Wednesday, 20 June 2012

गावाकडचं लगीन





‘यायचं हं’ असा लाडीक आग्रह करून बोलावलेल्या वर्‍हाड्यांचा छळ !

गाव म्हटलं की डोळ्यासमोर सर्व कसं साधं, सोज्वळ रूपात उभं राहतं. पण गावाकडची लग्नं हल्ली हल्ली तर अंगावरच येऊ लागली. काय तो बडेजाव, काय तो दिखाऊ दिमाख वर्‍हाड्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी ही ‘गावाकडची लग्नं’.. लग्नाचा मुहूर्त टळूनही उरकता उरकत नाहीत ! सत्कार सोहळे, आशीर्वादाची भाषणं. पुढारी नेत्यांच्या उठाठेवीनं गजबजून गेलेल्या या लग्न नामक सोहळ्यात नवरा-नवरी, मुहूर्त याकडे लक्ष द्यायला कोणाला उसंतच नसते.

परवा एका लग्नाला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग. वैशाखाचं ऊन रणरणतंय. घामाच्या धारांनी अंग घामेजून गेलंय. सगळ्यांच्या जिवाची काहिली झालेली. घड्याळात एक वाजून दहा मिनिटं झालेली. स्टेजवरील माइकवरून अखंड वटवट सुरू आहे. बाजूला बसलेले संगीत पार्टीवाले एकामागून एक रचना सादर करताहेत. मात्र, त्यांचं गाणं ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नाहीये! गाऊन नव्हे ओरडून त्यांचा घसा बाकी कोरडा पडलाय. कोणीतरी मध्येच त्यांना थांबवतोय. त्यांना गाण्याची अर्धी ओळही त्यांना गिळावी लागतेय! तेवढय़ात घाईघाईनं चार-दोन मान्यवरांची नावं पुकारून ‘सत्कार’ उरकून घेतले जातात..

लग्न ठरवताना अगदी आवर्जून पाहिलेला पत्रिकेवरील ‘शुभमुहूर्त’ केव्हाच टळून गेलाय. म्हणून वर्‍हाडी मंडळी अस्वस्थ आहेत. भर दुपारी मिरवणूक निघालीय.आपण ज्या शुभ मंगल सोहळ्यासाठी आला आहात.. तो सोहळा काही क्षणांत संपन्न होणार आहे.,’ असं वारंवार सांगितंल जातयं. (क्षण सोडा; अख्खा तास उलटून गेलाय.) उपस्थितांची सहनशीलता आता संपलेली. एक जण उठतो. जाऊन सूत्रसंचालकाला गाठतो. उशिराचं कारण विचारतो. तेव्हा भलतंच समजतं की ‘साहेब’ वाटेत आहेत. त्यांना यायला थोडा उशीर होतोय म्हणून.. हसावं की रडावं?

गावाकडच्या लग्नाचं स्वरूप आज इतकं बदललंय की, या लग्नांना जाणं ही विवेकी लोकांना शिक्षा वाटू लागलीय. अर्थात, हा बिघाड काही लग्नापुरता र्मयादित नाहीये. हे अगदी मान्य. परंतु समाजात अनिष्ट परंपरा, विकृती कशा निर्माण होतात? त्या पद्धतशीर कशा पोसल्या जातात? पुढे कशा फोफावतात. त्यातून सामाजिक प्रश्न कसे निर्माण होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता असणार्‍यांनी गावाकडची लग्नं जरूर ‘अटेन्ड’ करावी.

एका मित्राच्या लग्नाची पत्रिका घरात येऊन पडली. आशीर्वाद, सन्माननीय उपस्थिती, विशेष उपस्थिती, प्रेषक, कार्यवाह, व्यवस्थापक, संयोजक, स्वागतोत्सुक, निमंत्रक, भाऊबंद, किलबिल परिवार, आणखीन फर्म्सची आणि नवरा-नवरीची मिळून तब्बल ३५९ नावं होती! अर्थातच नवरा-नवरीची नावं त्यात हरवलेली! बर्‍याचदा पत्रिकेत नावं असलेली मंडळी लग्नाच्या मांडवाकडं फिरकतही नाहीत! आपलं नाव पत्रिकेत आहे, हेच मान्यवरांना ठाऊक नसतं.

अलीकडे लग्नपत्रिकेबाबत नवं ‘फॅड’ आलंय. एकाच लग्नाच्या तीन-चार नमुन्यांतल्या पत्रिका पाहायला मिळतात. यात खटकणारी बाब म्हणजे पाहुण्यांची ‘लायकी’, त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्थान पाहून पत्रिकांचं वितरण केले जाते. गरिबाला गरीब पत्रिका आणि दाबजोर असामींसाठी सजवलेली महागडी पत्रिका! विशेष म्हणजे असा चातुर्वण्र्य पाळायला कोणाला काही गैर वाटत नाहीये. अगदी बिनदिक्कतपणे सारं सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी उन्हातान्हात करावी लागणारी यातायात हा स्वतंत्र विषय आहे. ‘मान्यवरांची’ प्रत्यक्ष भेट होईपर्यंत यजमान लोकं पत्रिका देण्यासाठी हेलपाटे घालत राहतात. अगदी न थकता,न कंटाळता ते मान्यवरांचा पाठपुरावा करतच राहतात आणि पत्रिका वाटूनच घरी परततात

लग्नांत ‘सत्कार’ नावाचं ढोंग पोसलं जातंय. खरं तर हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. अगदी म्हणायचंच तर स्वागत म्हणावं. अनेक ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे फेटे बांधायला खास माणूस बोलावतात. माइकवरून अनेक नावांचा पुकारा सुरू असतो. अमुक-तमुक यांना विनंती आहे की, त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं.. हे लोक मोठय़ा लगबगीनं येतात. फेटा बांधून घेतात. पुढच्याच क्षणाला काढतात. चोळामोळा करून बगलेत घालतात! फेट्याचा काहीही उपयोग होत नाही, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण हे ‘फेटा कल्चर’ मांडवातल्या उपस्थितांचं वर्गीकरण कन टाकतेय.

दहा-पाच कथित अमुक-तमुकरावांचा सत्कार होत असताना लग्नासाठी खास वेळ खर्चून आलेल्या पै-पाहुण्यांना काय वाटत असेल याची कोणालाच फिकीर नसते. मात्र ‘अमुक-तमुक’ची बडदास्त ठेवताना, त्यांच्या मागं-पुढं करताना यजमानाची पुरेवाट लागलेली असते. हे अमुक-तमुक कोण? तर ते असतात राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी-अधिकारी अन् पत्रकारही. त्यात आमदार-खासदार साहेब, तहसीलदार, इन्स्पेक्टर किंवा बी.डी.ओ. लग्नाला आले असतील तर यजमानांची स्वारी भलतीच खूश. सोहळ्याला ‘चारचाँद’ लागल्यासारखं वाटतं त्यांना. पण उपस्थितांमध्ये कोणी संशोधक, वैज्ञानिक, साहित्यिक, ख्यातकीर्त चित्रकार, संगीत क्षेत्रातला कलावंत, सामाजिक कार्यकर्ता किंवा वेगळे काही करणारं कोणी आलं असेल तर त्यांची दखल पण घेतली जात नाही? अलीकडे लग्न म्हणा किंवा कौतुक सोहळ्यातून आध्यात्मिक गुरू, बाबा, बुवा, महाराज, उपदेशकांचे मोठ्ठं स्तोम माजलयं. मग कुठं ऐन लग्नातच दर्शनबारी सुरू होते!

मुळात ही सत्काराची किंवा नामोल्लेख करण्याची प्रथाच चूक आहे. त्यामुळे खर्‍या गुणवंतांचा सत्कार केला जात नाही, अशी तक्रार करायची नाहीये. पण यावन समाजात प्रतिष्ठेचे, गुणवत्तेचे, यशस्वीतेचे मापदंड कोणते आहेत? हे समजतं इतकंच. मुला-मुलीला सरपंच हो किंवा राजकारणात पड असे, सहसा कोणी सांगत नाही. तेव्हा आयटी, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा शाखांमागे करिअरच्या शोधात धावणारी पालक मंडळी लग्नात प्रतिष्ठित कोणाला समजतात? यातून कोणता संदेश जातो? हे कधीतरी आपण तपासायला हवं.

नवरदेव उशिरा कसाबसा मांडवाच्या/मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी येतो. ‘डीजे’च्या तालावर वरपक्षाची मित्रमंडळी बेधुंद, बेभान होऊन नाचत असतात. सार्‍या वर्‍हाडाला हे मूठभर लोक वेठीस धरतात. कोणीतरी नवरदेवाला तेथून बळजबरी ‘उचलून’ आणतो. मंगलाष्टकं सुरू होईपर्यंत ‘डान्सपार्टी’ रंगलेली असते. आशीर्वाद हा जणू विवाह संस्कारातील एक संस्कारच झालाय! नवरा-नवरी बोहल्यावर ताटकळत उभे. इकडे नावामागून नावं पुकारली जातात. वर्‍हाडी मंडळी हतबल झालेली. एकदाचं कधी लग्न लागतय, असं त्यांना झालेलं. पण आयताच ‘मॉब आणि माइक’ समोर आल्यावर आशीर्वादवाले आटोपते घेतील तर शप्पथ. बहुतेकांना मुला-मुलीची नावंही ठाऊक नसतात. याला-त्याला विचारतात. पण पुढचं भाषण इतकं सराईत की बस्स. मस्त टेप ऐकावी तसं. एखादा मोठा नेता किंवा आध्यात्मिक गुरु ‘कार्यबाहुल्या’मुळे लग्नाला येऊ शकला नाही, तर आशीर्वादाचं भाषण मोबाईल माइकसमोर धरून ऐकवलं जातं!

मंगलाष्टकांच्या किती तर्‍हा. कोणी पोवाडा म्हटल्याप्रमाणे म्हणतो. एखादी संगीत पार्टी भावगीतं, भक्तिगीतं म्हटल्याप्रमाणे म्हणते. कोणी शीघ्रकवी यजमानांची नावं गुंफून कृत्रिम गाणी तयार करतो. हे ऐकायला काहीतरीच वाटतं. इच्छा असो वा नसो अशा लग्नांना जावंच लागतं. लग्न लावून घरी येताना जीव नखात येतो. एका दिवशी १0-१२ लग्नांत हजेरी लावणारेही पुढारी आपल्याकडे आहेत. कधी कधी कोडं पडतं की, असं कसं काय शक्य होतं त्यांना ? लक्षात असं आलं की, लग्नातले स्वागत, सत्कार, हार-तुरे घेतली जाणारी ‘विशेष दखल’ यांना पुढच्या लग्नाला जायला ऊर्जा देते. याशिवाय पुढारी मंडळी लग्नाकडे कौटुंबिक सोहळा, धार्मिक संस्कार म्हणून पाहतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते जनसंपर्काचं आयतं माध्यम बनलंय. त्यामुळे आलिशान ‘एअर कंडिशनर’ गाडीतून लग्न अटेन्ड करणं त्यांना अजिबात त्रासाचं वाटत नाही.

राज्य पातळीवरील शाही विवाह सोहळे गाजतात. त्यांचे कवित्व सुरू राहतं. खाली खाली तेच झिरपतं. अनुकरण होत राहतं. आज ग्रामीण भागातदेखील ‘इझी मनी’वाल्यांची संख्या वाढलीय. ते लग्न किंवा अन्य कौटुंबिक सोहळ्यांवर प्रचंड पैसे उधळतात. त्यातून ‘लॉन्स कल्चर’ जन्माला आलंय. सायंकाळची वेळ. तिथली ती गुबगुबीत हिरवळ. ऑर्केस्ट्रा, लायटिंगचा झगमगाट, स्टेजची सजावट, बुफे जेवणाचा थाट.. जोडीला फटाक्यांची आतषबाजी (अर्थात पैशांचा धूर). काही जण तर खास यासाठी रात्रीच्या वेळेला लग्न ठेवतात. कारण एकच लग्न आता इव्हेन्ट बनलंय.. ते ‘नेत्रदीपक’ व्हावं ही महत्त्वाकांक्षा! त्यासाठी त्यावर लाखोंची उधळमाधळ होते.

गावाकडच्या तालेवार कुटुंबीयांच्या हुंड्याभांड्याच्या कल्पनाही अलीकडे बदलल्या. नवरदेव परदेशात नोकरीला असेल, त्याला तगडे पॅकेज असेल तर पुण्या-मुंबईत फ्लॅट किंवा महागडी फोर व्हीलर कार दिली जाते. सोबतीला सोनं-नाणं आणि इतर वस्तूंची रेलचेल असतेच. आज तालुकापातळीवर राहणार्‍या नोकरदारांचं स्वप्न काय असतं? तर बंगला, गाडी आणि मुलींची थाटामाटात लग्नं बस्स! ‘काय लागेल तो खर्च होऊद्या. एकदाच व्हायचं पोरीचं लग्न’ असं म्हणत अशा खर्चीक लग्नांचं खुशाल सर्मथन केलं जातंय. लग्न किती मोठं झालं? त्याला कोण कोण आलं? हे म्हणजे सोशल स्टेटसचा सिम्बॉल बनलाय. लग्नापेक्षा याच्याच चर्चा गावागावांत रंगतात. ही अशी प्रतिष्ठा मिळविण्याचा ‘संसर्ग’ सार्‍यांनाच जडलाय.

