Friday 14 December 2012

गोव्यातील जेवणखाण



गोव्यातील जेवणखाण ही नेहमी आनंददायक घडामोड असते. सगळ्यांच्या रोजच्या जगण्यातला महत्त्वाचा भाग या घडामोडीभोवती रचलेला असतो. गोव्याच्या संमिश्र इतिहासामुळे त्याच्या खाण्यापिण्यात असंख्य तरहा निर्माण झालेल्या आहेत. गावठी भाज्यांपासून रानडुकरापर्यंत अनेक प्रकार तेथे प्रसिद्ध आहेत. आणि अन्य कोणत्याही भागाप्रमाणे तेथेही सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी हॉटेलवर अवलंबून राहता येत नाही. पण अनेक गोष्टी हॉटेलमध्येही उत्तम मिळतात. गोव्यात प्रवास करणे हे मात्र फार जिकिरीचे काम आहे. पुन्हा महागही. उदा. मुंबईहून गोव्याला तुम्ही अडीच-तीन हजार रुपयांत जाता. म्हणजे सहाशे किलोमीटर. पण तेथून पंधरा किलोमीटरच्या गावी जायला तुम्हाला आठशे रुपये खर्च करावे लागतात. तेच तुम्ही विमानतळावरून एका मिनिटांत मुख्य रस्त्यावर येऊ शकता आणि बसने तेवढय़ाच अंतरासाठी पंधरा रुपये पुरेसे असतात. अर्थात, तुम्ही सहा-सात वाजेपर्यंत पोचलात तर.
गोव्यात दिवसाची सुरुवात नाश्त्यापासून होत नसते, तर दुपारच्या जेवणापासून होत असते. याचा अर्थ नाश्ता महत्त्वाचा नसतो अशातला भाग नाही. पण गोवेकराचा दिवसाभरातला मोठा भर असतो, तो दुपारच्या जेवणावर. बहुतेक ठिकाणी आठवडाभराचा मेनू ठरलेला असतो. पण गोवेकराचा दिवसाचा मेनू त्याला बाजारात काय हाती लागेल यावर ठरत असतो. त्यासाठी तो त्याच्या सोयीनुसार बाजारात फेरफटका टाकतो. आणि या सर्वाच्या सोयीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक-दीड वाजेपर्यंत मासळी बाजार भरलेला असतो. सकाळी लवकर कामावर जाणारी मंडळी एकतर सकाळी लौकर बाजार करून आणतात किंवा काम लवकर आटोपून मध्ये अकरा बाराच्या दरम्यान वेळ काढून ही जबाबदारी पार पाडतात. काही जणांची ही वेळ ठरलेली असते. दुकान नोकरावर सोपवून याच सुमारास मालक मासळी बाजारात असतो. काही वेळा नेहमीची गिऱ्हाईके बाजारातच व्यवहार करतात. म्हणजे दोघांचे काम होते आणि दोघांचाही वेळ वाचतो.
पुरुषमंडळी घरी नसली तर मासे आणायची जबाबदारी बायकांवर येते. त्यांच्यासाठी सायकलला टोपली
बांधलेला मासेविक्रेता किंवा डोक्यावरून टोपलीतून मासे घेऊन जाणारी मत्स्यगंधा या वरदान ठरतात. फक्त एवढंच की त्यांना बाजारातल्या इतका चॉईस मिळत नाही. नियतीवर भरोसा हा याच बाबतीत ठेवला जातो.
गोव्यात माशांना खूप महत्त्व आहे. मासे रोज, आठवडा-दोन आठवडय़ातून एकदा चिकन आणि महिन्यातून एकदा मटण. भाजी अधूनमधून, एक्स्ट्रा ऐवजी नाही. बाजारात गेलात की काही ठळक प्रकारातले मासे उपलब्ध असतात. एकतर मोठे मासे. सुरमई, पालू, मोरी, रावस, तांबसो वगरे. मध्यम आकारात पापलेट, सोनयाळे, बांगडे आदी मासे. छोटय़ा आकारात तारले, मुडदोशी, वेल्ली आदी. आणि अगदी छोटे करबट. म्हणजे त्यात अनेक प्रकारचे बोटापेक्षा लहान आकाराचे मासे असतात. मग खेकडे, सुंगटा, कालवं, खुबे, माणकी आदी प्रकार.

मुंबईत वगरे मासे घेतले की मासे विकणारी ती साफ करून, कापून देते. कोळंबी घेतली तरी सगळ्या कोलंब्या सोलून मिळतात. पण गोव्यात असले लाड मच्छीवाली करत नाही. कारण मुळात ती मासे बाजारात आणून सगळ्यांवर जेवढे उपकार करते, त्याचीच परतफेड होणे शक्य नाही, तर आणखी काय करणार तीन हजार रुपये देउन एक मीटर लांबीचा मासा घेतला तरी ती जसे आहे, जेथे आहे तत्त्वावर ती तो मासा विकते. त्यामुळे अशा वेळी मोठे मासे विकणाऱ्यांच्या बाजूलाच फक्त मासे कापून देणारे असतात. ते विशिष्ट मोबदला घेऊन हे
काम करून देतात. येथे प्राचीन बार्टर सिस्टीम अजून सुरू आहे. एकतर त्याची ठरलेली रक्कम (ही माशाच्या आकारानुसार बदलत नाही) देउन किंवा माश्याचं डोकं देऊन बाकीचा मासा कापून घेऊन जाऊ शकतात. मग हे लोक जमलेली डोकी स्वतंत्रपणे विकतात.
मासे विकणारीला किंमतीवरून खूप घासाघीस केलेली आवडत नाही. मुंबईत मासेवाली वाईट वाटून घेत नाही. पण घासाघीस केली की तो तिच्यापेक्षा माशांचा अपमान होतो. आणि मासा आपला सन्मान राखण्याच्या स्थितीत उरलेला नसतो. माशांचा सन्मान राखण्यासाठी ती मोफतमध्ये भांडते आणि माशाच्या अपमानाची परतफेड करते. तिचा मासा चांगला असेल तर तुम्ही घासाघीस करण्यासाठी मनातल्या मनात आकडा जुळवेपर्यंत एखादा जाणकार भाटकार तो मासा अलगद उचलतो. बाकीचे मासे घरी आहे तसे आणले जातात. मग मासे साफ करणे हे एक काम घरवालीवर येते. हे कसब आणि कौशल्याचे काम असते. खरा गोवेकर कधीच वाटण करून ठेव अमुक आणतो, असं कधीच सांगत नाही (आणि सांगू शकत नाही.) तो आधी आणतो आणि ते बघून घरवाली त्याचे वाटण ठरवते. गोड मासे वेगळ्या प्रकारे, बाकी मासे वेगळ्या प्रकारे, पुन्हा प्रत्येक मासा अनेक प्रकारे बनवता येतो. उदा. विसवण म्हणजे सुरमई किंवा पापलेट हे गोड प्रकारचे मासे मानले जातात. यांचा कांदा घालून रस्सा होतो तसेच ते तळायला उत्तम असतात. सुरमईचे
डोके मोठे असते. त्याच्या तुकड्यांचा कोरडा रस्सा करतात. आल्याचा स्वाद देऊन हे तुकडे भाडय़ाला लागून किंचित करपतील असे बघतात. गोव्यात गेलात आणि तिथल्या कोणत्याही किनाऱ्यावर नाही गेलात याचा अर्थ तुम्ही अंथरुणाला खिळलेले आहात असाच असू शकतो. धडधाकट असूनही जर तुम्ही गेला नाहीत तर मात्र तुम्ही चारधाम यात्रेला निघालेल्या गाडीऐवजी चुकीच्या गाडीत बसून गोव्याला पोचलात असाच अर्थ असू शकतो.
गोव्याचे किनारे मात्र बिघडत चाललेत. इथे येण्यापेक्षा चारधाम यात्रा परवडली, असे नक्की वाटावे, अशी स्थिती आहे. इथला सर्वात प्रसिद्ध किनारा कळंगुट हा अत्यंत अस्वच्छ झालेला आहे. पाण्यात खूप कचरा आहे आणि मोटर बोटिंग प्रकारामुळे समुद्रात प्रचंड डिझेल मिसळलेले आहे. गोव्यातील हा किनारा सर्वाधिक हॅपिनग होता आणि आता मी तेथे स्वत: पुन्हा जाणार नाही आणि कुणाला जायची शिफारस करणार नाही. पुन्हा तेथे खास गोमंतकीय खाद्यपदार्थ मिळायची मारामार आहे. सगळे पदार्थ पंजाबी स्टाईलमध्ये किंवा उडपी पद्धतीने बनतात. एखादं चुकार छोटंसं बार अँड रेस्तरॉं सापडलं तरच गोव्याचा स्वाद हाती लागण्याची शक्यता असते. नाश्त्यासाठी एकही गोमंतकीय हॉटेल नाही. जेवणासाठीही नाही. श्ॉकवर चांगलं जेवण मिळतं पण किमती भरमसाट आणि त्यात ते गोमंतकीय असण्यापेक्षा फॉरेनरसाठी कॉन्टीनेंटल अधिक असतं.

अलीकडच्या काळात माझा आवडता किनारा आहे पाळोळे. दक्षिण गोव्यातील हा अर्धचंद्राकार आकाराचा किनारा अद्याप स्वच्छ आहे. खूप अस्ताव्यस्त वाढलेला नाही. खाण्यापिण्याच्या दृष्टीने अधिक चांगला आहे. अत्यंत शांत. त्यामुळे अलीकडे परदेशी आणि देशीही पर्यटक या किनाऱ्याकडे अधिक आकर्षति होतात. येथे
माशांपासून पोर्कपर्यंत सर्व प्रकारचे उत्तम जेवण मिळते. येथे आम्हाला उत्कृष्ट बीफ आणि पोर्क मिळालं. आम्ही भरदुपारी एक वाजता पाण्यात शिरलो आणि तीन वाजता पाण्यातून बाहेर आलो. कडाडून भूक लागलेली. तेथे गरमागरम रोटय़ाही दुपारी साडेतीन वाजता मिळाल्या. व्वा. गोव्यात मडगाव, पणजीकडे दुपारी चारनंतर भटकताना मुंबईत वडय़ाच्या गाडय़ा लागतात त्याप्रमाणे रस्सा ऑमलेटच्या गाडय़ा लागतात. सोबत समोसे, मिर्ची भजी आणि साधी भजी असा मेनू असतो. रस्सा ऑमलेट म्हणजे नेहमीसारखे कांदा, मिर्ची, कोिथबीर, मीठ घातलेलं ऑमलेट असतं, आणि त्यावर गोमंतकीय चिकनचा जाडा रस्सा टाकला जातो. तो दुपारी ताज्या बनवलेल्या पावांसोबत मिर्ची भजी, समोसा याचा आस्वाद घेत खायचं असतं. किंवा नुसती मिर्ची भजी खाल्ली तरी चालतात. पण रस्सा ऑमलेट म्हणजे खास अनुभव असतो.
गोव्यात जावं कालवं, तिसऱ्या किंवा खेकडे खायला. त्यासाठी उंची हॉटेल्समध्येच त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे असं नाही. घरी अत्यंत साध्या पद्धतीने बनवलेले खेकडे उत्तम बनतात. कारण ते ताजे असतात. पटकन तयार होतात.
गोव्यात जावं कालवं, तिसऱ्या किंवा खेकडे खायला. त्यासाठी उंची हॉटेल्समध्येच त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे असं नाही. घरी अत्यंत साध्या पद्धतीने बनवलेले खेकडे उत्तम बनतात. कारण ते ताजे असतात. पटकन तयार होतात. उदा. मीठ, मिरची पावडर आणि हळद पावडर याचे मिश्रण लावून रवा लावून तव्यावर तेलात परतलेले खेकडे अप्रतीम लागतात. तेल नको असलेले लोक मायक्रोवेव्हमधूनही ते बनवू शकतात. फक्त त्याला सगळं वाटण लावून थोडा वेळ ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर मसाला आतपर्यंत मुरत नाही. खेकडय़ाचा रस्साही खासच असतो. त्यात छोटे खेकडे मजा आणतात. कालवांचा प्रकार अत्यंत नाजूक. पण काही ठिकाणी ही समुद्रअंडी मोठ्या आकारातही सापडतात. ती नुसत्या गरम तव्याच्या स्पर्शाने भाजून निघतात. त्याची भाजीही उत्तम बनते. छोटय़ा आकाराची कालवं असली की त्याचा रस्सा बनवतात. तसाच प्रकार तिसऱ्यांचा. अत्यंत छोट्या आकारापासून म्हणजे एका सेंटीमीटरपेक्षा लहान आकारापासून दोन इंचापर्यंतच्या आकारात िशपले सापडतात. त्याचे तळणे, रस्सा, डांगर आणि सुके सगळं अप्रतीम असतं.
हे सगळे प्रकार हॉटेलमध्ये मिळणे महाकठीण. उदा. करबटाचं (वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे मासे) हुमण खायचं असेल तर तिथल्या मित्रमत्रीणींकडे वशिला लावावा लागतो. करबटं साफ करणं महाकठीण काम. तसंच, अलीकडे स्वादापेक्षाही स्टेटस अधिक मोठा ठरतोय की काय असं वाटतं. बाजारात ओळखीचा माणूस भेटला आणि हे स्वस्त मासे घेताना बघून काय म्हणेल ही भीती अधिक दिसते. मात्र, अजून काही मासेवाल्या छोटे, स्वस्त आणि चविष्ट मासे विकत असतात. कुठल्या तरी चुली अजून या माशांची कढी उकळत असतात, एवढंच समाधान. आमची खाद्ययात्रा एका फेरीत पूर्ण होणे कठीण होतं. पण बरेच ठळक प्रकार खाऊन झाले. अजून प्रकार बाकी आहेत; ते तेथून नामशेष होण्याआधी जाऊन त्या चवीची ओळख करून देणे आवश्यक आहे.
 
