Tuesday 18 November 2014

नवरी आली !!




गोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

गोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


नवर्‍या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली

हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी

सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं




 

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया

भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा

किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


Friday 26 September 2014

लसीकरण - इलाजा पेक्षा काळजी बरी.


लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. १ वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. गोवरच्या लसीबरोबर ‘अ’ जीवनसत्त्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे. क्षयरोग प्रतिबंधक लसीला बी.सी.जी. लस म्हणतात. ती डाव्या खांदयावर कातडीमध्ये  टोचतात. बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. १५ दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्याठिकाणी थोडासा व्रण एक ते दिड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील ३-४ महिन्यात कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दिड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा दयावा.
बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियो प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियो पासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षाने आणखी एक बूस्टर डोस दयावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस दयावा लागतो.गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस बाळाला ९ ते १२ महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते.



१) अटेन्युएटेड व्हॅक्सीन –  यामध्ये ऍक्टिव्ह व्हायरस असतो, पण त्याला शक्ती नसते. यामध्ये कांजण्या, रुबेला, गालगुंड (मम्स) व टायफाइड लसी येतात.
२) टॉक्सॉइड व्हॅक्सीन – यामध्ये इनॅक्टिव्हेटेड टॉक्सिक कम्पाउंड्‌स असतात. यामध्ये घटसर्प (डिफ्तेरिया) व टिटॅनस(धनुर्वात) या लसी येतात.
लसीकरणाने जगातील विविध राष्ट्रात कित्येक रोगांवर विजय प्राप्त केला आहे. अमेरिकेत १९५९ साली कांजण्यांच्या ७६३०९४ केसेस सापडल्या व तेव्हा ५५२ लोक मरण पावली. तेच प्रमाण २००८ मध्ये कांजण्यांचे फक्त ६४ रोगी सापडले. त्यांतले ५४ रोगी दुसर्‍या राष्ट्रातून आले होते. ५४ पैकी ५३ लोकांना कांजण्यांचे लसीकरण दिले नव्हते.
आता आपण प्रत्येक लसीविषयी जाणून घेऊ- पहिल्यांदा बीसीजी. कुणालाही विचारा बीसीजी म्हणजे काय? कुणालाच माहीत नसणार! बॅसिलस कॅलॅमिटी गुएरीन. कॅलेमिटी व गुएरीन या शास्त्रज्ञांच्या नावाने ही लस ओळखली जाते. ती लस डाव्या हाताच्या खांद्यावर दिली जाते. अमेरिकेत व हॉलंडमध्ये ही लस मास इम्युनायझेशनने दिली जात नाही. ही लस मुलांच्या अंगात प्रतिकारशक्ती वाढवते. मिलिअरी टीबी व टीबी मेनिंनजायटीसपासून बचाव करते.
भारतात फुप्फुसाची टीबी मोठ्या प्रमाणात आढळते. त्याविषयी ही लस कोणतीही प्रतिकारशक्ती देत नाही. त्या रोगाविरुद्ध ही लस उपयोगी नाही. ही लस आयुष्याची पहिली १५-२० वर्षे या रोगाविरुद्ध संरक्षण देते. कुणी तुम्हास सांगत असेल की बीसीजीची लस टीबी रोखते तर ते अगदी खोटे आहे. असे असते तर राज्यात टीबी चे रोगी सापडले नसते. टीबीचे अनेक प्रकार आहेत. त्यात पाठीच्या कण्याचा टीबी, आतड्यांचा टीबी, गर्भाशयाचा टीबी.. मेंदूचा टीबी याविषयी ही लस संरक्षण करते पण टक्केवारी कमी आहे.
२) डीपीटी ची लस – ही लस पॉलिव्हॅलंट आहे. यात डिफ्थेरिया (घटसर्प) पर्ट्युसीस (कोल्हेखोकली) व टिटॅनस (धनुर्वात) वर एकत्रित केलेली लस दिली जाते.
बीसीजी जन्मतः दिली जाते तर डीपीटी व पोलिओचा पहिला डोस दीड महिन्यानंतर – दुसरा डोस – अडीच महिन्यानंतर तर तिसरा डोस साडेतीन महिन्यानंतर दिला जातो. डीपीटीची लस इजेक्शन रूपाने दिली जाते. तर पोलिओ तोंडावाटे प्यायला देतात. डीपीटी व पोलिओचा बूस्टर डोस वयाच्या एक वर्षानंतर दिला जातो. व नंतर पाच वर्षानंतर डीपीटीचा बुस्टर डोस.
३) पोलिओची लस – १९५२ साली जोन्स सॅक या शास्त्रज्ञाने ही लस शोधली. एल्बर्ट सॅबीन याने १९६२ मध्ये ती बनवली. पहिल्यांदा ही लस इंजेक्शनने दिली जायची. आता ती तोंडावाटे दिली जाते.
१९८८ साली पोलिओचे ३५०,००० रोगी जगात सापडले. तर २०१२ साली फक्त २३३ रोगी आढळले. आज भारत राष्ट्र पोलिओमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तरीदेखील शेजारच्या पाकिस्तानात पोलिओचे रोगी सापडतात तेव्हा आम्ही सदैव जागृत राहायला पाहिजे.

