Saturday 5 January 2013

व्रत आणि देवता

  नवरात्रीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येतं की दररोज अनेक स्त्रियांनी एकाच रंगाचे कपडे घातलेले असतात. तो त्या दिवसाचा रंग असतो. त्या दिवशी देवीला त्या रंगाची साडी नेसवलेली असते. त्याशिवाय नवरात्रीच्या काळात अनेक जणी नऊ दिवस अनवाणी फिरतात. एक वेळ जेवणं, धान्य-फराळाचा उपवास अशी वेगवेगळी व्रतं या काळात स्त्रिया करताना दिसतात.
नवरात्रीच्या काळातच नव्हे तर एरवीही केली जाणारी व्रतं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. या श्रद्धेतूनच नवरात्रीच्या काळातच नव्हे तर एरवीही अनेक व्रतवैकल्यं जन्माला आली आहेत. उदाहरणच द्यायचं तर वैभवलक्ष्मीचं व्रत, महालक्ष्मीचं व्रत, काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेलं संतोषी मातेचं व्रत. ही व्रतं केली तर समृद्धी येते, संपन्नता येते या श्रद्धेतून स्त्रिया ही व्रतं करतात. या व्रतांच्या कहाण्याही तेच सांगतात. संतोषी मातेच्या बाबतीत तर हे व्रत तुम्हीही करा आणि वीस जणांना हे पोस्ट कार्ड पाठवा, पाठवलेल्यांचा अमुक- तमुक फायदा झाला आणि न पाठवलेल्यांचं अमुक- तमुक नुकसान झालं अशी पोस्टकरडही यायची. ती पाठवायला कुठून, कशी सुरुवात होते आणि कोण ती करतं हे कधीच कळत नसलं तरी आपण ती साखळी पुढे नेली नाही आणि आपल्या घरात काहीतरी विपरित झालं असं व्हायला नको या समजुतीतून अनेक जण आपापल्या परीने तेवढय़ा संख्येची करड पाठवत ती साखळी सुरू ठेवतात.
एक म्हणजे ही सगळी व्रतं आणि त्यांच्यामागे असलेल्या श्रद्धा कुणाला त्रासदायक ठरणाऱ्या नाहीत. तुम्ही तुमच्या पातळीवर उपवास करा, पूजाबिजा करा, चांगलंचुंगलं खायला-प्यायला करा, मन प्रसन्न ठेवा, घरातलं वातावरण चांगलं ठेवा, घरात- बाहेर सगळीकडे एकमेकांशी प्रेमाने वागा असं जर या व्रतांमधून सांगितलं जातं, पण देवाधर्माच्या नावाने सांगितलेली कोणतीही गोष्ट माणसं सहजपणे स्वीकारतात हे लक्षात घेतलं तर धर्माच्या नावावर तुमच्या मानसिकतेवर कुणीही आधिराज्य गाजवू शकतं ही त्यामागची मेख आहे.
हे कुणीही कोण असू शकतं?
तर भाविक स्त्रियांनी अशी व्रतवैकल्यं केल्यामुळे कुणाचा फायदा होऊ शकतो असे लोक. एका व्रतामध्ये त्या व्रताचे त्या वर्षीचे उद्यापन करताना त्याच्या कहाणीची पुस्तकं पाच-दहाच्या पटीत इतर स्त्रियांना द्यावीत असा उल्लेख असतो. म्हणजे आपोआपच ती पुस्तकं विकली जाण्याची सोय होते. व्रतं असल्यामुळे फुलं बाजाराला, उपवास करायचा असल्यामुळे फळंबाजाराला उठाव मिळतो. संबंधित देवतेची प्रतिमा असलेल्या फोटोंची भरपूर विक्री होते. तिच्या फ्रेम बनवणाऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध होते. शंभरेक वर्षांपूर्वी सत्यनारायणाची पूजा असा काही प्रकार अस्तित्वात नव्हता आणि आता तो किती मोठय़ा प्रमाणात प्रचलित आहे हे पाहिलं तर त्यातल्या अत्यंत चलाखीने विकसित केलेल्या बाजारपेठेचा मुद्दा लक्षात येईल.