-------------- लोकप्रभा 

Tuesday 25 September 2012

आली गं माहेरवाशीण.. गौराई



लाडके गौराय कधी येसी..ऽऽऽ
पानी पडलं नय (नदी) भरलं.ऽऽऽ
भादव्याला येन्, कोरे सुपावर झनकत येन्


अशा आतुरतेने गौरीची वाट सारेच पाहतात! वारली आदिवासींच्या या गीतातून गौरीच्या सणाशी जोडलेला स्नेह, उत्साह आणि झनकत ये अशी तालबद्ध आगमनाची चाहूल, आनंद या साऱ्याच भावना दाटून आल्या आहेत. तिच्या आगमनाच्या कल्पनेने मोहरलेलं मन तिला साद घालतंय!
भाद्रपद महिन्याची सुरवातच मुळी हरितालका, गणपती, ऋषिपंचमी आणि गौरीच्या तयारीच्या लगबगीने होते. अगदी पहिल्या आठ दिवसांतच इतके सगळे पार पाडताना घरातल्या बायकांची पार धांदल उडते.
एकूणच मानवाच्या सांस्कृतिक परिवेशात मातृदेवतांच्या पूजनाची प्राचीन परंपरा आपल्याला दिसते. स्त्री देवता या निरनिराळ्या स्वरूपात पूजल्या जातात. कधी धान्याच्या रूपात, कधी वृक्षांच्या, वनस्पतींच्या स्वरूपात, कधी तांदळाच्या रूपात तर कधी मुखवटय़ाच्या रूपात! त्यांचे पूजन करताना निरनिराळे मूर्त रूप आपल्या डोळ्यासमोर असते. भाद्रपदात गौरी-गणपती हे महत्त्वाचे सण असले तरी हरितालिकेचं व्रत त्याआधी पार पाडलं जातं. भाद्रपदातील तृतीयेला हे व्रत केलं जातं. पार्वतीने शंकराला इच्छित वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं, त्याचप्रमाणे बायका, कुमारिका इच्छित वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात. यावेळी शंकर-पार्वतीची पूजा करून त्यांच्यापाशी मनोकामना व्यक्त केली जाते. नदीच्या वाळूपासून तीन शिवलिंगे तयार करून किंवा पार्वती शिवाच्या प्रतिमा आणून ही पूजा केली जाते.
‘हरिकाली’ व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं. सात धान्यांच्या अंकुरावर एका सुपात कालीची पूजा करतात. त्याच रात्री हे सूप जलाशयात विसर्जित करतात. ‘काली’ या दक्षकन्येचा शिवाशी विवाह झाल्यावर देवसभेत शिवाने तिला काली म्हटल्यावर तिला राग आला व तिने अग्नीत उडी घेतली आणि नंतर हिमालयाच्या घरी जन्मली. पुढे युद्धात तिने देवांना साहाय्य केले आणि देवांनी तिला वर दिला की जे स्त्री-पुरुष हिरवळीवर कालीची पूजा करतील त्यांना सौख्य, सौभाग्य व दीर्घायु प्राप्त होईल अशी लोककथा आहे.
यानंतर गणेश चतुर्थी पार पडली की भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. आदिवासींकडे तर गौरीची कहाणी सांगणारे स्वतंत्र गीतच आहे. या गीतात खेळून आलेली गौर सासू, सासरे, नणंद, दीर या साऱ्यांना हाक मारते, परंतु कुणीच तिला घरात घेत नाही म्हणून ती वनवासी जाते. तिच्या सर्वागावर फोड येतात ते पाहून पाटलीणही तिला आपल्या दारावरून हाकलते आणि पुढे-
गेली वारल्या वलेल्या
गेली कोल्याच्या वलेल्या
पाणी पाजा गवरायाला
वारलीन घराबाहेर आली
कोलीन घराबाहेर आली
गऊर पुढे निघून गेली
गेली महाराजे वलेला
हाका मारी महारीनबाई..
आणि महारीणबाई गौरीला घरात नेऊन पाटावर बसवते, आंघोळ घालून जेवायला वाढते असा कथाभाग पुढील गीतात आला आहे.
या वारली आदिवासींच्या कथेप्रमाणे आपल्याला प्रदेशपरत्वे जसे गौरी आणण्याच्या पद्धतीत वैविध्य दिसते तसेच कहाण्यांमध्येही ती विविधता आढळते.
एकदा गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी घरी गौर आणण्याचा हट्ट धरला होता. पण त्याला हे शक्य नसल्याने तो नदीत उडी मारून प्राणत्याग करण्यास निघाला. तेवढय़ात एका म्हाताऱ्या सवाष्णीने त्याला असे करण्यापासून परावृत्त केले. तो ब्राह्मण तिला घरी घेऊन आला आणि दरिद्री ब्राह्मण समृद्ध झाला. त्यानंतर या सवाष्णीने तू मला नदीवर सोडून ये असे सांगितले. परंतु आता जर ही गेली तर घरी दारिद्रय़ येईल, असे त्याला वाटले. त्याने आपल्या मनातील ही चिंता तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, विसर्जनानंतर मी तुला वाळू देईन ती तू घरभर टाकलीस की तुझी संपत्ती जाणार नाही.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची कहाणी आणखी थोडी वेगळी आहे. राजाने आपल्या आवडत्या व नावडत्या राण्यांपैकी नावडतीला राजवाडय़ाबाहेर काढल्याने ती मुलासह एकटी राहू लागली. एके दिवशी राणीच्या दोन मावशा तळ्याकाठी असणाऱ्या दास्यांकडे चौकशी करू लागल्या आणि त्यांनी राणीविषयी विचारले. त्या आवडत्या राणीकडे गेल्या. परंतु तिने त्यांना हाकलले. मात्र जेव्हा त्या नावडत्या राणीकडे गेल्या तेव्हा गरिबी असूनही तिने त्यांचा आदरसत्कार केला. त्यांनी तिला जर तू महालक्ष्मीची पूजा केलीस तर तुला वैभव प्राप्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे तिने महालक्ष्मीची पूजा करताच तिला वैभव प्राप्त झाले आणि राजाही तिच्याकडे आला. तेव्हापासून सौभाग्यप्राप्ती व समृद्धीसाठी महालक्ष्मीचे पूजन केले जाते.
भाद्रपद महिन्यात शेतात पीक उभे राहिलेले असते. आदिवासींकडे ‘नवे खाण्याचा’ सणही भाद्रपदातच होतो. तेव्हा शेतात तयार झालेले हळव्या जातीचे भात प्रथम देवाला अर्पण केले जाते व नंतर स्वत: खाल्ले जाते. कुठलेही नवीन तयार झालेले अन्न हे देवाला दाखवून मग स्वत: खाण्याची पद्धत तर भारतीय संस्कृतीत सर्वत्र आढळते. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे आजही महालक्ष्मीसमोर धान्याची रास घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा (सोवळ्याची) आणि कनिष्ठा (ओवळ्याची) या दोघी घरात विराजमान झाल्या की ज्येष्ठेसमोर तांदळाची व कनिष्ठेसमोर गव्हाची रास केली जाते. एकप्रकारे धान्यांच्या राशीची पूजाही याप्रसंगी होते.
धान्यरूपात स्त्री देवतांचे पूजन फक्त भारतात नाही, तर इतरत्रही केले जाते. इंडोनेशियात भात हे मुख्य पीक असून समृद्धीचे प्रतीक आहे. स्थानिक परंपरेनुसार इंडोनेशियाच्या राजांच्या लक्ष्मी या त्याच्या पत्नीरूपात राहत आणि जेव्हा त्याच्या एका राणीरूपी लक्ष्मीचे विष्णूवर प्रेम जडले व ती या प्रेमामुळे मरण पावली. तिला तेथे पुरण्यात आले. तेथे अनेक वनस्पती उगवल्या. भाताचे रोप तिच्या नाभीतून उगवले म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरले.
सुदानमधील लोक ही समृद्धीची देवता स्वर्गातून येऊन पृथ्वीवर भात उत्पन्न करते असे मानतात. या सर्व लोकश्रद्धांनी, लोकसंकेतांनी, पुराणकथांनी आपले अस्तित्व विविध सण, रूढी व विधींद्वारा अबाधित राखले आहे, हे धान्याची रास देवीसमोर मांडण्याच्या विधीतून आपल्याला प्रकर्षांने जाणवते.
सी.के.पी. सोमवंशीय क्षत्रिय, मराठा समाज तसेच कुणबी, वारली आदिवासी यांच्याकडे गौर येते ती पानाफुलांच्या स्वरूपात! निसर्गाशी असणारे साहचर्य, तादात्म्य आणि कृतज्ञता व्यक्त होते ती अशा पानाफुलांचे वैभव आपल्या घरात मांडण्यातून! या सर्वाकडची गौर ही तेरडय़ाच्या रूपात येते. सोमवंशीय क्षत्रिय समाजात मात्र तेरडय़ाबरोबरच, कोंबडा (वनस्पती), इदई व वासाच्या फुलाच्या पाच डहाळ्याही आणल्या जातात. विविध वनस्पती स्त्रीदेवतेच्या प्रतिकरूपात पुजण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. शाकांबरी/ बनशंकरी ही अशीच एक देवी आहे. विष्णुधर्मसूत्र, महाभारताचे वनपर्व, पद्मपुराण यातही तिचा उल्लेख आला आहे. दुष्काळ पडला असता लोकांचे अन्न-पाण्यावाचून मृत्यू होऊ लागले म्हणून देवीला लोकांची दया आली. तिने आपल्या अंगातून अनेक शाकभाज्या उत्पन्न केल्या आणि लोकांची भूक भागवली, म्हणून तिला शाकांबरी हे नाव मिळाले. अशी शाकांबरी देवीची उत्पत्ती कथा देवीभागवतात दिली आहे.
स्त्री-देवतांचे पूजन वनस्पतींच्या रूपात होते, तसेच तांदळाच्या रुपातही होते. याचा प्रत्यय आपल्याला गौरीच्या कहाणीत आला आहे. ब्राह्मणाला म्हातारी जलाशयाकाठी पोहचल्यावर सांगते की ‘दरवर्षी असेच जलाशयावरून खडे आणून माझे पूजन कर त्यांना माझेच रूप समज!’ म्हणूनच नदी, तलाव, सरोवर अशा पाणवठय़ाच्या जागेवरून दगड-खडे आणून गौरी म्हणून त्यांचे पूजन होते. एकूणच पाणवठय़ाचे ठिकाण आणि तेथे असलेल्या जलदेवता आजही लोकमानसात ‘साती आसरा’ म्हणून ओळखल्या जातात. पाणवठय़ावरून खडे आणण्याच्या संकेतात लोकमानसाची श्रद्धास्थाने आणि या संकेतांमार्फत येणारे सुप्त प्रवाह आपल्याला जाणवतात. जलदेवतांना इजिप्शियन संस्कृतीतही महत्त्व आहे. ‘इसीस’ ही जलप्रलय करणारी देवता आहे. ती
जलप्रलय करून शेतांना पाणीपुरवठा करते म्हणून इजिप्शियन संस्कृतीत ‘इसीस’ला विशेष स्थान आहे. गौरीच्या सणाच्या वेळी जसे पाणवठय़ाला महत्त्व आहे तसेच खड्डय़ांनाही!
गौरीला जेव्हा निरनिराळे दागिने घालून स्त्रिया नटवतात, तेव्हा त्या तिचे सौभाग्य अधोरेखित करतात. या सौभाग्य अलंकारातून समृद्धीचा प्रत्यय येतो आणि अशी समृद्धी आपल्या घरी चिरस्थायी असावी ही इच्छा त्यातून व्यक्त होते.
गौरी पाना-फुलांच्या असोत किंवा सुगड रचून उतरंड मांडलेल्या, मानवी मन या सर्वानाच मनुष्याकृती आकार देऊन या सर्व प्रतिकांशी आपली नाळ अलवार जोडतो. म्हणूनच मुखवटा असलेली गौर आपल्याला पाहायला मिळते. मुखावाटे माणसाचा प्राण जातो असे मानतात म्हणजेच मुख असल्यावर प्राण आहे, चैतन्य आहे या भावनेतूनच गौरीचा मुखवटा लावून पूजा करण्याची पद्धत दिसते. बोहाडय़ासारख्या उत्सवाची सांगता देवीच्या देवळात होते. देवीचे सोंग घेताना मुखवटा लावलेला असतो. तिथेही ज्या देवाचा मुखवटा आपण धारण करतो, त्या देवाचा संचार आपल्यात होतो अशी लोकश्रद्धा आहे.
गौरीचे आगमन तेरडय़ाचे रोप मुळापासून सुपात घेऊन असो किंवा सुगडीच्या स्वरूपात असो, ती घरी येते तेव्हा ‘सोन्यामोत्यांच्या पावलांनी ये..’ असे म्हटले जाते. ‘गौरी गौरी काय पाहतेस?’ असे विचारले की ती घरातल्या समृद्धीचे वर्णन करते. गौरीचा सण हा खास माहेरवाशिणींचा समजला जातो आणि त्याचा प्रत्यय लोकगीतातूनही येतो.
‘‘बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गनपतीच्या सनाला.’’
या गौरीच्या वेळी आलेल्या माहेरवाशीणींचे थेट साखरचौथ होईपर्यंत माहेरपण करतात.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे १६ भाज्या (चटण्या, कोशिंबीरी) पाच तऱ्हेच्या पोळ्या, पाच प्रकारच्या भजी करण्याची पद्धत आहे. भाज्यांमध्ये अंबाडी, भेंडी, पडवळ, कारलं, डांगर, दुधी, श्रावणघेवडा, मेथी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, मटार, वालाच्या शेंगा, गवार, अळू, चाकवत या भाज्या असतात.
कोशिंबिरीत मुळा, गाजर, सफरचंद, डाळिंब, काकडी, केळी, मिरचीचे पंचामृत, ज्वारीचे आंबील असते. चटण्यांमध्ये तीळ, खोबरे, कारळे, जवस, डाळ्या इ.च्या चटण्या केल्या जातात. बटाटा, गलका, अळू, मिरची, पालक अशा पाच भाज्या केल्या जातात. पुरणपोळी, सांज्याची पोळी, खव्याची पोळी, गुळपोळी, तूप-साखर पोळी या पाच प्रकारच्या पोळ्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. प्रदेशपरत्वे-स्थानपरत्वे यात थोडाफार फरक आपल्याला दिसतो.
सीकेपी लोकांकडे घावन घाटलं, लाल माठाची भाजी असते आणि गौर जेवते त्या दिवशी मटण-वडय़ांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. एखाद्या घरात जर गौरी आणि गणपती दोघेही असतील तर त्या दोघांमध्ये पडदा लावण्यात येतो. गौरीच्या विसर्जनाच्या वेळी नैवेद्यात मुरडीचा कानवला करण्यात येतो. मुरडीप्रमाणे ‘तू पुढल्या वर्षी परत ये’ हा संकेत त्यात असतो आणि वारली आदिवासींकडे
‘रानकेलीचा गाभा पिवला ग
गौराय नेसली पिवला पातल गं
गौरानं घेतल्या लाह्य़ा कुरमुऱ्या ग
गौराय चालली दरया पुजाया ग..’
असे म्हणून गौरी विसर्जन केले जाते. या सर्वामधून येणारी आणि टिकणारी समृद्धीच प्रतित होते.
स्त्री देवतांची आराधना विविध रूपात केली जाते. कधी समृद्धी, सौभाग्य, सुफलनाचे विधी इ.मार्फत ती होते, तर कधी प्रजननक्षम मातृदेवता म्हणून पुजली जाते. या स्त्री देवतांची आराधना करताना निरनिराळ्या प्रतीकांचा स्वीकार केला जातो आणि गौरीच्या सणातून ही निरनिराळी प्रतीकं, विविध माध्यमे, विधी, पूजा करण्याची पद्धत याद्वारे एकत्र आलेले दिसतात. गौरीचा मुखवटा लावून, तांदळा म्हणजेच दगड इ.द्वारे पूजन, धान्याची रास तिच्यासमोर मांडणे आणि निरनिराळ्या वनस्पतींच्या डहाळ्या आणून त्यांचे पूजन करणे या सर्व प्रकारातून स्त्री देवतांचे पूजन करताना त्या निरनिराळ्या माध्यमांद्वारे आपले अस्तित्व दाखवतात आणि पुजली जातात. त्या विविध माध्यमांचा अंगीकार निरनिराळ्या जाती-जमातीतील लोकांनी केलेला दिसतो. स्त्री देवतांच्या पूजनाची माध्यमे निरनिराळी असली तरी गौरी ही देवता समृद्धी, संपन्नता, सौभाग्य चिरंतन राहण्याच्या उद्देशानेच पुजली जाते. गौरीच्या कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा तिचे विसर्जन केले जाते, तेव्हा घरातील समृद्धी अखंड राहण्यासाठी वाळू आणून ती घरभर टाकली जाते. या लोकसंकेतातून समृद्धी चिरकाल अबाधित राहो हीच भावना दिसते. या ज्येष्ठेची पूजा भारतभर केली जाते. हिमाचल प्रदेशात ही बिह माता म्हणून ओळखली जाते. या देवीचे सापडणारे गीत आपल्याला वारली गाण्यातल्या गौरीशी साधम्र्य दाखवते.
‘जेठो मीनो त्वार वार,
बाह्मणे घरे आई बी-मां
चुडदे नाके पिजरे केशे आई,
ब्राह्मण देवे नहा धोआ
बीअ पापो मेऊवे ध्वाक. ओं
प्रात: स्नान करा,
हाथे पैरे महदसीरी गुंदा
चन्द्र, सूरज बी-बचात,
नरक तीड स्वर्ग सीड
धूप-दीप नैईवेद्य,
पण्ड प्रणाम प्रशन करा।’


