Monday, 27 February 2012

कातळातलं पाणी





सह्याद्रीमधील किल्ले आणि घाटवाटा यांच्या आठवणी तेथील तलाव आणि टाक्यांशी निगडीत आहेत. या किल्ल्यांची बांधणी, दरवाजे, बुरुज, कमानी, आतील इमारती, मंदिरं आणि पाण्याच्या टाक्यांची बांधणी, रचना, त्यावरील शिल्पं हे सगळं  मोहात पाडतं. या किल्ल्याची बांधणी करताना त्यावेळच्या स्थापत्यकारांनी पाषाणात दडलेल्या पाण्याचा शोध कसा घेतला असेल आणि नेमक्या ठिकाणी पाण्याची टाकी, हौद तलाव कसे निर्माण केले असतील या विचारानं आपण अचंबित होतो.
 
पुण्याच्या परिसरातले किल्ले कितीतरी. त्या सगळ्या किल्ल्यावरच्या पाण्याची मुबलकता थक्क करणारी आहे. सिंहगडावर कितीतरी टाकी आहेत. अमृतेश्वराच्या देवळाखालचा पाण्याचा तलाव विस्तीर्ण आहे. त्यानंतरचे दोन तलाव राजाराममहाराजांच्या समाधीलगत आहेत. इथलं देवटाकं इतिहासप्रसिद्ध खरं, पण इतरही अगणित ठिकाणी असलेल्या टाक्यांचं पाणी तितकंच गोड आहे.
 
गडाच्या तिस-या दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशी प्रशस्त बांधीव टाकी आहेत. उजवीकडच्या टाक्यालगत पुन्हा टाकं आहे. त्या शेजारच्या प्रशस्त टाक्यात उतरायला दगडी पाय-याही आहेत. गडावरील रहिवासी त्यात कपडे धुतात. डावीकडच्या एका टाक्यात रंगीत मासे आहेत. हौद म्हणावेत अशी ही टाकी आहेत.
 पुरंदर किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था अगदी आदर्श म्हणावी अशी आहे. प्रचंड बांधीव असे पाषाणात कोरलेले तलाव हे पुरंदरचं वैशिष्टय़. यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात तिथं ‘नॅशनल कॅडेट कोअर’चं  केंद्र बरीच वर्ष होतं. वरच्या विस्तृत सपाट पठारावर परेड होत असे.
या तलावाखेरीज खडकाच्या पोटात कोरून काढलेली टाकीही आहेत. गडावर चहा करून प्रवाशांना देणारे विक्रेते याच लहान टाक्यातील पाणी पोह-यानं काढतात. आम्हीदेखील गडावर गेल्यावर देवीच्या देवळात जाण्यापूर्वी हे थंड पाणी पिऊन आणि या पाण्यानं पाय धुवून मंदिरात जातो.
 
पुरंदरला केदारेश्वराचं मंदिर बरंच उंचावर आहे. किल्ल्यापासून थोडं उंचावर पठार आणि त्याच्या एका अंगाला वर चढत गेलेली वाट मंदिराकडे जाते. माथ्यावर मात्र  पाणी नाही. मात्र मधल्या टप्प्यावर पुन्हा पाण्याचे तलाव आणि टाकी आहेत. हे पाणी  केवळ पावसाचं नाही. या टाक्यात खालून पाण्याचे प्रवाह वाहत आलेले आहेत. पाणी, स्वच्छ, मधुर आणि थंड आहे. मोठय़ा तलावात मात्र थोडाफार कचरा आहे. काही तलावांच्या कडेचे दगड फोडून त्यात तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती वाढलेल्या आहेत.
 
पुण्याजवळ वेल्ह्याकडे जाताना डावीकडे राजगड हा देखणा गड दिसतो. उन्नत असा बालेकिल्ल्याचा माथा आणि तिन्ही अंगाला बाहुप्रमाणे पसरलेल्या माच्या- सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी. त्यांवर आणि बालेकिल्ल्यावरही पाण्याची विपुल टाकी आणि तलाव आहेत. पद्मावतीच्या माचीवर पद्मावतीचं देऊळ आणि त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत. शिवाय खालच्या अंगाला विस्तृत असा पद्मावती तलाव खोदलेला आहे. याच माचीवर पाठीमागच्या खोलदरीत पाण्याचा तलाव आहे. घोडय़ांच्या पाण्याची ती सोय होती.
 
शिवाजीमहाराजांनी रायगड बांधून घेतला. तिथं त्यांचा राज्याभिषेक झाला. मराठी राज्याची राजधानी म्हणून रायगडचा मान असला तरी त्यापूर्वीची दोन तपं महाराजांच्या कारभाराचं मुख्य ठिकाण ‘राजगड’चा किल्लाच होतं. त्या सगळ्यांना पुरेल इतकं पाणी गडांतील या टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये असायचे. आताही आहे.
 
अवघड ठिकाणी असलेल्या बालेकिल्ल्यावरही कितीतरी टाकी आहेत. तिथलं चंद्रकोरीचं टाकं खरोखरच चंद्रकोरीच्या आकाराचं आहे. त्यालगतही इतर टाकी आहेत. भटकंतीनं झपाटलेल्या आमच्या काळात या चंद्रकोरीच्या टाक्यांत पोहल्याचं  आठवतं. पद्मावती माचीवरील पद्मावती तलावात कोणी पोहलं नाही असं होणारच नाही. केवढी मजा असते अशा पोहण्यात? उंचावरच्या तलावात पोहताना मन आणि शरीर कसं पिसासारखं हलकं होतं! पाण्याचा सुखद, थंड स्पर्श, शिरशिरी आणि तो अनुभव तुमच्या आत कुठेतरी उतरत जातो.
 
तोरण्याच्या बालेकिल्ल्यावर दोन-तीन टाकी आहेत; पण कोकण दरवाज्यातून बाहेर पडलं की डुब्याकडे जाणा-या सोंडेच्या दोन्ही अंगाला खाली कितीतरी टाकी आहेत. डुब्याच्या खाली एक मोठ्ठं चौकोनी टाकं आहे. तर डुबा डावीकडे ठेवत पाठीमागच्या घोडेजिनाच्या बाजूलाही एक टाकं आहे. पण ते बरंचसं बुजून गेलं होतं. आनंद पाळंदेंनी काही भटक्यांवर जबाबदारी सोपवली की, हे बुजलेलं टाकं साफ करा. अजय ढमढेरे आणि त्याच्या दोस्त मंडळींनी ते मनावर घेतलं आणि ते टाकं साफ केलं.
 
 तोरण्याच्या या पाठीमागच्या पण देशाकडील बाजूला गडाबाहेर जाण्याचा एक दरवाजा आणि बुरुज आहे. वाळूंज दरवाजा असं त्यांचं नाव. या दरवाजातून एक वाट खाली ‘भट्टी’ या गावात उतरली आहे. वाळूंज दरवाजानं बाहेर पडलं की उजव्या अंगाला पाण्याचं टाकं आहे. म्हणजे गडावर पाण्याची सोय केलेली आहे. वेल्हय़ांकडून तोरणा किल्ल्यावर येणा-यांची संख्या खूप आहे. पण भट्टीवरून वाळूंज दरवाजानं किल्ल्यावर येणारे लोक फार कमी.
 
भटकणं, मुख्यत: किल्ले भटकणं या नादानं जेव्हा आम्ही झपाटले गेलो होतो, तेव्हा अशा अनवट वाटांनी आम्ही खूप भटकायचो.  वर येताना वाळूंज टाक्यांतील पाण्यानं आमची तहान भागवली होती. राजगड-तोरण्याला जोडणा-या डोंगरधारेनं जाताना आपण राजगडच्या संजीवनी माचीकडून बाहेर पडतो. तेव्हाही पाणी भरून घ्यावं लागतं. संजीवनी माचीवर ओळीनं पाण्याची टाकी आहेत. आता काही टाकी खालून फुटली आहेत. क्वचित एखाद्या टाक्यात एकादा बेडूक किंवा मेलेला पक्षी पडलेला असतो; पण असा अपवाद वगळता आभाळाखालची ही टाकी थंड पाण्याची तहान भागवतात. त्या आठ-नऊ कि.मी.च्या डोंगरधारेवर एक-दोन ठिकाणी वाहतं पाणी मिळतं.
 
कमाल वाटते ती हरिश्चंद्रगडावरील पाण्याची. कोण होता याचा स्थापत्यविशारद? केवढी योजकता, केवढी कल्पकता त्यानं या गडावर दाखवली आहे! हरिश्चंद्रगड नवलाचाच आहे. गडाचा विस्तार प्रचंड आहे. वर सपाटी तशी कमी आहे. सगळा भाग उंचसखल. त्यावर लहान दऱ्या, खोंगळी, उंचवटे, शिखर, कडे, कपा-या, गुहा.  गडाच्या मधल्या खोलगटीत हरिश्चंद्रेश्वराचं देखणं मंदिर आहे. त्याच्या पुढे एक घळ डाव्या अंगाला पायनईच्या बाजूला उतरत गेली आहे. मंदिराच्या उजवीकडे हरिश्चंद्र आणि तारामतीची शिखरं आहेत. तारामतीच्या शिखराच्या आतल्या अंगाला कातळातून काढलेल्या काही गुहा आहेत. ब-याचशा नैसर्गिक शिखराच्या उंचीवरून पडणारं पावसाचं पाणी मंदिरापुढच्या खोलगटीत वाहत जातं. ही लहान कुडी मंगळगंगा नदी अशी गडावर उगम पावते.
 
हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर काळ्या पाषणातून बांधून झाल्यावर रचनाकारानं मंदिराच्या पुढय़ातील खोलगटही नीट दगडानं बांधून घेतली. मंगळगंगा नदीचा प्रवाह त्या लहान दगडी कालव्यांतून पुढे डावीकडे वाहत जाऊन दगडांवरून उडी मारून पाचनइकडे जातो. मंदिराला शिखर आहे आणि चारींबाजूनं दगडी भिंतही. विशेष म्हणजे मंदिराच्या अंगणातच बाहेरच्या भिंतीच्या आतल्या अंगाला काही गुहा आहेत. त्यांच्या बाहेरच्या अंगाला लागूनच कातळ कोरून काढलेली पाण्याची टाकी आहेत. कातळाच्या आतल्या अंगाला असल्यानं दगडी छताखाली पाणी आहे. डोळे आणि तृष्णा एकाच वेळी तृप्त करणारं! शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक धरायला लांब जायला नको. देवळालगतच पाण्याची सोय.
 
हरिश्चंद्र गडावर गर्दी नसायची तेव्हा आम्ही देवळामागच्या मोठय़ा गुहेत झोपायचो. पाणी अगदी पायाशीच असायचं. गर्दी खूप असली की, तारामती शिखराच्या आतल्या अंगाला असलेल्या मोठय़ा गुहांमधून भटके झोपतात. त्याही गुहांपुढे पाण्याची टाकी आहेत. पाऊसकाळ संपल्यानंतरही डिसें.-जानेवारीपर्यंत हरिश्चंद्र गडावरून पाण्याचे प्रवाह वाहत असतात.
 
मंदिराच्या डाव्या उताराच्या अंगाला दोन गुहा आहेत. एका गुहेत कमरेइतकं पाणी भरलेलं आहे आणि गुहेच्या मधोमध पाण्यामध्ये शंकराची पिंडी आहे. तिचा निम्मा भाग पाण्यात आहे. पिंडीभोवती पाण्यातूनच प्रदक्षिणा घालावी लागते. आपल्या कंठांत हलाहल धारण करणाऱ्या शंकराला गारवा लाभावा म्हणून त्यावर अभिषेक धरतात. इथं तर शंकराची पिंडींच चक्क पाण्यात! शंकराला इथला निवास नक्कीच प्रिय असणार. मंदिराच्या पुढय़ात जरा उंचावर एका अंगाला पाण्याची पुष्करणी आहे. तिथं स्नान करून वा पाय धुवून मंदिरात जायचं. पाणी असं किती अंगानं इथं भेटतं.
 
