Thursday 23 February 2012

तुळजापूरची भवानी आई









महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांची 'कुलस्वामिनी', रामाची 'वरदायिनी', भक्तांच्या हाकेला धावून जाणारी 'त्वरिता' उर्फ 'तुकाई'. भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव कोजागिरीपर्यंत चालतो.

........
 उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत.

  कृतयुगाच्या वेळी 'कर्दम' ऋषींची पत्नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुन्कुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही त्वरीत धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा या नावाने तुळजापूरची देवी माहीत झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना सुराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असं म्हणतात त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली.

बालाघाट डोंगराच्या सान्निध्यात असलेले तुळजाभवानीचे हे मंदिर अतिप्राचीन असून, मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. देवीची मूर्ती गंडकी शिळेची असून, ती अष्ट भुजाधारी आहे. हातात भाला, त्रिशूल, शंख, वज्र, सुदर्शन चक्र आहेत. तुळजाभवानीची मूर्ती चल असून, ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते. इतर कोणतीही देवता अशा रीतीने सिंहासनावरून हलवण्यात येत नाही. 



श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूस पोस्ट ऑफिस आणि उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय असून, तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.


या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.


गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.
       
सभामंडप ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.


भादपद वद्य अष्टमीला नवरात्रापूर्वी प्रथम ही मूर्ती हलवण्यात येऊन अश्विन शुद्ध प्रतिपदेस पुन्हा स्थानापन्न करण्यात येते. दसऱ्याला सीमोल्लंघन केल्यानंतर पुन्हा विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ती मंचकी निदेत असते. तसंच पौष शुद्ध प्रतिपदेपासून पौष अष्टमीपर्यंत पुन्हा ती शेजघरात निदिस्त असते.

तुळजाभवानीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर १३९८ चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जातं. तुळजाभवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर इथं आहे.

तुळजापूर इथे आश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र महोत्सवास प्रारंभ होतो. तत्पूर्वी भादपद कृष्ण अष्टमीच्या दिवशी सायंकाळी देवीची महापूजा झाल्यानंतर देवीजींची मंचकी निदा सुरू होते. अश्विन शुद्ध एक हा दिवस घटस्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवीला पहाटे सिंहासनावर आरुढ केले जाते. आणि दुपारी बारा वाजता विधिवत घटाची स्थापना केली जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दोन वेळा अभिषेक पूजा होते. आश्विन शुद्ध नवरात्रीच्या रात्री या परिसरातील लोक रात्री जागरण करतात. रात्रभर भक्तीगीते आळवून देवीची उपासना करतात.

नवमीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर इथून देवीच पालखी आणि भिंगार इथून पलंगपालखी तुळजापूरला येते. विजया दशमीच्या दिवशी पहाटे बुऱ्हानगरच्या पालखीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या प्रतिमेस १०८ नऊवारी साड्यांचे वेष्टन दिलं जातं. याला 'दिंड' म्हणूनही संबोधण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी सीमोलघनानंतर भिंगार इथून आलेल्या पलंगावर देवीजी पुन:श्च निदाधीन होतात. आश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा हा कालावधी असतो. या दरम्यान ज्या पालखीत तुळजाभवानीची प्रदक्षिणा निघते, ती पालखी होमकुंडात जाळली जाते आणि पालखीचा दांडाच फक्त परत घेऊन पालखीचे मानकरी परत जातात.

कोजागिरीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या भक्तगणांच्या स्वागताला तुळजापूर सज्ज झालेलं असतं. 


हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. तुळजापूर हे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी तर सोलापूर या जिल्हा केंदापासून ४४ किमी अंतरावर आहे.
        
उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.


प्रेक्षणीय स्थळे:-


१)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.


२)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.


३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे.


४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे.


५)रामवरदायणी -येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.


६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.


७)गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.


८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे.


९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य महाराजांचा आश्रम येथे आहे


१०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.





No comments:

Post a Comment