Saturday 5 January 2013

गडकिल्ल्यांवरच्या देवी



शंभू महादेव जसे सह्यद्रीचे अधिष्ठान तसेच किंबहुना त्याबरोबरीनेच देवीचेदेखील अधिष्ठान आहे. सातवाहन, भोज, शिलाहार अशा अनेक राजवटींनी येथे साम्राज्य उभे केले, तेव्हा अनेक परकीय आक्रमणांना थोपवले ते सह्यद्रीनेच. सह्यद्रीच्या नसíगक देणगीचा आणि तेथील गडकिल्ल्यांचा समर्पक उपयोग केला तो छत्रपती शिवरायांनी. गडकिल्ले हे स्वराज्याचे खरे रक्षणकत्रे बनले. साधारण याच कालावधीच्या आसपास त्या त्या खोऱ्यातील पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा राबतादेखील वाढला होता. हाच काळ सध्या अनेक गडकिल्ल्यांवरील आढळणाऱ्या देव-देवतांच्या मूर्तीचा असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. काही त्यापूर्वीच्या देखील असू शकतील. अर्थातच त्याला ग्रामदेवतेच्या भावनेची जोड होती. गावकऱ्यांच्या जीवनात तिचे स्थान दुष्टांचे निर्दालन करणारी, संकटांचा सामना करणारी असेच होते आणि त्यातूनच गडकिल्ल्यांच्या आधाराने सह्यद्रीत अशा देवता स्थानापन्न झालेल्या दिसतात. हा साराच कालावधी अदमासे १७-१८ व्या शतकातला म्हणावा लागेल. अदमासे म्हणण्याचे कारण आपला इतिहास अनेक घटनांबाबत आजही अबोल आहे. यासंदर्भात ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर सांगतात, ‘‘इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासकांचा मुख्यत: भर राहिला आहे तो मूळ कागदपत्रांवर. काही अपवाद सोडता गडकिल्ल्यांवरील देवतांच्या मूर्तीबाबत फारशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने यावर फारसा अभ्यास झाला नाही.’’
किल्ल्यांचा विचार करताना साहजिकच सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो राजगड. राजांचा गड म्हणून ओळखला गेलला हा किल्ला. राजगडावर आपणास तीन देवींचे स्थान आढळून येते. गडाच्या सर्वोच्च ठिकाणी बालेकिल्ल्यावर प्रत्यक्ष ब्रह्मर्षीचे मंदिर आहे, तेथेच थोडय़ा खालच्या उंचीवर जननीदेवीचे मंदिर. अर्थात ही काही लढाऊ देवी नाही. गडाच्या पद्मावती माचीवर देवी पद्मावती स्थानापन्न झाली आहे. तेथे एक छोटासा तांदळादेखील आहे. इतिहासात मुगल आक्रमकांपासून आपले देव वाचावे म्हणून देवताला मूर्ती स्वरूप न देता तांदळाच पूजला जाण्याची प्रथा दिसून येते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत भटकताना अशा अनेक तांदळा देवता हमखास दिसतात. देवी पद्मावतीचे मूळ स्वरूप तांदळा असल्याचे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आप्पा परब सांगतात.
रायगडावरील शिर्काई
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्याच्या भव्यपणाची साक्ष देत आहेत. गडावर अनेक देवींच्या अस्तित्वाचे उल्लेख आढळतात. शिर्काई, भवानी, राणूबाई इत्यादी. पण मुख्य देवतेचा मान शिर्काईला मिळाला आहे. मोसे खोऱ्यातील शिरकवली गावच्या एका वीराने तिची स्थापना केली असे सांगितले जाते. पुढे शिवरायांच्या काळात तिची चांगलीच निगा राखली गेली. काही मूळ कागदपत्रांमध्ये शिर्काईच्या उत्सवासाठी खर्च झाल्याच्या नोंदी आहेत. शिर्काईच्या गोंधळासाठी वार्षकि नेमणूक नसे, पण खर्च मंजूर करण्याचा शिरस्ता असल्याचे या कागदपत्रात म्हटले आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दनिी असे हिचे स्वरूप आहे. १९३५ साली या मंदिरावर वीज कोसळली तेव्हा मंदिराला व मूर्तीला तडा गेला. तिथूनच काही अंतरावर नवीन मंदिर बांधून या मूर्तीची पुनस्र्थापना करण्यात आली.

