Thursday 15 March 2012

अतुल'निय नटरंग





मराठी चित्रपट सध्या फॉर्मात आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पाहायला लोक जाऊ लागले आहेत, चित्रपटांची संख्या खूप वाढलीय. निरनिराळे विषय हाताळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी चित्रपट निर्माते आणि अन्य व्यावसायिक आपला चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा सफाईदार असावा यासाठी आग्रह धरू लागले आहेत. पण विशिष्ट भूमिकेसाठी विशेष तयारी आणि मेहनत घेण्याचे प्रयत्न नटमंडळी करताहेत असे फारसे दिसत नाही. पण अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णी याला संपूर्णपणे अपवाद ठरला आहे. ‘नटरंग’ या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी अतुलने भारदस्त शरीरयष्टी धारण केली आहे.
‘बॅरिस्टर’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकांतून अतुलने आपल्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या होत्या हे सर्वानाच ठाऊक आहे. ‘देवराई’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’ यांसारखे मराठी तर ‘रंग दे 
बसंती’, ‘पेज थ्री’, ‘चांदनी बार’ यांसारख्या हिंदी सिनेमांतील अतुलच्या भूमिका लक्षात घेतल्या तर झी टॉकीजची पहिलीच स्वतंत्र निर्मिती असलेल्या ‘नटरंग’मध्ये अतिशय वेगळ्या स्वरूपाची ‘गणा’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
‘आयुष्यात कधीही व्यायाम केलेला नव्हता, किंवा त्याची आवडही नव्हती. पण या चित्रपटातील ‘गणा’ या व्यक्तिरेखेचा ‘ग्राफ’ पटकथेतून समजावून घेतल्यावर ८५ किलो वजनाचा पहिलवान असलेला तरुण शेतमजूर साकारायची तयारी करण्याचे ठरविले’, असे अतुल म्हणतो. अष्टपैलू अभिनेत्याला शरीरसौष्ठवाची तयारी करताना किती प्रयत्न करावे लागले यासंदर्भात सांगताना तो म्हणतो, ‘या भूमिकेला न्याय दिलाच पाहिजे असे वाटल्यानंतर परुळेकर जिम्नॅशियमचे सर्वेसर्वा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यायाम प्रशिक्षक शैलेश परुळेकर यांच्याशी संपर्क साधला आणि फक्त त्यांच्या सल्ल्यानेच व्यायाम करायचा आणि त्यानुसार दैनंदिन जीवनशैलीही विकसित करायचे आणि ‘भारदस्त गणा’ साकारायचा हे मनाशी पक्के ठरवले.
सप्टेंबरच्या दरम्यान या प्रक्रियेला सुरुवात केली. सुरुवातीला ४५ दिवसांच्या कालावधीत १५ किलो वजन वाढवले आणि नंतर शूटिंग सुरू केले.’ त्यासाठी प्रशिक्षक शैलेश परुळेकर यांनी प्रचंड परिश्रम घेऊन आपल्याकडून व्यायाम करून घेतला, असं अतुल सांगतो. इथे त्याची स्वत:ची मेहनतही दिसतेच, तो म्हणतो, ‘कोल्हापूरला शूटिंगदरम्यानही व्यायाम करण्यासाठी आवश्यक ती इन्स्ट्रमेंट्स शूटिंगस्थळी नेण्यात आली होती. कारण पडद्यावर ज्या पद्धतीने ‘गणा’ला पेश करायचे होते त्यासाठी शूटिंगच्या मधल्या वेळातही व्यायाम केला.’
या भूमिकेसाठी आमिर खानच्या गजनीप्रमाणे ‘८ पॅक्स बॉडी’ बनविण्याची गरज नव्हती तर कोल्हापूरच्या खेडय़ात राहणारा शेतमजूर असलेल्या पहेलवानाचे शरीरसौष्ठव असणे अपेक्षित होते. खास या भूमिकेच्या तयारीसाठी गेले सात महिने अतुल कुलकर्णीने एकही हिंदी चित्रपट अथवा कोणतेही नवीन काम स्वीकारलेले नाही. केवळ या भूमिकेसाठी आवश्यक असलेले पीळदार शरीर राखता यावे यासाठी मेहनत अतुलने मेहनत घेतली हे या कसदार अभिनेत्याचं वैशिष्टय़च आहे. आतापर्यंत मराठी चित्रपटातील एखाद्या कलावंताने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी कटाक्षाने स्वत:च्या जीवनशैलीत बदल करणे आणि हे सारे व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी करणे या सगळ्याच गोष्टी अपवादात्मक आहेत.