आपल्याकडे देवदेवतांची, व्रतवैकल्यांची मुळात कमतरता नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पारंपरिकरीत्या जी व्रतवेकल्यं आहेत ती कृषी संस्कृती, हवामानाचं चक्र, त्यानुसार शरीराची गरज यातून विकसित झालेली आहेत. त्या सगळ्या चक्राशी ती निगडित आहेत. उदाहरण द्यायचं तर चातुर्मासात कांदा-लसूण खाऊ नये, मांसाहार करू नये असं मानलं जातं. त्या काळात भरपूर व्रतवैकल्यंही असतात. त्यांच्या नैवेद्यात कांदा लसूण चालत नाही. त्यामागची मेख अशी आहे की चातुर्मासाचा सगळा काळ हा पावसाचा काळ आहे. या काळातली हवा ही वातुळ पदार्थासाठी वाईट. तसे पदार्थ खाल्ले तर पोट बिघडलंच समजा. त्यामुळे कांद्यासारखे घटक या काळात आहारात वापरू नयेत. हेच धर्माच्या माध्यमातून सांगितलं की लोक सहजपणे स्वीकारतात. पण संतोषी मातेचं व्रत, वैभवलक्ष्मीचं व्रत, महालक्ष्मीचं व्रत अशा कोणत्याही निसर्गचक्राशी जोडलेलं नाही.
देवीची ही सगळी व्रतं ही नवी बाजारपेठ निर्माण करण्याच्या हेतूतून निर्माण झालेली असू शकतात. त्यालाही हरकत नाही, पण त्यांच्या माध्यमातून, धर्माच्या नावाखाली लोकभावनेशी खेळण्याचा, त्यांच्या मनावर ताबा मिळवण्याच हा प्रयत्न आहे. फक्त तो कुणाचं नुकसान करणारा, कुणाच्या जिवावर उठणारा, भयानक अंधश्रद्धा पसरवणारा नाही हीच त्यातली जमेची बाजू आहे. ही बाब लक्षात घेऊन ही व्रतं कशी करतात हे समजून घ्यायला काय हरकत आहे?
संतोषी माता व्रत
साधारण १९७५ साली जय संतोषी माता हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील कथेप्रमाणे सात भावांपैकी एका भावाला व त्याच्या पत्नीला घरातील इतर भाऊ व त्यांच्या बायकांनी त्रास देतात. त्यावेळी तिला संतोषी मातेच्या व्रताविषयी समजते, ती ते व्रत करते. घर सोडून निघून गेलेला तिचा पती मातेच्या व्रतामुळे तो सधन व्यापारी होऊन घरी परततो. दरम्यान त्याच्या बायकोने सोळा शुक्रवारचे व्रत केलेले असते, त्याचे उद्यापन ती नवरा घरी आल्यावर करते. परंतु त्यावेळी त्याचे इतर भाऊ व भावजया दुष्टपणा करून जेवणामध्ये आंबट वस्तू टाकतात. जेणेकरुन व्रताचा भंग व्हावा. पुन्हा ती देवीची मनोभावे पूजा करते, पुन्हा उद्यापन करते. संतोषी मातेच्या कृपेने त्यांची भरभराट होते, अशी संतोषी मातेची कथा सांगितली जाते. या सिनेमामुळे संतोषी मातेचे व्रत करण्याची लाटच आली होती. संतोषी माता डिझाइनचे कपडे, की चेन्स तर होत्याच शिवाय पडद्यावर संतोषी मातेला फुलं, पैसे वगैरे वाहिले जायचे.
हे व्रत करण्याची पद्धतही सांगितलेली होती. त्यासाठी संतोषी मातेच्या प्रतिमेसमोर तांब्याचा कलश पाणी भरून त्यावर आंब्याची डहाळी ठेवतात, त्यावर ताम्हण ठेवून त्यात चणे आणि गूळ प्रसाद म्हणून ठेवतात. संतोषी मातेच्या प्रतिमेला हळदीकुंकू, फुले वाहतात. तुपाचे निरांजन लावतात व आरती करतात. असे सोळा शुक्रवार केल्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते. असे कमीत कमी वस्तूंचा वापर करून हे व्रत केले जाते.
महालक्ष्मी व्रत