तर लसीकरणाविषयी बीसीजी, पोलिओ, डीपीटी यातील ‘डीपीटी’ची लस याबद्दल आम्ही जाणून घेतले. आता सुरुवात आम्ही डी… पासून करू. डी.पी.टी.तील ‘‘डी’’ म्हणजे ‘‘डिफ्तेरिया’’ म्हणजेच ‘‘घटसर्प’’. कोकणीमध्ये आम्ही त्याला ‘कोटेल’ म्हणतो. तो जंतू म्हणजे सी. डिफ्तेरि – भयंकर विषाणू ज्याने घशाला संसर्ग होऊन घशावर, टॉन्सिल्सवर लवचीक पदार्थ साचला जातो व त्या रोगात मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘पी’’ म्हणजे ‘‘परट्यूसिस’’ – ‘‘हुपिंग कफ’’. हूपचा खोकला, कोल्हे खोकला(डांग्या खोकला). या रोगाचा संसर्ग झाल्यावर रोगी कोल्ह्याप्रमाणे ‘‘कुई’’सारखा आवाज काढत खोकायला लागतो. या रोगात मुलांची छाती भरून येते. न्यूमोनिया होऊन मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘टी’’ म्हणजे ‘‘टिटॅनस’’- ‘धनुर्वात’. हा महाभयंकर रोग म्हणून चर्चिला गेला. तुम्हाला माहीत असेल सटवाई आई ही एका मुलाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मुलाला न्यायला यायची. सगळी घरातील लोकं त्या रात्री जागवायची. दरवाजावर आडवी झोपायची. डबे, ढोल वाजवायची.
खरे म्हणजे या अंधश्रद्धेमागे खोच होती. त्या काळात गरोदर बायका आपल्या घरातच बाळंत व्हायच्या. गावातील सुईण बाई घरी यायची. घरातील एक खोली सारवायची, साफ करायची, मग सगळे बाळंतपण घराच्या त्या खोलीतच उरकायची. मुलाची नाळ कुठल्याही धारदार वस्तूने कापायची. एकेकदा ठेचायची. त्याने मुलांना धनुर्वात व्हायचा व सात दिवसांच्या आत मूल मरायचे.
आज धनुर्वातावर टीटी या लसीचे गरोदर बाईला एक किंवा दोन इंजेक्शने देतात. दुसरे बाळंतपण पहिल्यानंतर दोन वर्षांच्या अगोदर आले तर एकच इंजेक्शन नाहीतर दोन.
मूल जन्मल्याबरोबर दीड महिना त्याच्या रक्तात आईच्या रक्तातील अँटीबॉडीज आलेल्या असतात. तेव्हा डीपीटीचे पहिले इन्जेक्शन मुलांना दीड महिन्यावर, दुसरे व तिसरे दर ४ ते ६ आठवड्यानंतर म्हणजे सगळी तीन इन्जेक्शन. मग दीड वर्षानंतर डीपीटीचे बुस्टर डोस व त्यानंतर पाचव्या वर्षी डीटीचा बुस्टर डोस. बुस्टरचा डोस नेहमी रोगाविषयी रक्तात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीची तीव्रता तशीच ठेवण्याकरता असतो.
मुलांना १० वर्षानंतर मूल जेव्हा पाचवीत असते तेव्हा टीटीचे इन्जेक्शन देता येते. मग १५ वर्षांनंतर १० वीत असल्यावेळी. त्यांच्या मधल्या काळात या लसीकरणाची गरज नाही. लसीकरण हे फक्त मुलांमध्येच विचारात घेतलेले आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले लोक अंधश्रद्धेविषयी बोलणार नाही.
धनुर्वाताचा जंतू म्हणजे सी. टिटॅनी- हा जखमांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतो. तो जंतू मातीत असतो… धुळीत असतो. हा जंतू शरीरात ‘टिटॅनो स्पाझमिन’ नावाचे विष निर्माण करतो व हे विष मज्जातंतूंवर हल्ला करते. रोगी लवकरच दगावू शकतो. डीपीटीच्या लसीकरणाने मरणाचे प्रमाण खालील टक्केवारीने कमी झाले…
घटसर्प – ९५% ; हुपिंग कफ – ८० ते ८५% आणि धनुर्वात – १००%.
पूर्वी अमेरिकेत वर्षाकाठी धनुर्वाताच्या ५८० केसेस दिसायच्या. त्यातल्या ४७२ दगावत असत. आज लसीकरणानंतर वर्षाकाठी फक्त ४१ रोगी सापडतात व त्यातले ४ दगावतात.