नेमकी हीच मानसिकता साधेपणानं लग्न करण्यातला अडसर बनलीय. मोठय़ांचे डोळे दिपवणारे सोहळे पाहून पोरीचं लग्न कसं करायचं, अशा विवंचनेतल्या बापांचा ऊर चेपतो. ते कोसळून पडतात. ऐपत नाही आणि पोरीचं टुमणं मागं लागलेलं ‘किमान लग्न तरी देवळात माळबीळ घालून नका करू.. ’यातून मार्ग कसा काढायचा? बाप कोंडीत सापडतो.

महागडी, डोळ्यांना जेवढी भडक वाटतात तितकीच मनाला भडक वाटणारी, दिखाऊपणाचा उबग आणणारी, चुकीच्या प्रथांवर वायफळ पैसा आणि वेळ खर्च करणारी ही ‘गावाकडची लग्नं’ बघितली की, सामुदायिक विवाह सोहळे दिलासादायक वाटतात. बडेजाव, सामाजिक प्रतिष्ठा, त्याच्या अवतीभोवतीचा महाप्रचंड खर्च यांना कटाक्षानं बाजूला ठेवून होणारे हे सामुदायिक विवाह ,‘शी काहीतरी भलतेच’ म्हणून बडेजावपणाची हौस असणारे नाकारतात, अजूनही समाजातल्या मान-सन्मानाच्या कल्पनांमुळं सामुदायिक विवाहांना हवा तेवढा पाठिंबा मिळत नाहीये. या आर्थिक विषमतेनं सामाजिक प्रश्नही जन्माला घातले. सामुदायिक विवाह सोहळ्यात पुढार्‍यांनी, धनिकांनी स्वत:च्या घरातली लग्नं लावली तर खोट्या प्रतिष्ठेपायी येणारी कर्जबाजारीपणाची दुर्दैवी वेळ गरिबांवर येणार नाही.

आताच लग्नाची तिथी संपली. पुढील पन्नास दिवस तरी लग्न सोहळ्यांना विश्रांती मिळणार आहे. गावाकडच्या एका लग्नानं मला बौद्धिक पातळीवर इतकं दमवलंय, शिणवलंय की यापुढे गावाकडचं लगीन म्हटलं तरी घाम फुटावा.

---------------- लोकमत 



व्यायामाला .. पर्याय नाही !







वजन नसेल फार वाढलेलं तर कशाला हवा व्यायाम? अंग मोडून घरातली कामं करतो, मग वेगळ्या व्यायामाची काय गरज? नोकरीच्या वेळा, घरातलं वेळापत्रक; या घाईत व्यायाम शक्य तरी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न विचारणारे व्यायामाला नाकारून खूप काही गमावतात. आनंद, स्वास्थ्य, शांती आणि समाधान देणारा व्यायाम त्याला औषधाचा कडूपणा चिकटला तरी कसा? सक्तीनं, सवयीनं महत्त्वाचं म्हणजे आनंदानं व्यायाम करण्याची खूपशी कारणं आहेत. फक्त व्यायाम एकदा मनावर घ्यायला हवा इतकंच..

आमच्या शेजारी राहणार्‍या राणे काकू एक मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय महिला. चांगल्या शिकलेल्या. सुरुवातीला बँकेत एका चांगल्या पदावर असणार्‍या काकूंनी पुढे मुलं झाल्यावर नोकरी सोडून दिली. त्या लग्न होऊन आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आल्या. आमच्या लगतचाच त्यांचा फ्लॅट. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी त्यांना पाहते आहे. त्यांचा शिडशिडीत बांधा, बोलका स्वभाव, चेहर्‍यावरचं हसू यामुळे मला त्या प्रचंड आवडायच्या. मी जसजशी मोठी होत होते, का कोण जाणे मी त्यांचं निरीक्षण करू लागले. आणि मला अनेक ठळक बदल त्यांच्यात जाणवू लागले.
त्यांचं वजन वाढलं, त्यांचं बाहेर येणं जाण कमी झालं, आमच्याकडेही त्या येईनाशा झाल्या, आपलं बाहेरचं विश्‍व विसरून त्यांनी घरातल्या कामांमध्ये, नवर्‍याच्या मुलांच्या जबाबदार्‍यात स्वत:ला कोंडून घेतले होते. पण का? त्यांच्यातला हा बदल मलाच इतका नकोसा वाटतोय, प्रत्यक्ष त्यांना काय वाटत असेल?

आज बहुतेक महिला उत्तम गृहिणी आहेत, अगदी दुसर्‍यांना कौतुक वाटाव्यात इतपत. तर अनेक महिला करिअरिस्ट आहेत. ‘सुपर वुमन’ म्हणून घेण्याइतपत कार्यक्षम. नोकरी आणि घर यांना समान न्याय देताना त्या स्वत:तल्या शंभर टे क्षमता पणास लावतात. दिवसातले आपले चोवीस तास नोकरी, घर, मुलं, नवरा, ज्येष्ठांची काळजी यांच्यात वाटून टाकणार्‍या या महिलांकडे स्वत:साठी अर्धा तासही उरत नाही. मग वयाआधी दुखणी मात्र हात धुवून पाठीमागं लागतात. राणे काकू हे एक उदाहरण झालं; पण कमी-अधिक प्रमाणात असं सर्वच महिलांच्याबाबतीत होत असतं. स्वत:साठी दिवसातला अर्धा तास काढणं, या अध्र्या तासात स्वत:ला फिट राखण्यासाठी व्यायाम करणं, मनाला आनंद देण्यासाठी एखादी आवड, छंद, कला जोपासणं एवढय़ा साध्या पण आनंदी जगण्यास आवश्यक बाबीही जमू नये, हे असं का? व्यायामासारखी महत्त्वाची बाब आपल्या दिनचर्येतून स्वेच्छेनं अथवा अनिच्छेनं वजा करणार्‍या या बहुतांश महिला मग हे का स्वीकारत नाही की आपण वयाआधी लवकर पोक्त दिसतो, क्षमता असतानाही लवकर थकतो? काम काय आराम करतानाही आपली पाठ, कंबर, गुडघे, सांधे अखंड कुरकुरतात? कामात गुरफटलेलो असतानाही एकटं वाटतं, निराश वाटतं. या सर्व तक्रारींचं एकच उत्तर म्हणजे शरीराला व्यायाम नाही, मनाला आनंद देणारं काम नाही. त्यामुळे साहजिकच डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि औषधं, हेल्थ
सप्लिमेन्ट्स खाण्याशिवाय उपाय नाही. एखादा आजार जडल्यावर डॉक्टर औषधांसोबत व्यायामही करायला सांगतात. मग तो व्यायाम औषधासारखा अक्षरश: उरकला जातो. तो करण्यात ना आनंद असतो, ना समाधान. वाटतो तो फक्त जाच. शरीरासोबतच मनाला सुखावू शकणारा व्यायाम अगदी नकोनकोसा होऊन अध्र्यावरती सोडला जातो?

मुळात व्यायाम या संकल्पनेकडे लिंगसापेक्ष दृष्टिकोनातून पाहिलं जातं. व्यायाम काय पुरुषांनीच करावा. महिलांना काय गरज? पूर्वी काही आता आहेत तशा जिम नव्हत्या. सूर्यनमस्कार, योगा असे व्यायामाचे प्रकार होते. पण ते जास्तीत जास्त पुरुषच करायचे. व्यायाम हे आपलं काम नाही असं नव्हे, तर ती आपली गरजच नाही, असं समजून महिला तर त्याच्याकडे वघतही नसत. स्त्री असू देत नाहीतर पुरुष, दोघांनाही व्यायाम सारखाच गरजेचा आहे. उलट आताच्या काळात तर महिलांना व्यायाम खूप गरजेचा झाला आहे. एका बाजूला महिलांच्या हातात त्यांची कामं वाटून घेणार्‍या अत्याधुनिक सुविधा आल्या आहेत; पण म्हणून त्यांच्यावरच्या जबाबदार्‍या कमी झाल्या आहेत असं नाही. गृहिणी किंवा नोकरदार महिला दोघांवरही प्रचंड मानसिक ताण आलाय. सुविधा 
असल्याकारणानं शरीराच्या अँक्टिव्हिटी कमी झाल्या. बैठं काम वाढल्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली; पण प्रत्येक कामात मनाला काम करावंच लागत असल्याकारणानं मनावरचा ताण वाढला. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. फॅटयुक्त आहार घेण्याचं प्रमाण वाढलं. जीवनशैली बदलली, ती अगदी ताणाची आणि धकाधकीची झाली, तरीही बहुतांश महिलांच्या दिनचर्येत आजही व्यायामाला जागा नाही. कोणत्याही वयोगटातल्या महिलांसाठी व्यायाम हा आवश्यकच असतो. व्यायामाला वयाची र्मयादा नसते. फक्त वयानुसार व्यायामाचे प्रकार बदलतात.

व्यायामाच्या बाबतीत सर्वात पहिली गोष्ट होणं महत्त्वाचं असतं, ते म्हणजे व्यायामाला आपल्या धावपळीच्या दिनचर्येत अग्रक्रम देणं. व्यायाम ही अत्यावश्यक गरज म्हणून आनंदानं स्वीकारणं. कारण वास्तव हे आहे की कोणीही आनंदानं व्यायाम करत नाही. अनेक जण व्यायामाचा संबंध वजन कमी करण्याशी जोडतात. व्यायाम त्यांनीच करावा ज्यांचं वजन जास्त आहे, हीपण चुकीची संकल्पना आहे. व्यायाम हा शरीराला ताजेपणा आणि मनाला उत्फुल्लता येण्यासाठी करायचा असतो. व्यायामाचा तुम्ही कोणता प्रकार करता यावर त्यापासून मिळणारा फायदा अवलंबून असतो. व्यायामाचे दोन प्रमुख भाग असतात. एक ‘एरोबिक’ ज्याला ‘कार्डिओ’ही म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार म्हणजे वजन कमी करणं हा उद्देश ठेवून केलेलं ‘वेट ट्रेनिंग.’ ‘एरोबिक’ म्हणजे अशी कुठलीही ‘अँक्टिव्हिटी’ ज्यात
सतत श्‍वास घ्यावा लागतो, विशिष्ट काळ, विशिष्ट अंतर ठरवून हा व्यायाम केला जातो. म्हणजे विशिष्ट वेगात विशिष्ट अंतर चालणं. या क्रियेत सतत श्‍वास घ्यावा लागतो. या ‘एरोबिक’ व्यायामामुळे हृदयाचं कार्य, रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते. या प्रकारातही शरीरातल्या अनावश्यक ‘कॅलरीज बर्न’ होत असल्यामुळे या प्रकारचा व्यायाम करत असणार्‍यांचं अनावश्यक वजन वाढत नाही. तर व्यायामाच्या ‘वेट ट्रेनिंग’ प्रकारात एकाच जागेवर उभं राहून एकच क्रिया सारखी सारखी केली जाते. यामुळे वजन कमी होतं. व्यायामाचा उत्कृष्ट फायदा मिळवायचा झाल्यास एरोबिक आणि वेट ट्रेनिंग सोबत करावं. वेट ट्रेनिंगमुळे शरीराच्या आकाराला सौंदर्य मिळतं, स्नायूंना विशिष्ट आकार मिळतो. वजन कमी झाल्यावर त्वचा सुटते त्वचेला ‘फर्मनेस’ येण्यासाठीही व्यायाम गरजेचा असतो.

कोणत्याही वयात व्यायाम केल्यास तो तो व्यायाम त्या त्या वयातील संभाव्य समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो. फक्त आपण कोणता व्यायाम कोणत्या अवस्थेत करतो यावर परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम अवलंबून असतात. विशेषत: गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर कोणते व्यायाम करावेत हे आधी महिलांनी समजून घ्यायलाच हवे. या काळात ‘वेट ट्रेनिंग’ करून उपयोगाचे नसते. स्ट्रेचिंगचे प्रकार व्यायामात करणं आवश्यक असतं. यामुळे स्नायूंमधला ताठरपणा जाऊन स्नायू लवचिक होतात. गरोदरपणाच्या आधी जर वेट ट्रेनिंग करून वजन कमी केलेले असेल तर त्याचा फायदा गर्भधारणेच्या वेळेस होतो. वजन जर खूप असेल तर गर्भधारणा लवकर होत नाही. व्यायामाची सवय असल्यास बाळंतपणातील वेदना सहन करण्याची मनाची ताकद वाढते.

