Tuesday, 14 August 2012

घरच्या घरीच सौंदर्य



आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 
 
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय. 

त्वचेची देखभाल 

खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते. 

सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत. 
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. 
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात. 
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल. 
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

* "आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

* तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात. 
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे?  

* चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. 
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य  

* खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 

हाता-पायांचीही काळजी  

* चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 

निरोगी केसांसाठी  

* लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 
हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 



------------------ दै. सकाळ 

पुण्याचा सिंहगड !




पुण्याचे दोन मानबिंदू, एक शनिवारवाडा तर दुसरा सिंहगड! यातही सिंहगड म्हटले, की नरवीर तानाजी मालुसरेंचे रणकंदन, डोंगरदऱ्यांचा मावळ, हिरव्यागर्द झाडीचा आधार, शांत-निवांत सकाळ-संध्याकाळ आणि भन्नाट वारा असे बरेच काही डोळय़ांसमोर येते. इथे मिळणारी झुणका-भाकर, कांदाभजी, मडक्यातील दही या गोष्टीही खुणावू लागतात. यामुळे अनेक भटक्यांची पावले सिंहगडची ही वाट वर्षांनुवर्षे चढत असतात.
पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा गड! उंची ४३२९ फूट! पायाच्या आतकरवाडीतून वर चढणारी वाट, पण ज्यांना गड चढायचा त्रास त्यांच्यासाठी अलीकडे गोळेवाडीतून एक घाटवाट अगदी गडावर नेऊन पोहोचवते. याशिवाय जातीचे भटके कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड अशा अन्य डोंगरवाटांवरूनही त्यांची ही पंढरी गाठत असतात. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच खुणावू लागतो.
या पाऊसवेळी कधीही आलो, तरी हा गड तुम्हाला जिंकून घेतो. हिरवे रान, डोंगर-दऱ्या, त्यावरचा
ऊन-पावसाचा खेळ, रानफुलांची नक्षी, डोंगरकपारीच्या असंख्य जलधारा, ढग-धुक्याचे लोट, सुसाट वारा आणि या साऱ्यांशी टक्कर देत मधोमध एखादे जहाज नांगरल्यासारखा उभा असलेला तो उमदा गड! सिंहगडाचे हे राजबिंडे रूपच प्रथमदर्शनी मनावर ठसते. हिरवाईचे हे रूप पाहातच तासाभरात आपण गडमाथ्यावर दाखल होतो.
काहीसा कुऱ्हाडीसारखा गडाचा आकार. यातही पूर्वेकडची डोंगररांग सोडल्यास उर्वरित बाजूंना तुटलेले कडे. या उभ्या कडय़ांवरच सिंहगडच्या तटबंदीची चिलखते चढवली आहेत. तब्बल ३३ बुरूज आणि दोन प्रवेशमार्ग! एक पुण्याकडून तर दुसरा कल्याणहून शिरणारा राजमार्ग! पैकी पुणे दरवाजाची तीन तोरणे गडाच्या सुरुवातीच्याच खांदकडय़ाखाली दडली आहेत. हा खांदकडा म्हणजे गडाची एक माची! या माचीवरच आता सिंहगडाची ओळख बनलेला दूरदर्शनचा मनोरा उभा आहे. या माचीत अद्याप पाण्याची टाकी आणि घरांचे अवशेषही दिसतात. या माचीवरच दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यात आले होते. या माचीची एक गंमत इथेच सांगतो, छत्रपती शिवराय जेव्हा मिर्झाराजे जयसिंहाबरोबर तहाची बोलणी करायला बसले तेव्हा त्यांना दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत त्यांनी सिंहगडबरोबर चतुरपणे या माचीलाही आणखी एक किल्ला म्हणून जोडले. राजाच्या अंगी केवळ पराक्रम असून चालत नाही, तर त्याबरोबरच चातुर्य आणि मुत्सद्देगिरीही असावी लागते, तेव्हाच स्वराज्य उभे राहते. याचेच हे उदाहरण!

पुणे मार्गात तीन दरवाजे. यातील पहिल्या दरवाजाला आपल्या टपाल तिकिटावर स्थान मिळालेले आहे. या मालिकेतील पहिले दोन मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील! त्याच्या अंगा-खांद्यावरची स्तंभ कमळांची रचनाच याचे पुरावे देतात. आत शिरताच लगेच लागणारे ‘घोडय़ाची पागा’ नावाचे खोदकाम तर त्याहून प्राचीन! खरेतर हे सातवाहनकालीन लेणेच! मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना! अशा ठिकाणी कुणाच्यातरी डोक्यात ‘घोडय़ाची पागा’ अशी कल्पना आली आणि घोडय़ांना न विचारताच ती रूढही झाली. या खोदकामाची उंचीही घोडय़ांना आत सामावू शकत नाही, तिथे आम्ही पागा तयार केली.
अशाच पद्धतीची आणखी दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. यावरून हा गड किमान दोनएक हजार वर्षांपूर्वीपासून वाहता असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कुठल्याही गडावर फिरताना त्याच्या असे मुळाशी गेले, की इतिहास आणि ते स्थळ दोन्हीही रंजक होते.
या प्राचीनकाळी गडाचे नाव होते कौंडिण्यदुर्ग! कोणा कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले. पुढे ऋषींनीच इथे कौंडिण्यश्वराची स्थापना केली. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. मग काही दिवसांनी अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला कोंढाणा आणि कौंडिण्यश्वराचे झाले कोंढाणेश्वर! यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर!

यादवकाळापर्यंतचा हा प्रवास! यानंतर गडावर आल्या मुस्लिम राजवटी! कोंढाण्याचा पहिला लेखी उल्लेख याच काळात सापडतो. इसवी सन १३५० मध्ये लिहिलेल्या ‘शाहनामा-ए-हिंद’ या फारसी काव्यातील २२३व्या प्रकरणात मुहम्मद तुघलकाने ‘कुंधियाना’ जिंकल्याचा उल्लेख आहे. हा ‘कुंधियाना’ म्हणजेच कोंढाणा! यानंतर मग गडावर निजामशाही, आदिलशाही अवतरल्या. पुढे छत्रपती शिवरायांनी खेड शिवापूरच्या बापूजी मुगल नऱ्हेकर देशपांडे यांच्या मदतीने इसवी सन १६४७ मध्ये गडावर हिंदवी स्वराज्याचे तोरण चढवले. पण लगेच शहाजीराजांच्या अटक प्रकरणात त्यांना हा गड सोडावा लागला. १६५३ मध्ये त्यांनी तो पुन्हा घेतला आणि गडाचे नामकरण केले ‘सिंहगड’! पुढे मिर्झाराजेंबरोबरच्या तहात हरवलेला किल्ला हस्तगत करण्यासाठी तानाजी मालुसरेंना प्राणाची आहुती द्यावी लागली. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठय़ांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या रणमर्दानी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. या गडावरच तीन मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराममहाराजांचे निर्वाण झाले. यानंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! ‘बक्षी-दा-बक्ष’चा अर्थ दैवी देणगी! पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठय़ांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या अखेरच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला!

या शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांचा सिंहगड लुटीचा तपशीलदेखील धक्कादायक आहे. हा गड घेतला त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज मिळाला. याची त्या वेळी किंमत होती तब्बल पन्नास लाख रुपये! गडावरील एका बांधीव खांबात सोन्याची एक गणेशाची मूर्ती मिळाली. या मूर्तीचीच पाच लाख रुपये एवढी किंमत भरली. पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.
इतिहासाचा हा साराच भाग अनेक संदर्भ-तपशील पुरविणारा. तो लक्षात ठेवतच या सिंहाच्या गुहेत शिरावे.
तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारूगोळय़ाचे कोठार लागते. गडावरची आज शाबूत असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. गंमत अशी, की पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.
गडाच्या मध्य भागात किल्लेदाराचा वाडा, अमृतेश्वर-कोंढाणेश्वर मंदिर, तानाजी स्मारक, राम-गणेश-देव टाक्या आदी ऐतिहासिक वास्तू आहेत. पैकी किल्लेदाराचा वाडा आता पडून गेला आहे. त्याचा तट आणि कमानीचा दरवाजाच तो काय शिल्लक आहे. या जागेतच आता गडावरील पोलीस चौकी थाटली आहे. अमृतेश्वराचे मंदिरही पडले आहे. पण गाभाऱ्यातील शुद्ध पाषाणातील भैरव-भैरवीची मूर्ती मात्र आजही लक्ष वेधून घेते. या चतुर्भुज भैरवाच्या हातात जांबिया, डमरू, त्रिशूळ आणि एका हातात नरमुंड आहे. या नरमुंडातून ठिबकणारे रक्त पिणारा श्वानही पायाशी दाखवला आहे.

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले ते हे ठिकाण. त्या वेळी शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आताचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.
या लगतच्या टेकडीवर कोंढाणेश्वराचे प्राचीन मंदिर! यादवकाळातील हेमाडपंती शैलीतील हे बांधकाम. या मंदिराचे विविध द्वारशाखांनी सजलेले प्रवेशद्वार तर हमखास पाहावे असे. या टेकडीवरून उत्तरेकडे उतरलो, की वाटेत आणखी एक स्मारक दिसते. चौथऱ्यावर घुमटीत एका हाताची रचना तर पायाशी एका घोडेस्वाराची प्रतिमा ठेवली आहे. असे म्हणतात, तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड या दोघांमधील लढाईत या जागी तानाजींचा हात तुटला, त्याचेच हे स्मारक!
हा रस्ता असाच पुढे टिळक बंगला आणि राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरतो. सिंहगडावरचे हवामान, वातावरणाने आजवर अनेकांना मोहात पाडले आहे. यामध्ये लोकमान्य टिळक हेदेखील होते. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आक्र्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली. याच बंगल्याने १९१०मध्ये टिळक आणि महात्मा गांधीजींची ऐतिहासिक भेटही अनुभवली. गांधीजी टिळकांना आपले गुरू मानत. अशा या गुरू-शिष्यांमध्ये त्या वेळी नेमकी काय चर्चा झाली ते काळालाच ठाऊक! याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. टिळक बंगल्यातच ते मुक्कामाला होते. कराची काँग्रेस सोडून आलेल्या नेताजींनी या सिंहगडावरच टिळक बंगल्याच्या सहवासात नव्या लढाईची प्रेरणा घेतली. आज इथे आलं, की हे सारे इतिहासभारले क्षण रोमांच उमटवत आठवतात.
या बंगल्यामागूनच एक वाट उत्तरेकडे राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरते. ऐन कडय़ालगत ही वास्तू! महाराष्ट्रातील हे एक देखणे स्मारक! चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत! इथे आतमध्ये राजारामांच्या पादुका, देवीची एक मूर्ती आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्यपूजेतील एक तेजस्वी बाणही (शिवलिंग) इथे होता. हा बाण कोणी-कुठे हलवला याची माहिती मिळत नाही. समाधीचा हा परिसर स्वच्छ, मोकळा, शांत आहे. शेजारी पाण्याचे टाके आहे. पाठीमागे आता काही वर्षांपर्यंत गुलाबाची बाग होती. खरेतर इतिहासकाळात या समाधी आणि परिसराची व्यवस्था पाहण्यासाठी काही योजना लावून दिलेली होती. या साऱ्यांमुळेच हे स्मारक आज या अवस्थेत दिसते.
सिंहगडाचा हा मध्यभाग पाहात पुन्हा देव टाक्यावरून कल्याण दरवाजात उतरावे. एका खाली एक दोन दरवाजे! पैकी वरच्या दरवाजाच्या माथ्यावर दोन ओळींचा शिलालेख आहे.
‘‘श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान’’
बाळाजी बाजीरावाने हा दरवाजा बांधला किंवा दुरुस्त केला असा याचा अर्थ! या दरवाजाभोवतीच्या बुरुजांवर माहुतांसह हत्तीशिल्पं कोरली आहेत. पैकी डावीकडील अद्याप शाबूत आहे. याचा लाकडी दरवाजा आत्ता वीस-पंचवीस वर्षांपर्यंत उत्तम अवस्थेत होता. पण पुढे त्याला पाय फुटले. त्याच्या पोलादी साखळय़ा आजही दिसतात. आता त्या तरी भुरटय़ा चोरांपासून वाचवल्या पाहिजेत.

हे सारे पाहावे आणि दरवाजामागील टेकडीवर चढावे. इथे उदयभान राठोड यांचे स्मारक! एकेकाळी चौथरा आणि घुमटी असलेले हे स्मारक आता जवळपास भुईसपाटच झाले आहे. त्याचे ते कोरीव दगड अस्ताव्यस्त पडले आहेत. पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली असलेल्या या गडावर दिवसामागे ऐतिहासिक इमारती नामशेष होत आहेत आणि दुसरीकडे रोज एक नवी टपरी वाढते आहे. या गडाचा तट आता अनेक ठिकाणी ढासळू लागला आहे. कल्याण दरवाजाचा बुरूज नुकताच ढासळला. उदयभानचे स्मारकही नाहीसे झाले. दुसरीकडे गडावर वाढलेले बाजारू पर्यटनही सिंहगडाला त्रासदायक ठरू लागले आहे. या पर्यटकांकडून सरकार प्रवेशशुल्कापोटी पैसे गोळा करते. पण त्याचा वापर प्रत्यक्ष किल्ला वाचविण्यासाठी करण्याऐवजी सुशोभीकरणावरच होत आहे. गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता, पण आता गडाच्या दरवाजात पानाची टपरी टाकून पान-तंबाखू विक्री होत असेल तर हे पुरातत्त्व खाते खरेच झोपले आहे असे म्हणावे लागेल.
असो! सिंहगडाच्या नशिबाचे भोग म्हणावेत आणि पुढे निघावे. उदयभान स्मारकाच्या या टेकडीवरून आपण थेट दक्षिणेच्या झुंजार बुरुजावर उतरतो. या बुरुजावर आलो, की लगेचच समोरच्या डोंगररांगांतील राजगड, तोरणा खुणावू लागतात. काही भटके याला प्रतिसाद देत सिंहगड-राजगड-तोरणा अशी वारीही करतात.
झुंजार बुरूज ते पश्चिम टोकाचा कलावंतिणीचा बुरूज यामध्ये एक भलीमोठी तटबंदी घातली आहे. या दरम्यानच्याच डोणागिरीच्या कडय़ावरून तानाजी त्यांचे मावळे घेऊन वर आले होते. हे सारे पाहात कलावंतिणीच्या बुरुजावर यावे. समोरचा दऱ्याखोऱ्यांचा खेळ मन गुंतवून टाकत असतो. आकाश निरभ्र असेल तर इथे उभे राहून तळातील हालचाल निरखावी. मुठेचे ते चमचमते पात्र आणि त्याभोवतीची शेतीवाडी पाहावी. कधी इथूनच तो धीरगंभीर सूर्यास्त पाहावा आणि पूर्वेला उगवणारा तो पौर्णिमेचा चंद्रही मनात साठवावा. पाऊसकाळी बाष्पाने भरलेले ढग हा कडा चढत असतात. ते वेगाने येतात, आदळतात आणि विस्कटतातही. सारी दरी धुकटाने भरून जाते. मग त्याला हटवत मधेच ‘सू ऽ सूऽऽ’ आवाज करत वाराही घोंगावतो. निसर्गाचे हे सारे खेळ अनुभवताना समाधी लागते आणि मग अचानकपणे त्या वाऱ्यावर डफ आणि शाहिरांचे आवाजही स्वार होतात.
..चार फेब्रुवारी १६७०, माघ वद्य नवमीची ती काळरात्र! तो शूर नरसिंह आणि पाचशे रणमावळे! घोरपड लागावी त्याप्रमाणे ते सारे कडय़ाला चिकटले.. कडा चढून गडावर दाखल झाले.. हर हर महादेवच्या गर्जना उठल्या आणि त्या अंधाऱ्या रात्री सिंहगडावर एकच हलकल्लोळ झाला. प्रचंड मोठे रणकंदन झाले. पाचशे मावळे दीड हजार गनिमांना भिडले. तलवारीला तलवार भिडली. जणू विजेवर वीजच आदळली. वादळ वणवा पिसाटला.. उदयभान आणि तानाजी मालुसरे तर एकमेकांवर तुटून पडले.. घावावर घाव पडू लागले.. यातच रावांची ढाल तुटली, पण तरीही ते लढले. अखेर दोघेही धारातीर्थी कोसळले. नरवीर झाले. मराठय़ांचा सिंह गेला, पण गड आला! शिवबांच्या तानाजीने पूर्वीच ठेवलेले ‘सिंहगड’ हे नाव सार्थक केले!
सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. ‘इतिहास’ दिसण्यासाठी त्यात बुडावे लागते आणि ‘भूगोल’ सापडण्यासाठी त्यात हरवावे लागते. असे ज्याला जमते, त्याच्या डोळय़ांपुढे मग सतराव्या शतकातील ते रणकंदनही सहज नाचू लागते!