कोणतीही व्यक्तिरेखा साकारायची हे ठरविल्यानंतर त्याबद्दल विचार करताना आतापर्यंत आपण ‘आतून बाहेर’ अशा पद्धतीने विचार करत आलो. परंतु दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘गणा’ ही व्यक्तिरेखा समोर
कोणतीही व्यक्तिरेखा साकारायची हे ठरविल्यानंतर त्याबद्दल विचार करताना आतापर्यंत आपण ‘आतून बाहेर’ अशा पद्धतीने विचार करत आलो. परंतु दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘गणा’ ही व्यक्तिरेखा समोर ठेवल्यानंतर शेतमजूर पहेलवान ठेवल्यानंतर शेतमजूर पहेलवान साकारण्यासाठी शरीर कमावणे हा या व्यक्तिरेखेचा मूळ गाभा आहे म्हटल्यावर प्रथमच आपण भूमिकेचा विचार करताना ‘बाहेरून आत’ अशा पद्धतीने केला.
यासंदर्भात शैलेश परुळेकर यांच्याशी सविस्तर बातचीत करताना ते म्हणाले की, ‘व्यायामाची इक्वीपमेंट्स हे फक्त साधन असते. चांगली शरीरयष्टी कमवायची असेल किंवा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर शिस्त, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे, मेहनत करणे याशिवाय पर्यायच नाही. अतुल कुलकर्णी आपल्याला भेटल्यानंतर आम्ही सविस्तर चर्चा केली आणि मग व्यायामाला लागलो. सुरुवातीला दररोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम, फ्री हॅण्ड स्वरूपातले व्यायाम प्रकार असे सुमारे १० दिवस दररोज केले. त्या जोडीला डॉक्टरशी बोलून, अतुल यांची पूर्वीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, डॉक्टर, आहारतज्ज्ञ यांच्याशी विचारविनिमय करून नंतर आम्ही आहार काय असावा त्याचे वेळापत्रक ठरविले.
व्यायाम आणि आहार याला प्राधान्य देण्याचे ठरविल्यानंतर सकाळी ‘हेवी एक्सरसाइज’ म्हणजे छाती, थाइजचे व्यायाम तर संध्याकाळी पोटाचा व्यायाम तसेच बायसेप, ट्रायसेपचे व्यायाम अतुल यांनी केले. एक डिसेंबरपासून सुरू झालेले हे सत्र १० जानेवारीपर्यंत सुरू होते. दर तीन तासांनी कॉबो हायड्रेट्स, प्रोटीन्स, अंडी, मासे, फळे, प्रोटिन्सचा शेक असा आहार सलग ४५ दिवस सतत सुरू ठेवला आणि या सगळ्या गोष्टी करून ४५ दिवसांत ८५ किलो वजन वाढविण्यात आम्ही यशस्वी ठरलो.’ मात्र हे सगळे सांगताना एक गोष्ट परुळेकर यांनी आवर्जून नमूद करतात, ‘भूमिकेचा गांभीर्याने विचार करणे, त्यासाठी आवश्यक तो सर्व अभ्यास करणे हा त्यांचा गुण जसा वाखाणण्यासारखा आहे तितक्याच गांभीर्याने आपण दिलेल्या व्यायामाबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले, व्यायाम करण्याचा अजिबात कंटाळा केला नाही. वास्तविक ग्लॅमरच्या दुनियेतल्या तारेतारकांचे नखरे आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. पण कमालीची शिस्तबद्धता आणि बिलकुल खळखळ न करता प्रचंड मेहनत घेण्याची चिकाटी अतुल यांनी दाखविली म्हणून मलाही त्यांच्यासोबत काम करायला खूप समाधान मिळाले.’ अतुलचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मद्य, धुम्रपान सेवन ते कधीच करत नाहीत. त्यामुळेही इतक्या अल्प कालावधीत भूमिकेला साजेसे शरीर कमाविणे अधिक सहजशक्य झाल्याचे परुळेकर सांगतात.
‘नटरंग’च्या सुरुवातीला पहेलवानाची शरीरयष्टी असलेला गणा पुढे परिस्थितीचा सामना करत जगताना हळूहळू खंगत जातो. त्यामुळे वजन वाढविण्याबरोबरच वजन कमी करणेही क्रमप्राप्त ठरले. एक फेब्रुवारीपासून वजन घटविण्याचा हा व्यायाम तब्बल ३८ दिवस करताना दररोज १२ किलोमीटर धावणे आणि संध्याकाळी सर्किट ट्रेनिंग असा व्यायाम अतुलने केला आहे.

---- लोकप्रभा 

No comments:

Post a Comment