महिलांच्या आयुष्यातील सर्वात अवघड काळ म्हणजे ‘रजोनवृत्ती’चा काळ. या काळात शारीरिक बदलांसोबतच महिलांमध्ये मानसिक बदल झालेले असतात. त्यांच्यात चिडचिडेपणा, वैताग, नकारात्मक भावना, विमनस्कता, नैराश्य वाढलेलं असतं. शरीरात झालेले बदल सुखावणारे नसतात. पोटाचा, कमरेचा भाग वाढलेला असतो. ज्यामुळे अनेक महिलांमध्ये न्यूनगंडही येतो. शरीराच्या आतमध्येही बदल
झालेले असतात. विशेषत: हाडांमधील कॅल्शियम कमी होतं ज्यामुळे हाडं ठिसूळ आणि कमजोर होतात. आणि याच काळात सांधेदुखीच्या तक्रारीत वाढ होते. जर महिला नियमित व्यायाम करणार्‍या असतील तर रजोनवृत्तीचा तो अवघड काळ त्यांना कठीण जात नाही. हाडंही मजबूत राहतात. कारण व्यायामानं शरीराची ‘कॅल्शियम’ची मागणी वाढते. तसेच आहारातून जे कॅल्शियम मिळते ते वेचून घेण्याची हाडांमधील क्षमता वाढते. त्यामुळे सरसकट सर्वच महिलांना कॅल्शियम ‘सप्लिमेन्ट्स’ घेण्याची गरज भासत नाही.

जवळजवळ सर्वच महिला मग त्या कोणत्याही वयोगटातील असो की कोणत्याही आर्थिक स्तरातील असो आपली त्वचा, केस या बाबतीत त्या फारच जागरूक असतात. पण जागरूक असतात म्हणून त्या व्यायाम करतात असं नाही. तर व्यायाम सोडून स्कीन ट्रीटमेन्ट, ब्युटी ट्रीटमेन्टचे अनेक सोपस्कार पार पाडतात. त्याचा त्यांना फायदाही होतो, मात्र तो दीर्घकाळ टिकणारा नसतो. व्यायामामुळे महिलांच्या त्वचेची गुणवत्ता आणि केसांचा पोत नैसर्गिकरीत्या सुधारतो. व्यायामामुळे भरपूर घाम येतो. घामामुळे त्वचेची रंध्र उघडतात. त्याद्वारे भरपूर अँाक्सिजन घेतला जातो. पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. पाण्यामुळे आपोआपच शरीराच्या आतील अवयवांचं कार्य सुधारतं. लघवीवाटे शरीरास अपायकारक विषारी द्रव्यं बाहेर फेकली जातात. शरीराचं आतील कार्य सुधारल्यामुळे साहजिकच त्याचा बाहेरही चांगला परिणाम दिसायला लागतो.

सर्व आजारांवरचा नामी उपाय काही तासांच्या नव्हे, काही मिनिटांच्या व्यायामामध्ये आहे. पण व्यायाम फायदेशीर आहे म्हणून तो
सरसकट सर्वांनी सारखा करून उपयोगाचा नाही. एक मजेशीर उदाहरण आहे. साधारण पंचेचाळिशी गाठलेली एक महिला. आपलं वजन आवाक्याबाहेर जात आहे म्हटल्यावर आता व्यायाम गरजेचा आहे, असं त्यांना वाटलं. कोणीतरी वजन कमी करण्यासाठी जिना दिवसातून दोन-तीन वेळा चढा-उतरायचा व्यायाम सांगितल्याचं त्यांना आठवलं आणि त्यांनी तो सुरू केला. तिसर्‍या मजल्यावरचं घर भाजीच्या गच्च पिशवीसह पायर्‍यांनीच गाठूया म्हणजे व्यायाम होईल म्हणून बाई भर उन्हातून इमारतीत शिरल्या. लिफ्ट टाळून पायर्‍या चढू लागल्या. पहिल्या मजल्यावरच आपल्याला हे झेपत नाही, असं लक्षात येऊनही ‘यालाच तर व्यायाम म्हणतात’ असं म्हणून त्या चढत राहिल्या. आणि शेवटी ते सहन न होऊन चक्कर येऊन खाली कोसळल्या. मग काय त्याच क्षणापासून व्यायाम करायचा नाही, असं ठरवून मोकळ्या झाल्या. एकूण काय, असा आंधळेपणानं केलेला व्यायाम उपयोगाचा नसतो. व्यायामाचं गणित औषधांच्या ‘प्रिसक्रिप्शन’प्रमाणेच असतं. सर्व व्यायाम प्रकार सर्वांनाच चालतात असं नाही. भलेही ते व्यायामाचे प्रकार तुम्ही जिममध्ये न जाता घरच्या घरी करा; पण आधी त्याबाबत आपल्या डॉक्टरांना विचारा. कारण डॉक्टर तुमची ‘मेडिकल हिस्ट्री’ काय आहे, तुम्हाला रक्तदाब, मधुमेह यासारखे काही आजार आहेत का? हे बघून विशिष्ट प्रकारचे व्यायाम प्रकार सुचवत असतात. व्यायाम करताना एक गोष्ट नेहमी पाळायची असते की, कोणताही व्यायाम करताना स्नायूंना, सांध्यांना इजा होता कामा नये. त्यामुळे व्यायामात साहस कामाचे नसून सारासार विचार गरजेचा असतो. आपले वय, आपली क्षमता ओळखून केलेला नियमित व्यायामच लाभदायक असतो.

व्यायाम ही काही ‘लक्झरी’ नाही. व्यायाम हा फ पैसे खर्च करून जिममध्ये जाऊन करण्याचा प्रकारही नाही. अगदी घरच्याघरी व्यायाम करता येतो, फक्त जो व्यायाम प्रकार करायचा आहे तो नीट समजून उमजून घ्यायला हवा. अनेक गृहीणी घरकामालाच व्यायाम समजतात. पण घरकाम हा व्यायाम असत नाही. ते ‘एक्सरसाइज’ नसून ‘एक्झर्शन’ असतं. तुम्ही सतत काम करतात, तुमचं शरीर आणि मन दोन्ही कार्यरत असतं. पण मनावर ताण असतो. या ताणामुळे शरीराच्या विशिष्ट हालचाली होत असतात. पाच जणांच्या कुटुंबाला काय हवं नको ते बघताना महिलांची धावपळ होते, प्रत्येकाच्या वेळा सांभाळताना महिलांचा जीव मेटाकुटीस येतो, खाण्या-पिण्याच्या प्रत्येकाच्या आवडी-निवडी सांभाळताना दमछाक होते. शेवटी खूप काही करूनही महिला स्वत:साठी काय घेतात तर दगदग आणि ताणच. या दगदगीला जर कोणी व्यायाम म्हणत असेल तर या व्यायामातून तुम्हाला आनंद मिळाला का? हे त्यांचं त्यांनीच तपासायला हवं. कारण व्यायामाचं अंतिम ध्येय आनंद, शांती आणि स्वास्थ्य हेच असतं. व्यायामातही शरीर थकतं, घाम येतो पण मन थकत नाही. उलट ते अधिक ताजंतवानं होत जातं. मनाचा ‘मूड’ बदलतो. ते आनंदी होतं. शरीरातले ‘एन्ड्रॉफिन’ नावाचे साध्या भाषेत सांगायचं झालं तर ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतात. अनेक जणी व्यायामाला वेळ मिळत नाही, अशी सबब सांगतात. जरा त्यांच्या घरात डोकावून त्यांच निरीक्षण केलं तर त्या कामाच्या धबडग्यातही टीव्हीवरची
आवडीची मालिका न चुकता पाहतात, कोणा नातेवाइकाचा अथवा मैत्रिणीचा फोन आला तर वेळेचं भान हरपून फोनवर बोलतात. मग व्यायामासाठी वेळ काढायचं म्हटलं तर सबबी कशा पुढे येतात? कोणत्याही परिस्थितीत व्यायाम करायचा हा निग्रह तुम्हाला व्यायामाकडे पर्यायानं आनंदाकडे घेऊन जाऊ शकतो.

घरच्याघरी व्यायाम करणं जितकं गरजेचं आहे तितकंच थोडा वेळ बाहेर पायी फिरणंही गरजेचं आहे. बाहेरच्या मोकळ्या हवेतून शरीरास आवश्यक असणारा ‘अँाक्सिजन’ मिळतो, मन खुलतं, चित्तवृत्ती बहरतात. मनात वेगळे आणि सकारात्मक विचार येतात. चार लोक 
भेटतात. यातून कंटाळवाण्या, थकवणार्‍या दिनचर्येची चाकोरी भेदली जाते. व्यायाम, फिरणं यासोबतच जर दिवसातला काही काळ आपल्या आवडीनिवडी जपायलाही दिल्यास कुटुंबात, कामात विलीन केलेलं स्वत:च ‘स्वत्व’ गवसतं. एका सकारात्मक जगण्याचा पर्याय अशा प्रकारची दिनचर्या देऊ शकते. व्यायाम हा काही विशिष्ट वयातील महिलांनीच करावा, असं नसून सर्व वयोगटातल्या महिलांनी तो करावा. तुमचं पाहून तुमची मुलं-मुली व्यायामाकडे वळतील. एक सकारात्मक विचाराची, सशक्त आणि सुदृढ पिढी घडवण्याचं सार्मथ्य व्यायामात आहे. महिला ही कुटुंबाचा आधार असते. तिच्या पळण्यावर घर चालतं. तिचं फिट राहणं, तिचं आनंदी असणं यावर तिच्या कुटुंबाचं स्थैर्य आणि सुख अवलंबून असतं. शेवटी प्रत्येक महिलेच्या अखंड राबण्याचं अंतिम ध्येय तेच तर असतं. आपण आपल्या कुटुंबाला, त्याप्रती आपल्या जबाबदार्‍यांना जर इतकं गंभीरतेनं घेत असू तर व्यायामालाही जबाबदारीनं स्वीकारायला काय हरकत आहे?

 

----------------- नेहा लोहाडे (फिटनेस कन्सलटण्ट)



Tuesday, 19 June 2012

मी मराठी ..... शिर्षक गीत




उत्तुंग भरारी घेऊ या !
उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी ।
दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती ।
मी मराठी ..... मी मराठी .....।।

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन्‌ थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....।।

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश अमुच्या आहे अमुच्या आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....।।

अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
शिकवू आम्ही भारताला देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....।।

घोर संकटे झेलून घेतील आमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....।।

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी ....
 
 
 

विडा घ्या हो नारायणा !