------------ लोकप्रभा 



Thursday, 9 August 2012

मस्त मटनाची मेजवानी!




असं म्हणतात की प्रत्येक दहा मैलावर भाषा बदलते, तसेच पदार्थ पण बदलतात. परिसरात मिळणाऱ्या गोष्टींचा प्रभाव प्रत्येक प्रदेशाच्या पदार्थावर दिसतो. कोकणात नारळ, काजूचा वापर तर देशावर सुकं खोबरं, कडधान्य, लाल मीरची! आता हेच बघा नं, एकच मटण, पण त्याचे प्रदेशाप्रमाणे प्रकार तरी किती.. अहो म्हणूनच अगदी नवाबापासून तर अगदी सामान्य माणसापर्यंत याचे सगळेच चाहते! या आठवडय़ात मटणाचे विविध प्रदेशातील त्या मातीचा गंध घेऊन आलेले प्रकार बनवायला हवेत की नाही..  
 

हिरव्या मसाल्याचं विदर्भी मटण!
 
 

साहित्य : 
मटण - वीथ बोन - अर्धा किलो. 

मसाल्याचं साहित्य : 
धणे - २ टीस्पून, जिरे - १ टीस्पून, काळी मिरी - १ टीस्पून, तेजपान - १, दालचिनी - १ तुकडा, वेलची हिरवी - ४-५, स्टार फूल - १, तीळ - २ टीस्पून, खसखस - ३ टीस्पून, सुकं खोबरं किसलेलं - ४-५ टीस्पून, लवंग - ७-८, हिरव्या मिरच्या - ५-६, कोथिंबीर - १ जुडी (धुऊन, देठासकट, मूळं कापून घ्या)
इतर साहित्य : तेल - ४-५ टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा -२ मध्यम आकाराचे, आलं लसूण पेस्ट - ३-४ टीस्पून, हळद - १ टीस्पून, मीठ- २-३ टीस्पून. 

कृती : 
मटण व्यवस्थित धुऊन त्याला मीठ, हळद, आलं, लसूण लावून ठेवून घ्या. साधारणपणे १ तास तरी असं मॅरिनेट करून ठेवा.
मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी मिरची व कोथिंबीर टाका व गॅस बंद करा. आता हा मसाला थंड पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत तेल गरम करावं, कांदा टाकून लाल होईपर्यंत परतून घ्या. आता मटण टाकून छान परतून घ्या. थोडं गरम पाणी टाकून मंद आचेवर मटण २०-२५ मिनिटे शिजवून घ्या. मग वाटलेला हिरवा मसाला टाका. आवश्यक असल्यास थोडं पाणी टाका व मटण व्यवस्थित शिजवून घ्या व गरमागरम भाकरीबरोबर सव्‍‌र्ह करा.
* वाटलेला हिरवा मसाला शक्यतो शेवटी टाका, म्हणजे जास्त काळा होणार नाही.
खोबरं किसायच्या आधी वरचा काळा भाग चाकूनं कापून घ्या, म्हणजे आपला मसाला जास्त काळा होणार नाही.

मँगलोरीयन मटण सुक्का!

 

साहित्य : 
मसाला :- बेडगी मिरची - ५-६, काश्मिरी मिरची -४, काळे मिरे - १ टी स्पून, जिरे पाव चमचा, धणे १ चमचा, चक्रफूल - १, दालचिनी  - १ (छोटा तुकडा), वेलची - ३, सुके खोबरे किसलेले - १ वाटी, लसूण - ३-४ पाकळ्या, आलं - १ छोटा तुकडा, बडिशेप अर्धा चमचा, खसखस - १ टी स्पून, मेथीचे दाणे - ४-५ दाणे, मटण - अर्धा किलो (बोनलेस)

मटण शिजवत असताना लागणारं साहित्य : 
आलं लसूण पेस्ट - २ टी स्पून, हळद १ टीस्पून, लाल मीरची - १ टी स्पून, मीठ आवश्यकतेनुसार.

कृती : 
मटण नीट धुऊन उकळत्या पाण्यात टाकून एका मिनिटानंतर गाळून घ्या व पाणी फेकून द्या व मटण पुन्हा धुऊन घ्या. आता मटणाला आलं, लसूण, हळद, लाल मिरची व मीठ लावून घ्या. साधारणपणे १ तास बाजूला ठेवून द्या. आता पाणी (१ लीटर) उकळायला ठेवा. आता एका भांडय़ात थोडं तेल टाकून, मटण थोडं तेलावर परतून घ्या व मग गरम पाणी टाकून मटण उकळत शिजवून घ्या. (साधारणपणे पाऊण तासात मटण शिजायला हवं. मटण शिजत असताना बाकीचा मसाला वगरे करून घ्या.)
मसाला करण्यासाठी मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या व मिक्सरमधून थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून, हा मसाला परतून घ्या व मग शिजलेलं मटण व मटणाचं पाणी टाकून छान शिजू द्या. मसाला सगळा मटणाला चिटकायला लागल्यानंतर गॅसवरून काढून ताबडतोब सव्‍‌र्ह करा. या प्रीपरेशनबरोबर आप्पम छान लागतात. भाकरीबरोबर पण छान लागत.
* मसाला मंद गॅसवरच भाजा, नाहीतर करपेल व मसाला कडू होईल.

हैदराबादी पथ्थर का गोश्त!
 
 

 ही एक हैदराबादी पद्धतीची रेसिपी आहे. खरं तर पारंपरिक पद्धत म्हटली तर कोळशावर जाड दगड ठेवून तो गरम करून त्यावर हे शिजवतात, पण आपण ही रेसिपी जाड तव्यावर करणार आहोत.

साहित्य : 
मटण (बोनलेस) बोटी - ३०० ग्रॅम, कच्च्या पपईची पेस्ट सोलून - २ टी स्पून, आलं लसूण पेस्ट -२ टी स्पून, बडिशेप पावडर- अर्धा चमचा, मीठ - चवीनुसार, जायफळ पावडर -  १ चिमूट, गरम मसाला - अर्धा टीस्पून, जिरा पावडर - अर्धा टीस्पून, धणे पावडर - अर्धा टीस्पून, मोहोरीचं तेल - २-३ टीस्पून, बांधलेलं घट्ट दही (हंगकर्ड)- अर्धी वाटी, काळं मीठ - १ टीस्पून, काळी मिरीपूड - चिमूटभर, लाल मिरची पेस्ट - १ टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर -२ टीस्पून, दगडफूल पावडर -१ चिमूट (असल्यास), खसखस बदाम पेस्ट (भिजवून केलेली) - ४-५ टीस्पून.

कृती : 
मटणाला हॅमरनं किंवा एखाद्या बत्त्यानं जरा मारून घ्या व चाकूनं टोच्या मारा. म्हणजे मसाला व्यवस्थित आत जाईल. मग वरील दिलेले सगळे साहित्य मटणाला लावून घ्या. सगळं मिक्स करून मटणाला ३-४ तास मॅरिनेट करून घ्या. आता तवा गरम करून मंद आचेवर थोडं तेल घालून, मटणाचे तुकडे अलगद एक एक घाला. झाकण लावून मंद आचेवर शिजवा.दोन्हीही बाजूनं उलटून पालटून शिजवून घ्या (झाकण लावून). साधारणपणे १० ते १५ मिनिटांत मटण शिजायला हवं. गरमागरम, पराठय़ाबरोबर किंवा नुसतंच सव्‍‌र्ह करा.
*
शक्यतो मटण कोवळं असलं पाहिजे जून नको. व्यवस्थित मॅरिनेट करा.


 ------------------  लोकसत्ता 



Thursday, 19 July 2012

परसातील बाग




वाढत्या जनसंख्येला राहायला उंच इमारतींशिवाय पर्याय नाही. पण, मग शहरात भाजीपाला पिकविता येणारच नाही का? याचे उत्तर क्युबा या देशाने शोधले आहे. क्युबाकडे साखर वगळता काहीच नव्हते म्हणून हा देश आयातीवर पूर्णपणे अवलंबून होता. १९९२ साली अमेरिकेने निर्बंध घातले. अशा वेळी देशाची स्थिती पूर्णपणे ढासळायला हवी होती. पण,त्यांनी यातून मार्ग काढला. खरं तर शहरी शेतीत क्रांती घडवली. हवाना शहरात उपलब्ध असलेली प्रत्येक जागा, जमिनीचा तुकडा, गच्ची, बाल्कनी, खिडकी, जिकडेतिकडे शेतीच शेती. जिथे जे शक्य असेल ते, कुठे धान्य, कुठे फळे तर कुठे भाज्या! काही ठिकाणी वैयक्तिक तर काही ठिकाणी सामाजिक. एवढी खाद्यपदार्थांची निर्मिती व्हायला लागली की अमेरिकेची गरजच भासली नाही. क्युबाचे बघून व्हेनेझुएला, पेरू या देशांतही अशा प्रकारची शेती सुरू झाली. भारतातही डॉ. जोशींनी मुंबईत तर राठीबाई नी यशस्वीपणे शहरी शेतीचा पाया घातला. आपल्याकडेदेखील आता शहरी शेती करण्याची गरज भासणार आहे. दुसरीकडे असे चित्र आहे की पूर्वीच्या शेतजमिनीवर नवीन वस्त्या येत आहेत. त्यामुळे कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी खते, कीटकनाशके, तणनाशके यांसारख्या रसायनांचा अमर्याद वापर होत आहे. परिणामी उत्पन्न वाढते, पण पर्यावरणाबरोबर आपल्या आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होतात. खरे पाहायला गेले तर आपणही अनेक ठिकाणी भाजीपाला लावू शकतो. सरकारी गृहसंस्थांच्या आवारात, गच्चीवर अगदी आपल्या खिडकीतदेखील! मी दहाव्या मजल्यावर खिडकीच्या लहानशा जागेत बरेच काही पिकविते. त्या माझ्या अनुभवातून हा लेख सादर करीत आहे. आपल्या उपलब्ध जागेत नेमके काय लावावे यासाठी जरासे नियोजन करावे लागेल. काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. भाजीपाल्याला सूर्यप्रकाशाची भरपूर गरज असते. दिवसातले चार पाच-तास तरी त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडायलाच हवा. नाहीतर झाडांची वाढ चांगली होत नाही. झाडे लांबलचक वाढतात, पण त्यांच्यात जोर नसतो. झाडांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दुसरी बाब म्हणजे झाडे कशात लावावी? कुंड्याच विकत आणायला पाहिजेत असे बिलकूल नाही. आपण वस्तूंचा पुनर्वापर करून त्याचा कुंड्या म्हणून वापर करू शकतो. जुने डबे, मोठ्या बरण्या, प्लास्टिकच्या बादल्या याचा वापर करू शकतो. याची उंची किमान १२ इंच आणि व्यास १२ इंच असावा. झाडाच्या फुला-फळांच्या वाढीसाठी पुरेसे अन्नद्रव्य पुरवता यावे. निवळ खत-माती वापरून बाग करता येतेच, पण घरातला ओला कचरा वापरून भाजीपाल्याची जी पद्धत मी वापरते ती अशी- निवडलेल्या कुंडीला /भांड्याला खाली मोठे छिद्र पाडावे. त्यातून पाण्याचा निचरा होतो. १) छिद्रावर छोटी चपटी कपची ठेवावी. ज्यातून पाणी तर वाहून जाईल. पण माती वाहणार नाही. २) त्यावर विटांच्या तुकड्यांचा एक थर. ३) त्यावर घरातला ओला घन कचरा,भाजीची देठे, फळांची साले, चहा पावडर वगैरे. (उरलेले अन्न शक्यतो घालू नये.) ४) हा थर चार-पाच इंचाचा झाला की त्यावर कोरड्या मातीचा पातळ थर घालावा. ह्यामुळे कच-यातले पाणी/ओल खेचली जाते. कुंडीच्या उंचीनुसार असे दोन-तीन थर करता येतील. शेवटचा थर घालून त्यावर कोरडी माती अंथरून कुंडी तशीच ठेवून दिल्यास दोन दिवसांनी कचरा कुजवला असता त्यातून वासही येत नाही. थर खाली बसतात. त्यामुळे कुंडीच्या वरच्या भागात जागा तयार होईल. यात आणखी खत-माती घालून बिया पेरता येतील. मोठ्या प्रमाणात कुंड्या भरायच्या असल्यास पालापाचोळा, रसवंतीगृहातला उसाचा चोथा खालच्या थरांमध्ये घालता येईल. कुजण्याजोगा कोणताही कचरा वापरता येतो. निव्वळ कचरा वेगळा कुजवूनही त्याचे खत बनविता येते. त्याची कृती... मोठी बादली किंवा प्लास्टिकचे पिंप घ्यावे. त्याला १ सें.मी. व्यासाची ५,६ छिद्रे पाडावीत. तसेच छिद्र झाकणालाही पाडावे. झाकणाखाली जाळी ठेवावी. खालचा थर विटांच्या तुकड्यांनी भरावा व त्यावर ओलं शेण किंवा गांडूळ खत घालावे. (काही लोक यात वडाच्या झाडाखालची मातीदेखील घालतात.) मग यात रोजचा स्वयंपाक, घरातला कचरा घालावा. कोंबू नये. कचरा हवेशीर राहिला पाहिजे. ढीग व्हायला नको. कचरा कुजवताना हवा खेळती राहिली तर कधीच वास येत नाही. आपल्या कच-यात जवळजवळ ७० टक्के ओलावा असल्यामुळे बादली भरायला खूप दिवस लागतात. खालच्या खाली खत तयार होत असते. कशा लावाव्या . मग प्रश्न येतो,कोणत्या भाज्या लावाव्यात? स्वयंपाकघरात रोज लागणा-या वस्तू म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, गवती चहा तर असावाच. पालेभाज्या लावायला कमी जागा लागते आणि महिनाभरात त्या खुडायला तयार होतात. उत्पन्न लगेच मिळाल्याने आपला उत्साह टिकून राहतो. मेथी, पालक, कोथिंबीर, लाल माठ, शेपू या भाज्या लावणे खूपच सोपे आहे. हल्ली नवीन प्रकारचे वाण आले आहेत. जे एकदा पेरले की दोन-तीन वेळा खुडून जुड्या काढता येतात. मायाळूचा वेल लावल्यास त्याचे कोवळे कोंब आणि पाल्याचा वापर वर्षभर करता येतो. मुळासुद्धा लवकरच तयार होतो. भेंडी, वांगी, भोपळी मिरची, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या लावायला अवघड नाही, पण त्यातून उत्पन्न काढायचे असेल तर ब-याच कुंड्या लागतील. वेल वाढवायला जागा असल्यास तोंडलीचा वेल लावावा. तो अनेक वर्षे भरघोस उत्पन्न देतो. भाजीपाल्याच्या बियांची पाकिटे नर्सरीमध्ये मिळतात. खरं तर आपल्या घरातच कितीतरी बिया सापडतील. धणे(कोथिंबीर), मेथी बाळंतशेपा(शेपू), लाल मिरची, चवळी, मोहरी, (सरसोंका साग) पिकलेल्या कारल्यातल्या बिया, पुदिनाच्या जुडीतल्या ४, ५ काड्या कुंडीत खोचून ठेवल्या तर बघता बघता कुंडीभर पुदिना तयार करता येईल. काही भाज्यांची रोपे तयार करावी लागतात. उदा-टोमॅटो, मिरची, वांगी यांच्या बिया पहिल्यांदा पेरून त्यांची रोपे तीन ते चार पाने आल्यावर अलगद उपटून एका कुंडीत दोनच रोपे लावावीत. रोपांची गर्दी झाली तर झाडांची वाढ नीट होणार नाही. नर्सरीत उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांपैकी सुफला किंवा संपूर्णा हे मिश्रखत पंधरा दिवसांतून एकदा अगदी कमी प्रमाणात दिल्यास झाडांची वाढ चांगली होते. पाणी घालताना पाणी खाली वाहून जाऊ देऊ नये. एक तर खाली राहणा-यांना त्याचा त्रास होतो आणि दुसरे, मातीतील अन्नद्रव्ये वाहून जातात. सुरुवातीला रोपांची पाण्याची गरज कमी असते. पण कुंडीत कधीही पाणी साचू देऊ नये. त्यामुळे मुळे कुजतात. मुळांमध्ये हवा खेळती असावी. भाजीच्या रोपावर कीड लागल्यास त्यांचं संरक्षण करण्यासाठी विकतची विषारी औषधे न फवारता घरगुतीच कडुलिंबाचे तेल, गोमूत्र, (हे औषधांच्या दुकानातही मिळते) हे वापरावे.

