीतून तिच्यातील समंजसपणा आणि गंभीरपणा गोरोबांच्याही लक्षात येऊ लागला. गोरोबांही पत्नीची विचारपूस करु लागले. संतीबरोबर रामीचीही ते जेवणखाण, कुंभार कामासंदर्भात विचारणा करायला लागले.
यावरून हे स्पष्ट होते की संतीनं व रामीनं गुणदोषासह गोरोबाला आपलसं करण्याचा प्रयत्न केला आणि गोरोबाकाकांनी गुणदोषासह पत्नींची ख्यालीखुशाली विचारायला सुरुवात केली. यातून गोरोबांच्या घरी असलेला कौटुंबिक दुरावा कमी होऊन घरामध्ये एक कौटुंबिक सौंदार्हाचे वातावरण निर्माण झाले. तसेच आणखी एक झाले ते म्हणजे परमेश्वरविषयक सौहार्दभाव ही निर्माण होऊ लागला. गोरोबाप्रमाणे संती-रामी यांनाही विठ्ठल भक्तीचे कौतुक वाटायला लागले. संतीही परमेश्वर भक्तीत रममाण होऊ लागली. रामी घरात काही हवे नको बघायला लागली. अन् कधी नव्हे तो गोरोबांच्या घरी सौख्याचे, सौहार्दाचे नाते निर्माण झाले. 


गोरोबांचे पत्नीसह पंढरीस आगमन :
प्रत्येक महिन्याला पंढरपूरला गोरोबा जात असत. संतांची मंदियाळी घरी येऊन गेल्यापासून तर गोरोबा पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी उतावीळ झाले होते.कारण प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी कुंभाराचा वेष धारण करुन सात महिने सव्वीस दिवस आपल्या घरी राहिले.पण त्यांना आपण ओळखू शकलो नाही याचा गोरोबांना आणि त्यांच्या पत्नींना पश्चाताप झाला.देवराणा-पांडुरंग प्रत्यक्ष आपल्या घरी आला.पण त्याला आपण फक्त राबवून घेतले.म्हणजे प्रत्यक्ष परिस हाताशी लागला होता.पण तो दगड समजून आपण गोफणीत घालून भिरकावून दिला.इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने कामधेनू घरी आली. पण आम्ही काठीने मारून हाकलून लावली.याप्रकारचा पश्चाताप गोरोबाकाकांना झाला.आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा निर्धार केला.कारण आषाढी एकादशीला पांडुरंगाचे असंख्य भक्त पंढरीस येणार.टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका हरिनामाच्या संकिर्तनात व गजरात पंढरी दुमदुमून जाणार.आषाढी एकादशीच्या आदल्याच दिवशी गोरोबा काकांच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली.गोरोबांची मनाची अस्वस्थता संतीने ओळखली.संती गोरोबांची पंढरीला जायची तयारी करु लागली.ही तयारी करीत असताना संतीच्या अंतःकरणालाही कसली तरी अद्भुत ओढ लागली.गोरोबांना न सांगता तिनेही पंढरीला जाण्याची तयारी करुन ठेवली आणी रामीलाही शिदोरीची तयारी करुन ठेवायला सांगितले.संती व रामीच्या बारीकसारिक हालचालीवर गोरोबांचे बारकाईने लक्ष होते.    
पंढरीला निघता-निघता संती व रामीला विचारले की, उद्या आषाढ एकादशी आहे पंढरपूरला येता का! नव-याचे हे बोल ऐकून संती-रामी विलक्षण आनंदीत झाल्या.अन् गोरोबांच्या तोंडून आलेले ते वाक्य त्यांना सुखावून गेले.दोघीनीही होकार दिला.दोघीजणींना घेऊन गोरोबा आषाढी एकादशीवारीला पंढरीला निघाले.दोघीनी गोरोबांच्या पायाचे दर्शन घेतले.दोघींना दंडाना धरून उठवले.आणि सांगितले चला पंढरपूरला आणि अशारितीने गोरोबाचं सारं कुटुंबच पंढरीला निघालं.आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पहाटे गोरोबाचं कुटुंब टाळ-वीण्याच्या साथीत निघाले.दुपारी मध्यान्ह्याच्या सुमारास पंढरीला पोहचले.पंढरीच्या वेशीवर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसताच गोरोबासह संती-रामी यांची अंतःकरणेही विठ्ठल भेटीसाठी फुलून गेली.
पंढरीत येताच गोरोबा, आणि संती रामी यांनी चंद्रभागेत स्नान केले.भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतले.आणि सर्वांनी प्रफुल्लीत मनाने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला.आणि भक्तिभावाने भारावलेल्या अंतःकरणाने विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि विठ्ठल चरणी माथा टेकवून संती-रामीनं अंतःकरणातील अंहकाराचं, स्वार्थाचं विसर्जन करुन टाकले.गोरोबा सर्व विश्वाकडं समत्व भावनेने पाहणा-या, आणि सर्वांना त्याच भावनेने पहायला शिकविणा-या विठ्ठलाशी उराउरी भेटले.अशा या सगुण निगुर्णाच्या भेटीने गोरोबांच्या अंतःकरणाचा थेट ठाव घेतला अंतःकरणात भक्तिभावाचे अभंगरुपी पुष्प उमलले आणि देहभान हरपून ते मंदिराच्या गाभाऱ्यातच अभंग म्हणून लागले.