पान खाणारा माणूस सोशिक असतो असं म्हणतात. चुका करणाऱ्या माणसाविषयी व्यसनी माणसाला जरा अधिकचा कळवळा असतो.
खरंतर पानाने हॅबिट फॉर्मेशन होत नाही. पानात असं कुठलंही केमिकल नाही की ज्यामुळे सवय लागेल. पण नागवेलीच्या पानांचा जेव्हा विडा होतो तेव्हा त्याची चटक लागल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पान हा सवयीचा प्रकार मानला जातो. मुळात ते एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपल्या मेंदूत विशिष्ट भाग असतो. सवय लागलेला प्रकार आपण खाल्ला की तिथून समाधानाचं केमिकल बाहेर पडतं. छान वाटतं. लेखकाच्या हातून एखादा सुंदर पॅराग्राफ लिहून झाला की त्याला एकदोन मिनिटं छान वाटतं. बाळाला दूध पाजल्यानंतर आईला जे समाधान मिळतं, आनंद मिळतो, ते फीलिंग ऑफ वेल बीइंग असतं. तो सुखद आस्वाद व्यसनातून वारंवार मिळतो. कारण तेच केमिकल वारंवार पाझरत राहातं. म्हणून आपल्याला व्यसन लागतं. मेंदूचा तो भाग तुम्हाला काहीतरी रिव्हर्ट करतो. मज्जातंतूंना त्याची सवय लागते आणि वारंवार छान छान वाटायला पाहिजे असं वाटतं राहातं. मग फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे सवय होते. चांगल्या गोष्टीची ती सवय आणि वाईट गोष्टीचं ते व्यसन. दोन्ही एकच. पण विडा किंवा पान खाणं हे फक्त व्यसन किंवा सवयीच्या भिंगातून नाही बघता येत. विडा हा आपल्या संस्कृतीचा जीवनशैलीचाच एक भाग.
मराठी लग्नांमध्ये विडे तोडण्याचा एक रोमॅण्टिक समारंभ असतो. तामिळ लग्नांमध्ये तांबुल चर्वणम् हा विधी आहे. आधी तांबुल होतं. नंतर पान झालं. तांबुलात काय काय टाकायचं, त्याची घडी घालण्याची पद्धत कुठली त्यावरून कोणत्या विडय़ाला काय म्हणतात, याचे पूर्वापार वेगवेगळे प्रकार आहेत. देवस्थानात देवाला विडा देण्याचा प्रकारही आहे. आपण पान खातो तर आपल्या देवालाही तो देतो. देवाला पान देण्याचे हक्कही काही कुटुंबांना वाटून दिलेले आहेत. पूजा-नैवेद्य झाल्यावर देवाच्या तोंडाला विडा लावला जातो. मग कुटलेलं पान प्रसाद म्हणून दिला जातो. आंबेजोगाईच्या मंदिरात ही प्रथा आहे. दक्षिणेत कर्पूरयुक्त पान देवाला अर्पण केलं जातं. तांबुलाची पद्धत मोहंजोदडोपासून आहे. मुघलकालीन जेवढी पेण्टिंग आहे त्यात पान देणं, पान खाणं आहेच. एकेकाळी पान खाणं कुणालाही चुकीचं वाटत नव्हतं. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पान खात. घरातले पुरुष जेवण झालं की ते पान खात ओसरीत बसायचे. तोपर्यंत बायका जेवून घेत. बायकांचं जेवण झालं की मग एखाद्या लहान मुलाला पाठवून पानाचं तबक आत पाठवलं जायचं. वऱ्हाडात तर एकवेळ कुणी जेवण विचारलं नाही तरी काही वाटायचं नाही, पण घरात आल्यावर पानदान समोर ठेवलं नाही तर तो सगळ्यात मोठा अपमान समजला जायचा. त्यामुळे विडा किंवा तांबुल हा मानाचा भाग होता आणि आहे. म्हणूनच विडा उचलणं वगैरे वाक्प्रचार रूढ झाले असावेत. विडा उचलण्याऐवजी आता ‘सुपाऱ्या’ घेतात.
आयुर्वेदातही तांबुल होताच. त्याचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केलेलं होतं. प्रत्येक प्रकारचा रस आपल्या अन्नात असायला हवा असं आयुर्वेद सांगतं. आपल्या आहारात सगळं आहे, फक्त तुरट रस जेवणात येत नाही. ज्याला कषाय रस म्हणतात तो जवळपास नाहीच. मग हा तुरटपणा कुठून आणायचा, तर पानातून! तसा तो आवळ्याच्या सुपारीतून पण येतो. पण जेवणानंतर पान खाल्ल्यावर छान वाटतं. मुखशुद्धी होते. ओरल कॅव्हिटी स्वच्छ राहते. श्वासाला दरुगधी येत नाही.
एवढंच नाही तर जखम भरून आणण्याची क्षमताही पानात आहे. जखमेवर पान बांधलं जातं. नवजात बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून नाळ कापलेल्या ठिकाणी जो पोटपट्टा बांधतात त्यातही नागवेलीचं पान बांधलं जातं. पान थोडं अ‍ॅसिडिक असतं. पण इतकं नाही की त्याचा त्रास होईल. कच्च पान खाल्लं की बेंबीच्या आसपास थोडं जळजळतं. त्यामुळे भूक लागते. पानात मेन्थॉलही असतं, त्यामुळे खरं तर वेगळी ठंडक घालण्याची आवश्यकता नसते. पान कामोत्तेजक म्हणूनही वापरलं जातं. पानात अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक असतात असं परंपरेतून मानलं जातं. आयुर्वेदातही तसं सांगितलं आहे. म्हणूनच पलंगतोड पान वगैरे प्रकार विकसित झाले असावेत. पानात आणखी काही अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक टाकून त्याचं कामोत्तेजक स्वरूप आणखी वाढवताही येतं. शिवाय त्याच्याशी थोडा रोमान्सही जोडला गेला, त्यामुळे पानाला चांदीचा-सोन्याचा वर्ख आला. पानाच्या अनुषंगाने अनेक प्रेमकथा, गूढकथा आणि चावटिका निर्माण झाल्या.
वाजिद अली शाहच्या पान खाण्यासंदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्याच्या अनेक बेगमा होत्या. त्यामुळे त्याच्या पानात असे कामोत्तेजक घटक घातल्याचे दाखले सांगितले जातात. अशीही एक कथा आहे की, त्याने खाऊन टाकलेला चोथा त्याच्या भंग्याने खाल्ला आणि त्याचा असा काही परिणाम झाला की शेवटी त्या भंग्याच्या बायकोला वैद्याकडे न्यावं लागलं.
मेहंदीप्रमाणेच पानाच्या बाबतीतही काही समज आहेत. नवऱ्याचं प्रेम खरं असेल नवऱ्याने भरवलेला विडा रंगतो, असंही महटलं जातं. पानासोबत रोमान्स आला आणि मग प्रेमाची पानं वेगळी झाली. मिठा पान विकसित झालं. त्यात गुलकंद आला. काही लोकांनी चुन्याला देखील नटवण्याचा प्रयत्न केला. पानात गुलाबाचा आणि केवडय़ाचाही सुगंधी एसेन्स आला. ‘देवदास’ कादंबरीतली देवदास-पारोची पहिली भेट होते तेव्हा देवदास पान खात असतो आणि हुक्का ओढत असतो, तेही शाळेला दांडी मारून. ‘शतरंज के खिलाडी’मध्ये दोघे बुद्धिबळाचा पट घेऊन बाहेर खेळायला जातात तेव्हा दिवसभराची पानं बांधून घेतात, असाही उल्लेख आहे. जुनेच नाही तर नवे उल्लेखही विडय़ाचं कौतुक करणारे आहेत.

