Friday 14 December 2012

गोव्यातील जेवणखाण



गोव्यातील जेवणखाण ही नेहमी आनंददायक घडामोड असते. सगळ्यांच्या रोजच्या जगण्यातला महत्त्वाचा भाग या घडामोडीभोवती रचलेला असतो. गोव्याच्या संमिश्र इतिहासामुळे त्याच्या खाण्यापिण्यात असंख्य तरहा निर्माण झालेल्या आहेत. गावठी भाज्यांपासून रानडुकरापर्यंत अनेक प्रकार तेथे प्रसिद्ध आहेत. आणि अन्य कोणत्याही भागाप्रमाणे तेथेही सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी हॉटेलवर अवलंबून राहता येत नाही. पण अनेक गोष्टी हॉटेलमध्येही उत्तम मिळतात. गोव्यात प्रवास करणे हे मात्र फार जिकिरीचे काम आहे. पुन्हा महागही. उदा. मुंबईहून गोव्याला तुम्ही अडीच-तीन हजार रुपयांत जाता. म्हणजे सहाशे किलोमीटर. पण तेथून पंधरा किलोमीटरच्या गावी जायला तुम्हाला आठशे रुपये खर्च करावे लागतात. तेच तुम्ही विमानतळावरून एका मिनिटांत मुख्य रस्त्यावर येऊ शकता आणि बसने तेवढय़ाच अंतरासाठी पंधरा रुपये पुरेसे असतात. अर्थात, तुम्ही सहा-सात वाजेपर्यंत पोचलात तर.
गोव्यात दिवसाची सुरुवात नाश्त्यापासून होत नसते, तर दुपारच्या जेवणापासून होत असते. याचा अर्थ नाश्ता महत्त्वाचा नसतो अशातला भाग नाही. पण गोवेकराचा दिवसाभरातला मोठा भर असतो, तो दुपारच्या जेवणावर. बहुतेक ठिकाणी आठवडाभराचा मेनू ठरलेला असतो. पण गोवेकराचा दिवसाचा मेनू त्याला बाजारात काय हाती लागेल यावर ठरत असतो. त्यासाठी तो त्याच्या सोयीनुसार बाजारात फेरफटका टाकतो. आणि या सर्वाच्या सोयीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक-दीड वाजेपर्यंत मासळी बाजार भरलेला असतो. सकाळी लवकर कामावर जाणारी मंडळी एकतर सकाळी लौकर बाजार करून आणतात किंवा काम लवकर आटोपून मध्ये अकरा बाराच्या दरम्यान वेळ काढून ही जबाबदारी पार पाडतात. काही जणांची ही वेळ ठरलेली असते. दुकान नोकरावर सोपवून याच सुमारास मालक मासळी बाजारात असतो. काही वेळा नेहमीची गिऱ्हाईके बाजारातच व्यवहार करतात. म्हणजे दोघांचे काम होते आणि दोघांचाही वेळ वाचतो.
पुरुषमंडळी घरी नसली तर मासे आणायची जबाबदारी बायकांवर येते. त्यांच्यासाठी सायकलला टोपली
बांधलेला मासेविक्रेता किंवा डोक्यावरून टोपलीतून मासे घेऊन जाणारी मत्स्यगंधा या वरदान ठरतात. फक्त एवढंच की त्यांना बाजारातल्या इतका चॉईस मिळत नाही. नियतीवर भरोसा हा याच बाबतीत ठेवला जातो.
गोव्यात माशांना खूप महत्त्व आहे. मासे रोज, आठवडा-दोन आठवडय़ातून एकदा चिकन आणि महिन्यातून एकदा मटण. भाजी अधूनमधून, एक्स्ट्रा ऐवजी नाही. बाजारात गेलात की काही ठळक प्रकारातले मासे उपलब्ध असतात. एकतर मोठे मासे. सुरमई, पालू, मोरी, रावस, तांबसो वगरे. मध्यम आकारात पापलेट, सोनयाळे, बांगडे आदी मासे. छोटय़ा आकारात तारले, मुडदोशी, वेल्ली आदी. आणि अगदी छोटे करबट. म्हणजे त्यात अनेक प्रकारचे बोटापेक्षा लहान आकाराचे मासे असतात. मग खेकडे, सुंगटा, कालवं, खुबे, माणकी आदी प्रकार.