निर्गुणाच्या संग धरिला जो आवडी।
तेणे केले देशधडी आपणाशी।।
अनेकत्व नेले अनेकत्व नेले।
एकिले सांडिले निरंजनी।।
एकत्व पाहता अवघेचि लटके।
जे पाहे तितुके रुप तुझे।।
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव।
तुम्हा आम्हा नाव कैचे कोण।।

प्रारंभापासून गोरोबाकाकांनी निर्गुणाची प्राप्ती होण्यासाठी सगुण सावळ्या विठ्ठलाची परम भक्ती करायला सुरुवात केली होती.निर्गुणाचा ध्यास लागल्यानंतर जी उपासना केली जाते ती फलद्रुप होऊन निर्गुणाचा लाभ होतो.व्यावहारिक जीवन त्यामुळे पार पडते आणि इतकेच नव्हेतर अनेकत्वाचा लोप पावून अद्वैताचा साक्षात्कार होतो.हा झालेला अद्वैताचा साक्षात्कार विठ्ठल दर्शनानंतर प्रगट करतात.तसेच ईश्वर, जीव आणि जगत ही त्रिपुटी सोडून या तिन्ही तत्त्वांच्या ठिकाणी अद्वितीय परमात्मा तत्त्वाच्या ऐश्वर्याची अनुभूती प्रत्ययास येते.विठ्ठलाच्या दर्शनाने द्वैतभाव लोप पावून अद्वैतभाव कसा प्रकटला आहे तो सांगण्यासाठी म्हणजेच अद्वैतभावा चे वैभवशाली वर्णन ते वरील अभंगातून मांडतात आणि गोरोबाचे सारे कुटुंबच परमार्थमय बनले. असा हा गोरोबाकाका यांचा लौकिक पातळीकडून अलौकिक अशा पातळीकडे झेपावणारा भक्तिभावही येथे स्पष्ट होतो. 


गोरोबांना हात फुटले :
गोरोबा अभंग गात विठ्ठलाचे नामस्मरण करीत. मंदिराच्या गाभा-यातून बाहेर आले. विरक्त अवस्थेत असलेल्या गोरोबांना विठ्ठलांच्या मूर्तीवाचून दुसरं काही दिसत नव्हते. आता त्यांच्या नजरेस आलं की, महाद्वारात नामदेवाचे रसाळ कीर्तन चाललं होतं. नामदेव वीणा चिपळ्यांच्या साथीनं कीर्तन करीत होते. या कीर्तनात ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, वटेश्वर, चांगदेव, परिसा भागवत, सावता माळी, चोखामेळा, विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, जोगा परमानंद, मुक्ताई, जनाई इ. संतश़ेष्ठ मंडळी सहभागी झाली होती. सर्वजण नामदेवाचे कीर्तन एकाग्र चित्ताने ऐकत होते. नामदेवाच्या कीर्तनात विठ्ठल नामाचा गजर होत होता. त्या विठू नामाच्या गरजाने स्वर्गामध्ये ब्रह्मादीदेव तल्लीन झाले हेतो. सर्वजन देहभान विसरून टाळ्या वाजवित होते.    
हरिनामाचा गजर चालला होता. नामदेवाच्या कीर्तनात रंग भरू लागला होता. नामदेवाचे कीर्तनातील निरुपण ऐकून ज्ञानदेवादी सारे संतश़ेष्ठ तल्लीन झाले होते. नामदेव अभंग गातागाता निरुपण करु लागले. अन् त्यांना भक्तांना परमेश्वराने सांगितलेल्या नियत कर्तव्याची जाणीव करुन दिली. अन् अंतःकरणापासून सांगू लागले, "भाविकभक्तगण हो प्रथमतः परमेश्वराने तुम्हाला जीवन जगण्यासाठी जी नियम कर्तव्य सांगितली आहेत ती पार पाडली पाहिजेत. देव प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करावा असे कोणीच सांगत नाही. संसार हे देवाने तुम्हावर सोपविलेले कार्य आहे ते तुम्हाला केलेच पाहिजे. संसार करण्याचे कार्य तुम्ही टाळले तर तो देवाचा अपमान होईल का नाही? परमेश्वराने गीताईच्या रुपाने हा संसारधर्मच सांगितला आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी घरदार, बायकामुले म्हणजेच संसाराचा त्याग करता येत नाही. फक्त हा संसार कसा करावा ते समजलं पाहिजे. फक्त भक्तांनो होते काय? संसार करताना, संसारताप सांभाळताना प्रत्येकाला वाटते की हा "माझा संसार' अशी तुमची ठाम समजूत होते. पण हे चुकीचे आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही जो संसार करता तो तुमचा नसतोच. तो आगळ्या वेगळ्या अर्थाने परमेश्वराचाच असतो. संसारात राहून आपण जी कर्म करतो. पण त्यातला काही भाग इतरांसाठी करण्याचा तुमचा विचार पाहिजे. असा थोडासा विचार केला तर संसारातील दुःखाचा स्पर्श तुमच्या आत्म्याला होणार नाही. आपण आपली सारी कर्म ईश्वरचरणी समर्पित केलीत तर त्यातही तुम्हाला एक मुक्ततेची अनुभूती येईल. कर्मत्यागापेक्षा कर्माचा स्वीकार, आचार केला तर तुमची मुक्तता होण्याची शक्यता अधिक आहे. निष्काम कर्मयोग्यासाठी माणसाला आधी संसार करावा लागेल. इतकेच नव्हे तर आपला संसाराच परमार्थमय करुन टाकल्यास परमेश्वर प्राप्तीची आपली आकांक्षा तृप्त होईल. संसार करीत करीत पांडुंरंग नामस्मरण हे तुम्हाला सर्वोपयुक्त ठरणार आहे.'
नामदेवाचा हा भक्तिभाव अर्थातच व्यावहारिक भाव सगळेजण एकाग्र चित्ताने ऐकत होते. नामदेवाने संसार हे एक परमेश्वराने दिलेले नियत कर्तव्य कसे आहे? असे प्रतिपादल्यानंतर नामदेवानी शेवटी हरिनामाचा गजर सुरु केला. कीर्तनाला उपस्थित असलेल्या लोकांनी एका तालात टाळ्यांचाही गजर सुरु केला आणि त्यांच्या हातातील टाळांनाही कंठ फुटले. लोकांच्या उपस्थितीत संतश़ेष्ठ बेभान होऊन नामस्मरण करीत टाळ्या वाजवित होते. संती आणि रामीही टाळ्या वाजविण्यात अन् नामस्मणात मग्न झाल्या होत्या. गोरोबा काका मात्र टाळ्या वाजविण्यासाठी हात नाहीत म्हणून संचित होऊन बसले होते. नामदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा नामदेव काकांना म्हणाले, "गोरोबाकाका नामस्मरणात सामील व्हा. हाताने पांडुरंगाचे गुणवर्णन करा.' नामदेवांनी नामाचा उच्चार करण्यासाठी गोरोबासह सर्वांना हात वर करा म्हणून सांगितले.
वरती करा कर दोन्ही
पताकाचे अनुसंधानी ।।१।।
सर्व हस्त करिती वरी।
गोरा लाजला अंतरी।।२।।
नामा म्हणे गोरोबासी।
बरती करणे हस्ताशी।।३।।
गोरा थोटा वरती स्वीकारी
हस्त फुटते वरचेवरी।।४।।

