Tuesday 22 January 2013

संत गाडगे महाराज - भाग ४


कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू, संत, महंत काय, त्यांच्या पायांचे दर्शन आणि तीर्थ घ्यायला लोक नेहमीच धाधावले आढळतात. आणि तेही पठ्ठे, समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. कित्येक संत नमस्काराला आलेल्या भगतांच्या डोक्यावरच आपले पाय ठेवतात. असे झाले म्हणजे झालो बुवा, पावन झालो, भवसागरातून मुक्त झालो, जन्म-मरणाचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळतात. डेबूजी गाडगे बाबांनी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासूनच अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात. पण कोणालाही आपल्या पायांना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसांच्या पायांवर का म्हणून डोके ठेवावे? आदर काय दुरून दाखवता येत नाही? अशी त्यांची आचार-विचारसरणी आहे.
ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या
कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरतीत दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवांना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगेबाबांनी कीर्तनात ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या. तरीसुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदयस्पर्शी प्रवचनाना भारावलेल्या नि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पदस्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गाडगेबाबा जवळपास एखादी गुपचूप दडून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्होळ चालू करून दिला का सटकन निसटून त्या जागी दडून बसतात. पुंडलीक वरदा हारि विठ्ठल होऊन लोक पाहतात तो काय? गाडगेबाबा गडप, गुप्त, अदृश्य! भराभर लोक त्यांना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरूनही जायचे. अखेर, बुवा देवावतारी. झाले. गुप्तच झाले. अशा कण्ड्या पिकायच्या नि भोळसट त्या ख-या मानायचे. अनेक वेळा `कीर्तन आटोपल्यावर मला तुझे कांबळे दे बरं का पांघरायला थोडा वेळ’ असे कुणाला तरी आधीच सांगून ठेवायचे आणि दडायची वेळ आली का ते कांबळे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठेतरी काळोखात बसून रहायचे. कांबळे काळे नि काळोखही काळाच. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी त्यांना विनोदाचीही हुक्की यायची. `अहो तो गोधड्याबुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला.’ असे कांबळ्याच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेल खेडूत श्रोत्यांपैकी एखादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे-होय तर. तो लागलाय असा सहज सापडायला. देवरूपी तो. गेला पार कुठच्या कुठं पारव्यासारखा उडून. मग बुवाजी हळूच कांबळे बाजूला सारून प्रगट व्हायचे नि म्हणायचे, ``अहो, बाप्पानो, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल काय? बोल बोलता तो काय हवेत विरून जाईल? बामणांची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या फिसाटावर विश्वास ठेवण्याची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे.’’
अनेकनामी साधू
डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिकठिकाणचे लोक त्याला निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. व-हाडात त्याला डेबूजीबुवा किंवा वट्टीसाधू म्हणतात. नागपुराकडे चापरेबुवा म्हणतात. मद्रास नि कोकण विभागातगोधडेमहाराज. सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज. गोकर्णाकडे चिंधेबुवा. खानदेश, पुणे, बडोदे, कराची मोंगलाईत गाडगे महाराज इत्यादी अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील नि निकट परिचयातील मंडळी त्यांना श्रीबाबा किंवा नुसते बाबा म्हणतात.
डेबूजीच्या कीर्तनातली नवी जादू
सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत. असा हरदासाने गंभीर ध्वनि काढून कथेला प्रारंभ करताच, हा एकटा हरदासच तेवढा काठावर धडधाकट उभा नि बाकीचे सगळे जग समुद्रास्तृप्यन्तु झाले असे कोणीही शहाणा कधी मानीत नाही. कथा-कीर्तन-पुराणकारांची ब्रह्ममायेची नि समाधिमोक्षाची बडबड सुद्धा – एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात नि दुस-याने बाहेर  सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, न आवड, ना काही राम. जुलमाचा रामरामच असतो तो! त्याच पौराणिक कथा नि तीच आख्याने आणि तेच बिनकाळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या कीर्तनातल्या आख्यान-व्याख्यांनांची त-हाच न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा, वर्तमानकाळाच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा नि नळ-दमयंतीचा वनवास कशाला? खरं खोटा, तो झाला गेला, कालोदरात गडपला. समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी कष्टक-यांच्या वनवासावर नि उपासमारीवर त्याचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्यांना कसकशी फसवून लुटते. अनाक्षरतेमुळे गहाण-फरोक्ताचा भेद कसा उमगत नाही. आपली बाजू खरी न्यायाची असूनही खेडूत लोक कोर्टकचेरीच्या पाय-या चढायला कसे घाबरतात नि सावकार म्हणेल ते मेंढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोडगोड बालून रोजंदारीचा ठरलेला १२ आणे दाम हातावर ८ आणे टिकवून तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतक-याला आपला गुलाम बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो, या अवस्थेचे शब्दचित्र आपल्या बाळबोध गावंढळ भाषेत तळमळीने रंगवू लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यांतून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. ``तुम्ही निरक्षर राहिलात ते बस्स झाले. पण आता आपल्या मुलांमुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा.’’ हा त्याचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा.
परंपरेच्या ठराविक चाकोरीबाहेरचे नव्या विचारांचे तत्त्वज्ञान बहुजनसमाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठमोठ्या धर्म-पंथ-संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्यशोधनाचा नवा वळसा दिसला रे दिसला का बहुजनसमाज सटकलाच लांब दूर. पण डेबूजी गाडगे बाबांची शहामत मोठी! ते आपल्या तत्त्वचिंतनातले सत्यशोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्यापुढे कीर्तनांतून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुट्या भोळसट वारक-यांपासून तो कट्टर शहरी नास्तिकापर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी गाडगे बाबा ३-४ तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंगवून टाकतात, याचे शब्दचित्र काढणे माझ्या ताकदीबाहेरचे आहे. तो अनुभव ज्याचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा, दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो.
(१) देवासाठी आटापिटी
बरं आता, देव म्हणजे काय? हे सांगणं कठीण आहे बाप्पा. शास्त्र पुराणं वेद यांचं हे काम. माझ्यासारख्या अनाडी खेडवळाला कसं बर ते सांगता येणार? पण माझ्या इवल्याशा बुद्धीप्रमाणे सांगतो. पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयालाही नेणारी एखादी महाशक्ती असावी. तिला आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव नि रूप दिलेले आहे. नावरूपाशिवाय माणसाची समजूत पडत नाही. बरं आता देव कुठं आहे? संतशिरोमणि तुकोबाराय म्हणतात,
देव आहे तुझ्यापाशी । परि तू जागा चुकलाशी ।।
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तिथे ।।
अशी एक कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठावठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात का मी वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठंही नाही. मग पत्ता? तर देव सरळ पत्ता देतात हे नारदा, माझे भक्त माझे गुणगान कीर्तन करीत असतील, तेथे द्वारपाळाची नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडं कुठं हुडकण्याची नि पहाण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो. भलभलत्या फंदाच्या नादी लागून भटकत आहोतत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे.
बंदे! तूं क्यूं फिरता है ख्वाबमें, मैं हूं तेरे पास.
आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा यात्रा तीर्थक्षेत्रे धुंडाळू लागलो. यावर संतांचे इषारे काय आहेत पहा.
जत्रामे फत्तर बिठाया । तीरथ बनाया पाणी ।
दुनिया भई दिवाणी । पैसेकी धुळधाणी ।।
काशी गया प्राग त्रिवेणी । तेथे धोंडा पाषाण पाणी ।।
तीर्थवासी गेले आणि दाढीमिशा बोडून आले।।
पाप अंतरातले नाही गेले । दाढी मिशीने काय केले ।।
भुललो रे भुललो. आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराय म्हणतात.
शेंदून माखोनिया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।।
देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बाप झाला ।।
देव सोन्याचा घडविला । सोनार त्याचा बाप झाला ।।
सोडोनिया ख-या देवा । करी म्हसोबाची सेवा ।।
दगडाला चार दोन आण्याचा शेंदूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडता, तोंडात राख घालता, ही कायरे बाप्पा तुमची अक्कल? देवमूर्ती घडवणारे पाथरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला. आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्ड्याकडं चाललो आहोत. म्हसोबा मरीआईपुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललंय ते पहा.
सवाल – जगात देव किती आहेत?
जबाब – (श्रोत्यांचा) – एक.
सवाल – देव एकच आहे, हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बाप्पा. आपल्या गावी खंडोबा आहे का नाही? (आहे.) मग आता देव किती झालं? (दोन.) आपल्या गावी भैरोबा आहे काय? (आहे.) आता देव किती झालं? (तीन.) आपल्या गावी मराई आहे का नाही? (होय, आहे.) आता देव किती झालं? (चार.)? आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? (आहे.) आता देव किती झालं? (पाच) पहिलं म्हणत होता देव एकच आहे म्हणून. मग हा कारखाना कुठं सापडला? आणि याची वाढ कुठवर लांबणार? अशा लोकांना तुकोबा म्हणतात, ``वेडं लागलं जगाला देव म्हणती धोंड्याला’’ मेंढे आहोत आपण. काही ज्ञान नाही.
एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगाव पहावं तर दगडांना शेंदूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालू ठेवलाय. अहो, बाप्पानो, दगड धोंड्यांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसालाही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटेबाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठमोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरंढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमंल का हे असं केलं तर? (नाही, नाही, नाही.)  तर मग हा धंदा लबाडीचा आहे.

अखिल विश्व निर्माण करणारा आणि ते सुयंत्र चालवणारा कुणीतरी असावा. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, काय वाटेल ते नाव द्या. पण तो चार हातांचा आहे, आठ हातांचा आहे, भक्तांना स्वप्नांत दर्शन देतो, मोठा प्रकाश पाडतो, भक्तांना साक्षात्कार होतात, या गोष्टी थोतांड आहेत, असा बाबा सिद्धांत सांगतात. `स्वतःची बुवाबाजी माजविण्यासाठी या थोतांडाचा मतलबी लोक मोठा व्यापार करतात. त्यापासून शहाण्याने सावध असावे.’
``माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ती बनवतो आणि आपलेच चित्र उभे करतो आणि त्याला देव समजून लोटांगणे घालतो. माणसासारखाच देव असता, तर देवाला साधले ते माणसानाही साधले असते. देव सगळ्यांना सारखा पाहणारा. किडी मुंगीपासून सगळ्यांवर त्याची दया सारखी. मग अमक्याला दर्शन दिले नि तमक्याला द्यायचे नाही, असला भेदाव त्याच्यापाशी का असावा? माझी खात्री झाली आहे की देव साकार नाही आणि निराकारही नाही. तो कुणाला दर्शन देत नाही. व्हायचंच नाही ते. दर्शनाची, स्वप्नाची, साक्षात्काराची नि प्रकाश दिल्याची सारी सोंगेढोंगे आहेत.’’
``देव दिसणारच कसा? तो कसा आहे, हेच मुळी आजवर कुणाला उमगलेले नाही मोठेमोठे ऋषि मुनि होऊन गेले. `आम्हाला हे देवाचे गूढ समजले नाही हो नाही.’ हे त्यांनी चक्क कबूल केले. तरीही या देवदर्शनाच्या नि साक्षात्काराच्या गप्पा चालूच आहेत. खोट्या आहेत त्या सा-या.’’
(३) अंगात येणारे देव
तुमच्याकडं देव अंगात येतात का? (होय. येतात) आजवर देव कुणाच्या अंगात आला नाही, येत नाही आणि येणार पण नाही. तुम्हा आम्हाला देवाच्या रंगरूपाचा नाही ठावठिकाणा, असा तो देव माणसाच्या अंगात येईलच कसा? अंगात देव आल्याचे सोंग करणा-या घुमा-यांना नि अंगारे देणा-यांना चांगले फैलावर घ्यायचे सोडून, आपण त्यांच्यापुढं नाकदु-या काढतो. देवा असं कर, तसं कर म्हणतो. कसला हा अडाणीपणा? देव अंगात आणण्याच्या कामी पहिला नंबर बायांचा. दोघी चौघी जमल्या, एक ऊदकाडी पेटवली, नाकात थोडं धुपट गेलं का झाली नाचा उडायला नि घुमायला सुरुवात. ज्या बाईच्या अंगात येतं तिचा नवरा हवा चांगला खमक्या मर्दाना. पण हा असतो मसाड्या. बाई नाचायला, उडायला लागली तर हा धुपाटण्यात ऊद घालून तिच्यापुढं नमस्कार घालतो. मग त्या बाईला येतो डबल जोर. ती जोरजोरात नाचायला लागते. याला औषध फार सोपं आहे. पण त्या बाईचा नवरा खरा मर्दाना पाहिजे. आपली बायको लाजलज्जा गुंडाळून नाचायला लागली का एका बाजूने जाऊन त्याने तिच्या अश्शी सज्जड थोबाडीत भडकावून द्यावी, एका थपडीत तिचा घुमारा बंद. शकून सांगणारे, अंगारे धुपारे देणारे, ताईत गण्डेदोरे बांधणारे आणि हे घुमारे यांच्या सावलीतसुद्धा जाता कामा नये. यांच्या नादी लागला त्याचे झालेच वाटोळे समजा.
या अंगातल्या देवांची मजा पहा. मुंबईला डोंगरीहून देव घुमत निघाला चौपाटीकडे. आता देवाची हुशारी पहा. रस्ता मोकळा असेल तर देव मेनरोडच्या अगदी मधोमध नाचत उ़डत घुमत जातो. जर का समोरून एकादी मोटार टों टों करीत आली का देव झटकन फूटपाथच्या बाजूला धाव घेत जातो. मोटार गेलीसे दिसले का पुन्हा सगळे ते मांग डफलेवाले मंजिरीवाले नि त्या २-३ बाया लागल्या पुन्हा मेनरोडच्या मधोमध येऊन टपांग डांग चिन् वाजवीत नाचायला, घुमायला. अशा ढोंगधत्तु-यारा बाबांनो तुम्ही काय देव समजता? असल्या देवांची चांगली सटक जाईपावतर झणझणीत पूजा केली पाहिजे काठी खराट्याने. पण आपण पडलो मेंढ्याचे मावसभाऊ!
(अंगात देव आणणा-या बायांची नि त्यांच्या ढोलकी तुणतुणेवाल्यांची हुबेहूब नक्कल करताना गाडगे बाबा इतके विनोदी रंगात येतात की लोकांची हासता हासता मुरकुंडी वळून, शरमेने ते माना खाली घालतात.)
(४)आणि तो सत्यनारायण
(सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजेचे व्यसन सगळीकडे फार बोकाळलेले आहे. पुष्कळ वेळा एकाद्या ठिकाणी असल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा बेत ठरवून, पाठोपाठ गाडगे बाबांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. ठरल्या वेळी बाबा येतात ते थेट कीर्तनाच्या जागेवर जाऊन उभे राहतात. सत्यनारायणाच्या थाटाकडे ते पाहतही नाहीत. नमस्कारही करायचे नाहीत आणि तीर्थप्रसादही घ्यावयाचे नाहीत. मग कशाला करतील ते स्पर्श त्या तुपाळ शि-याच्या प्रसादाला? कीर्तनात हरिनामाच्या गजर चोलू होऊन प्रवचनाला रंग चढला का मग बाबांचा हल्ला सत्यनारायणावर कसा चढतो ते थोडक्यात पहा.
``आता हा सत्यनारायण देव लोकांनी तयार केला आहे. चांगला सोयिस्कर देव आहे बरं का हा. सव्वा रुपयात हवा तो नवस पुरा पाडतो. सव्वा रुपयात हल्ली मजूर नाही कामाला मिळत. आणि मिळाला तरी चोख काम करील तर हराम. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मघाशी तुम्ही त्याची पोथी ऐकलीच असेल. त्या कलावति का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईनं सत्यनारायणाचा प्रसाद खाताच. झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर काय? आहे का नाही या देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धांत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सत्यनारायणाची सोपी युगत अजून त्यांना कोणी सांगितली नाही कशी, कोण जाणे? बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला, त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला का भरभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील. येतील का नाही, सांगा तुम्ही? ही लांबची विलायतची भानगड राहू द्या. आपल्या जवळच्या मुंबई बंदरातच ती रामदास बोट बुडाली आहे. बापहो, माझी पैज आहे. एक कोट रुपये रोख देतो. कोणीही सत्यनारायणाच्या भगतान अपोलो बंदरावर सत्यनारायणाची महापूजा करून, ती बोट वर आणून दाखवावी असं झालं नाही, तर हा सुद्धा, बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा एक लबाडीचा धंदा आहे. त्यांच्या नादी लागू नका.’’

देवापुढे पैसा अडका, फळफळावळ ठेवली म्हणजे आपण मोठे पुण्य केलं अशा समजाचे  लोक पुष्कळ आहेत. ही त्यांची चूक आहे, बाप्पांनो, चूक आहे. भूल आहे. देव मोठा का आपण मोठे? (देव मोठा.) सर्व काही देवाने आपल्याला द्यायचे का आपण देवाला? (देवाने द्यायचे) देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसे का ठेवता? हा देवाचा अपमान आहे. देवापुढे पैसे ठेवणारे लोक मोठे डोकेबाज नि हुशार असतात हां. देवाच्या पाया पडायला जातो नि नमस्कार करून पुढे काय ठेवतो? तर एक भोकाची दिडकी! आपल्या खिशात शंभर दहा पांच रुपयांच्या नोटा असलेल्या देवाला काय माहीत नसतात का हो? सगळा अस्सल माल आला नि रद्दी तेवढी देवाची. हा न्याय कुठला हो बाबांनो? जरा विचार करू याआपण. देव त्या भोकाच्या दिडकीने खूष होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर तो रुष्टच होईल. अहो, कसल्या तरी क्षुल्लक चुकीसाठी पोलिसाने आपल्याला पकडले, तर सुटकेसाठी तो सुद्धा भोकाच्या दिडकीने खूष होतो काय? त्याला लागते हिरवी नोट. दिली नाही का बसलाच त्याचा दण्डा आपल्या पाठीवर. हे पहा बाप्पांनो, पैशा अडक्यानं नि फळफळावळींनी देवाशी चाललेला आपला हा व्यापार मूर्खपणाचा आहे. पैसा, फळे देवापुढे ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप पहा. पैसे लावील पुजारी आपल्या कडोसरीला नि फळांवर पडेल त्याच्या मुलामुलींची धाड. देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्तिशिवाय कशाचाही भुकेला नाही.
``देव भावाचा भुकेला..... धरा बळकट भाव, आपोआप भेटे भाव.’’ भक्तिभावाने केलेल्या एका नमस्कारातच देव खूष असतो. राजी असतो. म्हणून सांगतो हात जोडून का बाबांनो देवापुढं पैसा अडका, फळफळावळ ठेवू नका. देवाला नवस करू नका. केले असतील तर देऊ नका. देव कुणाच्या नवसाला आजवर पावला नाही, आज पावत नाही, पुढे पावणार नाही. देवाला नवस देणारेघेणारे व्यापारी, सावकार तुम्ही बनू नका. प्रपंच करून शिवाय वर मोठेपणा मिळावा यासाठी धूर्त लोकांनी तर्कातर्कांनी भोळ्या भाविकांना पद्धतशीर जाळ्यात अडकवण्यासाठी ही अनेक देवदेवतांची लफडी निर्माण केली आहेत. ती देव दैवते नसून पुजा-यांची अल्प-भांडवली दुकाने आहेत. या दुकानांवर देवाणीचा नव्हे तर फक्त घेवाणीचाच सवदा होत असतो. असल्या फंदांचा सर्व संतांनी कडकडीत निषेध केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात –
म्हणती देव मोठे मोठे । पूजताती दगड गोटे ।।
कष्ट नेणती भोगती । वहा दगडाते म्हणती ।।
जीव जीव करूनी वध । दगडा दाविती नैवेद्य ।।
रांडा पोरे मेळ झाला । एक म्हणती देव आला ।।
नाक घासूनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ।।
एका जनार्दनी म्हणे । जन भुलले मूर्खपणे ।।
(६) नवसाने पोरे होतात ?
