Tuesday 25 September 2012

आली गं माहेरवाशीण.. गौराई



लाडके गौराय कधी येसी..ऽऽऽ
पानी पडलं नय (नदी) भरलं.ऽऽऽ
भादव्याला येन्, कोरे सुपावर झनकत येन्


अशा आतुरतेने गौरीची वाट सारेच पाहतात! वारली आदिवासींच्या या गीतातून गौरीच्या सणाशी जोडलेला स्नेह, उत्साह आणि झनकत ये अशी तालबद्ध आगमनाची चाहूल, आनंद या साऱ्याच भावना दाटून आल्या आहेत. तिच्या आगमनाच्या कल्पनेने मोहरलेलं मन तिला साद घालतंय!
भाद्रपद महिन्याची सुरवातच मुळी हरितालका, गणपती, ऋषिपंचमी आणि गौरीच्या तयारीच्या लगबगीने होते. अगदी पहिल्या आठ दिवसांतच इतके सगळे पार पाडताना घरातल्या बायकांची पार धांदल उडते.
एकूणच मानवाच्या सांस्कृतिक परिवेशात मातृदेवतांच्या पूजनाची प्राचीन परंपरा आपल्याला दिसते. स्त्री देवता या निरनिराळ्या स्वरूपात पूजल्या जातात. कधी धान्याच्या रूपात, कधी वृक्षांच्या, वनस्पतींच्या स्वरूपात, कधी तांदळाच्या रूपात तर कधी मुखवटय़ाच्या रूपात! त्यांचे पूजन करताना निरनिराळे मूर्त रूप आपल्या डोळ्यासमोर असते. भाद्रपदात गौरी-गणपती हे महत्त्वाचे सण असले तरी हरितालिकेचं व्रत त्याआधी पार पाडलं जातं. भाद्रपदातील तृतीयेला हे व्रत केलं जातं. पार्वतीने शंकराला इच्छित वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं, त्याचप्रमाणे बायका, कुमारिका इच्छित वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात. यावेळी शंकर-पार्वतीची पूजा करून त्यांच्यापाशी मनोकामना व्यक्त केली जाते. नदीच्या वाळूपासून तीन शिवलिंगे तयार करून किंवा पार्वती शिवाच्या प्रतिमा आणून ही पूजा केली जाते.
‘हरिकाली’ व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं. सात धान्यांच्या अंकुरावर एका सुपात कालीची पूजा करतात. त्याच रात्री हे सूप जलाशयात विसर्जित करतात. ‘काली’ या दक्षकन्येचा शिवाशी विवाह झाल्यावर देवसभेत शिवाने तिला काली म्हटल्यावर तिला राग आला व तिने अग्नीत उडी घेतली आणि नंतर हिमालयाच्या घरी जन्मली. पुढे युद्धात तिने देवांना साहाय्य केले आणि देवांनी तिला वर दिला की जे स्त्री-पुरुष हिरवळीवर कालीची पूजा करतील त्यांना सौख्य, सौभाग्य व दीर्घायु प्राप्त होईल अशी लोककथा आहे.
यानंतर गणेश चतुर्थी पार पडली की भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. आदिवासींकडे तर गौरीची कहाणी सांगणारे स्वतंत्र गीतच आहे. या गीतात खेळून आलेली गौर सासू, सासरे, नणंद, दीर या साऱ्यांना हाक मारते, परंतु कुणीच तिला घरात घेत नाही म्हणून ती वनवासी जाते. तिच्या सर्वागावर फोड येतात ते पाहून पाटलीणही तिला आपल्या दारावरून हाकलते आणि पुढे-
गेली वारल्या वलेल्या
गेली कोल्याच्या वलेल्या
पाणी पाजा गवरायाला
वारलीन घराबाहेर आली
कोलीन घराबाहेर आली
गऊर पुढे निघून गेली
गेली महाराजे वलेला
हाका मारी महारीनबाई..
आणि महारीणबाई गौरीला घरात नेऊन पाटावर बसवते, आंघोळ घालून जेवायला वाढते असा कथाभाग पुढील गीतात आला आहे.
या वारली आदिवासींच्या कथेप्रमाणे आपल्याला प्रदेशपरत्वे जसे गौरी आणण्याच्या पद्धतीत वैविध्य दिसते तसेच कहाण्यांमध्येही ती विविधता आढळते.
एकदा गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी घरी गौर आणण्याचा हट्ट धरला होता. पण त्याला हे शक्य नसल्याने तो नदीत उडी मारून प्राणत्याग करण्यास निघाला. तेवढय़ात एका म्हाताऱ्या सवाष्णीने त्याला असे करण्यापासून परावृत्त केले. तो ब्राह्मण तिला घरी घेऊन आला आणि दरिद्री ब्राह्मण समृद्ध झाला. त्यानंतर या सवाष्णीने तू मला नदीवर सोडून ये असे सांगितले. परंतु आता जर ही गेली तर घरी दारिद्रय़ येईल, असे त्याला वाटले. त्याने आपल्या मनातील ही चिंता तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, विसर्जनानंतर मी तुला वाळू देईन ती तू घरभर टाकलीस की तुझी संपत्ती जाणार नाही.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची कहाणी आणखी थोडी वेगळी आहे. राजाने आपल्या आवडत्या व नावडत्या राण्यांपैकी नावडतीला राजवाडय़ाबाहेर काढल्याने ती मुलासह एकटी राहू लागली. एके दिवशी राणीच्या दोन मावशा तळ्याकाठी असणाऱ्या दास्यांकडे चौकशी करू लागल्या आणि त्यांनी राणीविषयी विचारले. त्या आवडत्या राणीकडे गेल्या. परंतु तिने त्यांना हाकलले. मात्र जेव्हा त्या नावडत्या राणीकडे गेल्या तेव्हा गरिबी असूनही तिने त्यांचा आदरसत्कार केला. त्यांनी तिला जर तू महालक्ष्मीची पूजा केलीस तर तुला वैभव प्राप्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे तिने महालक्ष्मीची पूजा करताच तिला वैभव प्राप्त झाले आणि राजाही तिच्याकडे आला. तेव्हापासून सौभाग्यप्राप्ती व समृद्धीसाठी महालक्ष्मीचे पूजन केले जाते.