--------- लोकसत्ता 

Monday 3 September 2012

कोकणातील गरम पाण्याचे झरे


पृथ्वीतलावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे वा उन्हेरे (याला कुणी उन्हवरे, उन्हाळे, गरम कुंडे असेही म्हणतात) होत. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत यालाच "हॉट स्प्रिंग' वा "थर्मल स्प्रिंग' असे म्हणतात.

पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. काही उन्हेऱ्यांतून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसाने मंदिरे बांधली आहेत. उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त केले आहे. अशा जागा यथावकाश जत्रा-यात्रांची ठिकाणे व आता पर्यटनस्थळे बनल्या आहेत. 
महाराष्ट्रात विविध भागांत शोध घेता आतापर्यंत 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इ. जिल्ह्यांत), बाकी उरलेले सर्व उन्हेरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हेरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळरेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंश रेषेला धरून हे उन्हाळे आहेत. यातील काही प्रमुख उन्हेऱ्यांचा हा परिचय. 
गणेशपुरी : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्‍यात तानसा नदीच्या पात्रात व काठाने किमान 60 ठिकाणी उष्णोदकाचे उमाळे आहेत. खुद्द गणेशपुरीला श्री नित्यानंद महाराजांचे समाधिस्थानाजवळ व्यवस्थित बांधून काढलेले व लोकमान्यता पावलेले गरम जलकुंड आहे. या परिसराच्या मागच्या बाजूला तानसा नदीचे पात्र आहे. तानसा नदीवरच्या पुलावरून उत्तरेकडे पाहिले असता नदीच्या मध्यातील बेटवजा भाग दिसतो. इथे वडांच्या वृक्षांनी वेष्टित श्री पातालबाबाचे समाधिमंदिर आहे. या बेटावर काही गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे नदीपात्र उत्तर-दक्षिण आहे. बेटाच्या पल्याड नदीपात्रात उतरून उत्तरेकडे चालत गेल्यास नदीपात्रातच गरम पाण्याचे अनेक झरे आढळून येतात. सगळे मिळून इथे डझनभर तरी झरे असावेत. यापैकी नदीपात्राच्या ऐन मध्यावर एक मोठे कुंड आहे. आसपासच्या सर्व कुंडांमध्ये या कुंडाचे तापमान सर्वाधिक, म्हणजे सुमारे 55 अंश ते 58 अंश सें.ग्रे. असते. त्यामुळे या कुंडास "अग्निकुंड' असे योग्य नाव दिलेले आहे. या कुंडात तांदूळ टाकल्यास भात शिजतो, अशी समजूत असल्याने जागोजागी गरम पाण्याच्या प्रवाहात तांदूळ टाकलेले दिसून येतात. उत्तर दिशा धरून चालत राहिल्यास तानसा नदीच्या पलीकडल्या काठावर आपण पोचतो. इथे रस्त्याच्या पल्याड शिवअनूसया मंदिर आहे. इथे दोन गरम पाण्याची कुंडे असून, त्यापैकी एकाला "अनसूया कुंड' असेच नाव आहे. इथूनच निंबवली- गोरूड रस्त्याने वज्रेश्‍वरीकडे जाणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता खराब असल्याने गणेशपुरीला जाऊन मोठ्या चांगल्या रस्त्याने वज्रेश्‍वरीला जावे हे बरे. वज्रेश्‍वरी-भिवंडी रस्ता आणि तानसा नदीच्या दरम्यान अनेक मंदिरे व गरम पाण्याची कुंडे आहेत. वज्रेश्‍वरी बस स्थानकालगत श्री रामेश्‍वर महादेवाचे मंदिर आणि कुंड आहे. जवळच नदीपात्रात चार-पाच कुंडे आहेत. यांना "अकलोली कुंडे' असे म्हणतात. त्यापैकी सूर्यकुंड आणि चंद्रकुंड प्रसिद्ध आहेत. 
सातवली : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्‍यात टिकालाजवळ हे विशेष प्रसिद्ध नसलेले उन्हाळे आहे. महामार्गावरूनच डावीकडे (पश्‍चिमेकडे) हिरवागार वृक्षाच्छादित परिसर आणि मंदिरांचे कळस दिसतात. मंदिरे शंकर आणि हनुमानाची आहेत. वांद्री या छोट्या नदीच्या डाव्या तीरावर ही मंदिरे आणि लहान-मोठी डझनभर गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तीर्थकुंड सर्वांत उष्ण व महत्त्वाचे आहे. जवळच अगदी साधी धर्मशाळा आहे. अहमदाबाद रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेकडे हाय-वे ढाबा आहे. भोजनाची सध्या तरी ही एकमेव व्यवस्था आहे.  
उन्हेरे पाली (गणपती) : खोपोलीजवळचे गणपतीचे पाली हे अष्टविनायकांपैकी एक. खोपोलीकडून पलीकडे जाताना पालीच्या अगदी जवळ पोचलो, की उजवीकडे उन्हेऱ्याची पाटी दिसते. उन्हेरे मुख्य रस्त्यापासून जेमतेम एक किलोमीटर आत आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. पार्किंगसाठी मोठी विस्तीर्ण जागा आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळच दोन कुंडे- एक मोठे, एक छोटे- आहेत. जवळच भक्तनिवास आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्नानाची स्वतंत्र सोय असणारा कायमस्वरूपी मंडप आहे. पार्किंग जागेजवळ चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्या आहेत. जेवणसुद्धा आगाऊ कल्पना दिल्यास तयार करून देतात. पालीला मुक्कामास राहूनही हे ठिकाण साधता येते.  
सव : मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो.  
पालवणी : मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तीरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची एकाकी मंदिरे व जवळच नदीकाठाने उन्हाळे आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून, नदीच्या काठाने "महाराष्ट्र वृक्ष' म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तामणाची असंख्य झाडे आहेत. उन्हाळ्यात भेट दिल्यास सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षिनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) सहजी लक्षात येत नाही. त्यामुळे जरा लक्ष ठेवावे लागते. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट बने आहेत. कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच ओबडधोबड पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे, असे याचे वर्णन करता येईल.
दापोली : खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडला उन्हवऱ्याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरत जातो. हा रस्ता आपल्याला थेट फरारीच्या खाडीवर घेऊन जातो. एसटी स्थानकाजवळील मोकळ्या जागेत गाडी लावता येते. दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्‍य दिसते. मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड, असा याचा लौकिक आहे. (तापमान 70 अंश सें.ग्रे.! अबब!!) त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. लहान मुलांना (व स्वतःलाही) दूर ठेवावे. पाण्याची (वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. समोरच्या डोंगरउतारावरील मदरशाची आधुनिक पद्धतीची इमारत पाहून थक्क व्हायला होते. शाळेची इतकी सुंदर इमारत पुण्यालाही नसेल. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई-गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान 40 अंश सें.ग्रे. आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान 35 अंश सें.ग्रे. आहे. अशा ऊन पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्‍चर्य वाटते. "मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते,' इ. माहिती चहावाल्याने पुरवली. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे. खाण्याची सुविधा नीटशी उपलब्ध नाही. मुक्कामाचीही सोय नाही. अर्थात खेड वा दापोलीला मुक्काम करून इथे येणे सोपे आहे. 
राजापूर राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. या गंगातीर्थाच्या रस्त्यावर उन्हाळे आहेत. अर्जुना नदीच्या काठाने ही उन्हाळे आहेत. जवळच श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. कुंड बंदिस्त आहे. फाट्यापासून 1.5 किलोमीटरवर आहे. 
तुरळ : मुंबई-गोवा मुख्य महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात राजवाडीजवळ हे कुंड आहे. रस्त्यावर "हॉट स्प्रिंग' नावाचेच हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारून मागे गेलेली पायवाट उन्हाळ्याकडे जाते. जवळ राजगंगा नदी व हॉटेलला लागून वाघजाई चंडिकामाता मंदिरे आहेत. 
राजवाडी :  चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पायऱ्यांची वाट कुंडाकडे जाते. शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळ्यांवरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुंड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणाऱ्या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्‍य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीव कामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, मात्र राहण्या-जेवणाची सोय नाही. 
अरवली : गोवा महामार्गावरील गड नदीचा पूल ओलांडला (गोव्याकडे जाताना) की लगेचच डावीकडे हे कुंड आहे. जवळच वरदाई, कालिमाता, केदारनाथाची मंदिरे आहेत. कुंडाचे पाणी फारसे स्वच्छ नाही. 