खडकाच्या पोटात खांब खोदून आतल्या अंगाला असलेली पाण्याची टाकीही बऱ्याच किल्ल्यावर आहेत. शिवनेरीवर गंगा-जमुना अशी दोन टाकी आहेत. किल्ल्यावर त्यांचंच पाणी प्यायलं जातं. त्यातून पाईपलाईन टाकून पाणी किल्ल्यावर नेलं आहे. पुरंदरवरही तशी सोय केलेली आहे. राजमाचीवर मनोरंजन-श्रीवर्धन असे दोन आवळेजावळे किल्ले आहेत. मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालाच उढेवाडीची महादेव कोळी आणि काही कुणबी अशी वस्ती आहे. मनोरंजन किल्ल्यावर पाण्याचा प्रशस्त तलाव आहे. त्यातून पाईप टाकून ‘सायफन’ तंत्रानं पाणी मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालगत असलेल्या खोदीव टाक्यांत सोडलेलं आहे. आता उढेवाडीत पाणीयोजना झाली; पण त्या पूर्वी पाण्याचा मुख्य स्रोत किल्ल्यावरचं पाणी हाच होता.
 
 श्रीवर्धन किल्ल्यावरही पाण्याची मोठी टाकी आहेत; पण पूर्वीइतकी त्याची धारणक्षमता राहिलेली नाही. उढेवाडीच्या पठारावर गावापासून अध्र्या कि.मी.वर ‘उदय सागर’ हा पेशवेकालीन पाण्याचा तलाव आहे. त्याकाठी शंकराचं मंदिर आहे. बरंचसं मातीत गाडलेलं होतं ते! गो.नी. दांडेकरांचा राजमाचीवर फार लोभ होता. त्यांनी गावक-यांकडून ते माती उकरून बाहेर काढलं.
 
एका भ्रमंतीत आमचा मुक्काम एक रात्र कर्नाळा किल्ल्यावर होता. इथं सुळक्याच्या पोटात ब-याच गुहा आणि टाकी आहेत. एका टाक्याच्या पायरीवर बसून बोलता-बोलता अनवधानानं मी टाक्यात पडले होते. आमच्या डोंगरभाऊंना पुढे हसायला कित्येक दिवस हा विषय पुरला होता!
 
चावंड हा खरं तर लहान किल्ला; पण जुन्नरजवळच्या या किल्ल्यावर सात टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमध्ये पाणी. एका टाक्यावर कमान व गणेशपट्टी कोरलेली आहे. त्यातून जाऊन टाक्यातल्या पाण्यात डुंबायला मोठी मजा येते. चावंड, हडसर, जीवधन ही दुर्गत्रयी जुन्नर परिसरातली. तिन्ही ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. याच परिसरातून कोकणात उतरणारी घाटवाट, ‘नाणेघाट’ आहे. सातवाहन राजवटीतील राणीनं हा घाट खोदला. या घाटवाटेनं जाणा-या व कोकणातून देशावर येणा-या व्यापा-यांच्या तांडय़ांसाठी नाणेघाटात ऐसपैस गुहा खोदली. शिलालेखही खोदून घेतला. पांथस्थांसाठी गुहेलगत कातळामध्ये पाण्याचे हौद खोदले. घाटाच्या माथ्यावर गणेशमूर्ती स्थापन केली. एका बाजूला रांजण ठेवला. त्याला जकातीचा रांजण म्हणतात. गणेश मूर्तीपाशी पुन्हा पाण्याचं एक टाकं आहे. कोकणातून देशावर माल घेऊन येणा-या-जाणा-या लमाणांच्या तांडय़ाला या पाण्याचा केवढा आधार वाटत असणार!
 
रायगड जेव्हा शिवाजीमहाराजांनी बांधून घेतला, तेव्हा खाणीतून खोदलेला दगड किल्ल्यावरील इतर इमारतींच्या बांधकामासाठी वापरला. आणि त्या खाणीचं रूपांतर मोठय़ा  तलावात केलं. ‘गंगासागर’ नावानं प्रसिद्ध असलेला हा तलाव रायगडावरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याशिवाही गडावर तलाव आणि टाकी आहेतच. हे राजधानीचं ठिकाण असल्यानं तिथं पाण्याची उपलब्धता असणं गरजेचं होतंच. त्याचा संपूर्ण विचार त्यावेळच्या स्थापत्यविशारदांनी कसा केला असेल?
 
हरिश्चंद्र गडावरून मळगंगेचा प्रवाह निर्माण झाला, तर ‘प्रवरा’ नदीचा उगम रतनगडच्या किल्ल्यावर झाला. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील हा जुना किल्ला. याच्या मुख्य डोंगरकण्याच्या पोटामध्ये तुडुंब भरलेलं टाकं आहे. नदीचा उगम तिथूनच होत असल्यानं त्याला ‘प्रवराकुंड’ म्हणतात. इथून बाहेर पडणारी धार गडाच्या अंगावरून लगेचच खाली उतरते. तीच ‘प्रवरा’ नदी. तिच्यावर ब्रिटिशांना भंडारदरा धरण बांधलं. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.
 
अलंग-कुलंग-मंडण ही दुर्गत्रयी आणि याच पंक्तीत बसणारा हरिश्चंद्रगड हे भटक्यांचं नंदनवन. ही त्रयी अहमदनगरच्या घाटकर जवळ आहे. त्या भागातले ते अनभिषिक्त सम्राटच आहेत. या किल्ल्यांवर खोदलेली टाकी पाहून नवल वाटतं. अलंग-कुलंगवर 10-11 टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमधून पाणी. मंडणवर मात्र टाक्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. या तिन्ही ठिकाणची टाकी आकारानं साधारण आयताकृती आणि मोठी आहेत.
 
आज आपण रेनवॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरतो; पण आपल्या पूर्वजांनी ते कधीच किल्ल्यांवर राबवलं. पाणी कुठे सापडेल, याचा अचूक अंदाज घेऊन टाकी खोदली. त्याचा दगड बांधकामाला, बांधबंदिस्तीला वापरला. काही ठिकाणी भूगर्भातील पाण्याचे प्रवाह मिळाले. शिवाय पावसाचं पाणी त्यात साठवता येऊ लागलं.
 
शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्रांत किल्ल्यांचं महत्त्व फार मोठं होतं. त्याचं अविभाज्य अंग म्हणजे किल्यांवरील पाणी. प्राचीन काळात दुर्गम डोंगर-दऱ्यांतून प्रवासाची आधुनिक साधनं नव्हती. बैल, घोडा, नाही तर पायी चालणं. अवघड घाटवाटांवरून तर फक्त पायीच प्रवास शक्य होता. अशा वेळी इतर मानव आणि मानवेतर जीवसृष्टीसाठी कातळ खोदून पाण्याची सोय त्यांनी केली. हे लोक महामानवच होते, असं म्हणावं लागेल.






कांदा भजी



प्रत्येक पदार्थ कसा खावा याचाही विचार करायला हवा. उदा. साबुदाण्याची खिचडी वर साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी, पुरणपोळीत किती तूप घातलंय हे बघू नये आणि कांदाभजी नेहमी पाऊस बघत खावी.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती स्वागतशील आहे. म्हणूनच तिनं नवीन ते स्वीकारलं; पण जुनं ते सोडलं नाही. नव्या पदार्थाच्या गर्दीत आपले पदार्थ हरवले नाहीत. बटाटावडा, थालीपीठ, मिसळ, कांदापोहे याबरोबरच महाराष्ट्रातील कांदाभजीचं वेगळं अस्तित्व आहे. सगळी प्रादेशिक वैशिष्टय़ं जपत कांदाभजीनं खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मुंबईसारख्या शहरातही आपली रूची टिकवली आहे.
 
भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असलेला कांदा जगभरातही आवडीनं खाल्ला जातो. कापलेल्या कांद्यांवरच्या गोलाकार रेषा अनंत जीवनाचं प्रतीक आहे, असा इजिप्तमध्ये समज आहे. कांद्याच्या उग्र वासामुळे मेलेला माणूसही जिवंत होतो, असं म्हटलं जातं! एक मात्र खरं की, कांदाभजीच्या खमंग वासामुळे झोपेतला माणूससुद्धा जागा होईल एवढं निश्चित!
 
मुळात कांद्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रक्तदाब आणि हृदयरोग आटोक्यात आणण्यात कांदा मदत करतो. कांद्यामुळे डोकेदुखी थांबते. कांदा थंड असल्यानं शरीरातील उष्णता निघून ताप कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या कांद्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, असं डॉक्टर सांगतात. अशा या बहुगुणी कांद्याचा उपयोग भारतीय पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणात केला जातो. कांद्याच्या अनेक रेसिपींबरोबर सर्वाच्या परिचयाचा आणि आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे कांदाभजी.
 
‘बाहेरचं खाऊ नकोस, आजारी पडशील’, असं कुणी म्हटलं तर हसायला येतं. ऑफिस, शाळा, कॉलेज, क्लब, पार्क यापैकी कोणतंही ठिकाण असो, माणूस एकटा असो किंवा दुकटा, त्याला बाहेरच्या खाण्याची लहर येतेच. या लहरीमागे उदर भरणापेक्षा मानसिक भूक मोठय़ा प्रमाणावर असते. कढईत गरमागरम कांदाभजी सोडल्यावर ती खाण्याचा मोह कुणाला होणार नाही? दुपारी भरपेट चापलेलं असलं तरी सायंकाळी पाय मोकळे करताना कांदाभजी आणि चहा प्यायची इच्छा होते, ती उगीच नाही!
 
आजची पिढी फिटनेस आणि आरोग्याला विशेष महत्त्व देते. मुलींना फिगर सांभाळायची असते आणि मुलांना मसल्स तयार करायचे असतात. तरीही बाहेरचं खाण्यात नव्या पिढीचा खूप मोठा वाटा असतो. मुळात बाहेरच्या खाण्याची चटक लागते ती चवीमुळे! म्हणूनच चटपटीत आणि खमंग खाण्याची वारंवार इच्छा होते. त्यातही किंमत कमी आणि तात्काळ मिळणाऱ्या मेन्यूला लोक जास्त पसंती देतात. संध्याकाळची वेळच अशी असते की, काहीतरी चटपटीत, खमंग आणि गरमागरम खाण्याची इच्छा अनावर होते. अशा वेळी कांदाभज्यांवरच ताव मारला जातो.
 
प्रत्येक पदार्थ विशिष्ट प्रकारे खाण्यात मजा असते. साबुदाण्याची खिचडी वर साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी, पुरणपोळीत किती तूप घातलंय हे बघू नये आणि कांदाभजी नेहमी पाऊस बघत खावी!
 
कांदाभज्यांना खरी प्रसिद्धी दिली असेल तर बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनशेजारच्या स्टॉल्सनी. महाराष्ट्रातील सर्वच भागात सर्रास कांदाभजी मिळतात.
 
कुरकुरीत कांदाभजी तयार करण्यासाठी पीठ भिजवताना पाणी घालू नये. चणाडाळीचं जाडसर पीठ घ्यावं. भज्यांसाठी कांदा उभा चिरून त्यात मीठ पेरून ठेवावं.
मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटतं. आलं-लसणाची पेस्ट करावी. ही पेस्ट आणि हिरव्या मिरच्या आडव्या चिरून त्या चिरलेल्या कांद्यात पेराव्यात. लालसर झालेल्या कांद्यावर चवीपुरतं मीठ, चिमुटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खाण्याचा सोडा घालावा. कांद्याला सुटलेल्या पाण्यात बेसन घालून पीठ चांगलं भिजवावं आणि नेहमीप्रमाणे भजी तळावी. बेसनच्या पिठात साखर टाकल्यानं भजी  कुरकुरीत होतात. या भज्यांना ‘खेकडा भजी’ही म्हटलं जातं.
 
भज्यांचे अनेक प्रकार आहेत; पण पावसाशी नातं जोडणारी भजी अर्थात कांद्याचीच. पण त्यातसुद्धा अनेक पोटप्रकार आहेत. ओनियन पकोडा कशाला म्हणायचं आणि भजिया कशाला, हे कळायला केवळ जीभच नव्हे तर नाकही तितकंच तत्पर असायला हवं.
 
आजकाल मोठमोठय़ा उपहारगृहात ओनियन रिंग्ज मिळतात. महाराष्ट्रातील अनेक भागात गोल कांदाभजी मिळते तर विदर्भात याच कांदाभजीला पकोडे किंवा भजे म्हणतात. पुण्याच्या सिंहगडची कांदाभजी खूपच फेमस आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी ‘भजीपाव’ हा ब्रेकफास्ट म्हणून मिळतो. मुंबईत नरीमन पॉइंट येथे एलआयसीशेजारी गोल कांद्याची, भरपूर हिरव्या मिरच्या घातलेली गरमागरम भजी मिळतात. दादरलाही चित्रा टॉकिजजवळ खमंग कांदाभजी मिळतात. कोकणात कधी जाणं झालं तर सावंतवाडीतील आनंद भुवनच्या भज्यांची जरूर टेस्ट घ्यावी. अगदीच जमलं नाही तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात चुलीवरील कढईत तळलेल्या शेर्ला आणि तळवडे गावातील भजी खाण्याची संधी सोडू अजिबात सोडू नये. कसारा घाट सोडला की, बहुतेक ठिकाणी कांदामिश्रित गोल भजी पुढय़ात येतात.
 