भाद्रपद महिन्यात शेतात पीक उभे राहिलेले असते. आदिवासींकडे ‘नवे खाण्याचा’ सणही भाद्रपदातच होतो. तेव्हा शेतात तयार झालेले हळव्या जातीचे भात प्रथम देवाला अर्पण केले जाते व नंतर स्वत: खाल्ले जाते. कुठलेही नवीन तयार झालेले अन्न हे देवाला दाखवून मग स्वत: खाण्याची पद्धत तर भारतीय संस्कृतीत सर्वत्र आढळते. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे आजही महालक्ष्मीसमोर धान्याची रास घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा (सोवळ्याची) आणि कनिष्ठा (ओवळ्याची) या दोघी घरात विराजमान झाल्या की ज्येष्ठेसमोर तांदळाची व कनिष्ठेसमोर गव्हाची रास केली जाते. एकप्रकारे धान्यांच्या राशीची पूजाही याप्रसंगी होते.
धान्यरूपात स्त्री देवतांचे पूजन फक्त भारतात नाही, तर इतरत्रही केले जाते. इंडोनेशियात भात हे मुख्य पीक असून समृद्धीचे प्रतीक आहे. स्थानिक परंपरेनुसार इंडोनेशियाच्या राजांच्या लक्ष्मी या त्याच्या पत्नीरूपात राहत आणि जेव्हा त्याच्या एका राणीरूपी लक्ष्मीचे विष्णूवर प्रेम जडले व ती या प्रेमामुळे मरण पावली. तिला तेथे पुरण्यात आले. तेथे अनेक वनस्पती उगवल्या. भाताचे रोप तिच्या नाभीतून उगवले म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरले.
सुदानमधील लोक ही समृद्धीची देवता स्वर्गातून येऊन पृथ्वीवर भात उत्पन्न करते असे मानतात. या सर्व लोकश्रद्धांनी, लोकसंकेतांनी, पुराणकथांनी आपले अस्तित्व विविध सण, रूढी व विधींद्वारा अबाधित राखले आहे, हे धान्याची रास देवीसमोर मांडण्याच्या विधीतून आपल्याला प्रकर्षांने जाणवते.
सी.के.पी. सोमवंशीय क्षत्रिय, मराठा समाज तसेच कुणबी, वारली आदिवासी यांच्याकडे गौर येते ती पानाफुलांच्या स्वरूपात! निसर्गाशी असणारे साहचर्य, तादात्म्य आणि कृतज्ञता व्यक्त होते ती अशा पानाफुलांचे वैभव आपल्या घरात मांडण्यातून! या सर्वाकडची गौर ही तेरडय़ाच्या रूपात येते. सोमवंशीय क्षत्रिय समाजात मात्र तेरडय़ाबरोबरच, कोंबडा (वनस्पती), इदई व वासाच्या फुलाच्या पाच डहाळ्याही आणल्या जातात. विविध वनस्पती स्त्रीदेवतेच्या प्रतिकरूपात पुजण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. शाकांबरी/ बनशंकरी ही अशीच एक देवी आहे. विष्णुधर्मसूत्र, महाभारताचे वनपर्व, पद्मपुराण यातही तिचा उल्लेख आला आहे. दुष्काळ पडला असता लोकांचे अन्न-पाण्यावाचून मृत्यू होऊ लागले म्हणून देवीला लोकांची दया आली. तिने आपल्या अंगातून अनेक शाकभाज्या उत्पन्न केल्या आणि लोकांची भूक भागवली, म्हणून तिला शाकांबरी हे नाव मिळाले. अशी शाकांबरी देवीची उत्पत्ती कथा देवीभागवतात दिली आहे.
स्त्री-देवतांचे पूजन वनस्पतींच्या रूपात होते, तसेच तांदळाच्या रुपातही होते. याचा प्रत्यय आपल्याला गौरीच्या कहाणीत आला आहे. ब्राह्मणाला म्हातारी जलाशयाकाठी पोहचल्यावर सांगते की ‘दरवर्षी असेच जलाशयावरून खडे आणून माझे पूजन कर त्यांना माझेच रूप समज!’ म्हणूनच नदी, तलाव, सरोवर अशा पाणवठय़ाच्या जागेवरून दगड-खडे आणून गौरी म्हणून त्यांचे पूजन होते. एकूणच पाणवठय़ाचे ठिकाण आणि तेथे असलेल्या जलदेवता आजही लोकमानसात ‘साती आसरा’ म्हणून ओळखल्या जातात. पाणवठय़ावरून खडे आणण्याच्या संकेतात लोकमानसाची श्रद्धास्थाने आणि या संकेतांमार्फत येणारे सुप्त प्रवाह आपल्याला जाणवतात. जलदेवतांना इजिप्शियन संस्कृतीतही महत्त्व आहे. ‘इसीस’ ही जलप्रलय करणारी देवता आहे. ती
जलप्रलय करून शेतांना पाणीपुरवठा करते म्हणून इजिप्शियन संस्कृतीत ‘इसीस’ला विशेष स्थान आहे. गौरीच्या सणाच्या वेळी जसे पाणवठय़ाला महत्त्व आहे तसेच खड्डय़ांनाही!
गौरीला जेव्हा निरनिराळे दागिने घालून स्त्रिया नटवतात, तेव्हा त्या तिचे सौभाग्य अधोरेखित करतात. या सौभाग्य अलंकारातून समृद्धीचा प्रत्यय येतो आणि अशी समृद्धी आपल्या घरी चिरस्थायी असावी ही इच्छा त्यातून व्यक्त होते.