कोकणातील सर्वच्या सर्व 22 कुंडे चार दिवसांत पाहणे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी स्वतःचे वा भाड्याचे वाहन हवे. त्याचा कार्यक्रम असा ....

दिवस पहिला : मुंबईतून प्रवासास सुरवात करावी. अहमदाबाद महामार्गाने पालघर तालुक्‍यातील दहिसर (तर्फे मनोर) गाठावे. हमरस्त्याला लागूनच हलोली येथील पाटीलपाडा आणि पाडोसपाडा कुंडांना भेट देणे. तेथून मुंबईच्या वाटेवर टिकालाजवळ सातवलीला यावे. त्यानंतर मनोरमार्गे पालघरच्या वाटेवरील कोकनेर पाहावे. परत येऊन मनोरला हमरस्ता सोडून वाड्याचा रस्ता पकडावा. वाटेत थोडी वाकडी वाट करून खारिवलीजवळ पिंगेमान येथे वैतरणेच्या पाण्यात बुडलेली कुंडे लांबूनच पाहावीत. पुन्हा हमरस्ता गाठून मांडवी फाट्यावरून गणेशपुरी- वज्रेश्‍वरी जवळ करावे- अर्थात रात्रीच्या मुक्कामासाठी. 
दिवस दुसरा : पहाटे लवकर उठून गणेशपुरी, निंबवली, गोराड, अकळोली- वज्रेश्‍वरी परिसरातील गरम पाण्याची कुंडे स्नानकर्मासह व्यवस्थित पाहून घ्यावीत. आसपासची मंदिरे व समाविष्ट स्थाने पाहून होईपर्यंत दुपार उजाडते. इथेच जेवण करून अंबाडीमार्गे टिटवाळ्याला गणेशदर्शन करावे. तेथून मधल्या घाटमार्गाने अंबरनाथ जवळ करून बदलापूर- कर्जतमार्गे खोपोली फाट्यावरून गणपती पालीकडे प्रयाण. उन्हेऱ्याची कुंडे पाहून मुक्कामासाठी पालीस जावे.  
दिवस तिसरा : पालीवरून गोवा महामार्गास लागावे व थेट महाड गाठावे. महाड परिसरातील कोंडिवते व सवची कुंडे पाहून महामार्ग सोडून उजवीकडे मंडणगड गाठावे. (दुपारचे जेवण,) उन्हवरे (पालवणी) करून उन्हवरे (दापोली) ला जावे. तेथून खेडला मुक्कामासाठी यावे. गावाबाहेरील मरू घातलेले उन्हवरे पट्टीचे उन्हाळे पाहून गावातच मुक्काम करावा. 
दिवस चौथा: पहाटे खेड सोडावे. चिपळूण मार्गाने प्रथम अरवली, नंतर तुरळ, राजवाडी, फणसावणे, मठ (पाण्याखाली) इथली कुंडे पाहून राजापुरास (हॉटेल राजापूर) दुपारचे जेवण घ्यावे. नंतर राजापूर कुंडास भेट द्यावी, की संपला प्रवास।
 
-------------------- सकाळ 

अंबरनाथ



मुंबईनजीकच्या काही स्थळांनी आपलं वैशिष्टय़ जपताना पर्यटकांचं आकर्षण म्हणून नावलौकिक मिळवलाय. हाकेच्या अंतरावरील वज्रेश्वरी-अकलोली ही ठिकाणं गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रख्यात आहेत. शहरी गजबजाटातही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे तर पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे. घारापुरी हे त्रिमूर्तीचे बेट म्हणून जागतिक सांस्कृतिक वारसायादीत समावेश झाल्याने त्याचं नाव जगभर झालंय.
मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ मात्र एक लोकल गाडय़ांचं टर्मिनस स्थानक म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. त्याव्यतिरिक्त काडेपेटय़ांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे ठिकाण इतपतच लोकांना परिचित आहे, पण औद्योगिकीकरणात झपाटय़ाने बदलत्या या शहराला प्राचीन इतिहासापासून मानाचं स्थान आहे हे तेथील प्रख्यात शिवमंदिरामुळे. आज शहरीकरणाचा अंगरखा धारण करतानाही अंबरनाथ पूर्वेकडील या मंदिर परिसराचा सारा मोहल्ला आपल्या मूळच्या ग्रामीण खुणा जागोजागी दाखवतोय.. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सुमारे दीड कि.मी.वर हे एक हजार वर्षांचे पुरातन मंदिर पाहताक्षणीच एखाद्या परडीमध्ये ठेवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छासारखे भासते. भारतातील प्रत्येक प्रांतामधील मंदिर स्थापत्य कला ही अजोड कलाकृती असल्याने त्यातील काही मंदिरांनी हजारो वर्षांपासून आपलं स्थान अबाधित ठेवलंय. त्यातील अंबरनाथच्या या शिवमंदिराला आता हजार वर्षांचा काळ लोटला आहे. हेमाडपंती वास्तुकला म्हणून या मंदिराचा लौकिक जनमानसात असला तरी स्थापत्यशास्त्रीय भाषेत ही ‘भूपिज’ शैली म्हणून ओळखली जाते.
‘वालधुनी’ ऊर्फ ‘वढवाण’ नदीच्या एका उपनदीवर तथा ओढय़ावरील काठावर हे मंदिर उभारले आहे. सध्या सांडपाणी वाहून नेणारा हा ओढा मंदिराच्या अनोख्या सौंदर्याशी पूर्णत: विसंगत वाटतो, तसेच सभोवतालच्या गलिच्छपणाने मंदिर परिसराला एक ओंगळ स्वरूप आणून दिलंय. शिलाहारराजा छित्तराजने हे मूळ मंदिर बांधले असले तरी हे बांधकाम पूर्णत्वास नेऊन त्याचा जीर्णोद्धार छित्तराजपुत्र ‘मुम्मुणी’ ऊर्फ ‘ममवानी’ यांनी इ.स. १०६० मध्ये केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आढळतो. आता मंदिराचा कळस अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी कळसाचे काही भग्नावशेष मिळवण्यात बर्जेस सारखे संशोधक यशस्वी झालेत.



या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारेआहेत. प्रमुख प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाणमूर्ती प्रथमत: आपलं लक्ष वेधून घेते. या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव-रेखीव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचे जागोजागी जाणवते. हेमाडपंताच्या काळाआधीपासून जी ‘भूपिज’ शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिले मंदिर म्हणून गणले जाते.
मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे.
मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो.
मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे.
मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे.

हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे. 
मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.
शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या 
लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात.

सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.

अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शिलाहारांची राजसत्ता होती. त्याकाळी बांधले गेले. आपल्या प्रदीर्घ राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली. त्यातील हे अंबरनाथचे एकमेव शिवमंदिर आजही आपलं असित्व टिकवून आहे. येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भावप्रकट करताना त्यातून तत्त्वज्ञान-संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे. या शिल्पातून मानवी जीवनाला पूरक असा जो संदेश दिला आहे. त्यातून भारतभूमीचे तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे.. कोणतीही लिखित भाषा तथा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जाते.


-------------- लोकसत्ता 

कोल्हापुरी रेसिपीस

 

कोल्हापुरी चिकन

साहित्य:

  • १ किलो चिकन, २/३ कप: दही
  • ग्रेटेड नारळ, १ कापालेला टोमॅटो
  • लसनाची पेस्ट, १ चम्मच कोथिंबीर
  • १चम्मच लाल तिखट, हळदी पावडर २ चम्मच, ,
  • १-२ कडीपत्ता, २ टुकड़े दालचीनी
  • ६ टुकड़े: लौंग, काळी मिर्च, २ कांदे,
  • २ चम्मच तेल, मीठ चवीनुसार.
  • लिंबुचा रस २ चम्मच
कृती:
  • वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी,काजू, धने,शहाजिरे,ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळं जिन्नस किंचित कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका.
  • कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
  • नंतर वरील वाटण घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला.
  • दोन मिनिटाने चिकन घालून ते परता. बेताचे पाणी घालून ढवळा.
  • १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या.
  • वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा

----------------------------------------------------------------------------------

कोल्हापुरी मटन रस्सा

साहित्य:

  • १/२ किलो मटण, ४ मोठे बटाटे,
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ कांदे
  • १/२ ग्रेटेड नारळ, ८ तुकडे लौंग
  • ६-७ लाल मिरची
  • १ कप कोथिंबीर, १ चमच्या पेस्ट लसुंन
  • १ चमच्या हळदी पावडर, खस-खस
  • १ चमच्या सौंफ
  • तेल, मीठ.
कृती:
  • मटणाच्या तुकड्यावरती मीठ, हळद आणि लसूण पेस्ट घाला. १ तसापर्यंत मिक्स करून घ्या.
  • २ चम्मच तेल आणि लौंग,पेपयरकॉर्न, खसखस, लाल मिरची एकत्र करून टाळून घ्या. कांदा लाल होई पर्यंत टाळून घ्या आणि नारळ व टोमॅटो ही टाळून घ्या.
  • पेस्ट आणि एक मटण तुकडा घालून बघा. /li>
  • प्रेशर कुकर मध्ये तेल गरम करून घ्या आणि मटण व बटाटा घाला. त्यानंतर चांगल्या प्रकारे वाफाळून घ्या. मसाला पेस्ट आणि मीठ घाला. त्यानतर पाणी घाला आणि मटण नरम करून घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यामधे कडून घ्या.
  • त्यानंतर कोथिंबीर घालून तुम्ही सर्वे करू शकता.