बटाटा, सिमला मिरची, मिरची, ओव्याची पानं, पालक, नीळ फणस आणि वांग्याचीही भजी बनवली जातात. या प्रत्येक भज्यांला स्वत:ची वेगळी चव आणि खमंगपणा असतो. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात मिरची भजी मिळतात. या  भज्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिरच्या लहान असतात तर गोव्यात भज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिरच्या लांब आणि कमी तिखट असतात.
 
एक मात्र खरं की भज्यासोबत चटणी, कच्च्या ताज्या हिरव्या मिरच्या किंवा उभा कापलेला कांदा हवाच.
 
पण एक बाकी खरं की, कांदाभजी हा काही हॉटेलात बसून खाण्याचा प्रकार नाही. टपरीवरच्या भज्यांवर ताव मारण्यासारखा दुसरा आनंद नाही!




कोकणचो फेरफटको -




भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजे जमदग्नी आणि रेणुकामाता यांचा पुत्र परशुराम. निसर्गरम्य कोकणभूमीची निर्मिती परशुरामाने केली. प्राचीन समाजाच्या आचार-विचारांची, चालीरीतींची, संस्कृतीची व देवस्थानांची महत्त्वपूर्ण नोंद आपल्याला कोकणच्या इतिहासात सापडते.
रत्नागिरीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकुटांचा आहे. राष्ट्रकूट राजांची देवता गजान्तलक्ष्मी ही होती. जेथे-जेथे त्यांचा मोठा शिलेदार असे, तेथे या देवीच्या मूर्ती स्थापन केल्या असाव्यात. शिलाहारांचा राजा अपराजित याने आपले राज्य खूप वाढवले, ही घटना दहाव्या शतकातील आहे. त्याच्या राज्यात पुणे, संगमेश्वर, चिपळूण यांचा समावेश होता. तीन-चार पिढय़ांनंतर अपरादित्य गादीवर आला आणि त्याने आपली गादी


प्रणाल-पन्हाळेकाझी येथे नेल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर विक्रमादित्य, हरपाल देव, मल्लिकार्जुन हे राजे होते. मल्लिकार्जुनने बाराव्या शतकात चिपळूणवर राज्य केल्याचा उल्लेखही आढळतो.
कोकण हा भाविकांचा प्रदेश, त्यामुळे कोकणात प्रत्येक गावात ग्रामदेवतेचे मंदिर आढळते. नयनरम्य सौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीतील प्रत्येक मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.
भगवान परशुराम हा शिवभक्त होता, त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावात एखादे तरी शिवमंदिर आढळते. एकटय़ा संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे दोनशेहून अधिक मंदिरे आहेत. कोकणातील मंदिरांमध्ये प्रामुख्याने नवलाई, पावणाई, वरदान, वाघजाई, विठलाई, चणकाई, भैरवनाथ, जोगेश्वरी, वाघजाई या देवींच्या मूर्तीचा समावेश असतो.
भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्राला मागे हटवले आणि तेथे परशुराम भूमीची निर्मिती झाली. चिपळूणनजीक असलेले परशुराम मंदिर इसवी सन पूर्व १५०० च्या सुमारास निर्मित झाल्याचे सांगितले जाते.
कोकणातील काही देवस्थानाची प्रचीती संपूर्ण भारतभर पसरली आहे तसेच काही देवस्थानांचा परिचयही नाही पण त्यांची वैशिष्टय़े मात्र आपण विसरू शकत नाही. मंडणगड किल्ल्यावरील गणेश मंदिर, वेसवी येथील गणेश मंदिर, बाणकोट येथील गणेशमंदिर, पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांच्या वेळास या गावातील भैरी व दुर्गादेवी मंदिर, दापोलीतील कडय़ावरचा गणपती, आसूद येथील केशवराज मंदिर, आंजर्ले येथील दत्त मंदिर, दाभोळ येथील गुहेतील चंडिका देवीचे मंदिर, गुहागर तालुक्यातील व्याडेश्वर मंदिर, हेदवी येथील दशभूजा लक्ष्मीगणेश मंदिर, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिर, मारळ येथील मार्लेश्वर मंदिर, शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर, बुरंबाडचे आमनायेश्वर मंदिर, देवरुख येथील सोळजाई मंदिर, महिपत गडावरील भवानी मंदिर अशी प्रसिद्ध स्थळे आहेत.
तसेच राजापूर तालुक्यातील गंगामाता, आडिवरेची महाकाली, कुणकेश्वर मंदिर, कशेळीचे कनकादित्य मंदिर, धोपेश्वर येथील धूतपापेश्वर मंदिर, सागवे येथील कात्रादेवी मंदिर यांसह अनेक मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
  कडय़ावरील गणपती
 दापोलीपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या आंजर्ले येथील कडय़ावरच्या   गणपतीचे मंदिर पर्यटकांचे एक आकर्षण बनले आहे. या गणपती मंदिराला ११ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. १२ व्या शतकात मंदिर निर्मितीसमवेत मंदिरासमोर असलेला तलाव आणि तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. या पूर्वाभिमुखी मंदिराची लांबी ५५ फूट, रुंदी ३९ फूट आहे. या विश्वात्मक, विश्वाधार, मूलाधारस्थित, ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे मुक्त दर्शन सर्वाना करता येते. अशी ही गणेशदेवता सदैव अनुरक्त असते. दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय व आल्हाददायक असते. त्यामुळे निसर्गपर्यटनाचा आनंदही लुटता येतो. दापोलीतून आंजर्ले येथे थेट बसने जाण्याची व्यवस्था आहे. मुंबई - आंबेत - मंडणगड - कांदिवली - आंजर्ले असा रस्ता आहे. या रस्त्याला थेट कडय़ावरील गणपतीच्या मंदिरापर्यंत पोहोचणारा जोडरस्ता आहे.
  श्री क्षेत्र परशुराम
मुंबईहून चिपळूणकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून देवस्थानाला जाण्यासाठी थोडेसे आत जावे लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. चारही बाजूंनी जांभ्या दगडांच्या भिंतीने बंदिस्त असलेले हे श्री परशुरामाचे पवित्र मंदिर पुरातन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होते. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते.
श्री परशुराम मंदिराच्या मागे परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. या जागृत देवतांचे आणि तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी भाविक पर्यटकांची येथे सतत ये-जा असते. येथे जाण्यासाठी मुंबईहून चिपळूणकडे जाणाऱ्या वाटेत घाटाच्या माथ्यावर श्री क्षेत्र परशुराम थांबा आहे.
केळशी
केळशीचं खास आकर्षण म्हणजे सुमारे अडीच कि.मी. लांबीचा पांढरीशुभ्र वाळू असलेला समुद्रकिनारा व वाळूची टेकडी, या टेकडीवर धावणे-घसरणे म्हणजे लहान मुलांना एक पर्वणीच, तसेच टेकडीवर बसून सूर्यास्त पाहणे म्हणजे आनंदाचा परमावधीच. विस्तीर्ण समुद्र किनारा, महालक्ष्मी मंदिर आणि गणेश मंदिर यामुळे दापोली तालुक्यातील केळशी हे गाव पर्यटन कंेद्र बनले आहे. हे महालक्ष्मीचे मंदिर शके १८०८ मध्ये बांधले असावे, हे मंदिर पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा नमुना आहे. बेलेश्वर, राधाकृष्ण मंदिर, उंटबरकरणी देवीचे मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती आणि भाईमियांचं बेट ही या ठिकाणची वैशिष्टय़े मानली जातात. केळशी हे गाव दापोलीपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे तसेच रिक्षासुद्धा मिळतात.
उफराटा गणपती
गुहागरनजीक असलेले उफराटा गणपती मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती समुद्रामध्ये पाणी वाढल्यावर गुहागरच बुडून जाईल अशी भीती काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांना वाटली. त्यांनी पूर्वेकडे तोंड असलेल्या या गणपतीचे तोंड उलटीकडे फिरविले. तेव्हापासून उफराटा गणपती म्हणून हे मंदिर ओळखले जाऊ लागले. गणपतीची मूर्ती पांढरीशुभ्र असून तिच्या हातात परशू व त्रिशूळ आहे. डाव्या सोंडेच्या या मूर्तीभोवती नागाने वेटोळे केलेले आहे.
  दाभोळची चंडिकादेवी
वाशिष्ठी नदीच्या खाडीकिनारी दापोली तालुक्यात दाभोळ हे गाव वसलेले आहे. चंडिकादेवी ही मूळ गावात उंच डोंगरावर पांडवकालीन गुहेत वसलेली आहे. हे मंदिर पांडवकालीन असून शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी संरक्षण दिले होते. या देवीच्या मंदिरात विद्युतप्रकाश चालत नाही. देवी उंच व मुख्य डोंगराच्या एक उतरत्या भुयारात वसलेली आहे. या मंदिरात उतरताना काळोखातच नतमस्तक होऊन उतरावे लागते. गाभाऱ्यात छोटे तेलाचे दिवे पेटत असतात, त्या प्रकाशातच दगडावर कोरलेल्या स्वयंभू चंडिका देवीचे दर्शन घेता येते. या मंदिराच्या पश्चिमेला पसरलेला अरबी समुद्र तर एका बाजूला वेढलेल्या डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात.
  हेदवीचा गणेश
गुहागरातील हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावरील दशभुज गणेश मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार गुहागर-नरवण या रस्त्यालगत असून, तेथूनच मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. दोन्ही बाजूला रंगीबेरंगी फुलझाडं असल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंदिराचा परिसर स्वच्छ असल्याचं आपल्या लक्षात येतं. मंदिराच्या आवारातील उंच दीपमाळ मंदिराच्या स्थापनेपासून असल्याचं सांगितलं जातं. दशभुज गणेशमूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक ‘सिद्ध लक्ष्मी’ वसलेली आहे. उजव्या वरच्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग फळ आहे. डाव्या बाजूच्या वरच्या महिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात रदन व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मंदिराची उंची साठ फूट, रुंदी चाळीस फूट तर कळसापर्यंतची उंची पन्नास फूट इतकी आहे. समुद्राच्या सान्निध्यात वसलेले असल्याने हे मंदिर पाहून पर्यटकांची पावले बीचकडे वळू शकतात. येथे येण्यासाठी गुहागर आणि चिपळूण बसस्थानकावरून एस.टी. बसेस सुटतात.
  वेळणेश्वर
गुहागरपासून १५ कि.मी. अंतरावर असलेले वेळणेश्वराचे मंदिर भक्त व पर्यटकांना मोहून टाकते. हे मंदिर १२०० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे असे म्हटले जाते. एक एकराच्या परिसरात चौफेर चिरेबंदी तट आहेत. भाविकांच्या नवसाला पावणारा वेळणेश्वर अशी या मंदिराची ख्याती आहे. पुढील बाजूला काळभैरव मंदिर आहे. पाऊस वेळेत सुरू झाला नाही व दुष्काळ पडला, तर वेळणेश्वर व काळभैरवाचे गाभारे पाण्याने भरण्याची प्रथा आहे. नवस म्हणून हे पाणी भरले जाते व या नवसाला यश येऊन पाऊस सुरू होतोच अशी भक्तांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला या देवस्थानचा उत्सव साजरा हातो. स्वयंभू शिवलिंग आणि प्रशस्त, स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेले आवार पर्यटकांना मोहून टाकते.
  व्याडेश्वर
चिपळूणजवळील गुहागर तालुक्यातील व्याडेश्वर हे अत्यंत जागृत व ऐतिहासिक देवस्थान आहे. श्रावणात व महाशिवरात्रीला विशेष गर्दी होते. भगवान परशुरामाने गूढ गुहेसारख्या या स्थानाची तपश्चर्येसाठी निवड केली, या गूढ वनात वास्तव्य कर असा वर व्याडीमुनीना दिला, या ठिकाणी मग परशुराम शिष्य व्याडीमुनीने एका शिवलिंगाची स्थापना केली व छोटेसे मंदिर बांधले. त्याचे पुढे व्याडेश्वर झाले. मंदिर प्रशस्त व शिवपंचायतन असून काळ्यापाषाणाची शिवपिंड असून तेथे गोमुख आहे. बांधकाम दगडी आहे. चार कोपऱ्यात गणपती, देवी, विष्णू व सूर्य यांची मंदिरे आहेत. नंदिकेश्वराची मूर्ती आहे.
  मारळचा मार्लेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून अवघ्या २१ किमी तर आंगवली या गावापासून ११ कि.मी अंतरावर असणारे श्री क्षेत्र मार्लेश्वर हे उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीतील गुहेत श्री मार्लेश्वराची स्वयंभू पिंडी आहे. या क्षेत्राला पर्यटनक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता खूप सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे. पायऱ्या चढताना आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांच्या आपण मोहात पडतो. येथील हवामान थंड आहे. पायऱ्या पूर्ण चढून गेल्यावर मंदिर आहे व मंदिराच्या पाठीमागे मोठा धबधबा पाहावयास मिळतो, या धबधब्याला बाराही महिने पाणी असते. धबधब्याखालील नदीतील पाणी बर्फासारखे थंड असते. या स्थानाला भेट देऊन जीव सुखावतो. संगमेश्वर, देवरुख, मारळ असा पक्का मार्ग आहे. देवरुख येथून एस.टी. बसेसची सोय आहे.
कऱ्हाटेश्वर
जयगड बंदराजवळील नांदिवडे गावाजवळील जुन्या बांधणीचे कौलारू छपराचं कऱ्हाटेश्वराचं मंदिर म्हणजे जयगडमधील एक रम्य निवांत स्थळ. बाजूला डोंगराळ परिसर, गरजणारा समुद्र, जवळील दीपगृह मन वेधून घेतं. हे मंदिर शिलाहारकालीन असून सायंकाळ नंतर बंद ठेवण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळात या ठिकाणी गंगा अवतीर्ण झाली होती. त्या जागेला आता बेभाटी गंगा म्हणून ओळखले जाते. कार्तिक वद्य प्रतिपदेला या ठिकाणी गंगा आली होती पण १९२२ साली मंदिराभोवतालची जागा रुंद करण्यासाठी खडक फोडले तेव्हापासून ती लोप पावली. मंदिराशेजारी धर्मशाळा आहे. रत्नागिरीपासून ४० कि.मी. अंतरावर असणाऱ्या कऱ्हाटेश्वर मंदिरात जाण्यासाठी रत्नागिरीहून जयगडला जाणाऱ्या बसने नांदगावपर्यंत सहज जाता येते.
  गलबतवाल्यांचा गणपती - गणेशगुळे
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे. जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
गणपतीपुळे
श्री क्षेत्र गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणपतीपुळ्याचे देवस्थान स्वयंभू व जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या पायथ्याशी, अफाट सागणाच्या विस्तीर्ण रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर वसले आहे. या गणेशाची स्थापना पुरातनकाळी बाळंभटजी भिडे यांनी केली व तेव्हापासून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. निराकार स्वरूप डोंगराला म्हणजेच श्री गजाननाला प्रदक्षिणा घालण्यासाठी या मंदिरापासून निघून या डोंगराला वळसा गाळून परत मंदिरात येणारी फरसबंदी पाखाडी आहे. या प्रदक्षिणेच्या वाटेवर केवडय़ाचे बन, तलाव व विहीर आहे. देवालयास लागूनच दक्षिणेस पूर्वापार धर्मशाळा आहे. देवालयाच्या ईशान्य कोपऱ्यात देवालयालगतच काळ्या दगडी असून त्यातून नाभी गंगोदक झिरपत असते. त्याच्या शेजारी तुळशीवृंदावन व द्वारदेवता आहे. उत्तरेकडील मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश केल्यावर देवाचा मुख्य घुमट आहे. यात प्रवेश करण्यासाठी पश्चिमेस व उत्तरेस दरवाजे आहेत. सदरहू घुमट हा छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रधान अण्णाजी दत्तो यांनी बांधला असे सांगण्यात येते. देवाच्या समोरील सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त सोपे आहे. दक्षिणेकडील सोप्यात श्रींची शयन करण्याची जागा असून त्या ठिकाणी रोज रात्री श्रींचा पलंग घालून त्यावर गाद्या घातल्या जातात.
देवळाच्या समोर १२ कि.मी लांबीचा रुपेरी वाळूचा व फेसाळणाऱ्या लाटांच्या संगीताची पाश्र्वभूमी लाभलेला समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या किनाऱ्यावर खडक नाहीत. दरवर्षी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या पहिल्या आठवडय़ात मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजातून श्री गणेशावर पडतात. हे नैसर्गिक नयनरम्य दृश्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.
मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरीला येण्यापूर्वी १५ कि.मी वर निवळी येथे गणपतीपुळ्याला जाणाऱ्या रस्त्याचा फाटा फुटतो. तेथून सुमारे ३५ कि.मी अंतरावर श्रींचे मंदिर आहे. रत्नागिरीहून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.
पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळाची निवासाची व्यवस्था शिवाय तंबू निवास व बोटिंगची सोय आहे.