फलभाज्या, पालेभाज्या ताज्या आणि स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले. तुमच्या छोट्याश्या अंगणातून तुम्हाला रोज लागणाऱ्या भाज्या ताज्या आणि स्वस्तात सहज मिळवता येतील.
बाग म्हटली म्हणजे ती लहान असो, मोठी असो, त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बागेची आवड नसणारे क्वचितच सापडतात. छोटेसे घरकुल त्याभोवती बाग असली की घराला काही वेगळेच स्वरूप येते. आवड आहे. पण जागा नाही आणि जागा आहे पण आवड नाही. असे खूप ठिकाणी आढळते. बागेची आवड असणारे मात्र डबे, बाटल्या, कुंड्यातून हे परमेश्वरांचे रूप जगवण्याचा प्रयत्न करतात. माणसांप्रमाणे झाडांतही जीव आहे. आपण झाडांवर प्रेम केल्यास ते त्याचा पुरेपूर मोबदला देते. या विषयांवर लिहावयाचे म्हटले तर खूप आहे. पण आपण नियमीत लागणाऱ्या भाज्यांचा विचार करू ऋतुमानानुसार बागेतील लागडीतही बदल करावा लागतो. हिवाळ्यात कोबी, फ्लॉवर, नवलकोल, मुळा, गाजर, टोमेटो यासारख्या भाज्या लावतात. पावसाळ्यात दोडकी, पडवळ, घोसाळी, काकडी, श्रावणघेवडा, पापडी, गवार, भेंडी, वांगी, इत्यादी तर उन्हाळ्यात भेंडी, गवार, श्रावणघेवडा, कलिंगड, इत्यादी भाज्या काढता येतात.
बागेची आणखी माहिती
दिवसातून एकदातरी झाडांजवळ जाऊन त्यांची मुलांप्रमाणे नीट देखभाल करावी. बाग म्हटली कि आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने जमीन, भाज्यांचे प्रकार, सुशोभन, जमिनीचे क्षेत्रफळ आणी स्वतःला असलेली बागेची आवड ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच नंतर बागेची व्यवस्थित आखणी करावी. जमीन कशी आहे, ह्यावर झाडाचे आयुष्य अवलंबून असते. जमीन मुरमाड, चिकट, चुनखडीची -कशी आहे ते पाहावे. जमीन दोनचार वेळा चांगली खणून घ्यावी. त्यातील दगड वेचून काढावे. नंतर शेणखत, नीमपेंड टाकून जमीन चांगली खुरसावी व सगळीकडे सपाट करावी. जमीनीत कोठेही खाचखळगा राहू देऊ नये. बागेत स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रथम थोडे खर्चाचे होते. परंतु नंतर मात्र ते फायद्याचे ठरते.
झाडांची निवड 
 झाडांची आखणी घरांच्या पुढील भागात शक्यतो फुलझाडे सीझन फ्लॉवर्स लावावी. मोगरा, जास्वंद, तगर, कर्दळ, शेवंती वगैरे, कारण यांची निगा फार राखावी लागत नाही. या प्रकारातील फुले देवाला चालणारी आहेत. या झाडांना पाणी रोज द्यावे लागत नाही. औषध मारावे लागत नाही. आठ पंधरा दिवसांनी मात्र झाडांची आळी खुरपावी. त्यात थोडासा युरिया घालावा. झाड वाढतांना एक गोष्ट मात्र जरूर लक्षात ठेवावी. झाड कोठेही, कसेही वाढते. तेव्हा त्याला आकार देऊन ते व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे आहे. झाडाला आकार देणे हे फुलझाडे, फळझाडे, सर्वांना लागू आहे. एकदा फुले किंवा फळे येऊन गेलेली फांदी निकामी होते. ती जर छाटली तर त्याला नवीन फुटी येतात आणि फुलाफळांचा बहर हा दुप्पट वाढतो. काही जर छाटली नाही तर ती खुरडीच राहाते.
कोणत्या भाज्या लावणे सोयीचे ?
एका कुटुंबाला वांगी, मिरच्या कढीलिंब, कोथिंबीर, आळू, टोमॅटो, लिंबू, पालेभाज्या इत्यादी भाज्यांची आवश्यकता असते. छोट्या कुटुंबाला चार ते सहा, वाग्यांची व मिरच्यांची झाडे, एक कढीलिंबाचे, एक लिंबाचे, एक दोन केळीची, केळीच्या खाली अळूची झाडे असल्यास  पुरेशी होतात. वांच्याच्या झाडाभोवतीच्या आळ्यावर कोथिंबीर, मेथी किंवा मुळा ह्यांसारख्या पालेभाज्या घ्याव्यात. चने व मेथी दर आठवड्याला टाकली तर नियमित पणे मिळते. मिरची व वांगी यांची झाडे वर्षभर टिकणारी आहेत त्यामुळे त्यांच्या आळ्यांवर पालेबाजी होऊ शकते. ह्या झाडांवरील पीक निघून गेल्यावर त्या झाडांना छाटून टाकावे. थोडेसे खत घालावे. म्हणजे नवीन बहर येतो. लिंबाचे झाड थोडे मोठे होते. त्यामुळे जागा असली तर ते लावावे कढीलिंब कुंडीतही होऊ शकतो. भोपळा व वेलभाज्या हे घरावर, गॅलीवर चढवून त्याचे पीक घेता येते. तोंडली कंपाऊंडच्या तारेवरही होऊ शकतात. अर्थात हे मात्र शेजाऱ्यावर अवलंबून आहे.

स्वकष्टाच्या भाजीची चव आगळीच
हे सर्व कागदावर लिहिणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष करताना मात्र थोडे अवघड आहे. थोडे समजू लागले की मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. एकदा स्वतःच्या बागेतील भाजी खावयाची सवय झाली की मग बाजारातील भाजी शिळी, जून असे उद्गार तोंडावाटे नकळत बाहेर पडतात हे सर्व करताना लागणारे कष्ट, खत, बियाणे, मिळणारे उत्पन्न ह्याचा विचार करावा. भाजी विकत आणली असे समजून त्याचे पैसे पेटीत टाकावे. म्हणजे त्यापैशातच झाडांसाठी लागणारे कत, औषधे यांचा खर्च पुरा होतो की नाही, हे कळून येते. घरात निघणारा भाजीचा कचरा, उष्टे खरकटे, पालापाचोळा हा वाया न घालवता तो ३ बाय ३ बाय ३ फूटांचा खड्डा करून त्यात टाकावा. ह्याचे सुंदर कंपोष्ट खत तयार होते. त्यामुळे आपल्यला कचरा लांबवर न्यावा लागत नाही. व घाणही येत नाही. ह्यासाठी घरामागील कोणताही कोपरा निवडला तरी चालेल.
गवार, भेंडी, श्रावणघेवडा अशा भाज्याचे बियाणे जागेवरच लावावे. वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी फ्लॉवर अशा भाज्यांची रोपे गादी वाफ्यात करावी. ही रोपे तयार होईपर्यंत जागा मशागत करून, खत टाकून तयार ठेवावी रोपे तयार होण्यास साधारणपणे ३० दिवस लागतात. वेलीभाज्या लावल्यानंतर त्या एक महिन्यात मांड्यावर जातात. भाज्यांची रोपे किंवा बिया लावल्यानंतर १५ दिवसांनी त्याला तीन बोटात राहील एवढा युरिया, झाडाभोवती चार बोटांचे अंतर ठेवून, सर्कल करून टाकावा म्हणजे झाडाची वाढ लवकर होते. नंतर १५ दिवसांनी थोडे मिश्र खत संपूर्णावरील पद्धतीनेच एक टेबलस्पून घालणे. थोडे दिवसांणी परत झाडाची खुरपणी करून हा वरखताचा डोस द्यावा. नंतर मात्र खत घालू नये. झाडे लावण्यापूर्वी जमीनीत शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळावे. वरखतांमध्ये सुफला. संपूर्णा पोटॅश किंवा युरिया यासारखी खते येतात.
औषधे वापरल्यास नियमित दोन औषधांचा वापर करावा. औषध दर आठवड्याला नियमितपणे मारावे. ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे शेणीची राख भुरभुरावी, तंबाखूचे पाणी , गोमूत्र ह्याचा पंपाने स्प्रे करावा. म्हणजे औषधापासून होणारा त्रास वाचेल. परंतु जर अगदीच इलाज चालला नाही तर मात्र रोगोर किंवा मॅलेथीऑन वापरावे किंवा कोरडे गंधक वापरावे. सध्याच्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या भाज्या अतिशय महाग तर असतातच शिवाय त्या शिळ्या सडक्या, जूनही असतात. ताज्या भाज्या मिळणं हा एक आनंद आहे आणि ताज्या भाज्या खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यकही अहे. तेव्हा आपल्या छोट्याशा परसात चारदोन प्रकारच्या भाज्या लावल्यात तर हा आनंद आणि आरोग्य तुम्हाला निश्चितच मिळत राहील.


------------- दैनिक एकमत 


Tuesday, 26 June 2012

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज.





आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जम झाला. त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता. तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र. असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता. शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.
शिवारायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले. स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले. औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत. कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत. इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता. अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार दि. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव घाटगे यांचे  "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले. त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं. 

राजकारण
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.


 समाजकार्य
८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.
राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.  



‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.



‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.
करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता.  

खासबाग कुस्तीचे मैदान म्हटले की साहजिकच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आठवण येणे क्रमप्राप्त. त्यानीच या मैदानाची स्थापना केली होती. ते स्वतः अगदी लहानपणापासून निष्णात असे कुस्तीगीर होते. त्यांच्या काळात (जवळपास २६-२७ वर्षाचा काळ होता) महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी हा सुवर्णकाळ होता. कोल्हापूरच नव्हे तर सार्‍या राज्यात कुस्तीगिरांच्या तालमींचा हा उत्कर्षाचा काळ होता. त्यानी हिंदुस्थानातील कोल्हापुरात कुस्तीसाठी निमंत्रित केले. काहीजणांना वाड्यावर आणि गावात कायमचा आश्रयही दिला. पैलवानांच्या आहारासाठी [पैलवानी भाषेत 'खुराक'] महाराजांनी लाखो रुपयांची अनुदाने दिली होती. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला.

अशा थोर जाणता राजास मानाचा मुजरा.