गौरी पाना-फुलांच्या असोत किंवा सुगड रचून उतरंड मांडलेल्या, मानवी मन या सर्वानाच मनुष्याकृती आकार देऊन या सर्व प्रतिकांशी आपली नाळ अलवार जोडतो. म्हणूनच मुखवटा असलेली गौर आपल्याला पाहायला मिळते. मुखावाटे माणसाचा प्राण जातो असे मानतात म्हणजेच मुख असल्यावर प्राण आहे, चैतन्य आहे या भावनेतूनच गौरीचा मुखवटा लावून पूजा करण्याची पद्धत दिसते. बोहाडय़ासारख्या उत्सवाची सांगता देवीच्या देवळात होते. देवीचे सोंग घेताना मुखवटा लावलेला असतो. तिथेही ज्या देवाचा मुखवटा आपण धारण करतो, त्या देवाचा संचार आपल्यात होतो अशी लोकश्रद्धा आहे.
गौरीचे आगमन तेरडय़ाचे रोप मुळापासून सुपात घेऊन असो किंवा सुगडीच्या स्वरूपात असो, ती घरी येते तेव्हा ‘सोन्यामोत्यांच्या पावलांनी ये..’ असे म्हटले जाते. ‘गौरी गौरी काय पाहतेस?’ असे विचारले की ती घरातल्या समृद्धीचे वर्णन करते. गौरीचा सण हा खास माहेरवाशिणींचा समजला जातो आणि त्याचा प्रत्यय लोकगीतातूनही येतो.
‘‘बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गनपतीच्या सनाला.’’
या गौरीच्या वेळी आलेल्या माहेरवाशीणींचे थेट साखरचौथ होईपर्यंत माहेरपण करतात.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे १६ भाज्या (चटण्या, कोशिंबीरी) पाच तऱ्हेच्या पोळ्या, पाच प्रकारच्या भजी करण्याची पद्धत आहे. भाज्यांमध्ये अंबाडी, भेंडी, पडवळ, कारलं, डांगर, दुधी, श्रावणघेवडा, मेथी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, मटार, वालाच्या शेंगा, गवार, अळू, चाकवत या भाज्या असतात.
कोशिंबिरीत मुळा, गाजर, सफरचंद, डाळिंब, काकडी, केळी, मिरचीचे पंचामृत, ज्वारीचे आंबील असते. चटण्यांमध्ये तीळ, खोबरे, कारळे, जवस, डाळ्या इ.च्या चटण्या केल्या जातात. बटाटा, गलका, अळू, मिरची, पालक अशा पाच भाज्या केल्या जातात. पुरणपोळी, सांज्याची पोळी, खव्याची पोळी, गुळपोळी, तूप-साखर पोळी या पाच प्रकारच्या पोळ्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. प्रदेशपरत्वे-स्थानपरत्वे यात थोडाफार फरक आपल्याला दिसतो.
सीकेपी लोकांकडे घावन घाटलं, लाल माठाची भाजी असते आणि गौर जेवते त्या दिवशी मटण-वडय़ांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. एखाद्या घरात जर गौरी आणि गणपती दोघेही असतील तर त्या दोघांमध्ये पडदा लावण्यात येतो. गौरीच्या विसर्जनाच्या वेळी नैवेद्यात मुरडीचा कानवला करण्यात येतो. मुरडीप्रमाणे ‘तू पुढल्या वर्षी परत ये’ हा संकेत त्यात असतो आणि वारली आदिवासींकडे
‘रानकेलीचा गाभा पिवला ग
गौराय नेसली पिवला पातल गं
गौरानं घेतल्या लाह्य़ा कुरमुऱ्या ग
गौराय चालली दरया पुजाया ग..’
असे म्हणून गौरी विसर्जन केले जाते. या सर्वामधून येणारी आणि टिकणारी समृद्धीच प्रतित होते.
स्त्री देवतांची आराधना विविध रूपात केली जाते. कधी समृद्धी, सौभाग्य, सुफलनाचे विधी इ.मार्फत ती होते, तर कधी प्रजननक्षम मातृदेवता म्हणून पुजली जाते. या स्त्री देवतांची आराधना करताना निरनिराळ्या प्रतीकांचा स्वीकार केला जातो आणि गौरीच्या सणातून ही निरनिराळी प्रतीकं, विविध माध्यमे, विधी, पूजा करण्याची पद्धत याद्वारे एकत्र आलेले दिसतात. गौरीचा मुखवटा लावून, तांदळा म्हणजेच दगड इ.द्वारे पूजन, धान्याची रास तिच्यासमोर मांडणे आणि निरनिराळ्या वनस्पतींच्या डहाळ्या आणून त्यांचे पूजन करणे या सर्व प्रकारातून स्त्री देवतांचे पूजन करताना त्या निरनिराळ्या माध्यमांद्वारे आपले अस्तित्व दाखवतात आणि पुजली जातात. त्या विविध माध्यमांचा अंगीकार निरनिराळ्या जाती-जमातीतील लोकांनी केलेला दिसतो. स्त्री देवतांच्या पूजनाची माध्यमे निरनिराळी असली तरी गौरी ही देवता समृद्धी, संपन्नता, सौभाग्य चिरंतन राहण्याच्या उद्देशानेच पुजली जाते. गौरीच्या कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा तिचे विसर्जन केले जाते, तेव्हा घरातील समृद्धी अखंड राहण्यासाठी वाळू आणून ती घरभर टाकली जाते. या लोकसंकेतातून समृद्धी चिरकाल अबाधित राहो हीच भावना दिसते. या ज्येष्ठेची पूजा भारतभर केली जाते. हिमाचल प्रदेशात ही बिह माता म्हणून ओळखली जाते. या देवीचे सापडणारे गीत आपल्याला वारली गाण्यातल्या गौरीशी साधम्र्य दाखवते.
‘जेठो मीनो त्वार वार,
बाह्मणे घरे आई बी-मां
चुडदे नाके पिजरे केशे आई,
ब्राह्मण देवे नहा धोआ
बीअ पापो मेऊवे ध्वाक. ओं
प्रात: स्नान करा,
हाथे पैरे महदसीरी गुंदा
चन्द्र, सूरज बी-बचात,
नरक तीड स्वर्ग सीड
धूप-दीप नैईवेद्य,
पण्ड प्रणाम प्रशन करा।’