याप्रमाणे नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे गोरोबाकाकांनी वरती हात करुन ते भजनात दंग झाले असता त्यांना वरचेवर हात फुटले. गोरोबांच्या थोट्या हातांना अचानक पंजे फुटु लागले. थोड्याच वेळात गोरोबांचे हात पूर्ववत झाले. त्यांना आश्चर्य वाटले. पांडुरंगाचाच हा कृपाप्रसाद आणि गारोबांचे अंतःकरणही भरुन आले. अन् इतराप्रमाणे टाळ्या वाजवू लागले. त्यांच्या आनंदाला आणि भक्तगणांच्या संतपरिवाराच्या आनंदालाही सीमाच उरली नाही. नामदेवाच्या कीर्तनाने नामस्मरणाने कृतकृत्य झालेल्या भक्तमंडळींनी नामदेवाचे अन् त्यापाठोपाठ गोरोबा काकांचेही दर्शन घेतले. 


संतीलाही तिचा बाळ-मकरेंद्र मिळाला :

परमेश्वराची लिलाच अगाध असते. नामदेवाचे कीर्तन निमित्त धरुन गोरोबा काकांना हात दिले. आपल्या नव-याला पहिल्यासारखे हात मिळाल्यामुळे त्यांच्या बायका संती व रामी या दोघींना आनंद झाला. त्याचबरोबर त्यांना संतांच्या अद्भूत सामर्थ्याचाही प्रत्यय आला. संती मनात विचार करु लागली. आपल्या नव-याला कीर्तनात हात प्राप्त झाले. मी मात्र देवाची अवकृपा झाल्याने बाळाविना राहिले. याचे अतीव दुःख तिला होऊ लागले. ती मनातल्या मनात पांडुरंगाचे स्मरण करु लागली, पांडुरंगाला आळवू लागली,"हे पतितपावन पांडुरंगा, माझे मूल तुझ्या दारी आले आहे. तेवढे मला परत दे. एका मातेचे दुःख तुलाच समजू शकते. माझ्या मनाचे दुःख जाणून माझे बाळ मला परत कर' असे म्हणून तिने पांडुरंगाचे चरणकमळ धरले "माझे बाळ मला परत करेपर्यंत मी तुझे चरणकमल सोडणार नाही' संतीचे ते दुःख पाहून नामदेव संतीला म्हणाले,"पांडुरंगावर दृढ विश्वास ठेऊन. "मकरेंद्राऽऽ झडकरी ये असा धावा कर". संतीनेही पांडुरंगाचे चरण धरुन मकरेंद्राऽऽ मकरेंद्राऽऽ ये! असा धावा करिताच. माता संतीचे प्रेम, वात्सल्य पाहून बाळ-मकरेंद्र दुडूदुडू रांगत आले. संतीने दुडूदुडू धावत येणाऱ्या मकरेंद्राला उचलून उराशी धरिले. तिचा बाळ तिला मिळाल्याने ती आनंदित झाली. गारोबा काका ही ह्या प्रसंगाने आश्चर्यचकित झाले.
संत वचन करावया सत्य।
देव कामे करी नित्य।।
स्वसत्ते काहीच न करीत।
मान देत संत वचना।।     