पद्मावती माचीमुळे देवीचे नाव पद्मावती की देवीमुळे माचीचे नाव हा प्रश्न शिल्लक राहतोच. खरे तर आपल्या अनेक किल्ल्यांच्या बाबतीत हा गुंता सुटलेला नाही.
गडावर असलेली तिसरी देवी आहे, दक्षिणेची देवी काळेश्वरी. सुवेळा माची आणि संजीवनी माचीला जोडणाऱ्या वाटेवर एका कुंडापाशी ही काळेश्वरी आहे.
राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात असताना पद्मावती देवीच्या मंदिराची चांगली निगा राखली गेली. याच मंदिरामध्ये आणखीन एक देवीची मूर्ती आपणास आढळून येते. राजगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि तेथे असणारा डोंगर भटक्यांचा आणि गडप्रेमींचा राबता यामुळे पद्मावती देवीची पूजा वगैरे होत असते. भोरच्या पंत सचिवांनी पद्मावतीचा जीर्णोद्धार केला. याच भोर संस्थानाच्या अधिपत्याखाली कोंकण आणि देशाच्या सीमेवर असणारा पालीजवळील सुधागडदेखील होता. या डोंगराला भोराईचा डोंगर, किल्लादेखील म्हटले जाते. याच संदर्भात इतिहास अभ्यासक आणि लेखक भगवान चिले सांगतात, ‘‘भृगू ऋषींनी गडावर देवीची स्थापना केली. त्यामुळे भृगूअंबा, भोरंबा व सध्या भोराई असा हिचा प्रवास झालेला दिसतो. भोराई ही भोर संस्थानाच्या पंत सचिवांचे कुलदैवत, त्यामुळे त्याची निगा चांगल्या प्रकारे राखली आहे. समोर दीपमाळ व सभामंडप आहे.’’ भोर संस्थान म्हणून ही भोराई असे वाटणे केवळ योगायोग म्हणावा लागेल. पालीतील अभ्यासक उपप्राचार्य सुधीर पुराणिक सांगतात, ‘‘१७०५ मध्ये भोर संस्थानाने गडावर वाडा बांधला तर १७५० मध्ये मंदिराला सभामंडप बांधला. आश्विनात नवरात्राचा मोल्ला उत्सव किल्ल्यावर होत असे. त्यासाठी संस्थानातून नियमित नेमणूक होत असे. मध्यंतरी काही काळ हा उत्सव बंद झाला होता. सध्या पालीतील मान्यवर आणि पायथ्याचे ग्रामस्थ दरवर्षी नवरात्र साजरे करतात. उत्सवाचा सारा खर्च भोराई मंदिर ट्रस्ट लोकवर्गणीतून करत असते.’’

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे थोर अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरें यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ‘महाराष्ट्र हा मूळचा शक्तीचा पुजारी. शक्ती म्हणजे देवी. साऱ्या जगाची, प्रत्येक कुळाची आणि प्रत्येक गावाची राखण करणारी आई. ती कुलदेवतेचे रूप घेऊन कुलांचा सांभाळ करते, तर कधी ग्रामदेवीचे रूप घेऊन गाव राखते. पदूबाई, कळमजाई, फिरंगाई, मेसाई, मुक्ताई, तुळजाई अशा कितीतरी विचित्र नावांनी ती महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात नांदते आहे. कुठे डोंगराची स्वयंभू कपार, कुठे अनघड तांदळा, कुठे उभी शीला तर कुठे सर्व अवयवांनी नटलेली मूर्ती अशा अनेक रूपांनी तिची पूजा होते.