कोल्हेखोकला हा रोग संसर्गजन्य आहे. त्याला ‘‘शंभर दिवसांचा खोकला’’ असेही म्हटले जाते.
दर वर्षी लसीकरणाअगोदर या रोगाने जगभर ४८.५ लाख रोगी सापडायचे व त्यातले तीन लाख मरायचे. १९९० साली तो आकडा एक लाख ६७००० वर पोहोचला तर २०१० मध्ये ८१००० रोगी दगावले. १९१२ साली अमेरिकेत सोळा राज्यात या रोगाचा प्रसार झाला. वॉशिंग्टन, विरमॉंट, विनकॉनसीन या राज्यात रोगी. कारण कोणते?…
ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना या रोगाविषयीची लस घेण्यास अटकाव केला त्यांनाच हा रोग झाला. आज परत एकदा लसीकरण मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे व हा रोग तेथे आटोक्यात आलेला आहे.
त्यानंतर आपण विचार करणार आहोत- ‘‘गोवर (मिझल्स)’’ या रोगावरील लसीकरणाविषयी. ही लस लहान मुलांना इन्जेक्शनद्वारे देण्यात येते. पहिला डोस नऊ महिन्यावर देण्यात येतो तर सव्वा वर्षावर ‘एम.एम.आर.’चा डोस दिला जातो. ०.५ सीसी याप्रमाणे त्वचेखाली डोस दिला जातो.
गोवर या लसीचा शोध १९६३ साली लावण्यात आला व १९६८ साली लस तयार झाली. एम.एम.आर.ची लस १९६७-६९ या दरम्यान तयार झाली व मुलांना ही लस १९७१ सालापासून देण्यात आली.
गोवर’लाही लोक मग देवीच मानायचे. कांजण्यासारखेच दोन्ही रोग व्हायरसमुळेच होतात. खूपच संसर्गजन्य रोग आहे हा. गावातील सगळी मुले आजारी पडायची. न्यूमोनियाने रोगी मुले दगावायची. आज लसीकरणामुळे मरणार्‍यांची संख्या खूपच कमी झालेली आहे.
लसीकरण केल्यावरही मुलांना ‘‘गोवर’’ होतो?
हो..! लसीकरण केल्यावरही हा आजार मुलांना होऊ शकतो कारण गोवर या रोगाचे जंतू तीन ते चार प्रकारात मोडतात. एकाच प्रकारावर लस उपलब्ध आहे, बाकीच्यांची नाही. तेव्हा वेगळ्या प्रकारचे गोवरचे जंतू जर शरीरात प्रवेश करते झाले तर मुलांना गोवरचा आजार होऊ शकतो. पण लसीकरण केलेल्या मुलांना कमी प्रमाणात पुरळ उठतो. तापाचे प्रमाण पण कमीच असते.
अमेरिकेत गोवर २००० सालापासून नेस्तनाबूद झाला. तरीही भारतात २००५ साली गोवरचे रोगी सापडले. ज्या मुलांना त्यांच्या पालकांनी लसीकरण करविले नव्हते त्यांच्यातच हे रोगी सापडले.
आज लसीकरणात भर पडलीय ती दोन लसींची-
१. हिपॅटायटीस-बी आणि २. जापनीज एन्सेफेलायटीस (मेंदूज्वर).
१) हिपॅटायटीस-बी ची लस १९८१ पासून तयार झाली. या दोन सालात भारत सरकारने आपल्या या लसीकरण कार्यक्रमात या लसीचा अंतर्भाव केला.
या लसीचे तीन डोस एक महिन्याच्या अंतराने दिले जातात. हे डोस डिपीटीबरोबर दीड-अडीच-साडेतीन महिन्यावर बालकाला दिले जातात. या लसीमुळे २५ वर्षापर्यंत मुलाला प्रतिकारशक्ती मिळते.
या लसीमुळे मुलामध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे.
२) मेंदूज्वर ची लस अमेरिका, ऑस्टे्रलिया व युरोप राष्ट्रांत २००९ सालापासून देण्यात येते. ही लस इन्जेक्शनद्वारे ९ व्या व १८ व्या महिन्यात देण्यात येते.
हा लसीकरणाचा कार्यक्रम ठरला. मुलांना लसीकरणाबरोबर व्हिटामिन ‘अ’चे डोस देण्यात येतात.
मंडळी, तुमच्या मुलांना देण्यात येणार्‍या प्रत्येक लसीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या लसीमुळे कोणत्या रोगांपासून तुमचे मूल मुक्त राहू शकते ते जाणा- व माझ्यावर तेवढे तरी उपकार कराच! काळजी घ्या!