--------- लोकसत्ता 

Monday 3 September 2012

कोकणातील गरम पाण्याचे झरे


पृथ्वीतलावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे वा उन्हेरे (याला कुणी उन्हवरे, उन्हाळे, गरम कुंडे असेही म्हणतात) होत. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत यालाच "हॉट स्प्रिंग' वा "थर्मल स्प्रिंग' असे म्हणतात.

पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. काही उन्हेऱ्यांतून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसाने मंदिरे बांधली आहेत. उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त केले आहे. अशा जागा यथावकाश जत्रा-यात्रांची ठिकाणे व आता पर्यटनस्थळे बनल्या आहेत. 
महाराष्ट्रात विविध भागांत शोध घेता आतापर्यंत 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इ. जिल्ह्यांत), बाकी उरलेले सर्व उन्हेरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हेरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळरेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंश रेषेला धरून हे उन्हाळे आहेत. यातील काही प्रमुख उन्हेऱ्यांचा हा परिचय. 
गणेशपुरी : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्‍यात तानसा नदीच्या पात्रात व काठाने किमान 60 ठिकाणी उष्णोदकाचे उमाळे आहेत. खुद्द गणेशपुरीला श्री नित्यानंद महाराजांचे समाधिस्थानाजवळ व्यवस्थित बांधून काढलेले व लोकमान्यता पावलेले गरम जलकुंड आहे. या परिसराच्या मागच्या बाजूला तानसा नदीचे पात्र आहे. तानसा नदीवरच्या पुलावरून उत्तरेकडे पाहिले असता नदीच्या मध्यातील बेटवजा भाग दिसतो. इथे वडांच्या वृक्षांनी वेष्टित श्री पातालबाबाचे समाधिमंदिर आहे. या बेटावर काही गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे नदीपात्र उत्तर-दक्षिण आहे. बेटाच्या पल्याड नदीपात्रात उतरून उत्तरेकडे चालत गेल्यास नदीपात्रातच गरम पाण्याचे अनेक झरे आढळून येतात. सगळे मिळून इथे डझनभर तरी झरे असावेत. यापैकी नदीपात्राच्या ऐन मध्यावर एक मोठे कुंड आहे. आसपासच्या सर्व कुंडांमध्ये या कुंडाचे तापमान सर्वाधिक, म्हणजे सुमारे 55 अंश ते 58 अंश सें.ग्रे. असते. त्यामुळे या कुंडास "अग्निकुंड' असे योग्य नाव दिलेले आहे. या कुंडात तांदूळ टाकल्यास भात शिजतो, अशी समजूत असल्याने जागोजागी गरम पाण्याच्या प्रवाहात तांदूळ टाकलेले दिसून येतात. उत्तर दिशा धरून चालत राहिल्यास तानसा नदीच्या पलीकडल्या काठावर आपण पोचतो. इथे रस्त्याच्या पल्याड शिवअनूसया मंदिर आहे. इथे दोन गरम पाण्याची कुंडे असून, त्यापैकी एकाला "अनसूया कुंड' असेच नाव आहे. इथूनच निंबवली- गोरूड रस्त्याने वज्रेश्‍वरीकडे जाणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता खराब असल्याने गणेशपुरीला जाऊन मोठ्या चांगल्या रस्त्याने वज्रेश्‍वरीला जावे हे बरे. वज्रेश्‍वरी-भिवंडी रस्ता आणि तानसा नदीच्या दरम्यान अनेक मंदिरे व गरम पाण्याची कुंडे आहेत. वज्रेश्‍वरी बस स्थानकालगत श्री रामेश्‍वर महादेवाचे मंदिर आणि कुंड आहे. जवळच नदीपात्रात चार-पाच कुंडे आहेत. यांना "अकलोली कुंडे' असे म्हणतात. त्यापैकी सूर्यकुंड आणि चंद्रकुंड प्रसिद्ध आहेत. 
सातवली : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्‍यात टिकालाजवळ हे विशेष प्रसिद्ध नसलेले उन्हाळे आहे. महामार्गावरूनच डावीकडे (पश्‍चिमेकडे) हिरवागार वृक्षाच्छादित परिसर आणि मंदिरांचे कळस दिसतात. मंदिरे शंकर आणि हनुमानाची आहेत. वांद्री या छोट्या नदीच्या डाव्या तीरावर ही मंदिरे आणि लहान-मोठी डझनभर गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तीर्थकुंड सर्वांत उष्ण व महत्त्वाचे आहे. जवळच अगदी साधी धर्मशाळा आहे. अहमदाबाद रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेकडे हाय-वे ढाबा आहे. भोजनाची सध्या तरी ही एकमेव व्यवस्था आहे.  
उन्हेरे पाली (गणपती) : खोपोलीजवळचे गणपतीचे पाली हे अष्टविनायकांपैकी एक. खोपोलीकडून पलीकडे जाताना पालीच्या अगदी जवळ पोचलो, की उजवीकडे उन्हेऱ्याची पाटी दिसते. उन्हेरे मुख्य रस्त्यापासून जेमतेम एक किलोमीटर आत आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. पार्किंगसाठी मोठी विस्तीर्ण जागा आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळच दोन कुंडे- एक मोठे, एक छोटे- आहेत. जवळच भक्तनिवास आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्नानाची स्वतंत्र सोय असणारा कायमस्वरूपी मंडप आहे. पार्किंग जागेजवळ चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्या आहेत. जेवणसुद्धा आगाऊ कल्पना दिल्यास तयार करून देतात. पालीला मुक्कामास राहूनही हे ठिकाण साधता येते.  