प्राचीन कोकण
गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत.
गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक गुहा लागते. हि गुहा म्हणजे काळाचे प्रतिक असून आपण वर्तमानकाळातून भुतकाळात प्रवेश करतो. प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याकरीता संस्थेचे मार्गदर्शक आपल्या सोबत असतात. गावात आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो. गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ते "वाघजाई" या ग्रामदेवतेचे मंदिर. अंगणातच सुपारी कातरत बसलेले खोत आपल्याला दिसतात. माजघरात खोताची बायको उभी आहे. कोकणी स्त्रिया शूर व सुंदर होत्या पन त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठा हि त्यांच्या साठी मर्यादा होती. पडवीत खोतांची दोन मुले परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. खोताच्या घराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. खोताच्या घरातून आपण जातो ते एका शेतकऱ्याच्या घराकडे. पूर्वी बारा बलुतेदार, राजे यांना धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करायचा. शेतकऱ्याच्या घराशेजारीच गोठा आहे. त्याची सर्व अवजारे जसे, नांगर, इरलं, मासे पकडायची खोयणी, कणगी आपल्याला येथे पहायला मिळतात.
अशा प्रकारे गावात फेरफटका मारताना आपल्याला एक एक बलुतेदार भेटत जातो. गणपती सणाला लाल मातीचे गणपती, मातीची भांडी बनविणारा कुंभार, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी बनविणारा सुतार, पाण्यात जाळे टाकून मासे पकडणारा कोळी व त्याची बायको, तेलाच्या घाण्यावरून तेल काढणारा तेली, चर्मकार यांच्या घरांना भेट देत देत आपण पोहचतो ते पाणवठयावर. उंचावरून पडणारे पाणी, मातीचा बांध, पाणी भरणाऱ्या कोकणी स्त्रिया हा सर्व देखावा सुंदर आहे. गावात सर्वात जो उंच पाणवठा असे तेथे बंधारे बांधून ते पाणी प्रत्येक घराकडे नेले जाते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव असे ठिकाण कि जेथे सगळेजण एकत्र येत असे.
कोकणात आढळणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या सापांचे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आपणास बघावयास मिळते. गावात फेरफटका मारून तुम्ही दमलात आणि भुक लागली असेल तर इथले "आतिथ्य" रेस्टॉरंट तुमच्या स्वागताला तयार आहे. खास कोकणी पदार्थ म्हणजेच भाजणीचे गरमागरम थालिपीठ, उकडीचे मोदक, फणसाचे सांजण, कोकम/आवळा सरबत यावर यथेच्छ ताव मारता येतो. जर तुम्हाला येथे काही खरेदी करावयाची असेल तर कोकण टुरीझमच्या हस्तकला केंद्रात अनेक गोष्टी आपणास पहायला आणि खरेदी करायला मिळतात. या संस्थेने केवळ ५०० वर्षापूर्वीच्या कोकणसंस्कृतीचे दर्शन देणारे केवळ खेडेच नाही उभारले तर कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्नही चालवीला आहे.


डेरवण 
चिपळूण तालुक्यातील चिपळूणपासून 19 कि.मी. अंतरावर असलेले एक छोटेसे खेडेगाव. चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने गोवा हमरस्त्यावरून निघालो की सावर्डे हे गाव लागते. सावर्डे ही पंचक्रोशीतील गावांची बाजारपेठ. सावर्डे गावातून रत्नागिरीकडे निघालो की डाव्या हाताला दुर्गवाडी गावाकडे जाणारा फाटा फुटतो. या मार्गाने तीन-चार कि.मी. गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा श्री शिवरायांचे मावळे आपले स्वागत करतात हाच तो श्री क्षेत्र डेरवण येथील श्री शिवसमर्थ गड.
गडाला भव्य शिवकालीन प्रवेशद्वार असून दोन भव्य हत्ती, पायदळ व घोडदळातील मावळ्यांसह आपलं स्वागत करतात. शिल्पकार कै. दादा पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री दिगंबरदास महाराजांच्या कल्पनेला शिल्परूप दिले आहे.
विविध रंगातील असंख्य रोमंचकारी चित्रशिल्पं बघून डोळ्यांचे पारणे फिटते. इतिहासाचे स्फूर्तिदायक दर्शन काही काळ का होईना पण बुद्धीला आत्मपरीक्षण करावयास लावते. देव, देश
आणि धर्म या विलयीच्या कर्तव्याचे स्मरण जागृत होते. याच कारणासाठी येत्या शिवजयंतीला आपण डेरवण येथील शिवसृष्टीस आवर्जून भेट द्या! पंचखंडात जिला तोड नाही अशी ‘शिवसृष्टी’ शिल्परूप होऊन आपल्या स्वागतासाठी इथं उभी आहे!
तेज तम अंसपर कान्हा जिमी कंसपर । 
त्यो म्लेंच्छ बंसपर सेर सिवराज है॥