------नवप्रभा

Tuesday 5 August 2014

रानातून आणलाय रानमेवा



पावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात. शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच, कोणतीही मशागत-मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो.  श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात. या भाज्या एखाद्याच महिन्यात, तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात, त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी, चव चाखावी आणि त्यांचा आस्वादही जरूर घ्यावा. अळंबी – आजकाल बारा महिने मिळणारी पावसाळी भाजी म्हणजे अळंबी. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार आहेत. अळंबी थंड व गोड आहेत. यालाच आपण मशरूम असे म्हणतो. ते शक्तीवर्धक असून पचनास थोडे जड, पौष्टिक आहेत. यात भरपूर प्रथिने असल्याने आहारात सावधगिरी बाळगणार्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व सोडियमचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे आहे. यात ‘‘ब’’ जीवनसत्त्वाचे उपघटक ५ ते ३० % पर्यंत आहेत. त्यामुळे मशरूम ही भाजी आपल्या आहारात आलटून पालटून असावीच. टाकळा, फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, भारंग, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, वेगवेगळे कंद आदी विविध प्रकारच्या भाज्या पावसाबरोबर जमिनीतून उगवून येतात आणि स्थानिक गावकऱ्यांच्या, आणि अपवादाने का होईना पण मुंबईकरांच्याही ताटात दिसू लागतात.

केवळ पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या या रानभाज्यांचे दर्दी मोजकेच असले, तरी एकदा या रानभाज्यांची चव जिभेवर रुळलेले खवय्ये ठरलेल्या ठिकाणी बसणाऱ्या आपल्या ठरलेल्या भाजीवाल्याकडे आवर्जून या
भाज्यांची चौकशी करतात. या भाज्यांचा मोसम जेमतेम दोन-तीन महिन्यांचा. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनपासून ते फार फार तर सप्टेंबरपर्यंत या रानभाज्या असतात. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुले, शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. प्रामुख्याने या भाज्या मिळतात मुंबईच्या उंबऱ्यावरच्या पालघर, सफाळे, वसई, कर्जतजवळच्या लहान- लहान गावांमध्ये. या गावांमधल्या महिला, मुलं पहाटे, खरं तर मध्यरात्रीच या भाज्या खुडण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे अडीच-तीन वाजताच त्यांचे काम सुरू होते. गावात, खाचरांच्या बांधांवर, डोंगरउतारावर उगवणाऱ्या या भाज्या गोळा करून त्या बाजारात घेऊन येतात. मुंबई- उपनगरांत भाजीविक्री करणारे भाजीवाले रानभाज्या खरेदी करून पहाटेच मुंबईच्या दिशेने निघतात. पहाटे चार-पाच-सहा वाजता पालघरहून निघणाऱ्या रेल्वेमध्ये असे भाजीवाले अनेक असतात. पावसाळ्यात त्यांच्या टोपलीत या रानभाज्यांच्याही जुड्या असतात. या भाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात. त्यातही प्रत्येक भाजीचा सीझन वेगवेगळा असतो. गणपतीपर्यंत या रानभाज्या हळुहळू संपत येतात.