-------------------- लोकसत्ता

लज्जतदार मालवणी




आज जनसामान्यांमध्ये मालवणी जेवण आवडणाऱ्यांची  संख्या वाढत आहे. मांसाहारी जेवणाचा बेत असला की, बरेचदा मालवणी खाद्यपदार्थाचा शोध घेतला जातो. बाहेरगावी जाताना रस्त्यांवरील धाब्यांवरदेखील ‘येथे मालवणी जेवण मिळेल’ अशा पाटय़ा सर्रास दिसू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं गाव मालवण. मालवणी लोकांचं बोलणं थोडं तिरकस, हेल काढून असलं, तरी राहणं आणि खाणंपिणं मात्र अगदी निखळ स्वच्छंद! गरीबातला गरीब मालवणी माणूससुद्धा खाण्यापिण्यात काटकसर करताना दिसणार नाही. मग तो मुंबईसारख्या शहरात राहणारा चाकरमानी असो की, वडिलोपार्जित स्थावर सांभाळणारा गावकरी असो.
मालवणी जेवणाची लज्जत नारीच! गावाकडे आजही सकाळची न्याहारी उकडय़ा तांदळाची पेज आणि त्याबरोबर तोंडी लावायला वाळवून तळलेल्या ताकातल्या सुक्या मिरच्यांनी होते. मालवण
समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे भात व मासे हाच मुख्य आहार. वार पाळणारे मालवणी बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी शाकाहाराकडे पूर्णत: पाठ फिरवतात.
मालवणी कोंबडी-वडे किंवा वडे सागुती सुप्रसिद्धीच! एका कोंबडीला एक नारळ, वाटल्यास थोडं सुकं खोबरं असं साधं -सोपं प्रमाण. कढईत थोडय़ा तेलावर कांदा व खोबरं खरपूस भाजून त्याचं वाटण कोंबडीला लावलं जातं, पण खरी चव मालवणी मसाल्याचीच. बेडगी, संकेश्वरी सुकी मिरची, धणे, लवंग, मिरी, जायफळ, तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी, बडीशेप, खसखस, मसाला वेलची योग्य प्रमाणात घालून
वर्षभराचा मालवणी मसाला केला जातो. भाजक्या वाटपाचे सर्व प्रकार साधारणत: एकाच पद्धतीने केले जातात. मग ते बकऱ्याचं मटण असो वा कुल्र्याचं कालवण; कोलंबी बटाटा रस्सा असो की मोरीचं (मुशी) थपथपीत असो. अगदी मासे नाही मिळाले तर अंडय़ांची आमटीदेखील त्याच पद्धतीने केली जाते.
मालवणी पद्धतीने केलेल्या माशांच्या आमटीत थोडासा कांदा, थोडीशी चिंच, बेडगी मिरच्या, धने सर्व जिन्नस एकत्र वाटून घातले जाते. वाटण अगदी बारीक वाटलं जातं. अगदी सहाणेवर उगाळलेलं गंध. पूर्वी पाटय़ावरवंटय़ाच्या जमान्यात त्याची लज्जत औरच होती. 
मिरचीचा रंग मात्र लालच असायला हवा. तसेच काळी पडलेली चिंच बादच केली जाते. कारण त्यामुळे आमटीचा रंग बदलतो. यावरून एक गोष्ट दिसून येते की, चवीबरोबर रंगालाही मालवणी गृहिणी महत्त्व देते. या मसाल्यात मग पापलेट, सुरमई, हलवा, बांगडे, मांदेली, मुडदुशे, कोलंबी, भिंगी तत्सम अन्य माशांची आमटी केली जाते. वाटण तेच पण प्रत्येक माशाप्रमाणे त्याची चवही वेगळी. लसणीचा उपयोगही थोडय़ाफार प्रमाणात आवडीप्रमाणे केला जातो. कधी कधी तेच वाटप कमी पाणी घालून छोटे बांगडे, पेडवे, तारली, मोदकं यांसारख्या माशांना लावून त्याचं सुकं किंवा तिखलं केलं जातं. त्यात तिरफळं घातली की एक वेगळाच स्वाद निर्माण होतो. आणि जर ते मातीच्या सोरकुलात (पसरट भांडय़ात) चुलीवर शिजवलं असेल तर अप्रतिमच! कधी कधी शेवग्याच्या शेंगा, कैरी वगैरे घालून कोलंबीची किंवा शिंपल्यांची मासं काढूनही अशा प्रकारे लाल आमटी केली जाते.
मालवणच्या किनाऱ्यावर भरपूर बांगडे सापडतात. त्यामुळे ताजे बांगडे तर स्वस्त मिळतातच, पण सुक्या बांगडय़ांचाही वर्षभरासाठी साठा केला जातो. सुकी मिरची, चिंच, ओलं खोबरं व थोडं मीठ घालून जाडसर चटणी वाटली जाते. सुका बांगडा चुलीवर किंवा गॅसवर दोन्ही बाजूने भाजला जातो. त्याच्यावरचा जळका भाग काढून आतलं मांस चटणीत घातलं जातं. गरम गरम भाकरी आणि बांगडय़ांची चटणी किंवा गरम गरम कुळथाची पिठी (पिठलं) भात आणि बांगडय़ांची चटणी खाण्यात काय स्वर्गीय सुख आहे, ते मालवणी माणसालाच 
विचारा. त्या बांगडय़ाप्रमाणेच सुका जवळा, सुकी टेंगळी घालूनही चटणी करता येते. पावसाळ्यात सुक्या बाजाराने दुधाची तहान ताकावर भागवली जाते.
हळदीच्या किंवा केळीच्या पानात मसाला लावलेले बांगडे चुलीच्या निखाऱ्यावर भाजून फारच चविष्ट लागतात. माखले, शिवडं, कालवं, गुले ही वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळतात. कधी कधी भरल्या वांग्याबरोबर किंवा सुरण, दुधी वा कच्च्या पपईबरोबर सुका- ओला जवळा घालून भाजी केली जाते.
मालवणी पाककृतीनुसार मिरचीपूड, हळद, चिंच किंवा कोकमाचा रस व मीठ लावून मासे अर्धा तास ठेवून मग तांदळाचं पीठ लावून तेलात
कुरकुरीत तळले जातात. भिंगीची किंवा करलीची गाबोळीदेखील थोडी वाफवून घेऊन तिचे तुकडे करून अशाच प्रकारे तळली जाते. माशाच्या आमटीबरोबर एखादी कांदा, खोबरं घातलेली सुकी पालेभाजी, तसंच सोलकढी! सोलकढीशिवाय मालवणी माणसांचा मांसाहार पूर्ण होत नाही. लसणाची एखाददुसरी पाकळी ओल्या खोबऱ्याबरोबर वाटून त्याचा रस काढतात. त्यात एखादी ओली मिरची, मीठ व सोल म्हणजे कोकम टाकून सोलकढी केली जाते. तीदेखील गुलाबी दिसली पाहिजे. शेवटचा भात सोलकढीबरोबरच खायचा. नंतर एक वाटी सोलकढी प्यायली की मन एवढं तृप्त होतं की, ‘उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म’ म्हणजे काय याची जाणीव होते.
मालवणी भोजन म्हणजे फक्त मांसाहार हे समीकरण तसं चुकीचंच आहे. कारण मालवणी शाकाहारदेखील तेवढाच समृद्ध आहे. काळ्या 
वाटाण्याचं सांबारं, आंबोळ्या, घावणे मालवणी जेवणातील अविभाज्य घटक आहेत. काळ्या वाटाण्याचं सांबारं आणि तांदळाचे वडे, रव्याची लापशी किंवा तांदळाची खीर जसे लग्नकार्यात करावेच लागतात, तसेच श्राद्धकर्माच्या वेळीही तितकेच आवश्यक असतात. खापरोळी, भोपळ्याचे वडे, नरयेलाची भाकरी, मालपोआ हे पदार्थ प्रसंगानुसार केले जातात. नागपंचमीच्या सणाला हळदीच्या पानात बनवलेले पातोळे, नारळाच्या रसात गूळ-वेलची घालून त्याबरोबर खाल्लेल्या तांदळाच्या किंवा नाचणीच्या शेवया, काकडीचं धोंडस, उकडीचे मोदक, अळूवडय़ा, मूगडाळीचं कढण, कारळ्याची चटणी, ओल्या नारळाच्या पुरणाच्या करंज्या यांची सणासुदीला वर्णी लागतेच.
चुनाची कापं (खोबऱ्याच्या वडय़ा), शेंगदाण्याचे खडखडे लाडू, शेवाचे लाडू, खाजं ही भेट कोकणातून आलेल्यांकडून येतेच. मुगाचे, चण्याचे किंवा उकडय़ा तांदळाचे लाडू ही मालवणी लोकांची खासियतच असते. मोसमाप्रमाणे रतांब्याचं (कोकम फळाचं) सरबत, रायवळ आंब्याचं रायतं, कैरीचं लोणचं, विलायती फणसाची कापं किंवा भाजी, लाल भोपळ्याचे वडे, अळूच्या गाठीची भाजी, भरलेल्या मिरच्या, मायाळूच्या पानांची भजी, सुरणाच्या काचऱ्या केल्या जातात. सातपानी भेंडय़ांची आमटी व गोळ्यांची, टोमॅटोची आमटी माशाच्या आमटीच्या मसाल्यात केली जाते. प्रत्येक मालवणी घरात बिडाच्या तव्याबरोबर आप्पेपात्रही असतेच. भरपूर काजू व शेंगदाणे घालून गोडाचे तसेच तिखटाचेही आप्पे सणासुदीला केले जातात.
मोड आलेल्या मुगाची, कुळथाची, वालाची, चवळीची आमटीदेखील मटणाच्या मसाल्यात केली जाते. ओल्या काजूची उसळ जो खाईल त्याच्या हाताचा वास जाणार नाही, हे निश्चितच. फणसाच्या घोटय़ा (बिया) घालून केलेली टाकळ्याची भाजी, उडदाचं डांगर, वांग्याचं भरीत, कच्च्या फणसाची भाजी इतकंच काय शेवग्याच्या शेंगाचं चण्याच्या डाळीचं पिठलंही सुरेखच!
नुसती कांदा-मिरची घातलेली वालीची भाजी असो की मसालेदार भरली वांगी, जिरं, खोबरं वाटून लावलेलं तुरीच्या डाळीचं वरण असो. मुळ्याची पीठ भरलेली भाजी असो की परतलेल्या अळंब्या; सारं काही जिभेचे चोचले पुरविणारं!  मुगाच्या डाळीची साधी किंवा तिखट खिचडीदेखील  भूक शमवते, मनाला तृप्ती देते. खिचडीबरोबर ताकाची कढी असेल आणि एखादा तळलेला उडदाचा पापड तर मजा काही औरच!
अशा प्रकारे वैविध्यपूर्ण मालवणी जेवणावर कोणीही फिदा होईल. मालवणी माणसापुढे तुम्ही पंजाबी, मोगलाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, थाई, देशी-विदेशी खाद्यपदार्थाची जत्रा मांडा; तो आनंदाने ते भोजन चाखेल, पण घरी आल्यावर स्वयंपाकघरात जाऊन आईने  किंवा बायकोने आज काय जेवण केलं होतं, त्यातलं काही उरलय का, याची निश्चितच चौकशी करेल!

------------लोकप्रभा




ईर्जिक - सहकारातून प्रगती



एक आटपाट नगर नव्हत.... साध सुध गाव होत.
आटपाट नगरातील राजवाडा नव्हता, राजा नव्हता अन त्याच्या दोन राण्या पण नव्हत्या.ना आवडती ... ना नावड्ती !
तिथे हो्त एक चन्द्रमौळी टुमदार कौलारू घर. शेताच्या बांधाला लागून.
लोक त्याला "धर्माची वस्त्ती " म्हणत !
त्या घराचा राजा होता धर्मवीर. लोक त्याला "धर्मा" म्हणत.
त्याची एकच आवडती राणी होती. नाव तिच द्रोपदी. लोक तिला "धुर्पा" म्हणत.

या राजा-राणीच्या घराच्या तुटक्या-फुटक्या कौलातून चन्द्रोदय झालेवर चंद्राचे चांदणे घरभर विखुरतात. म्हणून हे चन्द्रमौळी घर. तुम्ही याला फाटके-तुटके म्हणू शकता. मी मात्र चन्द्रमौळीच म्हणाणार! वचने किं दारिद्र? शिवाय खर्‍या चन्द्रमौळी घरा मध्ये राहणारॆ तथा-कथित सुखवस्तु लोक, धर्मा-धुर्पा पेक्षा जास्ती सुखी नव्हते. आई अंबाबाईच्या आशिर्वादनं धर्माच्या घरात दोन पोरं बागडत होती.थोरली "रक्मा" अन धाकला "शिवा". गोठ्यात धर्मानं लहानपणा पासून वाढिवलेली खिलारी जोडी अन धुर्पाच्या माहेरा कडून आलेली आंदन-गाय झुलत व्हती.

आता तुम्ही म्हनाल कि ही "आंदन-गाय" काय़ भानगड हाये ?
तर बगा, आम्च्या टायमाला नां , सासुरवाशिण बाई सासरला जाउदे न्हायतर म्हायाराला जाउदे , ती कदीपन मोकळ्या हातान जात नव्हती. तिच्या बरोबर बुत्तीची दुर्डी आन जोंधळ्याच पोतं न्हायतर कडधान्याचं गठुड असनारच. सासुरवाशिण घरला पोचल्यावर दुर्डी खाली होई पवस्तर बुत्ती गांवभर वाटली जायाची. सासुरवाशिण म्हायाराला आल्याची बातमी गावभर पसरायची अन पोरीच्या मैतरनी भरा-भरा गोळा व्हयाच्या.

आता तुम्ही म्हनाल कि ही "बुत्ती" काय़ भानगड हाये ?

बुत्ती म्हंजी साबुती, एक लहान आकाराची सारण भरलेली गोड पोळी. ही बुत्ती गावभर वाटून, सर्वांचे तोंड गोड करून, सर्वांना सासुरवाशिण घरी आल्याच्या आनंदात सहभागी करून घेणारा पदार्थ.
धुर्पा लगीन झाल्यावर पहिल्यांदा म्हायाराला आली. मैतरनीच्या घोळक्यात चारदिस कसं गेल कळलंपन न्हाय.सासरी जायाचा दिस उजाडला अन सर्व्यांच्या डोळ्यात दाटून आल. धुर्पाचा भाउ मुराळी म्हुन जायच ठरलं. त्यान बैलगाडी जोडली. बां न जोंधळ्याच पोतं गाडीत चढीवल.बुत्तीची दुर्डी पांढर्‍या धोतराच्या तुकड्यात बांधून गाडीत ठेवली गेली. धुर्पाच्या आईने तिची खणानारळान ओटी भरून जड अंत:करणान गाडीत बसवलं. बैलाच्या पठीवर थाप पडनार तेवढ्यात धुर्पाच्या बां न आवाज दिला " ए पोरा, जरा थांब !". धुर्पाचा बां बिगीनं गोठ्यात गेला. धुर्पाची लाड्की गाय "तुळसा" चा कासरा सोडला अन गाडी माग बांधून दिला. आंदन म्हनुन . तस बगितल तर धुर्पाच्या आई-बापान लग्नातल्या रुकवतात आंदन म्हनुन मोप भांडी-कुंडी दिली व्हती. पर धुर्पाचा बां लय दूरदर्शी. त्यो रुकवतात आंदन म्हनुन गाय पन देची म्हनत व्हता. भांडी-कुंडी काय निर्जीव वस्तु. पर धुर्पाची लाड्की तुळसा पोरीबर धाड्ली तर तिला सासरी एकटं-एकटं वाटायच नांय. वाट्ल कि माझ्या म्हायाराची जिती-जागती सखी हायं सोबतीला. उद्या आई अंबाबायच्या कुर्पेन घरात चार नातवंड खेळत्यालं. त्यासनी प्वाटभर दुध-दुबत मिळलं. म्हनुन काय रुकवतात गायं? ईक्रितच झाल ! . धुर्पाच्या आईला काय हे पटाना ! ती भर मांडवात धुर्पाच्या बां वर डाफरली ...