भाविकांनी येथे ही गोष्ट लक्षात घ्यावी की, गोरोबांच्या आयुष्यातील हा एक चमत्कार होय. यावरुन गोरोबाच्या जीवनाशी, प्रपंचाशी विठ्ठल किती एकरुप झाले होत. हे विशद करण्यासाठीच हा चमत्कारपूर्ण प्रसंग वर्णिलेला आहे. हा चमत्कार खऱ्या अर्थाने साधकांना चैतन्य आणि चेतना देणारा आहे. मंडळीचे गोरोबांच्या घरी आगमन झाल्याने त्यांच्या घराला एक घरपण प्राप्त झाले. 

गोरोबांनी विरक्तीतून संसारात पदार्पण केले :
गोरोबांचे कुटुंब जणू सर्वच विठ्ठलमय झाले होते. आता केवळ परमेश्वर गुणगाण जपणे होते. पुढे गोरोबांची शपथही सुटली होती. कारण प्रत्यक्ष गोरोबांच्या स्वप्नात येऊन तसेच विठ्ठलाने सांगितले होते. अन् पांडुरंगानेही सांगितले की, "माझी शपथ मी काढून घेतली आहे. आता गृहंपुत्र दारा सुख भोगुनी. संसारी वर्तावे सुखरुपा. आणि मग गोरोबांचा संसार आता खरा समाधानी व आनंदमय बनला, संती आणि रामी यांच्याशी गोरोबा एकरुप झाले आणि हे सर्व कुटुंबच परमेश्वरमय झाले. गोरोबा हे विरक्तीतून परमश़ेष्ठ विठ्ठलभक्त झाले. त्यांच्या कुटुंबात परमेश्वर वृत्तीचा विकास झाला. सारे कुटुंब विठ्ठल भक्तीत रंगू लागले. मुळातच संत गोरोबाकाकांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच. आता सारे कुटुंबच धार्मिक वृत्तीचे बनले. तोच संस्कार घेऊन संती व रामीही उर्वरित आयुष्यात विठ्ठल भक्तीत रमत संसार करु लागल्या. 