संगीतकार एस.डी. बर्मन एकदा फुटबॉलची मॅच बघायला जात होते. एक प्रोडय़ूसर गाणं मागण्यासाठी आला होता, त्यांनी त्यालाही गाडीत बसवलं. बर्मनदांनी सवयीने गाडीत बसून पान लावायला घेतलं. पण त्या प्रोडय़ूसरची प्रश्नांची सरबत्ती काही कमी होईना. शेवटी कंटाळून बर्मनदांनी त्याला गाडीतून उतरवलं. कुणीतरी विचारलं, ‘दादा तो तर पैसे घेऊन आला होता. त्याला कशाला उतरवलं?’ त्यावर ते म्हणाले, ‘जो आदमी मला पानही नीट खाऊ देत नाही, तो मला काम काय करू देणार?’ मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात अनेक संस्थानिकांमुळे पानसंस्कृती आणि अय्याशी यांचं नातं निर्माण झालं. जिथे आरामशीर, जमीनदारीचं आयुष्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला पानाचं प्रस्थ जास्त दिसेल. बनारसमध्ये दिसेल, कलकत्त्यात दिसेल. कलकत्त्याइतकं पान कुठेच खाल्लं जात नाही. मुंबईत अय्याशी दिसत नाही. कारण मुंबई हे वर्किंग कम्युनिटीचा प्रकार आहे. तरीही मुंबईत पानाचा मोठा बाजार नळबाजारात असायचा. पहाटे चार वाजता हे पानांचं मार्केट सुरू व्हायचं. आता पानाचं मार्केट चुनाभट्टीला आलंय. मोठा गुंडाळा असतो, त्यात पाच हजारांपर्यंत पानं असतात. पानाचं शेल्फ लाइफ कमी असतं. त्यामुळे पानवाला कधीही पान वाया घालवत नाही. थोडं लागलेलं पान असेल तर तो कातरीने तेवढा भाग कापून टाकतो. मुंबईत पान आलं ते बाले लोकांबरोबर. त्याबरोबर पानाची गादी हा प्रकार आला. कोकणातील वैश्य-वाण्यांची पान-तंबाखू, विडीची दुकानं थाटली गेली. त्यांच्याकडे पान खाणारे लोक वेगळे, भैय्याकडे पान खाणारे वेगळे.
पान खाण्यामध्ये थोडी रंगबाजी आली. पान घ्या, ते नखला; अंगठय़ाच्या नखाने पातळ शीर आणि पापुद्रा निघाला पाहिजे. पानाच्या जातींप्रमाणे शीर कमी जास्त असते. पूना पान पातळ. पानाच्या गादीवर मिळतं. पूना पानात चोथा भरपूर असतो. पानात जेवढा चोथा कमी तेवढी पानाची प्रत चांगली. पानात जेवढा तिखटपणा अधिक त्याप्रमाणे पानाची प्रत ठरते. काही जणांना पिवळं जर्द पान लागतं. काहींना हिरवंगार पान लागतं. कलकत्ता पान तिखट आहे. त्याला बांगला पान असंही म्हणतात. पूना पानात तो तिखटपणा नाही. पण पानाला चव आहे. बांगला पान मोठं, तिखट आणि चोथा कमी असतो. मघई हे जोडीने खायचं पान. एकावेळी दोन पानं खावी लागतात. त्यात एकही शीर नसते. तोंडात विरघळून जातं. पण शेल्फ लाइफ कमी. पानाची उपज कमी. भरघोस येत नाहीत. त्यामुळे ते महाग असतं.
पान खाण्याच्या संस्कृतीबरोबर पान लावण्याचे प्रकारही विकसित झाले आणि त्यासोबतचे शिष्टाचारही. आपल्याकडे पानाच्या चटण्या बोटाने फिरवतात. उत्तरेत ते अशिष्ट समजतात. तिथे दांडीने किंवा पानाला पान लावून चुना, काथ आणि चटण्या एकत्रित केल्या जातात. पानाच्या या शिष्टतेच्या संस्कृतीसह रसिकताही येऊन चिकटली. त्यामुळे साहित्यात त्याचे रंग उमटले नसते तरच नवल.
ना. धों. महानोरांच्या ‘भलताच रंगला काथ लाल ओठांत’ या कवितेतला ठसका बघा..
त्या दिसी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा, कहर भलताच
तसंच कवी शैलेंद्रच्या गाजलेल्या ‘पान खाये सैंयाँ हमारो’ मध्ये ‘ले आया जालीम बनारस का जर्दा’ला मिळणारा शिट्टय़ांचा प्रतिसाद विलक्षण असतो. राजा बढेंची ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान’ ही लावणी असू द्या किंवा माजघरात म्हटलेले पाळणे, ओव्या, गीतं असू द्या त्यात विडय़ाचे उल्लेख अपरिहार्य असायचे.
सुपारी
पानाची सवय लागते ती सुपारीमुळे. कारण सुपारीमध्ये अल्कलॉइड्स असतात. हीच अल्कलॉइड्स अफूमध्येही असतात. फक्त श्रेणीमध्ये फरक असतो. सुपारीतलं अल्कलॉइडस् हे शेवटच्या दर्जाचं असतं. त्यामुळे त्याची नशा होत नाही. पण सवय जरूर लागते. ही अल्कलॉइड्स जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा जास्त असतात. सुपारी वाळत जाते तसे ते सुपारीच्या आतला पांढरा गाभा आहे त्यात जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रत बदलते. श्रीवर्धनची सुपारी म्हणजे दिवेआगर, आंबेत, हरिहरेश्वर या पट्टय़ातली सुपारी. ती बाजारभावापेक्षा २०० रुपये अधिक प्रीमिअम खाऊन जाते. त्याचं कारण पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीला चव जास्त. एरव्ही सुपारीला चव काडीची नाही. सुपारी ही अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. नैसर्गिकरीत्या ती कुणालाही आवडणार नाही. दोन-तीनदा खाल्ल्यानंतर तिची चव विकसित होत जाते. जशी वाइनची चव विकसित व्हावी लागते. सुपारी जेवढी कच्ची तेवढे तुमचे कान लाल होतात. सुपारीचा ठोठरा बसणे हा अनुभव घ्यायचा असेल तर कच्ची सुपारी खावी. आख्खं खानदान आठवतं. गुजरातमध्ये तिला काची सुपारी म्हणतात. नेपाळीत काचो सुपारी म्हणतात. उफाडय़ाच्या दिल घायाळ करणाऱ्या तरुण मुलीलाही काचो सुपारी अशीच उपमा आहे. तिथल्या लोकसाहित्यात ही प्रतिमा येते.
सुपारी किनारपट्टीवर केरळपासून आढळते. लाल-तांबडी माती सुपारीला धार्जिणी. मातीनुसार सुपारीची चव बदलते. सुपारीचं उत्पादन मँगलोरमध्ये जास्त होतं. आपल्याकडच्या सुपारीला श्रीवर्धनचा रोठा म्हणतात. यात मग खूप बारीक बारीक प्रकार येतात. मद्रासची चिकणी सुपारीही लोकप्रिय आहे. पण ती काथाच्या पाण्यात प्रोसेस केलेली असते. त्यामानाने तिचा कमी ठोठरा बसतो.
सुपारी श्रीलंका, बांगलादेश, कलकत्ता या भागातही होते.
सुपारीत काहीतरी अद्भुत गुण आहेत अशी पहिल्यापासून धारणा आहे. तिच्यात काही मिस्टिक गुणधर्म आहेत. लग्नापासून ते मर्तिकापर्यंत जेवढे समारभं आहेत त्या प्रत्येकात सुपारी आहे. बिहारी लग्नात पहिल्यांदा जी परात येते त्यात परात भरून सुपाऱ्या असतात. मग सुपारीत नाना तऱ्हेचे ढंग सुरू झाले. उत्तर प्रदेशात वेगळे आणि दक्षिण भारतात वेगळे. दक्षिणेत सुपारीला कापराचा फ्लेवर मिळाला. तिथे सुपारीपासून बाईपर्यंत कापराचा वास. त्यांच्या पानात कापूर घालतात. आपल्याला बुंदीच्या लाडवाला कापराचा वास आलेला चालणार नाही. पण तिथे बुंदीच्या लाडवाला कापराचा वास नसेल तर ते अशिष्ट मानलं जातं. सुपारीला ठोठरा बसतो, काथाचा कडवटपणा, चुन्याने जीभ भाजू शकते. यावर उतारा काय तर मग खोबऱ्याचा शिरकाव झाला, त्याने उग्रपणा थोडा कमी होतो. चवीला लवंग आले. (हे सगळे किनारपट्टीवरचे) नागवेल, सुपारीचं खांड, लवंगा, वेलदोडे, खोबरं. उत्तरेत केशर आलं. दक्षिणेत कापूर, क्वचित कस्तुरीचा उल्लेख आहे. पण ती कवीकल्पना असावी. धार्मिक कार्यक्रमाला प्रथम यजमान पुरोहिताला एक सुपारी देतो. ही कशासाठी तर तुम्ही आमचे काम चालवा. आज वेगळ्या कारणासाठी सुपारी दिली जाते. काम झाल्यानंतर आशीर्वचनासह ती सुपारी यजमानाला परत दिली जाते. या प्रत्येक टप्प्याला आपण नाव दिलेलं आहे. लग्नातही पान-सुपारीच देण्याची पद्धत आहे.
काथ
आपल्याकडे खैराचं झाड तोडण्यावर बंदी आल्यानंतर काथ मिळवणं कठीण झालं. काथ महाग होऊ लागला आणि पानात परवडेनासा झाला. आता मलेशियातल्या जंगलातल्या गंबीर झाडाचा काथ आपल्याकडे येतो. तो फार चांगला नसतो.
तंबाखू
तांबुल भ्रष्ट केला तो तंबाखूने. तंबाखूने व्यसन पूर्णत्वाला नेलं. तंबाखू आल्यामुळे पानाचं नैतिक स्खलन झालं. सात्विक गृहिणीनं पटकन डोळा मारल्यावर जसं वाटेल तसं झालं. पोर्तुगीजांनी तंबाखू आणला. तंबाखूही मृत करून पानात वापरला जातो. त्याशिवाय त्याला नशा येत नाही. तंबाखूची हिरवी पानं गठ्ठे बांधून जमिनीत पुरून ठेवली जातात. त्यातलं क्लोरोफिल संपूर्ण संपल्यानंतर ती पिवळी पडल्यानंतर मग ती नशा येते. आजही गादीवर संपूर्ण तंबाखूचं वाळलेलं पान घेणारे शौकिन आहेत.  खाण्याचा तंबाखू चवीला कडवट असतो. सुपारी आणि पान मिळून मग त्याचा कडवटपणा मरतो. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुवास आले. पहिला केशर आला, काहींनी केवडा वापरला. सुगंधी तंबाखूला जर्दा म्हणतात. तीन गोष्टींसाठी भोपाळ प्रसिद्ध आहे. जर्दा, गर्दा आणि नामर्दा. सुगंधी तंबाखूची नशा आणि अतिसेवन अखेरीस वंध्यत्व आणते, असा अर्थ त्यातून ध्वनित होतो.
तंबाखूचे १२०, १६०, ३०० हे मुळात प्रकार नसून हे तेव्हाचे किलोचे भाव आहे. डीएस नावाची एक कंपनी परफ्यूम्ड तंबाखू बनवायची. त्यांचे दर हेच पुढे त्या तंबाखूच्या प्रकारांचे नाव झाले. या पानात टाकून खायच्या सुगंधी तंबाखूने क्रांती केली. जर्दा कुणी वेगळा खात नाही. हा पानात खायचा तंबाखू. यात भोलानाथ केसरवानी यांचं नाव फार फेमस आहे. पानाच्या ठेल्यावर भोला तंबाखू टाक, असं म्हटल्यावर तो एक हिरवा डबा काढतो. त्यावर एक मुच्छड माणूस दिसतो. हाच तो भोलानाथ केसरवानी. या भोलानाथने हा पहिला तंबाखू अजरामर केला. भोला, मग १२०, मग १६० लोकप्रिय होत गेले. तंबाखूचं सुगंधी मिश्रण तयार झालं.
किवाम
कजरारे गाण्यात एक ओळ आहे.. ‘तेरे बातों में किवाम की खुशबू हैं.’ किवाम म्हणजे तंबाखूचा चुरा वाया न घालवता त्याचं कूट करून जे मिश्रण केलं जातं ते किवाम. त्यातही नवरतन किवाम सगळ्यात फेमस. त्यानंतर राजरतन आला. यातला तंबाखूबरोबर जाणारा परफ्यूम महत्त्वाचा. दुसरा कोणताही सुगंध त्याबरोबर जात नाही. चार्ली वापरून तर कुणी खाणार नाही. या परफ्यूम शोधून काढणाऱ्यांनी कोटय़वधी रुपये कमावले.
गुटखा
पानाचं अर्बनायझेशन म्हणजे गुटखा. शुभ्र दातांचे दिवस आले आणि पानाचं गुटख्यात रूपांतर झालं. गुटखा खायला सोपा. मळावा लागत नाही. त्याचा सुगंध खूप वेगळा आहे. दोशी नावाच्या माणसाने तो तयार केला असं इंडस्ट्रीत सांगितलं जातं. एका जुन्या लोकप्रिय पान मसाल्याचा फ्लेवरही त्याने तयार केला होता. पण त्याला त्याचे पैसे दिले गेले नाहीत. म्हणून त्याने त्याचा फॉम्र्युला एका नव्याने लोकप्रिय झालेल्या गुटखावाल्याला दिला. गुटखा आणि पान मसाला इंडस्ट्रीतलं हे युद्ध नंतर माफिया टोळ्यांपर्यंत गेलं होतं असं म्हणतात.
गुटख्याच्या यशाचं गमक आफ्रिकेत आहे. गुटखा तयार करताना त्यात सोडियम काबरेनेट वापरलं जातं. आफ्रिकेत त्याला तुंबूक म्हटलं जातं. हा तुंबूक सोडिअम काबरेनेटच्या पाण्यात भिजवला जातो, सडवला जातो नंतर त्याचा जो तंबाखू तयार होतो त्याची नशा सामान्य तंबाखूपेक्षा शंभर पटीने अ‍ॅडिक्टिव्ह असते. जिभेच्या खालच्या स्नायूपटलातून तंबाखूतलं निकोटिन शोषलं जातं. नशा आली की बाकी गळी गुळणी. मग या पानाची फक्त उरते पिंक.
पुलंनी लिहिल्याप्रमाणे खरा गाणारा फक्त पखवाज, तंबोरा आणि गळा यावर स्वर्ग उभा करतो. तसा बेसिक खाणारा पान, चुना, काथ, खातो. सुपारी वेगळी कातरून तोंडात टाकतो. मग तंबाखू खातो. मग पाच मिनिटांनी पिंक टाकतो.  पान अ‍ॅसिडिक, चुना अल्कलाइन, काथ म्युच्युअल, सुपारीत अल्कलॉइड्स. तरीही हे बेसिक चार घटक म्हणजे तंबोऱ्याच्या तारांसारखे मानले जातात. चांगल्या लावलेल्या तंबोऱ्यातून शुद्ध गंधार उमटतो. या चार घटकांचा एकत्र स्वाद गंधारासारखाच असतो. तो एक प्रकारचं सुखद फीलिंग देतो. तरीही वाटतं की या तांबुल फॅमिलीत सगळं मारूनच तयार होतं. चुना भाजला की तयार होतो. काथ जिवंत झाड कापून त्याच्या गाभ्यातला रस काढून तयार होतो. काथाची भट्टी लावावी लागते. सुपारी सुकवावी लागते, तर तंबाखू जमिनीत गाडून ठेवावा लागतो. कुणाला तरी मारून, जाळून मग हे पदार्थ तयार होतात. पान सोडलं तर या तांबुलात रसरशीत काही नाही. पानाशी निगडित सगळे जिंदगी से हारे हुए लोक इथे जमा झाले आहेत. पण एकत्र आले तर वेगळंच रसायन होतं. पण, पानातून रामायण कधीच तयार होणार नाही. झालंच तर महाभारतच. पान सोज्वळ नाही. खूप वेगवेगळ्या अफेअर्सनी तयार झालेली ही स्टोरी आहे.
विडा
(१)
विडा घ्या हो नारायणा । कृष्णा जगज्जीवना ।
विनविते रखुमाई । दासी होईन मी कान्हा ।।धृ.।।
शांति हे नागवेली- । पानें घेऊनिया करी ।
मीपण जाळूनीया । चुना लावियेला वरी ।।१।।
वासना फोडुनीया । चूर्ण केली सुपारी ।
भावार्थ कापुराने । घोळियेली निर्धारीं ।।२।।
विवेक हा कातरंग । रंगी रंगला सुरंग ।
वैराग्य जायफळ । मिळविले सकळ ।।३।।
दया ही जायपत्री । क्षमा लवंगा आणिल्या ।
सुबूद्धि वेलदोडे । शिवरामीं अर्पियेले ।।४।।
(२)
विडा घेई नरहरीराया । धरूनि मानवाची काया ।
यतिवेष घेउनिया । वससीं दीनासी ताराया ।।धृ.।।
ज्ञान हें पूगीफळ । भक्ति नागवल्ली दळ ।
वैराग्य जूर्ण मिळ । लवंगा सत्क्रिया सकळ ।।१।।
प्रेमरंगी जैसा कात । वेला अष्टभावसहित ।
जायफळ क्रोधरहित । पत्री सर्वभूतलहित ।।२।।
सर्व फोटो : प्रशांत नाडकर



--------- लोकप्रभा 


Monday, 18 June 2012

‘वाळवण’ - हरवलेल्या अंगणातली हरवली संस्कृती



गर्दीनं वेढलेल्या शहरांत घरं छोटी झाली. घरामागचं अंगण तर फक्त आठवणीतच उरलं. घरात माणसं तीन-चार तरी नोकरी-कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या बाईला रोजच्या धावपळीत एक अख्खा दिवस अपुरा पडू लागला. चारचौघींनी एकत्र येऊन करायच्या गोष्टींना तर सवडच उरली नाही. घरातल्या पापड-कुरडयांच्या डब्यांची, लोणच्यांच्या बरण्यांची जागा ‘घरगुती’ विशेषणांच्या विकतच्या पाकिटांनी घेतली. आता तशी जागा नाही, पूर्वीसारखा वेळ नाही या सबबींखाली एकेकाळची आई-आजी, लेकीबाळींच्या लगबगीनं गजबजलेली ‘वाळवण’ संस्कृती हरवत गेली..


उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं मी माझ्या नेहमीच्या दुकानात गेले आणि खास उन्हाळ्याच्या सामग्रीची यादी सांगितली. गुलकंद, चटक सुपारी, कोकम सरबत, एक दोन मसाल्याची पाकिटं असं किरकोळ सामान घेऊन दुकानदाराला बिल करायला सांगितलं. त्यानं तेवढय़ात आत जाऊन पोह्याच्या पापडाचं अन् कुरडईचं पाकीट आणून माझ्या पुढय़ात ठेवलं. ‘अरे, हे नकोय बाबा. कुणी खात नाही आमच्याकडे.‘ ‘वहिनी, एक एक पाकीट घेऊन जा. पापड अर्धा काय, चतकोर करून तळा. हा अस्सा कढईभर फुलतोय. खाताना मस्त त्या तिखटाचा सौम्य ठसकाही लागतोय. आणि कुरडई तर तेलात घातल्या घातल्या पांढर्‍या शुभ्र फुलासारखी टपोरी होते.‘ ‘अरे बाबा, ते सगळं खरंय. पण माझ्याकडे खप नाही ना. आमच्या घरातले सर्व जण कॅलरी कॅान्शिअस आहेत.‘ पण तो काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. मी अगदी नेहमीची ग्राहक असल्यानं अगदी हक्कानं तो माझ्याकडे हट्ट धरत ‘वहिनी, पापड खाल्ल्यावर पैसे द्या,‘ असं ठेवणीतलं गोड वाक्य बोलून त्यानं बिल करायला घेतलं. पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेल्या एकसारख्या आकाराच्या लालम लाल पोह्याच्या पापडाच्या चळतीकडे व दळदार पांढर्‍या शुभ्र कुरडयांकडे पाहता पाहता माझ्या मनात घट्ट रुतून बसलेल्या उबदार आठवणी हळूहळू सैल होऊन डोळ्यापुढून सरकू लागल्या. दुकानातून सामान पिशवीत भरणं, घरच्या रस्त्याला चालू लागणं या सर्व क्रिया यंत्रवत होऊ लागल्या. मी खरंतर दुकानातल्या त्या पापडांकडे पाहता पाहताच माहेरच्या वाळवणाच्या आठवणीत हरवून गेले होते. माहेरच्या ऐसपैस अंगणात वाळवणाची राखण करता करता वेगवेगळे खेळ खेळण्यात मन केव्हाच दंग होऊन गेलं होतं. अंगणात ठेवलेली लांब-रुंद बाज, त्यावर आईची जुनी पण स्वच्छ एकेरी करून घातलेली मऊसूत साडी नि त्यावर कुरडयांचे ओलसर पांढरे पांढरे ठरावीक अंतरावर घातलेले गुच्छ आठवले. नकळतच पिशवीतल्या कुरडयांवर अलगद हात फिरला. माहेरच्या आठवणींनी मनात एवढढा दंगा घातला होता की, बाहेरचं रखरखतं ऊन जाणवतही नव्हतं.
खरंच, किती धम्माल असायची या एप्रिल मे महिन्यात! माहेर मुंबईचं, मुलुंडचं. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची मुंबई आतासारखी नव्हती. आपआपली दारं लावून फ्लॅटमध्ये बंदिस्त असलेली.. आमची नात्यातलीच दोन दोन खोल्यांची चार बिर्‍हाडं. पुढं मागं मोठ्ठं अंगण. मागच्या दारात आंबा, शेवगा, पारिजातक नि झाडून सगळी फुलझाडं. अगदी शुभ्र कापूस देणारं कापसाचं झाडही होतं. पुढच्या दारी जांभळाचं निळं-जांभळं झाड होतं. परीक्षा संपल्या की वाळवणांची गडबड उडायची. कुरडयांसाठी गहू तीन दिवस भिजत घालायचे. मग त्याचं सत्त्व काढून ते निवळत ठेवायचं. दुसर्‍या दिवशी आधणात तेल, मीठ घालून ते पांढरेशुभ्र सत्त्व हळूहळू ओतायचं. आई रवीनं भराभर ढवळायची. गुठळी होता कामा नये म्हणून तिची उडालेली धांदल अक्षरश: तिचा घाम काढायची. मग तुकतुकीत असा चिकाचा गोळा तयार व्हायचा. लाल लाकडी सोर्‍यामध्ये आई गरमागरम चीक भरून द्यायची. आम्ही सख्ख्या चुलत बहिणी त्या बाजेवर अगदी निगुतीनं आई-आजीनं शिकवल्याप्रमाणे सोर्‍या गोल गोल फिरवून दळदार कुरडईचं फुल काढायचो. अंगणातून स्वयंपाक घरापर्यंत जाताना सोर्‍या उघडून त्याच्या तळाशी राहिलेला चीक गट्टम करून टाकायचो. आईने तेवढा ’लॉस’ गृहीत धरलेला असायचा. कुरडया घालून पूर्ण झाल्या की अधिकृतपणे चीक वाटीत घेऊन खाल्ला जायचा. मग दुपारी एका हातात पुस्तक व एका हातात धुणं वाळत घालायची उंच काठी घेऊन मागच्या दारात पायर्‍यांवर राखणीला बसायचं. कावळ्यांना उडवून लावायचं. आई आडवी झाल्याची खात्री झाल्यावर मधली एखादी, बाजूनं वाळत आलेली पण आत ओली असलेली कुरडई उचलून, मावली नाही तरी अख्खीच्या अख्खी तोंडात कोंबायची. मग पुन्हा राखण सुरू. दुसर्‍या दिवशी त्या उलटून परत कडकडीत वाळवायच्या. नि घट्ट झाकणाच्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवायच्या.
नंतर पापडाचा कार्यक्रम असायचा. मोठी काकू पोह्याच्या पिठाचा गोळा कुटून कुटून अगदी चमकदार करायची. त्या लुसलुशीत गोळ्याच्या कधी एकदा लाट्या पडतायत असं होऊन जायचं. पापड लाटण्यासाठी हात शिवशिवायचे. काकू दोर्‍यानं पटापट एकसारख्या लाट्या पाडायची. आम्ही पोळपाट लाटणं घेऊन तयार असायचोच. ’छान गोल लाटा गं’ आजीचं बारीक लक्ष असायचं आमच्यावर. पहिले पाच-दहा पापडांचं तर परीक्षणही व्हायचं. लाटलेले पापड वर्तमान पत्रावर टाकले जायचे. जरा वेळानं पापड लाटायचं कौतुक संपायचं. कंटाळा यायचा. लाटलेल्या पापडाच्या मोबदल्यात लाट्या घेऊन स्वयंपाकघरात जायचं. एका कॉमन तेलाच्या वाटीत लाट्या भसकन बुडवून त्या जिभेवर ठेवताना काय सुख मिळायचं म्हणून सांगू ! ती तिखटाची, पापडखाराची अन् पोह्याची चव एकत्र जिभेवर रेंगाळत राहायची. माझी दुसरी काकू सालपापडया फार सुंदर करायची. कुकरमधून एक वाफ देऊन बाहेर काढल्या की सुईनं अगदी अलगद न फाडता त्या काढायच्या. सॉलिड कौशल्य लागतं बरं का त्याला. ती सालपापडी इतकी पातळ असायची ना! जरा जरी सुईचा अंदाज चुकला की फाटलीच म्हणून समजा. असाच बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाणा-बटाट्याच्या कुरडया, सांडगे अन् सांडगी मिरच्या व्हायच्या. पण त्यात खायला काही मिळायचं नाही. त्यामुळे त्या कामात फारसा रस नसायचा. फक्त आईच्या धाकानं मदत मात्र करावीच लागायची. शेवयांचं काम पूर्णपणे आज्जीकडे असायचं. अतिशय अवघड आणि कौशल्याचं काम. आईसकट आम्ही सर्व जणी म्हणजे तिच्या असिस्टंट असायचो. धुणं वाळत घालायची काठी स्वच्छ धुवून घेऊन ती आडवी ठेवून तिच्यावर आज्जी लांबच्या लांब शेवया घालायची. आज्जीच्या हातांच्या चपळ हालचाली आम्ही मुग्ध होऊन पाहत असू. पण ते कौशल्य काही आम्ही आत्मसात केलं नाही. आणि शेवया फक्त आजी लोकांनाच जमतात, असा समज करून घेतला. मग हळदीचा -तिखटाचा नंबर लागायचा. लालभडक (ब्याडगी की काय असायची ते तेव्हा कळायचं नाही.) मिरच्यांची देठं काढायची. नि त्या व्हरांड्यात वाळत टाकायच्या. जवळनं गेलं तरी खाट नाकात जायचा. हळकुंड बिचारी निमूटपणे वाळत पडलेली असायची. त्यातली एक-दोन ‘लेकुरवाळी’ हळकुंड बाजूला काढून ठेवली जायची. मिरच्या चांगल्या खळखळ वाजायला लागल्या म्हणजे अगदी खडखडीत वाळल्या, असं समजायचं. मग वेगळ्या गिरणीतून हळद तिखट दळून आणलं जायचं. ते काम मात्र आमच्याकडे नसायचं. कारण त्या गिरणीवाल्याला असं दळ नि तसं दळ असं काहीतरी स्पेशल सांगायचं असायचं. दळून आलेलं ताजं हळद तिखट पत्र्याच्याच डब्यात चार सहा बिब्बे घालून ठेवून दिलं जायचं.
शिकेकाईची अख्खी सरबराई आई करायची. एखादा आठवडाभर तरी शिकेकाईच्या शेंगा उन्हात ठेवायची. संत्र्यांची साल, नागरमोथा, लिंबाची साल, रिठा, गव्हातला कचरा असं काय काय घालून आई शिकेकाई घरी कुटायची. मागच्या अंगणात उखळ ठेवून, काळं मुसळ एकेका हातात पेलत शिकेकाई कुटणारी आईची ती कष्टाळू मूर्ती आजही तितक्याच लख्खपणे आठवते. मागच्या अंगणात आई शिकेकाई कुटत असली आणि आम्ही पुढच्या अंगणात असलो तरी सटासट शिंकायला लागायचो. इतकी निर्भेळ अन् ताजी असायची ती. मग आई एका वेगळ्या चाळणीनं चाळून डब्याला कागद लावून घट्ट झाकणाच्या पत्र्याच्या डब्यात ठेवून द्यायची. तेव्हा शाम्पू नव्हते. न्हायाच्या वेळेस शिकेकाई उकळायची. वरच्या पाण्यानं केस धुवायचे नि चोथ्यानं तळपाय, कोपरं, पाठ स्वच्छ करायची. आम्हा सगळ्या बहिणींचे केस अगदी दृष्ट लागण्यासारखे होते. दाट, मऊ नि काळेभोर. शिकेकाईनं न्हाल्यावर केस मस्त सुगंधी अन् सळसळीत होऊन जायचे. तेव्हा या केसांचं सौंदर्य वगैरे काही कळायचं नाही. पण मुठीत केस घेऊन हुंगताना आई जाम ग्रेट वाटायची.
घरच्या कैर्‍यांचं लोणचंही एक मोठा सोहळाच असायचा, वाळवणाची सांगता करणारा.., घरी लोणच्याचा मसाला करून केलं गेलेलं लोणचं वर्षभरही हवंहवंसं असायचं. कैर्‍यांचे तुकडे करून द्यायला एक माणूस यायचा. त्याच्या वेगळ्या विळीवर तो खटाखट बाठ अलगद बाजूला काढत एकसारखे कैर्‍यांचे तुकडे करायचा. मोठय़ा परातीत लोणचं कालवून त्याच्यावर गार केलेली खमंग फोडणी घालून, दादरा बांधून काचेच्या फिरकी असलेल्या बरणीत ते बंद व्हायचं. या लोणच्याच्या बाबतीत आई -आजी कडक सोहळं पाळायच्या जे तेव्हा अगदी अंगावर यायचं. आजही जेव्हा केव्हा मी माझ्या घरी लोणचं घालते तेव्हा आपण केलेली मेहनत वाया जायला नको म्हणून भीत भीत ते पाळते. पण त्यात काही अर्थ नाही हेही कळत असतंच.
चारही काकवा व आम्ही सगळ्या बहिणी बहिणी एकत्र येऊन ही वाळवण करायचो हे सारं स्वप्नवतच वाटतं आता. आईसकट तेव्हा नोकरी करणारं कुणीच नव्हतं. तसं म्हटलं तर घर, नवरा, मुलं-बाळं हेच त्यांचं विश्‍व होतं. पण किती खूश असायच्या त्या सार्‍या जणी ! कुरडया घालताना, पापड लाटताना एकमेकींशी किती बोलत असायच्या. काय बोलायच्या ते तेव्हा कळायचं नाही. पण बोलण्याच्या चढ-उतारावरून, आवाजाच्या हलकेपणावरून, मध्येच निर्मळ हसणार्‍या चेहर्‍यांकडे बघून त्या गप्पा एकमेकींना सुखावणार्‍या आहेत हे नक्की कळायचं. या सर्व पदार्थांची एकमेकींकडे देवाणघेवाण तर व्हायचीच, पण आम्ही कोणत्याही काकूकडे जाऊन कधीही, काहीही खायला मागत असू शकू. काही नाही तरी मायेच्या हातांनी भाजलेले खमंग लालसर शेंगदाणे नि पिवळा गोड गुळाचा खडा नक्की मिळायचा आमच्या इवल्याशा हातावर. ’माझ्या पुरतं’ ’माझं’, ’माझ्यासाठी’ हे शब्द फार उशिरा कानावर पडले. लहानपणापासून ऐकत आलो ते ’आम्ही’, ’आमचं ’ , ’आमच्यासाठी ’ हेच शब्द नि वाढलोही त्याच शब्दारासांवर. शिस्तीचे, कामाचे, स्वच्छतेचे, सुगरणपणाचे धडे याच सगळ्या जणींनी शिकवले. त्यांचा आम्हाला धाक होता पण भीती नव्हती. प्रेम होतं पण आंधळी माया नव्हती. वाळवणाची राखण करताना, आपण जे मेहनतपूर्वक निर्माण करतो ते कसं राखायचं याचं बाळकडूच मिळालं जणू ! आमच्या शाळेच्या सुट्या कधी नकोशा वाटल्या नाहीत कुणाला. उलट सुट्यांत आम्हाला घर आणि घराला आम्ही अगदी हवंहवंसं वाटायचो.
काळाच्या ओघात नि रेट्यात ते सगळं सुख नाहीसं होऊन गेलं. अंगण गेलं, बाज गेली. नि वाळवणंही गेली. त्या वाळवणाबरोबर एकमेकींशी सहज होणार्‍या गप्पाही गेल्या. आता गप्पांसाठी भिशी नाहीतर किटी पार्टी करावी लागते आम्हाला. जुन्या वाड्यांची, घरांची अपार्टमेंट झाली. बंद दाराआडची एक वेगळीच संस्कृती उदयाला आली. त्या संस्कृतीनं मी, माझं, माझ्यापुरतं ही ’म’ ची बाराखडी निक्षून शिकवली. आम्ही, आमचं, आमच्यासाठी ही ’अ’ ची बाराखडी मनाच्या पाटीवरून कधी पुसली गेली ते कळलंही नाही. साधे दोन गोड शब्दही बोलणं जिथे दुरापास्त, तिथे पापड लाटायला कोण बोलावणार आणि कोण येणार? एकत्र कुटुंब विभागलं गेलं. भावंडांमध्ये आपसूक निर्माण होणारं प्रेम या विभक्त कुटुंबामुळे संपुष्टात आलं. आणि आता भावंडं असतही नाही म्हणा. मनुष्यबळ कमी झालं. घरी काही करण्याची गरजही संपली. बाजारात ’घरगुती’ असं सारं काही मिळू लागलं. हे जेव्हा घरी येऊन खाऊ लागलो तेव्हा तर आई-आजीची आठवण प्रकर्षाने येऊ लागली. त्या घरगुती पदार्थांमध्ये माझ्या त्या घराची चव कुठेच नसायची. पण छान, चविष्ट म्हणून हे पदार्थ स्वीकारण्यावाचून पर्यायच नसायचा. बदलत्या काळानं स्त्रियांना नोकरी करायला लावलीच होती. त्या नोकरीच्या जू खाली बाई शिणत नि वाळत गेली. तिला स्वत:कडे बघायला नि स्वत:चा डबा भरायलाही वेळ मिळेनासा झाला. ती वाळवणं कुठून घालणार ! पुढच्या दारानं सारी ’भौतिक’ सुखं अगदी पत्ता विचारीत विचारीत आली. आणि मागच्या दाराने शाश्‍वत मानसिक सुखांनी जुन्या भाडेकरूप्रमाणे त्या भौतिक सुखांसाठी जागा खाली केल्या. भौतिक सुखं फारशी अंगी न लागल्यामुळे माणसं आरोग्याच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक झाली. ’तळलेलं नको’ या एका वाक्याच्या फटक्यासरशी पापड, कुरडया लांब फेकल्या गेल्या. अगदीच सणावारी, आयत्या आणलेल्या (घरगुती) पाकिटातल्या पापड, कुरडया पानाची शोभा वाढवू लागल्या. तमाम स्त्री वर्गाप्रमाणे मी पण या बदलाच्या रेट्यात सापडलेली आहे.. खरंच तीस-पस्तीस वर्षांत केवढा बदल झाला ! एक पूर्ण पिढी बदलली. या बदलांमुळे छोट्या छोट्या आनंदाला घरातली बाई तर मुकलीच, पण इतर सारेही त्या आनंदापासून वंचित झाले. दोष कुणाचाच नाही. कारण ‘बदल‘ हीच तर कायम स्थिर असणारी गोष्ट आहे.
रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरनी एकामागून एक येणार्‍या आठवणींना खीळ घातली.. ऊन तापत होतं. घरी आले. बाकीचं सामान भरलं. वाळवणांच्या आठवणींनी पछाडलेली मी घरी गेल्या गेल्या पापड, कुरडयांचं पाकीट फोडलं. उन्हाची वेळ होती तरी तेल घालून गॅसवर कढई तापत ठेवली. कात्रीनं त्या लाल भडक पापडाचे चार तुकडे केले. चतकोर तुकडा तापलेल्या तेलात सोडला. खरंच कढईभर फुलला. झार्‍यानं निथळून ताटलीत काढला. कुरडई पण तळली. तीही अशीच सरकन फुलली. टेबलावर ताटली ठेवून खुर्ची ओढून खुर्चीवर बसत, पापडाचा तुकडा मोडत परत आई आजीबरोबर घराच्या अंगणात वाळवणाच्या लगबगीत हरवून गेली.

