Thursday 1 March 2012

अभेद्य सिंधुदुर्ग




-------------------------------------------------------

सुमारे चार वर्षे मालवण किनाऱ्याजवळच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग या पाणकोटाचे बांधकाम चालू होते. महाराजांच्या इमारत खात्यावरील अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग तालेवारीने बांधून पूर्ण केला. किल्ल्यात आवश्यक त्या सर्व इमारती बांधून काढण्यात आल्या. सदर , धान्याची आणि बारुदगोळ्याची कोठारं , सैनिकांच्या करिता राहाण्याच्या अलंगा , श्रीभवानी आणि अन्य देवतांची मंदिरे , सरकारवाडा इत्यादी
बांधकामे पूर्ण झाली. समुदात जणू नवीन शिवलंकानगरी थाटली गेली. किल्ल्याची वास्तुशांत महाराजांनी साजरी केली. त्यावेळी त्यांनी किल्ल्यास नाव दिले ' सिंधुदुर्ग '.

समारंभ छान झाला.  या वास्तुशांतीचे पौरोहित्य दादंभट बिन पिलंभट उपाध्ये त्यांनी केले. सर्व कर्त्यासावरत्या कामगारांची महाराजांनी कौतुके केली. सुरतेहून आणलेली संपत्ती अशी सार्थकी लावली.
ते समयी महाराज दादंभट उपाध्ये यांस म्हणाले की , ' तुम्ही आता येथून पुढे कायमचेच किल्ल्यात राहाल काय ? देवदेवस्थानांची आणि किल्ल्यातील नित्यनैमित्तिक धामिर्क सणसमारंभांची सर्व व्यवस्था तुम्हीच पाहायाला हवी' हे दादंभट उपाध्ये संसारी होते. तरुण होते. किल्ल्यात पूजेअचेर्साठी आणि अन्य धामिर्क उपचारांसाठी कायमचे राहायचे तर गोष्ट आनंदाचीच होती. पण कायमची बांधिलकी वाट्यास येणार होती.
किल्ल्यातल्या लष्करी अधिकाऱ्यांसारखीच ही धामिर्क जबाबदारी महाराज दादंभटास सुचवीत होते. किती तासांनी किंवा दिवसांनी दादंभटाने महाराजांना आपली इच्छा होकाराथीर्च कळविली याची नोंद नाही. पण असे वाटते , की त्याच दिवशी त्यांनी महाराजांची इच्छा आणि गडाची सेवा स्वीकारीत असल्याचे निवेदन केले असावे असा अंदाज आहे.

बहुदा दादंभटाने आपल्या पत्नीचा विचार घेतला असावा. घेतला की नाही कोण जाणे! पण दादंभटाने हे काम स्वीकारले. त्यांच्यावर सिंधुदुर्गासाठी युद्ध करण्याची संरक्षणात्मक जबाबदारी कधीच पडणार नव्हती. पण किल्ल्यातील सैनिकांचे मनोबल आणि धामिर्क बाबतीतील पावित्र्य पूर्ण उत्साहाने टिकविण्याची जबाबदारी निश्चित अंगी पडणार होती. सिंधुदुर्गावर किल्लेदार , महालदार , सर्व लष्करी कारखानदार , पहारेकरी , गस्तवाले आरमारी आणि पूजाअर्चा करणारे गुरुजी आपापल्या कामांत रंगून गेले. १८ टोपीकर फिरंग्यांच्या , श्यामल सिद्द्यांच्या आणि इदलशाही गनिमांच्या उरावरी सिंधुदुर्गाचे जबरदस्त बलवान आरमारी ठाणे
महाराजांनी उभे केले.