 
पावसचे श्री स्वरूपानंद
रत्नागिरीपासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर पावस हे निसर्गरम्य गाव आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत होऊन ते तीर्थक्षेत्र बनले आहे. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामींनी येथेच समाधी घेतली. त्यांची समाधी व स्मृतिमंदिर येथे बांधण्यात आले आहे. समाधी मंदिराच्या शेजारी एक आवळीच्या झाडात काही वर्षांपूर्वीच एक स्वयंभू गणपती प्रकट झाला आहे. स्वामींचे वास्तव्य असलेली ‘अनंत निवास’ ही इमारत समाधीजवळच आहे. १९३४ ते १९७४ पर्यंत स्वामीजींचे वास्तव्य होते. या घरासमोरच पर्यटक व भक्तांसाठी स्वरूपाश्रम, भक्त निवास व माऊली माहेर अशा सर्व सोईनी उपयुक्त इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. स्वामींच्या समाधी मंदिरात मर्यादित निवासाची व भोजनाची सोय आहे. रत्नागिरी एस.टी. स्टँडवरून पावस या मार्गावर दर तासाने बससेवा उपलब्ध आहे.
मालगुंडमधील केशवसुत स्मारक
नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, फणस, काजू यांची झाडे आणि इतरही अनेक वृक्षांची गर्द छाया मिरवीत असलेलं मालगुंड हे गाव. या गावात केशव विठ्ठल दामले राहात. ते शिक्षण खात्यात शिक्षक होते. पत्नी, तीन पुत्र असा संसार होता. पंधरा मार्च १८६६ या दिवशी केशव दामल्यांना व त्यांच्या पत्नीला चौथ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. केशवरावांनी या पुत्राचे नाव ‘कृष्णाजी’ असे ठेवले. कृष्णाजी पुढे महाराष्ट्र सारस्वताच्या एका संपूर्ण शतकावर प्रभाव टाकणारे कीर्तिवंत कवी झाले. त्यांनी अभिमानाने स्वत:ला ‘केशवसुत’, केशवरावांचा पुत्र म्हणून घेतले. वडिलांच्या निवृत्तीनंतर ते दापोली येथील वळणे गावी राहू लागले. नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरवलेले श्रेय, अंत्यजाच्या मुलास अशा अजरामर कविता लिहिणाऱ्या या थोर कवीच्या स्मारकास आवर्जून भेट द्यावी. रत्नागिरीपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय आहे.
शिरंबेचा मल्लिकार्जुन
संगमेश्वर तालुक्यात शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर चोहोबाजूनी पाण्याने वेढलेले आहे. सुमारे ५० चौरस फुटाच्या तळ्याच्या मध्यभागी मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पुल बांधण्यात आला आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी स्वच्छ वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण असं आहे की जे पाण्यात आहे. येथील शिवलिंगही पाण्यामध्येच आहे. सभामंडपाची रचना तळ्याच्या पाण्याच्या उंचीप्रमाणे करण्यात आली आहे, त्यामुळे गाभारा सभामंडपाच्या खूप खाली आहे. शिवलिंग निम्मे पाण्यातच आहे. मंदिराभोवतालीचे वातावरण निसर्गरम्य आहे. मंदिराजवळ ग्रामदेवता व गणपतीचे मंदिर आहे. संगमेश्वर एस.टी. बसस्थानकावरून शिरंबे येथे जाण्याची सोय आहे.
रत्नागिरीकरांचे ग्रामदैवत श्री देव भैरी
रत्नागिरीच्या शहरी गजबजाटापासून दूर वसलेले श्री देव भैरीचे मंदिर शांत आणि सावलीला आहे. कार्तिक वद्य अष्टमीला भैरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या परिसरात मारुती, दत्त, तृणबिंदूकेश्वर, जंबुकेश्वर, पंचायतन, त्रिमुखी देवी व देव भैरव अशी मंदिरे आहेत. हरतालिका ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती आहे. तिला घागरा घातला असून ती काळ्या पाषाणाची दोन हात असलेली मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपाचे १२ खांब म्हणजे १२ मानकऱ्यांचे प्रतीक समजतात. ग्रामदैवत म्हणून हजारो रत्नागिरीकरांवर गेली कित्येक वर्षे आपल्या कृपेची छाया धरणाऱ्या श्री देव भैरी मंदिराकडे जाण्यासाठी बसस्थानकावरून बसेसची सोय आहे. शिवाय रिक्षा किंवा खाजगी वाहतूकपण उपलब्ध आहे.
कसबा येथील कर्णेश्वर मंदिर
संगमेश्वरपासून अवघ्या ४ कि.मी अंतरावर असणारे कर्णेश्वराचे पुरातन मंदिर धार्मिक म्हणून नव्हे तर कलाविष्काराचे मंदिर म्हणून आवर्जून पाहायला हवे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकाच्या सुमारास बांधलेले हे मंदिर काहींच्या मते हेमाडपंती धाटणीचे तर काहींच्या मते चालुक्यकालीन वाटते. मंदिराची एकूण रचना आणि त्यातील कोरीव काम पाहता पुरातन भारतीय कलासंस्कृतीचा एक जिवंत इतिहास आपल्यासमोर प्रकट होतो. कर्णेश्वर हे शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे ४०० चौ.मी. क्षेत्रफळात बांधलेले आहे. या शिवमंदिरातील दगडात कोरलेल्या पराती हे मंदिराचे खास वैशिष्टय़ आहे. मंदिरात पांडवमूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभावर व छतावर सुंदर नक्षीकाम आहे. यामंदिराव्यतिरिक्त या परिसरात काशीविश्वेश्वर, कार्तिकेय आदी अनेक मंदिरे चौथरे, स्तंभ, खांब यांची पडझड झालेल्या अवस्थेत उभी आहेत. मंदिरांमधील देखणे शिल्पकाम पुरातन संस्कृतीची आठवण करून देतात. तसेच जवळच शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक करून त्यांचा अतोनात छळ करून तुळापूर मुक्कामी त्यांचा क्रूर वध केला. संभाजी महाराजांची आठवण म्हणून त्यांचा अर्धपुतळा व एक स्तंभ उभारण्यात आला आहे. संगमेश्वरपासून अवघ्या ४ कि.मी. असणाऱ्या कसबा गावी जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.
निसर्गसंपन्न केशवराज
कोकणचं सृष्टीसौंदर्य तर जग जाहीर आहे. हिरवीगार झाडी, डोंगरांच्या रांगा, विविध देवळं हे तर कोकणाचं वैशिष्ट मानलं जातं. ह्य वैशिष्टय़ांपैकी एक वैशिष्ट म्हणजे दापोलीपासून हर्णेच्या वाटेवर साधारण ८ कि.मी. वर अंतरावर भगवान विष्णुच वेगळं रूप असणारं केशवराजाचं मंदिर. मंदिराकडे जाण्यासाठी आसुदबाग थांब्यावर उतरावे लागते. सभोवताली पोफळ - नारळाची, आंब्या-फणसाची दाट झाडी पाहून मन मोहून जातं. ही झाडी इतकी दाट आहे की त्यातून सूर्यप्रकाशसुद्धा जमीनीवर पडत नाही. याच झाडांच्या सावलीतून केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. वाटेत कासव नदीवरचा पूल ओलांडून दुसऱ्या डोगरापाशी जावे लागते. १५-२० मिनिटांची चढण चढून गेल्यावर केशवराज मंदिर लागते.
केशवराज मंदिर गर्द झाडीत लपलेलं, ऐसपैस दगडी देऊळ आहे. मंदिराच्या आवारात गोमुख आहे, या गोमुखातून १२ महिने थंडगार व स्वच्छ पाणी वाहत असते. केशवराजाच्या मुख्य दगडी मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपती तर खालच्या बाजूस ‘शरभा’ची मूर्ती पहावयास मिळते. डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला गरुड आहे. केशवराजाच्या हातात शंख, चक्र, गदा, पउा अशी चारही आयुधं आहेत.
कार्तिकातल्या पहिल्या एकादशीपासून ५ दिवस येथे उत्सव असतो. पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद असतो. तर दुसऱ्या एकादशीपासून तीन दिवस उत्सव असतो. त्रयोदशीला महाप्रसाद असतो.
देवळाच्या बाजूला एक सभामंडप आहे, त्यामध्ये २० ते २५ जणांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. देवळाच्या मागील डोंगराव दाड झाडी असल्याकारणाने इथे जंगलात खूप पक्षी आहेत त्यामुळे पक्षीनिरीक्षणाचा आनंदही घेता येतो.
जायचे कसे: दापोलीहून हर्णे, अंजर्ले, मुरुडकडे जाणाऱ्या बसेस आसुदबागला थांबतात. दापोलीहून रिक्षासुद्धा इथे येतात.
कशेळीचा कनकादित्य
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील कनकादित्याचे मंदिर हे या जिल्ह्यातील सूर्यमंदिर म्हणून ओळखले जाते. हे सूर्यमंदिर प्राचीन असून या मोठा इतिहास आहे.
मंदिराच्या आवारात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गा, श्री मारुती व श्री विष्णूचीही मंदिर आहेत. कनकादित्य मंदिरावर तांब्याचा पत्रा आहे. शिलाहार वंशातील गोजराजाने शके १११३ मध्ये दानपत्र लिहून दिलेला ताम्रपट आजही मंदिरात पाहावयाच मिळतो. अनेक थोरामोठय़ांच्या पदस्पर्शाने कशेळी गाव पावन झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन मार्च १६६१ मध्ये झाले होते. इतिहासाचार्य राजवाडे (१९१३), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१), बॅ. नाथ पै यांची कनकादित्यावर श्रद्धा होती.
राजापूरपासून ३२ कि.मी वर राजापूरमार्गे धारतळ, आडिवरे, कशेळी अशी बस व्यवस्था आहे. रत्नागिरीहून जायचे झाल्यास पावस, पूर्णगड, गावखडी, कशेळी असे जाऊ शकता. गाडी थेट देवळापर्यंत जाऊ शकते. जवळचे रेल्वे स्थानक राजापूर.

कुणकेश्वर
समुद्राच्या काठावर असलेले हे शंकराचे मंदिर पर्यटकांसाठी निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि भाविकांसाठी जागृत धार्मिक देवस्थान आहे. देवालयासमोर सहा दीपमाळा व भव्य नंदी आहे. मंदिराच्या शिखरावर गंड भेरुड, कामधेनूची चित्रे आहेत. मंदिरामध्ये शिवपिंडीव्यतिरिक्त पार्वतीची मूर्ती, नंदित्याल मागे श्री देवमंडलिक मंदिर, चार भव्य स्तंभात स्थापित कासव, तीन हाताचा गणेश आहे. नांदगांव रस्त्यावर सैतवडा धबधबा व ३० कि.मी. वर कोटकामते गावातले भगवती मंदिर बघण्यासारखे आहे.
रत्नागिरीची भगवती
रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे. या गडावर ती स्वयंभू रूपात राहिली आहे. देवळावरील घुमटी हेमाडपंथी पद्धतीची आहे. त्यावेळी असलेला देवीचा घुमट अजूनही तसाच आहे. १७३६ मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर यांना सांगून देवीचे मंदिर बांधल़े १९४० साली दानशूर भागोजीशेठ कीर यांनी हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. या मंदिराचा गोपूर जमिनीपासून ७० फूट उंचीचा आहे. देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान हे अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र आणि ढाल, तलवार आहे. देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे.
भगवतीच्या डोंगरावरून दिसणारे सौंदर्य विलोभनीय दिसते. येथील एक वैशिष्टय़ म्हणजे डोगराच्या एका बाजूला असणाऱ्या समुद्राकाठची वाळू काळी आहे तर दुसऱ्या बाजूच्या समुद्राकाठची वाळू पांढरी आहे. त्यामुळे समुद्र एकच असला तरी पांढरा समुद्र आणि काळा समुद्र अशी दोन अंगे आपल्याला भगवतीच्या डोंगरावरून पाहावयास मिळतात.
भगवतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रत्नागिरी बसस्थानकावरून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे. ही बस पायथ्यापर्यंत जाते. पुढे थोडा डोंगर चढून गेले की भगवतीच्या मंदिरात आपण सहज पोहचतो.
क्वालिटी रिसॉर्ट चिपळूण
कोकण फिरायचे असल्यास चिपळूण एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून जवळपास अडीचशे किमीवर असलेल्या चिपळूणला पोहोचण्यासाठी रेल्वेने चार तास लागतात. बसने किंवा खाजगी वाहनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून गेल्यास साधारण सहा ते साडेसहा तास लागतात.
क्वालिटी रिसॉर्टसचे रिव्हरव्ह्यू हे रिसॉर्ट राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परशुराम मंदिरापासून पायी अंतरावर असणारे हे क्वालिटी ग्रुपचे फोर स्टार रिसॉर्ट असून तेथे ३७ सुसज्ज व सुंदर व आरामदायी खोल्या आहेत. त्याचबरोबर येथे स्विमिंग पूल, आयुर्वेदीक मसाज, जिम, कॉन्फरन्स रूम, मुलांसाठी खेळघर अशा फॅसिलिटीजही उपलब्ध आहेत. गुहागर, वेळणेश्वर, डेरवण, हेदवी, परशुराम मंदिर, गणपतीपुळे अशा अनेक ठिकाणच्या साईटसीईंगसाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून गाडीची व्यवस्था केली जाते.
www.chiplunhotels.com
आडिवरेची महाकाली
भक्तांच्या नवसाला पावणारी आडिवरे गावची महाकाली देवी प्रसिद्ध आहे. वाडापेठ या ठिकाणी देवीची दक्षिणाभिमुख स्थापना करण्यात आली आहे. आद्य शंकराचर्यानीच श्री महालक्ष्मीची स्थापना केल्याचा उल्लेख पुरात आढळतो. मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजूला महालक्ष्मी आहे. महाकाली मंदिर परिसरात योगेश्वरी, नगरेश्वर, रवळनाथ मंदिरे आहेत. राहण्यासाठी भक्तनिवासाची सोय आहे. राजापूरपासून ३० कि.मी. वर अंतरावर आडिवरे हे गाव आहे. आडिवरे येथे राजापूरमार्गे किंवा बेनगीमार्गे नदी पार करून जावे लागत असे. परंतु आता पावसमार्गेही आडिवरे येथे जाता येथे. रत्नागिरीतून पावसमार्गे आडिवरेत जाताना कित्येक किमीचे अंतर कमी होते. जाताना अथांग समुद्राचे दर्शन तर होतेच.