सव : मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो.  
पालवणी : मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तीरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची एकाकी मंदिरे व जवळच नदीकाठाने उन्हाळे आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून, नदीच्या काठाने "महाराष्ट्र वृक्ष' म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तामणाची असंख्य झाडे आहेत. उन्हाळ्यात भेट दिल्यास सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षिनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) सहजी लक्षात येत नाही. त्यामुळे जरा लक्ष ठेवावे लागते. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट बने आहेत. कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच ओबडधोबड पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे, असे याचे वर्णन करता येईल.
दापोली : खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडला उन्हवऱ्याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरत जातो. हा रस्ता आपल्याला थेट फरारीच्या खाडीवर घेऊन जातो. एसटी स्थानकाजवळील मोकळ्या जागेत गाडी लावता येते. दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्‍य दिसते. मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड, असा याचा लौकिक आहे. (तापमान 70 अंश सें.ग्रे.! अबब!!) त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. लहान मुलांना (व स्वतःलाही) दूर ठेवावे. पाण्याची (वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. समोरच्या डोंगरउतारावरील मदरशाची आधुनिक पद्धतीची इमारत पाहून थक्क व्हायला होते. शाळेची इतकी सुंदर इमारत पुण्यालाही नसेल. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई-गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान 40 अंश सें.ग्रे. आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान 35 अंश सें.ग्रे. आहे. अशा ऊन पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्‍चर्य वाटते. "मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते,' इ. माहिती चहावाल्याने पुरवली. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे. खाण्याची सुविधा नीटशी उपलब्ध नाही. मुक्कामाचीही सोय नाही. अर्थात खेड वा दापोलीला मुक्काम करून इथे येणे सोपे आहे. 
राजापूर राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. या गंगातीर्थाच्या रस्त्यावर उन्हाळे आहेत. अर्जुना नदीच्या काठाने ही उन्हाळे आहेत. जवळच श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. कुंड बंदिस्त आहे. फाट्यापासून 1.5 किलोमीटरवर आहे. 
तुरळ : मुंबई-गोवा मुख्य महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात राजवाडीजवळ हे कुंड आहे. रस्त्यावर "हॉट स्प्रिंग' नावाचेच हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारून मागे गेलेली पायवाट उन्हाळ्याकडे जाते. जवळ राजगंगा नदी व हॉटेलला लागून वाघजाई चंडिकामाता मंदिरे आहेत. 
राजवाडी :  चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पायऱ्यांची वाट कुंडाकडे जाते. शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळ्यांवरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुंड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणाऱ्या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्‍य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीव कामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, मात्र राहण्या-जेवणाची सोय नाही. 
अरवली : गोवा महामार्गावरील गड नदीचा पूल ओलांडला (गोव्याकडे जाताना) की लगेचच डावीकडे हे कुंड आहे. जवळच वरदाई, कालिमाता, केदारनाथाची मंदिरे आहेत. कुंडाचे पाणी फारसे स्वच्छ नाही. 