----------------------------------------------------------------------------------

फिश् राइस

साहित्य:

  • ६ मासे
  • ३ बटाटे ( कापलेले), ३ कप कोथिंबीर पाने (धुतलेलि)
  • ८ लसूण, लौंग
  • २-६ हिरव्या मिरची, १ पीस आले,
  • १ चमच्या हळदी पावडर
  • २ चमच्या साखर, ४ कप खोबरे दूध
  • २-४ पीस कोकम
  • मीठ चवीनुसार
कृती:
  • मासे कट करून त्यामध्ये थोडे मीठ आणि हळदी पावडर घालून बाजूला ठेवा. थोड्या पाण्यामध्ये कोथिंबीर, आले, लसूण, चटणी आणि साखर याची पेस्ट करा.
  • एका भांड्यामध्ये नाराळाचे दूध आणि मीठ घालून बुड्बूडे येई पर्यंत उष्णता द्या.
  • त्यानंतर त्यामध्ये बटाटे शिजवाण्यासाठी टाका आणि मासे ही मिक्स करा.
  • माशांना रंग येई पर्यंत शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये कोकम घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि तुम्ही सर्वे करू शकता.

 ----------------------------------------------------------------------------------

अंडाकरी

साहित्य:

  • ६ अंडी , १ मध्यम कांदा
  • १/२ कप सुकं खोबरं
  • १/४ टीस्पून कांदा-लसूण मसाला
  • ३ टेबलस्पून कांदा बारीक चिरून
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला
  • १ १/४ टीस्पून लाल तिखट
  • १ टोमॅटो चिरून
  • ३ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
  • १ कप तेल
कृती :
  • तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
  • मग त्यात सुकं खोबरं आणि कांदा लसूण मसाला घाला आणि ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
  • एकीकडे ३ अंडी पाण्यात घालून उकडून घ्या. १ अंड नंतर ग्रेवीमध्ये वापरण्यासाठी बाजूला राहू दे .
  • पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
  • वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. १ अंड फोडून घाला आणि अलगद मिक्स करा. वरून झाकण ठेवा. अंड शिजू दे.

----------------------------------------------------------------------------------

नवाबी बिर्यानी

साहित्य:

  • १ किलो चिकन ( कापलेले)
  • १ १/२ कप: मोठा तांदूळ, १/२ पाण्यामध्ये धुतलेला
  • २ कप दही
  • 1१ कप: तूप, १ कप दूध
  • १० पीस पेपयरकॉर्न्स ८ पीस लौंग
  • ४ मध्यम आकारच्ये कांदे ( चिरलेले)
  • १ कप: कोथिंबीर (चिरलेली) १/२ कप: बदाम
  • ३ चमच्या लसूण आले पेस्ट, २ चमच्या लाल तिखट
  • १ चमच्या गरम मसाला पावडर, १ चमच्या जिरे आणि शहजीरा
  • १ चमच्या हळदी पावडर, १ चमच्या मीठ चवीनुसार
कृती:
  • लसूण आले पेस्ट, दही, मीठ चिकन मध्ये मिक्स करा आणि १ तासापर्यंत लांब ठेवा.
  • ) १/२ कप तूप गरम करा आणि त्यामध्ये शहाजिरा, लौंग, पेपयरकॉर्न्स आणि बदाम मिक्स करा. चिकन, हळदी, लाल तिखट, आणि १/२ कप पाणी ही मिक्स करा. चिकन शिजे पर्यंत उष्णता द्या. त्यानंतर कोथिंबीर मिक्स करा.
  • १/४ कप तूप गरम करून कुकरला तांदूळ लावून घ्या. ३ कप पाणी मिक्स करून भात पूर्णपणे शिजवून घ्या.
  • १/४ कप तुपमध्ये कांदा रंग येई पर्यंत गरम करा.
  • मोठ्या भांड्यामध्ये भात घ्या आणि त्यामध्ये चिकन घालून मिक्स करून घ्या .
  • आता तुम्ही सर्वे करू शकता.



----------------- महाराष्ट्र माझा 





Tuesday 28 August 2012

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप



नमस्कार मंडळी,
इंडो-चायनिज् च्या पहिल्या भागात आपलं सहर्ष स्वागत.
गेल्या बुधवारी संतोषने झक्कास व्हेज रोल आणि त्या जीवघेण्या शेझवान सॉस चा फोटो टाकला तेव्हा पासुन आमच्या जीभेचा वाहणारा नळ काही बंद होईना.
काही तरी बनवुन कोंबल्या शिवाय तो बंद होणार नाही ते आम्ही तेव्हाच ताडले.
तर आजचा मेन्यु बच्चे कंपनीच लाडक चिकन-लॉलीपॉप. (आम्हीही अजुन ल्हानच आहोत Wink )
आजकाल बाजारात रेडीमेड लॉलीपॉप्स मिळतात. पण आपल्या कडे अजुन सर्वत्र मिळतीलच अस नाही.
त्यामुळे तुम्हाला चिकन्-विंग्जस् पासुन लॉलीपॉप कसे बनावायचे ते पण सांगतो.
साहित्यः
चिकन विंग्जस् . एका विंगचे दोन लॉलीपॉप होतात.

१ चमचा आल-लसुण भरड वाटलेल.
१ चमचा काळा सोयासॉस.
१ चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
१ वाटी मैदा.
१ चमचा कॉन फ्लॉवर.
२ चमचे बेसन.
१ चमचा लाल तिखट.
तंदुरीचा रंग. (ऑपशनल)
कृती:
चिकन विंगच्या सांध्यात सुरीने कापुन एका विंगचे दोन तुकडे करा.

चित्रात दाखवल्या प्रमाणे विंगच्या टोलाका सुरीने हाडा भोवती गोल चरा द्या.
मग अंगातुन टी-शर्ट काढावा त्या प्रमाणे हाडाच्या चरा दिलेल्या टोकाला पकडुन मांस (इन साईड आउट) खाली खेचा.
विंगच्या खांद्याकडील भागाला एकच हाड असत. तर खालच्या भागात दोन हाड असतात.
तसच वरच्या भागात मांस जास्त असत तर खालच्या भागात कमी.
खालच्या भागाच लॉलीपॉप बनवताना दोघा पैकी एक हाड काढुन टाकाव.

सगळे लॉलीपॉप तयार झाल्यावर त्यांना मीठ, आल-लसुण, कळीमिरी पुड, सोयासॉस लावुन १५-२० मिनिटे मुरत ठेवाव.

एका भांड्यात मैदा, बेसन, कॉन फ्लॉवर, मीठ, लाल तिखट नीट एकत्र करुन घ्याव.
थोड थोड पाणी टाकत भजी सारख घट्ट पीठ तयार कराव. (भजी पेक्षा किंचीत जाडं)
रंग टाकायचा झाल्यस पाणी टाकल्यावर घालावा.
कढईत तेल तापवुन घ्याव.
एक एक लॉलीपॉप त्या पीठात घोळवुन खरपुस तळुन घ्यावे.
लहान मुलांना सॉस सोबत नी त्यांच्या बाबाला थंडगार बियर सोबत सर्व्ह करा. (आईने पण घेण्यास आमची ना नाही ) Wink

***************************
संतोषने शेझवान सॉस ची रेसिपी दिली आहेच....
मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हा सॉस बनवतो.
खाली सौरभने विचरणा केली आहे म्हणुन इथेच देतो.
शेझवान सॉस.
सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.

५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.

कृती:
दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.

गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.

एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.

मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.




पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.











---------------  मिसळपाव 

Monday 27 August 2012

 
खाद्यसंस्कृतीत 'मिसळ'लेलं पुणं ! 
 

"पुण्यात त्या काळांत हल्लींसारखा हॉटेलांचा सुळसुळाट झाला नव्हता. चहा-कॉफीची दुकानंही नव्हतीं. फराळाची दुकानं मात्र भरपूर असत. बुधवार पेठेत पुणें नगर वाचन मंदिराच्या दोन्ही बाजूंना फराळाची दुकानं असत. त्या दुकानातले फराळाचे जिन्नस म्हणजे घरगुती दिवाळीच्या दिवसांतल्या फराळाचे असत. करंज्या, लाडू, अनरसे, चिरोटे, कडबोळी, शंकरपाळी, चकल्या, चिवडा असेच जिन्नस मुख्यतः असत. जिलेबी, शिरापुरी, कांद्याची भजी यांचा प्रचार क्वचितच झाला होता. त्या दिवसांत पाव-बिस्किटांचाही प्रसार झाला नव्हता. अंडी उघड विक्रीला दुकानात ठेवण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हता...''

पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर हे महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी केलेलं हे पुण्याचं वर्णन! हा काळ आहे 1883 ते 1897 च्या दरम्यानचा. हे पुणं आहे, "खाद्यसंस्कृती' हा शब्दही जन्माला यायच्या आधीचं.

गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत पुण्याचं खाद्यजीवनही पुण्यासारखंच चहूबाजूंनी उमलून आलं आहे. "कॉंटिनेंटल फूड'पासून ते आजच्या गतिमान तरुणाईला भावणाऱ्या चटपटीत, चमचमीत "फास्ट फूड'पर्यंत. पुणेकरांच्या चैनीची परमावधी आता मटार उसळ आणि शिकरणाच्या कितीतरी योजनं पलीकडं गेली आहे. कॅम्पातल्या इराण्याकडं (चोरून...!) प्यायलेल्या चहाच्या आधी ऑम्लेट-पावाचा आस्वाद घेणं, ही सांस्कृतिक क्रांतीची खूण मानणाऱ्या पुण्याचा प्रवास, शनिवारी-रविवारी हॉटेलांत रांगा लावून जेवणारे पुणेकर "वीकएंड'ला घरात चूल पेटवतच नाहीत की काय, असं वाटण्यापर्यंत झाला आहे. पुण्यात दरवर्षी साजरे होणारे उत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या श्रीमंतीचा एक महत्त्वाचा पैलू मानला, तर आता 12 महिने 13 काळ पुण्यात चालणाऱ्या "खाद्योत्सवा'नं या श्रीमंतीला आगळीच झळाळी आणली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

"खादाड असे माझी भूक' हे कविवचन शब्दशः खरं करणाऱ्या पुण्याच्या खाद्यविश्‍वाच्या या प्रवासात जाणवणारं महत्त्वाचं सूत्र म्हणजे, अजूनही अनेकांगांनी परंपराप्रिय असणाऱ्या पुणेकरांनी या खाद्यपरंपरेच्या काही अनवट "जागा' आणि "घराणी' अजूनही जोपासलेली आहेत! म्हणूनच पुण्याला लगटून असणाऱ्या लोभसवाण्या टेकड्यांना न जुमानता (प्रसंगी त्या होत्याच्या नव्हत्या करून!) पुण्याची क्षितिजं कितीही विस्तारली, तरी "बेडेकरां'ची, "वैद्यां'ची, "श्रीकृष्ण'ची, "श्री'ची, "रामनाथ'ची, चिंचवडच्या "कवीं'ची मिसळ, "प्रभा'चा, "टिळक स्मारक'चा, "भरत'चा, कॅम्पातल्या जे. जे. गार्डनजवळचा, लक्ष्मी रोडवरच्या काकाकुवा मॅन्शनच्या दारातला वडा, "पुष्कर्णी'ची भेळ, "मार्झोरिन'ची सॅंडविचेस्‌, "कयानी'ची श्रुसबरी बिस्किटं, "पूना गेस्ट हाउस'चं थालीपीठ आणि खिचडी, "शिव-कैलास'ची लस्सी, कोंढाळकरांची मस्तानी... हे सारे खाद्यविशेष आपापलं स्थान टिकवून आहेत. ही काही संपूर्ण यादी नव्हे; पुण्यात ह्या यादीचे आणखीही काही मानकरी आहेत. एखादा "तबियतदार' तज्ज्ञ या यादीत हवी तेवढी भर घालू शकेल.