रेडीचा श्री गणेश

रेडीचा श्री गणेश हा स्वयंभू आहे. ही मूर्ती १९७६ साली रेवती बंदराजवळील खाणीत सापडली. बसलेल्या अवस्थेतील ही मूर्ती १५ मी. उंचीची आहे. संकष्टीला येथे भक्तांची भरपूर गर्दी होते. रेडी येथे यशवंतगड हा किल्ला असून रेडी हे गाव मँगेनीज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. वेंगुल्र्यापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर असलेल्या रेडीला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.
राजापूरची गंगा
राजापूरची गंगा म्हणजे साक्षात स्वर्गीय गंगेचेच हे रूप असून अत्यंत अवचितपणे ही गंगा प्रकट होते आणि तितक्याच अचानकपणे ती लुप्त होते. हे मंदिर नदीकिनारी असून ही गंगा डोंगरात उगम पावते. साधारणत: दर तीन वर्षांनी येणारी ही गंगा प्रकट झाल्यावर मूळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड, नर्मदाकुंड, सरस्वतीकुंड, गोदाकुंड, वरुणकुंड, हिमकुंड, वदिकाकुंड आणि काशीकुंड अशी १४ कुंडांतून वाहते. जगातील एक आश्चर्य मानावे असे गंगामाईचं ठिकाण राजापूर शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या उन्हाळे गावाच्या टेकडीवर आहे. गंगेपासून जवळच खाली नदीकिनारी उन्हाळे गाव आहे. गावात ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मीचे मंदिर आहे. जवळच बारमाही वाहणारा गंधकयुक्त व औषधी असलेला गरम पाण्याचा झरा आहे. या पाण्यानेही त्वचारोग नष्ट होतात. राजापूरपासून अवघ्या तीन कि.मी वर असणाऱ्या या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा व इन्स्पेक्शन बंगला आहे.
विमलेश्वर मंदिर
निसर्गाच्या कुशीत लपलेले ठिकाण आजूबाजूला दाट वनराई, नारळ-पोफळीच्या बागा, फेसाळणारा समुद्र असे हे रम्य ठिकाण. देवालयाच्या समोर पाच नग्न मर्ती, गाभाऱ्यात उंचावरील शिवपिंड हे आणखी एक वैशिष्टय़. पावसाळ्यात येथे गरम पाण्याचे झरे पाझरतात. साडा या परिसरात असलेले हे मंदिर कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. देवगडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या या गावाकडे जाण्यासाठी देवगड बसस्थानकावरून बसेस सुटतात.

साटम महाराजांची दाणोली

आंबोलीच्या पायथ्याशी वसलेले दाणोली हे गाव कोकणातील संत महात्म्यांच्या परंपरेतील साटम महाराजांच्या वास्तव्याने पुण्यक्षेत्र म्हणून उदयास आले आहे. ते सावंतवाडी संस्थानचे राजगुरू होते. या ठिकाणी साटम महाराजांचे समाधीस्थान, नगझरी तळे तसेच निवासस्थान आहे. महाराजांच्या पुण्यतिथीला येथे मोठा उत्सव भरतो. दाणोली हे गाव सावंतवाडी-बेळगांव रस्त्यापासून १२ कि.मी. अंतरावर आहे.



मटणाचा झटका







 मटण घरोघरी कारभारणीच बनवत असल्या, तरी कोकणातल्या लाल तिखटजाळ मटणाची लज्जत वेगळी, कोल्हापूरच्या झणझणीत तांबड्या-पांढऱ्या रश्श्याची चव वेगळी आणि खानदेश-मराठवाडा-विदर्भातल्या कानाच्या पाळ्या गरम करणाऱ्या काळ्या मसाल्यातल्या मटणाची टेस्ट वेगळी. मात्र मटण कुठलंही असो तोंडाची 'हायहुय' झाल्याशिवाय मटण खाल्ल्यासारखं वाटत नाही...
...........

शहरातला पाव्हणा-रावळा खूप दिवसांनी गावी गेला, तर त्याच्यासाठी खास मटणाचा बेत करण्याची प'द्धत आजही गावोगावी आहे. आता शहरांतल्या घरात मटण होत नाही, असं नाही. पण तरीही गावच्या मोकळ्या वातावरणात झणझणीत मटणाची चव काही वेगळीच लागते. मग ते गाव कोकणातलं असो वा विदर्भातलं किंवा खानदेशातलं वा पश्चिम महाराष्ट्रातलं. चुलीवर किंवा आता गॅसच्या शेगडीवर रांधलेलं तिखटजाळ मटण आणि सोबत ज्वारी-बाजरी-तांदळाची भाकरी असली की, पाव्हण्यांचा अंतरात्मा शांत होतो. अगदी बोटंही चाटून-पुसून साफ केली जातात.

अलीकडे शहारांतून सर्रास कोंबडीच्या सागुतीला चिकन आणि बोकडाच्या सागुतीला मटण म्हटलं जातं. पण गावाकडे आजही सागुती कोंबडीची असो किंवा बोकडाची त्याला मटणच म्हटलं जातं आणि पाव्हणा जेवायला येणार असेल, तर सकाळपासूनच यजमान-यजमानणीची धावपळ सुरू होते. कारण विकतचं मटण आणण्याऐवजी घरातलंच दोन किंवा चार पायाचं मारण्याची पद्धत अद्याप खेडोपाडी शिल्लक आहे. मग या कामाची विभागणी होते. घरातल्या र्कत्या पुरुषाने बाहेरचं म्हणजे कोंबडी वा बोकड मारण्याचं काम बघायचं, तर घरधनीणीने आतलं म्हणजे मटणासाठी लागणाऱ्या वाटण्या-घाटण्याचं काम बघायचं. अन् खरी गोम तिथेच असते. कारण यजमान थोड्याच वेळात कोंबडी-बकरं कापून घरात मटण देऊन मोकळा होतो. पण ते चविष्ट रांधायचं कसोटीचं काम घरातल्या गृहिणीचं असतं. अन् हे काम ती आपलं सारं पाककौशल्य पणाला लावून मोठ्या हौसेनं करते. कारण संपूर्ण शाकाहारी किंवा मांसाहारी खाद्यपदार्थांत मटण करतानाच गृहिणीचा कस लागतो. कारण जरा काही कमीअधिक झालं की, मटणाचा बेत फसण्याची शक्यता असते. पण असं क्वचितच घडतं. रोजची भाजी ज्या सहजतेने फोडणीला घालावी, त्याच सहजतेने घरोघरीच्या कारभारणी किलो-दोन किलोचं मटण सहज बनवतात आणि आलेला पाव्हणा-रावळा त्यावर तब्येतीने आडवा हात मारतो.

पण मटण जरी घरोघरी कारभारणीच बनवत असल्या, तरी कोकणातल्या लाल तिखटजाळ मटणाची लज्जत वेगळी, कोल्हापूरच्या झणझणीत तांबड््या-पांढऱ्या रश्श्याची चव वेगळी आणि खानदेश-मराठवाडा-विदर्भातल्या कानाच्या पाळ्या गरम करणाऱ्या काळ्या मसाल्यातल्या मटणाची गोडी वेगळी. प्रदेश बदलतो, तशी मटण बनवण्याची पद्धतही बदलते. मात्र मटण कुठलंही असो तोंडाची 'हायहुय' झाल्याशिवाय मटण खाल्ल्यासारखं वाटत नाही. आणि त्यासाठीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात खास मसाले वापरले जातात.

कोकणात नारळ भरपूर असल्यामुळे मटण करताना भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कोकणात मच्छीचा, मटण-भाजीचा वर्षभराचा मसाला एकदाच कुटून ठेवला जातो आणि मटणाचा मालवणी-कोकणी मटणमसाला तयार करतानाच त्यात गरम मसाल्याचे पदार्थ घातलेले असतात. त्यामुळे कोकणी-मालवणी प'द्धतीचं मटण तयार करताना वेगळे असे गरम मसाल्याचे पदार्थ फार टाकावे लागत नाहीत. त्यामुळे कोकणी प'द्धतीचं मटण बनवायला वेळ लागत नाही. आलं-लसूण-कोथिंबीरीचं हिरवं वाटण आणि कांदा-खोबऱ्याचं भाजलेलं वाटण लावलं की घरातून मटणाचा वास परमळायला सुरुवात होते. हा वास असतो भाजलेलं आलं-लसूण, खोबरं आणि तेजतर्रार लाल मसाल्याचा. कारण मालवणी मटणमसाल्यात मिरची पावडर मोठ्या प्रमाणावर असते.

खानदेश-मराठवाडा-विदर्भात मात्र मटणाच्या मसाल्यात गरम मसाल्याचा वापर जास्त असतो. किंबहुना त्यांचा काळा मसाला म्हणजे गरम मसालाच असतो. मिरची पावडर तिथे वेगळीच ठेवलेली असते आणि मटण करताना तिचा वापर कमी केला जातो. परिणामी मराठवाडा-विदर्भातल्या मटणाचा रंग काळा असतो. आणि त्यात गरम मसाला जास्त असल्यामुळेच ते झणझणीत होतं. विशेषत: मराठवाड्यात मटणासाठी लागणारा काळा मसाला आयत्या वेळी केला जातो. त्यासाठी दगडफुल, धणे, खसखस, लवंग, वेलची असे गरम मसाल्याचे सर्व पदार्थ भाजून एकत्र कुटले जातात. तसंच कांदा बरेचदा अख्खा भाजला जातो आणि खोबरंही सुकंच वापरलं जातं. त्यामुळे या मसाल्याचा खमंगपणा मटणातही उतरतो. नगर-बीडकडे काही ठिकाणी मटणासाठी भाजल्या जाणाऱ्या पदार्थांत हरभऱ्याचे दाणेही भाजून घेतले जातात.

या काळ्या मसाल्यातलं मटण तयार करताना आधी ते तेलावर लसूण-जिरं आणि हळदीची फोडणी देऊन नंतर पाणी टाकून उकडलं जातं. मटण शिजल्यावर वेगळ्या भांड्यात भरपूर तेलावर कांदा परतून घेऊन त्यात ताजा काळा मसाला आणि मिरची पावडर चांगली परतून घ्यायची नि मग त्यातच शिजवलेलं मटण टाकायचं. यात मटण उकडल्यावर उरलेलं पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं. या मिश्रणाला मस्त वाफ काढली की झणझणीत काळं मटण तयार होतं.

पश्चिम महाराष्ट्रातही मटण करायची पद्धत साधारणपणे अशीच आहे. मात्र तिथला मसाला, विशेषत: कोल्हापूरकडचा मसाला कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे. तिथे कांदा-लसूण, कोथिंबीर, जायपत्री, मिरच्या भाजून त्यापासून तयार केलेला मसाला मटणासाठी वापरला जातो. हा मसाला 'कोल्हापुरी मसाला' म्हणूनच प्रसिद्ध आहे. याशिवाय प्रत्यक्ष मटण करताना ओलं खोबरं, सुकं खोबरं, जिरं, तीळ आणि गरम मसाल्याचे पदार्थ भाजून त्याचंही वाटण मटणाला लावलं जातं.

कोल्हापुरी पांढरा रस्सा करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. त्यासाठी मटण शिजवून त्याचा रस्सा (स्टॉक) वेगळा काढून ठेवतात. नंतर मोठ्या पातेल्यात तुपावर काळी मिरी, सुक्या लाल मिरच्या आणि तमालपत्राची फोडणी तयार करून त्यात ओल्या नारळाचं दूध आणि मटणाचा स्टॉक टाकतात. कधी कधी यात काजूची पेस्टही घालतात.

मटण करण्याच्या पद्धती केवळ प्रादेशिकतेनुसारच नाही, तर समाजा-समाजानुसार बदलतात. त्यामुळे सगळ्याच पद्धतींचा इथे मागोवा घेता येणार नाही, पण ठाणे जिल्ह्यातील डहाणू-पालघरच्या चौकळशी-पाचकळशी समाजात फक्त काळी मिरीच्या पावडरमध्ये सुकं मटण केलं जातं. भरपूर तेलावर आलं-लसूण (२०टक्के आलं, ८० टक्के लसूण) आणि खसखशीची पेस्ट परतून त्यात काळी मिरीची भरड पावडर टाकायची. हे मिश्रण चांगलं परतून घेतल्यावर त्यात मटणाचे तुकडे टाकायचे आणि ते शिजण्यासाठी पाणी टाकायचं. मात्र हे पाणी पूर्णपणे आटवायचं.

याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील लमाण समाजात मटणाचा 'सळोई' नावाचा एक वेगळाच प्रकार केला जातो. पाहुणे जेवायला येणार असतील तर लमाण समाजात हा पदार्थ हमखास केला जातो. त्यासाठी बोकडाची मुंडी, खुर, वजरी(कातडी) साफ करुन ती मोठ्या पातेल्यात उकडत ठेवतात. ते शिजत आल्यावर त्यात बाजूला काढलेली रक्ती म्हणजे रक्त आणि ज्वारीचं पिठ एकत्र चांगलं खलवूून टाकतात. नंतर मीठ टाकून हे मिश्रण आटवतात. या सळोईमध्ये मसाला किंवा मिरची काहीही टाकत नाही, तरीही ती चवीला अप्रतिम लागते.