कोकणातील सर्वच्या सर्व 22 कुंडे चार दिवसांत पाहणे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी स्वतःचे वा भाड्याचे वाहन हवे. त्याचा कार्यक्रम असा ....

दिवस पहिला : मुंबईतून प्रवासास सुरवात करावी. अहमदाबाद महामार्गाने पालघर तालुक्‍यातील दहिसर (तर्फे मनोर) गाठावे. हमरस्त्याला लागूनच हलोली येथील पाटीलपाडा आणि पाडोसपाडा कुंडांना भेट देणे. तेथून मुंबईच्या वाटेवर टिकालाजवळ सातवलीला यावे. त्यानंतर मनोरमार्गे पालघरच्या वाटेवरील कोकनेर पाहावे. परत येऊन मनोरला हमरस्ता सोडून वाड्याचा रस्ता पकडावा. वाटेत थोडी वाकडी वाट करून खारिवलीजवळ पिंगेमान येथे वैतरणेच्या पाण्यात बुडलेली कुंडे लांबूनच पाहावीत. पुन्हा हमरस्ता गाठून मांडवी फाट्यावरून गणेशपुरी- वज्रेश्‍वरी जवळ करावे- अर्थात रात्रीच्या मुक्कामासाठी. 
दिवस दुसरा : पहाटे लवकर उठून गणेशपुरी, निंबवली, गोराड, अकळोली- वज्रेश्‍वरी परिसरातील गरम पाण्याची कुंडे स्नानकर्मासह व्यवस्थित पाहून घ्यावीत. आसपासची मंदिरे व समाविष्ट स्थाने पाहून होईपर्यंत दुपार उजाडते. इथेच जेवण करून अंबाडीमार्गे टिटवाळ्याला गणेशदर्शन करावे. तेथून मधल्या घाटमार्गाने अंबरनाथ जवळ करून बदलापूर- कर्जतमार्गे खोपोली फाट्यावरून गणपती पालीकडे प्रयाण. उन्हेऱ्याची कुंडे पाहून मुक्कामासाठी पालीस जावे.  
दिवस तिसरा : पालीवरून गोवा महामार्गास लागावे व थेट महाड गाठावे. महाड परिसरातील कोंडिवते व सवची कुंडे पाहून महामार्ग सोडून उजवीकडे मंडणगड गाठावे. (दुपारचे जेवण,) उन्हवरे (पालवणी) करून उन्हवरे (दापोली) ला जावे. तेथून खेडला मुक्कामासाठी यावे. गावाबाहेरील मरू घातलेले उन्हवरे पट्टीचे उन्हाळे पाहून गावातच मुक्काम करावा. 
दिवस चौथा: पहाटे खेड सोडावे. चिपळूण मार्गाने प्रथम अरवली, नंतर तुरळ, राजवाडी, फणसावणे, मठ (पाण्याखाली) इथली कुंडे पाहून राजापुरास (हॉटेल राजापूर) दुपारचे जेवण घ्यावे. नंतर राजापूर कुंडास भेट द्यावी, की संपला प्रवास।
 