--------------------  अर्चना बापट



Wednesday, 13 June 2012

शनिवारवाड्याचे रहस्य



शनिवारवाड्याचे रहस्य
-१-
रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. "वेस्ट्-एन्ड" टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेत जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे. म्हणून मी पॉवर हाऊसमार्गे के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोरुन जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती, अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा बोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूच्या भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करुन एक दगड उचलला आणि रस्त्यावरचा सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्या भागापुरता तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा बोळा कोंबून धडपडत पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील त्राण संपल्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला होता. तेवढ्यात एक माणूस के.ई.एम्.च्या आतून पळत आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करु लागला. पुढे हा काय करतो? हे पाहण्यापूर्वीच मी तेथून पलायन केले. न जाणो आपण याच्या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो.....
-२-
दुसर्‍या दिवशी मी उशीरा उठलो. रविवार असल्याने आईनेही मला नेहमीप्रमाणे उठवले नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा बोळा तसाच अजून खिशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शनिवारवाड्यासंदर्भात काहितरी लिहीले होते व दुसर्‍या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सर्व आवरुन मी शनिवारवाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वास्तूचा उल्लेख कागदावर आहे त्याच ठिकाणी जाऊन पाहिलेले बरे असा विचार करुनच मी शनिवारवाडा गाठला होता.
शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच एक माडी आहे, ती माझी आवडती जागा आहे. तिथेच एका कोपर्‍यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या पहिल्या पानावर (बहुतेक त्या माणसाने...) लिहिले होते की, "सन ११७६ मध्ये घडवलेली नटराजाची रत्नजडीत मूर्ती शनिवारवाड्यासमोरील बाजीरावाच्या पुतळ्याखाली आहे." मी बायनॉक्युलर (दूरदर्शी) आणला होता. त्यातून मी बाजीरावाच्या पुतळ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. बाजीरावाची घॉड्यावरची मर्दानी मूर्ती पाहताच अस्सल मराठी माणसाच्या नसा फुगल्याशिवाय रहात नाही. बाजीराव खूप पराक्रमी होता यात काही संशय नाही. पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला. शत्रू हातातून सुटू नये म्हणून उभ्या घोड्यावरच हातावर हुरडा भरडून पोट भरुन परत लढाईला कूच करणार्‍या पहिल्या बाजीरावाच्या या कथा केवळ दंतकथा म्हणूनच आता ओळखल्या जातात. बाकी ही मस्तानी होती खूप सुंदर म्हणूनच बाजीरावासारखा रांगडा गडी तिच्यावर भाळला की काय न कळे. पण मस्तानीचेही बाजीरावावर तेवढेच प्रेम होते हेही तितकेच खरे. असो, तर मी माडीवरच्या कोपर्‍यातून बाजीरावाच्या पुतळ्याकडे पाहिले पण तेथे मूर्ती काही दिसली नाही. थोडे डॉके चालवल्यावर कळाले की एवढी मूल्यवान मूर्ती उघड्यावर कोणी ठेवणार नाही. ती बरोबर पुतळ्याच्याच जागी जमिनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो -
" ही मूर्ती देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे मी ही अनमोल मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा विचार करतोय. मूर्तीकडे जाण्याचा नकाशा मागे दिला आहे. मी तर ही मूर्ती काढणे अशक्यच आहे, म्हणून कोणातरी विश्वासू व्यक्तीलाच ही माहिती देण्याचा मनसुबा आहे."
- वीरेन्द्र प्रताप सातव
१२ ऑगस्ट १९९२.
मी विचार करु लागलो, ज्याअर्थी हे पत्र अशा पद्धतीने लिहिले आहे त्याअर्थी खून झालेली व्यक्ती दुसरीच असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे बसलेल्या विक्रेत्याकडून "सकाळ" व "केसरी" ही पुण्यातील दोन अग्रणी वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.मी एवढ्या घाईत घरुन निघालो होतो की न्यूजपेपर वरुन नजर फिरवायची देखील सवड मिळाली नव्हती. पेपर घेऊन मी शनिवारवाड्याच्या माडीवर परत आलो. अगदी पहिल्याच पानावर खुनाची सविस्तर बातमी आलेली होती. मी मन लावून ती सर्व बातमी वाचून काढली. ज्याचा खून झाला होता त्या व्यक्तीचे नाव होते रामदास जाधव. खून करणारा त्याचा भाऊच होता - सीताराम. एका गुप्त आणि प्राचीन मूर्तीची माहिती असलेला नकाशा रामदासकडे होता, म्हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळाल्यावर सीताराम स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. त्यामुळे पोलिसांचे काम संपल्यात जमा होते. पण माझे काम संपले नव्हते, कारण त्या नकाशाचे उत्तरदायित्व आता माझ्याकडे होते. मला ती मूर्ती शोधून काढून सुखरुपपणे पुरातत्त्व खात्याकडे सुपुर्त करायची होती. खूनाचा साक्षिदार म्हणून मी जाणारच नव्हतो, आणि आता तशी गरजही नव्हती. मी घड्याळात पाहिले. नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मी खाली उतरलो व शनिवारवाड्याच्या शेवटच्या बाजूस असणार्‍या बंद असलेल्या भुयाराच्या दरवाजाच्या जवळ जाऊन बसलो.
-३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणार्‍या लोखंडी दरवाज्याचे कुलुप काढून आत गेला. तसे होणार हे मला माहित होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आम्ही सगळे मित्र इथे शनिवारवाड्यातच येऊन अभ्यास करायचो. तेव्हा दररोज सकाळी १० वाजता एक माणूस भुयारातील पाण्याची मशीन चालू करायला यायचा. या माहितीचा आज अशा वेळी उपयोग होईन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर नेहमीप्रमाणेच आजही तो माणूस आला व भुयाराच्या जाळीच्या दरवाजाचे कुलुप उघडून आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आपल्याकडे पहात नाही याची खात्री करुन मी भुयाराच्या दारातून प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन फाटे फुटतात. मशीन सुरु करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावाच्या पुतळ्याखाली जायचे असल्यामुळे मला उजवीकडेच जायचे होते त्याप्रमाणे मी उजवीकडे वळालो. शनिवारवाड्याच्या भुयारांबद्दल एक आख्यायिका आहे. शनिवार वाड्यातून एक भुयार थेट पर्वतीपर्यंत जाते आणि दुसरे भुयार रास्ता पेठेतील रास्तेवाड्यात उघडते. सध्या रास्तेवाड्यात शाळा चालू आहे, तरी शाळेच्या पायर्‍यांपाशीच एक खूप मोठे लोखंडी दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पर्वतीवरही कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे. आज या दंतकथेवरील पडदा उघडणार का? असे अनेक विचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खालच्या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा प्रश्न माझ्या मनात उत्कंठाही निर्माण करत होता आणि भीती देखील.
मी नेहमी एक छोटासा कि-चेन टॉर्च जवळ बाळगायचो, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. आज तो छोटासा टॉर्च उपयोगाला आला होता. सुरुवातीचे अंतर मी दबकत दबकत टॉर्च न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आलेल्या त्या माणसाला टॉर्च चा प्रकाश दिसण्याचा संभव होता. काही अंतर गेल्यावर मला थोड्या ओबडधोबड पायर्‍या पायाला लागल्या. तोल जाईन म्हणून मी टॉर्च पेटवला. पायर्‍या एकूण पाच होत्या. खाली उतरल्यावर एकदम माझ्या पायांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. माझे दीड हजार रुपये किंमतीचे बूट पूर्णपणे बुडुन पाणी माझ्या घोट्याला लागले होते. मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फेकत पुढे निघालो. अधून मधून नकाशाही पहात होतो. नकाशात असलेल्या खुणा टॉर्चच्या प्रकाशात शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पहिली मुख्य खूण शनिवारवाड्याच्या दरवाज्यापाशी होती. त्यामुळे मला खूप पुढे जावे लागले. बर्‍याच वेळाने मला असे वाटले की मी आता शनिवारवाड्याच्या प्रासिद्ध पोलादी दरवाज्याखाली आहे. पहिली खूण सूर्याची होती.... " " अशी. टॉर्चच्या प्रकाशात मला ती खूण सापडायला थोडे कष्टच पडले. कारण ती खूण नेमकी माझ्या डोक्यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने डावीकडे वळण घेतले होते.
पुढची खूण होती चंद्राची.. "". या दोन्ही खुणा शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या आहेत हे मला त्यावेळी आठवले.मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत होत्या. हा नकाशा नसता तर शनिवारवाड्याच्या पोटात असलेल्या भुयारांच्या भुलभुलैय्यात मी कुठे हरवलो असतो कोण जाणे.
-४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती "". ही खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला रस्ता डावीकडे वळायचा संकेत देत होता व प्रत्यक्षात भुयाराचा मार्ग उजवीकडे जात होता. माझे डोके खजिना शोधाच्या साहसकथा वाचून बरेच सुपीक झाले होते त्यामुळे मी लगेच ओळखले की येथे गुप्त द्वार आहे. मी खुणेचे टॉर्चच्या अंधुक प्रकाशात नीट निरीक्षण केले व खुणेतील गोलाकार फुगीर असल्याचे जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची भिंत आवाज करत मधोमध दुभंगली व माझ्यासाठी डाव्या बाजूने जायचा मार्ग मोकळा झाला. मी आत पहात हळूच प्रवेश केला. एव्हाना पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते व माझी आवडती डेनिमची पॅन्टदेखील खराब झाली होती. मी आत प्रवेश केल्याकेल्या एक रिकामा चौथरा माझ्या दृष्टीस पडला. त्यावर मूर्ती नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला की काय असे वाटून मी निराश झालो. कोणी घेतली असेन याचा विचार करत मी खिन्न होऊन बसलो होतो. मी एकदम माझ्या घड्याळाच्या आवडत्या ट्यूनने भानावर आलो. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या चौथर्‍याची तपासणी करु लागलो. तपासणी करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथर्‍याची फरशी आपोआप बाजूला झाली. त्या चौथर्‍याच्या आत टॉर्चचा प्रकाश न टाकताही ती रत्नजडीत मूर्ती मला लगेच दिसली कारण मूर्तीची सर्व रत्ने खूप चमकत होती. बहुतेक ते सर्व हिरे असावेत असे वाटले, कारण रत्न ओळखण्याइतपत ज्ञान मला नव्हते. फक्त हिरा अंधारात चमकतो एवढेच मला माहित होते. मी माझ्या पाठीवरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहेर पडलो होतो. त्यामुळे सॅक मधे टॉवेलदेखील आणलेला होता मी. तर सोबतच्या टॉवेलात इतिहासातील तो अनमोल रत्नजडीत मूर्तीचा ठेवा काळजीपूर्वक गुंडाळला. मूर्ती सॅकमधे ठेवून मी घड्याळाकडे एक नजर टाकली. माझ्या घड्याळाचे रेडीयमचे काटे अंधारात ११.०५ ही वेळ दाखवत होते. मूर्ती जड होती व त्यात मला पाण्यातून चालायाचे असल्यामुळे थोडा त्रास झाला. पण मी सुखरुपपणे भुयाराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो .
-५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून निघून गेला होता. खिशातून काही मिळते का ते मी पाहू लागलो. हेरगिरीच्या व साहसे करण्याच्या स्वभावापायी मी अनेक वस्तू जमवून ठेवल्या होत्या त्यात अनेक चाव्यापण होत्या. खिशात काही नाही मिळाले पण माझ्या सॅकमधे हा चाव्यांचा जुडगा होता. दरवाजा जाळीचाच होता. त्यामुळे बाहेर हात घालून कुलुप उघडण्याचा प्रयत्न करणे सहज शक्य होते. मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते. माझ्याकडच्या चाव्यांपैकी एका चावीने ते छोटेसे कुलूप जास्त कष्ट न करता माझ्या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहेर जाताना मुख्य दरवाजावरील कर्मचारी विचित्र व हेटाळणीच्या नजरेने पहात होता. बरोबर होते त्याचे. गुढग्यापर्यंत पॅन्ट पूर्णपणे भिजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहून कोणीही असेच पाहिले असते. तर मी शनिवारवाड्याबाहेर जाताच पहिल्यांदा पब्लिक टेलिफोन बूथ गाठला. सुदैवाने सुटी नाणी होती माझ्याकडे. मी सर्वप्रथम पुण्याच्या महापौरांना फोन केला व थोडक्यात माझा हा उद्योग कळवला आणि पुरातत्त्व खात्याच्या इमारतीत यायची विनंती केली.
मी भांडारकर रस्त्यावरील पुरातत्व खात्याच्या इमारतीत पोहोचेपर्यंत महापौरदेखील आलेले होते. मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक केले. मूर्तीची माहिती समजताच सर्व वर्तमानपत्रांचे वार्ताहरही आलेले होते. ती रत्नजडीत मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. मी शांतपणे घरी परतलो. घरी येई पर्यंत संध्याकाळ झालेली होती. खूप थकलो असल्याने मी रात्री लवकर झोपलो...
दुसर्‍या दिवशी सकाळी पेपर मध्ये पहिल्या पानावर माझ्या पराक्रमाची सविस्तर हकिकत आलेली होती. अगदी ती रत्नजडीत मूर्ती व महापौर यांच्यासोबत काढलेल्या फोटोसकट. पेपर पाहूनच आईने मला साखरझोपेतून उठवले व म्हणाली- कार्ट्या असे उद्योग करायला उलथला होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"... म्हणून आईने मला जवळ घेतलं ...
एका रात्रीत मी सार्‍या पुण्यात फेमस झालो होतो. मला मात्र एका मोठ्या रहस्यावरचा पडदा उघडल्यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉन्ड ... जेम्स बॉन्ड... हा हा...
 