नागपूरचं सावजी मटणही असंच प्रसिद्ध आहे. सावजी म्हणजे कोष्टी समाज. मूळच्या विणकर असलेल्या या समाजातील काही मंडळींेनी आपल्या घरात बनणारं चविष्ट मटण खानावळीतून विकायला सुरुवात केली आणि तेच पुढे 'सावजी मटण' या नावाने प्रसिद्ध पावलं. जळजळीत तिखट ही या मटणाची खासीयत. हे मटण बनवण्याची रेसिपी साधारणपणे इतर मटणांप्रमाणेच आहे. मात्र या मटणासाठी कोष्टी समाजातील जो मसाला वापरला जातो, त्याची अधिकृत रेसिपी कुणालाच सांगितली जात नाही. हा मसाला बनवण्यासाठी तब्बल चार दिवस लागतात, असं म्हटलं जातं.

महाराष्ट्रात मटणाचे असे नानाविध प्रकार केले जातात. तरी सर्वसाधारणपणे मटण म्हणजे झणझणीत, तिखटजाळ हेच समीकरण आहे आणि असं झणझणीत मटण खानदेश, मराठवाडा, विदर्भ असं सर्वत्रच ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लं जातं. मराठवाडा-विदर्भात तर मटणात भाकऱ्या कुस्करुन खाण्याची पद्धत आहे. कोकणात मात्र अशी पद्धत नाही. तसंच कोकणात मटणाबरोबर खायच्या पदार्थांमध्येही विविधता आहे. तांदळाची भाकरी असतेच. पण त्याशिवाय भाजणीचे कोंंबडीवडे, तांदुळ-गव्हाचं पिठ आदल्या दिवशी एकत्र भिजवून केलेले भोकाचे वडे ते थेट आंबोळ्या असे अनेक पर्याय कोकणात उपलब्ध आहेत.

मात्र भाकरी असो किंवा वडे, मटण तिखटजाळ-झणझणीत असेल तर मटणाचा बेत रंगलाच समजा! 




झणझणीत कुर्ल्या




 

 पावसाळा सुरू झाला की कुर्ल्यांचं म्हणजे खेकड्यांचं पीकच येतं. मग मटणाप्रमाणेच कुर्ल्यांचेही बेत शिजू लागतात. चवीत मटणाच्या रश्श्यालाही मागे टाकणाऱ्या कुर्ल्यांची जिभेवर रेंगाळणारी झणझणीत चव...

********************

गावोगावी पाऊस आता रुळलाय. नद्या, नाले, ओढे, पऱ्ह्े दुथडी भरुन वाहू लागलेत. एवढे की नाल्या-ओढ्याचं पाणी आता शेतातही खेळू लागलंय. आणि म्हणूनच एरव्ही समुदाच्या खाडीच्या खाजणात आढळणारी किरवी म्हणजेच कुर्ल्या वाहत्या पाण्याबरोबर नदीतून नाल्यात आणि नाल्यातून शेतात धावू लागल्या आहेत. साहजिकच सांजच्याला काही कोरड्यास नसलं की, घरातली सासुरवाशीण शेतावरनं येतानाच कारभाऱ्याला 'येताना थोड्या कुर्ल्या घेऊन या', म्हणून सांगू लागली आहे.

किरव्यांचा म्हणजेच कुर्ल्यांचा बेत ठरला की, माणूस एकटा-दुकटा नाहीच जात किरवी पकडायला. कारण तुरुतुरू धावणारी छोटी-मोठी किरवी शेतात सहज सापडत असली, तरी भरपूर मांस असलेली किरवी हवी असतील, तर नदीत किंवा नाल्यातच उतरावं लागतं आणि किरव्यांची बिळं हुडकावी लागतात. नेहमीच ही बिळं किरव्यांची नसतात, कधी कधी पाणसापांचीही असतात. पण जे पट्टीचे मासेमार असतात, त्यांना कुठली बिळं कुणाची ते बरोब्बर ठाऊक असतं. आणि किरव्यांचं बीळ हुडकलं की ते लगेच त्या बिळात हात घालत नाहीत. खेकड्यांना पकडताना ते आपल्याबरोबर गवताची काडी ठेवतात. किरव्याचं बीळ दिसलं की त्यात ते हळूहळू गवताची काडी घालतात. काडी पुरेशी आत गेल्यावर ते काडी भोसकायला सुरूवात करतात. जर आत किरवा असेल, तर तो त्या भोसकण्याने चिडून ती काडी आपल्या आंगड्यांमध्ये(नांग्या) घट्ट पकडतो. त्यासरशी काडी आत सारणाऱ्याला काडी जड लागते आणि किरवा फसल्याची खात्री पटते. मग तो ती काडी अलगद बाहेर काढतो. त्याबरोबर किरवाही बाहेर येतो. मात्र सहज हातात सापडलेला हा किरवा खूप सावधपणे पकडावा लागतो. त्याला बेसावधपणे पकडायला गेलं तर, त्याने हाताचा अंगठा आपल्या आंगड्यांनी फोडलाच म्हणून समजा. म्हणूनच किरवा पकडताना तो मागून त्याच्या मधल्या भागावर दाब देऊनच पकडावा आणि पकडल्या पकडल्या त्याच्या आंगड्या तोडाव्या.

असे आंगड्या तोडलेले मोठ्ठाले किरवे टोपलीभर जमा झाले की सारेजण त्याची वाटणी करतात आणि ऐटीत घरी जातात. एव्हाना त्यांच्या जिभेवर किरव्यांची चव रेंगाळायला सुरुवात झालेली असते.

अर्थात किरवी पकडून यजमान घरी परतेपर्र्यंत, सासुरवाशिणीने वाटणाघाटणाची सगळी तयारी करून ठेवलेली असते. कांदा-खोबरं चुलीत खमंग भाजून वाटून ठेवलेलं असतं. आलं-लसणाची बारीक गोळी वाटून ठेवलेली असते. फोडणीसाठी कांदाही बारीक चिरून ठेवलेला असतो. घरी येऊन यजमानाने किरव्यांची पोतडी हातात सोपवली की, पुढची उस्तवार तीच करते. सगळ्यात आधी ती किरवी पाण्याने स्वच्छ धुऊन घेते. नंतर त्यांचे पाय तोडून ते पाट्यावर जाडसर वाटते आणि पाण्यात टाकून पायातलं मांस आणि कवच वेगळं करते. मग कवचाचा जाडसर भाग टाकून, मांसयुक्त पाणी कालवणासाठी ठेवून देते.

किरवा साफ करणं तसं जिकिरीचंच असतं. आंगड्या मोडलेल्या असतात. पायही मोडून झालेले असतात. किरव्याचा मधला जो भाग असतो, त्याला पेंदा म्हणतात. तो मांसाने भरलेला असतो. तो साफ करताना त्याचं वरचं कवच काढून टाकलं जातं. मात्र कवच साफ करताना त्यात जी लाख असते, ती काढून घेतात. किरवी छोटी असतील तर ती क्वचित कवचासकट ठेवतात आणि जर मोठी असतील, तर त्याचे विळीवर दोन तुकडे करतात.

एवढं सगळं झाल्यावर चुलीवर मोठ्या पातेल्यात तेल कडकडीत तापवून त्यात कांदा फोडणीला टाकला जातो. कांदा चांगला परतल्यावर त्यात आलं-लसूण-कोथिंबीर वाटून तयार केलेला हिरवा मसाला आणि कांदा-खोबऱ्याचं वाटण टाकलं जातं. ते परतल्यावर मसाला (सुक्या मिरच्या आणि गरम मसाल्याचे पदार्थ टाकून केलेला मसाला) टाकून पुन्हा एकदा हे सारं मिश्रण तेलावर खमंग परतायचं. त्याला कडेने तेल सुटू लागल्यावर मग त्यात साफ केलेली किरवी आणि आंगड्या टाकायच्या. नंतर आवश्यक तेवढं पाणी टाकून ते चांगलं रटरटू द्यायचं. जसजशी किरवी शिजू लागतात तसा त्यांचा वास नाकात शिरतो आणि त्या वासावरूनच ओळखता येतं की, घरात किरवी शिजतायत. साधारणपणे दहा-पंधरा मिनिटं चांगलं रटरटल्यावर किरवी झकास शिजतात. त्यांचा मूळचा काळपट रंग जाऊन त्यांना सुरेख तांबुसपणा आलेला असतो.

अशा किरव्यांवर ते गरमगरम असतानाच ताव मारण्याचा आनंद काही भन्नाटच असतो. किरव्यांचं कालवण करताना त्यात तिखट जरा जास्तच टाकलं जातं. सदीर् घालवण्यासाठी किरव्यांचा तिखटजाळ रस्सा हा उत्तम उपाय मानला जातो.

असा हा किरवा किंवा कुर्ल्या म्हणजेच खेकडा. संपूर्ण महाराष्ट्रात किरव्यांना सरसकट खेकडा म्हटलं जातं. पण कोकणात खेकड्यांना किरवा, कुर्ल्या, चिंबोऱ्या अशी अनेक नावं आहेत. विशेषत: आगरी-कोळी समाजात खेकड्यांना चिंबोऱ्या म्हणतात आणि त्या अधिक करून हिरव्या मसाल्यात म्हणजे आलं-लसूण-कोथिंबीरीच्या वाटणात केल्या जातात. उर्वरित कोकणात मात्र खेकड्यांना कुर्ल्या किंवा किरवीच म्हटलं जातं आणि मटणासारखंच भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून कुर्ल्या मासाला करण्याची पद्धत आहे.

खेकडे महाराष्ट्रात सर्वत्र मिळतात, त्यामुळे ते सगळीकडेच खाल्ले जातात. परंतु कोकणातली मजा इतरत्र नाही. कारण कोकणात पेंदा किंवा आंगड्या दाताने चावूनच खाल्ल्या जातात. परंतु इतरत्र अनेक ठिकाणी पेंदा किंवा आंगड्या ठेचून टाकला जातो. किंवा काही ठिकाणी आंगड्या ठेचून त्यातलं मांस काढूनच शिजवलं जातं. खानदेश-मराठवाडा-विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रात खेकड्याचं कालवण करायची पद्धत साधारणपणे सारखीच आहे. फक्त खानदेश, मराठवाड्यात काळा मसाला टाकून खेकडे ठेचून टाकले जातात. तर पश्चिम महाराष्ट्रात मिरच्या-कांदा-लसूण भाजून केलेला लाल मसाला वापरला जातो. सोलापूर परिसरात मात्र खेकडा मसाला करण्याची खास पद्धत आहे. तिकडे खेकडा मसाला करताना नेहमीचा काळा मसाला वापरतातच, पण त्याचबरोबर काळी मिरी, जिरं, मेथी, सुकं खोबरं आणि कांदा एकत्र भाजून त्याचा मसाला करून तो कालवणासाठी वापरला जातो. मुख्य म्हणजे सोलापुरात खेकड्याच्या कालवणात चिंचेचा कोळ टाकला जातो, जो इतरत्र कुठेच टाकला जात नाही.

कोकणात खेकड्यांच्या कालवणाबरोबरच भरलेली खेकडी करण्याचीही पद्धत आहे. त्यासाठी खेकड्यांचं कवच अलगद काढून त्यात सारणासाठी केलेला मसाला भरला जातो. सारणाचा मसाला करताना कांदा-खोबरं भाजून त्याचं वाटण केलं जातं. या वाटणात जेवढ्यास तेवढं चण्याच्या डाळीचं पीठ मिसळून, चवीपुरतं मीठ टाकून ते सारण एकजीव केलं जातं. अशा पद्धतीने तयार केलेलं सारण खेकड्याच्या कवचात भरुन कवच पुन्हा बंद केलं जातं. हे कवच सुटू नये म्हणून खेकडा गवताच्या काडीने बांधला जातो आणि मग कालवणात सोडून शिजवला जातो.

हे भरलेले खेकडे खातानाची मजा काही न्यारीच असते. कारण खेकड्यांतलं चविष्ट मांस असतंच. पण जोडीला त्या मांसाची आणि रश्श्याची चव कवचात भरलेल्या सारणातही उतरलेली असते. रश्श्यात शिजलेला तो सारणाचा उंडा म्हणजे अक्षरश: जिव्हेची तृष्णा तृप्त करणारा असतो. यापेक्षा चविष्ट काही असूच शकत नाही, एवढं वाटण्याइतका हा उंडा टेस्टी असतो.