कामंधामं आटपल्यावर संध्याकाळी भोळ्या बाया नि त्यांचे मालकसुद्धा शिळोप्याच्या गप्पा मारायला गावच्या देवळात जमतात. दर्शन घेतल्यावर मालक थोडा वेळ बाहेर थांबतात. हो, कारण ज्ञानोबाराय सांगतात ना की,
देवाचियाद्वारी उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।
दररोज या चारी मुक्ति साधण्याचा लाभ टाळायचा कसा? मालक गेले का बायांची पार्लमेण्ट भरते. तिथं कसकसल्या भरताड गप्पा निघतील त्याचा नेम नाही. एकादी भागूबाई गंगूबाईला सांगते, ``बगा बया, मला पदर आला तवापून  चार वरसं झाली, सा वरसं झाली, पुन मुलाचा पत्या नाय. त्या भीमाआजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला. जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस. फुकाट दीस कशाला घालवता? दुस-याच दिशी कारभारी नि मी खंडोबाकडं गेलू, नवस केला, आनं तवापासनं हा ना-या, गंप्या, चिंगी नि बनी झाल्या पगा बायांनो. देवाच्या दरबारात बसलूया समदी आपन. खोटं कशाला बोलायचं? त्ये पहा समूरच कारभारी बसल्याति. इचारा त्येना हवं तर. खरं का न्हाय वो कारभारी!’’ कारभारी पडला नंदीबैलाचा मावसभाऊ. तो सरळ होकाराची मान हालवतो. आता विचार करा माझ्या मायबापानो, खंडोबापासनं जर पोरं होतात, तर नवरा चांगला, नवरी चांगली, मुहूर्त पहा, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेण्डबाजा लावा, वरात काढा, नवराबायकोचा जोडा खोलीत घाला, या खटपटी कशाला हो हव्यात? कुण्याही बाईनं उठावं, देवळात जावं, देवाला सांगून चार पोरं आणि दोन पोरी घेऊन यावं. सोपा कारखाना. जमंल का हे? (नाही नाही) नाही ना? मग नवसानं पोरं झाली नि होतात, असं म्हणणारांची माथी कशी पोकळ आहेत बरं? तुकाराममहाराज म्हणतात –
नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति ।
देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबांनो. तीर्थक्षेत्रे, जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुलभुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढीमिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा.
(७) जादूटोणे आणि चमत्कार
यावर विश्वास ठेवणारांची विनोदपूर्ण कोटिक्रमांनी कीर्तनात बाबा टर उडवू लागले का हास्याचे खोकाट उडतात. ``जादूटोणे करून अथवा मूठ मारून हवा त्याचा धुव्वा माणसाला उडवता येता तर मग तो देवापेक्षाही मोठा म्हटला पाहिजे. लढायात असले आठ दहा मूठ मारणारे सोडले का काम भागले. कशाला हव्यात बंदुका, तोफा नि ते आटम बांब? मंत्रेच वैरी मरे । तरी कां बांधावी कट्यारे।।’’
``चमत्कार! अमका माणूस म्हणे एकदम गुप्त झाला. एकाच वेळी चार दूरदूरच्या गावात लोकांना दिसला. असं कधी होतं का बाप्पा. खोटं आहे हे सारं. मुळीच विश्वास टाकू नका असल्या गटारगप्पांवर. देवाला घाम फुटला. मारुतीच्या बेंबीत म्हणे कोणाला टिळक दिसले. का बाबांनो आमच्या टिळकांची नि त्या मारुतीच्या मूर्तीची अशी हकनाहक बदनामी करता?’’
``सगळ्या पोथ्या पुराणांत हे असले चमत्कार रगड लिहिले आहेत. पण खरं खोटं आपण उमजून घेतलं पाहिजे. उगाच मेंढ्यामागे मेंढ्यासारखं जाण्यात काय हशील?’’
``माणूस हाच एक मोठा चमत्कार आहे. त्यातल्या त्यात कष्ट मेहनत करून जमिनीतून अन्नाचे सोने काढणारा शेतकरी उपाशी मरतोच कसा? हा एक मला मोठा चमत्कार वाटतो. या चमत्काराचे मूळ शोधायचे, त्यातले खूळ टाकायचे, का अमका गुप्त झाला नि तमका दहा ठिकाणी एकदम दिसला, असल्या चमत्कारांच्या गप्पा मारीत बसायचे? याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे बाबांनो.’’

शिष्यांच्या कानात मंत्रोपदेश देणे, ठराविक संप्रदायाची माळ गळ्यात घालणे किंवा एकादा विशेष पेहराव वापरायला लावणे, या मामुली संताळी चाळ्यांना गाडगे बाबांनी केव्हाही थारा दिला नाही नि मुलाजाही राखला नाही. ``ज्यांना लोक-सेवेची ही कष्टाची कामगिरी आवडत असेल, त्यांनी कडकडीत निर्लोभी वृत्तीने ती करावी. परवडली नाही, संसाराचा मोह मनात डोकावू लागला रे लागला का झटदिशी हा मार्ग सोडून खुशाल प्रपंचाला लागावे.’’ हा त्यांचा इषारा वरचेवर ते अनुयायांना देत असतात. आधी प्रपंच करा नि मग परमार्थाला लागा, हे प्रत्येक नवागताला बाबा अट्टहासाने सांगतात. अविवाहिताला  सुद्धा ``लग्न करूनही बायकोसकट लोकसेवेच्या मार्गाला लागलास तरी हरकत नाही. पण दांभिक ब्रह्मचर्य नको.’’ असा खडखडीत इषारा देतात. शिष्य म्हणून मिरवणारांना अनुलक्षून कीर्तनात ते कटाक्षाने जाहीर सांगत असतात की –
``मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही. स्वयंप्रेरणेने प्रपंचाचा मोह टाकून जे जे कोणी निरिच्छतेने आणि निर्लोभी वृत्तीने दीनोद्धाराच्या आणि अडाणी जनतेला देवधर्म विषयाचे खरे ज्ञान देऊन त्यांना कर्तबगार बनवण्याच्या कामात तल्लीनतेने झतटत झगडत अजून माझ्या मागे टिकून राहिलेले आहेत, ते सारे माझ्या अनंत जन्माचे गुरूच आहेत.’’ परवा एका गावी कीर्तन करीत असताना आपल्या एका अनुयायाचा बाबानी गुरुबंधू म्हणून उल्लेख करताच, सभोवारचा हजारो श्रोतृगण चमकला. शिष्याला बाबा `गुरुबंधू’ म्हणतात हे काय गूढ असावे, हाच प्रत्येकाला प्रश्न पडला. खुलासा विचारला असता बाबा हासत हासत म्हणाले - ``बाप्पा, तुकारामबुवा आमचे समद्याहीचे (सगळ्यांचे) गुरू. त्याहीचे (त्यांचे) आमी सगयेच (सगळे) शिष्य न हो काय?’’ या छोट्याशा उत्तरातच बाबांच्या सांप्रदायिक निषेधाचे सारे ब्रह्माण्ड आढळते.
कीर्तन-सप्ताह आणि भंडारे
बाबांचा लोकसंग्रह शतरंगी आहे. त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत ब्राह्मणांपासून तो थेट महार मांगापर्यंत सर्व जमातीचे कीर्तनकार भजनी लोकसेवक आणि त्यागी संचारी प्रचारक यांचा सरमिसळ भरणा झालेला आहे. कोण कोठचा नि कोणत्या जातीचा हा भेदच उमगायचा नाही. भेदातीत बंधुभावाचे इतके कौतुकास्पद उदाहरण उभ्या भारतखंडात एकाहि संघटनेत आढळणार नाही.
`कीर्तनाला जा’ असा बाबांचा हुकूम सुटला आणि नवशिक्याने कुठे जाऊ या? असा सवाल टाकला म्हणजे बाबा सांगतात - ``हवा तिथे हवेसारखा जा. पाय नेतील तिकडे जावे. हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे.’’
बाबांच्या कीर्तनाची मोहिनी महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात संचारल्यावर, जागोजाग लोक त्यांना सप्ताहाचा आग्रह करू लागले.  जा त्या गावी, लावा विणा, असा हुकूम सुटला का अनुयायांपैकी कोणीतरी तेथे जाऊन सप्ताहाचा प्रारंभ करायचा. सातव्या दिवशी फक्त कीर्तनाला बाबा हजर. गाडगेबाबांचे कीर्तन होणार ही आवाई गेली का आसपासच्या १०-१० नि १५-१५ कोसांवरून स्त्री-पुरुष-मुलांचे घोळकेच्या घोळके पायी, घोड्यांवर नि गाड्यांतून जमा व्हायचे. त्या चिमुकल्या खेड्यात किंवा तालुक्याच्या गावात एकाकी मोठे लष्कर उतरल्यासारखा गाडीतळ पडायचा. माणसांची तर दाटीवाटीची यात्राच जमायची.