संतपरीक्षक गोरोबा कुंभार :
"ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीत' संत शिरोमणी गोरोबा वयाने जेष्ठ होते. लोक त्यांना आदराने गोरोबाकाका म्हणत। श्री संत गोरोबाकाका भक्ती आणि नामस्मरण या साधनांद्वारे "नराचे नारायण झाले' म्हणजेच विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले. अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची भक्तीची किमया सर्वांना पटवून समजावून दिली. म्हणून संत परिवारात ते वडिलधारी तर होतेच त्याच्याबरोबर आदरणीय, वंदनीयही होते. कारण गोरोबांचा परमार्थिक अधिकारच मोठा होता. प्रपंच करुनही परमार्थ साध्य करणारा हा वैरागी पुरुष अनंत, निर्गुण, निराकार, अशा परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे "काका'. म्हणून सर्वजण त्यांना "काका' या नावाने हाक मारीत असत. गोरोबाकाका यांच्या जीवनचरित्रातून त्यांची आध्यात्मिक भाववृत्ती "विठ्ठलमंत्र सोपा असूनही एकवेळी तरी उच्चारावा' ह्या संदेशातून स्पष्ट होते. ते परमेश्वराचे पांडुरंगाचेही आवडते भक्त होते. गोरोबांच्या ठिकाणी समर्पणाचा भाव असल्याने अहंकाराला थारा नव्हता. याचे कारण गोरोबांच्या ठिकाणी असलेला भक्तिभावच त्यांना परमेश्वराप्रत नेणारा होता. पण ही गोष्ट नामदेवाला मात्र मान्य नव्हती. त्यांना असे वाटत होते की आपल्या इतका पांडुरंगाचा आवडता निःसिम भक्त कोणीच नाही. हा नामदेवाचा अहंकार होता. हा नामदेवाचा अहंकार घालविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक युक्ती योजिली. एकदा नामदेव आळंदीत आले असताना गोरोबाकाकांना ज्ञानेश्वरांनी आळंदीस बोलावून घेतले. यापाठीमागील ज्ञानेश्वरांची भूमिका ही होती की, नामदेवाच्या ठिकाणी असलेला अहंकार घालवणे. कारण अहंकाराच्या ठिकाणी समर्पणाचा भाव राहत नाही.
ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी एकदा पंढरपुरास गेली असता कीर्तन संपल्यावर सर्व संतांनी काकांना नमस्कार केला होता. पण नामदेवाने अहंकाराने नमस्कार स्वीकारल्याचे दाखवले नाही. त्यावेळी मुक्ताबाईंही नामदेवावर चिडली होती.
ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला सांगितले की,""गोरोबाकाका आळंदीला येतील। निःस्सीम भक्तिभावाने ते परमेश्वराप्रत गेलेले आहेत. जन्मभर त्यांनी मडकी भाजलीत आणि त्यामुळे कच्चे मडके पक्के मडके ओळखण्यात ते वाकबगार आहेत. आता आपण सर्वांचीच परीक्षा त्यांच्याकडून करुन घेऊ. कारण संतपरीक्षा घेण्याचा त्यांचाच अधिकार आहे. ज्ञानदेवाचा हा विचार मुक्ताबाईस पटला. तीही या गोष्टीला तयार झाली. सर्व संतांना ही कल्पना आवडली. पण नामदेवाला या गोष्टीचा थांगपत्ताही कुणी लागू दिला नाही. फक्त नामदेवाला एवढेच कळले की गोरोबाकाका आळंदीस येणार आहेत.
गोरोबा काका आळंदीत येऊन पोहचले. आळंदीत सिध्देश्वराच्या देवळात सर्व संत मंडळी एकत्रित भक्ती रुपाची चर्चा करीत होते. परंतु नामदेव मात्र एकटेच कोपऱ्यात बसून नामस्मरण करीत होते. गोरोबा काका आल्याचे समजताच सर्व संतमंडळीकडून त्यांचे स्वागत केले. ज्ञानेश्वरांनी, निवृत्तीनाथांनी, सोपानदेव व मुक्ताबाई यांनी आणि सर्व संतमंडळींनी त्यांना विनम्रभावे नमस्कार केला. नामदेव मात्र कोप-यात नामस्मरण करीत बसले होते.