पण हा उंडा असो किंवा नुस्ता खेकडा, त्याचं कालवण पातेल्यात रटरटायला लागल्यावर पोटात भुकेचा आगडोंब उसळलाच पाहिजे! हीच तर झणझणीत कुर्ल्या मसालाची खासियत आहे!! 



चटकदार कोळंबी








----------------------

कोकणात कुठेही जावं, कोळंबीचे विविध पदार्थ चाखायला मिळतात. अगदी वांग्याबटाट्याच्या रश्श्याबरोबर आणि शेवग्याच्या शेंगांबरोबरही कोळंबी कालवणात सापडते. कोळंबी ज्या पदार्थांत जाईल तिथे अगदी सहज मुरून जाते. पण स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व राखूनच!

जे मत्स्याहाराला पूर्णपणे सरावलेले नसतात, ते आपल्या नवतीच्या दिवसात फक्त कोळंबी खातात. कारण कोळंबीत काटा नसतो आणि कोळंबी शिजल्यावर फळाच्या गरासारखी लागते. त्यात ती फ्राय म्हणजे नुस्ती मसाला लावून तळलेली असेल, तर चकण्यासाठी तळलेल्या लसणापेक्षा भारी लागते.

मात्र कोळंबी हा माशाचाच एक प्रकार (शेल-फिश)असला, तरी कोळंबीची टेस्ट ही कोळंबीचीच असते. पापलेट, सुरमई किंवा हलवा यांची चव, नाही म्हटलं तरी थोडीफार सारखी असते. परंतु कोळंबीची दडदडीत चव खास तिची असते. कोळंबी कितीही शिजवली तरी ती एकदम नरम शिजत नाही, ती दडदडीत म्हणजे घट्टमुट्ट अशीच राहते आणि त्यातच तिची चव दडलेली आहे. या चवीसाठी खवय्यांच्या कोळंबीवर उड्या पडतात.

अशी ही कोळंबी मत्स्यप्रेमींचा जीव की प्राणच! पण कोळंबी किंवा एकूणच माशांचे प्रकार हे मुख्यत: समुदात मिळत असल्यामुळे मासे हे समुदकिनारी राहणाऱ्यांचंच प्रमुख खाद्य आहे आणि त्यामुळेच संपूर्ण कोकण किनारपट्टी मासे खाण्यात पटाईत आहे. अर्थात नदी किंवा तलावातही मासे मिळतात. परंतु तरीही खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र मांसाहार म्हणजे मटण जेवढं चवीने खातो, तेवढ्या चवीने मत्स्याहार करत नाही. परिणामी मत्स्याहाराच्या भौगोलिकतेनुसार वेगवेगळ्या पध्दती पाहायला मिळत नाही. परंतु ती उणीव कोकणवासीयांनी स्वत: भरुन काढली आहे. कोकणात जेवढ््या जाती, तेवढ्या त्यांच्या मासे करण्याच्या पध्दती वेगवेगळ्या. कोळंबीही याला अपवाद नाही. किंबहुना कोळंबीच्या जेवढ्या नाना त-हा चाखायला मिळतात, तेवढ्या इतर माशांच्या क्वचितच मिळत असतील.

मुख्य म्हणजे आज हॉटेलात सर्रास तळलेली कोळंबी मिळत असली, तरी कोकणात घरी शक्यतो कोळंबी तळत नाहीत. घरी कोळंबी करताना कोळंबी मसाला किंवा कोळंबीचं कालवणच करतात. कोळंबी मसाला करताना साधारणपणे सर्वत्र एक पध्दत आढळते. ती म्हणजे मध्यम आकाराची कोलंबी साफ करुन घ्यायची. कांदा बारीक चिरुन भरपूर तेलात परतवून घ्यायचा. त्यात कांदा-खोबऱ्याचं भाजलेलं आणि आलं-लसूण-कोथिंबीरीचं वाटण टाकायचं. त्यानंतर तिखट मसाला टाकून तोही तेलावर चांगला परतून घ्यायचा. मग त्यात कोळंबी टाकून वर झाकण ठेवून ती शिजवायची. 'कोळंबी मसाला' हवी असेल, तर या रेसिपीत जास्त पाणी टाकायचं नाही. उलट टाकलेलं आटवायचं. मात्र कालवण हवं असेल, तर त्यात आवश्यक तेवढं पाणी टाकायचं.

मात्र ही झाली सर्वसामान्य आणि सर्वमान्य पध्दत. परंतु कोकणात कोळी, आगरी, कुणबी, वाडवळ, भंडारी, पाठारे प्रभु अशा वेगवेगळ्या समाजात कोळंबीची काही ना काही वेगळी पाककृती चाखायला मिळते. तळकोकणात गेलात तर तिथे 'कोळंबीची पोटली' आणि 'कोळंबीचं तिखलं' हे प्रकार चाखायला मिळतील. 'कोळंबीची पोटली' म्हणजे आधी एका भांड्यात तेलावर बारीक चिरलेला कांदा टाकून तो परतून घ्यायचा. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकायची. मग त्यात मालवणी मसाला टाकायचा. हे मिश्रण चांगलं परतल्यावर त्यात साफ केलेली कोळंबी टाकायची. चवीसाठी मीठ व वरुन कोकमं टाकायची. यात पाणी टाकायचं नाही. झाकण मारुन वाफेवरच कोळंबी शिजवायची. कोळंबी शिजून हे सर्व मिश्रण घट्ट झालं की ते हळदीच्या पानात घेऊन त्याची मोटली म्हणजे पुरचुंडी बांधायची. मोटली बांधण्यासाठी केळीच्या खोडाचा दोर वापरतात. मोटली बांधली की ती चुलीतले निखारे पुढे ओढून त्यावर टाकायची. साधारणपणे तीनेक मिनिटं ही पोटली निखा-यात ठेवली की आतलं मिश्रण खरपूस भाजून निघतं. त्याला हळदीच्या पानाचाही सुरेख वास येतो. हळदीचं पान नसलेल्या दिवसात हीच मोटली केळीच्या पानांत बांधतात. पण एकूणच निखाऱ्यांवर ही पोटली भाजून निघाल्यामुळे आतल्या कोळंबी-मसाल्याला जी चव येते, ती म्हाराजा दुस-या कशालाच नाही.

' कोळंबीचं तिखलं' करताना मात्र ते मातीच्या पसरट भांड्यात करण्याची पध्दत आहे. या पसरट भांड्याला सरकुल म्हणतात. हे सरकुल चुलीवर ठेवून त्यात पुरेसं तेल टाकायचं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्यात आलं-लसूण आणि खोब-याचं रवाळ वाटण टाकून मग त्यात मालवणी मच्छी मसाला टाकायचा. हा मसाला चांगला परतल्यावर त्यात तिरफळं आणि मीठाबरोबर स्वच्छ केलेली कोळंबी टाकायची. पुरेसं पाणी टाकून शिजवायची. पण एकदम पातळ करायची नाही. पण हे तिखलं एकदम पातळ करायचं नाही. थोडं जाडसर ठेवायचं. कोळंबीच्या या तिखल्याबरोबर भात ओरपताना बिलकूल भान राहत नाही.

कोळंबीच्या मोटलीप्रमाणेच कोकणातील भंडारी समाजात केलं जाणारं कोळंबीचं सुकंही एकदम भन्नाट असतं. त्यासाठी कोळंबीला आधी कोकमाचं आगळं आणि मीठ लावून ती थोडावेळ बाजूला ठेवायची. नंतर चिरलेला कांदा, धणे, बडीशेप, सुक्या काश्मिरी मिरच्या आणि खवलेलं खोबरं या सारं मिश्रण कच्चच वाटायचं. मग लोखंडी कढईत किंवा जाड बुडाच्या पसरट भांड्यात तेल घेऊन, तेलावर हे सारं वाटण मस्त परतवून घ्यायचं. ते परतल्यावर त्यात कोळंबी आणि दोन-तीन कोकमं टाकायची. झाकण मारुन शिजवायची. यात पाणी अजिबात टाकायचं नाही. वाफेवर कोळंबी शिजून आतला मसालाही एकदम सुका खडखडीत झाला पाहिजे. त्यानंतर भाडं खाली उतरायचं. हा मसाला आणि कोलंबीचा आस्वाद घेण्यासाठी सोबत तांदळाची गरमागरम भाकरीच पाहिजे.

कोळी-आगरी समाजात बनविले जाणार कोळंबीचे प्रकारही भन्नाट आहेत. कोळी समाजाची 'कोळंबी मसाला' पाककृती फेमस असली, तरी लाल तर्री असलेलं हिरव्या मसाल्यातलं कोळंबीचं कालवण म्हणजे भन्नाटच. बटाटे आणि टोमॅटो टाकून केलेलं हे कालवण भाकरी आणि भाताबरोबर झकास लागतं. कितीही हात धुतले तरी तेल आणि कोळंबीचा वास जाता जात नाही.

आगरी समाजाची कोळंबी रेसिपीही वेगळी आहे. कोळंबी साफ करुन ठेवायची. आलं, लसूण, कोथिंबिरीची पेसस्ट करुन घ्यायची. चिंच गरम पाण्यात भिजत घालायची. ही तयारी झाल्यावर तेल कडकडीत तापल्यावर त्यात आलं-लसणाचं वाटण टाकायचं. ते खमंग परतल्यावर, हळद आणि खास आगरी मसाला टाकायचा. नंतर कोळंबी आणि चवीसाठी मीठ टाकायचं. कोळंबी शिजत आल्यावर भिजत घातलेल्या चिंचेचा कोळ टाकायचा. पाणी टाकायचं नाही. ही कोळंबी साधारणपणे सुकी होते. कांदा-खोबरं नसल्यामुळे ही चवीलाही छान लागते. आगरी समाज कोळंबीत कांदा-खोबरं टाकत नाहीत. त्यामुळे कोळंबीची चव जाते, असं त्यांचं म्हणणं आहे.

आगरी समाजाप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील पालघर-डहाणू परिसरातल्या वाडवळ समाजातही कोळंबीचे वेगवेगळे भन्नाट पदार्थ केले जातात. पण त्यातही कैरीच्या दिवसात केली जाणारी 'आंबा कोळंबी' खासच आहे. ती करण्याची पध्दत म्हणजे पसरट भांड्यात तेल घेऊन, ते तडतडल्यावर त्यात कांदा फोडणीला टाकून मग आलं-लसूण पेस्ट टाकायची. ती व्यवस्थित परतल्यावर हळद-मीठ आणि खास वाडवळ मसाला परतून घ्यायचा. मग कोळंबी टाकून ती शिजण्यासाठी अंगासरशी पाणी टाकायचं. कोळंबी शिजत आली की, कैरीच्या फोडी आणि थोडं तांदळाचं पीठ कालवलेलं पाणी आमि चिंचेचा कोळ, थोडा गूळ व खोबरं टाकायचं. साधारणपणे पाच मिनिटं शिजवून मग गॅस बंद करायचं. चिंचेच्या कोळामुळे काळसर दिसणारी ही 'आंबा कोळंबी' चवीला मात्र एकदम फर्मास असते.

मूळ मुंबईकर असलेल्या पाठारे प्रभूंचं 'कोळंबीचं खडखडलं'ही असंच सस्त आहे. हे खडखडलं करताना दोन पळ्या तेल घेऊन त्यात वाटलेलं लसूण, हिंग, हळद, काळी मिरी, पाठारे प्रभूंचा सांभार मसाला (बहुतेक समाजाचे मसाले आता त्या-त्या समाजाच्या नावाने बाजारपात मिळतात)टाकून चांगला परतायचा. नंतर त्यात कोळंबी टाकून ती टोप दोन्ही हातानी धरुन खडखडवायची. म्हणजे कोळंबीला मसाला मस्तपैकी लागतो. या खडखडवण्यामुळेच या रेसिपीला 'खडखडलं' नाव मिळालंय. या रेसिपीतही कांदा टाकत नाहीत. पाणी बेताचंच टाकावं. रस्सा जाडसर झाला की गॅस बंद करावा. या खडखडल्याची चव कोळंबीच्या इतर रेसिपीपेक्षा वेगळी लागते.

कोकणात कुठेही जावं कोळंबीचे असे विविध पदार्थ चाखायला मिळतात. अगदी वांग्याबटाट्याच्या रश्श्याबरोबरच, शेवग्याच्या शेंगांबरोबरही कोळंबी कालवणात सापडते. एवढंच नाही, तर वाढवळ समाजात भेंड्याच्या भाजीबरोबरही कोळंबी असते. कोळंबी ज्या पदार्थांत जाईल तिथे ते अगदी मुरून जाते. पण स्वत:चं अस्तित्व राखूनच!