-------सागर


Tuesday, 12 June 2012

शेरलॉक होम्स - रेड हेडेड लीग





त्या दिवशी वॉटसन होम्सकडे आला तेव्हा त्याच्याकडे एक क्लायंट येऊन बसलेला होता. त्या क्लायंटची कुठली गोष्ट वॉटसनच्या नजरेत सर्वप्रथम भरली असेल तर त्याचे तांबडेलाल केस! होम्सने त्या क्लायंटची - मि.विल्सन त्यांचं नाव- आणि वॉटसनची ओळख करून दिली. विल्सन साहेबांची हकीकत फारच विलक्षण होती. विल्सन यांचा तारण घेऊन पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा होता. त्यांच्या कोबर्ग स्क्वेअर मधल्या घरात राहूनच ते हा व्यवसाय एका मदतनिसाच्या साहाय्याने करत असत. धंदा उत्तम नाही तरी ठीकठाक चालला होता. विल्सन आपला मदतनीस व्हिंसेंट स्पॉल्डिंग यावर खूष होते कारण तो कामाला तर चांगला होताच पण मार्केट रेट च्या जवळजवळ निम्म्या पगारात तो हे काम करत होता. त्याची एकच खोड विल्सनना आवडत नव्हती. ती म्हणजे त्याचा फोटोग्राफीचा छंद. उठसूट तो फोटो काढायचा आणि मग तळघरात जाऊन ते डेव्हलप करत बसायचा. पण त्याच्या कामात काही कसूर होत नसल्याने विल्सनना तक्रारीला जागा नव्हती.

एक दिवस व्हिंसेंट एक जाहिरात घेऊन आला. लाल केसांच्या लोकांच्या संघटनेने प्रसिद्ध केलेली ती जाहिरात होती. एक रिकामी जागा भरायची होती. आवश्यक अर्हता - लाल केस. बाकी अटींच्या बाबतीत काटेकोरपणा नव्हता आणि पगार तर फारच आकर्षक; आठवड्याला चार पौंड!! इच्छुकांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावलं होतं. विल्सनना जायची खूप इच्छा झाली आणि व्हिंसेंटने पण त्याला दुजोरा दिला. दोघे मुलाखतीच्या जागी पोहोचले. विल्सन साहेबांचा नंबर आला. लाल केसांच्याच एका माणसाने मुलाखत घेतली. जुजबी प्रश्न विचारले गेले. विल्सनने केसांचा टोपबीप तर घातला नाही याची खात्री करून घेतली कारण नोकरी फक्त लाल केसवाल्यांसाठीच होती! विल्सनची निवड झाली. दुसऱ्या दिवशी कामावर रुजू होण्यास सांगितले. कामाच्या वेळा -सकाळी १० ते दुपारी २. म्हणजे विल्सनना संध्याकाळी आपल्या धंद्यासाठी वेळ देता येणार होता. इतर वेळात व्हिंसेंट होताच. काम काय हे सांगितल्यावर मात्र विल्सन अवाक झाले. काम होतं एन्सायक्लोपीडीया ब्रिटानिका उतरवून काढणे! विल्सनना हे जरा चमत्कारिक वाटलं पण दर आठवड्याला मिळू घातलेले चार पौंड दिसत होते! म्हणून ते काही न बोलता दुसऱ्या दिवसापासून कामावर जाऊ लागले.

दोन महिने असे गेले आणि आज जेव्हा विल्सन कामावर गेले तेव्हा कचेरीला कुलुप आणि तिथे पुढील सूचना लिहिलेली : लाल केसांच्या लोकांची संघटना बरखास्त केली आहे. आजूबाजूला चौकशी केली पण कुठूनही काही समाधानकारक माहिती मिळाली नाही. मग विल्सन सरळ होम्सकडे आले.

होम्सने विल्सनना आणखी काही प्रश्न विचारले. मदतनिसाच्या दिसण्याचे वर्णन ऐकल्यावर होम्सला त्यात काही तरी ओळखीचे वाटले. "मी तुमची केस घेत आहे. आज शनिवार आहे, सोमवार पर्यंत मी तुम्हाला निश्चित काही तरी सांगू शकेन." असे म्हणून होम्सने विल्सनना निरोप दिला.

नंतर होम्सने वॉटसनला घेऊन एका संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याची टूम काढली. पण तिथे जाण्यापूर्वी ते कोबर्ग स्क्वेअर मध्ये गेले. विल्सन साहेबांचे घर सिटी अँड सबर्बन बँकेच्या पिछाडीस होते. होम्सने विल्सनच्या घराचे दार वाजवले तेव्हा विल्सनचा मदतनीस बाहेर आला. होम्सने  त्याला विचारले "इथून स्ट्रँडला कसं जायचं हो?" त्याने ते सांगितले व आत गेला. पत्ता विचारणे हा होम्सचा हेतू नव्हता हे वॉटसनने ओळखले. त्याबद्दल विचारणा केली असता होम्स म्हणाला "मला त्याची विजार गुडघ्याशी कशी आहे ते पहायचे होते." वॉटसनला अशा उत्तरांची सवय होती! पण कोपऱ्यापासून विल्सनच्या घरापर्यंत जाताना  होम्स मधूनमधून काठी का आपटत होता हे मात्र त्याला कळले नाही. संगीताच्या कार्यक्रमानंतर दोघे आपापल्या दिशेला जायला निघाले. होम्सने वॉटसनला रात्री १० वाजता घरी येण्यास सांगितले आणि येताना पिस्तूल आण असेही सांगितले.

रात्री १० वाजता वॉटसन जेव्हा होम्सच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे स्कॉटलंड यार्डमधील इन्स्पेक्टर जोन्स आणि सिटी अँड सबर्बन बँकेचे डायरेक्टर आधीच आलेले होते. काही मिनिटातच चौघेजण बाहेर पडले आणि थोड्याच वेळात ते बँकेच्या तळघरात पोहोचले. तिथे काही पेट्या रांगेने लावून ठेवलेल्या होत्या. त्या एकेका पेटीत सोन्याची दोन दोन हजार नाणी आहेत असे डायरेक्टर महोदयांकडून कळले! चौघेही अंधारात बसून राहिले. होम्स म्हणाला विल्सनकडे सर्व निजानीज झाल्यावरच 'ते लोक' हालचाल करतील. तोपर्यंत आपल्याला अंधारातच आवाज न करता बसायला हवे.

बऱ्याच वेळानंतर जमिनीतून एक प्रकाशाची तिरीप बाहेर आली, त्या पाठोपाठ एक हात. त्या हाताने फरशी बाजूला केली आणि एक माणूस वर आला. तो व्हिंसेंट होता! त्याच्या पाठोपाठ एक लाल केसांचा माणूस वर आला पण ह्या चौघांवर त्यांची नजर जाताच त्यांचं धाब दणाणलं. लाल केसवाला (तो विल्सनचा बॉस) पटकन खाली पळून गेला. पण व्हिंसेंट स्पॉल्डिंग उर्फ जॉन क्ले याच्या हातात जोन्सने बेड्या अडकवल्या. त्याचा पूर्वेतिहास होम्स आणि जोन्स यांना माहीत होता. लाल केसवाला पळून गेल्याचे कोणाला काही वाटले नाही कारण दुसऱ्या दारात त्याच्या स्वागतासाठी जोन्सने हवालदार उभे केलेले होतेच.

अशा रीतीने होम्सच्या हुशारीने बँकेवरचा मोठा दरोडा टळला आणि अनेक वर्षे सापडत नसलेला अट्टल दरोडेखोर, खुनी, बदमाश जॉन क्ले हा पण पकडला गेला.