गोरोबाकाका यांची नामदेवाकडे नजर गेली. काकांना वाटले की नामदेव नामस्मरणात एकाग्र झाला असावा म्हणून ते थेट नामदेवाकडे गेले आणि नामदेवाच्या पायाचे दर्शन घेतले. नामदेव थोडे गोंधळले. पण अहंकार मनी असल्याने त्यांनी मनाला विचार केला की आपणच थोर भक्त आहोत. त्यामुळे गोरोबांनी आपल्याला नमस्कार केला म्हणून काय झाले. गोरोबाकाका यांनी निर्लेप, निरंकारी भावाने नामदेवाला नमस्कार केला. गोरोबांच्या ठिकाणी असलेल्या समत्वबुध्दीचे सर्वांना कौतुक वाटले. त्यांनी हातपाय धुतले आणि संतमंडळीत येऊन बसले. ज्ञानदेव व गोरोबाकाका यांचा संवाद घडला. त्याने गोरोबाकाका मनोमनी सुखावले.
मुक्ताबाईकडे मिस्किलपणे पाहत ज्ञानदेव गोरोबा काकांना म्हणाले, "" काका तुम्ही आयुष्यभर मडकी भजली आणि आव्यातून मडकी काढून कोणतं मडकं कच्च कोणतं मडकं पक्क याची परीक्षा करीत आला आहात.'' गोरोबांनी ज्ञानेश्वरांना उत्तर दिले की,""ते माझे नियत कर्तव्य आहे ते मी करीत आलेलो आहे.'' त्यावर मुक्ताई म्हणाली,""काका तुम्हाला मातीच्या मडक्याबरोबरच माणसांची मडकी कच्ची आहेत की पक्की हे आपण सहज ओळखत असाल तेव्हा आपण आपल्या अनुभवाच्या थापटण्यानं आम्हा संतमंडळीतील कच्ची मडकी कोणती? व पक्की मडकी कोणती याची परीक्षा घ्यावी. दुरुन हा ज्ञानदेव मुक्ताई गोरोबाकाका यांचा संवाद नामदेव ऐकत होता.
गोरोबाकाकांनी सर्वांचे म्हणणे ऐकून हाती थापटणं घेतले आणि संतपरीक्षा घ्यायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी निवृत्तीनाथाच्या डोक्यावर थापटणं मारलं त्यावर निवृत्तीनाथ काहीही बोलले नाहीत, ज्ञानदेवाच्या डोक्यावर थापटणं मारल्यावर तेही गप्पच हाते, नंतर सोपान, मुक्ताबाई, सावतामाळी, चोखामेळा या सर्वांच्या डोक्यावर थापटणं मारले पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यावर गोरा काकांनी आपले मत दिले की ही सर्व मडकी चांगली भाजलेली आहेत. आता नामदेवाची पाळी आली. गोरोबाकाका नामदेवाकडे वळले आणि नामदेवाच्या डोक्यात थापटणं मारले. त्याबरोबर नामदेव कळवळले आणि डोके चोळीत बसले. त्यावर गोरोबाकाका म्हणाले,""अरेरे, एवढं मडकं तेवढं कच्च निघालं. या मडक्याला अजून भक्तीच्या आव्यात आतून बाहेरुन चांगलंच भाजून काढले पाहिजे.'' संत नामदेवांच्या मनातल्या अहंभावनेवर ही मार्मिक टीका गोरोबांनी केली.
गोरोबांच्या वरील अभिप्रायावरुन सर्व संतमंडळी हसली. नामदेवाला हा अपमान वाटला. त्यांना रडू कोसळले शेवटी ज्ञानदेव नामदेवाजवळ गेले आणि म्हणाले,""तू परमेश्वराचा थोर भक्त आहेस. पण तुझ्या ठिकाणी अहंकारभाव असल्याने समर्पणाचा भाव राहत नाही. आता तू गुरुचा आशिर्वाद प्राप्त करुन घे. त्याशिवाय तुला खरा परमार्थ कळणार नाही'' ज्ञानेश्वरांच्या सांगण्याप्रमाणे नामदेवाने विसोबा खेचरांना पुढे गुरु करुन घेतले.
अशाप्रकारे नामदेवाच्या ठिकाणी असलेला अहंकारभाव गळून गेला. त्यांनी पंढरीत जाऊन विठ्ठलाकडे गा-हाणे सांगितले. विठ्ठलांनी त्यांना सांगितले की,""गोरोबाची कृती संयुक्तिक आहे.'' या प्रसंगातून नामदेवाचा अहंकार गळाला. पण नामदेवासारख्या थोर भक्ताला दुखावल्याचे दुःखही गोरोबाकाकांना झाले. कारण जशी त्यांनी नामदेवावर टीका केली, तशी नामदेवाविषयी त्यांच्या मनात आदाराचीही भावना होती. नामदेवाविषयीच्या आदरयुक्त भावनेचा प्रत्यय त्यांच्या एका अभंगातही येतो, ते आपल्या एका अभंगात म्हणतात,