सह्यद्रीतील गडकिल्ल्यांवर सर्वच देवतांना असे भाग्य लाभतेच असे नाही. जुन्नरजवळील जीवधन किल्ल्यावरील जिवाईदेवी मात्र अजूनही उन्हात अशीच उभी आहे. चतुर्भुजा अशी पूर्णपणे शस्त्रसज्ज अशी तिची मूर्ती अजूनही बऱ्यापकी शाबूत आहे. तर लोणावळ्याजवळील घनगडावर वाघजाई देवी गुहेत स्थानापन्न आहे. अँबी व्हॅलीजवळील कोरीगडावर कोराई देवीचे मंदिर आहे. दीड मीटर उंच अशा शस्त्रसज्ज मूर्तीची मूळकथा अजूनही उलगडली नाही. असाच प्रश्न जुन्नरजवळील ‘चावंड किल्ल्यावर चामुंडा देवीबद्दल उपस्थित होतो. चामुंडा ही म्हैसूरकडील देवी. मग येथे ते नाव कसे आले. जुन्नर ही त्याकाळी मोठी बाजारपेठ होती. तेथे आलेल्या कोणा म्हैसुरी व्यापाऱ्याने हिची स्थापना केली का, की चावंड किल्ल्यावरील म्हणून चामुंडा याकडे इतिहास अभ्यासक शिल्पा परब यांनी लक्ष वेधले आहे. कोराई देवीबद्दल दुर्ग अभ्यासक लेखक प्र. के. घाणेकर एक वेगळीच कथा सांगतात. ‘‘सन १८१८ ला जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, तेव्हा कोराई देवीच्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने होते. इंग्रजी अधिकाऱ्यांनी हे दागिने येथून नेऊन मुंबईतील मुंबादेवीला घातले.’’
सह्याद्रीच्या कडेकपारीत निवास करणाऱ्या या देवतांबद्दल ग्रामस्थांकडे अनेक कथा प्रचलित असतात. मुरबाडनजीकच्या सिद्धगडावरील नारमाता देवीबद्दल माचीवरील ग्रामस्थ वेगळीच कथा सांगतात. नारमाता आणि कळंबजाई दोघी भीमाशंकराच्या भगिनी. देवीचा अभ्यास सांगतो की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहे. दुर्गा म्हणून जी रूपे आहेत ती मुख्यत: पार्वतीची. पण सिद्धगडावर नारमातेला शंकराच्या भगिनी संबोधले आहे. नारमाता सिद्धगडावर तर कळंबजाई भीमाशंकरला. सिद्धगडावरील पुजारी कळंबजाईच्या पूजेला गेले तर पालखीचा पहिला मान त्यांना दिला जातो. माळशेज घाटातील भरवगडावर आदिवासींची देवी आहे, अर्थातच तांदळा. त्याला चांदीचे डोळे, पाळणा दिला जातो. बऱ्याच ठिकाणी नावांचा उलगडा किल्ल्याच्या आधारे देखील होत नाही. जसे नारायण गडावरील हस्ताबाई. हस्त नक्षत्र आणि देवी असा काही संबंध येऊ शकतो का, यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. तर कोंकणातील कांगोरी - मंगळगडावर जी देवी पुजली जाते ती मुळात भरोबाची मूर्ती आहे. पण आता ग्रामस्थांमार्फत तिची देवी म्हणूनच ओळख आहे. तोरणा किल्ल्यावर मेंगाई आणि तोरणजाई अशा दोन देवींच्या मूर्ती आढळतात. काही ठिकाणी दैवते चांगल्या प्रकारे टिकून आहे याकडे दुर्ग अभ्यासक पराग लिमये लक्ष वेधतात. सातारा पंढरपूर रस्त्यावरील पुसेगावच्या जवळ वर्धनीचा डोंगर म्हणजे वर्धनगड आहे. गावातील कारखानीस यांच्याकडे देवीचे सर्व जुने दागिने सुरक्षित आहेत. नवरात्रीमध्ये येथे मोठ्ठा उत्सव असतो. दागिन्यांनी सजवलेल्या देवीची पालखी असते. पंचक्रोशीत देवीची प्रसिद्धी असल्यामुळे मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार झाला आहे.

प्रतापगडावरील देवी भवानी
प्रत्यक्ष शिवरायांनी प्रतापगडावर आपल्या कुलदेवतेचे मंदिर असावे म्हणून हिची स्थापना केली. देवी घडविण्यासाठी खास गंडकी नदीतून शिळा आणण्यात आली. त्या शिळेतून तुळजा भवानीचे मूíतमंत रूप साकारले गेले.
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई म्हणजे कळसू देवीचे स्थान. कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावले, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय. येथे देखील मूर्ती नसून भला मोठ्ठाा तांदळा आहे. कर्नाळा किल्ल्यावरील देवीला कोणी करनाई तर कोणी भवानी म्हणते, अलिबागच्या किल्ल्यातील पद्मावती, अजिंक्य ताऱ्यावरील मंगळादेवी, कोल्हापूरजवळच्या रांगणा किल्ल्यावरील रांगणाई, कुर्डूगडाच्या पायथ्याला जगज्जननी अशा अनेक देवींचे दर्शन किल्ल्यांवरील भटकंतीत घडत असते. महाराष्ट्रात सुमारे ३५० च्या आसपास किल्ले आहेत. सर्वच किल्ल्यांवर देवीचे स्थान नाही. बारा मावळातील किल्ल्यावर मात्र हमखास देवीची मूर्ती पाहायला मिळते. ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसली तरी पंचक्रोशीतील गावांमध्ये अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. काही दंतकथा तर काही लोककथा. अर्थात अशा माध्यमातून का असेना पण या दैवतांची माहिती आज उपलब्ध होत आहे. या साऱ्याच विषयाचा आवाका प्रचंड आहे. मूळ संदर्भ न मिळणे, ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसणे असे अनेक अडचणींचे डोंगर आहेत. या सर्वातून मार्ग काढत या विषयाचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. अन्यथा डोंगरमाथ्यावरीलही ग्रामदैवतांच्या इतिहासास आपण पारखे होऊ.
------- लोकप्रभा 

No comments:

Post a Comment