मुंबईत वगरे मासे घेतले की मासे विकणारी ती साफ करून, कापून देते. कोळंबी घेतली तरी सगळ्या कोलंब्या सोलून मिळतात. पण गोव्यात असले लाड मच्छीवाली करत नाही. कारण मुळात ती मासे बाजारात आणून सगळ्यांवर जेवढे उपकार करते, त्याचीच परतफेड होणे शक्य नाही, तर आणखी काय करणार तीन हजार रुपये देउन एक मीटर लांबीचा मासा घेतला तरी ती जसे आहे, जेथे आहे तत्त्वावर ती तो मासा विकते. त्यामुळे अशा वेळी मोठे मासे विकणाऱ्यांच्या बाजूलाच फक्त मासे कापून देणारे असतात. ते विशिष्ट मोबदला घेऊन हे
काम करून देतात. येथे प्राचीन बार्टर सिस्टीम अजून सुरू आहे. एकतर त्याची ठरलेली रक्कम (ही माशाच्या आकारानुसार बदलत नाही) देउन किंवा माश्याचं डोकं देऊन बाकीचा मासा कापून घेऊन जाऊ शकतात. मग हे लोक जमलेली डोकी स्वतंत्रपणे विकतात.
मासे विकणारीला किंमतीवरून खूप घासाघीस केलेली आवडत नाही. मुंबईत मासेवाली वाईट वाटून घेत नाही. पण घासाघीस केली की तो तिच्यापेक्षा माशांचा अपमान होतो. आणि मासा आपला सन्मान राखण्याच्या स्थितीत उरलेला नसतो. माशांचा सन्मान राखण्यासाठी ती मोफतमध्ये भांडते आणि माशाच्या अपमानाची परतफेड करते. तिचा मासा चांगला असेल तर तुम्ही घासाघीस करण्यासाठी मनातल्या मनात आकडा जुळवेपर्यंत एखादा जाणकार भाटकार तो मासा अलगद उचलतो. बाकीचे मासे घरी आहे तसे आणले जातात. मग मासे साफ करणे हे एक काम घरवालीवर येते. हे कसब आणि कौशल्याचे काम असते. खरा गोवेकर कधीच वाटण करून ठेव अमुक आणतो, असं कधीच सांगत नाही (आणि सांगू शकत नाही.) तो आधी आणतो आणि ते बघून घरवाली त्याचे वाटण ठरवते. गोड मासे वेगळ्या प्रकारे, बाकी मासे वेगळ्या प्रकारे, पुन्हा प्रत्येक मासा अनेक प्रकारे बनवता येतो. उदा. विसवण म्हणजे सुरमई किंवा पापलेट हे गोड प्रकारचे मासे मानले जातात. यांचा कांदा घालून रस्सा होतो तसेच ते तळायला उत्तम असतात. सुरमईचे
डोके मोठे असते. त्याच्या तुकड्यांचा कोरडा रस्सा करतात. आल्याचा स्वाद देऊन हे तुकडे भाडय़ाला लागून किंचित करपतील असे बघतात. गोव्यात गेलात आणि तिथल्या कोणत्याही किनाऱ्यावर नाही गेलात याचा अर्थ तुम्ही अंथरुणाला खिळलेले आहात असाच असू शकतो. धडधाकट असूनही जर तुम्ही गेला नाहीत तर मात्र तुम्ही चारधाम यात्रेला निघालेल्या गाडीऐवजी चुकीच्या गाडीत बसून गोव्याला पोचलात असाच अर्थ असू शकतो.
गोव्याचे किनारे मात्र बिघडत चाललेत. इथे येण्यापेक्षा चारधाम यात्रा परवडली, असे नक्की वाटावे, अशी स्थिती आहे. इथला सर्वात प्रसिद्ध किनारा कळंगुट हा अत्यंत अस्वच्छ झालेला आहे. पाण्यात खूप कचरा आहे आणि मोटर बोटिंग प्रकारामुळे समुद्रात प्रचंड डिझेल मिसळलेले आहे. गोव्यातील हा किनारा सर्वाधिक हॅपिनग होता आणि आता मी तेथे स्वत: पुन्हा जाणार नाही आणि कुणाला जायची शिफारस करणार नाही. पुन्हा तेथे खास गोमंतकीय खाद्यपदार्थ मिळायची मारामार आहे. सगळे पदार्थ पंजाबी स्टाईलमध्ये किंवा उडपी पद्धतीने बनतात. एखादं चुकार छोटंसं बार अँड रेस्तरॉं सापडलं तरच गोव्याचा स्वाद हाती लागण्याची शक्यता असते. नाश्त्यासाठी एकही गोमंतकीय हॉटेल नाही. जेवणासाठीही नाही. श्ॉकवर चांगलं जेवण मिळतं पण किमती भरमसाट आणि त्यात ते गोमंतकीय असण्यापेक्षा फॉरेनरसाठी कॉन्टीनेंटल अधिक असतं.