" काय यड का खुळं म्हनावं ? रुकवतात कुनी गायं बसिवत्यात व्हयं? पुन्यांदा म्हायाराला ईल तवा द्या काय ती."

त्यो दिस आज उजाडला. धुर्पा बरुबर आज तुळसा पन नांदाया निघाली व्हती. "आंदन " म्हनून!. धुर्पा आन तुळसा सांच्याला सासरी पोचली तवा तुळसाला बगुन धर्मानी सासर्‍याच्या मनातली कालवाकालव बरुबर हेरली.त्यानी दावनीच्या ईतर जनावरा सारखी तुळसाला पर माया लावली. वैरण तोडल्यावर पैली पेंडी तुळसच्या गव्हानित पडायची. रोज वड्यावर न्हिउन खरारा करायचा, बेलफळ लाउन घासुन आंघोळ घालायचा.
शब्दाविना एकमेकाच्या मनातील भावना जाणून त्याला स्वत:च्या आचरणानी प्रतिसाद देण ही फार थोर कला आहे, तिला परिपक्वतेची खोली आहे, दोन व्यक्ती मध्ये द्रुढ नांत निर्माण करण्याची क्षमता आहे मात्र शब्दांचा उथळ्पणा बिलकुल नाही.
धुर्पाच्या बां चा "आंदन-गाय" पाठविण्या मागचा हेतू पूर्णपणे सफल झाला होता. तिच्या दुधावर दोन नातवंड पोसली होती.
तर ही अशी हाय बगा "आंदन-गाय" ची भानगड!.


बोंबलां ! घडाभर तेल नमनालाच खर्ची झाल की ! आपुन कुठ व्हतो आन कुठल्या कुठ भरकटलो तुळसाच शेपुट धरुन!

तर मी काय सांगत होतो की, त्या चन्द्रमौळी घरातल्या राजा-राणीचा संसार लेकरा-बाळा सकिट आन गोठ्यातल्या गाय-म्हशी सकिट मजेत चालला व्हता. बाप-जाद्याची ईस बिगा जमीन हुती. धुर्पा तिचा उल्लेख "काळीमाय" म्हनून करायची. वैशाखाचा वनवा थंड झाला व्हता. जेष्टी पुनव पन उलटून गेली व्हती. म्हातार्‍याच्या आजारपनानं धर्माला पुरा घेरला व्हता. अजुन बिगाभर जमीन पर नांगरून झाली नव्हती. हां हां म्हंता आकाडातल पैल नक्षत्र फुटंल. धर्माला काय कराव काय सुचना झालं. आजच्याला जरी नांगर धरला तरीबी एका नांगरावर हापत्याभरात ईस बिग जमीन कशी काय नांगरून व्हनार? धर्मा शेताच्या बांधावर डोक्याला हाथ लाउन बसला व्हता. पांदीवरन गुरवाच्या म्हाद्य़ाला जाताना बगुन धर्माच्या डोक्यातला तिडा सुट्ला. त्याला एक दिसात आख्खी ईसबिगा जमीन नांगरायची चावी सापडली. धर्मान बसल्या जागवरनं साद घाताली......

" ए ~~ म्हादा ! हाकड ये जरा ! "
म्हादा येउन बांधावर धर्माच्या शेजारी टेकत बोलताझाला...
" कांय धर्मा ! काळजीत दिसतुयास जनुं ! आं ! काय झालं ?"
" त्यच काय हाय म्हादा, म्हातार्‍याच्या दुखण्यापायी आवंदा जमीनीची नांगरट आज पतुर झाली नाय बग ! आता पावसाच्या आगुदर सगळी मशागत उरकायची तर मला ईर्जिकी
शिवाय दुसरा कुटलाच रस्ता दिसत नांय !"
" आरं मग घाल कि ईर्जिक मर्दा ! च्या मायला, एका दिसात आख्ख शिवार उखडुन टाकुया ! दिउ का समध्यासनी उध्याच आवातनं ! बोल !"
घटकाभर डोकं खाजऊन धर्मानं निर्णय घेतला.....
"व्हयं ! त्याच्या बिगर दुसरा कायबि ईलाज नाय ! दे उद्याचं आवातनं सर्व्यासनी !"
"ठरल तर मग ! आत्ताच जाउन सांगतो सर्व्यासनी ! तुमी लागा तयारीला "
म्हादा उठून रस्ता धरणार तेवढ्यात धुर्पानं दरवाज्यातनं हाळी दिली...
" ओ~~ भावजी ! कुट निगालासा लगी ? मी च्या टाकलाय ! बसा जरा यळ !"
धर्माला चहा टाकण्याची आर्डर देण्याची गरज भासली नव्हती. "अतिथी देओ भव " हे धुर्पाच्या रक्तातच होतं. चहा पीत-पीत तिघांनी ईर्जीकीच्या तायरीची बईजवार चर्चा केली.१५-२० आवातनी म्हंजी लहान-मोठी धरून घरटी ४ मानस धर्ली तरी पाउन्शे लोकाची यवस्ता करावी लागंल. शिवाय दोन ईसा जनावराचा दाना-पानी बगावा लागंल. लेकरास्नी दुध लागंल. मीठ-मिर्ची, तेल-तिखाट, दळण ईत्यादी सर्व्या गोष्टी वर चर्चा झाली. ईर्जीकीच्या तयारीची मिटींग दोन मिनिटात संपली आन जो तो आपापल्या कामाला लागला.वस्तीवरून आत्ताच गावात जाव लागनार व्हतं. च्या चा शेवटचा घोट घेउन धर्मा-म्हादा उठलं. धर्मान कनगीतन धा पायली जोंधळ काढुन म्हादाच्या मदतीनं तेची दोन बाचकी बनिवली. दोघांनी एक-एक बाचकं खांद्यावर मारून गावचा रस्ता धरला. किश्या पाटलाच्या चक्कीवर बाचकी उतरून, चक्कीवरच्या पोराला आर्डर सोडली,

"नीट बारीक दळुन वस्तीवर पोचिव रं ! ईर्जीक हायं उद्याला. ".
पोरान मान डोलावली.
म्हादा मधल्या आळीत शिरला अन रस्त्यावरनच सगळ्यास्नी आवातनी ध्यायला सुरवात केली..
"ओ~ शिर्पा.... आरं ईर्जिक हायं उद्या धर्माकड ! लवकर यं सकाळी वस्ती वर! काय ?"
धर्मानं जोश्याच्या पाकाडीतनं वर जाउन मांग वाडयाचा रस्ता धरला. धर्माची चाहूल लागताच वाड्यावरची कुत्री कोकलायला लागली. बिर्‍या मांगाच्या पालासमोर आल्यावर धर्मान आवाज दिला...

"हाईत का बिरुबा घरांत ? "
डोक्यावरच पागुटं सारख करत बिरुबा पालाच्या भाईर आला.
" कोन त्ये ? धर्मादादा व्हयं ! या या बसाकि ! लंय दिसानी येन केलं ! "
बिरुबाच्या बायकुनं पालातली घोंगडी आणुन पालाफुड टाकली.
" नग ! बसाया टाईम न्हाय ! उध्याची ईर्जीक ठिवलिया ! हाल्गी तापउन ठेव बगं ! ईसरू नको "
" न्हाय बां ! ईसरीन कसा ! यतोकि हाल्गी घिउन सकाळी-सकाळी ! बिनघोर र्‍हावा तुमी " .

ईर्जिकीनं "टेकॉफ" घेतला होता. म्हादा आवातनी करून घरी गेला होता. चक्कीवरच्या पोरानं दोन पायल्या जोंधळ्याच पीठ पाडलं होतं. १५-२० घरातल्या बायका पोरांना ईर्जिकीची खबर पोहोचली होती. धुर्पा घरातल्या आवरा-आवरीत गुंतली होती. धर्मा मात्र घरी जाउन बिनघोर झोपला होता. आपल शेत आता पिकणार याची खात्री पटल्याने तो निर्धास्त झाला होता.
शेवटी तो ईर्जिकीचा दिस उगवला. पैल कोंबडं आरावलं तवाच धुर्पा उठली व्हती. आंगुळ-पांगुळ ऊरकून अंगणात सडा घातला. चुल पेटवली अन च्या चं आदंन ठेवल. धर्मानं कुस बदलली तसा धुर्पानं आवाज दिला...

"आवं ~~ उटा कि आता ! का दिस उगवायचि वाट बगताया "

धर्मा उठला. चूळ भरून दोघंनी च्या घेतला.पोरस्नि उठिवलं. वैरण तोडून गुराम्होर गव्हानीत टाकली.
झुंजू-मुंजू झाल तसं एक-एक गडी बैलगाडीत नांगर, जूं , कासरा ईत्यादी आवजार घेउन जमाय लागला. वरच्या आळीचा बाप्या, खाल्या आळीचा धोडुदादा, माळावरला पोपट्या, पाटलाचा रम्या, सुताराचा किसन्या, सोनाराचा ईसन्या, माळ वाडितला भैरू, लव्हाराचा बाळ्या, गुरवाचा दत्या, हौसाक्काचा राम्या, शेलाराचा बाब्या......समदी जंनं आली. दिवस उजडे पातुर पंधरा-ईस गडी जय्यत तयारीनिशी गोळाझाली. धुर्पाची समद्यासनी च्या-पनी देता-देता धांदल उडाली व्हती. तरी बरं ! किसन्याची बायकु हिरा अन पोपट्याची शेवंता सकाळच्या पारी मदतीला आल्या व्हत्या.

च्या झाला.
तंबाकुची चंची समध्यांच्या हातातनं फिरून परत जागच्याजागी आली.
तळहातावरच्या पत्तीला चुना रगडून मस्त मळणी झाली.
तंबाकुचा बार भरून मान तिरकी करून पिचकारी मारीत सर्वीजन उठ्ली.
धोतराचे सोगे खोचले गेले. बैलांच्या मानंवर जूं कसली गेली. नांगरची पाती बांधून, दोन नांगरच्या मधी कासराभर अंतर ठेउन सर्वांनी आपापली पात धरली. कुनालाबी कायबी सांगा-सवरायची गरज पडली नाय. खरं पायल तर धर्मा या शिवाराचा मालक. पर आज त्यो कुनाच्या हिशोबातच नव्हता. जस काय समध्यास्नी अस वाटत व्हतं की हे शिवार आपल हाय, आन ते सांच्यापतुर नांगरून व्हयालाच पायजे.
समदि तयारी झाली.
दत्या गुरवानं बैलांच्या कपाळावर गुलाल टाकून नांगराच्या फाळावर नारळ वाढीवला.
धर्मा-धुर्पा नं काळ्या माईला हळद-कुकू वाहून जमीनीवर डोस्कं टेकिवल तसं बिर्‍या मांगाची थाप हाल्गीवर पड्ली.

हाल्गी कडाडली.
बैलं कान टवकारून फुस्कारायला लागली.
सर्वांनी एकच कल्लोळ केला.....
" भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! "

नांगराचा फाळ हाथभर जमिनीत घुसला अन काळीभोर ढेकळं बका - बका उदसून टाकाया लागला.
ईकडं बाया मानसं आपापल्या घरची धुनी-भांडी, केर-पोतारा उरकून लेकरा-बाळांना घिउन धुर्पाच्या वस्तीवर जमाया लागली. जिला जे दिसल ते काम कराया लागल्या. न सांगता न सवारता. समध्याजनी जनुकाय सवताच्याच घरात वावरत होत्या. हौसाक्काची एन्ट्री झाली अन वातावरण बदलून गेलं. हौसाक्का ही सर्व्याजनी मधे जेष्ट. तिचं जेष्टत्व सर्वमान्य. तिनं वस्तीवर पाय ठेवला अन सर्व सुत्र स्वताच्या हातात घेतली.

"ए धुर्पा, दुध तापवायला ठेवलस का ?"

" ए तुळसा, यका चुलीवर काय व्हनार हाय ! आजुन दोन चुली पेटवा ! आत्ता दुपार्च्या जेवायचा टाईम व्हईल ! बापै मानसास्नी भाकरी साठी ताटकळत ठिउ नांय कदी ".

" तुमी दोगी-तिगी कांय करताय गं हिरिवर ? एकीन पानी शेंदा आन दोगीजनी रांजनात आनुन वता."

" ए शेवंता , त्या पोराला पाजं आगुदर! कवापस्न रडतया"

" काय फुलाबाय, बसल्या का तुमी मिसरी लावत ? तुमचं मुरली-वादन उरका बिगिन आन चटनी घ्या वाटायला "

" ए पोरी , ते दुरडीतलं कांदं टाक चुलीत भाजायला"

हौसाक्काच्या भात्यातनं सटासट आर्डरी सुटाया लागल्या आन सगळ्या जणी त्या खुशीनं पेलायला लागल्या. तिची सासुगिरी सर्वजणींना हवी - हवीशी वाटायची. गावच्या कुठ्ल्याही बाईवर कसलंही संकट येउदे, हौसाक्का त्या संकटा समोर ढाली सारखी उभी राहायची. मग दोघीमधे एकतर नवीन नातं निर्माण व्हायच किंवा असलेल नातं अधिकच द्रुढ व्हायच.
आई मधल्या सासूचं आणी सासूमधल्या आईच नातं!. भारतीय आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम करणार नातं!.

" बकुळा दिसत न्हाय कुट ती ? परंत वांत्या व्हया लागल्या का काय म्हनावं ?"