प्रसादाच्या भंडा-याची योजना
बाबांच्या कीर्तनासाठी गावोगावचे हजारो लोक आस्थेने यायचे. मावळतीला परक्या गावी आल्यावर त्यांच्या जेवण्याखाण्याची सोय काय? कीर्तन रात्री ९च्या पुढे चालू व्हायचे नि मध्यरात्री १-२ वाजता पुरे व्हायचे. म्हणजे रात्रभर मुक्काम करावाच लागे. सुखवस्तू आपापल्यापुरते फराळाचे आणीत. पण केवळ बाबांच्या रसाळ कीर्तनाच्या रंगात रंगण्यासाठी अन्नपाण्याची पर्वा न करता आलेल्या इतर असंख्य जनांची सोय काय? त्यांनी काय उपाशी पोटी कीर्तन ऐकावे?
थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार, या तुकोक्तीच्या संदर्भाने बाबांनी लोकमताचा कल भंडा-याकडे मोठ्या कुशलतेने वळवून, सप्ताहाच्या दिवशी भंडा-याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. ``गोरगरिबांसाठी थोडेबहुत अन्नदान कराल तर ठीक होईल. आपल्याला दूध द्यायची सक्ती नसेल तर ताक तरी द्यावे. तेहि नसेल तर पोटभर पाणी पाजावे `आईये बैठीये पीजे थोडा पाणी, यह दो बातोंको नलगे पैसा और आणि.’ आपल्याकडे येणा-यांचा प्रेमाने आदर करणे हा मोठा गृहस्थ-धर्म आहे.’’ अशा अर्थाचे बाबांचे उद्गार बाहेर पडताच मग काय हो! सारे गावकरी कंबर कसून भंडा-यासाठी साहित्याची भराभर जमवाजमव करायचे. ज्वारी – गव्हाच्या पिठांची पोती, साखरेच्या गोणी, गुळाच्या ढेपी, भराभर थप्प्या लागायच्या. चुली पेटायच्या. पुरुष बायका मुले कामाला लागायची. सैपाक तयार झाला का पुढचा थाट पहा कसा व्हायचा तो.
बाबांनी नि अनुयायांनी हातात खराटा घेऊन भोजनासाठी जागा अशी स्वच्छ नि चोख झाडायची का सारे गावकरी आश्चर्याने बघतच रहायचे. ज्वारीच्या पिठाने रांगोळ्या घालायच्या पत्रावळी मांडायच्या. ``बाबा आम्ही आहोत, तुम्ही नुसते पहा.’’ असे कुणी सांगितलेले परवडायचे नाही. कामाचा झपाटा सारखा चालू. पंगतीसुद्धा नीट सरळ ओळीत रांगेने आखायच्या. वेडेवाकडे जड बोजड थातर मातर खपायचे नाही. पंगतीच्या मांडणीचा थाट पाहून शहरी इंजेनरही तोंडात बोट घातले पाहिजे आणि खेडुतांनाही शिस्तीच्या वळणाचा धडा घेता आला पाहिजे, असे धोरण. वेळ झाली का सगळे भोजनार्थी पाहुणे, जात कुळी, धर्म, स्पृश्य-अस्पृश्य कसलाही भेद न जुमानता, सरळ एकाजवळ एक एका पंगतीत बसून पुण्डलीक वरदा हारि विठ्ठल गर्जनेत जेवायचे. जेवणे आटोपल्यावर खरकटी काढायला, जागा झाडून सारवून स्वच्छ करायला, इतरांच्या बरोबरीने गाडगे बाबा सगळ्यांच्या पुढे हजर.  सहस्रभोजन आटोपताच कीर्तनासाठी रंगणाची व्यवस्थाही तेच करायचे. इकडे दिवाबत्ती लागत आहे तोच चटकन बाबा कोठेतरी निघून जायचे. एवढे प्रचंड मिष्टान्नांचे भोजन व्हायचे, पण बाबांनी आजवर चुकून कधी त्यातला एक घास तोंडात घातलेला नाही. ते जवळपासच्या कोठेतरी एकाद्या झोपडीसमोर हारळी देऊन मिळेल ती कांदा चटणी मडक्यात खाऊन, बिनचूक वेळेला कीर्तनासाठी समाराधनेच्या जागेवर हजर. मात्र असल्या मिष्टान्न समाराधनेतच जर कोणी भाकर, भाजी , झुणका, आमची आणून त्यांच्या मडक्यात दिली तर पंगतीत दाटीवाटीने बसून आनंदाने खातील. मिष्ठान्न अपंग गोरगरिबांना. आपण स्वतः इतरांना भरपूर वाढायला सांगतील. त्यांचे खरकटे काढतील. पण एक घास चुकूनही कधी चाखणार नाहीत. हा निर्धार आजपर्यंत अखंड पाळलेला आहे. या समाराधनेत अनाथ अपंगांना कपडे वाटण्याचेही कार्यक्रम नेहमी होत असतात.

आत्यंतिक निरिच्छता हा गाडगे बाबांच्या चारित्र्याचा आत्मा. त्याच्यापुढे मोठमोठ्या धनवंतांनी हात टेकले नि उदारधींच्या उदारतेने मान वाकवली. चिंध्या-मडकेधारी ही त्यागी विभूति कंठशोष करून जनतेला नवा माणुसकीचा धर्म शिकवते, दररोज पाच-पंचवीस मैलांची पायपिटी करीत गावेच्या गावे नि शहरेच्या शहरे पायदळी घालते कोणी काही मिष्टान्न पक्वान्न, कपडालत्ता दिला तर त्याचाही अव्हेर करून निघून जात, अडल्या नाडल्याच्या अडवणुकीत सोडवणुकीला धावते, कसे या साधुपुरुषाचे पांग फेडावे? या प्रश्नाने गावोगावचे लोक विव्हळ व्हायचे. ``बाबा, तुमच्यासाठी आम्ही काय करावे सांगा?’’ ``माझ्यासाठी? मला कशाचीच गरज नाही. काही करायचेच असेल तर तुमच्यासाठी तुम्ही करा, मी सांगतो. अन्नदानासारखा जगात दुसरा मोठा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता. बाबांनो, जरा सभोवार नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे, पांगळे, लुळे, लंगडे महारोगी गावोगाव मुंग्याच्या वारुळासारखे वळवळाताहेत. उष्ट्यामाष्ट्यावर कशी तरी पोटाची खाच भरताहेत. तुमच्या कमायतीत नाही काहो बाबांनो, त्यांचा काही हक्क? त्या आपल्या अभागी भावाबहिणींना सन्माने पाचारून वर्षातून एकदा तरी, एकाद्या यात्रेजत्रेच्या प्रसंगी, गोडधोडाचे पोटभर जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा निवेद. तीच त्याची खरी भक्ति नि ती खरी त्याची महापूजा.’’
सप्ताहाच्या भंडा-याप्रमाणेच अनेक वेळा केवळ अनाथ अपंगांसाठी मिष्टान्नांची भोजने आणि त्यांना वस्त्रदान, हे समारंभ महाराष्ट्रात हजारो ठिकाणी आजवर साजरे केले आहेत आणि साध्यही होत आहेत.
झंजावाती संचाराती फलश्रुति
गाडगे बाबांचा संचार म्हणजे एक तुफानी झंजावाताचा सोसाटा म्हटले तरी चालेल. कोणत्याही ठिकाणी एक दिवसापेक्षा अधिक ते कधी रहायचेच नाहीत. आज मुंबईला दिसले तर उद्या व-हाडात वर्ध्याला, परवा औरंगाबादला नि तेरवा थेट गोव्याच्या सरहद्दीवरील एकाद्या गावी. त्यांची गाठभेट बिनचूक घेणे आजवर त्यांच्या निकटवर्ति अनुयायांनाही साधत नाही, तेथे इतरांचा पाड काय? या झंजावाती संचारात त्यांनी व-हाड ते गोमांतकापर्यंत लोकांच्या रहाणीचे फार सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे. यात्रा जत्रांच्या तीर्थक्षेत्रांत गोरगरिबांच्या अन्नपाणी, निवा-याचे किती भयंकर हाल होतात, ते त्यांनी पाहिले होते. ही अडचण दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि जागोजाग धर्मशाळा, सदावर्ते, पाणपोया आणि मागासलेल्या जनतेच्या उमलत्या पिढीसाठी शाळा नि बोर्डिंगे स्थापन करण्याची अनन्यसामान्य कामगिरी केलेली आहे.
सन १९०८ साली ऋणमोचनच्या नदीला घाट, परीट जमातीची धर्मशाळा – गावक-यांच्या इच्छेसाठी लक्ष्मीनारायणाचे मंदिर वगैरे गाडगेबाबांना लोकांकडून करवून घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. त्यानंतर सालोसालच्या वार्षिक मुद्गलेश्वराच्या पौषी यात्रेला बाबा गेले का एकेका नवीन कार्याचा पाय घालीत आणि भटकंतीला जात. ऋणमोचनाला आता एकचसा काय, पण सोयीस्कर जागी नदीला चार प्रचंड घाट बांधण्यात आले आहेत व पांचव्या घाटासाठी जनतेची ५ हजारांची वर्गणी तयार आहे.
बाबांचे ते फुटक्या गाडग्याचे टवकळ जशी त्यांची कामधेनू, तशी आत्यंतिक निरिच्छतेने आणि कमाल निस्पृहतेने झळकणारी त्यांची वाणी जागोजाग कल्पवृक्षाप्रमाणे मोठमोठ्या धर्मशाळा अन्नसत्रे गोरक्षण संस्था आणि शिक्षणाच्या शाळा जादूप्रमाणे निर्माण करीत चालली आहे. तोंडातून शब्द निघायची थातड, मोठमोठे श्रीमंत स्त्री पुरुष तो झेलायला आजूबाजूला हात जोडून उभेच असतात. गाडगे बाबांनी केवळ इच्छामात्रे करून महाराष्ट्रभर उभारलेल्या असल्या लोकोपयोगी इमारतींचे नि संस्थांचे जाळे फार विशाळ आहे. त्यांची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एका १०० पानी सचित्र ग्रंथातच छापलेली मिळते. वानगीदाखल काही ठळक संस्थांची नावे मात्र येथे देणे शक्य आहे.