या रानभाज्यांचे बी पेरावे लागत नाही. त्याला खतपाण्याचीही आवश्यकता नसते, कीटकनाशके- औषधे यांचाही वापर केलेला नसतो. त्यामुळे या भाज्या पूर्णतः नैसर्गिक, शुद्ध असतात सध्या उच्चभ्रू वर्गात असलेल्या ' ऑरगॅनिक फूड ' च्या फॅडला या भाज्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

पालघरजवळच्या अनेक भागांमध्ये अनेक कुटुंबांमधल्या व्यक्ती पावसाळ्यात रानात फिरून अशा भाज्या गोळा करून भाजीविक्रेत्यांना विकतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही पद्धत सुरू आहे. पावसाळ्यात या भाज्या मुद्दामून खाव्यात, विशेषतः मराठी कुटुंबांकडून या भाज्यांना अधिक मागणी असते, मराठी वस्त्यांमध्ये या भाज्यांची टोपली घेऊन बसलेले विक्रेते दिसतात, असेही ते सांगतात.


पावसाळ्याच्या काळात या गावांतील स्थानिकांच्या आहारात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या भाज्यांमुळे स्थानिकांना अल्पकाळापुरता रोजगारही मिळतो. शहरी वर्गाच्या कीचनमधून या भाज्या गायब झाल्या असल्या, तरी काही घरांमध्ये या भाज्या आवर्जून शिजवल्या जातात. स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण असलेल्या या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात, असे म्हटले जाते. मात्र या रानभाज्यांमधली व्हरायटी शहरी-उपनगरी भाजी बाजारात तेवढी पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात टाकळा, फोडशी या भाज्याच मुबलक प्रमाणात दिसतात. एरव्ही शेवग्याच्या शेंगा, अळू या जरा गावरान प्रकारांच्या सोबत या भाज्या दिसतात. अळंबीसारखी एकेकाळची गावरान भाजी आज मश्रूमच्या रुपाने फाइव्हस्टार हॉटेलच्या मेन्यूकार्डचा, एलिट सर्कलचा भाग झाली आहे. तेवढ्याच स्वादिष्ट असलेल्या रानभाज्या काही मोजक्यांच्या रसोईचा भाग आहेत. 


टाकळा : महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी ‘टायकळा’ किंवा ‘टाकळा’ म्हणून ओळखली जाते. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळय़ा पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तवात, रक्तपित्त यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खातात. पावसात होणारा खोकला, शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणं, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खावी.

गोमेटू : तोंडलीसारखी लांबट हिरवी फळं या भाजीला येतात. आमटीत किंवा भाजीत ही फळं घातली असता त्या पदार्थाच्या चवीत वाढ होते. या दिवसात चिखल्यांमुळे पायाला जखमा होतात. अशावेळी निखा-याच्या आगीवर ही फळं भाजून त्याचा गर पायाला लावल्यास जखमा ब-या होऊन पाय आधी जसे स्वच्छ होते तसेच होतात.

कुळू : गवताची पाती तसंच लव्हाळ्याप्रमाणे दिसणारी ही रानभाजी ‘फोडशी’ म्हणून ओळखली जाते. भिजवलेली मुगाची डाळ किंवा चणाडाळीत कांदा घालून केलेली ही भाजी अतिशय रुचकर लागते. या
भाजीमुळे पोटदुखी थांबते.

कुर्डू : कांदा-लसूण घालून केलेली कुर्डूची भाजी पोटासाठी सारक ठरते. या भाजीत लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयातील मुली, महिला यांनी ती आवर्जून खावी. कुर्डूची फुलं तसंच बियांची चटणी लघवीच्या विकारांवर औषधी ठरते.
कुडाच्या शेंगा : पोटाच्या आजारांसाठी ही भाजी गुणकारी समजली जाते. कोवळ्या कुडाच्या शेंगा मोडून, पीठ पेरून परतून केलेली भाजी या दिवसांत अनेक घरांत खाल्ली जाते. कुडाच्या शेंगाची भाजी आणि चटणी मूतखडय़ावर बहुगुणी समजली जाते. या कुडाच्या कांद्यांना अंकुर फुटल्यावर त्यांचीही भाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही अंकुर फुटलेल्या कांद्याची भाजी कृमी तसंच जंतूंवर गुणकारी ठरते.