महालक्ष्मी व्रताच्या मार्गदर्शन पुस्तिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी करता येते. हे व्रत सुख, शांती, धन-संपत्ती व लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी केले जाते. पुस्तिकेमध्ये वर्षभर हे व्रत करण्याचा उल्लेख असला तरी प्रामुख्याने हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्याकडे महिलावर्गाचा ओढा दिसतो. महिन्यातील चार किंवा पाच गुरुवार एक तास या पूजेसाठी स्त्रिया देताना दिसतात. अनेक कार्यालयांमध्ये मार्गशीर्ष महिना हा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येत असल्यामुळे खास चार रजा गुरुवारसाठी शिल्लक ठेवल्या जातात. काही ठिकाणी या महिला सवलत घेऊन घरी लवकर जाऊन महालक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. काही जणी या गुरुवारी कार्यालयातच हळदीकुंकु समारंभ आयोजित करतात. कार्यालयांमध्ये सवलतीची सोय नाही अशा स्त्रिया पहाटे अडीच वा तीन वाजता उठून महालक्ष्मीची यथासांग पूजा त्यानंतर घरातील कुटुंबीयांचे दररोजचे काम आटपून वेळेवर कार्यालयात हजर असतात.
या व्रताच्या अर्थकारणामध्ये आपण शिरलो तर बरेच मोठमोठे आकडे समोर येतील. साधारण १९९०-९२ च्या काळात हे व्रत फोफावलेले दिसते. तेव्हा पाच प्रकारच्या पानांची जुडी साधारण दोन रुपयांना मिळत होती ती आता पाच रुपयांना मिळताना दिसते. घटावर घालण्यासाठी (महालक्ष्मी म्हणून कलशावर जो नारळ ठेवतात) शेवंतीच्या फुलांची वेणी पाच रुपयांवरून सुरुवातीला दहा व शेवटच्या गुरुवारी वीस रुपयांपर्यंत विकली जाते. त्यावेळी कोथिंबीरची जुडी घेताना घासाघीस करणारी ही गृहिणी इथे एक चकार शब्द न काढता तो खर्चाचा भार सहन करताना दिसते. तोच प्रकार फळांचा वर्षभरात मुलांसाठी फळं घेताना महाग म्हणून हात आखडता घेणारी ही गृहिणी पूजेसाठी व उद्यापनासाठी सढळ हाताने खर्च करत असते. उद्यापनाच्या दिवशी देण्यात येणाऱ्या पुस्तिकेच्या अनेक आवृत्त्याचा आकडा लाखोंच्या घरात गेलेला आहे. आणि दरवर्षी हा आकडा वाढताना दिसतो.
श्रीवैभवलक्ष्मी व्रत
हे व्रत शुक्रवारी केले जाते. यालाच वरदलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत एका विशिष्ट महिन्यात करावे असा नियम नाही. हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया, कुमारिका तसेच पुरुषही करतात. फक्त व्रत करताना जय श्री वैभव लक्ष्मी मातेवर पूर्णपणे श्रद्धा ठेवावी. मन पवित्र आणि शांत ठेवावे. या व्रतासाठी अकरा अथवा एकवीस असे शुक्रवार करण्याचा संकल्प आधी करावा लागतो. या पुस्तिकेत दिलेल्या जय श्री वैभव लक्ष्मी मातेच्या आठ वेगवेगळ्या स्वरूपांना व श्रीयंत्राला मनोभावे वंदन करून पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त पूजा करून व्रत करतात. हे व्रत करताना ताम्हणावर वाटीमध्ये सोन्याचा दागिना नसल्यास चांदीचा दागिना अथवा रुपया ठेवून पूजा केली जाते. संकल्प केल्याप्रमाणे शुक्रवार पूर्ण झाल्यावर समारंभपूर्वक उद्यापन करतात. आपण श्रद्धापूर्वक हे व्रत केल्यास आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास वैभवलक्ष्मी माता स्वत: वेगवेगळ्या रूपात येऊन आपल्याला मदत करते 
  ------------- लोकप्रभा 
 
 
 

No comments:

Post a Comment