(१)ऋणमोचन घाट. मंदिर. सन १९०८. खर्च रु. २५ हजार. आणखी ३ घाटांचा हिशेब निराळाच.
(२)   मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, धर्मशाळा, सन १९०८, खर्च १ लाख रुपये
(३)   पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, सन १९२०, खर्च १ लाख
(४)   पंढरपूर मराठाशाळा, सन १९२०, खर्च २लाख
(५)   पंढरपूर परीट धर्मशाळा, सन १९२५, खर्च २५ हजार
(६)    नाशिक धर्मशाळा, सन १९३०, खर्च ३ लाख
(७)    आळंदी धर्मशाळा, सन १९३०, खर्च १ लाख
(८)    आळंदी परीट धर्मशाळा, सन १९३०, खर्च ० हजार
(९)     देहू धर्मशाळा, सन १९३०, खर्च २५ हजार
(१०)    त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, सन १९४८, खर्च २५ हजार
(११)    पुणे आकुल धर्मशाळा, सन १९४०, खर्च दीड लाख
(१२)    त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, सन १९४०, खर्च १० हजार
याशिवाय आणखी पाच पन्नास संस्था आहेत, त्यांची नावनिशीवार यादी कोठवर द्यावी? पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालण्यासाठी नुकतीच डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.

या संस्थांच्या टोलेजंग इमारती बाबांनी मनोमन आखाव्या, स्वयंस्फूर्त धनिकांनी ‘घ्या घ्या’ म्हणून पैशांच्या पाशी बाबांपुढे ओतून त्या प्रत्यक्षात आणाव्या आणि पायाभरणीच्या क्षणालाच त्या सर्व इमारतींचे ट्रस्ट-डीड करून त्या जबाबदार विश्वस्तांच्या हवाली कारभारासाठी द्याव्या. प्रत्येक ठिकाणी त्यात एक मुख्य अट ठळकपणे प्रथमच असायची. ती ही `या संस्थेत खुद्द गाडगे बाबा, त्यांचे वारस वंशीय नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसला काही हक्क नाही. कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे. सदावर्तातही त्यांना अन्न घेण्याचा अथवा येथे वसति करण्याचा हक्क नाही.’ या कठोर निरिच्छतेला नि कमाल निस्पृहतेला हिंदुस्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासतही जोड सापडणार नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बाबांनी कोठेही एकादे देऊळ बांधलेले नाही किंवा स्वतःसाठी मठ उभारलेला नाही.तीर्थाच्या ठिकाणी देवांची मोठमोठी ख्यातनाम देवळे आहेत. पण तेथल्या त्या दगडी देवांचे दर्शनही बाबा कधी घेत नाहीत, आजवर घेतलेले नाही. देव देवळात असतो, ही कल्पनाच त्यांनी कधी मानलेली नाही आणि इतरांनीही ती मानू नये, असा त्यांचा वाजवी अट्टाहास असतो.
मात्र कोठे एकादे देऊळ असल्यास त्याचा अनादर ते करायचे नाहीत. नाशिकच्या ओसाड टेकडीवर धर्मशाळा बांधताना मधेच एक मारुतीचे लहानसे देऊळ आढळले. बाबांनी ते नीट मोठे बांधून घेतले. एका मजल्यावर मारुतीची बैठक आणि देवळाचा घुमट वरच्या मजल्यावर, अशी ती धर्मशाळेच्या इमारतीच्या पोटातच केलेली युक्तिबाज बांधणी प्रेक्षकाला अचंब्यात पाडते.
निर्वासित मारुतीचा उद्धार
याच टेकडीवर ९ फूट लांब, ३ फूट रुंद नि दीड फूट जाडीची एक दुसरी मारुतीची मूर्ती टेकडीत गाडलेली बाहेर निघाली. बाबांनी बरेच दिवस ती एका बाजूला काढून ठेवली. ‘‘असू द्या मारुतीराय सध्या इथेच. लावीन त्यांची सोय कुठेतरी.’’ काही वर्षांनी बाबा व-हाडात गेले असताना मूर्तिजापूर धर्मशाळेत येणा-या लोकांनी सांगितले, ‘‘बाबा मूर्तिजापूर शहर मोठे. तेथे पुष्कळ देवळे आहेत. पण या धर्मशाळेत देव नाही, देऊळ नाही. म्हणून तेथे लग्न लावलेल्या नवरानवरीला दर्शनासाठी लांब दूरच्या देवळात जावे लागते.’’ देव देवळांबद्दल बाबांचा अभिप्राय काहीही असला तरी या किंवा दुस-या कोणत्याही बाबतीत अडाणी जनतेचा बुद्धिभेद ते करीत नाहीत. ते मुलांच्या बोलीने बोलतात नि चालीने चालतात. त्यांनी नाशिकला तार दिली की ‘‘बाजूला काढून ठेवलेला तो मारुती ताबडतोब पहिल्या गाडीने घेऊन यावे.’’ ती प्रचंड जाडजूड मारुतीची मूर्ती नि आगगाडीने न्यायची तरी कशी? कारभारी नि शिष्ट विचारात पडले. अखेर सहा बैलांच्या खटा-यातून मारुतीरायांना स्टेशनवर आणले. गाडगे बाबांचे नाव ऐकताच रेलवेचे सारे अधिकारी नि हमाल धावले. त्यांनी मूर्ती मेलगाडीत चढवली. स्टेशनला तार दिली का गाडगे बाबांचा मारुती मेलने येत आहे, उतरून घ्या. मूर्ती उतरून घ्यायला शेकडो लोक आधीच तयार उभे होते. बाबांनी धर्मशाळेनजीक योग्य जागेवर मारुतीची स्थापना केली आणि गावक-यांना सांगितले, ‘‘देव पाहिजे होता ना? हा घ्या देव. आता मात्र त्याच्यासारखे शूर आणि पराक्रमी बनले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी.’’ नाशिकच्या उकीरड्यातल्या मारुतीचा अखेर व-हाडात निर्वासितोद्धार झाला.
कशाला हा एवढा भुईला भार?
देवळे नि त्यातले देव याविषया बाबांच्या मताची मूर्खानंदजी एक मजेदार आठवण सांगतात. गाव नेमके आठवत नाही. पण त्या गावी नदीकाठी खूप देवळे होती. बहुतेक सारी शिवालये. त्या गावी कोणीतरी केलेल्या सप्ताहाचे शेवटी बाबांचे कीर्तन झाले. दुसरे दिवशी सकाळी बाबा म्हणाले, ``रात्री कीर्तनाला जेवढे लोक होते. तितकीच देवळे आहेत इथं.’’ आम्ही या अतिशयोक्तीबद्दल हासलो.
‘‘हासता कशाला बाप्पा? तुम्हीच पहा ना. सगळी नदीची दरड या देवळांनीच भरली आहे. पण व्यवस्था पाहिलीत का त्यांची? कोण्या देवळात नंदी नाही तर कोण्या ठिकाणी देवाचाच पत्ता नाही. मग तो लेक काय फिरायला गेला म्हणावं? कशासाठी बांधली असतील एवढी देवळं?’’
‘‘धर्मश्रद्धा, बाबा.’’ मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
‘‘संस्किरत (संस्कृत) भाषेत नको काही सांगू. असं सांगा का भोळा भाव. पण या देवळांची ही अशी परवड होईल असं स्वप्न त्यांना पडलं असतं तर? तो पहा, तो पहा, एक कुत्रा बेधडक देवावर लघवी करून चालला.’’
कुत्र्याला मारण्यासाठी मी दगड उचलला. मला अडवून बाबा म्हणाले - ‘‘कोणाला मारता? कुत्र्याला? का बाप्पा? तुम्हाला रागच आला असेल, तर तो ही देवळं बांधणारांचा आला पाहिजे. कशाला इतकी देवळं बांधली? एकच बांधायचं होतं नि त्यातल्या देवाला म्हणायचं होतं रहा बाप्पा इथं येऊन. भुईला भार करून ठेवला उगीच. तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ।। असंच म्हणतात ना आपलं तुकोबाराय ?’’

सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बाल्यावस्थेतच नख लावण्याच्या उद्देशाने ब्राह्मणांनी सत्यशोधक समाजाविरुध्द प्रचार करण्यास प्रारंभ केला.
''ब्राह्मणांनी घाबरवून सोडलेले हे गरीब व अज्ञानी लोक ज्योतिरावांकडे येऊन त्यांना विचारीत, 'अहो मराठीत केलेली प्रार्थना देवाला कशी ऐकू जाईल?' ज्योतिरावा त्यांना समजावून सांगत की, 'मराठी, गुजराती, तेलगू किंवा बंगाली भाषेत परमेश्वराची प्रार्थना केली तर ती परमेश्वराला पोहोचत नाही किंवा रूजू होत नाही, असे मानणे ही चुकीची गोष्ट आहे. विधाता हरएक मनुष्याचे मन जाणतो. त्याची आंतरिक इच्छा, प्रार्थना त्याला कळतात. लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतून केलेल्या प्रार्थना देवाला ऐकू गेल्या नाहीत काय? तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी यांच्या प्रार्थना देवाच्या कानी गेल्या नाहीत काय?''49
सत्यशोधक समाजाचे कोणी सभासद होऊ नये असा प्रचार ब्राह्मण लोक खेडयापाडयात करीत आणि त्याबरोबर धाकही दाखवीत. सत्यशोधक समाजाचे जे सभासद होत त्यांचा छळ केला जाई. सरकारी नोकरीत ब्राह्मण अधिकाऱ्याच्या हाताखाली सत्यशोधक समाजाचे सभासद असलेल्या व्यक्ती नोकरीत असल्या तर त्यांना छळ सोसावा लागे. केव्हा केव्हा त्यांना नोकरीसही मुकावे लागे.