खवैयांच्या मैफलीत नाही, असा पुणेकर मिळणं कठीणच. इथं प्रत्येकानं स्वतःसाठी ठरवलेल्या खास जागा आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी मिळणारी चीज वेगळीच आहे. सकाळी लॉ कॉलेजच्या, "फर्ग्युसन'च्या किंवा अशाच कुठल्याही टेकडीवर आधी मोकळी हवा खायची किंवा टेनिसशी चार हात करायचे आणि मग खाली उतरून डेक्कन जिमखान्याचं "अप्पाचे कॅंटिन' सुरू होतं, तेव्हा "अप्पाचे कॅंटिन' किंवा लॉ कॉलेजचं कॅंटीन, "रूपाली', "वैशाली', "वाडेश्‍वर'मध्ये बसून खिचडीचा, इडली-चटणीचा नाहीतर उप्पीटाचा समाचार घ्यायचा, हा विविध वयोगटांतल्या पुणेकरांचा रोजचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी कॅलरीज्‌च्या आधी थोडं पेट्रोल जाळायला त्यांची ना नसते. (सायकल वापरून हा उपक्रम करणारे उत्साही पुणेकरही आहेत!)

अगदी इतिहासात शिरायचं म्हटलं तर पुण्यात काम-धंद्यानिमित्त लोक यायला लागले, तसा हा व्यवसाय वाढत गेला. रविवार पेठेतली वैद्य मिसळ आणि आवारेंची सामिष खानावळ, असे शताब्दी साजरी केलेले सेलिब्रिटीज्‌ही इथं आहेत. 19 व्या शतकाच्या सुरवातीला कर्नल वेल्सनं पुण्याचं वर्णन "सर्व मराठी साम्राज्याच्या व्यापाराचं एक मोठे केंद्र' अशा शब्दांत केलं आहे. ब्रिटिश आमदानीत संस्थात्मक जीवनाबरोबरच पुण्याच्या समाजजीवनामध्येही स्थित्यंतरं येऊ लागली. "क्षुधाशांती भुवन' अशा सरळ सोप्या नावाच्या खाणावळी त्या काळी, बाहेरून पुण्यात शिकायला, काम-धंद्याला येणाऱ्यांचा पहिला आधार असायच्या. पुढील काळात या आधारांमध्ये सरपोतदारांचं पूना गेस्ट हाऊस, बादशाही, गुजराथ लॉज, पूना बोर्डिंग, जनसेवा, आशा डायनिंग, सुवर्णरेखा यांनी मोलाची भर घातली.

पुण्यातली हॉटेलं लाडू, चिवडा, करंज्यांमधून बाहेर पडली विसाव्या शतकाच्या मध्यात केव्हातरी. आजही खाद्यपदार्थातली पुण्याची खासियत कोणती, या प्रश्‍नाला थोड्याफार फरकानं "मिसळ' हेच उत्तर मिळतं. पुण्यातल्या मिसळीची जगातल्या कोणत्याच मिसळीशी तुलना होऊ शकत नाही, अशी तमाम पुणेकर मिसळप्रेमींची श्रद्धा आहे! मिसळीच्या कटाची आंबट-गोड चव हे पुणेरी मिसळीचं वैशिष्ट्य. या कटाच्या चवीवर मिसळीची "घराणी' ठरतात. मग पोहे, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, भाजक्‍या किंवा पातळ पोह्यांचा चिवडा, ओलं खोबरं, आलं, हिरवी मिरची अशा विविधतेतून "रामनाथ', "श्री', "श्रीकृष्ण', "मार्केट' वगैरे विशिष्ट पिढीजात चवीची मिसळ साकारते. पुण्यातल्या परंपरागत मिसळींमध्ये आता "काटा किर्रर्रर्र...', "पुरेपूर कोल्हापूर', "पोटोबा' यांसारख्या नव्या पिढीतल्या मिसळींनीही स्थान मिळवलं आहे. कोल्हापुरातल्या खासबागेतली प्रसिद्ध मिसळही आता पुण्यात आली आहे आणि "मुंजाबाचा बोळ, नारायण पेठ, पुणे 30', हा आपला परंपरागत पत्ता सोडून, बेडेकर मिसळही आता कर्वेनगरात स्थिरावली आहे.

तारांकित हॉटेलांचा कितीही अनुभव पाठीशी (किंवा पोटाशी!) असला तरी आपल्या गावात जगप्रसिद्ध असलेल्या एखाद्या बोळातल्या तुलनेनं कळकट्ट हॉटेलात बसून मिसळ किंवा पहिल्याच घासाला ब्रह्मांडाची आठवण करून देणारा तत्सम पदार्थ चापण्यात आनंद असतो, हे वैश्‍विक सत्य पुण्यातल्या कोणत्याही पारंपरिक हॉटेलात अनुभवता येऊ शकतं.

सत्तरीच्या दशकात दाक्षिणात्य पदार्थांना पुण्यानं आपलंसं केलं. "संतोष भुवन' हे एकेकाळचं इडली-डोसा (खरा उच्चार "दोशा...' इति एक दक्षिणभाषाभिमानी पुणेकर!) मिळण्याचं खास ठिकाण. नंतरच्या काळात "रूपाली', "वैशाली', "मॉडर्न कॅफे', "वाडेश्‍वर', "कॉफी हाऊस' ते "रामकृष्ण' अशी दाक्षिणात्य; विशेषतः उडुपी पदार्थ देणाऱ्या हॉटेल्सची एक साखळीच पुण्यात उभी राहिली. रास्ता पेठेतल्या "कॉफी हाऊस'च्या दाक्षिणात्य कॉफीची जिभेवर रेंगाळणारी चव आणि याच परिसरातल्या साउथ इंडियन मेसमधलं रसम्‌ ही दक्षिणी खासियत. यातल्या बऱ्याच ठिकाणांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं गेल्यानंतर ऑर्डर काय द्यायची, हा फार मोठा प्रश्‍न नसतो इतकं चवीतलं सातत्य या मंडळींनी राखलं आहे.

पुण्याबरोबरच पुण्यातली खाद्यसंस्कृतीही विस्तारत गेली. पंजाबी, मुघलाई, चायनीज्‌ आणि आता मल्टी क्‍युझिन रेस्टरंट्‌स असा हा प्रवास आहे. या सगळ्याच्यामध्ये "फास्ट फूड'ची एक मोठी लाट आली आणि आता पुण्यात अमुक तमुक कॉर्नरवरील वर्ल्ड फेमस पावभाजीपासून ते मल्टिनॅशनल चेनमधल्या पिझ्झापर्यंतची रेंजच उपलब्ध आहे.

"ऑक्‍सफर्ड ऑफ ईस्ट' या बिरुदामुळं पुण्याच्या लौकिकाबरोबर खाद्यजीवनातही मोलाची भर पडली आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या प्रत्येक पिढीनं खवय्येगिरीबरोबर तितक्‍याच लज्जतदार गप्पा मारण्यासाठी खास कट्टेच "डेव्हलप' केले आहेत. कॉलेजात आणि कॉलेजबाहेरही. जिथं जिथं या सळसळत्या तरुणाईचा वावर असू शकतो, तिथं तिथं हे कट्टे सापडतात. इथलं खाद्यवैविध्यही "अमेझिंग' असतं. वडा-पाव, मिसळ, बनवडा, ऑम्लेट, अंडा भुर्जी, इडली-डोसा, पाव-भाजी, सॅंडविच, पाणी-पुरी, रगडा पॅटिस, भेळ, दावणगिरी अन्‌ लोणी डोसा ते पिझ्झा, बर्गर अन्‌ "चिकन मॅक्‍ग्रिल'पर्यंत! या कट्ट्यांवर हवा तेवढा वेळ बसा. इथं एक कप कॉफी किती जणांनी आणि किती वेळ प्यावी, याचं गणित काहीही असू शकतं. ऑर्डर देत राहा अन्‌ मित्र-मैत्रिणी जमवून मजेत दुनियाभरच्या टवाळक्‍या करा, प्लॅन्स करा, काहीही सेलिब्रेट करा, फारच कामसू असाल तर बसल्याबसल्या एखादं कामही करा. तुमची मर्जी. शहरात अनेक ठिकाण असे कट्टे हमखास सापडतात. कोथरूडमध्ये एमआयटीच्या रस्त्यावर, गोखले इन्स्टिट्यूटच्या समोरचा पीडी कट्टा, वाडिया परिसरात मंगलदास रोडवरची अप्पाची टपरी, फूडक्राफ्ट इन्स्टिट्यूटचा रस्ता आणि ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्यावरचा "जिवाला खा'! इथली खासियत म्हणजे नुसती "जिभेची तृप्ती ते उदरभरण' इतकी रेंज मिळते आणि खिसाही फार हलका होण्याची शक्‍यता नसते. नव्याने विकसित झालेल्या पुण्याच्या अनेक भागांमध्ये खाऊगल्ल्या डेव्हलप झाल्या आहेत. "मार्झोरिन'समोरची खाऊगल्ली अशीच व्हरायटी देणारी. तिथला खमण ढोकळा लक्षात राहणारा. सारसबाग, कमला नेहरू पार्क, कॅम्पापासून ते अगदी चांदणी चौकापर्यंत शहरात अशा "चौपाट्या' आहेत. पोहे, खिचडी, कबाब, तंदुरी अशा पदार्थांपासून सिझलर्स, शोर्बा, कोजी वेर्का चेटीनाड, फिश फिंगर्स, थाई करी, तंदुरी रान अशी शाकाहारी-मांसाहारी कॉम्बिनेशन्स इथं मिळतात. "हिंदुस्थान', "संतोष', "पूना बेकरी'चे पॅटिस ही अनेक पुणेकरांची रविवार सकाळची मुख्य डिश! पॅटिससाठी एकेकाळी रांगा लागायच्या. आता अस्सल पुणेरी पॅटिसही विश्‍वात्मकतेच्या पातळीवरून मांचुरिअन, चीज, नूडल्स अशा व्हरायटीत मिळू लागली आहेत.

"पुष्कर्णी भेळ' हे पुण्यातलं आणखी एक आश्‍चर्य. न बदलणारी चव हे या भेळेचं वैशिष्ट्य. "आमची कोठेही शाखा नाही' हे पुणेरी व्यावसायिकांचं ब्रीदवाक्‍य काळाच्या ओघात अनेकांनी सोडलं, तशी पुष्कर्णी भेळेचीही शाखा निघाली, आणखीही काही पदार्थ तिथं मिळायला लागले; पण भेळेच्या मूळ चवीत फरक नाही. भेळ आणि पाणी-पुरीच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं बदल आणला तो "गणेश' आणि "कल्याण' भेळ यांनी. गाडीवरच्या चाट, पाणीपुरी आणि भेळेला त्यांनी एकदम "कॉर्पोरेट' करून टाकलं! तरीही शनिवारवाडा, सारसबाग, बंडगार्डन अशी भेळेची पारंपरिक ठिकाणं आपलं स्थान टिकवून आहेतच. निगडीत तर एका चौकालाच भेळेच्या गाड्यां मुळे "भेळ चौक' असंच नाव मिळालय!

साग्रसंगीत भेळेइतकंच लोकप्रिय मिश्रण म्हणजे मटकी-भेळ. विशेषतः रात्री लक्ष्मी रस्त्यावरची दुकानं बंद होण्याच्या वेळेला मिळणारी गणपती चौकातली, सोन्या मारुती चौकातली, भानुविलास आणि विजय टॉकीजच्या चौकातली मटकी-भेळ हे उत्तरसंध्याकाळी सक्रिय होणाऱ्या खवय्यांचं आणखी एक आकर्षण. अगदी घरातून जेवून-खाऊन कुटुंबकबिल्यासह या भेळेचा आस्वाद घेणारे पुणेकर अनेक सापडतील. दिवसाउजेडी मिळणाऱ्याही काही चांगल्या मटकी-भेळेंपैकी सारसबागेच्या पिछाडीला मिळणारी भेळ किंवा सातारा, नगर आणि सोलापूरकडं जाताना जकातनाक्‍यांच्या पलीकडं गेल्यावर मिळणारी कोरडी भेळही अनेकांच्या विशेष आवडीची आहे. फक्त भेळ तिथं बसून खायची की बांधून घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवावं. यातल्या काही भेळीही आता मागील पिढीकडून पुढील पिढीकडं गेल्या आहेत. याच मालिकेतला, आता बंद झाला असला तरी, अजूनही आठवणीत असणारा फरासखान्याजवळचा भगवंतांचा चिवडा!