सहज जाताजाता उल्लेख करावासा वाटतो की , हा सिंधुदुर्ग किल्ला अगदी अखेरपर्यंत कधीही शत्रूच्या कब्जात गेला नाही. अगदी इंग्रजी राज्य आल्यावरही सिंधुदुर्गावरती मालकी राहिली ती कोल्हापूरच्या छत्रपती
महाराजांकडेच मराठी मनाला अभिमान वाटावा आणि त्याची छाती शीडासारखी फुगावी असाच हा सिंधुदुर्ग आहे.
पुढे घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करावयाचा आहे. इ. १६८० नंतर रायगडावर राज्याभिषिक्त झाले. संभाजी महाराज छत्रपती सतत नऊ वषेर् मोगलांशी झुंज देत देत त्यांनी स्वराज्य ताठ मानेने युद्धमान ठेवले. सिंधुदुर्गही तसाच बुलंद होता. पुढे दुदैर्वाने शंभूछत्रपती महाराज आलमगीर हाती गवसले गेले आणि त्याने छत्रपतींना ठारही केले. धाकटे राजारामराजे छत्रपती होऊन राज्य राखू लागले. अन् याच (इ. १६९१ ते ९८ ) काळात या सिंधुदुर्गावर सागरी मार्गाने औरंगजेबाने स्वारी पाठविली. म्हणजे आता सिंधुदुर्ग काबीज करण्यासाठी मोगली आरमार येणार होते. ते उत्तरेकडून येऊ लागले. सिंधुदुर्गाला खबरा आल्या.
किल्ल्यास तांब्रांचा परीघ पडणार हे निश्चित झाले. ते समयी किल्ल्यातील किल्लेदार मोहिते याने युद्धाची बईजवार तयारी केली. धान्य , दारुगोळा , आणि जरूर त्या युद्धसाहित्याचा साठा सिंधुदुर्गात भरला जाऊ लागला. मोगली हल्ला केव्हाही येवो , आम्ही आगरी , कोळी , भंडारी अन् अठरापगड कोकणी माणसं महाराजांची माणसं आहोत अशा अभिमानाने अवघा सिंधुदुर्ग मोगली सुसरी मगरींची वाटच पाहू लागला. त्यावेळी किल्लेदार मोहिते याच्या मनी एक कोवळा विचार आला की , एकदा गडास मोगलाई वेढा पडला म्हणजे तो किती दिवस चालेल हे काय सांगता येतंय ?
कदाचित वर्षामागून वर्षसुद्धा. म्हणून किल्लेदाराने दादंभट गुरुजींस पुसलं की , गुरुजी मोगल येतात. झंुज लागणार. गनिमांचा आरमारी गराडा पडणार. आम्ही तर सिपाईच हो. आम्ही झुंजूच. पण तुमचे कैसे होईल ? एकदा गराडा पडला की मग बाहेर जाणे कठीण. तरी तुम्हांस आम्ही आत्ताच सुखरूप मालवणांस किंवा कडवाडांससुद्धा बायकामुलांनिशी पोहोचते करतो. काळजी करू नका. तरी विचार सांगावा. ' यांवर दादंभटाने ' किल्ल्यातील काम ' आम्हांवर सोपविले तेच कोणत्याही परिस्थितीत करीत राहण्याचा आपला विचार किल्लेदारास सांगितला.

मोगली आरमार आले. बारुदगोळा लोहाराच्या ठिणग्यासारखा चौफेर उडू लागला. गडाचं अवसान मोठं. गड किंचितही वाकेना. पण दिवसांमागून , महिन्यांमागून , वर्षही उलटलं. तरीही सिंधुुदुर्ग झुंजतच राहिला. किल्ला वाकला नाही. किल्ल्यातील अन्नधान्यही कमी होऊ लागले. तरीही किल्ला वाकला नाही.

पुढे तर किल्ल्यात पटकीची साथ उद्भवली. तरीही किल्ला वाकला नाही. किल्लेदारापासून ते रोज पूजाअर्चा करणारे लंगड्या दादंभटापर्यंत अवघा सिंधुदुर्ग दर्याभवानीच्या बळानं झुंजत राहिला. अखेर मोगल हरले. सिंधुदुर्ग बुलंद राहिला. बाका राहिला.

केवढं विलक्षण कथानक या सिंधुदुर्गाच्या भिंतीआड घडलं आहे. सिंधुदुर्गाच्या भिंती आणि दरवाजा वाट पाहतोय. एखाद्या मराठी प्रतिभावंत चित्रपट निर्मात्याची.


गडावर पूर्णत: फेरफटका मारण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तासांचा अवधी लागतो. गडावरील छोटय़ा-मोठय़ा वास्तू, बुरूज आता पूर्णपणे मोडकळीस आले असून त्याचे दगड इकडेतिकडे विखुरलेले 
आहेत.. गडाच्या चारही बाजूला समुद्र असला तरी गडावर आजही लाल मातीचं साम्राज्य आहे. त्यात एक गोडय़ा पाण्याची विहीर आहे.

 मराठय़ांच्या सागरी सामर्थ्यांची निशाणी असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला पाहायचा असेल तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला प्रथम यावं लागेल. मुंबई, पुणे, सांगली, सातारा
, कोल्हापूर इत्यादी ठिकाणाहून मालवण इथं येण्यासाठी एसटीच्या थेट बसगाडय़ा आहेत. तसंच  कोकण रेल्वेच्या मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-मडगांव पॅसेंजर या गाडय़ांनी आलात तर कुडाळ येथे उतरून मालवणला जाण्यासाठी दर तासाला एसटी बसेस मिळतील.. मालवणच्या धक्क्यावर आल्यानंतर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी फेरीबोट उपलब्ध असतात. या फेरीबोटमधून प्रवास करत असताना समुद्रातील लाटांमुळे व वाऱ्यामुळे जेव्हा बोट वर-खाली होते तेव्हा थरकाप उडतो; पण तरीही एकदा तरी पाहावा असा हा सागरी किल्ला आहे.





No comments:

Post a Comment