''नारायणराव कडलक हे सरकारी नोकरीत असून सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते. त्यांची बदली हेतुत: पुण्याहून महाबळेश्वरला करण्यात आली. जर ब्राह्मणांच्या उपस्थितीशिवाय कोणताही धार्मिक विधी केला किंवा संस्कार केले तर तसे संस्कार करणाऱ्या कुटुंबावर परमेश्वराचा कोप होईल किंवा ब्राह्मण आणि देव यांच्या शापामुळे त्यांचे नि:संतान होईल, अशी त्यांना ब्राह्मण भीती दाखवीत असत.''50
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या ध्येय-उद्दिष्टांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. 1848-73 या काळात फुले यांनी या उद्दिष्टांच्या संदर्भात बरेच कार्य केले होते. 1873 नंतर त्या कार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.
''सत्यशोधक समाजाचा लढा हा मुख्यत: धर्मसंस्थेशी व विशेषत: भिक्षुकशाहीशी होता. नामधारी ब्राह्मण धर्मविधी करताना जे मंत्र व मंगलाष्टके म्हणत त्यांचा अर्थ आमच्या लोकास समजत नाही, म्हणून सत्यशोधक समाजाकडून विवाह व इतर कार्यासंबंधीचे धर्मविधीची पुस्तिका लोकहितार्थ मराठीत तयार केली व त्या पुस्तिकेच्या प्रथम आवृत्तीच्या 2000 प्रती छापल्या होत्या.''51
फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: ज्योतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली.
''ज्योतिरावांचा एक दूरचा नातलग त्यांच्या दुकानात नोकर होता. त्याने सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्न करण्यास होकार दिला. ब्राह्मणांनी मुलीच्या बापाला विरोधात उठविले; परंतु त्या मुलीची आई सावित्रीबाई फुले यांची मैत्रीण असल्यामुळे ती या निर्धारापासून ढळली नाही. हा नियोजित विवाह 25 डिसेंबर 1873 साली झाला. पानसुपारीचा जो काही खर्च आला तेवढाच. वधू-वरांनी एकमेकांशी निष्ठेने वागण्याविषयीच्या फुलेरचित शपथा सर्वांच्या देखत घेतल्या. सत्यशोधक समाजाचे सभासद बहुसंख्येने या विवाहसमारंभास हजर होते. लग्न समारंभ सुरक्षितपणे पार पडला.''52
ब्राह्मण भिक्षुकांशिवाय हिंदू विवाह! खरोखरच ही एक मोठी आश्चर्यकारक घटना घडली. ब्राह्मणांच्या दृष्टीने ज्योतिरावांकडून घडलेला हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे माफ करण्यात आला; परंतु सत्यशोधक विवाह पध्दतीने दुसरा विवाह ज्योतिरावांनी करण्याचे ठरविताच त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे ब्राह्मण भिक्षुकांनी ठरविले.
''ज्ञानोबा ससाने या विधुराचा विवाह ब्राह्मण व स्वकीयांचा कट्टर विरोध असतानाही फुले यांनी स्वत:च्या घरी 7 मे 1874 रोजी लावला.''53
''1884 मध्ये ओतूर गावच्या गावच्या माळी, साळी, तेली जातीच्या लोकांनी सत्यशोधक विवाह पध्दतीने लग्ने लावली. या विवाह पध्दतीत वधूच्या गावी वर आल्यास गावातील महाराणीने हातात दीपताट घेऊन ओवाळावे, अशी योजना होती. तत्कालीन वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेला ते एक आव्हानच होते. लग्नविधीत मंगलाष्टके म्हणण्याचे काम स्वत: वधूवराने करावे. लग्नविधीनंतर सर्व मानव बंधूतील पोरक्या मुला-मुलीस व अंध पंगूस दानधर्म करावा. श्रीमंत लोकांनी शिक्षण फंडास मदत करावी, असे या विवाहाचे स्वरूप होते. लग्नविधी, वास्तुशांती व दशपिंडविधी या तिन्ही विधीत फुले यांनी ब्राह्मणांचे अस्तित्व नाकारले होते. सत्यशोधक विवाह हा साधा व अल्प खर्चातील होता. फुले यांच्या अनेक अनुयायांची लग्ने या पध्दतीनुसार झाली.''54
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वीच फुले यांनी स्त्रिया व अस्पृश्यांच्या शिक्षणाचे मोठे काम हाती घेतले होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याला आणखी गती मिळाली.
''सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.''55
पुण्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे लोन पोहोचविण्यास सुरुवात केली.
''पुण्याजवळ हडपसरजवळ एक शाळा काढली. हडपसर हे सत्यशोधक समाजाचे एक मोठे केंद्र बनले. शूद्र लोकांस विद्येची अभिरुची नसल्याने त्यांच्या मुलांना दररोज शाळेत येण्याची सवय लागावी म्हणून सत्यशोधक समाजाच्या वतीने एक पट्टेवाला ठेवला होता.''56
सत्यशोधक समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वत्तृफ्त्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
''1875 च्या काळात सत्यशोधक समाजाने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. त्यासाठी दोन बक्षिसे ठेवण्यात आली. 'हिंदी शेतकीची सुधारणा कशी करता येईल' हा निबंधाचा विषय होता.''57
''1876 सालच्या मे महिन्यात एक खास वत्तृफ्त्व स्पर्धा ठेवण्यात आली. त्यासाठी दोन विषय ठेवण्यात आले. 'मूर्तीपूजा उपयुक्त आहे किंवा कसे?' आणि दुसरा विषय 'जातीभेद आवश्यक आहे किंवा कसे?' यशस्वी उमेदवारांना बक्षिसे देण्यात आली.''58
ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने व उपकरणे वापरावी, म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत.
''स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी प्रार्थना केली होती. त्या अर्जाचा हेतू सफल झाला.''59
''कनिष्ठ वर्गातील पाच टक्के विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, असे शिक्षण खात्याचे संचालक येरफिल्ड यांनी सरकारी शाळांना जे आज्ञापत्रक काढले होते, त्याविषयी त्यांचे आभार मानले. सत्यशोधक समाजाच्या कार्याविषयी आपुलकी दाखवून त्या कार्याला प्रसिध्दी देणाऱ्या 'सत्यदिपिका, 'सुबोधपत्रिका' आणि 'ज्ञानप्रकाश'ला धन्यवाद देण्यात आले. सत्यशोधक समाजाने चालविलेल्या शिक्षणकार्याच्या प्रचारासाठी हरि रावजी चिपळूणकर यांनी जे मोठे साहाय्य केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.''60
सत्यशोधक समाजाने या काळात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्य केल्याचे दिसून येते.
''सप्टेबर 1875 मध्ये अहमदाबादेत जो प्रचंड जलप्रलय झाला होता तेव्हा पुण्या-मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी रुपये 325- दिल्याचा उल्लेख समाजाच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनात आहे.''61
शूदातिशूद्रात विद्येचा प्रसार व्हावा यासाठी वसतिगृह काढण्याचा विचार सत्यशोधक समाजाने प्रारंभीच केला होता. या विचाराला फुले यांचे जवळचे स्नेही कृष्णराव भालेकर यांनी मूर्त स्वरूप दिले.
''भालेकरांनी 18 नोव्हेंबर 1884 रोजी पुण्यात कसबा पेठेत सुशिक्षणगृह स्थापन केले. लहान-मोठया खेडयातील पाटील, देशमुख, इनामदार आणि नोकरीच्या निमित्ताने सतत बाहेर असणारे लोक आपल्या मुलाची पुरेपूर काळजी घेऊन त्यांना विद्यार्जनास प्रोत्साहित करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन हे गृह स्थापन केले. तेथे प्रामुख्याने कुणबी, मराठा, माळी अशा जातीची दहा वर्षांखालील मुले दरमहा रु. बारा घेऊन ठेवली जात. या सुशिक्षणगृहातील मुलांची व्यवस्था पाहण्याच्या कामी डॉ. विश्राम घोले व गंगाराम भाऊ म्हस्के यांनी मदत केली.''62
सत्यशोधक समाजाच्या समकालीन असलेल्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज इत्यादींचे कार्य शहरापुरते व उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते. त्यांची भाषा, आचार हे सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळया पातळीवरचे होते. सत्यशोधक समाज हा बहुजन, शूद्रातिशूद्र लोकांशी निगडित असला तरी इतर जातीधर्माचे लोकही यात सामील होते.
''ब्राह्मण, महार, मांग, ज्यू आणि मुसलमान या जातीधर्माचे लोक या समाजाचे प्रारंभीच्या काळात सभासद होते. सत्यशोधक समाजाच्या वतीने अनेक सहभोजनाचे कार्यक्रम पार पाडले जात. सत्यशोधक समाजाच्या शाखा अनेक ठिकाणी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सभा आठवडयातून एकदा होत असत.''63
सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता कसा होता, याविषयी कुलकर्णी म्हणतात,
''साधासुधा, प्रामाणिक, शेतकरी, कामगार हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता होता, सभासद होता. त्याचे तत्त्वज्ञान साधेच होते. त्याचे ध्येयही साधे, सरळच होते. हृदयातील प्रेरणा ही त्याची कार्यशक्ती होती. त्याची भाषा ही त्याची रोजचीच होती. साधी सोपी सर्वांना समजणारी! आणि त्याची प्रार्थना ती अन् त्याचा देव यांना कोणतीही जागा चालत होती. त्यांच्या सभा, बैठका आणि प्रचार यांना कोणतीही जागा चाले. अगदी एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतातील मळणीची जागाही त्यासाठी चालत होती.''64
''सत्यशोधक समाजाच्या प्रचारकांचा पोशाखदेखील सर्वसामान्य कनिष्ठ वर्गातील माणसासारखाच असे. कमरेला धोतर नेसलेले, खांद्यावर एक घोंगडी घेतलेली अन् डोक्याला पागोटे गुंडाळलेले असे. ते प्रचारक हाती डफ घेऊन प्रचाराला जात. त्यांची प्रचारातील भाषणे म्हणजे शिष्टसंमत सभेतील भाषणासारखी आखीव, रेखीव, विद्वत्तादर्शक, गहन, जड अशी अजिबात नसत तर ते जणू आपल्या श्रोत्यांशी गप्पाच मारत असत.!''65
ज्योतिरावांना कार्याच्या तळमळीने प्रभावित झालेले अने कार्यकर्ते मिळाले. त्या कार्यामुळे या समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांचा फैलाव सर्वत्र झाला.