तसा लक्ष्मीनारायण चिवडा हा खास पुणेरी. पोह्यांच्या आणि बटाट्याच्या किसाच्या चिवड्यांच्या असंख्य चवींमध्ये प्रत्येकाची एक खास चव जपली गेली आहे. पिढ्यान्‌पिढ्या चव जपणारे असंख्य खाद्यपदार्थ पुण्यात आहेत. "चितळ्यां'ची बाकरवडी, "स्वीट होम'चं करपलेल्या वरणाच्या वळणावर जाणारं सांबार (काही न मुरलेले पुणेकर याला सांबार मानत नाहीत; पण त्याकडं लक्ष देण्याचं काहीच कारण नाही), "काका हलवाई'चा कट सामोसा, "एसएनडीटी'च्या बोळातला साबूदाणा वडा, ग्राहक पेठेच्या दारातले "वृंदाज्'चे रोल आणि आणखी कितीतरी.

काळाच्या ओघात पुण्यातली इराणी हॉटेलं आता विस्मृतीत जात असली तरी त्यांच्याशिवाय पुण्याची खाद्यसंस्कृती अपुरीच राहील. ब्रिटिशांबरोबर इथे स्थिरावलेली ही हॉटेल्स म्हणजे एकेकाळी निवांतपणाचं दुसरं नाव असायचं! बन-मस्का, ब्रून हे इथलं स्टेपल डाएट. चहाची चव सगळीकडं सारखी असली तरी प्रत्येक जागेचा "नोकझोक' वेगवेगळा. नवकवींची आणि नवोदित प्रेमवीरांची वर्दळ इथं हमखास असणार, याचं मुख्य कारण म्हणजे एक सिगारेट आणि एक ग्लास चहा या भांडवलावर कितीही वेळ घालवण्याची मुभा! त्यातही "घराणी' होती. "कॅफे डिलाईट' हा एकेकाळचा डाव्या बुद्धिवाद्यांच्या चर्चेचा अड्डा. "लकी' देव आनंदचं लाडकं. समोरचं "गुडलक' आपला वेगळा आब राखून असणारं. "पॅराडाईज'मध्ये पडीक असणं हा कित्येकांचा पूर्ण वेळचा उद्योग असायचा! "अलका'समोरच्या "रीगल'मध्ये चहा आणि बनवरोबर रेकॉर्डवर हवं ते गाणं चार आण्यात ऐकण्याची सोय होती. कॅम्पातली इराण्याची हॉटेलं हा आणखी वेगळा विषय. "नाझ'मधला सामोशांचा "डोंगर' आता फक्त आठवणीत उरला आहे!

पुण्यातले डायनिंग हॉल हा एक स्वतंत्र विषय आहे. "जीपीओ'समोरचं "रिट्‌झ', आपटे रोडवरचं "श्रेयस', फर्ग्युसन रोडवरचं "आम्रपाली', टिळक रोडवरचं "दूर्वांकुर', लॉ कॉलेज रोडवरचं "कृष्णा', शनिवार पेठेतलं "रसोई', भांडारकर रस्त्यावरचं "पंचवटी', डेक्कनवरचं "सुकांता' हे नेहमीचे टप्पे... यांच्या जोडीला मेहेंदळे गॅरेज परिसरातलं "अभिषेक', तुळशीबागेतले "अगत्य' ते बाणेर रस्त्यावरचं "राजवाडा', औंधमधलं "सूर्या', "थाटबाट'ची साखळी आणि "एनआयबीम' रस्त्यावरचं हाय प्रोफाईल "झेडकेज्‌' या क्रिकेटवीर झहीर खानच्या हॉटेलापर्यंत अशी वळणंही. शेफ विष्णू मनोहरांची "विष्णूजी की वाडी' हे या यादीतलं ताजं नाव.

केवळ चांगलंचुंगलं खायला मिळतं म्हणून नव्हे; तर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचं "हॉर्न ओ के प्लीज' आणि नगर रस्ता परिसरातलं, कारचा फील देणारं "बॉनेट' अशी काही हॉटेल्स त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सजावटींमुळंही लक्षात राहतात.

सामिषप्रेमींसाठीही पुण्याच्या खाद्यजीवनात स्वतंत्र दालनं आहेत. "आवारे', "नेवरेकर' यांच्या खास बोलाईच्या मटणाच्या खानावळींबरोबर "गुडलक', "लकी' आणि त्याच परिसरातलं "डायमंड क्वीन' ही अगदी सहज आठवणारी नावं. नुसती बिर्याणी म्हटलं तरी "दोराबजी', "ब्ल्यू नाईल', "जॉर्ज' ह्या पारंपरिक नावांत कित्येकांच्या कित्येक आठवणी गुंतलेल्या असतील! "दोराबजी'ची आख्खी लेनच गोयंची सय देणारी! यावरून आठवलं, "वैद्य मिसळी'ची आणखी एक खासियत म्हणजे आजही तिथल्या मांडणीत फार फेरफार न करता तिथं थेट विसाव्या शतकाच्या मध्यातल्या एखाद्या फिल्मसाठी शूटिंग करता येईल! तर बिर्याणी. "दुर्गा', "एसपीज्‌' आणि "तिरंगा' ह्याही महत्त्वाच्या जागा. अलीकडच्या काळात त्या भर पडलीय ती "हंड्रेड बिर्यानीज्‌' आणि "लखनवी बिर्याणी'ची. "कलकत्ता बोर्डिंग', नळस्टॉपजवळचं "निसर्ग', अभिनेत्री लालन सारंग यांच्या "मासेमारी'सारख्या ठिकाणी मत्स्यप्रेमी हमखास सापडणारच. पुणेरीपणाच्या अर्काचं पेटंट असणाऱ्या सदाशिव पेठेतल्या एकाच रस्त्यावर पाऊण किलोमीटर अंतराच्या आत-बाहेर किमान डझनभर नॉनव्हेज हॉटेल आहेत, हा खास पुणेरी तिढा!

"शबरी', "गिरिजा', "मथुरा' यांसारख्या मंडळींनी भाकरी, भरली वांगी, मटकीची उसळ, कुरडया वगैरे टिपिकल मराठी पदार्थ एकदम लोकप्रिय करून टाकले. गुजराथी जेवणातल्या फरसाणाऐवजी "पूना गेस्ट हाऊस'पासून अलीकडंच नव्या रूपात सुरू झालेल्या "सुगरण'पर्यंत लोकांनी महाराष्ट्रातल्या सुरळीच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, पाटवड्या, भाजणीचे वडे, वांग्याचे काप, मिरगुंड देण्याचा प्रघात आता रूढ केला आहे. मसालेभात, आळूचं फतफतं, मोदक, पुरणपोळ्या असं खास पुणेरी जेवण थेट जर्मनीत इंट्रोड्यूस करण्याऱ्या "श्रेयस'च्या चितळ्यांनी महाराष्ट्रीय आणि कॉंटिनेंटल पदार्थांच्या "जुगलबंदी'चा प्रयोग केला होता. वरणफळं आणि पास्ता, मोदक आणि डिमसम अशा जोड्यांना पुणेकरांनी मनापासून दाद दिली होती.

झुणका-भाकरी खाणं हे "स्टाईल स्टेटमेंट' होण्याच्या खूप आधी भाकरी पुण्याच्या खाद्यजीवनात आणली ती हमाल पंचायतीच्या "कष्टाची भाकर'नं. "एक रुपयात झुणका-भाकर' या घोषणेचं राजकियीकरण होण्यापूर्वी हमाल पंचायतीच्या "कष्टाच्या भाकर'बरोबर गरम जिलेबी आणि कांदा भजी या मेन्यूनं माजी पंतप्रधान विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्यासह भल्याभल्यांना भुरळ घातली होती. "पोळी- भाजी केंद्रं' ही आता व्यग्र पुण्याची गरज बनत असताना काहीसा विस्मरणात गेलेला "इंदिरा कम्युनिटी किचन'सारखा प्रयोग आणि महिला समूहांनी चालवलेली "जेवणघरं'ही याच खाद्यसंस्कृतीचा आणखी एक भाग.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा साद्यन्त आढावा घेणं हे हिमनगाची खोली मोजण्याइतकंच अनगड काम आहे. नुसती आइस्क्रीम्सच घ्या ना! "कावरे', "गणू शिंदे', "बुवा', "गुजर', "शिरीष' हे लोकल ब्रॅंड्‌स लोकांच्या जिभेवर अजून आहेत. "दुग्धालय' अशा भारदस्त नावाची दूध, खरवस, विविध मिठाया विकणारी दुकानंही पुण्यात असत. कोल्हापूरसारखी समोर म्हैस पिळून दूध मिळण्याचीही सोय पुण्यात होती, अशीही आठवण सांगितली जाते. पण सोन्या मारुती चौक, स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानक अशा काही ठिकाणी रात्री कढईतलं आटीव दूध प्यायला मात्र अनेकजण अजूनही गर्दी करतात. लक्ष्मी रस्त्यावरच्या "जनसेवा दुग्धालया'नं प्रसिद्ध केलेलं पियुष हे पेयही अनेकांच्या आठवणीत असेल. आता राष्ट्रीय पेय बनण्याच्या मार्गावर असलेल्या चहाला "अमृततुल्य' असा दर्जा देऊन चहाचीही चव जपण्याची किमया इथं आहे! डेक्कनवरचं "तुलसी', जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर फुगेवाडी जकातनाक्‍यासमोरचा चहा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागचा चहा आणि शहरातल्या असंख्य कॉर्नर्सवरच्या चहाच्या गाड्या आणि दुकानं थकल्या- भागल्या पुणेकरांचा आधार आहेत.

अगदी मनापासून खवय्येगिरी करणाऱ्या बहुतेक पुणेकरांचे पानवालेही ठरलेले आहेत. जेवायला कुठंही गेलं तरी पान खायला प्रसंगी वाट वाकडी करून अनिलकडं, जंगलीमहाराज रोडला आणि कुठं कुठं जातील.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचं आणि पुणेरी स्वभावाचंही एक मजेशीर नातं आहे. ते व्यक्त होत राहतं हॉटेलातल्या खास पुणेरी पाट्यांतून. "इंटरनेटकरां'नी जगभर पोचवलेल्या या पाट्या नकळत कुठंतरी अस्सल पुणेरी रोखठोकपणाही मिरवताना दिसतात. सदाशिव पेठेतल्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलात तर इतक्‍या पाट्या होत्या, की तिथं जेवणाऱ्याला कुणी काहीही बोललं नाही तरी "अगदी घरच्यासारखा' फील यायचा असं म्हणतात! "कामाशिवाय बसू नये' ही पाटी इथं फार कुणी मनावर घेत नाही; पण "एक मिसळ दोघांत घेतली तर दीड मिसळीचा आकार पडेल,' हा हिशेब होऊ शकतो तो केवळ पुण्यातच!

ही पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची केवळ एक झलक. ही संस्कृती समजावून घ्यायची असेल तर ती अनुभवायलाच हवी. या अभ्यासाचे पुण्यातले नियम स्वतंत्र आहेत, त्यांचाही अभ्यास लागतो. गेले हॉटेलात, मागवलं काहीतरी, असं नाही चालत. ते नुसतं पोट भरण्याचं काम; पण एकदा का हे अस्सल पुणेरीपण समजावून घेतलं, की मग त्या "पूर्णब्रह्मा'ची गोडी नुसतीच कळत नाही, तर ती भिनत जाते!

------------------ माधव गोखले


 

Friday 17 August 2012

सुंदर आणि श्रीमंत !