हौसाक्काच्या या फेकीन चांगलीच खसखस पिकली.
खर पाहिल तर या सगळ्या जणी आपापल्या घरी जी नैमत्तीक कामं करतात तीच सगळी काम ईथं येउन करीत होत्या. पण ईथ एकत्रित काम करण्याचा आनंद वेगळा होता. हुरुप होता. नवीन घडामोडींची आणी घरोघरीच्या बातम्यांची देवाण - घेवाण चालू होती. एकमेकीच्या कानात कुजबुज चालु होती. चेष्टा-मस्करीला उत आला होता. दर दोन मिनिटाला खसखस पिकत होती. सर्वजणी बाजारात पैसे देउन सुद्धा विकत न मिळ्णार्‍या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेत भराभर कामं उरकत होत्या. पोरांची फौज धमाल करीत होती. भांडा-भांडी, रडा-रडी आणी शक्य होतील त्या सर्व उचापती चालू होत्या. जाता-येता कुणीतरी त्यांच्यावर डाफरून, मुलांचे कडून कसल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न धरता आपापल्या कामाला निघून जात होते. त्यामुळं सगळी फौज कानात वारं शिरलेल्या वासरा सारखी बेभान होउन आजच्या दिवसाचा पुरेपूर उपभोग घेत होती.
तीन दगडं मांडून तयार केलेल्या चार चुली धगधगायला लागल्या. फोडणीचा झटका नाकात शिरून ठसका-ठसकी झाली. दोन-तीन काटवटीत भाकरीचं पीठ मळायला सुरवात झाली. सर्व काही कंट्रोल मधे आहे याची खात्री करून घेत हौसाक्का पडवीत टेकली, तेवढ्यात धर्मा अंगणात आला..

" हौसाक्का, मी गांवात जाउन येतो जरा. सांच्या ईर्जीकिची यवस्था करुन येतो."

" आगदि बिनघोर जा ! हिकडच संम्ध बगते मी "

नाही तरी आता धर्मा-धुर्पा चा कुठ्लाच रोल शिवारात किंवा घरात राहिला नव्हता. सर्वांनी आपापली जबाबदारी पेलली होती.

धर्मा वस्तीवरनं निघाला तो थेट मन्या सावकाराच्या वाडयावर जाउन धडकला. मोठ्या रुबाबात सावकाराच्या पडवीत चोपाळ्या शेजारच्या खांबाला टेकून बसला. झोपाळा थांबला. दोघांनी एकही शब्द न उच्यारता एकमेकांना न्याहाळल अन सावकार गपचुप उठून माजघरात निघून गेला. धर्माच्या ईर्जीकीची बातमी सावकराच्या कानावर कालच आली होती. त्यामुळ धर्माच्या येण्याच प्रयोजन काय आहे हे कुणी सांगण्याची गरज नव्हती. शंभराच्या पांच नोटा हातात घेउन सावकार परत पडवीत प्रगट झाला. त्यातल्या चार नोटा धर्माच्या हातावर ठेवल्या. जागेवरुन तसुभरही न हालता धर्मानं सावकाराच्या डोळ्यात नजर भिडवली. शब्दाविना नेत्रांची भाषा झाली अन सावकारानं पाचवी नोट धर्माच्या हातात कोंबत वडिलकीच्या हक्कानं दम भरला...

" यवडयात समद भागवायचं ! उगाच पैका हातात आला म्हुन उडवीत बसायच नांय ! निट लक्षात ठेव !"

सावकाराचे शब्द कानात शिरे पर्यंत धर्माने वड्याचा उंबरा ओलांडला होता. रुबाब असा काय कि जणू तोच सावकाराला कर्ज देऊन गेला आहे.

असा हा कर्ज देण्याचा आणि कर्ज घेण्याचा " सो काँल्ड " व्यवहार दोनच मिनिटात व कमित कमी शब्दात पूर्ण झाला होता. कागद नाही, शाई नाही, लिखावट नाही, स्टँम्प पेपर नाही, सही नाही, अंगठा नाही कि साक्षीदार सुध्दा नाही. असा हा आगळा वेगळा व्यवहार फक्त या काळ्या आईच्या कुशीत वाढलेल्या निष्पाप जिवां मध्येच होऊ शकतो. माणिकचंद उर्फ मन्या सावकार हा या गांवचा पिढीजात सावकार. वाड-वडिलांची सावकारी मन्या ने पुढे रेटली होती. पण अशी ही सावकारी म्हणजे आक्रीतच म्हणायच. सावकारकीच्या व्यवसायाला बट्टा म्हणा हव तर !. मन्या सावकार म्हणजे या गावची सार्वजनिक बँक आणी शेती मालाची बाजारपेठ सुध्दां. गावात कुणाच्याही घरी, कसलही अडचण अथवा कार्य असूदे. अगदि बाळंत पणा पासून ते मयती पर्यंत, फायनान्सर म्हणून मन्या सावकार ठामपणे पाठीशी उभा असायचा. पिकांच्या कापणी नंतर खळ्यातली रास घरात यायची. कणगी सारऊन, काठोकाठ भरून शेणाने बंद केल्या जायच्या. अशा प्रकारे पुर्ण वर्षाची बेगमी झालेवर शिल्लक राहिलेल सर्व धान्य पोत्यात भरून गाडी सावकाराच्या वाड्यावर पोहोचायची. सावकाराच्या पडवीत धान्याच्या पोत्यांची थप्पी लागत राहायची. एकदिवस सावकारच्या दारात ट्रक उभा राहायचा. जमाझालेला सर्व शेतीमाल ट्रक मधे भरून सावकार "म्हमई" ला जायचा. चार दिसांनी उगवायचा ते नोटाच पुडकं घेउन. मग एकेकाला वाड्यावर बोलाउन घेऊन आख्या वर्षाचा सविस्तर हिशेब सांगायचा अयशस्वी प्रयत्न करायचा...

" हे बग भैरू, तुझी जवारी भरली धा किंट्ल, त्याचे एवढे पैसे झाले...

बाजरीचे एवढे, हळदीला काय या वर्षी चांगला भाव भेटला नाय, त्याचे एवढे ...
सर्व मिळून एवढे झाले..एवढे

ट्रक वाल्याला एवढे दिले, त्यात तुझा हिस्सा एवढा....

पोरीच्या लगनाला तू एवढे घेतले होतेस...

दिवाळ सणाला तुझ्या बायकुनं एवढे नेले...

बँकेच्या भावा परमान माझ्या याज एवढ झालं ....
आणी हे आता एवढे शिल्लक रहिले ... हे घे "
सावकराचा हिशेब कसा चोख असायचा. त्यासाठी कसाल्याही कागद पत्राची गरज नसायची. सावकार हिशेब सांगत रहायचा अन समोरचा माणूस सावकाराची बडबड या कानाने घेऊन त्या कानाने सोडत राहायचा. सावकाराचे शेवटचे दोन शब्द " हे घे " कानात शिरले कि पट्कन हाथ पुढे व्हायचे. सावकाराने हातात ठेवलेल्या नोटा कोपरीच्या खिशात कोंबत तो माणूस चालता व्हायचा अन दुसरा टपकायचा. हे रूटीन आठवडाभर चालू राहायच.

तर असा हा मणिकचंद सावकार फक्त " गांवची बँक आणी शेत मालाची बाजार पेठ " या पुरताच मर्यादित नव्हता, तर अजून एक जबाबदारी त्याने स्वत:च अंगावर ओढून घेतली होती. वडिलकीच्या नात्याने गांवकर्‍यांच्या भविष्याची चिंता करण्याची जबाबदारी. कसं ते या किस्या वरूनच कळेल ...

त्याच काय झालं, मागल्या वर्सी चैतीची पुनव झाल्यावर कुदळवाडीचं पावनं भैरूच्या थोरल्या लेकीला बगायला आलं. पोरगी देखणी. चार-चौघीत उठून दिसायची. नाकी-डोळी सरस. चांगल्या संस्कारात वाढलेली. नांवं ठेवाया काय पर जागा नव्हती. कुदळवाडीकरांनी लगुलग पसंती सांगुन टाकली. कुदळवाडीकराच घरान बी मात्तबर. दोन्ही बाजूनी होकार भरला. झालं . लग्नाची बैठक बसली. दोन्ही गांवची वयस्कर मानसं पानाला चुना लावत अन सुपारी कातरत समोरासमोर बसून एकमेकाला तोलत होती. भैरू अगुदरच फाटक्या खिशाचा. त्यात समोरची पार्टी मात्तबर. कुदळवाडीत तेंचा मोठ्ठा बारदानां. ही सोयरिक आपल्याला काय झेपणार नाय म्हनून भैरून आगुदरच कच खाल्ली व्हती. पर पोरगी खात्या-पित्या घरात पडनार म्हनून गांवकर्‍यांनी अन भैरूच्या बाकुनं त्याला भरीस घातलं. बैठकीत एकेक ईषय यायला लागला तस भैरूच्या छातीत धडधडाया लागलं. भैरू तोंड उघडाया लागला कि किस्ना मास्तर त्याला डोळ्यांनी दटाउन " गप गुमान र्‍हा " म्हनून सांगत होता. एकेक मुद्दा फुड सरकत होता.......

लग्नाचा मांडव पोरीच्या दारात पडनार ............... ....................ठरलं !
उमदा घोडा, ताशा-पिपानीचा ताफा ..........................................ठरलं !
नवरा-नवरीची कापडं, शालु , हळदीच लुगड्म ........ ..............ठरलं !
आई कडल डोरलं, आजी कडून नथ, सासू कडून गंठण ...........ठरलं !
मामाच कन्यादान, आत्याच पैजण.........................................ठरलं !
वरमायांचा मान, आजचीर , रुकवतावरची साडी .....................ठरलं !
वरबापाचा पोशाख, मामाला फेटा .........................................ठरलं !
मावळणीची घागर, तिचा मानपान ......................................ठरलं !
करवलीचा मान , कानपिळ्याचा पोशाख .............................ठरलं !
बारा बलुतं दारांचा मान .................................................ठरलं !
हे...............................ठरलं ! ते...................................ठरलं !

सर्वांचा मानपान, परंपरागत रीती-रिवाज सांभाळत आणी चार कलाक घोळ घालत चाललेली ती बैठक एकदाची भैरवीच्या सुरावर येउन ठेपली. शेवटी किस्ना मास्तरानी मधुमध भला मोठा दगड ठेउन तेच्यावर सुपारी ठिवली. हुबं र्‍हाउन खडया आवाजांत सगळ्या ठरावांची पुन्यांदा उजळणी केली अन समस्त उपस्थितांना शेवटचा सवाल केला......

" तर काय मंडळी , फोडायची का सुपारी ?"

लोकं कबुली देण्यासाठी तोंड उघडणार तेवढयात कशीकाय ती माशी शिंकली आन उजव्या कोपर्‍यातल्या बायामानसांच्या कंपूतनं पैल्यांदाच खणखणीत आवाज उठला..............

" आमच्या घरच्या लक्षीमीला कायं लंकेची पारवती म्हून पाठिवतसा का काय म्हनावं ! आमच्या खानदानात धां सुना नांत्यात या घडीला ! पर कंच्याच कार्यात आस नाय घडल कधी ! निदान पाच-सा तोळ्याचा यकादा डाग नकोव्हय घालाया ? जनाची नाय निदान मनाची तरी.... ?"

झालं ! वरमायनं अगदि शेवटच्या क्षणी ठिणगी टाकून पोरीच्या आई-बापाच्या वर्मावर घाव घातला होता. बायामानसांच्या कंपूत त्या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागला नाही. नवर्‍या कडल्या बायांच्या अंगात झाशीची राणी तर नवरी कडल्या बायांच्या अंगात कडकलक्ष्मी संचारली होती. उणी-दुणी काढून झाली, घालून-पाडून बोलणी झाली आता फकस्त एकमेकीच्या झिंज्या उपटायच्या बाकी होत. चांगला कलाकभर तमाशा झालेवर शेवटी हौसाक्काच्या मध्यस्तीन रणांगण शांत झाल अन वरमाय "तीन तोळ्यावर " तयार झाली. पण भैरू काय व्हय भरायला तयार व्हयना आन सुपारी काय फुटनां. शेवटाला कुदळवाडीचं पाटिल फेटा सावरत बोलायला उभं र्‍हायल तसी सगळी जण एकदम चिडीचुप झाली.....

"हे बगा मंडळी, यवडा खंल घालुन पर तोडगा निघत नाय मजी ह्या सोयरीकीचा काय योग दिसत नाय ! तवा आमी म्हनतो कि आता उठावं. तिनिसांजच्या आत आमास्नीबी वाडीवर पोचाया पायजे. तवा आता आमास्नी निरोप ध्या. "

वरपक्षाची ही निर्वाणीची भाषा ऐकून ईतका येळ एका कोपर्‍यात गप-गुमान बसलेला मन्या सावकार खाड्कन ऊभा राहून खड्या आवाजात फुट्ला ........

" पाटी~~ल ! ही बैठक सुपारी फुटल्या बिगर उठनार नाय!. गांवच्या ईभ्रतीचा सवाल हाय ! चला, घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! हा गावच्या सावकाराचा सबूत हायं. आता फोडा सुपारी. तुमास्नी सोयरिकीची पुरणपोळी खाउ घातल्या बिगर हे गाव सोडू देनार नायं . "

कुदळवाडीच्या पाटलांनी परिस्थितीचं गांभिर्य लगोलग ओळखून सावकारा फुड हात जोडले....
" हे बगा सावकार, उगीच गैरसमज करून घेउ नकासा ! आमास्नी कुनाच्या ईभ्रतीला हात घालायचा नाय का कुणावर राग पन न्हाय ! पोरीच्या बापाला हां भरायला लावा, ही आत्ता सुपारी फुटंल!"