''मुंबईत व्यंकू बाळोजी काळेवार, जाया कराळी लिंगू, व्यंकय्या अय्यावारू; पुण्यातील धनाढय गृहस्थ रामशेठ बप्पूशेठ उरवणे, डॉ. अण्णासाहेब नवले, मारुतराव नवले, डॉ. विश्राम घोले, पुढे बडोद्याचे दिवाण झालेले रामचंद्रराव धामणकर, कामगार चळवळीचे जनक नारायण मेधाजी लोखंडे, डॉ. संतूजी लाड, ज्योतिरावांचे स्नेही सदाशिवराव गोवंडे आणि सखाराम परांजपे हे सत्यशोधक समाजाचे आरंभीचे सदस्य होते. तुकाराम तात्या पडवळ व विनायकराव भांडारकर हे समाजाचे सभासद नि वर्गणीदार होते. गणपतराव सखाराम पाटील, बंडोबा मल्हारराव तरवडे, वासुदेवराव लिंगोजी बिर्जे, डॉ. सदोबा गावंडे, देवराव कृष्णाजी ठोसर, विठ्ठलराव हिरवे, लक्ष्मणराव घोरपडे, सीताराम रघुनाथ तारकंडू, हरिश्चंद्र नाराययण नवलकर, रामजी संतूजी आवटे, सरदार बहादूर दर्याजीराव थोरात, धोंडीराम रोडे, पं. धोंडीराम नामदेव कुंभार, गणपतराव मल्हार बोकड, भाऊ कोंडाजी पाटील - डुंबरे, गोविंदराव काळे, भीमराव महामुनी, माधवराव धारवळ, दाजीसाहेब यादव पाटील पौळ, सयाजीराव मेराळ कदम, राजकोळी, धनश्याम भाऊ भोसले व भाऊ पाटील शेलार हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते.''66
1874 साली सत्यशोधक समाजाचा पहिला वार्षिक समारंभ मोठया थाटाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.
''वार्षिक सभेमध्ये कार्यकारी मंडळामध्ये थोडा फेरफार करण्यात आला. नारायण तुकाराम नगरकर यांची कार्यवाह म्हणून निवड झाली तर भालेकर आणि रामशेठ उरवणे यांची कार्यकारी मंडळावर निवड झाली.''67
1875 साली सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ साजरा करण्यात आला.
''ज्योतिरावांनी समाजाच्या अध्यक्षपदी धुरा समाजाचे एक प्रभावी तरुण नेते डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या खांद्यावर दिली. कोषाध्यक्षपद रामशेठ उरवणे यांना दिले. त्या वर्षी इलैया सालोमन नावाच्या एका ज्यूला कार्यकारी मंडळाचा सभासद करून घेतले.''68
सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक अहवालात हा समाज कसा सक्रिय होता, ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी कशी होत होती, याचे दाखले मिळतात.
''गोविंद भिलारे पाटील या सातारा जिल्ह्यातील व्यक्तीने ब्राह्मणाच्या मदतीवाचून दोन वर्षात 11 लग्ने लावली होती. ग्यानू झगडे यांने ब्राह्मणाशिवाय एक पुनर्विवाह घडवून आणला. गणपत आल्हाट याने आपल्या आजीचे पिंडदान ब्राह्मणाशिवाय केले. नारायणराव नगरकरांच्या वडील बंधुंनी आपल्या भावजयीचे उत्तरकार्य ब्राह्मणाशिवाय केले.''69
''व्यंकू काळभोर यांनी अंश्र, अपंग लोकांना वस्त्रे दिल्याचा व हरी चिपळूणकरांनी घनश्याम किराड या गरीब विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिल्याचा उल्लेख आहे.''70
सत्यशोधक समाजाची प्रारंभीची तीन वर्षाची वाटचाल खूपच सक्रिय होती. प्रत्येक सत्यशोधक झपाटल्यासारखे कार्य करीत होता. सर्वच कार्यकर्त्यांना फुले यांनी एका ध्येयवादाच्या प्रवाहात खेचून आणले. फुले यांचे नेतृत्व सर्वांनीच मान्य केले होते. आरंभीच्या काळात सत्यशोधक समाजाच्या बैठका नियमित होत. देणगी व खर्चाचे हिशेब व वर्षभराच्या कार्याचे अहवाल सादर केले जात व पुढे या कामात सातत्य राहिले नाही. याबद्दल भालेकर आपली नाराजी व्यक्त करतात,
''सत्यशोधक समाज म्हणून ज्योतिराव फुले यांनी पुण्यास एक पंथ काढला होता. त्यातही शिरून मी काही वर्ष राहून पाहिले; परंतु सुतार, लोहार, सोनार, कासार इ. पांचाळ हिंदू लोकांप्रमाणे सत्यशोधकांनी फक्त ब्राह्मणास बाजूस सारून हिंदू रिवाज म्हणजेच मूर्तीपूजा, जातीभेद वगैरे सर्व प्रकारच्या घातक रूढी जशास तशा चालविल्या आहेत. दुसरे असे की, सत्यशोधकास कोठेच मुख्य स्थळे नाहीत. समाजात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस वगैरे सर्वानुमते निवडलेले नाही. वार्षिक रिपोर्ट कधी प्रसिध्द होत नाही. फंडाचे हिशोब नाही वगैरे तेथून सर्व गोंधळ.''
3.2 सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्त्वे
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या शाखा अनेक ठिकाणी काढण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी दर आठवडयास सभा होत असत. पुण्यातील सोमवार पेठेतील डॉ. गावंडे यांच्या घरी दर आठवडयाला सभा भरत असे. अशा सभेत सत्यशोधक समाजाच्या खालील तत्त्वांवर चर्चा होऊन कार्याची आखणी केली जात असे.
''सर्व मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे करावे, दारूबंदीचा प्रसार व्हावा, स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांनी पौरोहित्य करण्याची मिरासदारी झुगारून द्यावी, लग्ने कमीत कमी खर्चात करण्याची व्यवस्था करावी, लोकांमध्ये असलेली ज्योतिष, भूतेखेते, समंध इ. ची भीती नाहीशी करावी, अशा विषयासंबंधीच्या चर्चा त्यामध्ये होत असत. जातीभेद, मूर्तीपूजा यांच्याविरुध्द मुख्य प्रचार असे. परमेश्वराचे जनकत्व आणि मनुष्याचे बंधुत्व या तत्त्वांवर भर दिलेला असे.''72
''सत्यशोधक समाज देव एकच आहे, असे मानीत असे. त्याचे मत मूर्तीपूजा करू नये, असे होते. केवळ दर आठवडयास भरणाऱ्या सभेच्या बहुदा शेवटी सांघिक प्रार्थना होई. धार्मिक बाबतीत मध्यस्थ, पुरोहित किंवा गुरुची आवश्यकता नाही. त्यांच्या आधाराविना किंवा मध्यस्थीविना कोणत्याही व्यक्तीला देवाची प्रार्थना आणि धार्मिक विधी करता येतात, अशी सत्यशोधक समाजाची शिकवण होती. त्यांचे मूळ आधारभूत तत्त्व ब्रह्मा किंवा मोक्ष नसून 'सत्य' हे होते. वेद हे ईश्वरनिर्मित ग्रंथ नसून मानवनिर्मितच आहेत, अशी ज्योतिबांची ठाम धारणा होती. त्याचप्रमाणे बायबल किंवा कुराण यासारखे धर्मग्रंथसुध्दा वेदांप्रमाणेच ईश्वरनिर्मित नाहीत असे ज्योतिबा मानत आणि तसे लोकांना समजावून सांगत.''73
सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचारक कसा होता, याविषयी कीर लिहितात,
''सत्यशोधक समाजाला फार मोठया बुध्दिवाद्यांचा पाठिंबा होता असे नाही. त्याचा तत्त्वज्ञानी पुरुष हा साधा प्रामाणिक शेतकरी होता. तो सामान्य शेतकरी असला तरी त्याला आंगीक प्रेरणा आणि बुध्दिप्रामाण्याची देणगी निसर्गत:च लाभली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान हृदय होते. त्याची भाषा जनतेची होती. त्याच्या प्रचाराची स्थळे, सभा बैठका व शेतावरील मळणीचे स्थान. सत्यशोधक प्रचारकांचा पोशाख म्हणजे एक घोंगडी, पागोटे व धोतर आणि हातात एक डफ. आपल्या भाषणात ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा उल्लेख करीत. धर्मविधी व संस्कार यांच्या जाचाखाली शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते व जो काही त्यांच्या गाठी पैसा असतो तो धूर्त ब्राह्मण भिक्षुक कसा लुबाडतो याकडे ते शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे लक्ष वेधीत असत. आपल्या मुलाला त्यांनी शिक्षण दिले पाहिजे, असे ते सांगत. तसे केले म्हणजे त्यांना चांगले काय नि वाईट काय, कायदा, धर्म व देव म्हणजे काय हे समजेल, असा त्यांना उपदेश करीत. सत्यशोधक समाजाचे हे प्रचारक शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांच्या कार्यात आणि प्रचारात पांडित्य व बुध्दिमत्ता यांचे तेज दिसून येत नसे, तथापि त्यांची कार्यशक्ती आणि तळमळ ही फार मोठी होती.''74
3.2.1 तत्त्वाच्या प्रचार व प्रसारार्थ फुले यांच्या सहकाऱ्यांचे कार्य
म. फुले यांच्या काळात त्यांना प्रामाणिक सहकारी लाभल्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार झपाटयाने झाला. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या काही सहकाऱ्यांचे कार्य सत्यशोधक तत्त्वांच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे.