कावळा : या भाजीला संस्कृत भाषेत ‘कचाय’ असंही म्हणतात. ओलं खोबरं घालून बारीक पानं असलेल्या कावळ्याची भाजी करतात. कच्च्या कावळय़ामध्ये गोडं दही आणि सैंधव मीठ घालून कोशिंबीरही केली जाते. ही भाजी कफदोषाच्या विविध आजारांवर गुणकारी समजली जाते.

कोळी : या नावाचा कीटक असतो, ते आपल्या सर्वाना माहीत आहेच; पण या नावाची भाजीही असते. या भाजीचं बळीराजाच्या आहारात विशेष महत्त्व आहे. शेतकरीराजा पाऊस पडल्यावर पेरणी, लावणीच्या कामाला लागतो. त्याही पूर्वी तो ‘कोळीच्या भाजी’चा नवेद्य आपल्या कुलदैवतेला दाखवतो.

कंटोळी : ‘कर्टुल’, ‘कंटोळं’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा-खोब-यासहित परतून केली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते.

भोपळयाचा वेल : भोपळ्याच्या कोवळय़ा वेलाची भाजी त्याच्या पानासकट केली जाते. या वेलीत लोह तसंच विविध क्षारांचं प्रमाण अधिक असतं. भोपळ्याच्या केशरी रंगाच्या फुलांच्या भाजीपासून मिळणारं लोह शरीराला पूरक ठरतं. फुलांची भाजी रक्तविकार आणि अंगाचा दाह कमी केल्यास उपयोगी ठरते.

सुरणाचा कोंब : पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कंद रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूंना हिरव्या रंगाची लांब पानं येतात. सुरणाच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार असतात. लाल तिखट, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ टाकून केलेली सुरणाच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.

शेवळ : ‘शेवळ’ किंवा ‘शेवळी’ ही करंगळीच्या जाडीची लाल, पिवळा तसंच जांभळय़ा रंगाची भाजी वातविकारांवर उपयुक्त ठरते. ही भाजी उकडवून तसंच सुकवून वर्षभरही वापरता येते. शाकाहरी तसंच मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या अन्नपद्धतीने ही भाजी तयार केली जाते.

चिवलाचे कोंब : ही भाजी म्हणजे बांबूंचे कोंब. पावसात नवीन बांबू रुजून वर येतात. त्या वेळी ते कोवळे असतात. त्या वेळीच हे बांबूचे कोंब खाण्यासाठी सर्वार्थाने वापरले जातात. पातळ कढण (सूप), भाजी करण्यासाठी ते योग्य असतात. या भाजीत क्षारांचं प्रमाण भरपूर असतं.


सोनअळंबी : अळंबीची खाण्यायोग्य जात म्हणजे सोनअळंबी. प्रथिनं आणि क्षारांचं भरपूर प्रमाण असणा-या सोनअळंबी या आकारानं लहान असल्या तरी पौष्टिक असतात. भाजी, मसाले भात, पुलाव, कढण मध्येही अळंबीचा वापर केला जातो.
बाफळी : पावसाळ्यात बद्घकोष्ठता आणि पोटदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यावर बाफळीची भाजी लाभदायी ठरते. या भाजीच्या बिया कांजण्या, देवी आदी रोगांवर औषध म्हणून तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

श्वेतकांचन : या भाजीच्या फुलांची भाजी दमा, खोकला, कफ, वायू, रक्तविकारावर औषधी ठरते.


चवळी : चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे ‘टॉक्सिन’ शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी पावसाळयात चवळीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा. या त्रासात भाजीचा रस पिण्यासाठी घ्यावा. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात ‘बोके’ म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते.