"कवण स्तुति करु कवणिया वाचे
ओघ संकल्पाचे गिळीले चित्ते।। १।।
मन हे झाले मुके, मन हे झाले मुके
अनुभवाचे हे सुखे हेलावले।।२।।
दृष्टीचे पहाणे परतले मागुती राहिली
राहिले निवांत नेत्रापती।।३।।
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे
जीवे ओवाळावे नामयासी।।४।।

परमेश्वराचे स्तवन कोणत्या वाणीने करावे? सुखाचा, समाधानाचा अनुभव इतका उत्कट आहे की मनाची भाषा मुकी झाली. मौनातले सुख घ्यावे. आपले जीवन नामदेवाला वहावे. येथे नामदेव हा शब्द गोरोबांनी परमेश्वर या अर्थानेही वापरला असावा. असे हे संतपरीक्षक गोरोबाकाका! 

तेर गावी गोरोबाकाका समाधीस्त :
शालीवाहीन शके ११०० मध्ये अनेक संतांनी अवतार घेतले. अन् भक्तीच्या मार्गाचा प्रसार करुन त्यांनी जनकल्याणाचे दैदीप्यमान असे कार्य केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आजही जनमाणसांच्या मनावर उमटलेला आहे. "ईष्वरनिष्ठांच्या मांदियाळी' ने जनकल्याणासाठी तीर्थयाख केल्यानंतर ते धन्य पावले. त्यानंतर अनेकांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, चांगदेव, निवृत्तीनाथ, इ. नी समाधी घेतली. मुक्ताई ग्रह्मस्वरुप लीन झाली. या संतांच्या समाधी सोहळ्यास पांडुरंगासंगे गोरोबाकाकाही होते. त्या समाधी प्रसंगांचे वर्णन नामदेव गाथेत नामदेवांनी केलेले आहे ते वाचकांनी वाचावे. पांडुरंगाच्या हस्ते सावतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, कुर्मा, विसोबा खेचर इ. चारही समाधी सोहळा पांडुरंग हस्ते पार पडला.    
अशा प्रकारे वैष्णव समुदायाचा समाधी सोहळा संपन्न झाला. अन् सकल संत समाधीस्त झाल्याने दुरावले. सकलसंत निजधामा गेल्याने गोरोबाकाका मनाने खिन्न झाले. सकल संतांचे अभंग गाऊन पांडुरंग गोरोबाकाकांचे सांत्वन करु लागले. पण गोरोबाकाका विठ्ठलाला म्हणू लागले. संतसंगविना माझे कशातही लक्ष लागत नाही, मनाला समाधान लाभत नाही, संतसंगाशिवाय मला कशाचीही गोडी वाटत नाही, उदा, खिन्न गोरोबाकाका पांडुरंगाच्या मुखाकडे पाहत आणि व्याकुळ होत होते. चैत्र वैद्य दशमी दिवशी गोरोबाकाका खिन्न मनाने विचार करु लागले, ""संतदर्शनाला आता मी पारखा झालो.
संताशिवाय माझे दुसरे कोणीही सोयरे नाहीत. संतसंगतीशिवाय मला दुसरे काही आवडत नाही. संत प्रेमानी मला वेडे केले आहे. संतांच्या प्रेमात मी बांधला गेलो आहे. त्यांच्या प्रेमामुळे मला मी विसरलो आहे.'' पांडुरंगाने गोरोबाची ही स्थिती जाणली आणि गरुडाला सांगून पंढरपुरातून रुक्मिणीसह ज्येष्ठ-श़ेष्ठ अशा वैष्णव भक्तांना तेरला आणावयास सांगितले. भक्त पुंडलिकासह रुक्मिणी सनकदीक, नारद इ. ची दाटी झाली. पांडुरंगाने गोरोबास अलिंगन दिले. भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाहून सकलसंतांच्या डोळ्यात आनंदाश़ू उभे राहिले. पताका, टाळ, दिंडीसह संतमंडळीही गंध, चंदन, बेलाची पाने, अक्षता, अर्पूण, निरंजन लावू लागले. प्रत्येकजण संत गोरोबाकाकांना प्रेमभरे भेटू लागले आणि समाधीसाठी आवश्यक असणारी शेज पांडुरंगाने तयार केली. नामाचा गजर करुन इ.स. १३१७ (शके १२६७) साली कृष्णपक्ष त्रैयोदशीस दुपारच्या समयी तेर येथे पांडुरंगानी गोरोबाकाकांना समाधीस्थळी बसविले. तेर येथे कालेश्वर लिंगाशेजारी गोरोबांची समाधी आहे.
अशारितीने श्री गोरोबाकाका यांचे व्यक्तिमत्व, जीवन चरित्र अलौकिक असेच होते. ते परग्रह्म होऊन जीवनमुक्तांचे जीवन जगले. गोरोबाकाकांच्या जीवनचरित्र वाचनाने या जगातील अज्ञानी लोक जितके शहाणे होतील तितके अधिक या भूमंडळातील लोकजीवनातील दुःखे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर रामनाम जपाने गणिकेचा उध्दार झाला अजामिळाला मुक्ती मिळाली. पापी लोक हरिनामाने तरले हे आपणां सर्वांना ज्ञात आहेच. म्हणून संतशिरोमणी गोरोबाकाका यांच्या जीवनचरित्रातून एकच संदेश घेता येईल, असे वाटते तो म्हणजे, "विठ्ठलमंत्र सोपा असुनी एकेवळी तरी उच्चारावा' या मंत्राने साधक व भाविक भक्तांचे, जनसामान्यांचे जीवनतंत्र सुधारेल. जनसामान्यांना त्यांचे जीवन आदर्श भक्त कसा असावा? यासाठी प्रेरणादायी चैतन्यदायी असे वाटते. 


गोरोबाकाका यांच्या कार्याची महती :

श्री.संत गोरा कुंभार यांचे जीवन एका सर्वसाधारण कुटुंबात व्यतीत झाले परंतु त्यांनी आपला भक्तीभाव जपला अन् आपला प्रपंच परमार्थमय करुन टाकला. संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा मानला नाही.
   

श्री.संत गोरोबाकाका यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे करणी करे तो नरका नारायण' होईल म्हणजेच "विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले' अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया त्यांनी सर्वांना पटवून दिली. संत गोरोबा संत-मंडळात "वडील' होतेच इतकेच नव्हे तर महाभागवतानाही आदरणीय, वंदनीय होते. संत गोरोबा विरागी पुरुष होते. अनंत, निर्गुण, निराकार अश परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे "गोरोबा' म्हणून सर्व संत त्यांना "काका' उपाधी बहाल करतात.पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात,

"तूझे रुप चित्ती राहो। मुखी तुझे नाम।
देह प्रपंचाचा दास। सुखे करी काम।।
देहधारी जो तो त्याचे। विहीत नित्यकर्म।।
तुझ्या परी वाहिला मी। देहभाव सारा।।
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा।।
नाम तुझे गोरा। होऊनि निष्काम।।'

गोरोबांच्या ह्या अभंगातून कोणीही अनन्य भावांनी वारकरी पंथात यावे कपाळी अबीर बुक्का लावावा. गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगांच नामस्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा. शुध्द अंतःकरणात फक्त भक्तीभावावरुन कळी फुलून द्यावी. म्हणजेच त्या भक्तीचा परिमल सर्वत्र दरवळतो. इतकेच नव्हे तर तो "देवाचा लाडका पुत्र म्हणून सन्मानित होतो' त्यापैकीच गोरोबाकाका होत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे "संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे सदोदीत.' संत गोरोबा संसारात राहत होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती. "कासयासी बहु घालिसी मळण. तुज येणेविण काय काज. एकपणे एक एकपणे एक. एकाचे अनेक विस्तारले' हा त्यांचा पारमार्थिक भाव होता