अलीकडच्या काळात माझा आवडता किनारा आहे पाळोळे. दक्षिण गोव्यातील हा अर्धचंद्राकार आकाराचा किनारा अद्याप स्वच्छ आहे. खूप अस्ताव्यस्त वाढलेला नाही. खाण्यापिण्याच्या दृष्टीने अधिक चांगला आहे. अत्यंत शांत. त्यामुळे अलीकडे परदेशी आणि देशीही पर्यटक या किनाऱ्याकडे अधिक आकर्षति होतात. येथे
माशांपासून पोर्कपर्यंत सर्व प्रकारचे उत्तम जेवण मिळते. येथे आम्हाला उत्कृष्ट बीफ आणि पोर्क मिळालं. आम्ही भरदुपारी एक वाजता पाण्यात शिरलो आणि तीन वाजता पाण्यातून बाहेर आलो. कडाडून भूक लागलेली. तेथे गरमागरम रोटय़ाही दुपारी साडेतीन वाजता मिळाल्या. व्वा. गोव्यात मडगाव, पणजीकडे दुपारी चारनंतर भटकताना मुंबईत वडय़ाच्या गाडय़ा लागतात त्याप्रमाणे रस्सा ऑमलेटच्या गाडय़ा लागतात. सोबत समोसे, मिर्ची भजी आणि साधी भजी असा मेनू असतो. रस्सा ऑमलेट म्हणजे नेहमीसारखे कांदा, मिर्ची, कोिथबीर, मीठ घातलेलं ऑमलेट असतं, आणि त्यावर गोमंतकीय चिकनचा जाडा रस्सा टाकला जातो. तो दुपारी ताज्या बनवलेल्या पावांसोबत मिर्ची भजी, समोसा याचा आस्वाद घेत खायचं असतं. किंवा नुसती मिर्ची भजी खाल्ली तरी चालतात. पण रस्सा ऑमलेट म्हणजे खास अनुभव असतो.
गोव्यात जावं कालवं, तिसऱ्या किंवा खेकडे खायला. त्यासाठी उंची हॉटेल्समध्येच त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे असं नाही. घरी अत्यंत साध्या पद्धतीने बनवलेले खेकडे उत्तम बनतात. कारण ते ताजे असतात. पटकन तयार होतात.
गोव्यात जावं कालवं, तिसऱ्या किंवा खेकडे खायला. त्यासाठी उंची हॉटेल्समध्येच त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे असं नाही. घरी अत्यंत साध्या पद्धतीने बनवलेले खेकडे उत्तम बनतात. कारण ते ताजे असतात. पटकन तयार होतात. उदा. मीठ, मिरची पावडर आणि हळद पावडर याचे मिश्रण लावून रवा लावून तव्यावर तेलात परतलेले खेकडे अप्रतीम लागतात. तेल नको असलेले लोक मायक्रोवेव्हमधूनही ते बनवू शकतात. फक्त त्याला सगळं वाटण लावून थोडा वेळ ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर मसाला आतपर्यंत मुरत नाही. खेकडय़ाचा रस्साही खासच असतो. त्यात छोटे खेकडे मजा आणतात. कालवांचा प्रकार अत्यंत नाजूक. पण काही ठिकाणी ही समुद्रअंडी मोठ्या आकारातही सापडतात. ती नुसत्या गरम तव्याच्या स्पर्शाने भाजून निघतात. त्याची भाजीही उत्तम बनते. छोटय़ा आकाराची कालवं असली की त्याचा रस्सा बनवतात. तसाच प्रकार तिसऱ्यांचा. अत्यंत छोट्या आकारापासून म्हणजे एका सेंटीमीटरपेक्षा लहान आकारापासून दोन इंचापर्यंतच्या आकारात िशपले सापडतात. त्याचे तळणे, रस्सा, डांगर आणि सुके सगळं अप्रतीम असतं.
हे सगळे प्रकार हॉटेलमध्ये मिळणे महाकठीण. उदा. करबटाचं (वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे मासे) हुमण खायचं असेल तर तिथल्या मित्रमत्रीणींकडे वशिला लावावा लागतो. करबटं साफ करणं महाकठीण काम. तसंच, अलीकडे स्वादापेक्षाही स्टेटस अधिक मोठा ठरतोय की काय असं वाटतं. बाजारात ओळखीचा माणूस भेटला आणि हे स्वस्त मासे घेताना बघून काय म्हणेल ही भीती अधिक दिसते. मात्र, अजून काही मासेवाल्या छोटे, स्वस्त आणि चविष्ट मासे विकत असतात. कुठल्या तरी चुली अजून या माशांची कढी उकळत असतात, एवढंच समाधान. आमची खाद्ययात्रा एका फेरीत पूर्ण होणे कठीण होतं. पण बरेच ठळक प्रकार खाऊन झाले. अजून प्रकार बाकी आहेत; ते तेथून नामशेष होण्याआधी जाऊन त्या चवीची ओळख करून देणे आवश्यक आहे.
 
-------------- लोकप्रभा