मायाळू : ‘पोतकी’, ‘उपोदिका’ ही ‘मायाळू’ या भाजीची काही नावं. या भाजीच्या लाल रंगाच्या वेलीवर हिरवी पानं उठून दिसतात. वात आणि पित्तदोषाचा नाश करणारी ही भाजी शुक्रधातूंची वाढ करण्यासाठी उपयुक्त असते. आजारपणात ही भाजी खाल्ली असता तोंडाला चव येते.


शेवगा : या वनस्पतीच्या पानं, फुलं आणि शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. शेवग्याला लाल, पांढरा आणि निळसर-काळपट अशा रंगाची फुलं येतात. यांपैकी लाल फुलं येणारा शेवगा आरोग्यदृष्टय़ा गुणकारी समजला जातो. फुलांची भाजी खाल्ल्याने लघवीस येणारा उग्र दर्प, जडपणा कमी होतो. मात्र जास्त घाम येणं, चक्कर येणं, नाकातून रक्त वाहणं, घसा सुकणं अशी लक्षणं दिसतात तेव्हा फुलांची भाजी खाऊ नये.

अळू : अळूच्या भाजीपासून देठी, ओले चणे-मका तसंच भुईमुगाच्या शेंगाचे दाणे, काळे वाटाणे, फणसाच्या आठळय़ा टाकून केलेली अळूचं साग (जे फतफतं, गरगाट म्हणून ओळखलं जातं), अळुवडय़ा हे पदार्थ तयार केले जातात. अळूच्या कंदांपासून म्हणजे अरवीपासूनही विविध पदार्थ तयार केले जातात. अळूची पानं तसंच देठात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही भाजी सर्वानी आवर्जून खावी. पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं. मात्र बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूच्या कंदापासून बनवलेली भाजी जपून खावी.


अंबाडी : अंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे. अळूची भाजी करताना अंबाडीची फळं तसंच पाल्याचा वापर केला जातो. फळांपासून सासव, किंवा कुठल्याही भाजीत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो. फळं वापरण्यापूर्वी ती तासावी लागतात. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी सांभाळून खावी.

वसूची भाजी : पावसाळ्यात ही मुबलक प्रमाणात आढळते. ‘पुनर्वसू’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. पांढरी आणि लाल असे या भाजीचे दोन प्रकार आहेत. साधारणपणे पांढ-या वसूचा भाजीसाठी उपयोग केला जातो. यकृताचे आजार, पोटात पाणी होणं, अंगावर सूज येणं, लघवीला कमी होणं या त्रासात पुनर्वसूची भाजी खावी.

हादगा : ही वनस्पती ‘अगस्ता’ या नावाने ओळखली जाते. शेवग्याप्रमाणेच हादग्याच्या कोवळय़ा पानांचा, शेंगाचा आणि फुलांचा जेवणात उपयोग केला जातो. भोंडल्याच्या खेळात खिरापतीत हादग्याच्या फुलांपासून तयार केलेल्या पदार्थाचा उपयोग केला जातो. जेवणानंतर सुस्ती येणाऱ्यांनी हादग्याच्या फुलांची भाजी नाचणीच्या भाकरीसोबत खावी.


प्रत्येक रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यातच नेहमीच्या भाज्यांचे वाढलेले दर पाहता अनेक ग्राहक रानभाज्याना विशेष पसंती देत आहेत. बहुतेक रानभाज्यांमध्ये औषधी गुण असल्याने भाजीची जुडी १० रुपये तर अळंबी ८० रुपये किलो दराने विकली जात आहे.
शेताच्या बांधावर किंवा माळरानावर मिळणारी भारंगी पोटाच्या विकारावर, दमा व खोकल्यावर गुणकारी आहे. कडवट चवीच्या कुडाच्या शेंगा मूत्रविकारावर उपयुक्त आहेत. टाकळाच्या भाजीमुळे रक्त शुद्ध होते. कोवळया अळूच्या पानांची भाजी जिभेला चांगली चव आणते. टाकळाची भाजी पचायला हलकी असते. तुरट चवीची ही भाजी पित्तनाशक आहे. बहुतेक सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असले तरी प्रत्येक भाजीत विपूल प्रमाणात लोह, तंतुमय पदार्थ तर इतर खनिज आहेत. तसेच या भाज्यांच्या वाढीसाठी रसायनिक खतांचा वापर होत नसल्याने ग्राहकांकडून यांना विशेष मागणी होत आहे.