अहमदाबाद मुंबई-गुजरात मेल. अहमदाबाद स्टेशनात मी धावतच गाडी गाठली. रात्रीचे पावणेदहा वाजून गेले होते आणि कामं आटोपून वेळेवर निघायचं म्हणून मला जेवणालाही फाटा द्यावा लागला होता. स्टेशनवरल्या स्टॉलवरून दोन सामोसे आणि अर्धा डझन केळी विकत घेऊन मी गाडीत चढलो आणि बर्थ गाठला.. समोरचा बर्थ पाहून एकदम फ्रेश झालो. तिशी-पस्तिशीचं एक नितांत सुंदर जोडपं समोर बसलं होतं. पुरुष हिंदी सिनेमातला नट शोभावा असा होता. निळी जीन्स, त्याला शोभेसा शुभ्र पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, पायात कोल्हापुरी वहाणा. ती पावलंही इतकी नितळ होती, की माझा रिझव्‍‌र्ह्ड बर्थ असूनही मला माझ्या पायातले बूट काढायची लाज वाटू लागली. बरोबर त्याची बायको असावी. त्याच्यापेक्षाही कांकणभर सरस, उंच, सडपातळ, केसाचा बॉब, खूप गहिरे काळेभोर डोळे, चिकणा तलम गुलामी पंजाबी ड्रेस.. एका सुंदर स्त्रीचं वर्णन करताना जे जे बोलता येईल ते सर्व तिच्याकडे होतं. इतकी देखणी स्त्री जवळ असलेला हा पुरुष या क्षणाला मला जगातला सर्वात श्रीमंत पुरुष वाटत होता. गाडी सुटली तशी माझी नजर वारंवार त्या दोघांकडे जाऊ लागली आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असाच असावा, हे मी मनोमन मान्य करून टाकलं.
मी लॅपटॉप काढला, उगाचच काहीतरी करायचं म्हणून बोटं फिरवू लागलो. मधूनच मी चोरट्या नरजरेनं दोघांकडे बघून घेत होतो. रात्र झाली आणि थोड्याच वेळात मला झोपावं लागणार आहे, याचंच मला वाईट वाटत होतं. त्यांना काहीतरी जाणवलं असावं. त्या नारायणानं बॅगेतून प्लॅस्टिकचा डबा काढला. त्यातून सँडविच काढून लक्ष्मीला दिलं. तिनं हातानंच ते नाकारलं. मला त्यांनी सँडविच खाण्याकरता विचारावं, अशी माझी अपेक्षा नव्हती; पण विचारलं असतं तर संवादाला सुरुवात करता आली असती. गाडीतले नऊ निरस तास बरे तरी गेले असते.
‘‘तू अजून रागावली आहेस काय?’’ नारायणने विचारलं. मी त्याचा आवाज प्रथमच ऐकला. प्रश्न मराठीतून आल्याने मला बरं वाटलं. तिचा आवाज आता ऐकायला मिळणार, या आशेनं मी कान टवकारले.
‘‘तुझ्या आईला अक्कल नाही रे अजिबात.’’ लक्ष्मीनं एकदम बॉम्ब टाकला. लॅपटॉपआड मी थरारलो. इतक्या सुस्वरूप स्त्रीकडून इतक्या कडवट शब्दांची मी अपेक्षाच केली नव्हती.
‘‘असं का म्हणतेस?’’ नारायणाचा स्वर अजिजीचा आलेला मला जाणवला.
‘‘आपल्या डॉक्टर सुनेला अशा सूचना देऊ नये, हे एवढं साधं कळत नाही त्यांना? मी काय झोपा काढतेय दवाखान्यात, गेली दहा वर्ष?’’
‘‘अगं, तू एवढय़ा वर्षानंतर प्रथमच प्रेग्नंट आहेस म्हणून काळजीपोटी बोलते ती?’’
‘‘तू आणखी बेअक्क्ल. ती मूर्ख बाई बोलते अन् तू तिची बाजू घेऊन मलाच समजावतोस?’’
‘‘माझ्या आईला माझ्यासमोर हे असे शब्द?’’
‘‘काय बोलू मग? व-हाडातल्या कुठल्या खेड्यातून आलेली बाई ही, चार बाळंतपणं घरी झाली हिची आणि ही मला, एका डॉक्टरला प्रेग्नन्सीत कसं वागावं हे शिकवते! स्टुपिड.’’
‘‘ऐकून घेत जा ग कधीतरी. फार चांगल्या मनानं सांगते ती आपल्याला.’’
‘‘का ऐकावं? तू सॉफ्टवेअर इंजिनियर, मी डॉक्टर. लाख रुपये कमवते मी महिन्याला. सीनियर डॉक्टरसुद्धा माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून ‘मॅडम मॅडम’ म्हणत मागेपुढे गोंडा घोळतात माझ्या. आणि मी या फाटक्या बाईचं ऐकून घेऊ? नेव्हर.’’
‘‘जाऊ दे ग, जुने लोक आहेत, त्यांची निश्चित मतं असतात काही.’’
‘‘ए, मतं माझ्यावर लादलेली मी नाही खपवून घेणार हं आणि यांना इतकं कळतंय, तर तुझी बहीण का मेली बाळंपतणात?’’
‘‘मेली नको म्हणूस ग, गेली बिचारी. तिचं सासर थेट खेड्यात, वेळेवर डॉक्टरी मदत मिळाली असतील तर वाचली असती ताई.’’
‘‘म्हणजे, आईचा शहाणपणा आला का कामास? ती आई तशीच आणि तिची मुलगीही तशीच.’’
‘‘बरं तू म्हणतेस तसंच. पण तू काही खाल्लेलं नाहीये, आतातरी खाऊन घे काहीतरी.’’
‘नो वे. तुझ्या आईनं सांगितलंय ना, आता तर तोंड नाही हलवणार. मी माझ्याच टाइमटेबलने चालणार. तुला समजतंय ना?’’
नारायणरावांनी नंदीबैलासारखी मान हलवली. मला सहनच होईना. या एवढय़ा चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या संवादांत, मनातल्या मनात मी कधी चकीत झालो, कधी संतापलो, कधी मला त्या क्षुद्र माणसाचा गळा दाबावासा वाटला, तर कधी चक्क त्या बाईला ‘या.. या नंदीबैलाला इंजिनियर बनवताना आणि इतर चौघांना आपल्या पायावर उभं करताना त्या माऊलीनं काय सोसलं असेल याची कल्पना आहे का?’ असं ओरडून विचारावंसं वाटलं. मला तिच्यासाठी लक्ष्मी हे नाव सहनच होईना. तासाभरापूर्वीची ती सुस्वरूप सुंदरी मला कुरूप दिसायला लागली आणि तो पुरुष जगातला सर्वात दरिद्री पुरुष.
आपला स्वत:वरचा ताबा सुटून आपण काहीतरी बोलू या भीतीनं मी लॅपटॉप मिटला, बर्थवर आडवा झालो आणि कोच अटेंडंटने दिलेली पांढरी चादर कानावर घट्ट लपेटून झोपून गेलो.
दादरला उतरलो तेव्हा प्रयत्नपूर्वक त्या दोघांकडे पाठ केली होती मी. पहाटे त्यांचे कुरूप चेहरे पाहिले असते तर दिवस निश्चितच नासला असता माझा. तसाच एसटी स्थानकावर आलो. अलिबागची बस लागलेलीच होती. खिडकीतच सीट मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानले अन् डोकं मागे टेकून, डोळे मिटून शांत बसून राहिलो.
‘‘बसू का दादा हीतं?’’ विटलेलं लुगडं नेसलेली, विस्कटलेल्या केसांची एक मध्यम वयाची बाई विचारीत होती. मी जरासा खजीलच झालो. अलिबागपर्यंत हा शेजार मला सहन करावा लागणार ही कल्पना फारशी सुसहय़ नव्हती.
मी खिडकीकडे सरकलो. बाई संकोचाने बसल्या. त्यांच्या शेजारी एक कॉलेजवयीन मुलगी येऊन बसली. साडेसहाला एसटी सुटली. गार वारा आत आला. बरं वाटलं. गाडीतले सगळे प्रवासी पेंगायला लागले. बाई मात्र टक्क जागी होती. आपल्याला झोप लागली आणि ही आपली बॅग घेऊन मध्येच उतरली तर पंचाईत या भीतीने मलाही झोपता येईना. तिच्या शेजारच्या तरुणीची मात्र झोपेमुळे मान कलायला लागली होती. मी पाहात होतो, तिचं डोकं हळूच बाईच्या खांद्यांवर विसावलं. बाई तिच्याकडे सरकली. आपला हात अलगद तिच्या डोक्यावर ठेवला. पोरगी दचकली. आपलं डोकं तिने बाईच्या खांद्यावरून पटकन काढून घेतलं.
‘‘झोप बाळा, व्यवस्थित झोप. -हाऊ दे डोकं माझ्या खांद्यावर.’’
‘‘सॉरी हं, चुकून झालं.’’
‘‘अग, सवारी कशापायी, माजी नात बी झोपत्ये की असंच. तु बी तेवढीच.’’
‘‘कुठे असते नात तुमची?’’ मुलीनं उगाच विचारलं. मला आवडलं नाही. कारण ही बाई  एकदा बोलायला लागली की, तिला थांबवणं कठीण झालं असतं.
‘हीतंच असत्ये ममईला. आता आली न्हवती का सोडायला मला? अलिबागला जाऊ नको म्हून लय मागं लागली माज्या.’’
‘‘ओके, तुम्ही अलिबागला जाताय होय?’’ मुलीच्या थांबतच नव्हत्या.
‘‘व्हय बाळा. सवत लय आजारी हाय माजी. तिचं करनारं न्हाई कुनी.’’
‘‘कोन आजारी आहे?’’ मुलीला ‘सवत’ हा शब्द ऐकायला गेला असावा. मलाही जरा आश्चर्यच वाटलं. दहा-पंधरा मिनिटांच्या आणि पाच-सात वाक्यांच्या परिचयावर बाई त्या मुलीशी ती आपली सख्खी नात असल्यासारखं बोलत होती.
‘‘सवत. दादल्याची ठेवलेली बाई. नऊ-धा वर्स झाली. मी मुलीजवळ ममईला, त्यो अन् सवत अलीबागला. आमची जमीन बक्क्ळ, पन ती बया घालून बसलीय घशात.’’
‘‘तरीही तुम्ही ती आजारी आहे म्हणून तिचं करायला जाताहात?’’
‘‘मग कोन करनार तिचं? तिची मुलं इचारेना तिला अन् दादल्याचं वय हाय का धावपळ करायचं?’’
‘‘अहो, पण नवऱ्यानं तुम्हाला सोडून तिला ठेवलीय ना?’’ मला अगदीच राहवेना म्हणून मी मध्येच तोंड घातलं.
‘‘तर काय भाऊ? या अशा येळेस बी राग लोभ धरायचा? त्यांचं केलं त्याचेपाशी आणि आपुन काय मोठं करतोय? आपुन पैशानं न्हाई करु शकत काई तर कष्टानं करावं. आपण चार कष्ट केल्याने कुनाला बरं वाटत असंल तर हरकत? शरीर झिजल तेवढं बरं दादा. आता या खेपेला वारी चुकंल माजी, पन या वर्साला इठोबाची न्हाई तर या रखमाईची सेवा घडंल.’’
माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. ही वाणी या गरीब फाटक्या बाईची का कुणा संताची? काहीच वेळापूर्वी कुरूप दिसणारी ही बाई मला देखणी आणि तेज:पुंज दिसू लागली. मघाची मरगळ सहजच दूर झाली. मला स्वत:चाच अभिमान वाटू लागला.
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत स्त्रीच्या शेजारी या क्षणाला मी बसलो होतो. पुढील अडीच तासांचा प्रवास अविस्मरणीय होणार होता!

------------ प्रहार 

Tuesday 14 August 2012

घरच्या घरीच सौंदर्य



आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 
 
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय. 

त्वचेची देखभाल 

खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते. 

सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत. 
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. 
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात. 
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल. 
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

* "आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

* तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात. 
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे?  

* चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. 
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य  

* खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 

हाता-पायांचीही काळजी  

* चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 

निरोगी केसांसाठी  

* लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 
हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 



------------------ दै. सकाळ