मराठी संतांनी भक्तिमार्गाची कास धरुन भागवत धर्माचा पुरस्कार केला. माणसे सुधारावीत त्यांच्यातील मानवाची, माणुसकीची पातळी उच्चतम करावी, याच तळमळीने संत उपदेश करीत असतात. सात्त्विकपणा, शुध्दाचरण, सद्गुण यांचा विकास आणि श़ध्दामय जीवन याविषयी सर्व संतमंडळींचा स्थायीभाव होता. स्वतः संत व्हावे सभोवतालच्या लोकांवर संतपणाचे संस्कार करावेत. संतपण समाजात पसरावे अशी तळमळ मराठी संतांना होती. आणखी संतांचे विशेष सांगावयाचे म्हणजे "संत जनहिताची मनोगते, संत श़ध्देची अंतःकुजिते, सदा संत देती स्फुर्ती, संत निर्वाणीचे सोबती, संत निर्गुणाचे गुणाकार, संत भवरोगाचे भागाकार, संत पाप तभसी भास्कर, संत वैद्य सर्वांना हे सर्व विशेषभाव इ. ज्यांच्या जीवनचरित्रात आढळतात. त्यापैकी संत शिरोमणी गोरोबाकाका एक होत.

संत गोरोबांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व प्रसार करणे. त्यांनी स्वतःचा पारंपारिक कुंभार व्यवसाय करीत संसारही केला आणि संतपणाही सांभाळीत भागवत धर्माची प्रतिज्ञा पार पाडली. भागवत धर्माच्या या प्रतिज्ञेशिवाय पंढरीचा वारकरी मनुष्यच ठरत नाही. जो उगवला दिवस देवाला स्मरुन सार्थकी लावतो तोच वारकरी ठरतो. मग तो आपल्या घरीदारी, नियत कर्तव्यकर्मात, अरण्यात, डोंगर द-याखो-यात कोठेही असो. जे स्वार्थनिष्ठ, लोभी ते वारकरी संत नाहीत. निरनिराळ्या सांप्रदायिक स्वरुपाचे कोणी मानवमात्राच्या कल्याणाचा ध्यास घेणारे, त्याचाच सतत विचार करतात तेच साधुसंत होत. अशा साधुसंतांच्या पुण्याईने समाज साजिवंत राहत असतो. असा महाभाग संसारीही असू शकतो. आपल्या अश़ितांचे भयापासून संरक्षण करावे हा क्रम गृहस्थाश़मी संत सतत पाळत असतात संत गुणदोषांची पारख करुन जनसामान्यातला परमेश्वर जागा करण्याचा प्रयत्न श़ध्देने करतात. याचबरोबर जनकल्याणाचे कार्य निरपेक्ष भावनेने करतात. या कार्यालाच यज्ञ म्हणतात. "जे जे आपणाशी ठावे. ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करुन सोडवे सकळ जन..' या उक्तीप्रमाणे ते संत ज्ञानयज्ञ करतात. जनयज्ञ करतात तो त्यांचा पुरुषार्थ अपूर्वच होय. संतांचे अभंग वाङ्मय जे अभंग असते. ते भाविकांस भेटले की, तो आपण होऊनच संतांचा गुणगौरव करतो. संत मात्र रसिक, भाविक,वाचक, अभ्यासक आणि समिक्षकांच्या "निंदा स्तुतीवर लावोणी फाटी' म्हणजे त्यांच्या टीका टिपणीचा विचार न करता त्यांचा ज्ञानयज्ञ आणि जनयज्ञ आपण असेतोपर्यंत व पश्चातापही सातत्याने पाळलेला असतो. संत शिरोमणी गोरोबाकाका यांची अभंग संख्या कमी असली तरी अभंगवाणीत आढळणारी उत्कटता, भावसमृध्दी यामुळे संतमेळ्यातील त्यांची अभंगरचना त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देणारी आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे अभंग त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांच्या अभंगवाणीतून साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, उत्कट भक्तीचा अनुभव, अनुभवाची संपन्नता, पवित्र आणि समृध्द असा ज्ञानानुभूतीचा प्रत्यय ही त्यांच्या अभंगवाणीतून प्रत्ययास येतो

नुसतीच व्यर्थ बडबड करणा-यांच्या निरर्थकतेला रामराम करुन अशा आजच्या जमान्यात "देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.' अशा "निश्चयाचा महामेरु', "आवडता डिंगरु केशवाचा' असे संतशिरोमणी गोरोबाकाका समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्रह्मांडाशी एकरुप झाल्याचा असा विलक्षण अनुभव घेतो की, जो योग्यानासुध्दा दुर्मिळ असतो. अद्वैताचा हा अवर्णनीय आनंद आपल्या दरिद्री प्रपंचात राहूनच त्यांनी प्राप्त केला आहे. अभेदाचे बौध्दिक ज्ञान वेगळे, हे सुखाचे सुख, हे भाग्याचे सौभाग्य, हा अत्यानंदाचा आनंदकंद, गोरोबाकाका आपल्या भक्तिभाव बळावर मिळवू शकले. अन् "मौनं सर्वार्थ साधनम्' असे ब्रीद उरी बाळगणाऱ्या शीलवान कर्मयोग्यास अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले होते. संत गोरोबाकाकांनी अनंत काळाला आपल्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा, कर्तृत्वाचा जो आदर्श निर्माण केला होता तो इतिहासाला कदापिही विसरता येणार नाही.
 
लेखक- डॉ. प्रकाश कुंभार