-------------------- सकाळ 

अंबरनाथ



मुंबईनजीकच्या काही स्थळांनी आपलं वैशिष्टय़ जपताना पर्यटकांचं आकर्षण म्हणून नावलौकिक मिळवलाय. हाकेच्या अंतरावरील वज्रेश्वरी-अकलोली ही ठिकाणं गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रख्यात आहेत. शहरी गजबजाटातही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे तर पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे. घारापुरी हे त्रिमूर्तीचे बेट म्हणून जागतिक सांस्कृतिक वारसायादीत समावेश झाल्याने त्याचं नाव जगभर झालंय.
मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ मात्र एक लोकल गाडय़ांचं टर्मिनस स्थानक म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. त्याव्यतिरिक्त काडेपेटय़ांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे ठिकाण इतपतच लोकांना परिचित आहे, पण औद्योगिकीकरणात झपाटय़ाने बदलत्या या शहराला प्राचीन इतिहासापासून मानाचं स्थान आहे हे तेथील प्रख्यात शिवमंदिरामुळे. आज शहरीकरणाचा अंगरखा धारण करतानाही अंबरनाथ पूर्वेकडील या मंदिर परिसराचा सारा मोहल्ला आपल्या मूळच्या ग्रामीण खुणा जागोजागी दाखवतोय.. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सुमारे दीड कि.मी.वर हे एक हजार वर्षांचे पुरातन मंदिर पाहताक्षणीच एखाद्या परडीमध्ये ठेवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छासारखे भासते. भारतातील प्रत्येक प्रांतामधील मंदिर स्थापत्य कला ही अजोड कलाकृती असल्याने त्यातील काही मंदिरांनी हजारो वर्षांपासून आपलं स्थान अबाधित ठेवलंय. त्यातील अंबरनाथच्या या शिवमंदिराला आता हजार वर्षांचा काळ लोटला आहे. हेमाडपंती वास्तुकला म्हणून या मंदिराचा लौकिक जनमानसात असला तरी स्थापत्यशास्त्रीय भाषेत ही ‘भूपिज’ शैली म्हणून ओळखली जाते.
‘वालधुनी’ ऊर्फ ‘वढवाण’ नदीच्या एका उपनदीवर तथा ओढय़ावरील काठावर हे मंदिर उभारले आहे. सध्या सांडपाणी वाहून नेणारा हा ओढा मंदिराच्या अनोख्या सौंदर्याशी पूर्णत: विसंगत वाटतो, तसेच सभोवतालच्या गलिच्छपणाने मंदिर परिसराला एक ओंगळ स्वरूप आणून दिलंय. शिलाहारराजा छित्तराजने हे मूळ मंदिर बांधले असले तरी हे बांधकाम पूर्णत्वास नेऊन त्याचा जीर्णोद्धार छित्तराजपुत्र ‘मुम्मुणी’ ऊर्फ ‘ममवानी’ यांनी इ.स. १०६० मध्ये केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आढळतो. आता मंदिराचा कळस अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी कळसाचे काही भग्नावशेष मिळवण्यात बर्जेस सारखे संशोधक यशस्वी झालेत.



या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारेआहेत. प्रमुख प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाणमूर्ती प्रथमत: आपलं लक्ष वेधून घेते. या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव-रेखीव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचे जागोजागी जाणवते. हेमाडपंताच्या काळाआधीपासून जी ‘भूपिज’ शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिले मंदिर म्हणून गणले जाते.
मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे.
मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो.
मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे.
मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे.

हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे. 
मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.
शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या 
लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात.

सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.

अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शिलाहारांची राजसत्ता होती. त्याकाळी बांधले गेले. आपल्या प्रदीर्घ राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली. त्यातील हे अंबरनाथचे एकमेव शिवमंदिर आजही आपलं असित्व टिकवून आहे. येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भावप्रकट करताना त्यातून तत्त्वज्ञान-संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे. या शिल्पातून मानवी जीवनाला पूरक असा जो संदेश दिला आहे. त्यातून भारतभूमीचे तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे.. कोणतीही लिखित भाषा तथा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जाते.


-------------- लोकसत्ता 

कोल्हापुरी रेसिपीस

 

कोल्हापुरी चिकन

साहित्य:

  • १ किलो चिकन, २/३ कप: दही
  • ग्रेटेड नारळ, १ कापालेला टोमॅटो
  • लसनाची पेस्ट, १ चम्मच कोथिंबीर
  • १चम्मच लाल तिखट, हळदी पावडर २ चम्मच, ,
  • १-२ कडीपत्ता, २ टुकड़े दालचीनी
  • ६ टुकड़े: लौंग, काळी मिर्च, २ कांदे,
  • २ चम्मच तेल, मीठ चवीनुसार.
  • लिंबुचा रस २ चम्मच
कृती:
  • वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी,काजू, धने,शहाजिरे,ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळं जिन्नस किंचित कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका.
  • कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
  • नंतर वरील वाटण घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला.
  • दोन मिनिटाने चिकन घालून ते परता. बेताचे पाणी घालून ढवळा.
  • १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या.
  • वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

----------------------------------------------------------------------------------

कोल्हापुरी मटन रस्सा

साहित्य:

  • १/२ किलो मटण, ४ मोठे बटाटे,
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ कांदे
  • १/२ ग्रेटेड नारळ, ८ तुकडे लौंग
  • ६-७ लाल मिरची
  • १ कप कोथिंबीर, १ चमच्या पेस्ट लसुंन
  • १ चमच्या हळदी पावडर, खस-खस
  • १ चमच्या सौंफ
  • तेल, मीठ.
कृती:
  • मटणाच्या तुकड्यावरती मीठ, हळद आणि लसूण पेस्ट घाला. १ तसापर्यंत मिक्स करून घ्या.
  • २ चम्मच तेल आणि लौंग,पेपयरकॉर्न, खसखस, लाल मिरची एकत्र करून टाळून घ्या. कांदा लाल होई पर्यंत टाळून घ्या आणि नारळ व टोमॅटो ही टाळून घ्या.
  • पेस्ट आणि एक मटण तुकडा घालून बघा. /li>
  • प्रेशर कुकर मध्ये तेल गरम करून घ्या आणि मटण व बटाटा घाला. त्यानंतर चांगल्या प्रकारे वाफाळून घ्या. मसाला पेस्ट आणि मीठ घाला. त्यानतर पाणी घाला आणि मटण नरम करून घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यामधे कडून घ्या.
  • त्यानंतर कोथिंबीर घालून तुम्ही सर्वे करू शकता.

----------------------------------------------------------------------------------

फिश् राइस

साहित्य:

  • ६ मासे
  • ३ बटाटे ( कापलेले), ३ कप कोथिंबीर पाने (धुतलेलि)
  • ८ लसूण, लौंग
  • २-६ हिरव्या मिरची, १ पीस आले,
  • १ चमच्या हळदी पावडर
  • २ चमच्या साखर, ४ कप खोबरे दूध
  • २-४ पीस कोकम
  • मीठ चवीनुसार
कृती:
  • मासे कट करून त्यामध्ये थोडे मीठ आणि हळदी पावडर घालून बाजूला ठेवा. थोड्या पाण्यामध्ये कोथिंबीर, आले, लसूण, चटणी आणि साखर याची पेस्ट करा.
  • एका भांड्यामध्ये नाराळाचे दूध आणि मीठ घालून बुड्बूडे येई पर्यंत उष्णता द्या.
  • त्यानंतर त्यामध्ये बटाटे शिजवाण्यासाठी टाका आणि मासे ही मिक्स करा.
  • माशांना रंग येई पर्यंत शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये कोकम घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि तुम्ही सर्वे करू शकता.

 ----------------------------------------------------------------------------------

अंडाकरी

साहित्य:

  • ६ अंडी , १ मध्यम कांदा
  • १/२ कप सुकं खोबरं
  • १/४ टीस्पून कांदा-लसूण मसाला
  • ३ टेबलस्पून कांदा बारीक चिरून
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला
  • १ १/४ टीस्पून लाल तिखट
  • १ टोमॅटो चिरून
  • ३ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
  • १ कप तेल
कृती :
  • तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
  • मग त्यात सुकं खोबरं आणि कांदा लसूण मसाला घाला आणि ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
  • एकीकडे ३ अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. १ अंड नंतर ग्रेवीमध्ये वापरण्यासाठी बाजूला राहू दे .
  • पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
  • वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. १ अंड फोडून घाला आणि अलगद मिक्स करा. वरून झाकण ठेवा. अंड शिजू दे.

----------------------------------------------------------------------------------

नवाबी बिर्यानी

साहित्य:

  • १ किलो चिकन ( कापलेले)
  • १ १/२ कप: मोठा तांदूळ, १/२ पाण्यामध्ये धुतलेला
  • २ कप दही
  • 1१ कप: तूप, १ कप दूध
  • १० पीस पेपयरकॉर्न्स ८ पीस लौंग
  • ४ मध्यम आकारच्ये कांदे ( चिरलेले)
  • १ कप: कोथिंबीर (चिरलेली) १/२ कप: बदाम
  • ३ चमच्या लसूण आले पेस्ट, २ चमच्या लाल तिखट
  • १ चमच्या गरम मसाला पावडर, १ चमच्या जिरे आणि शहजीरा
  • १ चमच्या हळदी पावडर, १ चमच्या मीठ चवीनुसार
कृती:
  • लसूण आले पेस्ट, दही, मीठ चिकन मध्ये मिक्स करा आणि १ तासापर्यंत लांब ठेवा.
  • ) १/२ कप तूप गरम करा आणि त्यामध्ये शहाजिरा, लौंग, पेपयरकॉर्न्स आणि बदाम मिक्स करा. चिकन, हळदी, लाल तिखट, आणि १/२ कप पाणी ही मिक्स करा. चिकन शिजे पर्यंत उष्णता द्या. त्यानंतर कोथिंबीर मिक्स करा.
  • १/४ कप तूप गरम करून कुकरला तांदूळ लावून घ्या. ३ कप पाणी मिक्स करून भात पूर्णपणे शिजवून घ्या.
  • १/४ कप तुपमध्ये कांदा रंग येई पर्यंत गरम करा.
  • मोठ्या भांड्यामध्ये भात घ्या आणि त्यामध्ये चिकन घालून मिक्स करून घ्या .
  • आता तुम्ही सर्वे करू शकता.



----------------- महाराष्ट्र माझा