मन्या सावकार तावातावान उठला अन भैरूला बकुटीला धरून मागच्या दाराला घेउन गेला. मागुमाग किस्ना मास्तर पण गेला.
"भैरू ! माज ऐक लेकां . पोरीच ठरत आलेल लगीन मोडू नगं ! खात्या-पित्या घरी पोरगी सुखात राहील बग ! आता माग हटू नगं "
" पर सावकार, हे समध नाय झेपायच माझ्याचानी ! जमिनीचा तुकडा ईकावा लागंल न्हायतर डोक्यावर कर्जाचा डोंगर उचलावा लागंल ! मग बायकापोरांच्या पोटांत काय काट
घालू ? दोन-चार वर्षात धाकली पर ईल लग्नाला ! कस काय जमनार सार?"
भैरू डोळ्यात पाणी आणून पोटतिडकीन बोलत होता.
" तसं कायपंर व्हनार नाय ! मी काय सांगतो ते नीट ऎकून घे ! तुझ्या हातात पैका टिकत नाय हे मी पैल्या पासन वळकुन व्हतो. तुझ्या हातात नोटा पडल्या कि पार्‍या वाणी निस्टुन जात्यात. म्हनुन तुझ्य़ा धाकल्या पोरीच्या जलमा पासून आज पर्यंत तुझ्या उत्पन्नातला तिसरा हिस्सा मी परस्पर किस्ना मास्तराकडम जमा केलाय. मास्तरानी तालुक्याच्या पोस्टातनं तुझ्या नावावर सर्टिफिकिटं घेउन ठेवल्यात. तवा आता पैशाची कायपर फिकिर नाय. ईचार वाटलस तर मास्तरला ! "
भैरू भांबावल्या सारखा किस्ना मास्तराकडं बगाया लागला.....
"खरं हाय सावकार म्हंत्यात ते ! आजच्या घडीला तुझा पैका चांगला दान-दुप्पट झालाय. आर मर्दा, तीन तोळ काय घेउन बसलास, कुदळवाडीकरांनी पाच तोळ मागितल तरी तू देऊ शकतोस१. चल ! ताट माननं हो भर आन दे बार उडउन !"
दोघांच्या बोलण्यान भैरूचा ऊर भरून आला. पागुटयाच्या टोकानं डोळं टिपुन भैरू पडवीत दाखल झाला ते धा हत्तीच बळ घेउनच. सगळीकड चिडिचुप झालं. भैरू काय निर्णय घेनार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मिशीवरन हात फिरवीत भैरूनं ताट मानेन सगळीकड नजर फिरवली. शेवटी विहिणबाई बसलेल्या कंपूवर नजर स्थीर करून गर्जना केली ...............

"घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! आनि वर जावयाला अंगठी पन घालतो ! फोडा सुपरी"
किस्ना मस्तरानी क्षणाचाही विलंब न करता, बैठकीला अजून पाय फुटण्या आगुदर हातातल्या दगडाचा सुपारीवर घाव घातलुन पार भुगा करून टाकला. गुरवाचा दत्या शिंगाला तोंड लाउन तयारच होता. शिंगाची थुई-थुई गावच्या वेशी पर्यंत जाउन घुमली अन समद गांव समजून चुकलं ! भैरूच्या पोरीची सुपारी फुटली ! सोयरिक जुळली!
एका मिनिटात सार वातावरण बदलून गेल. पानसुपारीची ताटं फिरायला लागली. हळदी-कुकवाचं करंड मिरवाया लागल.. काही वेळेपुर्वीच्या रणांगणाचा मागमूस सुध्दा राहिला नव्हता. वरमाय तोंडाला फेस येविस्तोवर व्हनार्‍या सुनेचं कवतुक कराया लागली. भैरूची बायकु जावायाच आप्रुक गायाला लागली. सयपाक घरात पुरणा-वरणाच्या सैपाकाची तयारी सुरु झाली. पडवीत पाचव्यांदा च्या चा कप जिरवीत तंबाकुच्या चंच्या उघडून शेतीवाडीच्या गप्पा रंगात आल्या. हळू हळू एकएक गावकरी कुदळवाडीकरांना रामराम करून काढता पाय घ्यायला लागला. शेवटी मन्या सावकार निरोप घेउन निघाला तस भैरूनं सावकाराला मिठी मारली .........

" सावकार ! आज तुमी देवासारकं धाऊन आलासा म्हुन मी वाचलो बगा ! न्हायतर गावात छी-तू झाली आसती !"
" आसं नगं म्हनूस मर्दा ! तुझी पोरं आन माझी पोरं काय यगळी हायती व्हय ! आनी म्या तरी आशी काय मर्दानकी गाजावलिया ? तुझा खिसा फाटका म्हनून तुझ्याच घामाचा पैका, तुझ्याच खिशातनं काढून मास्तराच्या भक्कम खिशात ठिवला."

तर मंडळी, असा हा आमचा मन्या सावकार. कागाद पत्रावर विश्वास नसलेला. फक्त माणसातील माणुसकी तारण म्हणून स्वीकारणारा. गांवचा अभिमानी. लोकांच्या भविष्याची चिंता करणारा. वसुली साठी कुणाच्याही दारात न फिरकणारा मात्र अडीअडचणीला हमकास टपकणारा. सावकारकीचा कुठलाही गुणधर्म नसलेला तरी सुध्दा यशस्वीपणे सावकारी करणारा. थोडक्यात काय तर सावकारकीच्या व्यवसायाला काळीमा फासलेला असा हा मन्या सावकार. त्याच्या या सरळ पणाचा गैरफायदा घेण्याचे धाडस कुणी केल नव्हतं.
तरी सुध्दा गांव तिथ हगीणदारी ही आलीच. बेन्या लव्हार हा त्याच घाणीतला किडा . बायकुच्या आजारपणाला म्हनून सावकारा कडनं सा महिन्याच्या बोलीवर कर्ज घेउन गेला आन दारू पीत बसला. बिचारी बायकु मरून गेली तरी याचा रोजचा खांबा चालूचं. धा महिनं उलटून गेल तरीबी सावकाराच्या वाड्यावर फिरकला नायं. बरं वसुलि तरी कशी करावी? उभ पीक शिरगांवच्या मारवाड्याला ईकून मोकळा झाला. वाट बगून बगून शेवटी सावकारानं तेच्या दारावर जाउन तगादा लावला. सुरवातीला टोलवा टोलवी करणारा बन्या शेवटी शेवटी सावकारावर डाफराया लागला. कायद्याची भाषा कराया लागला. काय पुरावा हाये तुझ्याकड मी पैस घेतल्याचा, आस उलटून ईचारायला लागला. सावकारान वळकुन घेतलं कि आपल पैस डुबलं. हळहळला बिचारा. रातभर झोपला नाय. सकाळी उठला तो डोक्यात सनक घेउनच. तडक कुंभार वाड्यावर जाउन एक मडकं घेतलं. तिरक्या न्हाव्याला त्याच्या धोपटी सकट फरपटत बन्याच्या घरासमोर घेउन गेला. दारात बसकन मारीत तिरक्याला हुकुम सोडला .......
"कर माज मुंडन ! मिशा सकट भादरून टाक मला "
सावकाराचं लालबुंद डोळं बगुन तिरक्याचं काय पन ईचारायचं धाडस झाल नांय. त्यानी गुमान भादरायला सुरवात केली. बातमी वणव्या सारखी गांवभर पसरली. अर्धा गाव जमा झाला अन बन्याच्या घरा भोवती कोंडाळं करून हुबा र्‍हायला. पर कुनाची हिंमत झाली नाय सावकाराशी बोलायची .पयल्यांदाच आस आक्रीत घडत होतं. बन्या मात्र दारात बसून दात ईचकत फिदीफिदी हासत सावकाराकड बगत व्हता. भादरून झाल्यावर सावकारान मडक्यात पाणी भरून खांद्यावर घेतल. बन्याच्या घराला उलट्या तीन फेर्‍या मारून मडकं सोडून दिलं. मडकं फुटल्याचा आवाज झाला अन सावकारान बन्याच्या नावान जोरजोरात बोंब ठोकली. कुणाशीही एकही शब्द न बोलता परत फिरला. जाता जाता बन्याला बजाऊन गेला ....
" बन्या ~~ भडवीच्या माझ पैसं डुबवलंस....... दारूत घातलंस ...... स्वताच्या बायकुला खाल्लंस .........तुझ्या नावानं मडक फोडल मी आज ! कुतर्‍याच्या मौतीनं मरशील बग !"
सावकार तडक घरी गेला. वड्याचा दरवाजा बंद करून आडसर टाकला तो दुसर्‍या दिवसा पर्यंत उघडला नाही.
सावकारानं दिलेला शाप खरा ठरला. सावकार शांत झाला. त्याने स्वत: पुरता "बन्या" अध्याय कायामचा बंद केला. पण गावानं बंद केला नाही. दुसर्‍याच दिवसा पासून गावच्या पोराठोरा पासून ते म्हातार्‍या कोतार्‍या पर्यंत सर्वांनी उत्फूर्त पणे, सामुहिक रित्या, बन्या विरुध्द "असहकाराचे" अघोषित युध्द पुकारले. गांधी बाबांनी सर्व सामान्यांना दिलेले यशस्वी हत्यार........ "अहिंसा आणी असहकार".
बन्याचा दानापानी बंद झाला. त्याला कुणी दारात उभं करेना. विहिरीवर कुणी पाणी भरू देईना. वाणी सामान देईना. चांभार चप्पल शिऊन देईना. शिंपी कपडे शिउन देईना. शेतीच्या कामाला मजूर मिळेना. बन्या अगदी एकटा पडला. जिथ जाईल तिथ हाडतुस व्हायला लागली. सावकाराच्या वाड्यावर जाउन नाकदुर्‍या काढल्या, गावकर्‍याचा हातापाया पडला. पण काहीसुध्दा उपयोग झाला नाही. सर्वजण आपाल्या भूमिकेवर ठाम होते. ज्या वटवृक्षाच्या छायेत सारा गाव नांदतो आहे त्या वटवृक्षाला लागलेले बांडगूळ कायमचं छाटून टाकणे आवश्यक होते. शेवटी बन्या वैतागला अन एक दिवस गांव सोडून ??????? ला पाय लाऊन पळून गेला. गांधी बाबाच हत्यारंच तस होत. आहो, एवढया मोठ्या ईंग्रजाला पळता भुई थोडी झाली तर मग हा बन्या किस झाड की पत्ती !

बोंबलां ! धर्माची ईर्जीक र्‍हायली बाजुला अन आपंन कुटल्या कुट भरकटत गेलो ? भैरूच्या पोरीची सुपारी फोडून बन्याच तेराव पन घालून आलो ! ह्या सगळ्या घोळात धर्माची ईर्जीक पडली कि बाजूला !

तर धर्मा ईर्जीकी साठी सावकाराकडून पाच नोटा घेउन भाईर पडला खरा, पर सावकाराच्या मनाला यका गोष्टीची चुट्पुट लागून र्‍हायली. आता ईर्जीक म्हनल्यावर रातच्याला वस्तीवर बकरं पडनार. सगळ मैतर मिळून मटनाचा रस्सा कोपरापोतर धार जाईस्तोर वरपनार. मग तेच्या जोडीला म्हनून धर्मान फुगा घेउन जाउनाय मजी मिळवली.

आता तुमी म्हनाल फुगा मजी काय?. त्याच आस हाय कि फुगा, खंबा, चपटी ही समदी एका द्रवरूप पदार्थाची माप आहेत. गावच्या जत्रला ह्या मापांचा लंय सुळसुळाट आसतो. एरवी कधीतरी कुनाकड खंडुबाचा जागर आसंल न्हायतर गावात तमाशाचा फड उतरला तरच ही मापं कानावर पडत्यात. म्हंजी आस कि, एकटा-दुकटा आसल तर चपटीत भागतं, जोडीला एक-दोन मैतर आसलं तर खांबा लागतो अन टोळक आसल तर फुग्या शिवाय भागत नाय.

पर धर्मानं हौसाक्काच्या भितीनं फुगा-बिगा काय घेतला नाय. सावकाराच्या वाड्यावरन निगाला तो सरळ धनगर वाड्यावर गेला.केरबा धनगर जाळीत मेंढरं कोंडून लोकर भादरत होता. धर्माला आलेला बगुन केरबान लहान-मोठी चार बकरी कळपातन बाजूला केली. धर्मानं बकर्‍यांच्या मागल्या खुब्यात हात घालून उचलून वजनाचा अंदाज घेतला. त्यातलं एक बकरू निवडून केरबाला ईचारलं.........

" ह्याच काय घेनार बोल "
केरबान उजव्या हाताची पाच अन डाव्या हाताची दोन बोट दाखवीत व्यवहाराच्या घासा-घासीचा श्रीगणेशा केला.
" काय बोलतो मर्दा, ह्याच सातशे ? तुझी बकरी काय सोनं हागायला लागली का काय म्हनावं. नीट ह्यवारानी बोल कि जरा "
तासभर घासाघीस करून धर्मान चार नोटा केरबाच्या हातात ठेवल्या आणि निवडलेल बकर पाट्कुळी मारून रस्ता धरला. हौसाक्कान सांगीतलेल्या चार गोष्टी वाण्याच्या दुकानातून घेतल्या. मशिदीला वळसा घालून टेकाडावरनं उतरत आब्बास भाईला आवाज दिला ....
" ओ ~~ आब्बास भाई, हायसाकां घरात ?""
दारावरचा जुन्या ओढणीचा पडदा बाजूला करीत आब्बास भाईने बाहेर डोकावल ...
" कौन ? धर्मा क्या ?हमको रातकोच मालुमपड्या ईर्जिक है करके ! दुपेरको आताय काटनेको ! "
" थोडा लवकरंच आव ! शिजनेको टाईम लगता है " ... धर्मान जवळ होत तेवढ हिंदी फांडत वस्तीचा रस्ता धरला.
धर्मा वस्तीवर पोहोचे पर्यंत दिस डोक्यावर आला होता. निम्म शिवार नांगरून झाल होतं. लोकांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी केली होती. बैल झाडाखाली वैरण चघळीत, अंगावर धन्याची थाप पडायची वाट बघत होती. गडी मानसं भाकरी खाऊन बांधावर सावलीला तंबाखू मळीत बसली होती. धर्मान खांद्या वरच बकर खाली उतरऊन झाडाला बांधल. हातातल सामान हौसाक्काला देउन वसरीला टेकला. पोरांनी बकर्‍या भोवती कोंडाळ करून नावीन उचापती सुरू केल्या. धुर्पानं पायरीवर आनून ठेवलेला पण्याचा तांब्या नरड्यात रिता करीन धर्मा उठला. हिरीवर जाउन पानी शेंदल अन सर्व्या बैलास्नी बादली-बादली पानी दावलं. एकएक गडी उठून आपापल्या शेजंनं कामाला लागला. तेवढ्यात शेलाराच्या सुगंधानं धर्माला वसरीच्या उंबर्‍यावरन आवाज दिला .........
" ओ~~ भावजी ! जिउन घ्या कि आगुदर ! धुर्पाक्का ताटकाळ्यात कवाधरनं ! सकाळपासन पोटात काय बि नाय बगा !"
" आत्तां ! च्यामारी, मी काय तिला उपाशी र्‍हायला सांगितल हुत व्हयं ! जेवायचं व्हत सगळ्या संगट ! "
" तस नव्ह भावजी ! तुमी जेवल्या बिगर घास उतरल व्हय धुर्पाक्काच्या गळ्या खाली ! आता भरवा पैला घास तुमीच !"
सुगंधाच्या बोलण्याने सगळ्याजणी तोंडाला पदर लाउन फिदि-फिदि हसायला लागल्या. धुर्पा बिचरी पार लाजून चुर्र झाली. तिन पडवीत घोंगडी टाकली. ताट वाढलं. पाण्याचा तांब्या ठिवला अन आजून काय चेष्टा-मस्करी व्हायच्या आत घरात निघून गेली. धर्मा गुमान जेवायला बसला. हात धुवस्तोवर आब्बास भाई आपली हत्यार पाजळत हजर झाला. त्यानं पोरांच्या कोंडाळ्यातन बकर्‍याची सुट्का केली अन लांब खिवराच्या झाडाखाली घेउन गेला. पोत्यातन सुरी काढली. बकर्‍याला आडव पाडून जबरदस्तीन तोंडात पाणी ओतून खटका उडवला. झाडाच्या फांदीला उलटं लटकऊन भराभर कातडी सोलून काढली. पोटात सुरी खुपसून साफ-सफाई झाली. बाभळीचा ओंडका उभा करून त्यावर खटाखट सत्तूर चा आवाज व्हायला लागला. धर्मानं आणून ठेवलेल्या भल्या मोठ्या भगुल्यात मटनाचं तुकडं पडायला लागलं. आब्बासभाईन तासाभरात आपल काम चोख बाजावलं. मुंडी आणी कातडी पोत्यात कोंबून आब्बासभाई चालता झाला.
होय ! मुंडी-कातडी हीच आब्बासभाईची मजुरी. गांवची पध्द्तच होती तशी. बरेचसे व्यवहार हे चलना शिवाय व्हायचे.
दिवस मावळतीला झुकला होता. चार चुली परत पेटल्या होत्या. तव्यावर भाकरी पडत होत्या. भल्या मोठया तप्याल्यात मटान रटरटत होतं. फोडणीचा खमंग वास नाकात घुसून पोरांच्या पोटात कावळं कोकलायला लागल होत. बाया मानसांची लगबग वाढली होती. तिकड नांगरटीनं शिवाराच शेवटचं टोक गाठलं होतं. बैलं घायकुतीला आली होती. आता थोड्याच टायमात सुट्टी व्हनार हे त्या मुक्या जनावरांनी वळीकल होत. जसा जसा नांगरटीचा शेवट जवळ येत होता तसा बिर्‍या चेव आल्या सारखा हालगी बडवीत बैलांना प्रोत्साहित करीत होता. शेवटी हाथभर दिवस असतानाच हालगी थांबली. आख्खं शिवार दिवस मावळायच्या आत उदसून टाकलं होत. सर्वांच्या चेहेर्‍यावर आनंद पसरला होता.

