Tuesday 21 February 2012

ज्वारी माहेरपणाला मुकली.!



------------------------- 





ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धान्य उत्पादनाचा पॅटर्न झपाट्याने बदलत आहे. ज्वारीचे हे कोठार आता ओस पडत असून मागील तीन वर्षांत तर जिल्ह्यातील रबी ज्वारीच्या क्षेत्रात १८ हजार २५0 एकरने घट झाली आहे. किंबहुना गळीत धान्याचे क्षेत्रही मोठय़ा प्रमाणात घटल्याने जिल्ह्यातील धान्य सुरक्षितताच संकटात आली आहे.
बालाघाटच्या पर्वत रांगांमध्ये उस्मानाबाद जिल्हा पसरलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद व तुळजापूर हे तालुके पर्वत रांगांच्या कुशीत तर उर्वरित उमरगा, लोहारा व परंडा हे तालुके पठारावर आहेत. रबी ज्वारीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ज्वारीचे मुबलक उत्पादन होत असे. विशेषत: भूम आणि परंडा तालुक्यातील जवळा (नि), माणकेश्‍वर, भांडगाव, सिरसाव येथे टपोरी मालदांडी तसेच दगडी, गोटा, गुळभेंडी, झिपरी या ज्वारीचे भरघोस उत्पादन घेतले जात असे. परंडा तालुक्यातील ज्वारीला राज्यात वेगळी ओळख होती. आणि हे सारे पावसाच्या पाण्यावर पिकत होते.
ज्वारी वगळता दुष्काळी भाग म्हणून भूम आणि परंडा या तालुक्यांकडे पाहिले जात असे. हे चित्र आता बदलत आहे. परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याबरोबरच सिंचनाचे विविध प्रकल्प यामुळे जिल्ह्यातील सिंचनात लक्षणीय वाढ झाली आहे. एकट्या लघु पाटबंधारे विभागातर्फे जिल्ह्यात ३५ सिंचन तलाव, ३४९ पाझर तलाव, ४0 गाव तलाव, ९१५ कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे व ४ हजार २६९ जवाहर विहिरींची कामे झाली आहे. जिल्ह्यात ४५0१६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे ज्वारी आणि गळीत धान्याचे पारंपरिक पीक घेणारा शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन या नगदी पिकांकडे वळला आहे. ज्वारीबरोबरच गळीत धान्याचा पेरा घटला. एकूणच जिल्हय़ातील पीक उत्पादनाचा समतोल ढासळत गेला. उत्पादनात घट झाल्याने भूम आणि परंड्यातील शेतकर्‍यांनाही आता इतर भागातून ज्वारी आयात करावी लागत आहे. यंदाच्या वर्षी तर ज्वारीचे माहेर असलेल्या या जिल्ह्यातून रबी ज्वारी हद्दपार होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी बारा ते तेरा रुपये किलोने मिळणारी ज्वारी यंदा तीस ते पस्तीस रुपयाच्या घरात गेल्याने ज्वारीऐवजी तुलनेने स्वस्त असलेल्या गव्हाकडे ग्राहक वळल्याचे चित्र आहे.
काळ्या मातीच्या जमिनीच बाद
कोट्यवधींची गुंतवणूक करून दुष्काळी भागात धरणे उभी राहत आहेत. या धरणातील बहुतांश पाण्याचा वापर उसासाठी होत असल्याचे दिसू लागले आहे. शेतकर्‍याचा विकास केवळ ऊस उत्पादनामुळेच होवू शकतो, हे एकांगी चित्र डोक्यात बसल्याने शेतकरीही ज्वारी, भुईमूग, हायब्रीड या पिकांऐवजी मोठय़ा संख्येने उसाकडे आणि अलिकडे द्राक्षबागांकडे वळत आहे. पर्यायाने काळ्या मातीच्या जमिनी बाद होवू लागल्या आहेत.
तीन वर्षांत ज्वारी
उत्पादनात ७३00 हेक्टर घट
तालुका २00७ २0११
उस्मानाबाद ३५८00 ३४६00
परंडा ८७८00 ८५000
भूम २२५00 २२२00
कळंब ३५२00 ३४000
लोहारा ७000 ५२00
तेलाचे घाणे इतिहासजमा
करडई, सूर्यफूल, भुईमूग, जवस या पिकांकडेही शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसते. पर्यायाने जिल्ह्यातील पारंपरिक तेलाचे घाणे बंद पडले. २00७ च्या तुलनेत गळीत धान्याच्या उत्पादनात २४ हजार १00 हेक्टरने घट झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. लोक आता सोयाबीन आणि पामतेलाकडे वळल्याचे दिसते. २00७ मध्ये जिल्ह्यात ६९ हजार ६00 हेक्टर गळीत धान्याचे क्षेत्र होते. २0११ मध्ये हे क्षेत्र ४५ हजार ५00 हे. उरले.



No comments:

Post a Comment