3.2.1.1 कृष्णराव भालेकर (1850-1910)
भालेकरांचा जन्म 1850 साली पुण्यात भांबुर्डे (शिवाजीनगर) येथे झाला. त्यांचे आजोबा राणोजी गावात प्रतिष्ठित मानले जात. राणोजीच्या धाकटया भावाची मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले होय. कृष्णरावाचे वडील जिल्हा सत्र न्यायालयात कारकून होते. भालेकरांच्या वडीलांच्या मृत्यूच्या वेळी फुले यांनी 'सत्पुरुषाचा आत्मा' या विषयावर प्रभावी भाषण दिले होते. 1864-68 या काळात भालेकर पुण्याच्या रविवार पेठेतील मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. 1868 ला त्यांनी गरीबीमुळे शिक्षण सोडून दिले. मुंबईचे गुत्तेदार दादाभाई दुवाझा यांचे खेड जि. पुणे येथील कामावर देखरेख करण्याची नोकरी करताना धर्मभोळा, अज्ञानी व दरिद्री समाज त्यांनी जवळून पाहिला. ही परिस्थिती ज्या कारणांमुळे निर्माण झाली, त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. शेतकरी, शेतमजूर यांच्या सभा घेऊन सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान ते लोकांना समजावून सांगू लागले. धर्मातील अनिष्ट व खोटया रूढींची ते माहिती देत; पण आपल्या कार्यास तेथे मर्यादा आहे, हे ओळखून त्यांनी राजीनामा दिला व ते भांबुडर्यास परत आले.
''फुले - भालेकर यांची भेट मुठेच्या काठी रोकडोबांच्या मंदिरात मे 1872 ला झाली. या मंदिरात भालेकरांनी 'अज्ञानराव भोळे देशमुख' व 'श्रीसत्यनारायण पुराणिक' हे दोन उपहासगर्भ वग सादर केले होते. अज्ञानराव भोळे देशमुख या वगात जहागीरदार, इनामदार, देशमुख असे वैभवयुक्त लोक अज्ञानात असल्यामुळे त्यांच्या हाताखालचे कारभारी त्यांना कसे लुटतात, फसवितात, हे दाखविले. श्री सत्यनारायण पुराणिक या वगातील वेंधळया ब्राह्मणाचे काम मोरेश्वर कावडे हे करीत.''75
सत्यशोधक जलशाचे मूळ या भालेकरांच्या वगात सापडते. आज हे वग उपलब्ध नाहीत; परंतु सामाजिक प्रश्नावरील पथनाटयाचे उद्गाते म्हणून भालेकरांचा उल्लेख करावाच लागेल. हे वग सादर केल्याची बातमी समजल्यामुळे पुफ्ले भालेकरांना भेटावयास आले. फुले यांच्यापेक्षा भालेकरांची भूमिका वास्तववादी होती.
''निराश्रित हिंदू हे आपले देशबांधव व धर्मबांधव आहेत, असे समजून त्यांना ब्राह्मणांनी ज्ञान द्यावे, असा आग्रह धरतात.''76
''अज्ञानी व निराश्रित हिंदू शहाणे झाले तर ते भटाभिक्षुकास देव मानणार नाहीत, सावकार व व्यापारी यांच्याकडून फसविले जाणार नाहीत, सरकारच्या दुराचारी नोकरांना घाबरणार नाहीत.''77
भालेकरांचे विचार फुले यांच्या विचारांशी अनुकूल होते. शिक्षणाने परिवर्तन होईल, अशी त्यांना खात्री होती. आपला ब्राह्मणांवर राग का आहे, याची कारणे ते खालीलप्रमाणे देतात.
1) मानवी हक्क ब्राह्मणांनी अन्य हिंदूस कळू दिले नाहीत.
2)  ब्राह्मणांनी इतरांकडून स्वत:ची पूजा करून घेऊन सर्वशक्तीमान परमेश्वराचा अपमान केला.
3)  इतर लोकांना ब्राह्मणांनी धर्मग्रंथ वाचू दिले नाहीत.
4)  परमेश्वराची आराधना ज्या पवित्र देवालयात होते तेथे सर्व हिंदूंना ब्राह्मणांनी प्रवेश दिला नाही.
5)  ब्राह्मणांनी आपले धर्मशास्त्र व कायदे इतर हिंदूंवर लादले.
6)    श्राध्दाच्या निमित्ताने त्यांनी मृतात्म्यांचा उपमर्द केला.''78
भालेकरांचा रोष जसा ब्राह्मणांवर आहे तसाच संस्थानिकांवरही आहे. ते म्हणतात,
''संस्थानिक क्षत्रिय हे निराश्रित हिंदूंच्या चळवळींना हातभार न लावता ब्राह्मणांच्या कलेने चालतात. संस्थानिकांच्या खजिन्यातील पैसा हा फक्त त्यांचे नातेवाईक, जातभाई, ब्राह्मण, नायकिणी व तमासगीर यांनाच उपभोगण्यास मिळतो.''79
भालेकरांनी माळी शिक्षण परिषद घेऊन फुले यांच्या कार्याची री ओढली.
''31 ऑक्टोबर 1909 रोजी भालेकरांचे 'माळी शिक्षण परिषदेची आवश्यकता' या विषयावर मुंबईत व्याख्यान झाले. दुसरे व्याख्यान पुणे शहरात झाले. प्रस्तुत परिषद पुणे किंवा मुंबई येथे भरवावी म्हणून लोकांना त्यांनी विनंती केली. नगर येथे जाऊनही हाच प्रश्न लोकांसमोर ठेवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे 2 जानेवारी 1910 ला पुणे येथे पहिली माळी शिक्षण परिषद भरली.''80
भालेकरांनी आपल्या कृतीयुक्त उपक्रमांनी चळवळीवर एक वेगळा प्रभाव पाडलेला दिसतो. ते स्वत: एक वेगळी चूल मांडीत होते; परंतु कार्याचा सार मात्र एकच होता.
''भालेकरांनी मे 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली. याकामी त्यांना विठ्ठलराव वंडेकर, रघुनाथ तारकुंडे, हरी चिपळूणकर, हरिश्चंद्र नवलकर, घोरपडे बंधू यांनी सहकार्य केले. लोकांच्या अडचणी सरकारपुढे मांडल्या. सरकारला कायदे करण्यापूर्वी जनतेची खरी स्थिती व मते याबाबत निवेदन सादर करणे, ब्राह्मणेत्तरांतील वाईट चालीरिती बंद करणे यासाठी या सभेची स्थापना करण्यात आली. शिक्षण हे सक्तीचे मोफत असावे, असा आग्रह या सभेने सतत चार वर्षे धरला. त्यासाठी भालेकरांनी एक लक्ष लोकांच्या सह्यांचा अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला. त्यांनी भांबुडर्यास 10,000 लोकांची सभा घेऊन दोन ठराव पास केले.''81
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे व काँग्रेस ही सर्व जातीच्या लोकांची सभा नाही, मूठभर उच्चवर्णीयांतल्या शिकलेल्या लोकांची ती सभा आहे. तिच्या मागण्याला आमची संमती नाही, ही भूमिका भालेकरांनी घेतली होती. भालेकर हे सत्यशोधक चळवळीतील निर्भीड कार्यकर्ते होते.
''1885 च्या गुढीपाडव्याच्या दिवशी भालेकरांनी सत्यशोधक समाजाच्या झेंडयाची मिरवणूक पुण्यातील प्रमुख रस्त्यावरून काढली. या मिरवणुकीत मुंबईचे रामय्या अय्यावारू, रामचंद्र हेजीब, पुण्यातील डॉ. भांडारकर, न्या. रानडे, सदोबा गावंडे, एल. के. घोरपडे, एच. एल. नवलकर इ. मंडळी सामील झाली होती. मिरवणुकीत फुले, रानडे, अय्यावारू यांची भाषणे झाली.''82
''1885 ला दयानंद सरस्वती पुण्यात आले असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांची मिरवणूक उधळून लावली. स्वामी दयानंदांची मिरवणूक उधळून लावल्यानंतर भालेकरांनी त्यांना भांबुडर्यास नेले व त्यांचा सत्कार करून तेथील धर्मशाळेत त्यांचे भाषण घडवून आणले.''83
कृष्णराव भालेकर व म. फुले यांच्या विचारात साम्य होते.
''भालेकरांनी भिक्षुकशाही व ब्राह्मणी ग्रंथ इत्यादींवर टीका करून शूद्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे.''84
''सावकारशाही, भटशाही व कुलकर्णी वतन यावर हल्ला करून शेतकरी व कारागीर हेच देशाचे आधारस्तंभ आहेत, असे त्यांनी म्हटले.''85
''कष्टकरी, शूद्र व शेतकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ व भटजी, सावकार, कुलकर्णी यांच्याविषयीची चीड त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते.''86
भालेकरांनी कंत्राट घेण्याच्या निमित्ताने वऱ्हाड व मध्यप्रांतात जाऊन सत्यशोधक चळवळ त्या भागात रुजविली.


------------------  प्रबोधनकार 

No comments:

Post a Comment