प्रोजेक्ट "ईर्जीक " यशस्वी झाला होता.
नो प्रोजेक्ट मँनेजर , नो प्रोजेक्ट टीम .....
नो कन्सलटन्सी , नो फिजिबिलिटी स्टडी ...
नो लीगल अडव्हायसर , नो ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ...
नो वर्कर्स , नो वेजेस ...........
नो मिटींग्ज , नो बिझनेस लंच ....
नो गाडी , नो घोडा .........
नो इन्फ़्रास्ट्रकचर , नो नेटवर्क ....
नो फायनान्सीअल रिसोर्स , नो करन्सी एक्स्चेंज ....
नो शेड्युलिंग , नो डी.आर. पी. ......
ओन्ली काँमन टारगेट अँड विल टू अचीव्ह ईट .... व्हाट वंडर ..........
" प्रोजेक्ट वाँज अ ग्रेट सक्सेस "

बैलांच्या माना जुआतून सुट्ल्या. सगळे बापें आवरा आवर करून हिरीवर हातपाय धुया गेल. धर्मान पेंडीच्या पोत्याचं तोंड खोलून घमेलं-घमेलं पेंड सरव्या बैलाफुड सरकवली. तेवढ्यात धुर्पा भाकरीची चवड हातावर घेऊन आली. स्वताच्या हातानी एक-एक भाकरी बैलास्नी भरवीत प्रेमानी त्यांच्या अंगावरन हात फिरिवला. ईर्जिकीच्या पैल्या पंगतीचा मान बैलास्नी मिळाला होता. ती बैलं कुणाच्या मालकीची आहेत हा प्रश्न गौण होता. मुक्या जनावरांना सुध्दा माणसा बरोबरीन वागणूक मिळाली होती. त्या साठी धर्मा-धुर्पाला "ह्युमन रिसोर्स, डेव्हलप्मेंट अँड मोटिव्हेशन " सारख्या "ट्रेनिंग प्रोग्राम " ला जायची गरज भासली नव्हती. जी माणसं मुक्या जनावरांच्या "काँन्ट्रीब्युशन" च एवढ्या उत्त्म प्रकारे "अँप्रिसिएशन" करू शकतात, त्यांना "ह्युमन मोटिव्हेशन" च कांय ट्रेनिंग देणार ?

बापय मानस बांधावर बसून सकाळ पासनं वावरात घडलेल्या लहान-सहान घटनांची उजळणी करीत, एक-मेकांची टिंगल-टवाळी करण्यात रमली होती. आज आपण एक "प्रोजेक्ट " यशस्वी पणे पूर्ण करून धर्माला चिंता मुक्त केलं आहे, याची कुणालाही जाणीव नव्हती. त्यांच्या साठी हा फक्त गाव-गाड्याच्या अन गावकीच्या रिती-रिवाजांचा एक भाग होता. दिवस मावळला होता. कडुसं पडल होत. धर्मानं वाण्याकडून उसनवारीवर आणलेली गँसबत्ती पेटउन वसरीवर आड्याला टांगली. धुर्पानं घोंगड्याच्या घड्या पसरून पंगतीची तयारी केली. पितळ्या, वटकावनं , तांबे मांडले गेले. बाया मानसांची लगबग शिगेला पोहोचली होती. चुली धगधगत होत्या. भाकरीच्या चवडी उंचावत होत्या. मटणाचा रस्सा रटरटत होता. हौसाक्काची नजर चौफेर भिरभिरत होती. सगळी तयारी झाली तसा धर्मान बांधाचा दिशेनं आवाज दिला .........
" चलाउठारं ~ माझ्या मर्दानू ~~, बसा पंगतीला "
पंगत बसली. गरमगरम मटनाचं कोरड्यास अन घरच्या जोंधळ्याची पांढरी-फेक भाकरी. पुन्यांदा एकदा " भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! " करून सर्वेजण तुटून पडले. तस बगितल तर, मटाण-भाकरीच जेवान सगळीजन कधी-मधी जेवत्यातच की !. पर आजच्या जेवनाची चव काय यगळीच व्हती. हौसाक्काची मँनेजमेंट तशी कधीच फेल जात नाय. पार कोपरा पर्यंत वगळ येईस्तवर रस्सा भुरकत होते. सोबत तोंडी लावायला चवदार गप्पा अन एक-मेकांची चेष्टा-मस्करी. खाणारांच्या तोडीला-तोड वाढणार्‍या होत्या. पैल्याभाकरीचा शेवटचा घास तोंडात घालेपर्यंत दुसरी भाकरी ताटात पडत होती. लगुलग गरम-गरम रस्याची वाटकं पितळीत पालत होत होतं. हौसाक्का सगळ्या पंगतीवर नजर ठिऊन होती. पंगत चांगलीच रंगली होती. तीन-तिगाड जाती एक-मेकाच्या मांडीला मांडी लाऊन जेवत होती. आपल्या मांडीला चिकटलेली मांडी कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे याचं कुणालाच सोईर-सुतक नव्हतं. आणि ही प्रवॄत्ती "डेव्हलप " करण्या साठी कुणी "सर्व धर्म समभाव " या विषयावराचं रटाळ व्याख्यान पन "अटेंड" केल नव्हतं. या पंगतीच अजून एक वैशिष्ठ म्हणजे, सोनाराचा ईसन्या अन गुरवाचा दत्या हे दोघे " जानवं धारी " शुध्द शाकाहारी सुध्दा ह्याच पंगतीला बसून, त्यांच्या साठी आवरजून केलेल्या वेगळ्या गोडाच्या जेवणाचा आस्वाद घेत होते. शेजारचा दाताखाली हड्डी फोडतोय म्हणून त्यांचा धर्म भ्रष्ट झाला नव्हता. धुर्पा पंगतीत फिरून आग्रह करीत होती ....

" ओ ~म्हादाभावजी ! यवड्यात झालव्हय ! घ्या कि एक भाकरी ! एकदम गरम हाये बगा !" ------ धुर्पा.
" नका आग्रिव करू वैनी ! प्वाट भरल आता " -------म्हादा.
" आरं घे कि मर्दा ! तुझ्या कारभारणीनच केलिया ती भाकरी ! " -----------सुताराच्या किसन्यान फिरकी घेतली.
" आत्तागं बया ! किसन्या, मुडद्या, तुलारं कसं रं ठाव ? भाकरीवर काय करनारनिचं नांव कोरलय व्हय ?" ----- हौसाक्का.
" आता एकदम गरम हाये म्हंजी त्याच्या बायकुनंच केली असनार कि ! " --------- किसन्या.

किसन्याच्या फिरकीनं चांगलाच हाशा पिकला. पंगतीत पन अन सयपाक घरात पन. यवडा हाशा पिकायला पन तसंच कारण व्हतं. म्हादाच्या बायकुनं "गरम डोक्याची " म्हनून आख्या गावात नाव कमावल होत. किसन्याचा "डायलाँग" ऐकून पुरती शरमून गेली बिचारी. तसा नाकावर राग पन आला, पर यवडया सार्‍या बापयं मानसा समोर तोंड उघडायच धाडस केल न्हाय पोरीनं. शिवाय वर हौसाक्काचा धांक. गप र्‍हायली बिचारी. या अचानक झालेल्या हल्यान कावरा बावरा झालेला म्हादा, मदतीच्या अपेक्षेनी हौसाक्काकडे बघू लागला. त्या संधीचा फायदा उठवीत धुर्पानं म्हादाच्या ताटात भाकरी वाढून मटनाची वाटी पालथी केली. म्हादा गुमान खाली मान घालून नवी भाकरी कुस्करायला लागला. मस्करीला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घेत हौसाक्कान फर्मान सोडलं ....
"बास झाली मस्करी ! गुमान जिऊन घ्या पोटभर ! पोरी ताटकळल्यात कवाच्या "
जेवणं उरकली. पंगत उठली. सिताफळीच्या झाडाखली हात धुउन, ढेकरांच्या लांबलचक डरकाळ्या फोडत मंडळी अंगणात टाकलेल्या सुतडयावर विसावली. मधे पानाचा डबा अन तंबाकूची चंची. पानाला चुना फासला गेला. सुपारीचं कात्रण अन तंबाकुची मळणी सुरु झाली. सुचेल त्या विषयांवर लांबलचक गप्पा सुरु झाल्या. शेतीवडी झाली. पावसाचे अंदाज वर्तवले गेले. राज कारण झाल. गांवकारण झाल. धर्माच्या अंगणातलं, चंद्राच्या चांदण्यातल खुल व्यासपीठ चांगलच रंगल होतं.
तोपर्यंत ईकडे बायकांनी जेवणं उरकून आवरा-आवर केली. सगळी झाका-पाक झाल्यावर एक-एक बाई धुर्पाचा निरोप घ्यायला लागली. पोराला कडेला मारून, पडवीच्या पायर्‍या उतरत आपल्या धन्याला हाक देत होती.....
" आवं ..! उटा कि आता ! किती रात झालिया बगा कि ! "
हळू हळू सगळ घर खाली झालं. शेवटी हौसाक्काला तिच्या घरापर्यंत पोहोचऊन धर्मा वस्तीवर परत आला. घराच्या पायरीवर एकटाच बसून चांदण्याच्या प्रकाशात नांगरट झालेल्या आपल्या शिवराकड एकटक पाहात राहिला. काल पर्यंत अशक्य वाटणरी गोष्ट आज सहजा सहजी शक्य झाली होती. वीस बिगा जामीन एका दिवसात नांगरून झाली होती. आता पाऊस गरजनार होता. उदसून वर आलेली ढेकळ न्हाऊन निघणार होती. काळ्याशार मऊ मतीत बीजं रुजणार होतं. नाजूक कोंब फुटणार होते. हिरवगार पीक वार्‍यावर डोलणार होतं. काल पर्यंत धर्माच्या डोक्यावर असलेल ओझं उतरलं होतं.
धर्माला बराच वेळ अस बसलेल पाहून धुर्पा त्याच्या जवळ आली. मायेन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हनाली ....
"आव~~धनी ! कितीयळ बसनार आस काळ्या आईकडं बगत ? मिटली आपली काळजी एकदाची. चला, झोपा आता निवांत ! "
धर्मा उठला. धुर्पान अंथरलेल्या घोंगड्यावर आडवा होऊन, आपल्या चद्रमौळी घरातलं चांदण पांघरून निवांत झोपला.
ईर्जीक संपली होती. नेहमी प्रमाणे यशस्वी झाली होती. पण अध्याप "ईर्जीक " चा खरा अर्थ उमगला नव्हता.
एवढच माहीत होत, कि काल राती पासून आत्ता पर्य़ंत जे जे घडल त्याला ईर्जीक म्हणतात.


आता तुम्हीच सांगा मंडळी, ईर्जीक चा खरा अर्थ!
ईर्जीक चा अर्थ केवळ "जेवणा वळी " पुरता मर्यादित आहे ?
ईर्जीक चा अर्थ शब्दात व्यक्त करता येईल ?
ईर्जीकीत सामील झालेल्या पात्रांची मनं, भावना, संस्कार, संस्क्रुती.... ईत्यादी, ईत्यादी शब्दांकित करता येईल?
अशी ही ईर्जिक काळाच्या ओघात लोप पावते आहे. कारण माणूस प्रगती पथावर आहे. तरी सुध्दा आत्ताच खरी ईर्जिकीची गरज आहे.
धर्माने घातलेली ईर्जिक त्याच्या वीस बिगा जमीन आणी १५-२० सहकार्‍या पुरती मर्यादित होती.
माझा देश काश्मिर पासून ते कन्या कुमरी पर्यंत कित्येक बिगा पसरलेली आहे.
राजकीय ईर्जिक घालून फोफावलेला भ्रष्टाचार आणि सफेद गुंडाराज उखडून काढण्या साठी करोडो सहकार्‍यांची गरज आहे.
सामाजिक ईर्जिक घालून बाबू लोकांचे लाच घेऊन बरबटलेले हात उखडण्या साठी ईर्जिक जिवंत राहाण गरजेच आहे.
सांस्क्रुतिक ईर्जिक घालून भारतीय संस्क्रुतीच्या वटवॄक्षाला लागलेल बांडगूळ छाटण गरजेच आहे.
सन्मान-जागृतीची ईर्जिक घालून मध्यम वर्गीय नामाक मुक्या प्राण्याला "मोटिव्हेट "करण्याची गरज आहे.
धर्मातील "धर्म" अन हौसाक्कतील "हौस " जागृत रहाण गरजेच आहे.
खरच माणूस प्रगती पथावर आहे ?



---- यशवन्त नवले.